Home Blog Page 557

वडगावशेरी मतदारसंघातील पाणीपुरवठा सुरळीत करावा – आमदार बापूसाहेब पठारे

पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांच्या समवेत आमदार बापूसाहेब पठारे यांनी मतदारसंघातील पाणीपुरवठा सुरळीत व सुनियोजित करावा यासंदर्भात पाहणीदरम्यान मागणी केली .

पुणे – वडगावशेरी मतदारसंघातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध करण्याच्या दृष्टीने आमदार बापूसाहेब तुकाराम पठारे यांच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन आणि पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला.

या दौऱ्यात लोहगाव बाजारतळ येथील सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी करण्यात आली. हे काम सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या. त्यानंतर हरणतळे वस्ती, विमाननगर, तुळजा भवानी नगर, खराडी या भागांतील पाण्याच्या टाक्यांची पाहणी करण्यात आली. या भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टाक्यांमध्ये साठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, यावर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

भामा आसखेड योजनेअंतर्गत वडगावशेरी परिसरासाठी दररोज २०० एमएलडी पाण्याची मंजुरी असूनही सध्या केवळ १४२ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. उर्वरित ५८ एमएलडी पाणी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच अनियमित पाणीपुरवठा सुरळीत व सुनियोजित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व कामांच्या गतीचा अधिकाऱ्यांसह आढावा घेतला. यावेळी काही महत्त्वाच्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविल्या जातील असे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितल्याचे पठारे यांंनी सांगितले.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत लागलेल्या आगीची उच्चस्तरीय चौकशी करावी – आमदार बापूसाहेब पठारे

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पठारे यांची मागणी..

पुणे – वडगावशेरी मतदारसंघातील चंदननगर येथील जुन्या मुंढव्या रस्त्यालगत असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत दि. २३ एप्रिल २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून, यात नागरिकांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या दुर्घटनेत अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आल्याने अनेकांनी आपले सर्वस्व गमावले आहे. ही आगीची घटना अतिशय दुर्दैवी होती.

सदर घटना घडून एक आठवडा होवूनही आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने आमदार बापूसाहेब पठारे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सदर आगीच्या दुर्घटनेची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या आगीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षितता आणि भीतीमय वातावरण तयार झाले आहे. सदर वसाहतीत लागलेल्या आगीच्या घटनेबाबत अनेक नागरिक खाजगीत वेगवेगळी चर्चा करत आहे. आगीच्या घटनेचे कारण अद्याप स्पष्ठ झाले नसल्या कारणाने सदर घटनेकडे नागरिक संशयाने पाहत आहेत. या सर्व बाबी विचारात घेता या घटनेची उच्चस्तरीय सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून सदर दुर्घटनेमागील सत्य कारणे समोर येतील आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करता येवू शकतात असे पठारे म्हणाले.

सदर आगीच्या गंभीर घटनेची तातडीने दखल घेवून आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एका उच्चस्तरीय चौकशी समितीची नेमणूक करावी. ज्यामार्फत ही समिती निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून सत्य कारणे समोर आणतील. जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करता येतील. तसेच या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी असल्याचे पठारे यांनी सांगितले

मागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नका

महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबईदि. 30 एप्रिल 2025 –

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून महावितरणतर्फे सर्वात आधी नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या क्रमाने सौर कृषी पंप बसविण्यात येत आहेत. प्रतीक्षा यादी बदलून पंप आधी बसवून देतो, असे आश्वासन देणारे काही बनावट कॉल शेतकऱ्यांना येत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. शेतकऱ्यांनी अशा बनावट कॉल किंवा मेसेजला बळी पडू नये तसेच अशा कॉलनुसार कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक आहे. शेतकऱ्यांनी ज्या क्रमाने नोंदणी केली आहे त्यानुसार पंप बसविण्यात येत आहेत. कोणालाही प्रतीक्षा यादी बदलून व इतरांना डावलून पंप देण्यात येत नाहीत. शेतकऱ्यांनी नोंदणी करताना आपल्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर पंप बसविण्यासाठी नंतर कधीही पैसे भरण्याची गरज नाही. 

शेतकऱ्याने आपल्या हिश्श्याची रक्कम भरून पंप बसविणाऱ्या एजन्सीची निवड केली की त्या शेतकऱ्याचे नाव प्रतीक्षा यादीत समाविष्ट होते. यादीनुसारच पंप बसविण्यात येत आहेत. 

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत प्रतीक्षा यादी डावलून आधी पंप बसवून देतो असे बनावट कॉल आले, तर शेतकऱ्यांनी त्याबाबत महावितरणच्या 1800 233 3435 अथवा 1800 212 3435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी. तसेच जवळच्या महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून शंका निरसन करता येईल.

या योजनेत शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व सौर कृषी पंप असा संपूर्ण संच मिळतो. केंद्र सरकारकडून 30 टक्के तर राज्य सरकारकडून 60 टक्के अनुदान मिळते. अनुसूचित जाती – जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. सौर पॅनेल्समधून 25 वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ पंपाचे बिल येत नाही. तसेच दिवसा वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या सोईचे होते.

