Home Blog Page 385

पंतप्रधान मोदींवर आचारसंहिता कारवाई करण्यास निवडणूक आयोगाकडून टाळाटाळ, हाय कोर्टात दाद मागणार: पृथ्वीराज चव्हाण.

कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, इंदिराजी गांधी व बाळासाहेब ठाकरेंवर कारवाई मग मोदींवर कारवाई का नाही?

प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत ६६ टक्के नवे चेहरे, ४४ टक्के ओबीसी तर एससी-एसटी १९ टक्के: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. ३० जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचे आयोगाने मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली पण मोदींवर कारवाई केलेली नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली होती. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही मग नरेंद्र मोदींवर आयोग कारवाई का करत नाही असा प्रश्न विचारूरन याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.या वेळी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, अनंत गाडगीळ आदी उपस्थित होते.

यासंदर्भात टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, दि. २८ डिसेंबर २०२० रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन रेल्वे मंत्री, कृषी मंत्री यांनी सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमार या किसान रेल्वेच्या १०० व्या गाडीचा शुभारंभ केला. यावेळी महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका व पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु होत्या. हा कार्यक्रम देशभर टीव्हीवर प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासन यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. याविषयी प्रफुल्ल कदम या कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असता सुरुवातीला वेळकाढूपणा करण्यात आला पण शेवटी आचारसंहिता भंग झाल्याचे मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज देण्यात आली. या प्रकरणी सरळ सरळ कायदा धाब्यावर बसवण्यात आलेला आहे हे स्पष्ट दिसत असतानाही नरेंद्र मोदी यांच्यावर कारवाई केली जात नाही, असे चव्हाण म्हणाले.

या प्रकरणी तक्रार करणारे प्रफुल्ल कदम यांनी आचारसंहिता भंग कशी झाली याची माहिती सर्व नियम व कायद्यानुसार दिली. निवडणूक काळात मतदारांवर प्रभाव पाडण्याचा हा प्रयत्न असून आदर्श आचारसंहितेचा उघड भंग केलेला असल्याने नरेंद्र मोदी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर..
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत ३३ टक्के ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत तर ६६ टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. ४१ टक्के ओबीसी, १९ टक्के एससी एसटी तर ३३ महिलांना संधी देण्यात आली आहे. कार्यकारिणीत भौगोलिक व सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

वादग्रस्त मंत्र्यांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, विधानसभेत मंत्री चक्क पत्ते खेळत आहेत तर बाहेर WWF सुरु आहे. गृहराज्य मंत्र्यांचे कुटुंब डान्सबार चालवते पण सरकारला त्याचे काही गांभीर्य नाही. या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत यासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने सभागृहात व रस्त्यावरही आंदोलन करून आवाज उठवला आहे. पण गेंड्याच्या कातडीपेक्षाही सरकारची कातडी जाड आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा नैतिकतेच्या आधारे घेतला नाही तर विरोधी पक्षांचा व समाजाचा दबाव वाढल्याने घ्यावा लागला आहे. इतर कलंकित मंत्र्यांचेही राजीनामे घ्यावेत ही काँग्रेसची मागणी आहे.

खा. प्रणिती शिंदे यांच्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, त्यांनी ऑपरेशन सिंदूर वा सैनिकांचा अपमान केलेला नाही, त्यांच्या विधानाचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावला आहे. सैनिकांच्या पराक्रमाचा आम्हाला अभिमानच आहे पण त्याचे श्रेय लाटण्यासाठी भाजपाने मोदींचे लष्करी गणवेशातील होर्डींग देशभर लावले. भाजपा नेत्यांने एका महिला अधिकाऱ्यांवर अत्यंत खालच्या पातळीवर वक्तव्य केले यासंदर्भात प्रणिती शिंदे यांचे विधान होते असे सपकाळ म्हणाले..

ऑपरेशन सिंदूर संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट उत्तर दिलेले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम केल्याचे ३० वेळा सांगितले त्यावर मोदी गप्प आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान ते खोडून का काढत नाहीत. मोदी खोटे बोलत आहेत, का ट्रम्प हे स्पष्ट झाले पाहिजे. तसेच केंद्रातील भाजपा सरकारने शिमला करार रद्द केला आहे का आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केलेल्या विधानावर मोदी सरकारने खुलासा केला पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले..

अतिरेकी कसाबसंदर्भात उज्ज्वल निकम यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कसाबला कायद्याने, न्यायालयीन प्रक्रियेनुसार फाशीची शिक्षा दिलेली आहे. ही फाशीची शिक्षा काँग्रेस सरकार असताना दिलेली आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम यांच्या वक्तव्यात काहीही अर्थ नाही, भाजपाने त्यांना राज्यसभा सदस्यत्व दिले आहे त्यामुळे ते काहीतरी बोलत आहेत असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले..

पौर्णिमेचा फेरा’ वेबसिरीजचा दुसरा सिझन प्रदर्शित

शुभम प्रोडक्शन फिल्म्स प्रस्तुत आणि पायल गणेश कदम निर्मित ‘पौर्णिमेचा फेरा सिझन १’ ह्या वेबसिरिजला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे आणि प्रोत्साहनामुळे ‘पौर्णिमेचा फेरा सिझन २ ’ शुभम प्रोडक्शन चॅनलवर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘पौर्णिमेचा फेरा सिझन २’ देखील सिझन १ इतकाच हॉरर आणि चित्तथरारक आहे.ही एक वेगळ्या धाटणीची दर्जेदार हॉरर कॉमेडी मराठी वेब सिरीज आहे.

मराठीत हॉरर-कॉमेडी पठडीतला सिनेमा किंवा वेब सिरीज फार क्वचितच बघायला मिळतात. कोकणातले निसर्गसौंदर्य यासोबत हॉरर, कॉमेडी आणि रहस्याचे मिश्रण असलेली ही वेब सिरीज प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यास यशस्वी ठरते. आपण जो विचार करतो त्या पलीकडे जाऊन आपल्या आजूबाजूला घटना घडत असतात. अनाकलनीय आणि भीतीदायक वाटणाऱ्या या घटनांमागचं नेमकं रहस्य काय आहे याचा उलगडा करत जाणारी ही एक रंजनीय वेब सिरीज आहे. एक चांगलं कथानक आणि त्याभोवती गुंफलेली गुंतवून ठेवणारी पटकथा ही या वेब सिरीजची जमेची बाजू आहे; जी तुम्हाला नक्कीच आवडेल.

अवधूत, संकेत आणि अमेय या तीन मित्रांभोवती फिरणारं हे कथानक आहे. मैत्रीसाठी कोणत्याही संकटाशी भिडायला तयार होणारे मित्र आपल्याला यात बघायला मिळतात. तिघेही अमेयच्या गावी कोकणात जातात. तिकडे गेल्यावर अवधूतसोबत अशा काही रहस्यमयी घटना घडायला लागतात ज्या सामान्य आयुष्यात घडणं शक्य नाही. आणि त्या मागचं गूढ नेमकं काय आहे ते संकेत आणि अमेयला उलगडत नाही. पण या घटनांमधून त्यांचा फायदाही होत आहे. त्या फायद्यामुळे निर्माण झालेले लालच, अमानवी शक्ती, त्यामुळे निर्माण झालेले संकट आणि त्या संकटातून कधी मुक्तता मिळेल कि नाही ? या सगळ्या गोष्टी यात व्यवस्थित मांडण्यात आल्या आहेत.

थरार, उत्कंठा, शोध या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरीत प्रश्नांचा शोध घेणारी ‘पौर्णिमेचा फेरा’ ही मराठी वेब सिरीज ‘शुभम प्रोडक्शन फिल्म्स’ या चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आली आहे. हास्यजत्रा कार्यक्रमातले विनोदवीर निखील बने आणि मंदार मांडवकर आपल्याला या वेब सिरीजमध्ये वेगळ्याच भूमिकेत पहायला मिळतात. त्यांना सिद्धेश नागवेकर या नव्या दमाच्या कलाकारासोबत, संदीप रेडकर, दीपा माळकर, प्राची केळुस्कर, निकिता बंदावणे, चंदन जमदाडे, संजय वैद्य, स्नेहल आयरे या सगळ्यांची साथ लाभली आहे. सगळ्या कलाकारांनी त्यांच्या भूमिका चांगल्या केल्या आहेत. ही वेब सिरीज बघताना प्रत्येकजण त्या त्या भूमिकेत चपखल बसलेला असल्याचं जाणवतं.

