Home Blog Page 453

संसदेचे उद्यापासून पावसाळी अधिवेशन, पहलगाम-ऑपरेशन सिंदूरवरून विरोधक घेरणार

नवी दिल्ली – संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून म्हणजेच २१ जुलैपासून सुरू होत आहे. ते पूर्ण महिनाभर म्हणजे २१ ऑगस्टपर्यंत चालेल. संसदेचे कामकाज मार्च आणि एप्रिलमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शेवटचे झाले होते. त्यानंतर, गेल्या १०८ दिवसांत पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर ते एअर इंडिया अपघातापर्यंत बरेच काही घडले आहे. पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यांवर गदारोळ होणे निश्चित आहे.

‘हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड’ हे पुस्तक लिहिणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी गेल्या ४० वर्षांपासून राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्या म्हणतात, ‘पावसाळी अधिवेशनात खूप गदारोळ होऊ शकतो. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, रशियाशी बिघडणारे संबंध, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे युद्धबंदीचे दावे, एअर इंडिया विमान अपघात असे मुद्दे वर्चस्व गाजवू शकतात.’

‘याशिवाय, सर्वांच्या नजरा बिहारशी संबंधित मुद्द्यांवर असतील. बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे संसद अधिवेशन असेल.’
१. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्याच्याशी संबंधित तपास
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ३ महिने पूर्ण होतील. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ भारतीयांचा बळी घेतला होता. आतापर्यंत हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध लागलेला नाही. अशा परिस्थितीत, पहलगाम हल्ल्याचा आणि त्याची चौकशी करण्यात आलेल्या अपयशाचा मुद्दा उपस्थित करून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील.

२. ऑपरेशन सिंदूर आणि परराष्ट्र धोरणावरील प्रश्न
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर ऑपरेशन सिंदूर सुरू केले. तेव्हापासून, विरोधी पक्ष वारंवार भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करत आहेत. या कारवाईत भारताला झालेल्या नुकसानाची माहिती मागत आहेत.

अशा परिस्थितीत काँग्रेस आणि इंडिया ब्लॉक ऑपरेशन सिंदूरबाबत सरकारला प्रश्न विचारण्याची तयारी करत आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे की कारगिल युद्धाप्रमाणेच ऑपरेशन सिंदूरवरही संसदेत चर्चा झाली पाहिजे.

३. एअर इंडिया विमान अपघात
१२ जून २०२५ रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला. आता अपघाताचे कारण, तपास आणि पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विमान अपघात तपास ब्युरोच्या प्राथमिक चौकशी अहवालावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष विमान अपघाताची जबाबदारी काय आहे यावर प्रश्न उपस्थित करतील.

४. बिहारमध्ये विशेष सघन सुधारणा
वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोग येथे मतदार यादी तयार करण्यासाठी एक विशेष सघन पुनरीक्षण मोहीम राबवत आहे. यामुळे संसदेत सर्वाधिक गदारोळ होऊ शकतो. या मुद्द्यावर विरोधी पक्ष भाजपविरुद्ध एकत्र येऊ शकतात.

विरोधी पक्षाने निवडणूक आयोगावर अनियमितता आणि त्यांच्या कामात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष या मुद्द्यावर सरकारला एकत्रितपणे घेरतील.

५. मणिपूर हिंसाचार
मे २०२३ मध्ये मणिपूर हिंसाचार सुरू होऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आतापर्यंत समस्या तशीच आहे. संपूर्ण राज्य कुकी आणि मेइतेई भागात विभागले गेले आहे. दोन्ही समुदायांचे लोक एकमेकांच्या परिसरात जाऊ शकत नाहीत.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्ष मणिपूरचा मुद्दा उपस्थित करत आहेत. मणिपूरची समस्या सोडवण्याची आणि राज्यातील राष्ट्रपती राजवट संपवण्याची मागणी संसदेत केली जाऊ शकते. भाजप राष्ट्रपती राजवट वाढवण्याची मागणी करणारा प्रस्ताव आणू शकते.

६. भारतीय परराष्ट्र धोरण आणि चीन सीमा वाद
मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण चीनबद्दल कमकुवत आणि मवाळ असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. अशा परिस्थितीत, विरोधी पक्ष चीनसोबतच्या सीमा वादावर, अलिकडच्या तणावावर आणि चीनच्या दाव्यांवर उत्तरे मागू शकतात.

याशिवाय, ऑपरेशन सिंदूरनंतर काँग्रेस भारताच्या परराष्ट्र धोरणावर सरकारला प्रश्न विचारण्याची तयारी करत आहे. ऑपरेशन सिंदूरवर भारताची बाजू मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवले होते.

प्राथमिक विद्यामंदिर, शिवाजीनगर येथे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

विद्यार्थी, पालक, शाळा समिती सदस्य व योगदानकर्त्यांचा सत्कार .

पुणे, – प्राथमिक विद्यामंदिर, शिवाजीनगर, येथे शैक्षणिक वर्ष 2024–25 ची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष डॉ. नंदकिशोर एकबोटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी शाळेचे व्हिजिटर सतीश लिंबेकर कार्यक्रमाला उपस्थित होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेची माजी विद्यार्थिनी कु. दीप्ती पानसरे व सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रेय पवार साहेब उपस्थित होते. आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून त्यांनी शिक्षणातील मूल्य, पालक-शाळा संबंध आणि सामाजिक सहभाग यावर प्रकाश टाकला.

सभेच्या निमित्ताने वर्षभर शैक्षणिक, क्रीडा, कला व इतर उपक्रमांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतलेल्या पालकांचाही सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.शैक्षणिक वर्ष 2025–26 साठी नवीन शाळा समितीचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले, तर मावळत्या समिती सदस्यांचा यथोचित सन्मान व निरोप देण्यात आला. त्यांच्या कार्यकाळातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी मागील वर्षभरात शाळेच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिलेल्या व्यक्तींना खास सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ. क्लेरा काळे यांनी ओघवत्या शैलीत पार पाडले.
मुख्याध्यापिका सौ. ज्योत्स्ना महाजन यांनी पालक, शिक्षक, विद्यार्थी यांचे आभार मानत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील वर्षातही असेच सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.

पारंपरिक ज्ञानाला संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी-रंजनकुमार शर्मा

पुणे: “आयुर्वेदासारख्या प्राचीन व पारंपरिक ज्ञानाला संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी. आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून ज्ञान, कौशल्ये आत्मसात करावीत. सतत शिकण्याची वृत्ती, सकारात्मक मानसिकता, कठोर परिश्रम, नेतृत्वक्षमता आणि तंत्रज्ञानाचा अंतर्भाव यामुळे आपले जीवन अधिक समृद्ध होते,” असे प्रतिपादन पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी केले.

प्राचीन संहिता गुरुकुल आयोजित ‘दिग्गजांच्या मुलाखती’ उपक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, आयुर्वेद अध्यापन व संशोधन संस्थेच्या संचालक वैद्य तनुजा नेसरी व पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी संवाद कार्यक्रम रंगला. टिळक रस्त्यावरील गणेश सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी वैद्य हरिश पाटणकर, वैद्य स्नेहल पाटणकर, बाळराजे खर्डेकर, सुरेश मोहिते, नीता मोहिते, अजय फराटे, धीरेंद्रराजे खर्डेकर, सिध्दसेनराजे खर्डेकर, वैद्य विनेश नगरे, वैद्य संतोष सूर्यवंशी, वैद्य सुहास हेर्लेकर, वैद्य योगिनी पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी प्राचीन संहिता गुरुकुल, केशायुर्वेद आणि कायायुर्वेद परिवाराच्या नवीन संस्थेच्या वास्तूचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. वैद्य हरीश पाटणकर लिखित ‘द ब्रह्मा कोड’ या पुस्तकाचे, वैद्य पाटणकर संशोधित व निर्मित ट्रायरेज हेअर ऑइलचे, इंडियन नॉलेज सिस्टीम ऑलिम्पियाडचे अनावरण झाले. ‘गुरुकुल’च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व वैद्य तनुजा नेसरी यांना ‘आचार्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. वैद्य विवेक आंबरे यांनी सूत्रसंचालन केले. वैद्य स्नेहल पाटणकर यांनी आभार मानले.