राज्य सरकारने जाहीर केलेली ही योजना शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे. सौर कृषी पंप बसविण्याच्या बाबतीत सध्या महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लवकरात लवकर पंप बसविण्यासाठी महावितरण प्रयत्न करत आहे.

साहित्याची मागणी चुकीची

शेतात सौर कृषी पंप बसविताना काही ठिकाणी संबंधित एजन्सीकडून शेतकऱ्यांकडे वाहतूक खर्च अथवा अन्य साहित्याची मागणी झाल्याच्याही तक्रारी महावितरणकडे आल्या आहेत. परंतु सौर कृषी पंप बसविण्याबाबत संपूर्ण कामाची जबाबदारी संबंधित एजन्सीची असल्याने शेतकऱ्यांनी अशा प्रकारे साहित्याची मागणी झाल्यास त्याची दखल घेऊ नये व महावितरणकडे तक्रार करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

अल्पसंख्यांक विभागाअंतर्गत सुरू असलेल्या योजनांच्या कामाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतला आढावा

मुंबई दि ३० – अल्पसंख्यांक विभागामार्फत सुरू असलेल्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, जैन आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट‍्रराज्य हज समितीच्या कामकाजाबाबत अल्पसंख्यांक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला.

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत जे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यावर देखरेख ठेवावी आणि परताव्‍याचे प्रमाण वाढविण्यात यावे. तसेच जैन आर्थिक विकास महामंडळाला केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा करण्यात यावा. या महामंडळाच्या पद निर्मिती आणि भरती प्रक्रिया राबविली बाबत आढावा घेतला सोबतच सर्व पायाभूत सुविधांचा विकास करण्यात बाबत उपाय योजना करण्यात यावेत तसेच जास्तीत जास्त अल्पसंख्यांक वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचनाही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी दिल्या. तक्रारींसाठी १८२२५७८६ या टोल फ्री नंबर जास्तीत जास्त लोकांपर्यत पाहोचावा. पंजाबी साहित्य अकादमी आणि उर्दु साहित्य अकादमीसाठी मिळणाऱ्या निधीचा योजनेअंतर्गत असलेल्या कार्यक्रमासाठी वापर करून जास्तीत जास्त साहित्यीक आणि साहित्य प्रेमींना त्याचा लाभ मिळेत यासाठी प्रयत्न करावेत.

हज यात्रेसाठी १८ हजार ९४९ हजी जात आहेत त्यांच्या प्रवासाचे नियोजन, सोयी सुविधा, आणि सुरक्षितेची सोय करावी अशा सुचनाही राज्यमंत्री मिसाळ यांनी यावेळी केल्या.

जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा सामाजिक समतेच्या दिशेने नरेंद्र मोदींच्या सरकारने टाकलेलं महत्वपूर्ण, क्रांतीकारी पाऊल–उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 30 :- “जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह असून यामूळे सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळण्यास मदत होईल. सामाजिकदृष्ट्या दुर्बल, वंचित, उपेक्षित समाजबांधवांच्या विकासासाठी सरकारला अधिक निधी देता येईल. मागास समाजघटकांचा शैक्षणिक, आर्थिकस्तर उंचावण्यास मदत होऊन सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे ध्येय वेगाने साध्य करता येईल. जातनिहाय जनगणनेचा निर्णय म्हणजे सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारने टाकलेलं महत्वपूर्ण, क्रांतीकारी पाऊल आहे.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले असून हा क्रांतीकारी निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.

जातनिहाय जनगणनेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी अनेक व्यक्ती, संस्था, संघटना गेल्या अनेक दशकांपासून करत आहेत. ही मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या, संवेदनशील नेतृत्वामुळेच पूर्ण होऊ शकली. जातनिहाय जनगणना होत नसल्याने अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती वगळता अन्य जातींच्या लोकसंख्येच्या आर्थिक, सामाजिक स्थितीची माहिती उपलब्ध होत नव्हती. याचा फटका ओबीसी समाजबांधवांसह इतरही समाजघटकांना फटका बसत होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना योग्य समाजघटकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. यातून सर्व समाजांना विकासाची समान संधी उपलब्ध होईल हा निर्णय येणाऱ्या भविष्यकाळात जातव्यवस्था संपूष्टात आणण्यास मदत करणारा ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?

नवा ‘फडणवीस वीमा पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक: हर्षवर्धन सपकाळ

शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक; पहिल्यासारखी विमा योजना सुरु ठेवा अन्यथा शेतकरी व काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही.

बीड पीक वीमा पॅटर्नमधील भ्रष्टाचाऱ्यांना सरकारचेच संरक्षण; भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवा.

लाडक्या उद्योगपतीनंतर सरकारने लाडका पोलीस अधिकारी योजना आणली आहे का ?