ह्या वेब सिरीजचे दिग्दर्शन अजय सरतापे यांनी केले असून त्याचे छायाचित्रण कुणाल महादेव परडकर ह्यांनी केले आहे. दिग्दर्शन, छायाचित्रण या कथेचा रॉनेसपणा जपत उत्कंठा निर्माण करण्यात यशस्वी झालेले आहेत. जितकं उत्तम दिग्दर्शन ह्या सिरीजला लाभलं आहे तितकच उत्तम लेखण देखील ह्या सिरीजला लाभलं आहे. ह्या वेब सिरीजची कथा शुभम विलास कदम याने लिहिली असून ह्या सिरीजचे संवाद व लेखन संदेश लोकेगावकर यांनी केले आहे. हॉरर म्हटलं कि सगळ्यात महत्वाचं असतं ते पार्श्वसंगीत. या वेब सिरीजचं पार्श्वसंगीत अगदी पूरक आहे. ते योग्य त्या ठिकाणी त्या सीनच्या गरजेनुसार भेदक वातावरण तयार करतं आणि ह्याचं सर्व यश अनिरुद्ध निमकर ज्यांनी ह्या सिरीज ला पार्श्वसंगीत दिलं त्यांना जातं.

एकंदरीत कोकणात घडणारी ‘पौर्णिमेचा फेरा’ ही हॉरर कॉमेडी वेब सिरीज तुमचं मनोरंजन नक्कीच करते. याचे दोन्ही सिझन तुम्हाला खिळवून ठेवतात. त्यामुळे ‘शुभम प्रोडक्शन फिल्म्स’ या चॅनेलवर यापुढेही अशाच वेगवेगळ्या धाटणीच्या वेब सिरीज बघायला मिळतील अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही. ज्यांना हॉरर-कॉमेडी आवडते त्यांनी ही सिरीज नक्कीच पहावी.

Link – https://youtu.be/YDUcYpH7mK4?si=5zeiGRKM4IgTyL7B

शिक्षण हेच ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना साध्य होण्याचे साधन – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सन्मान

पुणे, दि. ३०: संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे अर्थात ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना केवळ शिक्षणातून साध्य होऊ शकते. पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक सुहृदयी उपक्रम म्हणून सुरू केलेली ही मोहीम आज एक चैतन्यशील, बहु-विद्याशाखीय शैक्षणिक परिसंस्थेत रूपांतरित झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

सिम्बायोसिस विश्वभवन येथे सिम्बायोसिस आंतराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलपती पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने आयोजित केलेल्या डॉ. एस. बी. मुजुमदार यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, श्रीमती संजीवनी मुजुमदार, सकाळ मीडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. मुजुमदार यांना ९० व्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन करुन शतायुषी व्हावे अशा शुभेच्छा देत राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, सिम्बायोसिस ही संस्था भारत आणि परदेशातील हजारो तरुण मनांना सक्षम बनवत आहे. शिक्षण हे केवळ मनाला प्रकाशित करण्याचे साधन नाही तर शिक्षणाने सहानुभूती, एकता आणि शांती देखील मनामध्ये रुजवली पाहिजे हा डॉ. मुजुमदार यांचा दृढ विश्वास आहे.

पद्मभूषण डॉ. मुजुमदार यांच्या सत्काराचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सकाळ मीडिया समुहाचे अभिनंदन करून राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, ‘सकाळ’ वृत्तपत्राची स्थापना ९३ वर्षांपूर्वी स्वर्गीय नानासाहेब परुळेकर यांनी केली होती. प्रतापराव पवार आणि आता अभिजीत पवार यांनी दूरदृष्टी आणि समर्पणाने वृत्तपत्राचा समृद्ध वारसा पुढे नेला आहे. संस्था नफ्यासाठी नव्हे तर उद्देशाने बांधल्या जातात तेव्हा दृष्टी वचनबद्धतेशी जुळते तेव्हा काय होते याची सिम्बायोसिस आणि सकाळ दोन्ही आदर्श उदाहरणे आहेत, असेही ते म्हणाले.

गेल्या पाच दशकांमध्ये, सिम्बायोसिसने एक मोठी प्रतिष्ठा मिळविली केली आहे. डॉ. मुजुमदार आणि श्रीमती संजीवनी मुजुमदार यांनी शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या जगातील 85 हून अधिक देशांमधील विद्यार्थ्यांसाठी आपल्या विद्यापीठाच्या रुपाने एक घर निर्माण केले आहे. त्यांनी महाराष्ट्राला आणि विशेषतः पुणे शहराला देशातील उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून ओळख मिळवून दिली आहे.

शिक्षण हे आपले चरित्र निर्माण करते, त्याला चांगला आकार देते. मनुष्याला यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक आहे. तुम्ही तुमच्यातील प्रतिभेचा शोध घेतला पाहिजे. तुमची प्रतिभा तुमच्यासाठी आणि समाजासाठी, जगासाठी उपयुक्त असली पाहिजे आणि त्याप्रमाणे तिचा वापर केला पाहिजे. संपूर्ण जग आज खुले असून अनेक लक्ष विचलित करणाऱ्या बाबी आहेत. परंतु, त्यातून काय निवडायचे आणि पुढे जायचे हे आपल्यावर अवलंबून आहे, असेही ते म्हणाले.

प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे. मात्र, इतरांच्या भाषेचाही द्वेष होऊ नये. प्रत्येक विद्यापीठात इंग्रजीव्यतिरिक्त इतर कोणत्याही एका विदेशी भाषेचे शिक्षण दिले जावे यासाठी सर्व विद्यापीठांचा कुलपती म्हणून आपली भूमिका असल्याचेही ते म्हणाले.

खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, डॉ. मुजुमदार यांनी केवळ भारतातील आणि विदेशातील विद्यार्थ्यांनाच शिकवले नाही तर देशातील बहुजन समाजाला शिक्षित करण्यासाठी प्रयत्न केले. शिक्षण हे प्रत्येक प्रकारच्या विकासाचा पाया आहे ही राजर्षी शाहू महाराज यांची भूमिका होती. त्यांच्या विचारांनुसार डॉ. मुजुमदार यांनी काम केले.

डॉ. मुजुमदार यांचा ९० वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थ्यांचा सन्मान आहे. सिम्बायोसिस विद्यापीठ हे विचारांचे विद्यालय आहे. युरोपातील प्रगत देशात शिक्षणासाठी जाणे परवडत नाही अशा परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या रुपाने मदत करुन ते एक प्रकारे जगाची मदत करत आहेत, असेही श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले.

सन्मानाला उत्तर देताना डॉ. मुजुमदार म्हणाले, एका परदेशी विद्यार्थ्याचे दु:ख पाहून आपल्याला आयुष्याचे प्रयोजन समजले. त्यातून आणि परदेशी विद्यार्थी तसेच भारतीय विद्यार्थी यांच्यात मैत्री व्हावी, सलोखा निर्माण व्हावा आणि त्याद्वारे जागतिक शांततेचा मार्ग तयार व्हावा या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना केली. आज जगात मोठ्या प्रमाणात अशांतता आहे. युद्धाशिवायचे जग हवे असेल तर ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेला पर्याय नाही. ही संकल्पना भारतीय आहे याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.

शिक्षण म्हणजे केवळ परीक्षा, त्यातील गुण, पदवी इतकेच नाही तर जबाबदार नागरिक घडविण्याचे साधन आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आपण जागतिक नागरिक झालो पाहिजे. असे झाल्यास कोणीही विदेशी नागरिक राहणार नाही, असेही ते म्हणाले.

अभिजित पवार म्हणाले, विद्यार्थ्याला झालेला त्रास पाहून ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेनुसार डॉ. मुजुमदार यांनी या विद्यापीठाची स्थापना केली. जगातील 2 लाख विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. भौतिक, अध्यात्मिक, संतुलित जीवन कसे जगायचे हे डॉ. मुजुमदार यांच्याकडून शिकले पाहिजे. ज्ञानी ते ज्ञानयोगी असा त्यांचा प्रवास आहे. ज्ञानाची विद्यापीठे ही ज्ञानाची मंदिरे झाली पाहिजेत, असेही श्री. पवार म्हणाले.