रंजनकुमार शर्मा म्हणाले, “प्राचीन ज्ञान व परंपरा जगभर पोहोचण्यासाठी होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. प्रत्येकाने चांगले काम करण्याचा, नकारात्मक परिस्थितीवर मात करून सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकत्रित कुटुंबपद्धती, परस्परांतील संवाद ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. गॅजेट्समुळे अलीकडे कुटुंब विभक्त होताहेत. संवाद हरवला आहे. अशावेळी संवादाने एकमेकांना जोडण्याचे, समजून घेत साथ देण्याचे प्रयत्न व्हावेत.”

सौरभ राव म्हणाले, “गुरुकुल शिक्षणपद्धतीमुळे मूल्याधिष्ठित नेतृत्व तयार होऊ शकते. सध्याच्या काळात केवळ ज्ञानापेक्षा अनुभव, मूल्ये आणि जीवनकौशल्ये अधिक महत्त्वाची ठरत आहेत. आयुर्वेदासारख्या प्राचीन शास्त्रांचा अभ्यास करताना या सर्व गोष्टींचे महत्त्व अधिक आहे. आयुर्वेदाच्या अभ्यासामध्येही शास्त्रीय चिकित्सा, परंपरा आणि जीवनपद्धती यांचा समन्वय आवश्यक आहे. आयुर्वेद हे केवळ औषधशास्त्र नाही, तर संपूर्ण जीवनशैलीचे विज्ञान आहे.”

वैद्य तनुजा नेसरी म्हणाल्या, “आयुर्वेद हे केवळ उपचारपद्धती नसून, तो जीवन जगण्याचा मार्ग आहे. आधुनिक काळात आयुर्वेदाची जागतिक स्तरावर पुन्हा एकदा महत्त्वाची ओळख निर्माण होत आहे, आणि यामागे भारतातील गुरुकुल परंपरेचा मोलाचा वाटा आहे. भारतीय आयुर्वेद प्रणाली ही विज्ञानावर आधारित असून तिचा उगम ऋषीपरंपरेत आहे. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखणारी ही चिकित्सा जगभर लोकस्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरत आहे.”

वैद्य हरीश पाटणकर म्हणाले, “प्राचीन संहिता गुरुकुल, केशायुर्वेद व कायायुर्वेद भारतीय परंपरेला, आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नव्या पिढीला आयुर्वेदाची विविध अंगे समजावीत, समाजात सकारात्मकता पसरवण्यासाठी कार्यरत दिग्गजांना ऐकता यावे, यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण आहे.”

शालेय शिक्षणात आयुर्वेदाचा अंतर्भाव व्हावा

“आज जग आयुर्वेदाकडे पर्याय म्हणून नव्हे, तर प्राथमिक आरोग्य व्यवस्थेसाठी बघत आहे. विद्यार्थ्यांनी आयुर्वेदाचे सखोल अध्ययन करताना संशोधन आणि नवोन्मेष याकडेही लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आयुर्वेदाला घराघरात पोहोचवायचे असेल, तर आपल्याला शालेय शिक्षणात आयुर्वेदाचा अंतर्भाव करायला हवा. त्यातूनच सशक्त भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. परंपरा आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्रीकरणातून, सातत्याने अद्ययावतीकरण, स्वीकार्हता, आणि क्षमतावृद्धी या गोष्टी आत्मसात केल्या, तर शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम पिढी घडेल,” असेही वैद्य नेसरी यांनी नमूद केले.

टीव्हीएस अपाचेआरटीआर 310 लाँच

टीव्हीएस मोटर कंपनीद्वारे अल्टीमेट स्ट्रीट वेपन लाँच – 2025 टीव्हीएस अपाचे आरटीआर 310
~ आधुनिक रायडर्ससाठी आधुनिक तंत्रज्ञानासह बनवण्यात आलेले हे रिफ्रेश्ड मॉडेल बोल्ड ग्राफिक्स, सुधारित

डिजिटल वैशिष्ट्ये व नव्या तंत्रज्ञानासह

बेंगळुरू – रेसिंगचा चार दशकांचा समृद्ध वारसा लाभलेल्या टीव्हीएस मोटर कंपनी
(टीव्हीएसएम) – या दुचाकी व तीनचाकी क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या कंपनीने आज 2025 टीव्हीएस अपाचे
आरटीआर 310 लाँच केली. रायडर- फर्स्ट या मानसिकतेसह बनवण्यात आलेल्या या मॉडेलमध्ये कामगिरीवर भर
देणारे अपग्रेड, आकर्षक स्टायलिंग देण्यात आल् असून भारतीय रस्त्यांवर वर्चस्व गाजवण्यासाठी 2025 टीव्हीएस
अपाचे आरटीआर 310 सज्ज आहे. ताकद आणि अचूकता यांचे योग्य मिश्रण साधणारे हे मशिन आत्मविश्वास,
नियंत्रण आणि ठळक ओळखीसह रायडिंग करायला आवडणाऱ्यांसाठी परफेक्ट आहे.
OBD2B चे पालन करणारी 2025 टीव्हीएस अपाचे आरटीआर 310 स्मार्ट कामगिरीची व्याख्या नव्याने प्रस्थापित
करत आहे. यामध्ये रियल टाइम एमिशन मॉनिटरिंग, जास्त वेगवान प्रतिसाद आणि सुधारित इंजिन देण्यात आले
आहे. नेक्स्ट- जेन, मल्टी- लँग्वेज, UI/UX क्लस्टरने पर्दापण केल्यापासून हे मशिन जास्त इंट्युटिव्ह आणि इमर्सिव्ह
राइड देते, तसेच त्यात शाश्वतता, नाविन्य आणि रायडरचे समाधान नव्या पातळीवर गेले आहे.

समृद्ध आणि या क्षेत्रातील प्रथम वैशिष्ट्ये

बिल्ड टु ऑर्डर (बीटीओ) १२
2025 टीव्हीएस अपाचे आरटीआर 310 ही फॅक्टरी कस्टमायझेशन पर्याय देणारी या क्षेत्रातील पहिलीच गाडी असून
हा पर्याय टीव्हीएस बिल्ट-टु-ऑर्डर (बीटीओ) प्लॅटफॉर्मद्वारे देण्यात येणार आहे.

डायनॅमिक प्रो किटमध्ये पुढील गोष्टींचा समावेश –
 की लेस राइड सिस्टीम
 RT-DSC मध्ये ड्रॅग टॉर्क कंट्रोल वैशिष्ट्य
 RT-DSC मध्ये लाँच कंट्रोल वैशिष्ट्य
या क्षेत्रातील पहिल्यांदाच वैशिष्ट्ये :
 ट्रान्सपरंट क्लच कव्हर
 की लेस राइड
 ड्रॅग टॉर्क कंट्रोल
 कॉर्नरिंग ड्रॅग टॉर्क कंट्रोल (बीटीओ)
नवी वैशिष्ट्ये:
 जेन-2 क्लस्टर, मल्टी- लँग्वेज युआय
 USD 43 डीआयए फ्रंट सस्पेन्शन (बेस व्हेरिएंट)
 सिक्वेन्शियल टर्न सिग्नल लॅम्प (टीएसएल) नव्या स्टायलिंगसह
 हँड गार्ड्स
 ड्रॅग टॉर्क कंट्रोल (DTC)
 लाँच कंट्रोल (RT-DSC) – डायनॅमिक प्रो किट
 ग्राफिक्स रिफ्रेशसह नवीन रंगांचे पर्याय