मुंबई/छत्रपती संभाजीनगर, दि. ३० एप्रिल २०२५
भाजपा युती सरकारने पीक वीमा योजनेत मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेला नवा बदल चुकीचा असून तो शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. २५ वर्षापासून सुरु असलेली विमा योजना बंद करण्याची गरज नव्हती. योजनेत काही त्रुटी असतील तर त्यात बदल करता आला असता, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करता आला असता पण पूर्ण योजनाच बदलल्याने शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे. हा नवा ‘फडणवीस पीक विमा पॅटर्न’ अनाकलनीय असून तो रद्द करावा व आतापर्यंत सुरु असलेली योजनाच पुन्हा लागू करावी अन्यथा शेतकरी व काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

छत्रपती संभाजी नगर येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, निवडणुकीच्या आधी केलेल्या घोषणा या केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आलेले होते हे मंत्रिमंडळाने पीक विम्या संदर्भात घेतलेल्या निर्णयातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. एक रुपयात पीक विमा योजना पुढे सुरु ठेवण्यात काहीच गैर नव्हते. योजनेला बदनाम करणाऱ्या घोटाळ्यांची चौकशी करण्याएवजी योजनाच बदलण्याचा शासनाचा प्रयत्न दिसून येत आहे. शासनाने काल घेतलेल्या निर्णयातून पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना जी तुटपुंजी नुकसान भरपाई मिळत होती ती देखील बंद झाली आहे. कारण शासनाने नैसर्गिक आपत्तीमुळे, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात झालेले नुकसान शेतकऱ्यांना मिळत होते ती पद्धतच योजनेतून काढून टाकली आहे. आणि केवळ पीक कापणीच्या आधारावर नुकसान भरपाई देण्याची पद्धत अवलंबली आहे. यामुळे या खरीप हंगामाची नुकसान भरपाई पुढच्या खरीप हंगामात मिळणार आहे यातून शेतकरी अधिक कर्जबाजारी होईल.

मुळात पीक कापणी अहवालाच्या आधारावर नुकसान भरपाई देण्याची पद्धत ही दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी हितकारक नाही. आज राज्यात महसूल मंडळाच्या पातळीवर केवळ कागदोपत्री कापणी अहवाल तयार होतात. तेव्हा हे अहवाल कितपत ग्राह्य धरायचे? तसेच दुष्काळी भागातील मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागातून पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे शासनाने योजनेत सुधारणा करायच्या असतील तर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र तरतुदी कराव्यात.

एक रुपयात विमा ही पद्धत बंद करण्याएवजी शासनाने विमा कंपन्यांवर दबाव आणून शेतकऱ्यांना रास्त नुकसान भरपाई कशी मिळेल हे पाहिले पाहिजे. आता शासनाने एक हमी घ्यावी. नैसर्गिक आपत्ती, पाऊस, गारपीट, दोन पावसातील खंड यांमुळे होणारी नुकसान भरपाई राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, राज्य आपत्ती निवारण निधी मधून सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी. बीड पॅटर्नच्या ८०-११० टक्के यानुसार ११० टक्क्यांपर्यंतची नुकसान भरपाई विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात यावी व शेती पिकाचे त्यापेक्षा अधिक नुकसान झाले तर त्यावरची नुकसान भरपाई ही शासनाने स्वत: देण्याची हमी घ्यावी. ह्या आदेशाचे काय झाले, शासनाने याबाबतची माहिती प्रसिद्ध करावी. पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे पण या भ्रष्ट लोकांवर सरकार कारवाई करत नाही. भ्रष्टाचारी लोक सरकार व मुख्यमंत्री यांच्या आजूबाजूलाच फिरत असतात त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक सरकारमध्ये नाही उलट कृषी मंत्री शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी करतो, कर्ज माफीच्या पैशातून साखरपुडा करता असे निर्लज्जपणे म्हणतात. यातून भाजपा सरकारची शेतकरी विरोधी मानसिकता स्पष्ट होते असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा राजीनामा कधी घेणार?
शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून ते शेतकऱ्यांना वितरीत न करता राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या कारखान्यासाठी वापरले या प्रकरणी मा. सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकार आता मंत्री विखे पाटील यांचा राजीनामा घेणार का, असा प्रश्नही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

लाडका उद्योगपतीनंतर लाडका अधिकारी..
मुंबई पोलीस आयुक्त पदावरून विवेक फणसाळकर निवृत्त झाल्यानंतर सेवाज्येष्ठतेचे संकेत पायदळी तुडवत सहाव्या, सातव्या नंबरवरच्या देवेन भारती या खास मर्जीतील लाडक्या अधिकाऱ्याला सरकारने बढती दिली आहे. आधी फडणवीस यांनी पोलीस दलातील लाडक्या बहिणीकडून विरोधकांचे फोन टॅपिंग करुन घेतले, त्या अधिकाऱ्याला पोलीस महासंचालक पदाचे बक्षीस दिले व निवृत्त झाले तरी दोन वर्षांची मुदतवाढही दिली. भाजपा सरकारसाठी कायदा सुव्यवस्था हा प्रश्न महत्वाचा नाही. अशा पद्धतीने नियुक्त्या होत असल्याने राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, अवैध धंदे वाढले आहेत असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

