मुंबई -नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर सामान्य जनतेच्या अडचणी कमी कमी होत जातील आणि भ्रष्ट लोकांच्या अडचणीत वाढ होईल, असे सांगत काळ्या पैशाविरोधातील लढाई सुरुच राहील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानावर झालेल्या सभेमध्ये दिली . ज्या लोकांनी बॅंकांच्या मदतीने काळे पैसे पांढरे करण्याचा प्रयत्न केला ते शिक्षेस पात्र ठरतील असे ते पुढे म्हणाले.
आज त्यांच्या हस्ते येथे एकूण १ लाख कोटी रुपयांच्या मेट्रो आणि नागरी रेल्वेच्या विविध योजनांचा शुभारंभ झाला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.
भाजप सरकारने अनेक निर्णय घेतले परंतु नोटाबंदीचा हा निर्णय सर्वात मोठा होता. त्या निर्णयाचे समर्थन सर्व जनतेने केले. ही जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे पंतप्रधानांनी म्हटले.
शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करुन भाषणाला सुरुवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले कि , २०१४ च्या निवडणुकीला सुरुवात करण्यापूर्वी मी रायगडला आलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. ज्याप्रमाणे त्यांनी सुशासन आणि प्रशासन या दोन्ही बाजू अनेक संघर्षमय स्थितीमध्ये समर्थपणे पेलल्या त्याप्रमाणे मला करता यावे अशी मी प्रार्थना केल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.
महाराजांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. त्यांचे व्यक्तिमत्व केवळ फक्त त्यांच्या पराक्रमानेच मोजता येणार नाही. त्यांनी त्यापेक्षा खूप काही केले आहे असे मोदी म्हणाले. महाराष्ट्रातील अनेक मावळ्यांना त्यांनी प्रेरित केले. त्यांचा पराक्रम अलौकिक होताच परंतु ते एक उत्तम प्रशासकही होते असे पंतप्रधानांनी म्हटले.
शिवाजी महाराजांनी त्यांचे आरमार समृद्ध केले. त्यांनी पायदळाबरोबरच नौदलाकडे तितकेच लक्ष दिले. यातूनच त्यांचे दूरदृष्टी दिसून येते. शिवाजी महाराजांकडे वैज्ञानिक दृष्टिकोन होता. भारताकडे जगाला आकर्षित करण्याची क्षमता आहे. जगाला जर आपण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे दर्शन घडवले तर भारताच्या पर्यटन क्षेत्राचा गतीने विकास होईल.