फ्रीस्टायलरचे डिझाइन आणि डायनॅमिक्स
२०२५ साठी नव्याने तयार करण्यात आलेल्या टीव्हीएस अपाचे आरटीआर 310 मध्ये तीन नवीन, बोल्ड रंगांचे
पर्याय, ठळक ग्राफिक्स व पारदर्शक क्लच कव्हर तसेच अद्ययावत सिक्वेन्शियल टीएसएलसह देण्यात आले आहेत.
यामुळे या मोटरसायकलचा आक्रमक, भविष्यवेधी स्ट्रीटफायटर लूक आणखी उठावदार झाला आहे. सर्व
व्हेरिएंट्समध्ये स्डँडर्ड हँड गार्ड्स देण्यात आले आहेत. त्याशिवाय यातील आयकॉनिक रेस रेप्लिका सेपांग ब्लू टॉप-
एंट बीटीओ व्हेरिएंटवर टीव्हीएसच्या जागतिक रेसिंग वारशाला सलाम म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.
या लाँचविषयी टीव्हीएस मोटर कंपनीचे प्रमुख व्यवसाय – प्रीमियम विमल सुंबली म्हणाले, ‘2025 टीव्हीएस अपाचे
आरटीआर 310 लाँच करण्यात आल्यापासूनच नेकेड स्पोर्ट्स क्षेत्रात ट्रेंडसेटर ठरली आहे. २०२५ एडिशनसह आम्ही
आधुनिक तंत्रज्ञान, इंट्युटिव्ह डिजिटल इंटरफेजेस, स्टँडआउट स्टायलिंग आणि रायडर सुरक्षेसाठी अविरत बांधिलकी
जपत नवा वारसा तयार करत आहोत. या रिफ्रेश्ड फ्रीस्टायलरमध्ये मोटरसायकलिंगचा कनेक्टेड, कस्टमायझेबल व
शाश्वततेप्रती बांधील असलेला नवा काळ प्रतिबिंबित झाला आहे. दर दिवशी आपल्या मर्यादा पार करणाऱ्या
आमच्या टीव्हीएस अपाचे रायडर्सना हा अद्ययावत अनुभव मिळवून देताना आम्हाला अभिमान वाटत आहे.’
ही मोटरसायकल 35.6 PS@9,700 rpm आणि 28.7 Nm@6,650 rpm, देणारी असून दर्जेदार कामगिरीचा
वारसा जपणारी आहे.
2025 टीव्हीएस अपाचे आरटीआर RTR 310 आकर्षक प्रारंभिक किंमतीत उपलब्ध करण्यात आली असून त्या
पुढीलप्रमाणे आहेत –
बेस व्हेरिएंट रू. 2,39,990
टॉप व्हेरिएंट रू. 2,57,000
बीटीओ रू. 2,75,000 पासून सुरुवात

ही मोटरसायकल पाच व्हेरिएंट्समध्ये (बीटीओ कस्टमायझेशनसह) दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू आणि
चेन्नईसारख्या शहरांत १६ जुलै २०२५ पासून उपलब्ध केली जाणार आहे.