बारावीचा निकाल 13 मे ला लागणार:दहावीचा निकालही 15-16 मे रोजी अपेक्षित

0

पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बारावी बोर्डाचा निकाल पुढील महिन्यात 13 तारखेला लागणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर 15-16 तारखेला दहावीचा निकाल अपेक्षित असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे या दोन्ही इयत्तांचा निकाल केव्हा लागणार? हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

यंदा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडली होती. त्यानंतर 21 ते 17 मार्च या कालावधीत दहावीचे विद्यार्थी अग्निपरीक्षेला सामोरे गेले होते. या परीक्षेनंतर बोर्डाने ठरवून दिलेल्या निश्चित कालावधीत सर्वच शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण केले. सध्या गुणांची अंतिम पडताळणीचे काम सुरू आहे. त्यानंतर 13 मे रोजी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल. तर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 15 किंवा 16 मे रोजी जाहीर होईल. त्याची अधिकृत घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री करतील, अशी माहिती पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, चालू आठवड्यात गुण पडताळणीचे काम पूर्ण होऊन गुणपत्रिकांची छपाई सुरू होईल. यासंबंधीचे सर्व कामकाज 11 मेपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर निकाल ऑनलाईन पद्धतीने जारी केला जाईल. हा निकाल विद्यार्थ्यांना घरबसल्या पाहता येईल. यासंबंधीच्या वेबसाइट्सची माहिती पुढील आठवड्यात बोर्डाकडून सार्वजनिक केल्या जातील. निकालानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाचे अचूक नियोजन करणे सोयीचे ठरणार आहे.

गतवर्षी 21 मे रोजी लागला होता बारावीचा निकाल

उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षी बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर आठवड्याभराने म्हणजे 27 मे रोजी दहावीचा निकाल लागला होता. दहावी व बारावी या दोन्ही परीक्षांत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान 35 टक्के गुण आवश्यक असतात. याशिवाय विद्यार्थ्यांना ग्रेडही दिले जातात. ग्रेडिंग व्यवस्थेनुसार, 75 टक्के व त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळणार आहे.

बारावीचे विद्यार्थी
15.24 लाख

दहावीचे विद्यार्थी 16.39 लाख
एकूण विद्यार्थी संख्या 31.63 लाख

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखेर ‘वर्षा’ बंगल्यावर:अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त साधत केला गृहप्रवेश

0

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी अखेर अक्षय्य तृतीयेचे मुहूर्त साधत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी राहण्यासाठी गेलेत. देवेंद्र फडणवीस यांनी गतवर्षी 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली होती. पण तेव्हापासून ते ‘सागर’ या आपल्या जुन्याच निवासस्थानी राहत होते. कारण, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर केव्हा राहण्यास जाणार? असा प्रश्न सातत्याने विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. अखेर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर फडणवीस यांनी वर्षा बंगल्यात सपत्नीक गृहप्रवेश केला. अमृता फडणवीस यांनी एका पोस्टद्वारे या गृहप्रवेशाची माहिती दिली. तसेच काही फोटोही शेअर केले.

सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही 10 वी च्या बोर्ड परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे, असे अमृता फडणवीस यांनी एका पोस्टद्वारे सांगितले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच मुलीच्या दहावीच्या परीक्षेमुळे आपण अजून वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी गेलो नसल्याचे सांगितले होते. एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर आम्ही तिथे जाऊ. तिथे काही छोटी-मोठी कामेही होणार आहेत. सध्या माझी मुलगी दिविजा दहावीमध्ये शिकत आहे. ती म्हणाली की, माझी परीक्षा झाल्यानंतरच आपण तिकडे शिफ्ट होऊ. त्यामुळे आम्हालाही या प्रकरणी फार काही घाई नाही, असे ते म्हणाले होते.

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौक्या रिकाम्या केल्या:पाकिस्तानी झेंडे हटवले

माजी रॉ प्रमुख आलोक जोशी भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष

पहलगाम हल्ल्याच्या 8 दिवसांनंतर बुधवारी, पाकिस्तानी सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक चौक्या रिकामी केल्या. पाकिस्तानी सैन्याने या चौक्यांवरील झेंडेही काढून टाकले आहेत. कठुआच्या परगल भागात या पोस्ट्स रिक्त करण्यात आल्या आहेत.पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेवर सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. बुधवारी, पहिल्यांदाच पाकिस्तानी सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले. ज्याला भारतीय सैन्याने लगेच प्रत्युत्तर दिले.

