Home Blog Page 384

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले सर्वांचे स्वागत

मुंबई- माजी मंत्री व शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, त्यांचे पुत्र ईश्वरपूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे, विश्वनाथ डांगे यांनी शेकडो समर्थकांसह बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. श्री. डांगे यांच्या पक्षप्रवेशावेळी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, पृथ्वीराज देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ‘जनसुराज्य’ चे समित कदम, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ आदी उपस्थित होते.
जनसंघाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या वाढीत मोलाचा वाटा असणा-या शीर्षस्थ नेत्यांमधील एक नेता या शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अण्णा डांगे यांच्या कार्याचे कौतुक केले. श्री. डांगे यांची घरवापसी ही आनंदाची बाब असून आम्ही तुम्हाला सांभाळून घेण्याएवजी ज्येष्ठ या नात्याने तुम्हीच आम्हाला सांभाळून घ्या अशी भावनिक साद श्री. फडणवीस यांनी घातली. आम्ही चुकलो तर रागवा, तुमच्या आशीर्वादाने भाजपा आणि पक्ष कार्यकर्ते उत्तम काम करू अशी ग्वाही ही श्री. फडणवीस यांनी दिली. श्री. डांगे यांनी पक्ष सोडला तरी पक्षाच्या मूलभूत विचारांवर टीका केली नाही. ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्या शब्दाला भाजपामध्ये सदैव मान देण्यात आला होता तोच मानसन्मान पुन्हा मिळवून देण्याचा शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. दुर्दैवाने काही गैरसमजापोटी अण्णा भाजपा सोडून गेल्यानंतर प्रत्येक नेत्याला हळहळ वाटली होती ही कबुलीही त्यांनी दिली. आज मात्र विनंतीला मान देऊन ते आज आपल्या घरात परत आले आहेत याचा मनस्वी आनंद झाला आहे असेही त्यांनी नमूद केले. चौंडी येथील अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या वास्तूला गतवैभव मिळवून देण्यासाठी श्री. डांगे यांनी केलेल्या कामाचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आवर्जून केला.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि विकास नीतीवर विश्वास ठेवून या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तो विश्वास सार्थ ठरेल. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे डांगे कुटुंब आज भाजपामध्ये आल्याने त्या समाजाचे प्रश्न सोडवण्यास गती मिळेल. भाजपामध्ये त्यांचा यथोचित आदर राखण्यात येईल आणि त्यांच्या साथीने परिसराचा विकास करण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले.
श्री. अण्णा डांगे म्हणाले की, आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा दिवस आहे. 20 मार्च 2002 ला भाजपाचा राजीनामा दिला आता 23 वर्षांनी भाजपामध्ये येण्याचे समाधान आहे. मागची अनेक वर्षे अनेक पक्षात काम केले पण योग्य ती दखल घेतली नाही. आता भाजपाच्या वाढीसाठी विकासासाठी झटून काम करू असेही ते म्हणाले.
सांगलीमध्ये शरद पवार गटातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये माजी नगरसेवक सुभाष देसाई,माजी जि.प. सदस्य भानुदास वीरकर, दिनदयाळ मागासवर्गीय सह. सूत गिरणीचे चेअरमन अमोल चौधरी, माजी नगरसेवक श्रीकांत माने, अशोक देसाई, मोहम्मद गणीभाई, जालिंदर कोळी, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष गोपाल नागे,युवक कॉंग्रेस पार्टी उपाध्यक्ष अभिजीत रासकर आदींचा समावेश आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ ला तमाशा म्हणणा-या प्रवृत्तीचा तीव्र निषेध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर घणाघात

‘ऑपरेशन सिंदूर’ या देशाला अभिमान वाटणा-या मोहीमेला ‘माध्यमांवरील सरकारचा तमाशा’ म्हणणा-या काँग्रेसच्या हीन प्रवृत्तीचा मी निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूर बाबत पुराव्यानिशी विस्तृतपणे सत्य आणि वास्तव समोर मांडल्यानंतर काँग्रेस पूर्णपणे उघडी पडली आहे. जी भाषा पाकिस्तानचे नेते बोलतात तीच भाषा काँग्रेसचे नेते पूर्णविराम-स्वल्पविरामासकट बोलतात हे काल पुन्हा एकदा सिद्ध झाले असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. जे काँग्रेसच्या मनात आहे तेच शब्द काँग्रेसच्या नवीन सदस्यांच्या तोंडून वदवून घेण्याच्या काँग्रेसच्या हीन प्रयत्नांवर पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत बोलताना केलेल्या प्रहाराचा उल्लेख करत श्री. फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणे म्हणजे या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वेदनेवर मीठ चोळण्यासारखे आहे. दैदिप्यमान कामगीरी करत पाकिस्तानच्या दहशतवादाला पायबंद घालणा-या भारतीय सेनेचा हा अपमान आहे.

महंमद रफी हे महान गायक तसेच उत्तम व्यक्तीही : मोहन जोशी

सुभाषचंद्र जाधव लिखित ‘स्वरसम्राट महंमद रफी’ ग्रंथाचे प्रकाशन

पुणे : महंमद रफी हे केवळ महान गायकच नव्हे तर उत्तम व्यक्तीही होते. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली नाही; परंतु त्यांच्यावर प्रचंड प्रेम असल्याने त्यांच्या आवाजातील गाणी ऐकल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही, अशा भावना ज्येष्ठ चित्रपट अभिनेते आणि महंमद रफी यांचे चाहते मोहन जोशी यांनी व्यक्त केल्या.

महान गायक महंमद रफी यांची जन्मशताब्दी आणि त्यांच्या ४५व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला संवाद, पुणे आणि प्रतीक प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ सिनेपत्रकार, लेखक सुभाषचंद्र जाधव लिखित ‘स्वरसम्राट महंमद रफी’ या ग्रंथाचे प्रकाशन आज (दि. ३०) मोहन जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टाटा मोटर्सचे प्लांट हेड (निवृत्त) व्ही. गांधी यांची विशेष उपस्थिती होती. संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे, प्रकाशक प्रवीण जोशी मंचावर होते.
मोहन जोशी पुढे म्हणाले, ‘स्वरसम्राट महंमद रफी’ या ग्रंथात महंमद रफी यांच्या कारकिर्दीविषयी सखोल व अभ्यासपूर्ण माहिती असल्याने प्रत्येक रफीप्रेमीने हे पुस्तक जरूर वाचावे. महंमद रफी यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे भाग्य लाभले याचा आनंद आहे. संवाद, पुणेच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.
लेखनाविषयी बोलताना सुभाषचंद्र जाधव म्हणाले, वाचकांच्या प्रोत्साहनामुळे आज माझे २५वे पुस्तक प्रकाशित होत याचा विशेष आनंद आहे. महंमद रफी यांच्यावर प्रेम करणारे प्रकाशक मला भेटले हे माझे भाग्य आहे. महंमद रफी यांनी आपल्या गोड गळ्याच्या माध्यमातून प्रत्येक रसिकाला झपाटून टाकले आहे. माझ्या आयुष्यात अनेकदा आलेले नैराश्य रफीसाहेबांच्या आवाजातील गाणी ऐकल्यामुळे दूर झाले आणि माझ्या जीवनात सकारात्मकता पसरली. रफीसाहेब आजही रसिकांच्या हृदयात अमरच आहेत.
व्ही. गांधी यांनी महंमद रफी यांच्या गीतांविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. प्रकाशक प्रवीण जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीस सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले तर आभार निकिता मोघे यांनी मानले. सूत्रसंचालन चिन्मयी चिटणीस यांनी केले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त गफार मोमीन, प्रज्ञा गौरकर यांचा महंमद रफी यांच्या गाजलेल्या गाण्यांवर आधारित सिनेसंगीताचा ‘सदाबहार रफी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होतो.