स्थानिक प्रश्नांसह राज्यस्तरीय प्रश्न सभागृहात मांडले – आ. अमित गोरखे

0

तालिका सभापती पदाचा सन्मान जीवनातील सर्वोच्च आनंद – आ. अमित गोरखे

पिंपरी, पुणे (दि. १९ जुलै २०२५) यूपीएससी एमपीएससी या स्पर्धा परीक्षेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या परंतु निवड न झालेल्या उमेदवारांसाठी “प्रतिभा सेतू” सारखा प्रकल्प राबवावा. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जाती जमातीतील धर्मांतरित नागरिकांच्या सवलती बंद कराव्यात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीची माहिती देणारा अभ्यासक्रम सीबीएससी च्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या, पिंपरी चिंचवड शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात त्रुटी असल्यामुळे तो रद्द करावा. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या मागील पोलीस स्टेशनचे आरक्षण रद्द करून तेथे असणारे नियोजित माता रमाई आंबेडकर यांचे स्मारक विकसित करावे. राज्य सरकारमधील खेळाडूंना सन्मानपूर्वक बढती मिळावी. तसेच राज्यात इ गव्हर्नन्स द्वारे रिक्त पदे भरून जुनी पेन्शन योजना लागू करावी, बाल गुन्हेगारी व सोशल मीडिया मधील गैरवापर रोखण्यासाठी कडक कायदे करावेत, भटक्या श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी धोरण निश्चित करावे. राजकीय व सामाजिक आंदोलनात कार्यकर्त्यांवर झालेले गुन्हे मागे घ्यावेत व यासाठी नेमलेल्या समितीच्या नियमित बैठका घ्याव्यात. अनेक ठिकाणी सार्वजनिक स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी करताना जात, धर्म, वर्ग असा भेदभाव करून नागरिकांना त्रास दिला जातो. त्या गावातील पोलीस निरीक्षक व महसूल अधिकाऱ्यांना थेट जबाबदार धरून घटनेनंतर संबंधितांवर २४ तासात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा व पीडित कुटुंबांना तातडीची मदत, संरक्षण आणि सन्मानाची वागणूक द्यावी. राज्यातील अनेक ठिकाणी सांस्कृतिक सभागृहांमधील शनिवार, रविवार व इतर सुट्टीच्या दिवसातील अनेक कार्यक्रम ऐनवेळी राजकीय व शासकीय कार्यक्रमांमुळे अचानक रद्द केले जातात त्यामुळे कलाकारांचे आर्थिक नुकसान होते यासाठी निश्चित धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आयुर्वेदिक औषध उपचार व आयुर्वेदिक चिकित्सा विभाग पुन्हा सुरू करावा. मावळ मौजे उर्से येथील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी तात्काळ एसआयटी नेमून उच्चस्तरीय चौकशी करावी अशा विविध प्रश्नांवर मला विधान परिषदेत शासनाचे लक्ष वेधता आले अशी माहिती आमदार अमित गोरखे यांनी दिली.
शनिवारी (दि. १९) चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार अमित गोरखे बोलत होते.
यावेळी भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे, महिला मोर्चा अध्यक्ष शहराध्यक्ष सुजाताताई पालांडे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडी प्रदेशाध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी राजेश पिल्ले, महेश कुलकर्णी, ॲड. मोरेश्वर शेडगे, पिंपरी चिंचवड सरचिटणीस संजय मंगोडेकर, शितल शिंदे, प्रवक्ता राजू दुर्गे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, मंडल अध्यक्ष धर्मा वाघमारे, अनिता वाळुंजकर आणि मंगेश धाडगे, प्रभाग स्वीकृत सदस्य वैशाली खाड्डये, संजय कणसे, सागर फुगे, धर्मेंद्र क्षीरसागर, देवदत्त लांडे, प्रतिभा जवळकर, मारुती जाधव, गणेश लंगोटे, बापू घोलप, प्रताप सूर्यवंशी, अतुल इनामदार, शाकीर शेख, बाळा शिंदे किसन शिंदे, दीपक भंडारी आदी उपस्थित होते.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी देखील पत्रकारांनी पिंपरी चिंचवड शहराच्या प्रारूप विकास आराखडा विषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
वरिष्ठ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच अनेक ज्येष्ठ मंत्री यांच्यासमोर मला तालिका सभापती पदाचा सन्मान मिळाला ही माझ्या जीवनातील न विसरता येणारी सर्वोच्च आनंदाची घटना आहे असेही आमदार अमित गोरखे यांनी सांगितले. तसेच माझ्या काही प्रश्नांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जयकुमार गोरे, माधुरी मिसाळ यासारख्या वरिष्ठ मंत्र्यांनी माहिती देऊन माझ्यासारख्या युवा आमदाराला पाठबळ दिले. तसेच मी शहरातील स्थानिक प्रश्नांबरोबरच राज्यातील तसेच देशातील काही निवडक प्रश्न सभागृहात मांडू शकलो याविषयी आ. आमदार गोरखे यांनी समाधान व्यक्त केले.
विधान परिषदेतील कामकाजाविषयी अधिक माहिती देताना आमदार अमित गोरखे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहराचा प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला होता. यामध्ये अनेक त्रुटी आहेत. हा डीपी म्हणजे बिल्डर लॉबीच्या हिताचा कट आहे. त्यामुळे डीपी रद्द करावा अशी मागणी मी विधान परिषदेत लक्षवेधी द्वारे केली. यावर मंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात सांगितले की, हरकतींवर सुनावणी झाल्यावर नियोजन विभाग दुरुस्ती सुचवेल. त्यानंतर अंतिम अहवाल शासनाला पाठवला जाईल. शासनालाही दुरुस्ती करण्याचे अधिकार आहेत. यावर मुख्यमंत्री तसेच नगरविकास मंत्र्यांकडे बैठक लावणार आहे. आराखडा योग्य नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर निर्णय घेतील.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने अलीकडेच ‘प्रतिभा सेतू’ ही उपयुक्त योजना सुरू असून या योजनेचा उद्देश यूपीएससी स्पर्धा परीक्षेतील अंतिम मुलाखतीपर्यंत पोहोचलेल्या, पण अंतिम निवड न मिळालेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. एमपीएससी परीक्षांतही दरवर्षी लाखो विद्यार्थी सहभागी होतात. मात्र, जागांची मर्यादा असल्याने अनेकांची निवड होऊ शकत नाही अशा उमेदवारांसाठी महाराष्ट्रातही ‘प्रतिभा सेतू’ सारखी योजना राबविणे अत्यंत गरजेचे आहे.
अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा गैरवापर करणाऱ्यांचे प्रमाणपत्र रद्द करावे व धर्मांतर करून अनुसूचित जातीचे आरक्षणाचे लाभ घेत असलेल्या व्यक्तींना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र दिले जाऊ नये. या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहास माहिती देताना सांगितले की, हिंदू, बौद्ध आणि शीख या धर्मांव्यतिरिक्त धर्मांतर केलेल्या व्यक्तींना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही. जर इतर कोणत्याही धर्मात गेल्यावर कोणी एससी प्रमाणपत्र घेतले असेल, तर ते रद्द केले जाईल. शासन सर्वोच्च न्यायालयाच्या २६ नोव्हेंबर २००४ च्या निर्णयाची अंमलबजावणी कडकपणे करेल.
आधार संच यंत्र वाटप ची जबाबदारी असणाऱ्या महाआयटी या संस्थेकडे यंत्र वाटपाविषयीची आवश्यक माहिती उपलब्ध नाही. पुणे जिल्ह्यामध्ये वितरणामध्ये मोठी तफावत आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी लावून तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे व संबंधित कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषयीच्या माहितीचा समावेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्यासक्रम २०२० प्रमाणे सीबीएससीच्या शालेय पाठ्यपुस्तकात करावा. ई – गव्हर्नन्स व रिक्त पदे भरून, जुनी पेन्शन योजना पुनरुज्जीवित करावी आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी या आर्थिक वर्षात सर्व रिक्त पदे युद्धपातळीवर तातडीने भरावी. “२००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी. राज्यातील रक्तपेढ्यांमधून देण्यात आलेल्या रक्तामुळे अनेक नागरिकांना एचआयव्ही चा संसर्ग झाला ही गंभीर बाब आहे. यासाठी “नॅट” (Nucleic Acid Testing) ही रक्त तपासणीची आधुनिक चाचणी प्रायोगिक तत्वावर सुरू करावी.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नांदणी नदीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बांधलेला पूल २५ मे, २०२५ रोजी अवघ्या बारा वर्षात कोसळला यावर काय कारवाई करणार असा प्रश्न विचारला असता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, या प्रकरणात चौकशी अहवाल सादर झाला असून त्यात तफावत असल्याने पुन्हा चौकशी होणार आहे. तोपर्यंत संबंधित ठेकेदारावर तातडीने कारवाई केली जाईल आणि काळ्या यादीत टाकले जाईल व दोषी अधिकाऱ्यांवरही कठोर केली जाईल.
बालगुन्हेगारी व सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज आहे. अशा विधी संघर्षित मुलांवर सौम्य कारवाई करून बाल सुधारगृहात ठेवून नंतर मुक्त करणे केले जाते. या कायद्यातील पळवाटा गुन्हेगारांना मदत करणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे हा कायदा अधिक कडक करावा.
पुणे व पिंपरी शहरातील नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करून पीएमपी बसमध्ये प्राथमिक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली होती. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, पीएपी बसमध्ये आवश्यक सुरक्षासाधने असणे अत्यावश्यक आहे. सध्याच्या स्थितीत ती पुरेशी उपलब्ध नाहीत. प्रशासनाने हे गांभीर्याने घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा आहे.
राज्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी केली असता. मंत्री उदय सामंत सांगितले की, राज्यात भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या चौकटीत राहून विशेष मोहीम राबवण्यात येईल आणि यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जाईल.
विभागीय परीक्षेच्या अटींमुळे थेट नियुक्त खेळाडूंवर अन्याय होत आहे. खेळाडूंना शासनाचे लाभ मिळत नाहीत. त्याची पदोन्नती रखडलेली आहे. याबाबत तत्काळ उच्चस्तरीय बैठक बोलावून खेळाडूंना न्याय द्यावा. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ द्यावा. साहित्य, कला, समाज परिवर्तन आणि दलित समाजाचा आवाज बनून त्यांनी काम केले. राज्यात विविध संघटनांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालये आणि तहसील कार्यालये आदी ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना “भारतरत्न” मिळावा यासाठी आंदोलने सुरू आहेत. या लोकभावनांची दखल घेत, विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये ठराव संमत करून, केंद्र सरकारकडे अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी अधिकृत शिफारस करण्याची मागणी केली. अण्णा भाऊ साठे महामंडळ व संशोधन संस्थासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. ४४२ कोटी रुपयांची मागणी केली जात आहे. यापूर्वी दुसऱ्या टप्प्यात २१४ कोटी रुपयांची मागणी केली होती, पण आजपर्यंत हा निधी पूर्णपणे उपलब्ध झालेला नाही. यामुळे महामंडळाची कामे रखडली आहेत. ARTI साठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी.
पिंपरी चिंचवड मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पोलीस स्टेशन आरक्षण रद्द करावे व नियोजित माता रमाई आंबेडकर स्मारक विकसित करावे. ज्या गावात सार्वजनिक स्मशानभूमीवर जात, धर्म, वर्ग वा कुठल्याही सामाजिक ओळखीच्या आधारावर भेदभाव केला जातो, त्या गावातील पोलीस निरीक्षक व महसूल अधिकार्‍यांना थेट जबाबदार धरले जावे. घटनेनंतर २४ तासात गुन्हा नोंदवून संबंधितांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. अशा प्रकरणांमध्ये पीडित कुटुंबाला तातडीची मदत, संरक्षण आणि सन्मानाने अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
पिंपरी चिंचवडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील काम रखडलेली आहेत. रहदारीचा रस्ता अरुंद झाल्यामुळे दररोज अंदाजे २-३ तास वाहतूक कोंडीस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तांत्रिक ऑडिट आणि दोषींवर कारवाई करावी. ही कामे निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी.
पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या विकास प्रकल्पांमुळे अनेक नागरिकांच्या जमिनी, घरे आणि व्यवसाय बाधित होत आहेत. या पार्श्वभूमीवर “स्वतंत्र पोर्टल” तयार करून, या पोर्टलच्या माध्यमातून स्थानिकांना पुनर्वसनाच्या योजनांमध्ये प्राधान्य, तसेच नोकरी, प्रशिक्षण, व्यावसायिक संधींमध्ये प्राथमिकता मिळावी, ही मागणी केली. अनेक वेळा आयोजित नाट्य शो वा सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले जातात. यामुळे संबंधित कलाकारांचे आर्थिक नुकसान होते. शासनाने या संदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा. खनिकर्म प्राधिकरण विधेयक केवळ उत्खनन नव्हे, स्थानिकांचे सक्षमीकरण हवे. ७५ टक्के रोजगार स्थानिकांसाठी राखीव ठेवण्याची मागणी केली आहे.मावळातील मौजे उर्से येथील शेतकऱ्यांची बनावट नोटरी कुलमुखात्यार या दस्ताच्या आधारे कोट्यावधी रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी एसआयटी द्वारे उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात यापूर्वी आयुर्वेदिक ओपीडी चालू होती परंतु काही काळानंतर ती बंद करण्यात आली. महापालिका रुग्णालयांत व दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) मोठ्या संख्येने उपलब्ध असताना आर्युवेदिक औषध आणि उपचार सामान्य नागरिकांना मिळत नाही ते सुरु करावे असे सर्वसामान्यांची निगडित असणारे प्रश्न मी सभागृहात मांडले अशी माहिती आमदार अमित गोरखे यांनी यावेळी दिली.