यावेळी श्री. फडणीस यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी डॉ. मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळमार्फत तयार करण्यात आलेल्या ‘ज्ञानपर्व’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी सिम्बायोसिस विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, सकाळ मीडिया ग्रुपचे संपादक अनिकेत काणे, विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

भीक मागण्यासाठी पुण्यातून दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण: तुळजापूरातून 5 जणांना अटक

पुणे- कात्रज भागातील एका दोन वर्षांच्या मुलीचे भीक मागण्यासाठी अपहरण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अपहरण करणाऱ्या या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत अटक केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून या चिमुकलीची सुखरूप सुटका देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून, यात एका महिलेचा देखील समावेश आहे.

सुनील सीताराम भोसले (51), शंकर उजण्या पवार (50), शालुबाई प्रकाश काळे (45), गणेश बाबू पवार (35), मंगल हरफुल काळे (19), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी तुळजापूर येथील मोतीझारा इथले रहिवासी आहेत. धनसिंग हनुमंत काळे (25) यांच्या फिर्यादिवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

फिर्यादी धनसिंग हनुमंत काळे हे आपल्या कुटुंबासह कात्रज येथील वंडर सिटी परिसरातील झोपडी वजा घरात राहतात. त्यांना चार अपत्य असून त्यात दोन वर्षाच्या जुळ्या मुली आहेत. 25 जुलैच्या रात्रीच्या सुमारास संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना, यातील दोन वर्षांच्या चिमूकलीला झोपाळ्यातून उचलून अपहरण करण्यात आले. मध्यरात्री जंग आल्यावर हनुमंत यांच्या ही बाब लक्षात आली व तातडीने त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाणे गाठले व अपहरणाची तक्रार दाखल केली.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत चिमुकलीच्या शोधासाठी तातडीने पाठक पाठवण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनात दोन तपास पथके तयार करण्यात आली. याशिवाय गुन्हे शाखेने स्वतंत्र तपासपथक कार्यरत केले. तपास करताना वंडर सिटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात तीन जण एका दुचाकीवर मुलीसह जाताना दिसून आले. कात्रज ते रेल्वे स्थानक परिसरातील जवळपास 140 सीसीटीव्ही तपासले, त्यात रेल्वे स्थानकावरील फुटेजमध्ये आणखी दोन आरोपी असल्याचे दिसून आले.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास पथक तुळजापूरला रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने सुरुवातील तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून अपहरण झालेल्या चिमुकलीची सुखरूप सुटका करण्यात आली. तसेच पुढील चौकशी करत उर्वरित दोन आरोपींना देखील अटक करण्यात आली. या आरोपींची कसून चौकशी केली असता, भीक मागण्यासाठीच आपण अपहरण केल्याची कबुली दिली. या पाचही आरोपींना पुण्यात आणून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 2 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रात्रीतून वाईन शॉप फोडण्याच्या प्रकारात वाढ, बिबवेवाडीतील वाईन शॉप फोडून ७ लाखाची चोरी

पुणे- महायुती सरकारने दारूच्या करात भरमसाठ वाढ केल्यानंतर एकीकडे परमिट रूम चा धंदा मंदीत येत असताना वाईनशॉप देखील अडचणीत येऊ लागले आहेत . वाईन शॉप फोडून चोऱ्या करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. बिबवेवाडी कोठारी ब्लॉक अनंत सोसायटी शॉप नं ५ मधील क्रिस्टल वाईन शॉप फोडून चोरट्यांनी दुकानातील ५१,०००/-रु. कि.च्या वेगवेगळ्या कंपनीच्या दारुच्या बॉटल बरोबर दुकानातील इलेक्ट्रीक लॉकर व लाकडी टेबलच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेली रोख रक्कम ६,५८,००० रुपयांची रोकड पळवून नेली आहे. वाईन शॉपचे दुकानाचे शटर कुलुप लावुन बंद असताना, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे दुकानाचे लोखंडी ग्रीलचा कोयडा व आतील लोखंडी शटरचे कुलुप कशाचे तरी सहाय्याने उचकटुन, त्यावाटे आंत प्रवेश करून हि चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले . फौजदार ज्ञानेश्वर दळवी मो नं ९२८४१०११८३ हे या प्रकरणी तपास करत आहेत.

महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल करू- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे,: क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना देण्यात येणाऱ्या प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित क्रीडा पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाहक डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाहक प्रा. निवेदिता एकबोटे, सचिव प्रा. शामाकांत देशमुख, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, डॉ.विक्रम फाले, प्रा. दिपक कुटे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, खेळाडू, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.

आयुष्यात यश मिळविण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती ठेवून ध्येयाने प्रेरित होत वाटचाल करा असा सल्ला विद्यार्थ्यांना देऊन मंत्री श्री. भरणे यावेळी म्हणाले, नेहमी धाडस करून नवनवीन वाटा शोधल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करावे. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीची आदरपूर्वक सेवा करावी. आयुष्यात मोठ्यामोठ्या संधी उपलब्ध होतात, त्या संधीचे सोने करा. अहंकार बाजूला जीवनात नेहमी आनंदी रहा, असेही मार्गदर्शन त्यांनी केले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीत नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर राहिला आहे. त्यामुळे या संस्थेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी कुतुहल राहिले आहे, असेही श्री. भरणे म्हणाले.

श्री. जाधव म्हणाले, खेळामुळे खेळाडूंच्या अंगी संघर्ष करण्याची स्वयंशिस्त लागते. खेळाडूंकरिता प्रामाणिकपणा, संयम, आत्मविश्वास महत्वाचा आहे. खेळात निराश होऊ नका, नेहमी मोठी स्वप्ने पाहा, संधीचे सोने करा, कष्ट करत राहा, एक दिवस निश्चित यश मिळेल, असेही ते म्हणाले.

क्रीडा क्षेत्राला योगदान देण्याकरिता महाविद्यालयात खेळाडू कोट्याकरिता आरक्षित जागेवरच खेळाडूंना प्रवेश मिळावा, जागा रिक्त राहणार नाही याकरीता नियमात बदल होणे आवश्यक आहे. शालेय जीवनापासून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिल्यास राज्य, देशाचे नाव उज्ज्वल होण्यास मदत होईल, अशी सूचना करून आगामी काळात खेळाडूंच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच काम करीत राहील, असेही श्री. जाधव म्हणाले.

डॉ. एकबोटे म्हणाले, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याच्यादृष्टीने नेहमीच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन आहे. दिवसेंदिवस क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे.

क्रीडापटू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. या क्षेत्रातही रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. संस्थेला स्वायत्त संस्थेचा दर्जा असून क्रीडा क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवून भरीव योगदान देण्याकरिता संस्थेने प्रयत्नशील रहावे, असेही डॉ. एकबोटे म्हणाले.

डॉ. निवेदिता एकबोटे म्हणाल्या, महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्याअंगी असलेल्या कला, क्रीडा, सांस्कृतिक गुणांना वाव प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षणासोबतच क्रीडा, कलाविषयक आदी स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या स्पर्धेच्यामाध्यमातून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्याकरिता संस्था नेहमीच प्रयत्नशील आहे, असे डॉ. एकबोटे म्हणाल्या.

यावेळी डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी विचार व्यक्त केले.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले

अमेरिकन मराठी प्रेक्षकांनी घेतला मराठी चित्रपटांचा मनमुराद आनंद

सॅन होजे,(प्रतिनिधी) : संपूर्ण अमेरिका आणि कॅनडा मधील मराठी रसिकांच्या तुडुंब प्रतिसादामुळे ‘नाफा फिल्म फेस्टीव्हल २०२५ कमालीचा यशस्वी झाला. अडीच हजारांहून अधिक प्रेक्षक ‘द कॅलिफोर्निया थिएटर’ मध्ये या महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित होते. तीन दिवसांच्या या महोत्सवामुळे मनोरंजनाची दिवाळी साजरी झाल्याची प्रतिक्रिया या महोत्सवाचे आयोजक, नाफाचे संस्थापक – अध्यक्ष अभिजीत घोलप यांनी व्यक्त केले.

