नवी दिल्ली ता.२१ : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे लाईन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लक्ष घालावे म्हणून खासदार बापट यांनी आज निवेदनाद्वारे विनंती केली.
यावेळी बोलताना खासदार बापट यांनी सांगितले की पुण्याहून नाशिकला जाण्यासाठी असा कोणताही थेट रेल्वे मार्ग नाही. नागरिकांना पुणे-नाशिक प्रवास करण्यासाठी ६ तासाहून अधिक वेळ लागतो. हा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे लाईन प्रकल्प राबवत आहे. प्रस्तावित रेल्वे मार्ग पुणे रेल्वे स्थानकापासून सुरू होऊन नाशिक रेल्वे स्टेशन येथे संपेल. मध्य रेल्वेने या प्रकल्पाला यापूर्वीच मान्यता दिली असुन रेल्वे मंत्रालयाने खर्चाच्या वाटणीच्या आधारावर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. दिनांक 28. एप्रिल 2022 रोजी झालेल्या विस्तारित मंडळाच्या बैठकीत NITI आयोग, वित्त मंत्रालयाने देखील या प्रकल्पाचे कौतुक केले आहे. सध्या हा प्रस्ताव मंजुरीसाठी कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) कडे असून या प्रकल्पाला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. पुणेकरांसाठी हा प्रकल्प लवकर उपयोगात येण्यासाठी, CCEA कडून मंजुरी मिळाल्यानंतर पीएमओ (PMO) स्तरावर प्राधान्याने या प्रस्तावावर पुढील प्रक्रिया करण्यासाठी आणि हा प्रकल्प फास्ट ट्रॅकवर टाकण्यासाठी रेल्वे मंत्री म्हणून लक्ष घालावे अशी मागणी वैष्णव यांना निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे लाईन हा प्रकल्प पुणे आणि नाशिककरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून तो नियोजित वेळेत पूर्ण झाल्यास पुणे-नाशिक ही दोन्ही शहरे जवळ येतील त्यामुळे नागरिकांची वेळेची व आर्थिक बचत होईल. या रेल्वे मार्गामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होणार असल्याचे बापट म्हणाले.