केंद्राने माजी रॉ प्रमुखांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोर्डाचे अध्यक्ष केले
दरम्यान, केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना केली आहे. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांना त्याचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची (सीसीएस) बैठक संपली आहे. सीसीएसची ही दुसरी बैठक आहे, पहिली बैठक पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, 23 एप्रिल रोजी झाली होती.
सीसीएस बैठकीनंतर लगेचच, संसदीय कामकाजावरील मंत्रिमंडळ समिती, आर्थिक व्यवहार समिती आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल.केंद्र सरकारने मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना केली. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांना त्याचे अध्यक्ष बनवण्यात आले. माजी वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल पीएम सिन्हा, दक्षिणी आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल ए.के. सिंग आणि रिअर अॅडमिरल मोंटी खन्ना हे या समितीचे सदस्य आहेत. भारतीय पोलिस सेवेतील निवृत्त अधिकारी राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंग हे या मंडळावर आहेत. याशिवाय, आयएफएसमधून निवृत्त झालेले वेंकटेश वर्मा हे ७ सदस्यीय मंडळाचा भाग आहेत.

काश्मीर विभागीय आयुक्तांनी काश्मीरमधील सर्व हॉटेल्स, होमस्टे आणि इतर गेस्ट हाऊस, हाऊसबोट मालक आणि इतरांना पर्यटकांच्या आगाऊ बुकिंगची रक्कम परत करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

पाकिस्तानी मंत्र्यांचा दावा – भारत पुढील २४-३६ तासांत हल्ला करू शकतोपाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तरार म्हणाले की, पाकिस्तानकडे ठोस माहिती आहे की भारत पुढील २४ ते ३६ तासांत पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल ‘एक्स’ वर एक व्हिडिओ जारी करून हा दावा केला.

केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार:मूळ जनगणनेसह केले जाईल, मोदी मंत्रिमंडळाचा निर्णय

नवी दिल्ली- केंद्र सरकार जातीय जनगणना करेल. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जातीय जनगणना मूलभूत जनगणनेतच समाविष्ट केली जाईल. या वर्षी सप्टेंबरपासून जनगणना सुरू करता येईल. ते पूर्ण होण्यासाठी किमान २ वर्षे लागतील. अशा परिस्थितीत, जनगणना प्रक्रिया सप्टेंबरमध्ये सुरू झाली तरी अंतिम आकडेवारी २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७ च्या सुरुवातीला येईल.

केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले, ‘१९४७ पासून जातीय जनगणना झालेली नाही. मनमोहन सिंग यांनी जातीय जनगणनेबद्दल बोलले होते. काँग्रेसने जातीय जनगणनेचा मुद्दा केवळ स्वतःच्या फायद्यासाठी वापरला आहे. जातीय जनगणना हा फक्त एक केंद्रीय विषय आहे. काही राज्यांनी हे काम सुरळीतपणे केले आहे. आपल्या सामाजिक रचनेवर परिणाम होणार नाही, याची खात्री करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

कोविड-१९ साथीच्या आजारामुळे २०२१ मधील जनगणना पुढे ढकलण्यात आली. जनगणना सहसा दर १० वर्षांनी केली जाते, परंतु यावेळी थोडा विलंब झाला आहे. यासोबतच, जनगणनेचे चक्र देखील बदलले आहे, म्हणजेच पुढील जनगणना २०३५ मध्ये होईल.

मंत्रिमंडळाचे इतर २ प्रमुख निर्णय

शिलाँग ते सिलचर (मेघालय-आसाम) हाय-स्पीड कॉरिडॉर बांधला जाईल. ते १६६ किमी लांबीचे असेल आणि त्यात ६ लेन असतील. ईशान्येसाठी ते महत्त्वाचे असेल. यासाठी २२,८६४ कोटी रुपये खर्च येईल.
सरकारने २०२५-२६ साठी ऊसाचे रास्त आणि किफायतशीर भाव निश्चित केले आहेत. यामध्ये ऊसाचा भाव प्रति क्विंटल ३५५ रुपये निश्चित करण्यात आला आहे. ही प्रमाणित किंमत आहे, यापेक्षा कमी किमतीत ऊस खरेदी करता येत नाही.
जातीय जनगणनेवर विरोधकांची भूमिका

विरोधी पक्ष: बीजेडी, सपा, राजद, बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारसह देशात जातीय जनगणनेची मागणी करत आहेत. टीएमसीची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. राहुल गांधी अलिकडेच अमेरिकेला भेट देऊन आले होते, जिथे त्यांनी म्हटले होते की जातीय जनगणना योग्य आहे.
एनडीए: पूर्वी भाजप जातीय जनगणनेच्या बाजूने नव्हता. एनडीएने काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर जातीय जनगणनेद्वारे देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. तथापि, बिहारमध्ये भाजपनेच जातीय जनगणनेला पाठिंबा दिला. बिहारने ऑक्टोबर २०२३ मध्ये जातीय जनगणनेचा डेटा प्रसिद्ध केला होता. असे करणारे ते देशातील पहिले राज्य बनले.