पहिल्या दिवशी भव्य ग्लॅमरस रेड कार्पेटच्या साथीने फिल्म अवार्ड नाईट रंगली. महाराष्ट्रातून आलेल्या कलावंतांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आणि त्यासोबत अत्यंत मानाचा “नाफा जीवन गौरव” पुरस्कार जेष्ठ अभिनेते अमोल पालकरांना देण्यात आला. दुसऱ्या दिवशी मुख्य चित्रपट महोत्सव सुरु झाला तो अभिनेते सचिन खेडेकर यांच्या वैशिट्यपूर्ण भाषणाने. त्यांचं हे भाषण विशेष गाजलं. मराठी चित्रपटसृष्टीची सध्याची अवस्था अशी का आहे? मराठी चित्रपटांबद्दल का ओरड सुरु आहे? मराठी चित्रपट चालत नाहीत याला कोण जबाबदार आहे, अशा प्रश्नांचा वेध घेताना त्यांनी रोखठोक मतं परखडपणे मांडली. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपट न चालण्याची कारणं त्यांनी आकडेवारीसह मांडली. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ‘नाफा’ सारखी संस्था कसा पुढाकार घेऊ शकते, नेमकं काय काम होणं गरजेचं आहे, याबद्दलही ते सविस्तर बोलले.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘स्नोफ्लॉवर’ या चित्रपटांचं स्क्रिनिंग आणि त्यासोबतच ‘नाफा’ची निर्मिती असलेल्या तीन शॉर्टफिल्म्सही दाखवण्यात आल्या.  सोबत सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी आणि वैदेही परशुरामी यांच्यासाठी खास ‘मीट अँड ग्रीट’ आयोजित करण्यात आलं होतं, ज्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वर्कशॉप्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना आणि कलाकारांना थेट संवादाची संधी मिळाली. अश्विनी भावे, अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित सत्रं घेतली, तर प्रसाद फणसे आणि रोहन फणसे यांनी डबिंगसंदर्भात खास वर्कशॉप घेतलं, जे सहभागींसाठी अतिशय माहितीपूर्ण ठरलं. विशेष म्हणजे अमोल पालेकर यांचं आत्मचरित्र ‘ऐवज’आणि त्याचं इंग्रजी भाषांतर ‘Viewfinder’ यांचं अमेरिकेतील प्रकाशन नाफाच्या मंचावर पार पडलं. प्रकाशनानंतर विक्रम वाटवे यांनी अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीसाठी अमेरिकेचा क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकर खास उपस्थित होता.

‘नाफा फिल्म फेस्टिव्हल’च्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात झाली एका खास सन्मानाने, अमेरिकेच्या संसदेने ‘नाफा’ला दिलेलं मानपत्र, श्री ठाणेदार यांनी ‘नाफा’च्या मंचावर अभिजीत घोलप यांना प्रदान केलं. यानंतर तीन नव्या शॉर्टफिल्म्सचं स्क्रीनिंग पार पडलं आणि आदल्या दिवशी दाखवलेल्या तीन शॉर्टफिल्म्सचे दिग्दर्शक श्रीमिरजकर (योगायोग), हर्ष महाडेश्वर(सबमिशन), संदीप करंजकर(द गर्ल विथ रेड हॅट) यांच्यासोबत डॉ. गौरी घोलप यांनी संवाद साधला. त्यानंतर बेस्ट शॉर्टफिल्म(डम्पयार्ड), दुर्वा नांदापूरकर(बेस्ट स्क्रीन प्ले – भंगी), भूषण पाल( बेस्ट सिनेमॅटोग्राफी – डम्पयार्ड) रुचिर कुलकर्णी( बेस्ट एडिटिंग – चेंजिंग रूम), प्रफुल्ला खारकर (विशेष उल्लेखनीय – बिर्याणी), गार्गी खोडे(विशेष उल्लेखनीय – सबमिशन) या स्टुडंट सपोर्टींग विभागातील  शॉर्ट फिल्म्सना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

त्यानंतर अनिल भालेराव दिग्दर्शित छबिला आणि निखिल महाजन दिग्दर्शित ‘रावसाहेब’ या चित्रपटाचं स्क्रीनिंग झालं. सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी, सचिन खेडेकर, डॉ. मोहन आगाशे यांच्या मास्टर क्लासेसला रसिक प्रेक्षकांनी सखोल दाद दिली. यानंतर झालेल्या पॅनल डिस्कशनमध्ये मराठी सिनेमा – वर्तमान, भवितव्य आणि वाटचाल या विषयावर मधुर भांडारकर, अवधूत गुप्ते, डॉ. मोहन आगाशे, गजेंद्र अहिरे, स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी , आदिनाथ कोठारे यांनी आपली मतं मांडली या पॅनल डिस्कशनचे सूत्रसंचालन वैदेही परशुरामी हिने केले. क्लोजिंग सेरेमनीच्यावेळी नाफा अध्यक्ष अभिजीत घोलप, अर्चना सराफ, रिया ठोसर, अनुप निमकर, लक्ष्मण आपटे, वृषाली मालपेकर, मानसी देवळेकर आणि इतर सर्व नाफा सदस्यांनी प्रेक्षकांशी हितगुज केले. अभिजीत घोलप यांनी पुढील वर्षीच्या नाफामध्ये काय नवं असेल, कोणते नवे देश गाठायचे आहेत, आणि या उपक्रमाचं पुढचं पाऊल काय असावं, याविषयी माहिती दिली.

महामृत्युंजय यागातून पुणेकरांनी अनुभवली भक्ती उर्जा

अखिल मंडई मंडळात महामृत्युंजय याग; भाविकांच्या वतीने लक्ष बिल्वपत्र अर्पण


पुणे:  ॐ त्र्यंबकं यजामहे…’ च्या मंत्रघोषात अखिल मंडई मंडळाच्या वतीने आयोजित महामृत्युंजय याग अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात भक्तांच्या उपस्थितीत पार पडला.  श्री शारदा गजानन मंदिर, महात्मा फुले मंडई येथे  मंत्रोच्चार, हवन व धार्मिक विधी यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यानंतर दुपारी लक्ष बिल्वपत्र अर्पण करण्यात आले. यामध्ये  महिला, पुरुष आणि तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विश्वास भोर, विक्रम खन्ना, सुरज थोरात, तुषार शिंदे, चेतन वाघमळे उपस्थित होते. राजेश कराळे यांनी सपत्निक पूजा केली.

अण्णा थोरात म्हणाले, जीवनातील व्याधी, संकटे आणि मृत्यूचे भय दूर व्हावे, तसेच आरोग्य, चैतन्य व शांती लाभावी, या उद्देशाने मंडळाने यागाचे आयोजन केले होते.  महामृत्युंजय यागाच्या माध्यमातून पुणेकरांनी श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेचा अनुभव घेतला. अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात आध्यात्मिक जागृती निर्माण होते.

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त, मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावे-डॉ. दत्ता कोहिनकर  

धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार व करिअर मार्गदर्शन

पुणे: “आजच्या स्पर्धात्मक युगात फक्त अभ्यासात हुशार असणे पुरेसे नाही. यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मानसिकदृष्ट्या सशक्त असणे, करिअरबाबत स्पष्टता असणे आणि तणावावर प्रभावी नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, बदलत्या काळात येणाऱ्या आव्हानांचा सामना सकारात्मक दृष्टिकोनातून करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे. यासाठी योग्य मार्गदर्शन, वेळेचे नियोजन आणि भावनिक समतोल या गोष्टींचा समावेश त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात झाला पाहिजे,” असे प्रतिपादन माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी केले.धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. कोहिनकर बोलत होते. संस्थेच्या राजमाता जिजाऊ माँसाहेब सभागृहात ‘यशाचा सन्मान, भविष्यासाठी दिशा’ संकल्पनेवर झालेल्या कार्यक्रमावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप, संस्थेचे सल्लागार विद्यासागर सर, संचालक अनिकेत चव्हाण, संदीप चव्हाण, सीए हर्षदा अनिकेत चव्हाण यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंहगड रोड परिसरातील जवळपास ३० शाळांमधील दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे गौरव करण्यात आला.