केंद्र सरकार प्रमाणे राज्यात देखील रोलबॉल च्या खेळाडूंना नोकरीत आरक्षणासाठी प्रयत्न करणार – ना. चंद्रकांतदादा पाटील.

केनिया येथील स्पर्धेत सतरा वर्षाखालील मुलींचा रोलबॉल विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा “दादांच्या” हस्ते सत्कार !!

पुणे-अन्य खेळांप्रमाणे रोलबॉल खेळाचा देखील राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करेन असे ना. चंद्रकांत दादा पाटील उच्च शिक्षण मंत्री आणि संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकार च्या निर्णयाप्रमाणेच राज्यात देखील रोलबॉल च्या खेळाडूंना नोकरीत 5% आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू व लवकरच संबंधित विभागासोबत बैठक आयोजित करू असेही चंद्रकांतदादा म्हणाले.
केनिया ची राजधानी नैरोबी येथे पार पडलेल्या 17 वर्षाखालील मुला मुलींच्या विश्वचषक स्पर्धेत विश्वविजेतेपद जिंकलेल्या मुलींच्या संघाच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे, महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, दादासाहेब भोरे, प्रमोद काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुण्याची प्रांजल जाधव,
प्राची गर्जे अकोला,
तिशा पंडित ठाणे,
जान्हवी हेगडे नंदुरबार,
जय राजा यवतमाळ,हेमांगीनी काळे कोच,तेजस्विनी यादव फिटनेस कोच,प्राची फराटे टीम सपोर्टर,श्री मिलिंद क्षीरसागर टीम सपोर्टर यांना सन्मानित करण्यात आले.

रोल बॉल खेळाला भारतीय खेळ म्हणून ज्या प्रमाणे केंद्र शासनाने मान्यता दिली आहे आणि रोल बॉल खेळाडुंना नोकरीची संधी दिली आहे आणि राजस्थान, मध्यप्रदेश, छात्तीसगड, गुजरात, या महाराष्ट्रच्या शेजारील राज्यांमध्ये तसेच जम्मू काश्मीर, तामिळनाडू, आसाम, झारखंड, केरळ, ई. राज्यांमध्ये त्या त्या राज्य सरकारचे क्रीडा पुरस्कार, रोख पारितोषिके, नोकरीमध्ये आरक्षण देखील तेथील रोल बॉलच्या खेळाडूंना दिले आहे तसेच धोरण महाराष्ट्र शासनाने अंगीकारावे यासाठी आपण मदत करावी असे खेळाचे जनक राजू दाभाडे म्हणाले.
रोलबॉल खेळ हा महाराष्ट्राच्या मातीमध्ये तयार झालेला खेळ असून याच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारचे सर्व सहकार्य मिळत आहे. इतर राज्यातील खेळाडू, मार्गदर्शक, संघटक यांना त्यांच्या राज्य सरकारचे सहकार्य मिळत आहे. आपल्या राज्यातील खेळाडू राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अत्यंत महत्वाची कामगिरी करून देखील या सर्व गोष्टीं पासून वंचित रहात आहेत असे महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी निदर्शनास आणून दिले.या खेळा संदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी आपल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन, पुणे यांना दिली आहे असे ही खर्डेकर म्हणाले.
ज्या प्रकारे पारंपारिक क्रीडा प्रकार म्हणून कब्बडी, खोखो, मल्लखांब, आट्यापाट्या, योगासने तसेच पॉवरलिफ्टिंग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बुद्दीबळ, क्रिकेट, बिलीयर्ड आणि स्नुकर आणि कोणत्याही पायाभूत सुविधा किवा जिल्हा राज्य स्पर्धेचे आयोजन नसताना राज्यामध्ये प्रचार प्रसार दिसून येत नसताना गोल्फ, याटिंग, इक्वेस्टेरियन इत्यादी खेळांचा समावेश शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार यादी मध्ये समावेश करण्यात आला आहे, नोकरीमध्ये ५% टक्के आरक्षण खेळाच्या यादीमध्ये केला आहे याची खंत वाटते असेही राजू दाभाडे आणि संदीप खर्डेकर म्हणाले.
मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्यात 2023 साली झालेल्या विश्वचषक रोलबॉल स्पर्धेत महत्वाची भूमिका बजावली होती व तेव्हापासून दादा ह्या खेळाडूंच्या पाठीशी उभे आहेत, त्याच परंपरेनुसार दादा निश्चित पणे ह्या खेळाच्या बाबतीत राज्य सरकार कडे मागण्या मांडतील असा विश्वास संदीप खर्डेकर आणि राजू दाभाडे यांनी व्यक्त केला आहे.

ओला-उबर चालकांसाठी ₹३६ प्रति किलोमीटर दर निश्चित करण्याची मागणी- डॉ. बाबा कांबळे,

पुणे: ओला-उबर मोबाईल ॲप-आधारित कंपन्यांच्या दरांच्या निश्चितीसंदर्भात पुणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत हॅचबॅक कॅबसाठी ₹२५, सेडानसाठी ₹३० आणि एसयूव्ही (SUV) वाहनांसाठी ₹३६ प्रति किलोमीटर असे दर तात्काळ निश्चित करण्याची मागणी विविध टॅक्सी व कॅब संघटनांच्या वतीने एकमुखाने करण्यात आली.