ज्ञानोबा-तुकोबांचे विचारच भारताला विश्वगुरू बनवेल:डॉ. अविनाश धर्माधिकारी

‘श्री क्षेत्र आळंदीत ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’ चे उद्घाटन

पुणे, १९ जुलैः “अध्यात्म आणि विज्ञानाचे एकत्रिकरणकेल्यास भारताला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देता येऊ शकते. परंतू युवकांमध्ये वाढत जाणारी व्यसनाधिनतेला थांबवून त्यांना भक्तीची नशा लावावी. हे कार्य केवळ वारकरी संप्रदायच करू शकते. ज्ञानोबा-तुकोबांच्या विचारांवर जेव्हा युवक चालेल तेव्हाच भारत विश्वगुरू बनेल.” असे विचार चाणक्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन, पुणे’ व ‘एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद’ यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमानवाडी आळंदी (देवाची) येथील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल येथे आयोजित दोन दिवशीय ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’चे उद्घाटन द्विप प्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या प्रसंगी देहूचे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बापूसाहेब महाराज मोरे, खांडबहाले डॉट कॉम चे निर्माते डॉ. सुनिल खांडबहाले, पद्मश्री पोपटराव पवार व मुंबई येथील श्रीसंत नामदेव महाराज कीर्तन महाविद्यालय जगन्नाथ महाराज पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. या गोलमेज परिषदेचे संकल्पक एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड हे ही उपस्थित होते.
तसेच यशोधन महाराज साखरे, रामकृष्ण महाराज, परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील व राष्ट्रीय सरपंच संसदेचे सह समन्वयक प्रकाश महाले हे उपस्थित होते.
डॉ. अविनाश धर्माधिकारी म्हणाले,” या देशामध्ये युवकांचे उत्तम चारित्र्य घडविण्यासाठी वारकरी संप्रदाय महत्वाचा आहे. शिक्षणाचे कार्य हे चरित्र घडविण्याचे आहे. कोणतेही कार्य शुद्ध बुद्धिने व कर्तृत्वाने नीट केले तर समाजाची घडी व्यवस्थित बसेल. ज्ञानोबा तुकोबांच्या मार्गदर्शनाची गरज सर्वांना आहे. त्यांनी भक्ती आणि शक्तीच्या चळवळीचा संदेश दिला आहे. ”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”कीर्तनकारांनी समाजाला जागृत करण्यासाठी ज्ञानोब तुकोबाचा संदेश पोहचवावा. बुद्धि ही सद्बुद्धी असावी. आत्म अविनाशी असून मन चंचल आहे. अशा वेळेस मनाला स्थिर करण्याचे साधन कोणते हे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानात आहे.”
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ” सरकारी यंत्रणा आणि संप्रदाय यांच्यातील ही परिषद एक दुवा आहे. प्रत्येकाने आपली जवाबदारी ओळखून ती पूर्ण पाडावी. आज समाजाची वर्तमान स्थिती पाहता वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रातील धर्म टिकवून ठेवला आहे. वारी ही एक पॉवर हाऊस आहे. ती समाजाला दिशा देण्याची क्षमता ठेवते. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली. त्यानंतर काळानुरूप अनेक धर्माचे आक्रमण झाले तरी या संप्रदायाने आपले मुळ घट्ट रोवून ठेवले होते.”
डॉ. राहुल कराड म्हणाले,” परिषदेत वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून होत असलेले मौलिक लोककल्याणाचे कार्य, आध्यात्मिक प्रबोधनाबरोबरच लोक जीवनातील विविध दैनंदिन समस्यांच्या निराकरणासाठी अधिकाधिक कसे उपयोगी होईल. या विषयावर विविध अंगाने विचारमंथन होत आहे. येथे सामाजिक प्रबोधनाचे नवीन विषय व कार्याची निश्चित दिशा ठरविली जाणार आहे.”
पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले,”समाज एक संघ बांधण्याचे कार्य वारकर्‍यांनी केले आहे. परंतू भविष्यातील सर्वात मोठ्या समस्या पर्यावरण, मातीचे आरोग्य, व्यसनाधिन होत चालेली पिढी आहे. अशावेळेस संत साहित्याची वाटचाल पाहिली तर ज्ञानेबा तुकोबांची परंपरा ही आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालूनच समाज व भविष्यातील पुढील पिढी समृद्ध होईल.”
जगन्नाथ महाराज पाटील म्हणाले,” कल्याणाच्या मार्गाने चालणार्‍यांचे दर्शन करण्यासाठी ही परिषदे आहे. भारताच्या भविष्यासाठी लंडन येथे १९३० मध्ये गोलमेज परिषद भरविण्यात आली होती. त्यानंतर विश्वकल्याणासाठी ही परिषद आहे. समस्यांना समोर जातांना त्या सोडविण्यासाठी वारकरी विचार प्रणाली हाच उपाय आहे. ”
योगेश पाटील यांनी प्रास्ताविकेत सांगितले की, परिषदेत संपूर्ण महाराष्ट्रातील ६० कीर्तनकार आणि १५० सरपंच सहभागी झाले. जागतिक सामाजिक सस्यांचे निराकरण करण्याचे कार्य केवळ वारकरी संप्रदायच करू शकतात. वारकरी संप्रदायाच्या समोरील अडचणी जाणून त्यावर प्रतिशिल आराखडा तयार करून कार्य या परिषदेच्या माध्यमातून केले जाणार आहे.
यानंतर बापू महाराज मोरे व डॉ. सुनिल खांडबहाले यांनी आपल्या भाषणात सांगितले की वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मानव जातीचे कल्याण होऊ शकते. त्यासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालावे.
सूत्रसंचालन डॉ. शलिनी टोणपे यांनी केले.

महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, पर्यावरण संरक्षण आणि प्रशासकीय सुधारणांसाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा प्रभावी सहभाग ठोस पुढाकार

महाराष्ट्र विधानमंडळ पावसाळी अधिवेशन २०२५

मुंबई, १८ जुलै २०२५ :
महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै २०२५ दरम्यान मुंबईत पार पडले. या अधिवेशनात स्थिरावलेल्या सरकारच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळातील औपचारिकता पार पडत असताना मोठ्या प्रमाणावर विधायक कामकाज घडून आले. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनादरम्यान सामाजिक, आर्थिक, महिला व बालकल्याण, पर्यावरण, कृषी, प्रशासकीय सुधारणे या विषयांवर ठोस पुढाकार घेत प्रभावी भूमिका बजावली.

अधिवेशनाचे वैशिष्ट्य:

स्थिरावलेले सरकार आणि जलद निर्णयप्रक्रिया

महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा आणि मंजुरी

महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा भूषण गवई यांचा सत्कार

सामाजिक, महिला सुरक्षा, पर्यावरण आणि न्याय विषयक महत्वाचे निर्णय

अधिवेशनाची ठळक वैशिष्ट्ये व डॉ. गोऱ्हे यांचे योगदान

◆. अधिवेशनाचा प्रारंभ आणि गौरव समारंभ

अधिवेशनाच्या सुरुवातीला भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण रामकृष्ण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गटनेते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गोऱ्हे यांनी केले. सरन्यायाधीशांनी भारतीय राज्यघटनेचे महत्त्व, न्यायप्रणाली आणि लोकशाहीचे मूलभूत तत्त्वे सर्वसामान्य आणि लोकप्रतिनिधींना सोप्या भाषेत समजावून सांगितली.