अनिकेत चव्हाण म्हणाले, “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे फक्त यशाचे कौतुक नाही, तर त्यांच्या विचारांना दिशा देणे, निर्णयांमध्ये स्पष्टता आणणे आणि पुढच्या वाटचालीसाठी योग्य दिशा देणे ही खरी आपली जबाबदारी आहे. अशा उपक्रमांतून शिक्षण संस्था ही केवळ अभ्यासापुरती मर्यादित न राहता, जीवन घडवणारी कार्यशाळा बनते,अशी माझी भूमिका आणि दिशा आहे.”

“दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम निकाल मिळवला याचा आनंद तर आहेच, पण त्याचबरोबर पुढील शैक्षणिक प्रवासासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन देणे ही समाज आणि संस्थेची सामूहिक जबाबदारी आहे. केवळ गुणवंतांचा सत्कार न करता, त्यांच्यात मानसिक स्थैर्य, करिअरविषयी स्पष्टता आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा या कार्यक्रमामागचा खरा उद्देश आहे.”

– काकासाहेब चव्हाण, संस्थापक अध्यक्ष, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान

अण्णाभाऊंचा ‘फकिरा’  आमच्या घरी!

लेखक: आचार्य रतनलाल सोनग्रा

१९६४ साल असेल, अण्णा भाऊ साठेंच्या ‘फकिरा’ च्या कादंबरीवर चित्रपट निर्मिती होत होती. ‘फकिरा’ च्या झुंजार जीवनावर चित्रपट काढायचा होता. चित्रपटासाठी लागणारं वेगवान कथानक त्यात होतं. स्वत: अण्णाभाऊ साठे आणि प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक लेखक के. ए. अब्बास = (ज्यांनी राज कपूरच्या आवारा, बूटपॉलीश, मेरा नाम जोकर इ. बहुतेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या) यांनी ‘फकिरा’ ची पटकथा तयार केली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण नगर तालुक्यातील अकोळनेर या गावी घेण्यात येत होते.

नगर जिल्हा तसा साम्यवादी चळवळीत फार आघाडीवर होता. राजकीय कार्यकर्त्यांची एक संपूर्ण तरूण पिढी साम्यवादी विचारांनी भारावलेली हेाती. राहुरीचे कडू पाटील, शेवगाचे एकनाथ भागवत, पाथर्डीचे बाबुजी आव्हाड, लक्ष्मण पालवे, श्रीरामपूरचे अण्णासाहेब शिंदे – नगरचे चंद्रभान आठरे पाटील, पारनेरचे भास्करराव औटी, नेवाश्याचे वकिलराव लंघे, नगरचे बाळासाहेब नागवले किती नावे घ्यावीत.

डॉ. श्रीराम रानडे हे अहमदनगरचे लोभस आणि सर्व पुरोगामी चळवळींना आणि कार्यकर्त्यांना सदैव मदतीचा हात देणारे व्यक्तिमत्त्व ! एका अर्थाने ‘नगरचे नेहरू’ च होते.‘फकिरा’च्या सर्व कलाकारांचा मुक्काम त्यांच्या एैसपैस घरात होता… अर्थात कलावंतांना आपापल्या सोयीचे हॉटेल होतेच. पण डॉक्टरांना भेटल्यावरच, त्यांच्याशी चर्चा केल्यावरच सर्व पाने हलायची. अण्णाभाऊ साठे मला तिथेच भेटले. त्यांनी ‘फकिरा’ ची एक प्रत स्वहस्ताक्षरात  ‘सप्रेम भेट’ लिहून मला दिली. अण्णाभाऊंचं ते सावळे रूप मला अत्यंत कोमल आणि विनम्र वाटलं …

साम्यवादी चळवळीत अण्णाभाऊंना विविध शिबिरांतून भाषणांतून आधुनिक जगातील सर्व प्रवाह समजत असत. गिरणी कामगारांचे संघर्षमय जीवन जगणार्‍याने आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय शोषक सत्तेचे स्वरूप ओळखले. ‘सर्व सत्ता लोकांसाठी’ करायची असेल तर पुरोगामी विचार या मातीच्या लोककलेतून मांडायला हवा. अण्णाभाऊ आणि त्यांचे सहकारी इंडियन पीपल्स थिएटर’ (इष्टा) या संस्थेमार्फत लोकजागृतीची विविध माध्यमे वापरत असत. यात स्मृतिशेष बलराज सहानी, नीतिन  सेठी, ए. के. हन्गल, कबीर बेदी – रमेश तलवार, सुलभा आर्य आदि कलावंत सहभागी होत असत.

अण्णाभाऊंचा आधुनिक चित्रपटसृष्टीशी आणि त्यातील कथानक पात्रांशी इंग्रजी चित्रपटाच्या माध्यमातून संपर्क होता. ‘मेट्रो’ ला लागलेले उत्कृष्ट इंग्रजी चित्रपट ते कधी चुकवीत नसत – तेव्हा तत्कालिन प्रसिद्ध चित्रपट BENHUR QUAWADIS THE TEN COMANDMENTS M.G. वेल्सचे THE TIME MACHINE त्याच प्रमाणे चार्ली चॅप्लीनचे प्रख्यात चित्रपट  MODERN TIMES CITY LIGHT हे अत्यंत प्रभावी होते.

अण्णाभाऊंना ‘कथा’ सांगण्याची-लिहिण्याची जबरदस्त ओढ होती ! त्यांनी कादंबरी हा प्रकार अत्यंत परिणामकारक रीतीने हाताळला. मॅक्झिम गॉर्की, पर्ल बक यांच्या कादंबर्‍यांचे अनुवाद त्यांनी वाचले होते. विशेषत: जागतिक वाङ्मयात रशियन कादंबरी अत्यंत श्रेष्ठ गणली जाते. उदा., ‘क्राईम अँड पनिशमेंट’ सारखी अजरामर कादंबरी. अनेक भाषांत चित्रपटाचे विषय होते. त्या साहित्यकृतीवरील रशियन चित्रपटही अत्यंत भव्य दिव्य होते. अण्णाभाऊंनी याचा जिवंत अनुभव घेतला होता.

चित्रीकरण सुरू

अगदी सकाळीच आम्ही अकोळनेरसाठी रवाना होत असू. मी आणि माझा मित्र लक्ष्मीनारायण रोहीवाल, आम्ही डेव्हीड यांना सोबत देत होतो. सिने अभिनेते डेव्हिड त्यात गोर्‍या इंग्रज अधिकार्‍यांची भूमिका करीत होते.

विष्णुपंत कुलकर्णी, नाना पळशीकर होते. डॉ. श्रीराम रानडे यांची धिप्पाड देहयष्टी असून नाट्याभिनयाची जाण होती. त्यांना फकिराच्या पित्याची भूमिका देण्यात आली. सौ. कमलाबाई रानडे यांनीही सावकार पत्नीची भूमिका केली. आमचे मित्र दूर इंग्रज अधिकार्‍यांचे शिपाई म्हणून उभे राहत असत. व्ही. शांताराम यांचे सहाय्यक दिग्दर्शक असलेले कुमार चंद्रशेखर हे दिग्दर्शक होते. चित्रिकरणाचे काम फारच कंटाळवाणे होते. एक एक दृश्य घेण्यासाठी कितीतरी वेळा तालीम करावी लागे. प्रत्येक वेळी तो ‘मूड’ येईलच असे नव्हते. नदीच्या पात्रात दहापंधरा वेळा उतरून तोच तोच ‘सिन’ देताना कमालीचे धैर्य लागते. रूपेरी कागदाचे फळ्यांवरचे पडदे .. पांढर्‍या कपड्यांना निळसर रंग दिलेला. चित्रपट सृष्टीचे लोक म्हणजे आम्हाला देवलोकातील गंधर्वच वाटत हाते. तेथील मातंग वस्तीत मातीचे घर, त्यातील चूल आणि त्याच ठिकाणी तळपणारी ‘फकिरा’ ची तलवार. आमच्या समोर हे विस्मयकारी चित्रीकरण घडत होत होते.

