मुंबई-उठाव नव्हता तर ही गद्दारी होती. बाळासाहेब आणि दिघेसाहेब असते तर आज गद्दारांना काय न्याय दिला असता, असा सवाल करत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदेगटावर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेनंतर आता तीन दिवसांची शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. भिवंडीत मेळावा घेत त्यांनी यात्रेला सुरुवात केली.शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसैनिक असते तर हिंमतीने उभे राहिले असते. आम्ही उठाव आणि बंड केला असे ते म्हणत आहेत. पण, तो बंड आणि उठाव नव्हता. ती गद्दारी होती. उठाव करण्यासाठी हिंमत लागते. बंड करण्यासाठी ताकद लागते. ते महाराष्ट्रात थांबले असते. सुरत आणि तेथून गुवाहाटीला पळून गेले नसते. पूर आलेल्या आसाममध्ये ही आपले लोक मजा मारून आले.पुढे ते म्हणाले की, मी लहानपणापासून बघत आलो आहे. जे लोक हक्कानं घरी यायचे. कामं घेऊन यायचे आणि नवी जबाबदारी मागायचे. कुटुंबातील माणसारखं यांना आजवर शिवसेनेनं सांभाळलं. त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसला. ज्या शिवसेनेनं दिलं त्याच पक्षाशी गद्दारी केली. या आमदारांनी केलेलं बंड तुम्हाला पटलंय का? खरंतर आपलं एक चुकलं की आपण राजकारण कमी केलं आणि समाजकारणावर जास्त भर दिला. आपल्याशी गद्दारी यासाठीच होते की आपण विरोधी पक्षाच्या आमदारांवर कधी लक्ष देत नाही. त्यांच्यावर दबाव आणत नाही किंवा त्यांना त्रास देत नाही.शिंदे गटाला आव्हान करत आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांनी मतदारसंघात जाऊन मतदारांच्या भावना समजून घ्या. निवडणुकीला सामोर या. जनता ठरवले ते आम्हाला मान्य असेल. ज्यांना शिवसैनिक म्हणून परत यायचे असेल तर मातोश्रीचे दरवाजे 24 तास उघडे असतात. आमचे मन मोठे आहे. आज जे निष्ठानंत शिवसेनेसोबत आहेत ते खरे शिवसैनिक आहेत आणि ते घाबरणारे नाहीत. घाबरणारे असते तर सूरतेला आले असते.राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून जवळपास 20 दिवस झाले तरी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की सध्या सुरू असलेले राजकारण नाही. ही सर्कस आहे. राज्यात पूरपरिस्थिती असून चित्र बरे नाही. पण, आपल्याकडे दोन लोकांचे मंत्रीमंडळ आहे. दोघेच निर्णय घेतात. हे सरकार घटनाबाह्य आहे आणि हे सरकार कोसळणार हे तुम्ही लिहून घ्या.