या बैठकीत ओला-उबरसारख्या ॲप-आधारित कंपन्यांमार्फत सेवा पुरवणाऱ्या कॅब चालक-मालकांसाठी न्यायोचित व व्यवहार्य दर निश्चिती करण्यावर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीला पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले, राहुल जाधव यांच्यासह मुख्य लिपिक जगदीश कांदे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
टॅक्सी व कॅब संघटनांच्या वतीने ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे, मासाहेब कॅब संघटनेच्या अध्यक्षा वर्षाताई शिंदे, मनसे वाहतूक विभागाचे रुपेश कदम, महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष बिरुदेव पालवे, सारथी वाहतूक संघटनेचे अजय मुंडे, तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. बाबा कांबळे यांचे निवेदन:
ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, “पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सध्या १ लाख ३० हजार वाहनमालक आणि २ लाखांहून अधिक चालक-मालक कार्यरत आहेत. ओला, उबर आणि इतर कंपन्यांकडून त्यांना सध्या प्रति किलोमीटर ₹८ ते ₹९ असे अत्यल्प दर दिले जात आहेत, ज्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. दुर्दैवाने, दर निश्चित नसल्यामुळे आरटीओ आणि सरकारकडून कोणतीही नियमित कारवाई केली जात नाही. यामुळे आरटीओ समितीने दर निश्चित करावेत, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.”

डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मुंबई येथे भेट घेऊन ओला-उबर कंपन्यांचे दर निश्चित करण्याबद्दल व इतर प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली होती. यानंतर प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना संघटनेसोबत बैठक घेण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने मुंबई येथे परिवहन आयुक्त कार्यालय येथे पुणे-मुंबई येथील १४ संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यात दर निश्चिती व इतर विविध प्रश्नांवर सविस्तर विचारमंथन झाले. त्यानंतर पुणे येथे ही बैठक घेण्याचे निश्चित झाले होते. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारच्या बैठका घेऊन आरटीओ समितीमध्ये याबाबत दर निश्चित करावेत, असा निर्णय घेण्यात आला होता.

मासाहेब कॅब संघटनेच्या अध्यक्षा वर्षाताई शिंदे यांनी सांगितले की, “आजच्या बैठकीमध्ये आम्ही ओला-उबर कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कॅब चालक-मालकांसाठी न्यायोचित व शासनादेशानुसार दर निश्चित करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.”

डॉ. बाबा कांबळे यांनी पुढे सांगितले की, “यापूर्वी आम्ही कायदेशीर मार्गाने संघर्ष करून सुरुवातीला पाटणकर समिती, नंतर हकीम समिती व त्यानंतर खटवा समिती स्थापन करण्यास सरकारला प्रवृत्त केले होते. या सर्व समित्यांच्या वतीने ऑटो टॅक्सी चालकांचे मीटर दर निश्चित करण्याबद्दल शास्त्रीय सूत्र ठरवले आहे, यामध्ये महागाईचा निर्देशांक, बँकेचे कर्ज, वाहनाची झीज, टायरचा खर्च, विमा, पासिंगसाठी लागणारा खर्च, मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च या सूत्राच्या आधारे दर निश्चित केले जातात. याच सूत्राच्या आधारे ओला-उबरमध्ये चालणाऱ्या कॅब चालकांसाठी देखील दर निश्चित करावेत अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली आहे. आज देखील याच सूत्राच्या आधारे ₹३६ प्रति किलोमीटर दर देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.”

मासाहेब संघटनेच्या अध्यक्षा वर्षाताई शिंदे यांनी नमूद केले की, “ओला-उबर व इतर ॲप-आधारित कंपन्यांकडून चालक-मालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण चालू आहे. यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला ₹२५ प्रति किलोमीटरप्रमाणे दर निश्चित करून तसे पत्र ओला-उबर कंपन्यांना दिले होते. परंतु, आरटीओच्या वतीने व जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने ही ओला-उबर कंपन्यांना केवळ विनंती होती. विनंती केल्यामुळे या भांडवलदार कंपन्यांनी अधिकारांचे देखील ऐकले नाही. कायद्याप्रमाणे दर निश्चित झाल्यास या कंपन्यांना वचक बसेल व हक्काचे दर आम्हाला मिळतील. यामुळे तातडीने आरटीओ कमिटीने दर निश्चित करावेत अशी आमची सर्व संघटनांची मागणी आहे.”

सारथी वाहतूक संघटनेचे सल्लागार अजय मुंडे यांनी सांगितले, “खटवा कमिटीच्या सूत्रानुसार वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये हॅचबॅक कॅबसाठी वेगळे दर, सेडान गाड्यांसाठी वेगळे दर व एसयूव्ही (SUV) गाड्यांसाठी वेगळे दर निश्चित केलेले आहेत. याचप्रमाणे वैज्ञानिक पद्धतीने दर निश्चिती करून ते ओला-उबर चालकांना तसेच ऑल इंडिया परमिट व महाराष्ट्र परमिट असलेल्या सर्व वाहनांना तात्काळ लागू करावेत.


महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष बिरुदेव पालवे म्हणाले, “आरटीओने आज ओला-उबर कॅब चालकांच्या दर निश्चितीसाठी आमच्यासोबत चर्चा केली आहे. परंतु, या दर निश्चितीसाठी कालमर्यादा न ठेवता तातडीने दर निश्चित करून चालकांना तात्काळ न्याय द्यावा. आता आम्ही जास्त काळ प्रतीक्षा करू शकत नाही.


मनसेचे रुपेश कदम यांनी निवेदनात म्हटले आहे की, “हॅचबॅक कॅबसाठी ₹२५, सेडानसाठी ₹३० आणि एसयूव्ही (SUV) वाहनांसाठी ₹३६ असे दर निश्चित करण्याची मागणी आम्ही सर्व संघटनांनी एकमुखाने केली आहे. आम्ही मागणी केलेला दर निश्चित होईल आणि चालकांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांच्याकडे आम्ही वेळोवेळी मागणी केल्यामुळे पुणे येथील ही बैठक आयोजित करून यामध्ये दरांबद्दल चर्चा होत आहे. सरकार आम्हाला न्याय देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. परंतु, दर निश्चित न झाल्यास पुढील काळात आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा निर्णय देखील उपस्थित सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला.

वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी संस्थेला त्रिभुवन सहकार विद्यापीठाची मान्यता

  • मान्यता मिळवणारी देशाच्या सहकार क्षेत्रातील पहिली संस्था
  • ⁠केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : वैकुठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM) ही त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची (TSU) मान्यता मिळवणारी देशातील पहिली संस्था झाली आहे. या संस्थेत सध्या चार दीर्घकालीन पदवी आणि सहा अल्पकालीन कौशल्यवर्धित अभ्यासक्रम चालवले जातात. हे अभ्यासक्रम आता संस्थेच्या वतीने त्रिभुवन विद्यापीठाअंतर्गत चालवले जातील. पारंपारिक अभ्यासक्रमासोबतच आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहकारातील वापरासंबंधीचे अभ्यासक्रम आता या संस्थेत शिकवले जातील. यामुळे युवकांसाठी विशेषत: ग्रामीण भागातील युवकांसाठी करीयरचे नवे दालन खुले होत आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

वैकुठंभाई मेहता संस्थेच्या वतीनं सध्या कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचा २ वर्षांचा पदव्युत्तर -पदविका, सहकार विषयातील २ वर्षांचा पदव्युत्तर – पदविका, सहकारी बँकिंग आणि वित्त विषयातील ४ वर्षांचा व्यवसाय प्रशासन डिग्री आणि सहकारी व्यवसाय व्यवस्थापनाचा ९ महिन्यांचा डिप्लोमा हे अभ्यासक्रम चालवले जातात. सहकाराच्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा सैद्धांतिक पाया भक्कम करणे आणि त्यांना व्यावहारिक अनुभव प्रदान करणे हे या अभ्यासक्रमांचे उद्दिष्ट आहे.

सहकारी क्षेत्रातील विशिष्ट कौशल्य कमतरता आणि नेतृत्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वैकुंठभाई मेहता संस्था ६ अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवत आहे. यामध्ये कृषी-विपणन आणि सहकारी संस्थांमध्ये मूल्यवर्धन करणे, कृषी उत्पादक संघटनांचे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञांसाठी दुग्ध तंत्रज्ञान या विषयातील २ महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे. कृषी उत्पादन आणि भावांचा अंदाज (Agricultural Commodities and Price Forecasting), युवा नेतृत्व आणि सामाजिक बदल (Youth Leadership and Social Change), आणि सहकारासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र (Micro-Economics for Cooperatives) या विषयांचा १ महिन्याचा अभ्यासक्रम आहे.

तरुण, तळागाळातील नेते, सहकारी संस्थांचे व्यवस्था यांच्‍या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची रचना व्यावहारिक अनुभव, सहकारी मूल्ये आणि आंतरविद्याशाखीय शिक्षण एकत्रित करते, ज्यामध्ये ग्रामीण विकासावर प्राथमिक लक्ष केंद्रित केले जाते. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ (TSU) च्या सहकार्याने, VAMNICOM ने सहकारी परिसंस्थेतील विविध भागधारकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे सर्व कार्यक्रम डिझाइन केले आहेत.

भविष्यातील गरजेनुसार वैकुंठभाई मेहता संस्थेने डिजिटल सहकारी संस्था, सहकारी आर्थिक तंत्रज्ञान आणि शाश्वत ग्रामीण उद्योजकता यासारख्या नव्या जमान्याच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. या विषयातील डिप्लोमा, डिग्री आणि कौशल्य विकास कार्यक्रम सुरू कऱण्यात येणार आहेत. आगामी काळात सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगाने विकसित होणाऱ्या सामाजिक-आर्थिक परिदृश्यात आवश्यक असलेले ज्ञान देत त्यांना काळासोबत सुसज्ज करणे हा या अभ्यासक्रमांचा उद्देश आहे. त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची अधिकृत मान्यता ही वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेसाठी एक परिवर्तनाचा क्षण आहे. सहकारी क्षेत्रातील अभ्‍यासक्रमांसाठी एक मजबूत राष्ट्रीय शैक्षणिक व्यासपीठ तयार होईल.

सहकारातून समृद्धीकडे नेण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल…

‘पुणे लोकसभा मतदारसंघात गेली अनेक वर्षे सहकार क्षेत्रासाठी कार्यरत असलेली वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था आहे. त्रिभुवन सहकार विद्यापीठाची या संस्थेला देशातील पहिली मान्यता मिळाल्याने आता या सहकार विषयक पूर्ण शैक्षणिक काम व्हॅमनिकॉमला करता येईल. तसेच येथे शिकणाऱ्या सर्वांना अधिकृत विद्यापीठाची पदवी किंवा पदविका किंवा प्रमाणपत्र मिळेल. तसेच या संस्थेत आता सहकार विषयक संशोधनालाही चालना मिळेल. ग्रामीण भागातील युवकांसाठी करिअरचे नवे दालन खुले होईल. त्यामुळे देशातील सहकारापासून समृद्धीकडे नेण्यासाठी हे टाकलेले महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे’.

  • मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाजवळील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 30 : पुण्यातील महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जतन व विस्तारीकरणाची कामे सुरु करण्यासाठी स्मारकाच्या सभोवतालचे रहिवाशाना हलविणे आवश्यक आहे. जे रहिवाशी पर्यायी जागेवर जाण्यास तयार आहेत, त्यांचे  स्थलांतर करण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री श्री पवार यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जतन व विस्तारिकरण कामाचा  आढावा घेतला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार समीर भुजबळ, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव
डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते. तर पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले की, स्मारक विस्तारिकरणाच्या भूसंपादन कामासाठी राज्य शासनाने 200 कोटींचा निधी दिला आहे. मात्र अद्याप भू संपादनाची कामं सुरु झाली नाहीत. स्मारकासभोवतालच्या सुमारे एक हजार राहिवाशांना अन्यत्र स्थलांतरीत करण्यासाठी पर्याय दिले आहेत. त्यातील 200 रहिवाशी पर्यायी ठिकाणी जाण्यास तयार आहेत, त्यांना तिकडून स्थलांतर करण्याची कार्यवाही करावी. इतर रहिवाशांना टप्प्या टप्प्याने हलविण्याचे नियोजन करावे. तसेच येत्या 15 दिवसात भू संपादनची प्रक्रिया सुरु करावी.

अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, आतापर्यंत स्मारकाच्या विस्तारिकरणाची कामे सुरु व्हायला हवी होती. मात्र अद्याप सभोवतलच्या रहिवाशांचे स्थलांतर सुरु झाले नाही. सर्वांना एकाच वेळी हलविण्यापेक्षा जे नागरिक तेथून पर्यायी जागेच्या ठिकाणी जाण्यास तयार आहेत, त्यांना प्रथम हलविण्यात यावे व त्यांच्या जागा खाली कराव्यात. त्यानंतर इतरांना स्थलांतर करावे.

पुणे महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर यांनी सद्य:स्थितीत सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.

नागरिकांच्या सुरक्षेकरतामहावितरणने उपाययोजना कराव्यात–आमदार सिद्धार्थ शिरोळे

भूमिगत केबल्स साठी शासनाने निधी लगेच द्यावा

पुणे : नागरिकांच्या सुरक्षेकरिता महावितरणने (एमएसईबी) उपाययोजना हाती घ्याव्यात आणि भूमिगत केबल्ससाठी राज्य सरकारने तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) महावितरणच्या बैठकीत केली.