अहमदगनर हे ऐतिहासिक शहर आहे. त्यातील काही वाडे – किल्ला-मशिदी पाहून चित्रपटातील कलावंत मंडळी खूप खुश होत. कुणी काही वस्तू मागायचा अवकाश की आम्ही ती आणून द्यायला तत्पर असू. के. ए. अब्बासना कुणीतरी म्हणालं इथं ‘बर्फी’ फार चांगली मिळते. झालं ! रात्री अकराच्या सुमारास चितळे रोडवरील वखारेच्या हॉटेलात त्यांना बर्फी खाऊ घातली.

डॉ. रानडे यांचा दरबार !

अहमदनगरमधील सारडा गल्लीत आमचे जुने घर आहे. डॉ. श्रीराम रानडे यांच्याकडे सर्व कलावंत येत असत. डॉ. साहेब दिलदार आणि पुरोगामी चळवळीचे समर्थक असल्याने त्यांचा ‘दरबार’ म्हणजेच दिवाणखाना नेहमी कलावंतांनी फुललेला असे. फकिरातील विष्णुपंत कुलकर्णी म्हणजेच ज्येष्ठ नटवर्य नाना पळशीकर गप्पा मारीत. तेही कुठेतरी मुंबईला घाटकोपरच्या डोंगरावर झोपडपट्टीजवळच रहात होते. त्यांना दलित जीवनाची अत्यंत जवळून जाणीव होती.’

‘फकिरा’ चे चित्रीकरण म्हणजे नगरकरांचा चित्रपट उत्सवच होता. चंद्रकांत, सूर्यकांत हे अभिनेते भालजी पेंढारकरांच्या चित्रपटामुळे विशेष प्रसिद्ध होते.

या सगळ्या धामधुमीत मला ताप आला आणि एकदोन दिवस मी तिकडे फिरकलोलो नाही. डॉक्टरसाहेबांना संध्याकाळी मित्रासमवेत अहमदनगर स्टेशनवर  जाऊन तेथील स्पेशल चहा पिण्याची सवय होती. ‘चहा’ तयार होईपर्यंत आम्ही वेटींग रूममध्ये गप्पा मारीत असू. पण दोन दिवस मी नव्हतो. अचानक रात्री नऊच्या सुमारास डॉ. रानडे यांची २४२४ ही गाडी सारडा गल्लीत आली.

‘डॉक्टर आले… डॉक्टर आले …. अशी तमाम गल्लीत द्वाही पसरली. मी तिसर्‍या मजल्यावर होतो. डॉक्टरसाहेब आमचा अत्यंत अवघड फरशीचा जिना चढून वर आले. त्यांचे उंचेपुरे व्यक्तिमत्त्व अशा जिन्यातून सहजतेने चढणे मुश्कील होते. त्यांना आपले ‘डोके’ वाचवून चढावे लागले ! डॉक्टरसाहेब आत येताच मी उठून बसलो. पहातो तर त्यांच्यामागे ‘फकिरा’ ची भूमिका करणारे अभिनेते ‘सूर्यकांत’. विष्णूपंत कुलकर्णी – ऊर्फ नाना पळशीकर होते. आमच्या घरातील दोन लाकडी व एक लोखंडी खुर्ची देण्यात आली. आपल्या घरांत चित्रपटातील मंडळी आली आहेत हे  फक्त माझ्या मोठ्या भावालाच माहीत होते. वडिलांना डॉक्टरसाहेब घरी आले याचेच ‘अप्रूप’ होते…

‘‘काय म्हणतोस रतन ?’’ डॉक्टर म्हणाले.

‘‘काही नाही, जरा ताप होता…..’’ मी म्हणालो.

‘‘कसला ताप – नुसता भटकतोस !‘’ ते म्हणाले. खरे म्हणजे डॉ. रानडे यांच्यासमोर पेशंट त्यांना पाहूनच बरा होत असे.

‘‘उद्या सकाळी येतो.’’ मी म्हणालो.

‘‘डॉक्टरसाहेब, आज आपण आलात आणि विष्णुपंतांना व सूर्यकांतनापण बरोबर आणले.’’

‘‘यांनाही रात्री लवकर कुठली झोप येते ?’’

‘‘सहज आणले….’’

‘‘अरे वा ! हा फोटो कुणाचा ?’’ सूर्यकांतजींनी विचारले. ‘‘मगजींचा… माझ्या आजोबांचा !’’ मी म्हणालो. माझे आजोबा राजपूत योद्ध्यासारखे होते. त्यांच्या पांढर्‍या शुभ्र गलमिशा, डोक्यावर राजस्थानी फेटा, खूपच शोभून दिसत असे.

‘‘डॉक्टरसाहेब, ‘राणोजी’ चा मेकअप असाच हवा नाही ?’’

डॉ. रानडेंना फकिरात  भूमिका देण्यात आली होती. त्यांची धिप्पाड बांधेसूद अंगकाठी ! वेषभूषेनंतर ते खूपच छान दिसायचे !

आमच्या घरातली सगळी मंडळी जिन्यात येऊन हळूच या सिनेअभिनेत्यांना पाहून जात होती. माझ्या वडिलांचा व बंधूंचा मी परिचय करून दिला. आपला रतन वयाने लहान असला तरी किती मोठी मंडळी त्यांच्याकडे येतात असे कौतुकमिश्रित भाव त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. मीही मनातल्या मनात भाव खात होतो. ‘फकिरा’ ची क्रांती माझ्या डोक्यात भिनली होती. किती लवकर सगळं बदलून टाकू असं मला झालं होतं. शोषणा मुक्त समाजाचं स्वप्न सतत नजरेसमोर दिसत होता. चहापान करून मंडळी रात्री परत गेली.

मला वाटतं, नदीच्या दोन्ही बाजूला उभे राहून दुसर्‍या दिवशी फकिराचे मस्तक घेण्याचे काम होतं.  फकिराचे अंतिम संस्कार कोण करणार ? इंग्रज सरकारची प्रचंड दहशत होती. या प्रसंगाचे चित्रीकरण होते. कॅमेरा… लाईट … अ‍ॅक्शन … हे शब्द आसमंतात सतत ऐकू येत होते…  फक्त मस्तक ताब्यात घेण्याच्या दृश्याला संपूर्ण दिवसाचे बलिदान करावे लागले.

चित्रपटात भूमिका करणं निर्मिती करणं या गोष्टी सोप्या नाहीत. त्याला अत्यंत कष्ट लागतात. आपल्याला वाटतं, सिनेमात खूप पैसा आहे. पण खरं सांगायचं तर खूप परिश्रम आहेत. अण्णाभाऊंनी ‘फकिरा’ त आपले आयुष्य घातले. जगाच्या साहित्यक्षेत्रात एक झुंजार क्रांतिकारक वास्तववादी खर्‍याखुर्‍या पात्राने आपली हजेरी लावली आहे. रिचर्ड अ‍ॅटिन्बरोने ‘गांधी’ निर्माण केला. आता कुणीतरी इंग्रजीत ‘फकिरा’ निर्माण करायला हवा. ‘ज्यूलियस सिझर’, ‘स्पार्टाकस, ‘रॉबिन हूड’, ‘सॅम्सन’ च्या तोडीचा हा ‘नायक’ साकार होईल. ‘फकिरा : द ग्रेट’ ह्या पात्राची मी सिनेमास्कोप पडद्यावर वाट पहात आहे. ‘फकिरा’ माझ्या घरी आला आणि अण्णाभाऊ साठेंच्या झुंजार लेखणीचा अद्भुत चमत्कार मी अनुभवला !

‘अण्णा भाऊ साठे जीवनाच्या मांगल्याचे साहित्यिक’ होते.

रशियातील कामचटका येथे 8.8 तीव्रतेचा भूकंप:त्सुनामीच्या 4 मीटर उंच लाटा

0

जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप रशियाच्या पूर्व द्वीपकल्प कामचटका येथे झाला आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार, भूकंपाची तीव्रता 8.8 होती. भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे 4:54 वाजता हा भूकंप झाला.रॉयटर्सच्या मते, कामचटकाला 4 मीटर उंचीपर्यंतची त्सुनामी आली आहे. त्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. USGS ने सांगितले की भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 19.3 किलोमीटर खोलीवर होते.