पाकिस्तानी खासदार पलवाशा खान बरळल्या – बाबरीची पहिली वीट पाक सैनिक लावणार:असीम मुनीर देणार अज़ान

0


इस्लामाबाद-पाकिस्तानमधील बिलावल भुट्टो यांच्या पक्षाच्या नेत्या पलवाशा खान यांनी संसदेत भारतविरोधी वक्तव्य केले आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान, पलवाशा म्हणाल्या की पिंडी (रावळपिंडी) येथील प्रत्येक सैनिक बाबरी मशिदीच्या पायाची पहिली वीट रचेल आणि असीम मुनीर पहिली अजान देतील.पलवाशा खान म्हणाल्या की, पाकिस्तान केवळ आपल्या ७ लाख सैनिकांवर अवलंबून नाही तर त्यांच्याकडे २५ कोटी लोक आहेत जे कठीण काळात सैन्यासोबत असतील आणि सैनिक बनतील. जर भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर दिल्लीतील लाल किल्ल्याचे मैदान रक्ताने माखले जाईल.

पीपीपीच्या महिला खासदाराने आपल्या भाषणात म्हटले की, भारताला हे माहित असले पाहिजे की त्यांच्या सैन्यातील कोणताही शीख सैनिक पाकिस्तानविरुद्ध लढणार नाही कारण ही गुरू नानकांची भूमी आहे. त्यांनी खलिस्तानी नेते गुरपतवंत सिंग पन्नू याचे आभार मानले ज्यांनी युद्धात पाकिस्तानला पाठिंबा देण्याबद्दल बोलले.

पलवाशा खान या पाकिस्तानी खासदार आहेत आणि बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) च्या नेत्या आहेत. पलवाशा या पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहाच्या, सिनेटच्या सदस्या आहेत. २००८ मध्ये त्या पहिल्यांदा महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर खासदार म्हणून निवडून आल्या.२०१६ मध्ये पलवाशाने आयएसआयचे माजी संचालक झहीर उल इस्लामशी लग्न केले. त्यांना एक मूल देखील आहे. त्यांचे लग्न ३ वर्षे गुप्त राहिले. २०१९ मध्ये, एका पत्रकाराने त्यांच्या लग्नाचा खुलासा केला, ज्याची खूप चर्चा झाली. पत्रकार जाहिद गिश्को यांनी दावा केला होता की त्यांना या लग्नाबद्दल माहिती मिळाली होती, त्यानंतर स्वतः झहीर इस्लामने ते गुप्त ठेवण्याची धमकी दिली होती.

तथापि, २०२० मध्ये पलवशाने तिच्या पतीविरुद्ध स्वतःसाठी आणि तिच्या मुलासाठी संरक्षणाची मागणी करत खटला दाखल केला तेव्हा दोघांमध्ये वाद झाल्याचे वृत्त आले. पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी आदिल रझा यांनी आरोप केला होता की पलवाशा खान गर्भवती राहिली होती, ज्यामुळे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) झहीर उल इस्लाम यांना तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडण्यात आले.

टायटन वॉचेसचे नवे ऑटोमॅटिक्स कलेक्शन

अचूकपणा ज्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जे अर्थपूर्ण शैलीतून स्वतःला अभिव्यक्त करू इच्छितात अशा पुरुषांसाठी तयार करण्यात आलेले कलेक्शन

बंगलोर, : मेकॅनिकल विश्वाविषयी पुरुषांना वाटणारे आकर्षण सर्वश्रुत आहे. हे आकर्षण घड्याळांमध्ये साकार करून टायटन वॉचेसने आपले नवे ऑटोमॅटिक्स कलेक्शन सादर केले आहे. मेकॅनिकल वॉचमेकिंगचे नाजूक सौंदर्य अधोरेखित करत हे कलेक्शन व्हिजिबल मेकॅनिक्सचा सोहळा साजरा करते. कलेक्शनमधील प्रत्येक घड्याळामध्ये मनमोहक स्केलेटल डायल्स आहेत, ज्यामध्ये नाजूक इंजिनीयरिंग हे प्रत्येक शैलीचे सार आहे. इंटिग्रेटेड ब्रेसलेट्सपासून ड्युअल फिनिश सॉलिड लिंक स्ट्रॅप्सपर्यंत प्रत्येक डिझाईन त्यामधून विविध व्यक्तिमत्त्वे प्रतिबिंबित होतील अशाप्रकारे अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आले आहे. २१ ज्वेल बेयरिंग्स, दर तासाला २१६०० बीट्सची व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी आणि ४२ तासांचे पॉवर रिझर्व्ह असलेले हे कलेक्शन अचूकपणा, कारीगरी आणि कामगिरीवर लक्ष केंद्रित करते, चोखंदळ घड्याळप्रेमींसाठी तयार करण्यात आले आहे.

टायटनच्या ऑटोमॅटिक्स कलेक्शनमध्ये चार अनोख्या श्रेणी आहेत, अनोखी व्यक्तिमत्त्वे दर्शवण्यासाठी त्या खास डिझाईन करण्यात आल्या आहेत. यिन यांग स्केलेटल ऑटोमॅटिक वॉच या अतुलनीय कलेक्शनचा केंद्रबिंदू आहे, संतुलनाचा कलात्मक सन्मान करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे, असामान्य यिन यांग स्केलेटल डायल डिझाईन आणि रिफाईंड प्रेस-पॅटर्न डिटेलिंग यामध्ये दर्शवण्यात आले आहे. सुबक स्टेनलेस स्टील आणि शानदार रोज गोल्ड कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध असलेली ही श्रेणी औपचारिक वातावरणासाठी उत्कृष्ट आहे.