◆. जनसुरक्षा कायद्यावरील चर्चा

अधिवेशनातील महत्त्वाचे आकर्षण म्हणजे जनसुरक्षा विधेयक. या कायद्याद्वारे अराजक निर्माण करणाऱ्या हेतुपुरस्सर हिंसाचारावर नियंत्रण आणण्यासाठी सशक्त यंत्रणा तयार करण्यात आली आहे. न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील समितीकडे पुरावे सादर केल्यानंतरच कारवाई होणार आहे. विरोधी पक्षाने यावर सभात्याग केला, मात्र डॉ. गोऱ्हे यांनी या कायद्याचे महत्त्व अधोरेखित केले.

◆. महिला सुरक्षा आणि बालगृह सुधारणा

संभाजीनगर येथील बालगृहातून मुली पळून जाण्याच्या घटनेवर डॉ. गोऱ्हे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी पॉक्सो कायद्याचा पुनर्विचार आणि महिला-बालसुरक्षा व्यवस्थापनासाठी एसओपी तयार करण्याचे निर्देश दिले.

◆. ऊसतोड महिला मजुरांचे प्रश्न

ऊसतोड महिला मजुरांसाठी स्वतंत्र कायदा करण्याचा ठोस प्रस्ताव मांडत डॉ. गोऱ्हे यांनी सहकार विभागाला कायद्याचा मसुदा तातडीने तयार करण्याचे निर्देश दिले.

◆. महिला अत्याचार प्रकरणावर ठाम भूमिका

बॉम्बे रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांवरील अत्याचाराच्या प्रकरणात पोलिस आणि रुग्णालय प्रशासनाच्या निष्क्रियतेवर डॉ. गोऱ्हे यांनी कठोर नाराजी व्यक्त करून तातडीच्या कारवाईची मागणी केली.

◆. पर्यावरण संरक्षणासाठी उपाययोजना

अंधेरीतील कांदळवन तोडीच्या प्रकरणात डॉ. गोऱ्हे यांनी चौकशी समिती गठित करण्याचे निर्देश दिले आणि पर्यावरणीय गुन्ह्यांवर कठोर कारवाईसाठी कायदेशीर सुधारणा करण्यावर भर दिला.

◆. कृषी क्षेत्रातील पारदर्शकता

सोयाबीन खरेदीतील गैरव्यवहारावर कारवाईचा इशारा देऊन डॉ. गोऱ्हे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाला जबाबदार धरण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.

◆. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा संवर्धन

महात्मा फुले वाडा आणि भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाची गती वाढवण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी आढावा बैठक घेतली आणि १५ दिवसांत अंमलबजावणी सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

◆. मराठी भाषेच्या प्रसारासाठी पुढाकार

मराठी भाषेचा देश-विदेशात प्रसार व्हावा, या दृष्टीने सरकारने बृहन्महाराष्ट्र मंडळ (BMM) ५० लाख निधी दिला आहे. प्रसार व प्रचार उद्देशाने बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. मिलिंद महाजन यांच्याशी प्राथमिक बैठक घेऊन धोरणात्मक आराखडा तयार करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतला.

महत्त्वपूर्ण अन्य मुद्दे

भटक्या-विमुक्त समाजाच्या मागण्यांवर बैठक घेऊन दीर्घकालीन उपाययोजनेसाठी आश्वासन.

पुण्यातील बीडीपी (बायोडायव्हर्सिटी झोन) संदर्भातील समितीला शिफारसी सादर.

वैष्णवी हगवणे प्रकरण

महिला व बालविकास समितीने तयार केलेल्या अहवालाची प्रत सादर करण्यात आली असून, सरकारने तातडीने कारवाई करावी अशी शिफारस करण्यात आली. याआधी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी खैरलांजी घटनेवर सादर केलेल्या अहवालासारखेच या अहवालावरही लक्ष दिले जात आहे.

अधिवेशनादरम्यानची अप्रिय घटना
अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसांत झालेली मारामारी ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. माननीय अध्यक्ष व सभापतींनी प्रवेशाविषयी स्पष्ट नियम दिलेले असून, आमदारांनी त्याचे पालन केल्यास असे प्रसंग टाळता येऊ शकतात. एका आमदाराकडून घडलेल्या अयोग्य घोषणांची माहितीही समोर आली असून त्याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

अधिवेशनाचा संदेश आणि निष्कर्ष

या अधिवेशनातून मतभेद असले तरी मनभेद कमी व्हावेत आणि लोकशाही मार्गाने प्रश्न सोडवावेत हा संदेश स्पष्टपणे मिळतो. सरकारने अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी ठोस भूमिका घेतली असून, लोकप्रतिनिधींनीही सुसंस्कृत व जबाबदार वर्तन करून समाजात शांततेचा संदेश द्यावा, ही काळाची गरज आहे.

या अधिवेशनातून महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, पर्यावरण संरक्षण आणि सांस्कृतिक संवर्धनाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊले उचलण्यात आली, यामध्ये डॉ. नीलम गोऱ्हे यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली.

राज ठाकरेंसोबत जाणाऱ्यांचे राजकारण संपेल, मराठी मुद्द्यावरुन अभिनेता भाजप खासदार मनोज तिवारीचा इशारा

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदरमध्ये मराठीचा मुद्दा पुन्हा जोमात उचलून धरल्यानंतर, आता भाजपचे खासदार व लोकप्रिय गायक-अभिनेता मनोज तिवारी यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो महाराष्ट्रात समाप्त होईल,’ असा थेट इशारा त्यांनी दिला असून, मराठी अस्मितेचा खरा आदर भाजपच करत असल्याचा दावा केला आहे.

मनोज तिवारी म्हणाले की, या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात भाषिक आणि प्रांतीय एकतेचा जो भाईचारा आहे, तो मोडण्याचा प्रयत्न करणारा हा एक ‘प्राणी’ आहे. राज ठाकरेला कोणीही काहीही बोलू दे, पण जे राजकारणाच्या कचराकुंडीत गेले आहेत, त्यांना पुन्हा उचलण्याचा प्रयत्न कुणी करू नये, हीच प्रार्थना.

मनोज तिवारी म्हणाले की, राज ठाकरे आणि त्यांच्या सारखे लोक मराठी संस्कृतीचा केवळ दिखावा करतात. मात्र भारतीय जनता पार्टीच खऱ्या अर्थाने मराठी भाषेच्या अस्मितेचे जतन करते. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता राज ठाकरे यांना स्वीकारत नाही. आणि जे त्यांच्या सोबत जातील, ते देखील महाराष्ट्राच्या राजकारणातून संपतील.

दुबेला मुंबईच्या समुद्रात डुबे-डुबे के मारेंगे- राज ठाकरे

उत्तर भारतात येऊन दाखवा,तुम्हाला पटक-पटक के मारेंगे असे आव्हान झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिले होते. त्यावर दुबेंना प्रतिआव्हान देत तुम्ही मुंबईत येऊन दाखवा, तुम्हाला मुंबईच्या समुद्रात डुबे-डुबे के मारेंगे, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. हिंदी सक्तीचा विरोध आणि मीरा-भाईंदर येथील मनसेच्या आंदोलनानंतर प्रथमच राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर सभा घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीसाठी पेटलेत अशी टीका त्यांनी फडणवीस यांच्यावर केली.

हनीट्रॅपमुळेच एकनाथ शिंदे सरकार आले:काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा

मुंबई-महाविकास आघाडीचे सरकार उलथावून सत्तेत आलेले एकनाथ शिंदे सरकार हनीट्रॅपमुळे आल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी केला. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत हनीट्रॅपचे आरोप फेटाळले. पण सरकार व विरोधकांकडे याविषयी मोठी माहिती आहे. त्याचे पुरावे द्यायचे झाले तर तिकीट आम्हाला तिकीट लावावे लागेल. विशेषतः एकनाथ शिंदे यांचे सरकाही नाशिकच्या सीडीमुळेच आले होते, असे ते म्हणालेत. वडेट्टीवार यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गुरूवारी विधानसभेच्या पटलावर मंत्रालय, नाशिक व ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी एक पेन ड्राईव्हही सभागृहात दाखवले होते. विधानसभा अध्यक्षांनी सरकारला हनीट्रॅपच्या मुद्यावर निवेदन करण्याचे सांगितले. पण त्यांच्या सूचनेनंतरही सरकारने त्यावर निवेदन केले नाही. या प्रकरणी महाराष्ट्राची बदनामी होत आहे. मंत्रालय, नाशिक व ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र बनले आहे. राज्याचे महत्त्वाचे दस्तऐवज या समाजविघातक संघटनाच्या हाती जात आहेत. मी कुणाचेही चारित्र्यहनन करत नाही. माझ्याकडे पेन ड्राईव्हही आहे. मला ते दाखवायचे नाही. पण एवढ्या गंभीर प्रकरणात सरकार निवेदन करण्यास तयार नाही हा माझा आरोप आहे, असे ते म्हणाले होते.