छत्रपती शिवाजीनगर मतदार संघामध्ये अनेक वस्त्या आहेत, त्यामध्ये ओव्हरहेड केबल्सचे खूप मोठे जाळे पसरले आहे. त्याच्यामुळे नागरिकांना असुरक्षित वाटते. पावसाळ्यात हा धोका अधिक वाटतो. त्याकरिता उपाय म्हणून या ओव्हरहेड केबल्सचे ऑडिट करून त्यांना भूमिगत करणे अत्यंत आवश्यक आहे. केबल्स भूमिगत करण्याकरिता महावितरणकडे (एमएसईबी) निधीचा अभाव आहे, शासनाकडे महावितरणने त्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. त्याला तातडीने मंजुरी मिळावी, असेही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

अचानक अथवा ठरवून कोणत्याही उपकरणाची किंवा प्रणालीची दुरुस्ती किंवा तपासणी करण्यात येणार असेल तर नागरिकांना ती माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात यावी, तसेच काही वेळाकरिता वीजपुरवठा खंडित करण्यात येत असेल, तर त्याची पूर्वकल्पना नागरिकांना द्यावी, अशी सूचना आमदार शिरोळे यांनी बैठकीत केली.

बऱ्याच वेळा महावितरण बाबत (एमएसईबी) नागरिकांची तक्रार असते की, महावितरणकडे साहित्य शिल्लक नसतं त्यामुळे दुरूस्तीसाठी येणारा खर्च नागरिकांना करावा लागतो. उदाहरणार्थ, समजा डीपी पासून मीटर पर्यंत केबल जळाली तर त्या केबलचा खर्च हा महावितरण (एमएसईबी) ने करणे गरजेचे असते. साहित्य शिल्लक नसल्यामुळे नागरिकांना सांगितले जाते की, केबल तुम्ही विकत आणा आणि आम्ही ती तुम्हाला बसवून देतो. अशामुळे नागरिकांना उगाच भुर्दंड बसतो, असे आमदार शिरोळे यांनी निदर्शनास आणून दिले.

सुरक्षेचा मुद्दा, वाड्या वस्त्यांमध्ये आणि दाट लोकवस्तीच्या भागात अनेक ट्रान्सफॉर्मर्स आणि डीपी असतात त्यामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने शॉक लागण्याची शक्यता असते. सर्व डीपी आणि ट्रान्सफॉर्मर्स यांना सुरक्षितपणे बंदिस्त करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर मतदार संघातील डेड पोल तात्काळ हटवण्यात यावेत अशीही मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली. या बैठकीला शिवाजीनगर विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन थिटे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

शैक्षणिक संस्था ह्या संस्कार व सद्विचारांची विद्यापीठे व्हावीत-स्वरूपानंद सरस्वती स्वामी

डॉ. विश्वनाथ दा. कराड ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार’ ने सन्मानीत

पुणे,३० जुलै  : “देशातील सर्व विद्यापीठांकडून अत्याधुनिक शिक्षण दिले जावे, मात्र संस्कार आणि सद् विचार हे जीवन घडविणारे असतात. त्यामुळेच शैक्षणिक संस्था या सद्विचारांचे विद्यापीठ व्हावेत. संस्कार हे जीवन घडविणारे, विचार तर्क शुद्ध असल्याने सुंदर नव पिढी निर्माण करू शकू.” असे विचार श्रुतिसागर आश्रम फुलगावचे संस्थापक परमपूज्य स्वरूपानंद सरस्वती स्वामी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने परमपूज्य स्वरूपानंद सरस्वती स्वामी यांच्या हस्ते एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार’ २०२५ या विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश, स्मृती चिन्ह, मानपत्र, पगडी, कवड्याची माळ आणि शेला प्रदान करण्यात आला. तसेच, इतिहास अभ्यासक डॉ. केदार फाळके यांना श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती २०२५ ने सन्मानीत करण्यात आले. त्यांना प्रशस्तीपत्रक, ५० हजार रुपयांचा धनादेश, कवड्याची माळ व पगडी देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, अमृत पुरंदरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे संचालक रवींद्र वंजारवाडकर होते. जाणता राजाचे कलाकार सुनील थोपटे यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.
स्वरूपानंद सरस्वती स्वामी म्हणाले,”बाबासाहेबांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार महान शिक्षणमहर्षिला दिला गेला आहे. योग्य पुरस्कार योग्य व्यक्तिला देणे हाही एक योगायोग आहे. मन हे माणसाला शुन्यापासून उच्च स्तरापर्यंत घेऊन जाते. तसेच ते उच्च स्तरापासून जमिनीपर्यंत ही आणते. अशा वेळेस काळानुरूप मनावर संस्कार घडविणारी शिक्षण पद्धती गरजेची आहे.”
सत्काराला उत्तर देतांना डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”जीवनभर विनम्रतेने कार्य करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंतरिक समाधानाची अनुभूती घेत आहे. सद्गुणांची पूजा हीच ईश्वराची पूजा आहे. बाबासाहेब वयाच्या शंभरीत पदार्पण करीत होते. तेव्हा त्यांची भेट घेतली. बाबासाहेब नेहमी नम्रतेने, लीनतेने बोलत. शिवरायांच्या जीवनाचे खरे दर्शन बाबासाहेबांनी राज्याला आणि देशाला एका वेगळ्या भूमिकेतून घडवले.”
डॉ. केदार म्हणाले,”बाबासाहेब पुरंदरे नेहमीच म्हणत असे की घाबरत असाल तर इतिहासाचा अभ्यास करू नका. इतिहास संशोधकाने सत्य कथन करावे, त्याने मागे कधीच हटू नये आणि कोणाचा अपमान ही करू नये. सातत्याने सत्याचा वेध घेऊन समस्यांच्या मुळापर्यंत पोहोचावे.”
रवींद्र वंजारवाडकर म्हणाले,” डॉ. विश्वनाथ कराड यांना बाबासाहेब यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार म्हणजे एका ध्यासपर्वाने दुसर्‍या ध्यासपर्वाचा केलेला सन्मान असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बाबासाहेबांनी इतिहासात जसे आहे तसेच मांडले, त्यांनी कधिही सत्येची मोडतोड केली नाही.”

त्यानंतर प्रदीप रावत आणि अमृत पुरंदरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
 सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी व राधा पुरंदरे आगाशे यांनी आभार मानले.