फिनिक्स स्केलेटल ऑटोमॅटिक घड्याळ हे फिनिक्स पक्षापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहे, हे शक्तीचे आणि पुन्हा नव्याने भरारी घेण्याचे प्रतीक आहे. याची बोल्ड स्केलेटल डायल फिनिक्स पक्षाच्या पंखांप्रमाणे नाजूक डिझाईन करण्यात आली आहे. नर्ल्ड क्राऊन याचे सोफिस्टिकेटेड डिझाईन अधिक शानदार बनवतो. मोनोक्रोमॅटिक एक्लिप्स ब्लॅक आणि ऑप्युलँट एम्बर रोज गोल्ड प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. याचे प्रभावी डिझाईन आणि उत्कृष्ट फिनिश यामुळे हे घड्याळ संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या पेहरावांसाठी आणि महत्त्वाच्या प्रसंगांसाठी उत्तम ठरते.

नेक्सस स्केलेटल ऑटोमॅटिकमध्ये आधुनिक सौंदर्य आणि चिरंतन प्रतीकात्मकता यांचा मिलाप आहे. याची अनोखी स्केलेटल डायल जहाजाच्या सुकाणूपासून प्रेरित होऊन तयार करण्यात आली आहे, जे हालचाली आणि प्रगती दर्शवते, नाजूक ऑटोमॅटिक हालचाली दर्शवते. कॉफी ब्राऊन, गनमेटल आणि मिडनाईट ब्ल्यू या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. स्पोर्टी अपील आणि इंटिग्रेटेड ब्रेसलेट असलेले हे घड्याळ स्मार्ट कॅज्युअल लूक्स आणि दररोज वापरण्यासाठी साजेसे आहे.

गोल्डन हार्ट स्केलेटल ऑटोमॅटिक वॉच सोनेप्रेमींसाठी बनवण्यात आले आहे. बाय-मेटल आणि फुल गोल्ड प्रकारांमध्ये उपलब्ध असून गिल्टेड स्केलेटल डायलमधून विलक्षण जागरूकतेने तयार करण्यात आलेले बारकावे दिसून येतात. फॉर्मल प्रसंग, समारंभ आणि सांज सोहळ्यांमध्ये तुमच्या पेहरावाला अत्यावश्यक असलेला उठावदार, लक्झरियस स्पर्श देण्यासाठी हे अगदी योग्य आहे.

टायटन वॉचेसच्या मार्केटिंग हेड अपर्णा रवी म्हणाल्या, “टायटन ऑटोमॅटिक्स कलेक्शन हा आमच्या वाटचालीतील एक लक्षणीय टप्पा आहे, प्रगत, सोफिस्टिकेटेड होरोलॉजी आणि आधुनिक शैली यांचा समन्वय दर्शवणारी घड्याळे तयार करून नावीन्य घडवत राहण्याप्रती टायटनची वचनबद्धता यामध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. चोखंदळ आणि शैलीविषयी जागरूक असलेले पुरुष, ज्यांना घड्याळ हे स्व-अभिव्यक्तीचे माध्यम वाटते, अशांसाठी हे तयार करण्यात आले आहे, यांची कारीगरी तुम्ही काहीही बोलण्याआधी खूप काही व्यक्त करते.”

प्रत्येक घड्याळामध्ये ल्युमिनस काटे, स्पष्टपणे अप्लाय करण्यात आलेले इन्डायसेस आणि ड्युएल-फिनिश्ड सॉलिड स्टेनलेस स्टील स्ट्रॅप्स आहेत, दिवसभर आणि रात्रीदेखील प्रीमियम फील देणाऱ्या या घड्याळांच्या किमती १८,३२५ रुपयांपासून २२,१५० रुपयांपर्यंत आहेत. टायटन ऑटोमॅटिक्स कलेक्शन सर्व टायटन स्टोर्स आणि www.titan.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

“कामगार दिन, अक्षय्य तृतीया, संजीव अरोरा यांच्या वाढदिवसानिमित्त विंग्रो आठवडे बाजारातील महिलांना साड्या भेट”.

“क्रिएटिव्ह फाउंडेशन व म. ग.आचवल ट्रस्ट तर्फे तर्फे मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील संपन्न – संदीप खर्डेकर”.