नाना पटोले यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आरोप फेटाळले होते. ना हनी आहे ना ट्रॅप. आमच्यापर्यंत नाना पटोलेंचे बॉम्ब पोहोचलाच नाही, असे ते या आरोपांची खिल्ली उडवत म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी उपरोक्त दावा केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री काल हनीही नाही आणि ट्रॅपही नाही असे म्हणाले. पण त्यासंदर्भात सरकार व विरोधकांकडे फार मोठी माहिती आहे. कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा कुणाला अधिकार नाही म्हणून आम्ही शांत आहोत. पण मागच्यावेळेस शिंदे सरकार जे आले, ते अशाच नाशिकच्या प्रकरणामुळे आले. जे काही सत्तापालट झाले ते सीडीमुळेच झाले, एवढे मोठे ते प्रकरण आहे.

यात अनेक ऑफिसर, अनेक आयएएस व माजी अधिकारी आहेत. अनेक मोठी माणसे आहेत. त्यावर अधिक काही बोलण्याची गरज नाही. ते ज्यावेळी आम्ही दाखवू त्यावेळी आम्हाला 10-20 हजारांचे तिकीटच लावावे लागेल. ते चित्र निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच दाखवावे लागेल. एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.

राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात PIL:हिंदी भाषिकांना धमकावल्याचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. या याचिकेद्वारे त्यांच्यावर हिंदी भाषिकांविरोधात हिंसाचाराला खतपाणी घालण्यासह द्वेष पसरवण्याचा आरोप करण्यात आला आहे.महाराष्ट्रात हिंदीच्या सक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राज व उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला विरोध केल्यानंतर सरकारने यासंबंधीचा जीआर रद्दबातल केला. पण त्यानंतरही ठाकरे व सत्ताधारी भाजपच्या नेत्यांमध्ये या प्रकरणी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राज यांनी शुक्रवारी यासंबंधी मीरा भाईंदर येथे एक सभा घेतली होती. त्यात त्यांनी अमराठी नागरिकांना मुंबईत शांततेत व्यापार व्यवसाय करण्याचा इशारा दिला होता. मराठी व्यापारी नाहीत का? महाराष्ट्रात राहायचे असेल त मराठी शिका, नीट व्यापार करा. मस्ती दाखवली, तर दणका बसणार म्हणजे बसणार, असे ते म्हणाले होते.

त्यांच्या या इशाऱ्यानंतर हिंदी भाषिक नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असताना आता थेट सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाद्वारे हिंदी भाषिक लोकांविरोधात हिंसाचार भडकवण्याचा व द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. यामुळे महाराष्ट्रात भाषेच्या मुद्यावरून तणाव वाढवल्याप्रकरणी राज यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे लोकांना रस्त्यावर येण्याची प्रेरणा मिळते आणि त्यानंतर हिंदीला विरोध म्हणून मराठी न बोलणाऱ्या किंवा इतर राज्यांमधून आलेल्या लोकंवर मराठी लादण्यात येते, असा आरोपही या याचिकेत करण्यात आल्याचा दावा आयएएनएसने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे राज ठाकरे यांच्याविरोधात 3 वकिलांनी नुकतीच पोलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत राज यांची काही विधाने सामाजिक अशांततेला प्रोत्साहन देणारी तथा सामाजिक सलोखा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणारी असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती.

राज ठाकरे यांची शुक्रवारी मीरा भाईंदर येथे सभा झाली. त्यात त्यांनी मराठीच्या मुद्यावरून भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भाजपचा दुबे नावाचा एक कोणता तरी खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारू. त्याच्यावर केस झाली का? हिंदी चॅनलवाल्यांनी त्यांचे चालवले का? त्याचे वक्तव्य दाखवले का? काहीही नाही. बघा हे कसे असतात. तू आ म्हाला पटक पटक के मारणार? मी दुबेला सांगतो. तुम मुंबई आ जाओ. मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे, असे राज ठाकरे म्हणाले होते.

पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे भव्य उद्घाटन..!

पुणे-राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या येत्या २२ जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे उद्घाटन पुण्याच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या शनिवारवाडा येथून झेंडा दाखवून करण्यात आले.

या भव्य सोहळ्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू श्री. मनोहर चासकर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र घाडगे, मानद सचिव श्री. संदीप कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री. सुभाष जगताप, कार्याध्यक्ष सौ. रूपालीताई ठोंबरे व श्री. प्रदीप देशमुख, आयएएस अधिकारी श्री. विजय देशमुख, पक्षाचे विविध पदाधिकारी तसेच प्रचंड मोठ्या संख्येने स्पर्धक उपस्थित होते.

गतवर्षी याच स्पर्धेत १२२ किमी अंतर २ तास ३५ मिनिटांत पूर्ण करून सेनादलातील स्पर्धकाने विक्रमी कामगिरी केली होती. यंदा या विक्रमाचा पुढचा टप्पा गाठून नवीन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू घडावेत, अशी शुभेच्छा..!

अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या नऊ वर्षांपासून या स्पर्धेचे सातत्यपूर्ण आयोजन केले जात आहे. यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांचे विशेष परिश्रम असतात .

पीएमपीएमएल अधिकारी बदलाचा खेळ कोणासाठी-माजी आमदार मोहन जोशी

सत्ताधारी भाजपने लाखो प्रवाशांना
सोडले वाऱ्यावर

पुणे : गेल्या ७ वर्षात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) चे ८ अध्यक्ष बदलून व्यवस्थेचा खेळ खंडोबा केला. हा सगळा खेळ सत्ताधारी भाजप कोणासाठी खेळत आहे? असा सवाल माजी आमदार, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे विचारला आहे.

पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांचा सेवाकाळ पूर्ण होऊच दिला जात नाही. प्रशासनातील या सारख्या बदलांमुळे पीएमपी कारभाराची घडी व्यवस्थित बसू दिली जातच नाही. नुकतेच अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका दीपा मुधोळ-मुंडे यांची बदली करण्यात आली. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून केवळ १ वर्ष ४ दिवस एवढ्या काळानंतर त्यांना बदलण्यात आले आहे. त्यांनी पीएमपीमध्ये अतिशय कुशल कारभार करून पीएमपी कर्मचारी आणि प्रवासी यांच्याबरोबर संवाद साधून प्रशासकीय घडी बसविण्याचा प्रयत्न केला होता. पण, अचानक त्यांची बदली करून भाजपने काय साधले? असे, मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

गेल्या ७ वर्षात नयना मुंडे, डॉ.राजेंद्र जगताप, डॉ.कुणाल खेमणार, लक्ष्मीनारायण मिश्रा, ओमप्रकाश बकोरिया, सचिंद्र प्रताप सिंह, डॉ.संजय कोलते असे ७ चांगले प्रशासकीय अधिकारी त्यांचा सेवाकाळ पूर्ण होण्याच्या अगोदरच बदलण्यात आले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे १०लाख प्रवासी दररोज पीएमपीने प्रवास करतात. या प्रवाशांना सुलभ सेवा मिळणे गरजेचे असताना, तसेच पुणेकरांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, त्यातून सुटका करण्यासाठी सार्वजनिक बस सेवा अधिक सक्षम करणे आवश्यक असताना, ते करण्या ऐवजी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा खेळ सत्ताधारी भाजप करत आहे आणि पुणेकर प्रवाशांना वाऱ्यावर सोडले आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे ठेकेदारांशी गुंतलेले हितसंबंध कारणीभूत आहेत, असाही आरोप माजी आमदार मोहन जोशी यांनी केला आहे.