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य संवाद आणि संघर्षाचे प्रतीक : डॉ. श्रीपाल सबनीस

फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे भीमराव पाटोळे यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव
पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज यांचे संतत्व, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम, स्वातंत्र्य यांचा जागर करत बहुसंस्कृतीत एकात्मता जागविणारे साहित्य अण्णा भाऊ साठे यांनी निर्माण केले. त्यांच्या साहित्यकृती संवाद आणि संघर्षाच्या प्रतीक आहेत. बहुसंस्कृतीचे आव्हान पेलण्याची ताकद त्यांच्या साहित्यकृतींमध्ये होती. अण्णा भाऊंचे कर्तृत्व देश-धर्म-पंथाच्या सीमा ओलांडून विश्र्वात्मक मानदंड निर्माण करणारे होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. अण्णा भाऊंना वंदनीय मानून जात-धर्म-पंथाच्या सीमा ओलांडून जगण्याची भूमिका भीमराव पाटोळे यांनी आपल्या साहित्यकृतीतून मांडली आहे, अशा शब्दांत त्यांचा गौरवही केला.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे ज्येष्ठ साहित्यिक भीमराव पाटोळे यांच आज (दि. ३०) समाजरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते. कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल गायकवाड, माजी नगसेविका लता राजगुरू, विशाला पाटोळे मंचावर होते. शाल, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. दीप्ती पाटोळे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, बहुधार्मिक समाजाचे एकात्म चित्रण, स्वातंत्र्याचा जागर अण्णा भाऊंच्या शाहिरीत प्रकर्षाने दिसतो. भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीचा मिलाफ करत विचारधारेचे वेगळेपण जपत अण्णा भाऊ साठे यांनी एकात्म मानवता समाजापुढे मांडली. ते संवादी लेखक होते.
सत्काराला उत्तर देताना भीमराव पाटोळे म्हणाले, दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी निर्माण केलेल्या साहित्यकृती या चमत्कार आहेत. त्यांना भारतरत्न हा किताब मिळावा यासाठी मी प्रयत्नशील आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. प्रमोद आडकर यांनी तर सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भीमराव पाटोळे लिखित ‘ना खेद ना खंत’ या पुस्तकावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात बाळासाहेब शिवरकर, ॲड. दीपक मानकर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले, अजय पाटोळे यांचा सहभाग होता.

“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

राज्य महिला आयोगामार्फत संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा कृतीशाळेचे आयोजन

मुंबई, दि. ३० जुलै २०२५ : “मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा, ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, मानवी तस्करीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक यंत्रणा, पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि जनतेने एकत्र येऊन जनजागृती करत, लोकचळवळ तयार करावी, असेही त्या म्हणाल्या.

राज्य महिला आयोगामार्फत ‘संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा’ या कृतीशाळेचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले होते. जागतिक मानवी तस्करीविरोधी दिनानिमित्त हा उपक्रम पार पडला. या वेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्यासह पशुसंवर्धन व पर्यावरण बदल मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, गृह निर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सर्व श्री व श्रीमती आमदार प्रज्ञा सातव, श्रीजया चव्हाण, मनिषा कायंदे, हारून खान, सना मलिक, मोनिका राजाळे आणि आयोगाच्या सदस्य सचिव नंदीनी आवाडे यांच्यासह विविध सामाजिक संस्था, ॲन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग यंत्रणांचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी विदर्भातील व्यवसायिक लैंगिक शोषण अन्वेषण अहवाल व ‘समस्या, मदत, कायदे काय सांगतात’ या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. देशभरातील तज्ज्ञांनी परिसंवादात सहभाग घेतला.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महिलांनी आत्मसंरक्षणासाठी सजग व सक्षम होणे अत्यंत गरजेचे आहे. शासन या लढ्यात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. तस्करीविरोधातील लढ्यात तंत्रज्ञानाचा वापर करून ‘दोषसिद्धी’ वाढवणे शक्य आहे. प्रत्येक जिल्ह्याने शाश्वत विकास उद्दिष्टे यानुसार ३ टक्के निधी यासाठी वापरण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.” तसेच त्यांनी मानवी तस्करी झालेल्या मुलींनी यातून बाहेर पडल्यानंतर स्वत:ला कसे घडवले, पुढे नेले याची उदाहरणे दिली.

प्रथम परिसंवादात ‘तंत्रज्ञानाधिष्ठित उपाययोजना आणि मॉडेल्स’ यावर चर्चा झाली. यात श्री. ज्ञानेश्वर मुळे (माजी सदस्य, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग), स्टँक टेक्नोलॉजीचे संस्थापक श्री. अतुल राय, प्रेरणा संस्थेच्या रश्मी टेलर आणि सायबर पीस फाउंडेशनचे इरफान सिद्धावतम यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन प्रयास संस्थेच्या शॅरॉन मेनेझेस यांनी केले.

दुसऱ्या सत्रात ‘प्रवासा दरम्यान आणि ऑनलाइन माध्यमातून होणारी तस्करी’ या विषयावर चर्चा झाली. रेल्वे स्थानकं, महामार्ग, बस डेपो, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, एक्स यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर तस्करी ओळखण्याचे आणि रोखण्याचे उपाय यामध्ये मांडण्यात आले. परिवहन क्षेत्र, कायदेशीर तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था, पोलीस अधिकारी यांनी समन्वय व सुधारणा यावर आपले विचार मांडले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांचे हे स्पष्ट मत होते की, मानवी तस्करीविरोधातील लढा केवळ कायद्याने नव्हे, तर संवेदनशीलतेने आणि सामूहिक कृतीने लढायचा आहे.

इस्रोने सर्वात महागडा व शक्तिशाली उपग्रह NISAR लाँच केला

श्रीहरिकोटा-सर्वात महागडा आणि सर्वात शक्तिशाली पृथ्वी निरीक्षण उपग्रह NISAR आज, म्हणजे बुधवार, ३० जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आला. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सायंकाळी ५:४० वाजता GSLV-F16 रॉकेटद्वारे त्याचे प्रक्षेपण करण्यात आले.

हे रॉकेट NISAR ला ७४३ किमी उंचीवर, ९८.४ अंश कललेल्या सूर्य-समकालिक कक्षेत स्थापित करेल. यासाठी सुमारे १८ मिनिटे लागतील. हा उपग्रह NASA आणि ISRO ने संयुक्तपणे तयार केला आहे.

निसार ७४७ किमी उंचीवर असलेल्या ध्रुवीय कक्षेत फिरेल. ध्रुवीय कक्षा म्हणजे अशी कक्षा ज्यामध्ये उपग्रह पृथ्वीच्या ध्रुवांवरून जातो. या मोहिमेचा कालावधी ५ वर्षांचा आहे.NISAR हा एक उच्च तंत्रज्ञानाचा उपग्रह आहे. त्याचे पूर्ण नाव NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार आहे. हे अमेरिकन अंतराळ संस्था NASA आणि भारतीय संस्था ISRO यांनी संयुक्तपणे तयार केले आहे. या मोहिमेवर १.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १२,५०० कोटी रुपये खर्च झाले आहेत.