कामचटकाचे राज्यपाल व्लादिमीर सोलोडोव्ह यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि सांगितले की आजचा भूकंप दशकांमधील सर्वात शक्तिशाली होता. त्यांनी सांगितले की एका बालवाडी शाळेचे नुकसान झाले आहे.

जपानच्या NHK टेलिव्हिजननुसार, देशाच्या पूर्व किनाऱ्याजवळ एक फूट उंचीच्या पहिल्या त्सुनामी लाटा आल्या आहेत. जपानने 20 लाख लोकांना बाहेर काढले आहे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले आहे. याशिवाय, त्यांच्या फुकुशिमा अणुभट्टीतील लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
जपानमधील सुमारे २० लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यास सांगण्यात आले आहे. देशाच्या किनारपट्टी भागात त्सुनामीच्या लहान लाटा धडकत आहेत. तथापि, लाटा पूर्वी नोंदवलेल्या आकारापेक्षा खूपच लहान आहेत.

जपानच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेनुसार, देशातील २१ वेगवेगळ्या प्रांतांमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी लोकांना त्यांची घरे रिकामी करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वाधिक प्रभावित लोक होक्काइडो, कानागावा आणि वाकायामा सारख्या भागात आहेत. होक्काइडो हे जपानचे सर्वात उत्तरेकडील बेट आहे. त्सुनामीच्या पहिल्या लाटा येथे धडकल्या. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार लोक छतावर आश्रय घेत असल्याचे दिसून आले आहे.
रशियातील भूकंपानंतर पेरू, इक्वेडोर आणि चीनमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, पेरू आणि इक्वेडोरच्या गॅलापागोस बेटांवर इशारा देण्यात आला आहे.

खबरदारी म्हणून काही भागातून लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. जरी हे भाग रशियाच्या कामचटका द्वीपकल्पातील भूकंपाच्या केंद्रापासून सुमारे १३,००० किलोमीटर (८,००० मैल) अंतरावर असले तरी, संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर अजूनही खबरदारी घेतली जात आहे.

याशिवाय, पूर्व चीनच्या काही किनारी भागात त्सुनामीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, हा आतापर्यंतच्या सहाव्या सर्वात शक्तिशाली भूकंपांमध्ये गणला जाईल.

यापूर्वी, त्याच तीव्रतेचे आणखी दोन मोठे भूकंप झाले होते. एक २०१० मध्ये चिलीच्या बायोबायो प्रदेशात आणि दुसरा १९०६ मध्ये इक्वेडोरमधील एस्मेराल्डास येथे आला.

यूएसजीएस नुसार, चिलीच्या भूकंपात ५२३ लोकांचा मृत्यू झाला आणि ३.७ लाखांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली. त्याच वेळी, इक्वेडोरच्या भूकंपामुळे आलेल्या मोठ्या त्सुनामीत १,५०० लोकांचा मृत्यू झाला आणि लाटा अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत पोहोचल्या.

आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे आतापर्यंतचा पाचवा सर्वात तीव्र भूकंप रशियाच्या कामचटका प्रदेशातही आला. हा भूकंप १९५२ मध्ये आला होता आणि तो जगातील पहिला ९ तीव्रतेचा भूकंप मानला जातो.

त्या भूकंपामुळे हवाईला प्रचंड त्सुनामी आली ज्यामुळे तेथे १० लाख डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाले.

चाकण एमआयडीसीतील वीजपुरवठा सुरळीत

पुणे,- महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही चाकण फेज-२ अतिउच्चदाब केंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाल्याने गेल्या चार दिवसांपासून चाकण औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांचा व परिसरातील गावांचा वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने सुरु होता. महावितरण व महापारेषण या दोन्ही कंपन्यांनी युद्धपातळीवर काम करुन मंगळवारी (दि. २९) दुपारी १२.१९ वाजता बिघाड दुरुस्त करत वीजपुरवठा पुर्ववत करण्यात यश मिळविले आहे.

चाकण फेज-२ अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात महापारेषण कंपनीचे ५० एमव्हीए क्षमतेचे दोन अतिउच्चदाब रोहित्रे आहेत. पैकी एकामध्ये २१ तारखेला बिघाड झाला. चाकण औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांना रविवारची सुटी असल्याने विजेची मागणी कमी असते. त्यामुळे २६ तारखेला दुपारी ४ वाजता नादुरुस्त रोहित्र बदल्याचे काम पारेषण कंपनीने हाती घेतले. २८ तारखेला सकाळी ९.३५ वाजता काम पूर्ण करुन वीजपुरवठा सुरु करण्यात आला. तो दिवसभर चालला. मात्र सायंकाळी त्याच रोहित्रात पुन्हा बिघाड झाला. भरपावसात पुन्हा बिघाड दुरुस्ती करण्यात आली. शेवटी मंगळवारी (२९ जुलै) दुपारी १२.१९ वाजता उच्चदाब रोहित्र पूर्ण क्षमतेने कार्यन्वित करण्यात यश आले.

महापारेषणच्या बिघाड दुरुस्ती काळात संबंधित रोहित्रावर असलेला ४० मेगावॅटचा भार दुसऱ्या रोहित्रावर वळवून चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात आला. या संपूर्ण काळात उच्चदाबाचे १९० व लघुदाबाचे ११०० औद्योगिक ग्राहक तर वराळे, भांबोळी, सावरदरा, शिंदे, वासोली व सांगुर्डी आदी गावांमधील अंदाजे ६५०० वीजग्राहकांना याची झळ बसली. महावितरणने गावांना रात्री तर उद्योगांना दिवसा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला. उच्चदाब औद्योगिक ग्राहकांमध्ये टाटा टॅको, जीई, पॅकटाईम, इमरसन, इमीटेक, इस्सार, प्लास्टिक ओम्नीअम, बजाज इलेक्ट्रिक आदी ग्राहकांचा समावेश होता.

महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोलप, अधीक्षक अभियंता युवराज जरग (महावितरण) व विठ्ठल भुजबळ (महापारेषण), महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके, उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेळके, सहा. अभियंता विक्रांत वरुडे यांनी युद्धपातळीवर यंत्रणा कामाला लावून बिघाड दुरुस्तीचे व वीजपुरवठ्याचे नियोजन केले.

शिवाजीनगर एसटी स्थानकाचा कोणासाठी केला भाजपने खेळ खंडोबा-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : एसटी प्रवाशांसाठी सोयीचे असलेले शिवाजीनगर एसटी स्थानक सहा वर्षांनंतरही बांधले जात नाही. भाजप कोणासाठी प्रवाशांची ही सोय अडवून ठेवून, खेळ खंडोबा करत आहे आहे? असा सवाल माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत केला.

मेट्रो रेल्वेसाठी जुने शिवाजीनगर एसटी स्थानक सहा वर्षांपूर्वी पाडले आणि ते पुणे -मुंबई रस्त्यावरील वाकडे वाडी येथे स्थलांतरित करण्यात आले. वाहतुकीसाठी ही जागा अतिशय धोकादायक आहेच तसेच ती प्रवाशांसाठीही खूपच गैरसोयाची आहे. पण, एसटीसाठी नवीन स्थानक मूळ जागीच पुन्हा लवकरच उभे राहील, या आशेवर प्रवाशांनी धीर धरला. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आश्वासने दिली की, मूळ जागी तातडीने हे स्थानक उभारू. मात्र, ते आश्वासन गुंडाळले जावून आता त्याजागी खाजगी व्यावसायिकामार्फत एसटी स्थानकाबरोबरच व्यावसायिक संकुलही उभे करण्याचा खटाटोप भाजपकडून चालू आहे.यात कोणाचेतरी हितसंबंध आहेतच. शिवाय व्यावसायिक संकुल बांधताना हा प्रकल्पही लांबणीवर पडेल. या प्रकाराला काँग्रेस पक्षाचा विरोध राहील, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला आहे.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तीन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी पुणेकर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मूळ जागी स्थानक लवकर उभे करावे, अशी मागणी करण्यात आली आणि मेट्रो कंपनी आणि परिवहन खाते यांच्यातील करारानुसार एसटी स्थानक उभारण्याचे काम मेट्रो कंपनी करणार आहे, त्यादृष्टीने दोन्ही कंपन्यांमध्ये समन्वय साधला जावा , हे ही तेव्हा उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले, त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी लगेचच फोनवर परिवहन मंत्री आणि मेट्रो च्या अधिकाऱ्यांशी बोलणी केली. दरम्यान, मेट्रो ऐवजी ९८ वर्षाच्या कराराने खाजगी व्यावसायिकाकडून व्यापारी संकुल उभे करण्याचा प्रस्ताव भाजपने तयार करवून घेतला, असे खात्रीलायक समजले, हा सगळा खटाटोप आणि खेळ खंडोबा कोणासाठी चालला आहे? असा प्रश्न मनात येतो, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