पुणे- कामगार दिन, अक्षय्य तृतीया व ग्लोबल ग्रूप चे संचालक संजीव अरोरा यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विंग्रो मार्केट संचालित शेतकरी आठवडे बाजारातील महिलांना साड्या भेट देण्यात आल्या. क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त व माजी नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर तसेच ऍड. प्राची बगाटे यांच्या हस्ते ही भेट प्रदान करण्यात आली.
विंग्रो मार्केट च्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक असा हा आठवडे बाजार सुरु करून सहा वर्ष झाली असून एरंडवणे भागात आता 3 ठिकाणी हा बाजार भरतो असे ह्या बाजाराच्या प्रवर्तक संयोजक मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.येथील महिला अतिशय कर्तव्यदक्ष असून त्या आलेल्या ग्राहकांना प्रामाणिकपणे योग्य दरात,उत्तम भाजीपाला उपलब्ध करून देतात, त्यामुळेच हे आठवडे बाजार नागरिकांच्या पसंतीस उतरले असून एरंडवणे, भुजबळ बाग, नवसह्याद्री येथील यशस्वी कार्यानंतर आता कर्वेनगर भागात ही याच्या शाखा सुरु करण्याचा मनोदय असल्याचेही सौ. मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.ह्या महिलांच्या कामाची दखल घेऊन आज त्यांना साड्या भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आल्याचे सौ. खर्डेकर व ऍड. प्राची बगाटे म्हणाल्या.
ह्या उपक्रमसोबतच क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने ऑल आर्टिस्ट फाउंडेशन चे सभासद असलेल्या चार कलावंतांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया व एका कलावंताची लेझर शस्त्रक्रिया देखील संपन्न झाली. यासाठी कै. म. ग. उर्फ राजाभाऊ आचवल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे डॉ. अनिल परांजपे यांनी निम्मा व क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी निम्मा खर्चाचा भार उचलला. यापुढील काळात ही गरजू व्यक्तींची नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार असून गरजूनी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या 9850999995 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा असे संदीप खर्डेकर यांनी कळविले आहे.
ग्लोबल ग्रुप चे संचालक संजीव अरोरा यांनी एक मे ह्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून त्याचा वापर विविध सामाजिक कार्यासाठी करणार असल्याचे संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी देवेन भारती

मुंबई-मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी वरिष्ठ पोलिस अधिकारी देवेन भारतीय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मावळते पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची जागा घेतील. फणसाळकर आज पोलिस दलातून निवृत्त होणार आहेत.

देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त आहेत. त्यांनी 30 जून 2022 रोजी या पदाची सूत्रे स्वीकारली होती. सरकारने बुधवारी जारी केलेल्या एका आदेशानुसार, त्यांची आता मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर हे आज आपल्या 2 वर्षांच्या कारकिर्दीनंतर मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून निवृत्त होणार आहेत. देवेन भारती हे त्यांच्याकडून आपल्या नव्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारतील.

महायुती सरकार विरोधात लाडकी बहिण योजनेवरून संघटीत गुन्हेगारी, फसवणूक, विश्वासघाताची पोलिसात तक्रार

श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्यास … उच्च न्यायालयात जाणार

श्रीरामपूरराज्यातील लाडक्या बहि‍णींची महायुती सरकारने फसवणूक केल्याची तक्रार शेतकरी महिलांनी अहिल्यानगरमधील श्रीरामपूर पोलिस ठाण्यात केली आहे.महायुती सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात श्रीरामपूर पोलिस ठाण्यात तक्रार देताना, गुन्हा नोंदवण्याची मागणी शेतकरी महिला सुनिता वानखेडे, कोमल वानखेडे यांनी केली. शेतकऱ्यांनी कर्जमाफीवरून दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता शेतकरी महिलांनी महायुती सरकारविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. श्रीरामपूर पोलिसांनी शेतकरी महिलांचा तक्रारी अर्ज दाखल करून घेतला असून, पुढं काय कारवाई होणार का? याकडे आता लक्ष लागलं आहे.

महायुतीने (Mahayuti)विधानसभा निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होते की, सरकार येताच माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये दर महिना अनुदान देऊ, पणं निवडून सत्तेत येताच महायुतीने 2100 रुपये तर नाहीच दिले. पणं किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांचे 1500 रुपये अनुदानही बंद केले. आता फक्त 500 रुपये प्रति महिना देण्याचे जाहीर केले आहे.संघटीत गुन्हेगारीम्हणजेच, लाडक्या बहिणींना 2100 रुपये पणं नाही, अन् 1500 रुपये पणं नाही. आता 500 रुपये देऊन आमची फसवणूक केली आहे, अशी तक्रार शेतकरी महिलांनी महायुती सरकारविरुद्ध श्रीरामपूर पोलिस ठाण्यात केली. संघटीत गुन्हेगारी, फसवणूक, विश्वासघात करणे असे मुद्दे तक्रारीत दाखल केले आहेत. कर्जदार शेतकरी नवनाथ दिघे, प्रकाश जाधव, श्रीराम त्रिवेदी यांनी पण फसवणुकीची तक्रार केली आहे.

श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्यास शेतकरी संघटना नेतृत्वाखाली राज्यभरातील शेतकरी आणि लाडक्या बहिणी 5 मे रोजी संभाजीनगर उच्च न्यायालयात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वकील अजित काळे यांचेमार्फत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासाठी याचिका दाखल करण्यात येणार आहे.