हा उपग्रह ९७ मिनिटांत पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल. १२ दिवसांत १,१७३ प्रदक्षिणा पूर्ण करून, तो पृथ्वीच्या जमिनीच्या जवळजवळ प्रत्येक इंचाचा नकाशा तयार करेल.
यामुळे त्याला ढग, घनदाट जंगले, धूर आणि अंधारातही पाहण्याची क्षमता मिळते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अगदी लहान बदल देखील तो पाहू शकतो.
NISAR मोहिमेचा मुख्य उद्देश पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाला जवळून समजून घेणे आहे. हा उपग्रह विशेषतः तीन गोष्टींवर लक्ष ठेवेल:

जमीन आणि बर्फातील बदल: यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा हिमनद्यांमध्ये किती बदल होत आहेत ते पाहिले जाईल. जसे की जमीन खाली जाणे किंवा बर्फ वितळणे.
भूपरिसंस्था: पर्यावरणाची स्थिती समजून घेण्यासाठी जंगले, शेतजमीन आणि इतर नैसर्गिक क्षेत्रांच्या स्थितीचे निरीक्षण करा.
सागरी क्षेत्र: समुद्राच्या लाटा, त्यांचे बदल आणि सागरी पर्यावरणाचा मागोवा घेईल.
या माहितीमुळे, शास्त्रज्ञ हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील. मिशनचा ओपन-सोर्स डेटा सर्वांना मोफत उपलब्ध असेल.

अनधिकृत बांधकामांमुळे मोठे गैरव्यवहार:महापालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणी माजी आयुक्तांच्या घरी ईडीचे छापे

मुंबई,-मुंबई, नाशिक आणि वसई-विरार शहरांमध्ये मंगळवारी सकाळी सक्त वसुली संचालनालयाने (ED) एकाचवेळी मोठी कारवाई केली. अवैध बांधकामाशी संबंधित प्रकरणात एकूण 12 ठिकाणी छापे मारी करण्यात आली असून, यामध्ये वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या वसई तील निवासस्थानी ही धाड टाकण्यात आली आहे.

वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानी सुरू असलेली अंमलबजावणी संचालनालयची (ईडी) चौकशी तब्बल 18 तासांनंतर पूर्ण झाली आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता सुरू झालेली कारवाई रात्री दीड वाजेपर्यंत सुरू होती. या दरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी कोणालाही ताब्यात घेतले नसले तरी, निवासस्थानातून अनेक महत्वाची कागदपत्रे, हार्ड डिस्कमधील मोठ्या प्रमाणातील डिजिटल डाटा हस्तगत केला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.वसईच्या दीनदयाल येथील पालिकेच्या शासकीय निवासस्थानी मंगळवारी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. मात्र माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दरवाजा उघडण्यास विलंब केल्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना तब्बल 1तास 15 मिनिटे बाहेर वाट बघावी लागली, त्यानंतर त्यांनी नाईलाजास्तव टाळे खोलण्यासाठी दुसरी चावी बनवणाऱ्या कारागिराला बोलवावे लागले त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी शासकीय गृहात प्रवेश केला.कारवाई सुरू असताना माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या पत्नीला देखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानातून दुपारी दोनच्या सुमारास गाडीतून बाहेर नेले होते. त्यानंतर त्यांना रात्री 9च्या सुमारास शासकीय निवासस्थानी परत आणण्यात आले होते. त्यानंतर या कारवाईचा वेग वाढला होता. दोन प्रिंटर देखील कारवाईदरम्यान आणण्यात आले होते. तर संगणक तपशील जाम करण्यासाठी तीन हार्डडिस्क (संगणक संचयन यंत्र) ताब्यात घेण्यात आले होते.वसई विरार शहर महानगर पालिकेच्या माजी आयुक्तांची मंगळवारी सकाळी सुरू झालेली चौकशी अखेर बुधवारी दुसऱ्या दिवशी रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी पूर्ण झाली त्यानंतर रात्री दोन वाजता ईडीचे अधिकारी निवासस्थानातून बाहेर पडले होते. या कारवाईमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.

विशेष बाब म्हणजे, अनिल कुमार पवार यांनी सोमवारीच आयुक्तपदाचा पदभार सोडून तो मनोज कुमार सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांतच ईडीने ही धडक कारवाई केली. अनिल कुमार पवार यांचा सोमवारी पालिकेत निरोप समारंभ पार पडला होता आणि दुसऱ्याच मंगळवारी त्यांच्यावर ही कारवाई झाली. अनिल कुमार पवार यांची ठाण्यात एसआरए विभागात बदली झाली आहे.

ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसई-विरार परिसरातील डंपिंग ग्राउंड साठी आरक्षित असलेल्या 60 एकर जमिनीवर बेकायदेशीररीत्या 41 इमारती उभारण्यात आल्या. या प्रकरणाशी संबंधित मनी लाँडरिंगच्या संशयावरून ही छापे मारी करण्यात येत आहे.या आधीही ईडीने याच प्रकरणात 13 ठिकाणी छापे टाकून सुमारे 9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्या वेळी काही बिल्डर, आर्किटेक्ट आणि तत्कालीन अधिकारी वाय.एस. रेड्डी यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती.

सध्या ईडीचे पथक अनिल कुमार पवार यांच्या दीनदयाल नगर येथील घरात कागदपत्रांची सखोल तपासणी करत आहे. वसई, विरार आणि नालासोपारा पूर्व भागातील बेकायदेशीर इमारतींवरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा संशय ईडीला आहे.ईडीच्या या कारवाईमुळे वसई-विरार महापालिकेत आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

फडणवीस, दादांची शिस्त नावालाच उरली..

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिस्त सध्या नावालाच उरल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. हे दोन्ही नेते सध्या नाराजी, तीव्र नाराजी व अतितीव्र नाराजीच व्यक्त करताना दिसतात, असे ते म्हणालेत.
महायुती सरकार गत काही महिन्यांपासून आपल्या नेत्यांच्या व मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने वादात अडकत आहे. सुरूवातीला मंत्री नीतेश राणे यांनी वादग्रस्त विधाने करून सरकारला अडचणीत आणले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे जय गुजरात म्हणून सरकारच्या अडचणी वाढवल्या. त्यानंतर शिंदेंच्याच नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विधानभवनातील कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण करून आपला हात साफ करून घेतला. हे कमी की काय म्हणून त्यानंतर लगेचच मंत्री संजय शिरसाट यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला.
या व्हिडिओत संजय शिरसाट आपल्या बेडरूममध्ये पैशांच्या बॅगेसोबत बसल्याचे दिसून येत आहे. त्यांचा हा व्हिडिओ समोर येताच विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. यामुळे सरकारचा पुरता गोंधळ उडवला. हा वादाचा क्रम इथेच थांबला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याने विधिमंडळाच्या लॉबीतच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल केला. यावरूनही सरकारला सध्या रोज टीकेचे धनी व्हावे लागत आहे. विशेष म्हणजे कोकाटे यांच्या यापूर्वीच्या काही विधानांमुळेही सरकारची चांगलीच गोची झाली होती.