.पुणे शहरातील भाजपचे सर्व मंत्री, आमदार यांना आम्ही ताजमहाल उभा करायला सांगत नाही आहोत, एसटी स्थानक उभा करायचा आहे. ते ही त्यांना जमत नाहीये. याचा अर्थ त्यांना पुणेकरांच्या सुख सोयींशी काही देणेघेणे नाही. फक्त निवडणुका जिंकणे, एवढाच त्यांचा अजेंडा आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

पुणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला एसटी स्थानक हा विषय मार्गी लागावा म्हणून काँग्रेस पक्ष संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, निवेदने, आंदोलने अशा विविध मार्गांनी पाठपुरावा करत आहे आणि करत राहील, असे मोहन जोशी यांनी पत्रकारांना सांगितले.

ॠषिकेश ते रामेश्वरम गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात उत्साहात स्वागत .

पुणे: गौमाता की जय… भारत माता की जय… अशा घोषणा देत वंदे गौमातरम – गौ आधारित भारताच्या पुनर्निमाणाच्या दिशेने ६१ दिवसांच्या ऐतिहासिक गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात आगमन झाले. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने औंध येथील गोसेवा आयोग कार्यालयाच्या प्रांगणात या यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ही यात्रा देशभरातील १२ राज्यांतून प्रवास करत एकूण १०,१२७ किलोमीटर अंतर कापणार आहे.

यात्रेचे नेतृत्व भारतीय वेटर्नरी अ‍ँड अ‍ॅग्री रिसर्च इन्स्टिट्यूट अध्यक्ष व डेअरी अ‍ॅग्री कन्सल्टंट भारतसिंह राजपुरोहित आणि राष्ट्रीय गौ सेवक संघाचे संस्थापक नरेंद्र कुमार हे करीत आहेत. सदर यात्रेमध्ये राष्ट्रीय गो सेवक संघ अध्यक्ष रोहित कुमार बिष्ट हे सुद्धा सक्रियपणे सहभागी होते.

यात्रा स्वागत प्रसंगी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, सदस्य संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय, सदस्य सचिव डॉ मंजुषा पुंडलिक, अधिकारी डॉ संगीता केंडे, डॉ आशिष पवार आणि आयोगाचा सर्व कर्मचारी वृंद हजर होता. स्वागत समारंभाला पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयातील सहायुक्त मुख्यालय डॉ. श्यामकांत पाटील, उपायुक्त पुणे डॉ. परिहार आदी उपस्थित होते. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या सभागृहात पुणेरी पगडी, शाल देऊन गौ राष्ट्र यात्रेच्या आयोजकांचा सन्मान करण्यात आला.

भारतसिंह राजपुरोहित म्हणाले, गायीचा विषय सरकारने समाजावर सोडला अहे. त्यामुळे समाजाला देखील याविषयामध्ये सशक्त व्हायला हवे. गाय हे प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचे प्रतिक बनेल, असा प्रयत्न आपल्याला करायला हवा. महाराष्ट्रात गोमातेला राज्यमाता म्हणून घोषित करण्यात आले. सर्वच राज्यात अशा प्रकारे गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्यायला हवा. तब्बल ४२ दिवस आम्ही यात्रेत आहोत. यापुढेही ही यात्रा अशीच सुरु राहणार असून गोबर क्रांती आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनजागृती आणि संवादातून गाय हे प्रतिष्ठेचे प्रतिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. राजपुरोहित यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अल्पावधीत केलेल्या भरीव कामाचे कौतुक केले.

महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा म्हणाले, देशी गोवंशाचे संगोपन आणि संवर्धन व्हावे, तसेच गोआधारित शेती केली जावी, याविषयावर जनजागृतीपर ही यात्रा पुण्यात आली आहे. गाय वाचली तरच देश वाचेल. आपण तीन मातांना मानतो. त्यामध्ये सर्वप्रथम आपली आई म्हणजेच माता, मायभूमी म्हणजेच भारतमाता आणि गोमाता. त्यामुळे सर्वांचे कर्तव्य आहे की गोमातेचे रक्षण आणि संवर्धन करायला हवे. गोमातेला राष्ट्र मातेचा दर्जा देखील मिळायला हवा, असेही त्यांनी सांगितले. नरेंद्र कुमार, संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय यांनी मनोगत व्यक्त केले.

‘संगीतसंध्या’ मैफलीत दमदार तबलावादन आणि आश्वासक गायनाचा आविष्कार

‘कलासक्त’ आयोजित ‘संगीतसंध्या’ मैफलीस रसिकांची दाद

पुणे : डॉ. प्रांजल पंडित यांचे दमदार तबलावादन आणि युवा गायिका मृण्मयी भिडे यांचे सुरेल, आश्वासक गायन ही ‘संगीतसंध्या’ मैफलीची वैशिष्ट्ये ठरली.
कलासक्त कल्चरल फाऊंडेशन आणि आय. एम. ए. आर्ट्स सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संगीतसंध्या’ या मैफिलीत गायन-वादनाचा बहारदार कलाविष्कार रसिकांनी अनुभवला. डॉ. के. एच. संचेती सभागृह, टिळक रोड येथे ही मैफल रंगली.
कलासक्त फाऊंडेशनचे श्रीरंग कुलकर्णी, आय. एम. ए.चे डॉ. रणजीत घाटगे, डॉ. मोहन जोशी, डॉ. दाक्षायणी पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीरंग कुलकर्णी यांनी कलासक्त कल्चरल फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. प्रामुख्याने तरुण कलाकारांना वाव मिळावा, त्यांची कला रसिकांसमोर यावी या उद्देशाने कलासक्त फाऊंडेशन कार्यरत आहे. फाऊंडेशनतर्फे शास्त्रीय गायन स्पर्धा घेण्यात येते. आगामी काळात वाद्यवादन स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘संगीतसंध्या’ मैफलीची सुरुवात डॉ. प्रांजल पंडित यांच्या तबलावादनाने झाली. पंडित आनंद सिधये यांचे शिष्य असलेल्या डॉ. प्रांजल पंडित यांनी ताल त्रिताल सादर केला. पेशकार, कायदा, गत असे सादरीकरण उत्तरोत्तर रंगत गेले. त्यांना मानस साखर्पेकर यांनी लेहरासाथ केली.
उत्तरार्धात मृण्मयी भिडे यांनी राग रागेश्रीमथील ‘प्रथम सूर साधे’ या विलंबित एकतालातील पारंपरिक बंदिशीने सुरुवात केली. त्यानंतर ‘आवत भावत’ ही द्रुत एकतालातील रचना सादर केली. राग मियामल्हारमधील ‘घन गरजत बरसे’ (एकताल) आणि ‘कहे लाडला’ (द्रुत एकताल) ही रचना पेश करत त्यांनी वातावरण निर्मिती केली. ‘धाडिला राम तिने का वनी’ या नाटकातील ‘घाई नको बाई अशी आले रे बकुळफुला’ हे नाट्यपद, ‘तळमळ दूर करी’ ही रचना तन्मयतेने गाऊन ‘बोला अमृत बोला’ या भैरवीने त्यांनी सांगता केली. त्यांना सारंग जोशी (संवादिनी) आणि चिंतामणी वारणकर (तबला) यांनी अनुरूप साथसंगत केली.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील इंगळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. आय. एम. ए. आर्ट सर्कलच्या सचिव डॉ. गीतांजली शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.