भाजपाने जे पेरले तेच उगवले; विरोधकांच्या अंगावर सोडण्यासाठी भाजपने गुंड, मवाली पोसले.

पावसाळी अधिवेशनात शेतकरी, कष्टकरी, महिला, बेरोजगारांच्या प्रश्नांना सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता.

हनीट्रॅपचे धागेदारे समृद्धीच्या भ्रष्टाचारापर्यंत पोहोचलेले आहेत म्हणूनच सरकार चौकशी करत नाही.

मुंबई, दि. १९ जुलै ..

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, महिला सुरक्षित नाहीत, ड्रग्जचा सुळसुळाट जोरात सुरु आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीकविमा, बेरोजगारी यातील एकाही प्रश्नावर ना सविस्तर चर्चा झाली ना काही निर्णय. हे अधिवेशन लक्षात राहिल ते फक्त विधानभवनाच्या इमारतीत झालेल्या तुंबळ हाणीमारीच्या घटनेने…रस्त्यावरील गुंड, मवाली आता थेट विधानभवनात घुसले आणि त्याला फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप करत फडणवीसांनी पायश्चित म्हणून राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, विधिमंडळ अथवा संसदेत जनता आपले लोकप्रतिनिधी पाठवते ती त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पण अलिकडे हे चित्र बदलत चालले असून महाराष्ट्राच्या जनतेने यावेळी असे चित्र पाहिले जे आजपर्यंत या लोकशाहीच्या पवित्र मंदिरात घडले नाही. कालपर्यंत जे रस्त्यावर होत होते ते आज लोकशाहीच्या पवित्र मंदिरात घडले. जणू WWF च सुरु झाले आहे अशीच ही घटना होती. जे घडले त्याची निंदा करावी तेवढी कमीच आहे पण ही घटना घडण्यास राज्याचे मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. भाजपाने ही नवी संस्कृती जाणीवपूर्वक आणली आहे. अक्कलकोटमध्ये प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या मकोकाच्या गुंडाला भाजपाचे नेतेच ‘भिवू नकोस मुख्यमंत्री तुझ्या पाठीशी आहेत’ असे सांगत आहेत. तर आमदार निवासाच्या कँन्टीमध्येही एका आमदाराने असेच WWF केले. आका, कोयत्या गँग आता जुने झाले. आमदारांना मवाली म्हटले जाते असे मुख्यमंत्री म्हणतात, हे भाजपाने जे पेरले तेच उगवले आहे. आणि हा डाव आता भाजपावरच उलटत आहे असेही सपकाळ म्हणाले.

महाराष्ट्राच्या विधिमंडळात जे झाले त्याने जनतेत प्रचंड संताप आहे पण हे सत्तेच्या पिंडीवर बसलेले विंचू आहेत त्यांना ठेचायची सोय नाही. भाजपाने लोकशाही रसातळाला आणून ठेवली आहे. भाजपाला लोकशाही व संविधान मान्य नाही पण संस्कृती व परंपरा बुडवण्याचे पाप तरी करू नका. महाराष्ट्राच्या जनतेच्या अंत पाहू नका जनता याचा हिशोब नक्की करेल असा इशाराही प्रदेशाध्यक्षांनी दिला,

हनीट्रॅपचे धागेदारे समृद्धीच्या भ्रष्टाचारात…. ·

राज्यातील काही अधिकारी व मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत हे सत्य आहे. मुख्यमंत्री जरी असे काही घडलेले नाही असे म्हणत असले तरी ते नेहमीप्रमाणे खोटे बोलत आहेत. या हनीट्रॅपचे धागेदोरे समृद्धी महामार्गातील २० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारापर्यंत पोहोचलेले आहेत. हा घोटाळा उघड होऊ नये म्हणून तो दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, फडणवीस जे बोलले ते धादांत खोटे आहे, असेही सपकाळ म्हणाले.

जनसुरक्षा कायद्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून यावर हरकत घेतलेली असून काँग्रेसचा या विधेयकाला विरोध आहे. या विधेयकासाठी नियुक्त केलेल्या समितीतही अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. बजरंग दल, आरएसएस या संघटनाही या कायद्याच्या कक्षेत येतात का, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काही बोलत नाहीत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. काँग्रेसचा या विधेयकाला विरोध आहे आणि विधिमंडळाच्या आत व बाहेरही विरोधच राहिल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी ठामपणे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे महारक्तदान शिबीरांचे आयोजन

पक्षाच्या सर्व मंडलांमध्ये मुख्यमंत्र्यांना रक्तदानाच्या माध्यमातून शुभेच्छा देणार
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची माहिती

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी 22 जुलै रोजी प्रदेश भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यभरात महारक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पक्षाच्या संघटना रचनेतील सर्व मंडलांमध्ये ही शिबिरे होतील. या निमित्ताने राज्यभर विक्रमी रक्तदान नोंदवून प्रदेश भाजपातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात येणार आहेत. भाजपा परिवारातील सर्वांनी या महारक्तदान शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.
श्री.चव्हाण यांनी या पत्रकात म्हटले आहे की, 19 जुलैपर्यंत प्रत्येक रक्तदात्याचा फॉर्म भरून घ्यायचा असून प्रत्येक मंडलात किमान 100 रक्तदात्यांचे लक्ष्य जिल्हाध्यक्षांनी पूर्ण करायचे आहे.

मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली: खासदार निशिकांत दुबेंचे ट्वीट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. दुबे तुम मुंबई में आ जाओ… मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेवर आता दुबे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी अखेर राज ठाकरे यांना हिंदी शिकवली असे ते म्हणालेत.

राज ठाकरे यांची शुक्रवारी मीरा भाईंदर येथे सभा झाली. त्यात त्यांनी मराठीच्या मुद्यावरून भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भाजपचा दुबे नावाचा एक कोणता तरी खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारू. त्याच्यावर केस झाली का? हिंदी चॅनलवाल्यांनी त्यांचे चालवले का? त्याचे वक्तव्य दाखवले का? काहीही नाही. बघा हे कसे असतात. तू आ म्हाला पटक पटक के मारणार? मी दुबेला सांगतो. तुम मुंबई आ जाओ. मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे, असे राज ठाकरे म्हणाले होते.

राज यांच्या या टीकेवर निशिकांत दुबे यांनी अवघ्या एका वाक्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये मी राज ठाकरे यांना हिंदी शिकवली? अशी एका ओळीची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज यांच्या विधानाचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.


उल्लेखनीय बाब म्हणजे निशिकांत दुबे यांनी काही दिवसांपूर्वी मराठी – अमराठी वादात उडी घेत मराठी माणसांना उत्तर भारतात आल्यानंतर मारण्याची भाषा केली होती. त्यांनी या प्रकरणी राज व उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले होते. आपल्या घरात कुणीही सिंह असतो. पण तुमच्यात हिंमत असेल तर बिहार व उत्तर प्रदेशात या. आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. महाराष्ट्राबाहेर या. तुम्हाला आपटून आपटून मारू, असे ते म्हणाले होते.

एवढेच नाही तर त्यांनी देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे कोणतेही योगदान नसल्याचा दावाही निशिकांत दुबे यांनी केला होता. ते वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते, महाराष्ट्र कुणाच्या पैशांची भाकरी खातो? तिकडे टाटा, बिर्ला व रिलायन्स आहेत. पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. बिहार, झारखंड नसते तर टाटा व बिर्ला यांनी काय केले असते? टाटा , बिर्ला व रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात, पण टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो. तुम्ही कोणता टॅक्स आणता? तुमच्याकडे कारखाना नाही, उद्योग नाहीत किंवा खनिजांच्या खाणी नाहीत. सगळ्या खाणी झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश व ओडिशात आहेत. रिलायन्सची रिफायनरी व सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्रात काय आहे? मग वरुन आमचे शोषण करुन दादागिरी करता, असे ते म्हणाले होते.