या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी बुधवारी एका ट्विटद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिस्त सध्या नावालाच उरल्याचा दावा केला आहे. राज्याचे कारभारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची शिस्त तशी नावालाच उरली आहे वाटते. घपले करून हॉटेल घ्या, विधिमंडळात रम्मी खेळा, बरळा, मारामारी करा, कोणाच्याही नाकावर बुक्का मारा.. काहीही करा! आता हे दोन शिस्तीचे लोक फक्त नाराजी.. तीव्र नाराजी.. अति तीव्र नाराजी व्यक्त करतानाच दिसतात, असे दानवे यांनी म्हटले आहे. दानवे यांनी हे ट्विट फडणवीस व अजित पवारांनाही टॅग केले आहे.

सैनिकासोबतच त्यांच्या कुटुंबियांचा सन्मानाकरिता विधी सेवा चिकित्सालय केंद्र ठोस पाऊल-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे: सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मानासोबतच अचूक, वेळेवर आणि विनामूल्य कायदेशीर साहाय्य मिळणे आवश्यक असून विधी सेवा चिकित्सालय केंद्र त्याच दिशेने एक ठोस पाऊल आहे. प्रशासन, न्यायसंस्था आणि सामाजिक बांधिलकीचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नाल्सा वीर परिवार सहायता योजना २०२५’ आणि विधी सहाय्य केंद्राचे सैनिक कल्याण विभाग, घोरपडी, पुणे येथे सोमवारी (दि. 28) उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन, सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल (निवृत्त) दीपक थोंगे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील आदी उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले, सुमारे ५० टक्के नागरिकांना कायदे साहाय्य योजना आणि सरकारी योजनांची माहिती नसते. विशेषतः सैनिक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा यामध्ये समावेश आहे. हे विधी साहाय्य केंद्र म्हणजे त्यांच्यासाठी ऐतिहासिक सुवर्णसंधी आहे. आपले सैनिक कोणतीही परिस्थितीत माघार घेत नाही, ते सदैव देशाच्या रक्षणाकरिता उभे असतात, त्यांच्या राष्ट्रभक्तीचे ऋण फेडण्यासोबच त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे संरक्षण करणे हेच खऱ्या न्यायाचे स्वरूप आहे, असेही श्री. महाजन म्हणाले.

सोनल पाटील म्हणाल्या, आपल्या शूर जवानांनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यांच्या परिवारांना न्याय व सन्मान देणे ही आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे. एक सैनिक रणभूमीवर लढतो, पण त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाची लढाई न्यायासाठी सुरू होते, त्या लढाईत त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, असेही श्रीमती पाटील म्हणाले.

या केंद्राच्या माध्यमातून माजी सैनिक, वीरपत्नी, शहीद जवानांचे कुटुंबीय व लष्करातील कर्मचाऱ्यांना फौजदारी, दिवाणी, सेवा व पगार, निवृत्तीवेतन आदीसंबंधी कायदेशीर सल्ला, अपघात व विमा भरपाई प्रकरणांवरील मदत, जमीन व संपत्ती विवादांवर मार्गदर्शन, सरकारी योजनांविषयी माहिती व अर्ज प्रक्रियेत साहाय्य, मोफत वकील व समुपदेशन सेवा, वैध कागदपत्रांबाबत सल्ला, तक्रार नोंदणी व न्यायालयीन कार्यवाहीसाठी साहाय्य आदी सेवा पूर्णतः मोफत उपलब्ध असून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यातील वनपर्यटनात मोठ्या क्षमता; पर्यावरणपूरक पद्धतीने पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यात- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे: पुणे जिल्ह्यात वनक्षेत्रात अतुलनीय अशी पर्यटनस्थळे असून त्यांचा सर्वांगीण विकास केल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल. त्यादृष्टीने पुणे वनविभागांतर्गत राजगड तसेच अन्य किल्ले, जुन्नर वनविभागांतर्गत विविध घाट, धबधबे, डोंगर आदींच्या ठिकाणी पर्यटकांसाठी विविध सुविधा पर्यावरणपूरक पद्धतीने विकसित करण्याबाबत आराखडा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वनपर्यटन विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) जयश्री पवार, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई आदी उपस्थित होते.

राजगड पायथा येथे वनविभागाच्या कार्यक्षेत्रात विविध सुविधा निर्माण करण्यात याव्यात. त्या निर्माण करताना वनविभागाचे नियम, मानके लक्षात घ्याव्यात. स्थानिक दगड, माती, लाकूड आदींचा वापर करुन पर्यावरणपूरक विकास करावयाचा आहे. सीमेंट काँक्रेट किंवा अन्य बाबींचा वापर करण्यात येणार नाही. पर्यटक अधिकाधिक भेटी देतात अशी ठिकाणे निश्चित करुन त्या ठिकाणी दगडी बाकडे, शौचालये, आवश्यक त्या ठिकाणी दगडी पायऱ्यांचा वापर करुन लहान रस्ते, लाकडी बॅरिकेटिंग, रेलिंग आदी करावे. संबंधित ठिकाणांची महत्त्वाची माहिती पर्यटकांना मिळावी यासाठी सायनेजेस तयार करावेत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रात करावयाच्या कामांसाठी संबंधित विभागाची ना-हरकत घ्यावी. राजगड किल्ला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाल्यामुळे येथे विविध सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकेल, असेही ते म्हणाले.

या विविध ठिकाणी निर्माण करावयाच्या सुविधांच्या अनुषंगाने सल्लागार संस्थेच्यावतीने यावेळी सादरीकरण करण्यात आले.

उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी नानेघाट, दाऱ्याघाट, आंबोली, कांचन, काळू, धूरनळी धबधबे, दुर्गवाडी कोकणकडा, भिवेगाव खेड कुंड, कुंडेश्वर निसर्ग पर्यटन, शिंगेश्वर मंदीर टेकडी, भामचंद्र डोंगर, तुकाईमाता मंदीर, अरण्येश्वर मंदीर, शिरूर ऑक्सिजन पार्क या ठिकाणी करावयाच्या पर्यटक सुविधांच्या अनुषंगाने आराखडा सादर केला.

यावेळी इको टूरिझम क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. या सूचनांचा समावेश पर्यटन स्थळांचा विकास करताना केला जाईल, असे जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले.