Home Blog Page 377

एसबीआय जनरल इन्शुरन्सने आपल्या मोबाईल अॅपवर खास हेल्थ स्कॅनिंग सुविधा केली सुरू

नवीन बायोमेट्रिक सुविधा चेहरा आणि बोटांच्या स्कॅनवर आधारित आरोग्य तपासणी उपलब्ध करून देते, ज्यामुळे सक्रिय आरोग्यजाणीव आणि डिजिटल सबलीकरणाला चालना मिळते.

मुंबई, 17 सप्टेंबर 2025 – भारतातील अग्रगण्य जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय जनरल इन्शुरन्सने आपल्या मोबाईल अॅपवर नवे, नाविन्यपूर्ण व अनोखे हेल्थ ट्रॅकिंग फीचर सुरू केले आहे. आरोग्य आणि वेलनेसच्या प्रोत्साहनात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या नवीन सुविधेमध्ये प्रगत बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर करून वापरकर्त्यांना चेहरा किंवा बोटांचा स्कॅन करून सहजतेने महत्त्वाचे आरोग्य निर्देशक मिळवता येतात. ही योजना संपर्करहित, सुलभ आणि तंत्रज्ञान-आधारित पद्धतीद्वारे प्रोअॅक्टिव्ह वेलनेस साध्य करण्यासाठी राबविण्यात आली असून, वापरकर्त्यांना त्यांच्या आरोग्य व कल्याणाचे रिअल-टाइम व्यवस्थापन करण्यास मदत करते.

केअरप्लिक्सच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले हे हेल्थ ट्रॅकिंग फीचर वापरकर्त्यांना हृदयगती, श्वसनगती, रक्तदाब, बीएमआय, शारीरिक वजन, ताणाची पातळी, शरीरातील चरबी, शरीरातील पाण्याचे प्रमाण अशा अनेक महत्त्वपूर्ण आरोग्य निर्देशकांची माहिती उपलब्ध करून देते. फक्त चेहरा किंवा बोट स्कॅन केल्यावर वापरकर्त्यांना त्यांच्या आरोग्याविषयी संपूर्ण आढावा मिळतो, ज्यामुळे ते आपले वेलनेसविषयक निर्णय अधिक माहितीपूर्ण आणि सक्षमपणे घेऊ शकतात.

केअरप्लिक्सच्या नाविन्यपूर्ण रिमोट फोटोप्लेथिस्मोग्राफी (rPPG) तंत्रज्ञानाचा वापर करून हे फीचर फक्त मोबाईल डिव्हाइसच्या कॅमेऱ्यामधून घेतलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा फिंगरप्रिंट स्कॅनिंगद्वारे आरोग्यविषयक माहिती काढते. यामुळे वापरकर्ते कुठेही, केव्हाही, शारीरिक सेन्सर्स किंवा सुईंची गरज न पडता आपले आरोग्य तपासू शकतात.

लाँचिंगबाबत बोलताना श्रीमोहम्मद आरिफ खानउपमुख्य कार्यकारी अधिकारीएसबीआय जनरल इन्शुरन्स यांनी सांगितलेहे नाविन्यपूर्ण हेल्थ स्कॅनिंग फीचर पारंपरिक विम्याच्या चौकटीपलीकडे जाऊन सहज उपलब्ध होणारी आरोग्यदृष्टी देण्याकडे एक मोठे पाऊल आहेहे आमच्या डिजिटलदृष्ट्या सक्षम आणि आरोग्यजागरूक समाज निर्माण करण्याच्या दृष्टीकोनाचे प्रतिबिंब आहेजेथे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कल्याणाचे सक्रिय व्यवस्थापन करू शकेलप्रोअॅक्टिव्ह वेलनेस आणि सुलभता यांचा संगम साधून हे फीचर आम्हाला हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रात आघाडीवर नेतेजिथे नवकल्पना आणि सोयीसुविधा दैनंदिन जीवनाशी अखंडपणे जोडल्या जातातकंपनी आपल्या ग्राहकांना प्रगत आणि वापरण्यास सुलभ उपाययोजना पुरवण्यासाठी तंत्रज्ञानातील आपली क्षमता सातत्याने वाढवत राहील.”

नवीन बायोमेट्रिक हेल्थ फीचर हे विद्यमान तसेच नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या अॅपद्वारे संलग्न सेवा प्रदात्यांकडून केल्या जाणाऱ्या नियमित लॅब टेस्टवर ग्राहकांना 5% सवलतही मिळते, ज्यामुळे त्यांना अधिक मूल्यवर्धनाचा लाभ होतो. वापरण्यास सुलभता आणि आरोग्य निर्देशकांना मिळणारी तत्काळ उपलब्धता हे एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या डिजिटल पद्धतीने जोडलेला ग्राहकवर्ग तयार करण्याच्या बांधिलकीचे द्योतक आहे. तसेच, ग्राहकांना निरोगी राहण्यासाठी उपयुक्त साधने उपलब्ध करून देण्याचा हेतूही यात दिसून येतो.

या लाँचिंगमुळे एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या डिजिटल प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून, ग्राहक-केंद्रित नवकल्पना आणि पारंपरिक विम्याच्या पलीकडे जाऊन मूल्यवर्धित सेवा पुरवण्याच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी मिळाली आहे. यामधून अधिक निरोगी आणि सुरक्षित समाज निर्माण करण्याच्या ध्येयाला चालना मिळणार आहे.

डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते शनिवारी’लाईमलाईट प्रादेशिक’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे: प्रादेशिक सिनेमांची अनोखी सफर घडवणाऱ्या ‘लाईमलाईट प्रादेशिक’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते येत्या शनिवारी (ता. २७) सायंकाळी ५ वाजता लजपतराय भवन संकुल, विद्यार्थी सहायक समिती, सेनापती बापट रस्ता पुणे येथे होणार आहे. रुद्र पब्लिशिंग हाऊस प्रकाशित अच्युत गोडबोले व सतीश कुलकर्णी लिखित या पुस्तकामध्ये प्रादेशिक भाषांची जादू, अविस्मरणीय चित्रपटांची गाथा उलगडण्यात आली आहे. रुद्र पब्लिशिंग हाऊस आणि पुस्तकविश्व या संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे संयोजक नवनाथ जगताप यांनी कळवले आहे.

या पुस्तकाला प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, सोनाली कुलकर्णी यांनी या पुस्तकाविषयी भरभरून अभिप्राय दिला आहे. मराठीसह बंगाली, कन्नड, तेलगू, गुजराती, मैथिली अशा प्रादेशिक भाषांमधील सिनेमांचा रसास्वाद अतिशय रंजकपणे मांडला आहे. चित्रपटांची आवड असलेल्या रसिक-प्रेक्षकांना उत्तम, रंजक प्रादेशिक चित्रपटांची कथानके आणि दिग्दर्शनातील कंगोरे, अभिनयाची वैशिष्ट्ये याची ‘क्लासिक मुशाफिरी’ घडवणारे हे पुस्तक आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना;सेवा पर्वात महावितरणतर्फे विशेष अभियान

0

मुंबई दि.१७ सप्टेंबर २०२५:-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीतील सेवा पर्वात महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणतर्फे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. वीज ग्राहकांनी योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवा पर्वातील उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वीज ग्राहकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या या योजनेला प्राधान्य देण्यास त्यांनी सांगितले आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू केली आहे. सर्वसामान्य घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी ही योजना आहे. या योजनेमध्ये छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी वीज ग्राहकांना केंद्र सरकारकडून थेट अनुदान मिळते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला तीस हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला साठ हजार रुपये आणि तीन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. हाउसिंग सोसायट्यांनाही ५०० किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट १८ हजार रुपये अनुदान मिळते.

एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार महिना अंदाजे १२० युनिट वीजनिर्मिती होते. वीज ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीज सौर ऊर्जा प्रकल्पातून तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य होते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळविता येते.

राज्यात महावितरणच्या २,८४,२४५ वीज ग्राहकांना योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांनी बसविलेल्या सौर वीजनिर्मिती प्रकल्पांची एकूण क्षमता १०८७ मेगावॅट झाली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी वीज ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर घरबसल्या ऑनलाईन नोंदणी करावी. वीज ग्राहकांना आपल्या पसंतीचा पुरवठादार निवडता येतो. महावितरणने योजनेचा लाभ घेण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. सेवा पर्वात योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणच्या सर्व कार्यालयांना सूचना देण्यात आल्या असून या योजनेसाठीच्या अर्जांना प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे. महावितरणच्या जवळच्या कार्यालयातही या योजनेबद्दल चौकशी करता येईल.

लोकअदालतीमध्ये महावितरणची १०५७ प्रकरणे निकाली,२ कोटी १८ लाखांची वसुली

पुणे, दि. १७ सप्टेंबर, २०२५- नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये महावितरणची १०५७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणांतून महावितरणची २ कोटी १८ लाखांची वसुली सुद्धा झाली. यामध्ये दाखल पूर्व व प्रलंबित अशा दोन्ही प्रकरणांचा समावेश आहे.

नियममित वसुलीबरोबरच कायमस्वरुपी बंद असलेल्या व थकबाकीमुळे बंद केलेल्या जवळपास ग्राहकांच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरण कायम आग्रही असते. त्यासाठी वेळोवेळी वसुली मोहिमा राबविल्या जातात. त्यातूनही ज्या प्रकरणांत वसुली होत नाही अशी प्रकरणे महावितरणतर्फे लोकअदालतीमध्ये ठेवली जातात. महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे परिमंडलातील गणेशखिंड, रास्तापेठ व पुणे ग्रामीण या तीन मंडलांमध्ये थकबाकीमुळे बंद असलेल्या ५१३१७ वीज ग्राहकांना १३ सप्टेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीपुढे ठेवण्यात आले होते. सर्व प्रकरणातील वादींना तशा नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. तसेच वीजचोरीची ८३ प्रकरणे देखील लोकअदालतीपुढे ठेवण्यात आली.

५१३१७ प्रकरणांपैकी १०५३ प्रकरणांमध्ये २ कोटी १४ लाख ८९ हजार ३०८ रुपयांचा भरणा झाला. यात सर्वाधिक पुणे ग्रामीण मंडलातील १० ग्राहकांकडून १ कोटी ३ लाख ४१ हजारांचा तर त्यापाठोपाठ रास्तापेठ मंडल ९६ लाख ९७ हजार ८१८ व गणेशखिंड मंडलातून १७ लाख ८४ हजार ९३० रुपये वसूल झाले. तर वीजचोरीच्या ८३ पैकी ४ गुन्ह्यांमध्ये तडजोड झाली. त्यातून ४ लाख ८ हजार ४४० रुपयांची रक्कम वसूल झाली. या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी प्रभारी विधी सल्लाकार दिनकर तिडके, कनिष्ठ विधी अधिकारी नितल हासे, अंजली चौगुले व इम्रान शेख यांनी परिश्रम घेतले.

“स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियान अंतर्गत पुणे महापालिकेची आरोग्य शिबिरे सुरु

आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन या, (आभा कार्ड) तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांचे कार्ड काढून न्या .

पुणे- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांचे मार्गदर्शनाखाली “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियान अंतर्गत पुणे महापालिकेतर्फे किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता व महिलांच्या आरोग्य विषयक तज्ञ आरोग्य तपासण्यांसाठी शिबिराचे आयोजन येथे करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पुणे महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटल येथे केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगीमहापालिका आयुक्त नवल किशोर राम,माजी सभागृहनेते गणेश बिडकर ,अतिरिक्त महापालिका आयुक्त एस.जे. प्रदीप चंद्रन,ओमप्रकाश दिवटे,आरोग्य प्रमुख नीना बोराडे ,उपसंचालक, आरोग्य भगवान पवार, सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. मनिषा नाईक,डॉ. वैशाली जाधव ,उपआरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत,कमला नेहरू रुग्णालयाचे डॉ. प्रशांत बोठे, माजी नगरसेवक विशाल धनवडे पल्लवी जावळे तसेच राज्य शासन व पुणे महानगरपालिकेचे इतर अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांचे मार्गदर्शनाखाली “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियान दि. १७/०९/२०२५ ते दि. ०२/१०/२०२५ या कालावधीत सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत राबविण्यात येणार आहे.
या अभियानाअंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालये, युपीएचसी, आयुष्यमान आरोग्य मंदिर, हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे आपला दवाखाना अशा स्तरावर जनजागृती व तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. सदर अभियानात प्रामुख्याने किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता व महिलांच्या आरोग्य विषयक सर्व तपासण्या करून रुग्णांवर आवश्यक पुढील उपचार करण्यात येणार आहेत.या अभियानात सर्व प्रसूतिगृहे पुणे मनपा या ठिकाणी महाआरोग्य शिबीराचे नियोजन करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, दंत चिकित्सक, त्वचारोग तज्ञ,मानसोपचार तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, फिजीशीयन, फिजीओथेरीपिस्ट इत्यादी तज्ञांचा समावेश करून महिलांना आरोग्य विषयक तज्ञ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


तज्ञ डॉक्टर शिबिरामध्ये खालीलप्रमाणे सेवा देण्यात येणार आहेत

त्यामध्ये,महिलांची एनसीडी तपासणीः उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, आणि गर्भाशयाच्या मुखाची कर्करोग तपासणी.असुरक्षित महिलांसाठी क्षयरोग तपासणी.
किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी अशक्तपणाची तपासणी व समुपदेशन सेवा तसेच मासिक पाळी व स्वच्छता आणि पोषण यावर जागरूकता सत्र,
गर्भवती महिलांसाठी प्रसुतीपूर्व काळजी (एएनसी) तपासणी ज्यामध्ये हिमोग्लोबिन पातळीची चाचणी, गर्भधारणेदरम्यान पोषण आणि काळजी यावर समुपदेशन आणि माता आणि बाल संरक्षण (एमसीपी) कार्डचे वितरण.
बालकांना लसीकरण सेवा प्रदान करण्यात येणार आहे.
पोषण समुपदेशन आणि कल्याणसत्र, रक्तदान मोहीम, पीएमजेएवाय अंतर्गत नोदणी/ आयुष्मान वय वंदना कार्ड चे वितरण, निक्षयमित्र स्वयंसेवकांची नोंदणी.

तसेच सर्व युपीएचसी, आयुष्मान आरोग्य मंदिर व हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्यामार्फत प्रत्येक आठवड्याला २ शिबिरे घेण्यात येणार असून सदर आरोग्य संस्थेमध्ये येणाऱ्या नागरिक व रुग्णांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यकता असल्यास त्यांना पुढील उपचारासाठी नजीकच्या प्रसुतीगृहाकडे संदर्भित करण्यात येणार आहे.
सोबत येताना नागरिकांनी आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे जेणेकरून नागरिकांना (आभा कार्ड) तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांचे कार्ड काढून देण्यात येतील.
चतुश्रृंगी देवी मंदिर, तांबडी जोगेश्वरी मंदिर व भवानी माता मंदिर इत्यादी ठिकाणी नवरात्र काळात महिलांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यासाठी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिरा करिता आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका याच्या कडून मनुष्यबळ, औषधे साधन सामग्री याची पूर्व तयारी करण्यात आली आहे,
शिबिराचे काटेकोर नियोजन करण्याबाबत परिमंडळ व क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहे.




रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेचा महानगर आयुक्तांनी घेतला आढावा

पिंपरी (दि.१७) : प्रस्तावित रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेसंबंधी सुरू असलेल्या कार्यवाहीचा पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी प्रशासकीय यंत्रणांकडून आढावा घेतला. टप्पा एक, दोन, तीन आणि चारसंदर्भात सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत आढावा घेऊन तातडीने भूसंपादन प्रक्रिया आणि मोजणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांमार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने प्रस्तावित रिंग रोडसह इतर महत्त्वाचे काही रस्ते रुंदीकरणाच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे. रिंग रोड टप्पा एक, दोन, तीन आणि चार असे असून सद्यस्थितीत टप्पा क्रमांक एक सोलू ते निरगुडीमधील ३ गावांची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. संबंधित शेतकऱ्यांना एफएसआय / टीडीआर देण्याच्या अनुषंगाने तातडीने संबंधित शेतकऱ्यांसोबत बैठका आयोजित करण्याचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले.

हिंजवडी व चाकण भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत माहिती जाणून घेतली. नवले ब्रीज परिसरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी भूसंपादन, जलवाहिनीचे स्थलांतर व सिग्नल यंत्रणा बसविण्याबाबतची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. संबंध‍ित व‍िभागांनी समन्वयातून ऑक्टोबरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे न‍िर्देश द‍िले.

या बैठकीला पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील, जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे, भूमिअभिलेख विभागाच्या अधीक्षक आशा जाधव, अधीक्षक अभियंता शिवप्रसाद बागडी, भूसंपादन समन्वय अधिकारी, पुणे महानगरपालिका, एनएचएआय, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्यासह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीसांच्या चमकोगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. १७ सप्टेंबर २०२५

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊचे बिरुद लावून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जागोजागी पोस्टर लावले आहेत. पण हे पोस्टर लावताना त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे याचे भान ठेवून पोस्टर योग्य जागी तरी लावयला हवीत पण प्रभादेवी रेल्वे स्टेशनच्या गल्लीत लावलेल्या पोस्टरच्या खाली कचरा, घाण, अस्वच्छता दिसत असून लोक त्या पोस्टरवर थुंकत आहेत. स्वतःच्या चमकोगिरीमुळे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अपमान होत आहे,असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले आहे की, देवेंद्र फडणवीस, तुमच्या प्रसिद्धीच्या हव्यासापायी महाराजांचा असा अवमान का केला जात आहे? जिथे लोक थुंकतात, कचरा टाकतात, तिथे पोस्टर लावून महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हे मुद्दाम केले गेले आहे का? असा प्रश्न विचारून रा. स्व. संघ व भाजपच्या नेत्यांनी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यापद्धतीने जाणीवपूर्वक अपमान केला ते पाहता हे मुद्दाम केले गेले असेल अशी शक्यता नाकारता येत नाही.

सपकाळ पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत, त्यांच्या प्रतिमेला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ लावणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्र व शिवप्रेमी जनता हा अपमान कदापी सहन करणार नाही. स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मार्कंडेय यज्ञ संपन्न – संदीप खर्डेकर, विश्वजित देशपांडे यांचे संयोजन.

“क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विविध संस्थांना आरोग्य किट भेट”.

पुणे- नरेंद्र मोदी हे अलौकिक व्यक्तिमत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारत हा जागतिक महासत्ता बनेल, त्यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांनी हाती घेतलेल्या कार्याला यश प्राप्त होवो अश्या शुभेच्छा भाजपा चे वरिष्ठ नेते माधवराव भांडारी व पुणे शहर अध्यक्ष धीरजजी घाटे यांनी दिल्या.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताची आता सगळं जग दखल घेत असून भारत हा महासत्ता बनेपर्यंत पंतप्रधान पदी मोदीजी रहावेत अशी कामना देखील माधवराव भांडारी यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोथरूड च्या मृत्युंजयेश्वर मंदिरात मार्कंडेय यज्ञ व सप्तचिरंजीव पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्या वेळी ते बोलत होते.ह्या कार्यक्रमाचे संयोजन भाजपा चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर,भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वजित देशपांडे व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केले.
यावेळी भाजपा शहर सरचिटणीस पुनीत जोशी, युवा मोर्चा चे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ, नगरसेवक दीपक पोटे, सुशील मेंगडे,जयंत भावे, माधुरीताई सहस्त्रबुद्धे,प्रशांतजी हरसूले, शहर उपाध्यक्ष विठ्ठल बराटे,पुणे जिल्हा नियोजन समिती चे सदस्य डॉ. संदीप बुटाला, सुयश गोडबोले,बापूसाहेब मेंगडे,गिरीश खत्री,प्रभाग 29 च्या अध्यक्ष एड. प्राची बगाटे,राजेंद्र येडे, शंतनू खिलारे, शरद लेले,गौरी करंजकर,कल्पना पुरंदरे,जयश्री तलेसरा, पूनम कारखानीस,अपर्णा लोणारे,छाया सोनावणे, शुभांगी सुदामे, जागृती कणेकर, कल्याणी खर्डेकर, डॉ. मृणाल इनामदार, वृषाली शेकदार,सुलभा जगताप,दिलीप उंबरकर,दीपक पवार,प्रतीक खर्डेकर,सुमित दिकोंडा, सतीश कोंडाळकर, बाळासाहेब धनवे, योगेश करपे,स्वाती मानकर,विवेक विप्रदास,सुनील कटारिया,सुभाष झानपुरे,मंगल शिंदे,रत्ना कटारिया,भाग्यश्री साठे,मंगल जाधव,श्रीपाद सुभेदार,मालुसरे, जगदीश डिंगरे,इ मान्यवर उपस्थित होते.
हा यज्ञ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांना आरोग्यसंपन्नता लाभो यासाठी करण्यात आल्याचे संदीप खर्डेकर व विश्वजित देशपांडे यांनी स्पष्ट केले. पूर्णाहुती च्या वेळी उपस्थित असलेल्या सर्वांच्या कुटुंबियांना देखील ह्या यज्ञाचा लाभ होईलच पण सकल समाजाला यातून आरोग्यसंपन्नता लाभावी अशी प्रार्थना असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
यावेळी माधवराव भांडारी, मंजुश्री खर्डेकर,सुशील मेंगडे, दीपक पोटे, जयंत भावे, माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने विविध संस्थांना आरोग्य किट चे वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने देवदेवेश्वर संस्थान चे रमेशजी भागवत, जगन्नाथजी लडकत, अखिल भारतीय ब्राह्मण संघाचे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, विजय शेकदार, परशुराम हिंदू सेवा संघाचे हृषीकेश सुमंत,स्वामी आंगण वृद्धाश्रमाच्या आनंदी जोशी,कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे गिरीश शेवडे ,महाराष्ट्र ब्राह्मण महासभा मयुरेश अरगडे, चैतन्य जोशी,तुषार निंबर्गी, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्राचे मकरंद माणकिकर, आम्ही सारे ब्राह्मण चे भालचंद्र कुलकर्णी,श्री राजस्थानी छ:न्याती विप्र मंडळ चे मनोज पंचारिया,यांना आरोग्य किट ज्यात उच्च रक्तदाब तपासणी यंत्र , शुगर तपासणी यंत्र,प्रथमोपचार पेटी भेट देण्यात आली.
अभिनव पद्धतीने नरेंद्रभाई मोदी यांना शुभेच्छा दिल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. ह्या यज्ञाचे पौरोहित्य ऋषिकेश रत्नाकर सुमंत, चैतन्य दिगंबर जोशी, योगेश काजरेकर, महेश नऱ्हेकर, प्रशांत कुलकर्णी यांनी केले. मंत्रोच्चाराने अत्यंत प्रसन्न वातावरणात हा यज्ञ पार पडला.

चाकण भागातील सव्वादोनशे अतिक्रमणावर हातोडा

पीएमआरडीएसह शासकीय यंत्रणांची विविध मार्गावर संयुक्तपणे कारवाई

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत सव्वा दोनशेपेक्षा अधिक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित कारवाई अजून काही दिवस सुरू राहणार असल्याने या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरी समस्या सोडवण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

चाकण एमआयडीसीसह परिसरातील अनाधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे काढण्यासाठी १० सप्टेंबरपासून संयुक्तरित्या मोहीम राबविण्यात येत आहे. यात पुणे नाशिक महामार्ग- चाकण चौक ते एकतानगर, पुणे महामार्ग- एकतानगर ते चाकण चौक, तळेगाव चाकण शिक्रापूर- चाकण चौक ते तळेगाव, तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता व चाकण चौक ते शिक्रापूर या भागातील एकूण २३१ अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी चाकण भागातील अनाधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणावर कारवाईच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय यंत्रणांना निर्देश दिले होते.

या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावी, अशा नोटीसा संबंधितांना देण्यात आल्या होत्या. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबवण्यात येत आहे. संबंधित अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणावर निर्मूलनाची कारवाई पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, चाकण नगरपरिषद, एमएसआयडीसी या प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

चाकण भागात केलेल्या कारवाईची आकडेवारी
१) १० सप्टेंबर – पुणे नाशिक महामार्ग- चाकण चौक ते एकतानगरमधील (३.१ कि.मी) एकाबाजूची ४० अनाधिकृत बांधकामे हटवली
२) ११ सप्टेंबर – पुणे महामार्ग- एकतानगर ते चाकण चौक भागातील (३.१ किमी) दुसऱ्या बाजूची ११० अनाधिकृत बांधकामावर कारवाई
३) १२ सप्टेंबर – तळेगाव चाकण शिक्रापूर- चाकण चौक ते तळेगाव भागातील दोन्ही बाजूची (१.५ किमी) ४२ अनाधिकृत बांधकामे काढली
४) १५ सप्टेंबर – तळेगाव चाकण शिक्रापूर सहयोग- चाकण चौक ते शिक्रापूरमध्ये दोन्ही बाजूची (१.३ किमी) रस्ता मोकळा करून ३९ अनाधिकृत बांधकामे हटवली.

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला:ठाकरेंची शिवसेना आक्रमक, दादरमध्ये तणाव; पोलिस बंदोबस्त तैनात

मुंबई-शिवाजी पार्क परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अज्ञात व्यक्तीने मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांनी पुतळ्याची साफसफाई केली आहे. पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. सध्या परिसरात खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वातावरण दूषित करण्यासाठी कोणीतरी हे कृत्य केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. या घटनेमागे एखादा समाजकंटक आहे की माथेफिरू आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

स्थानिक आमदार महेश सावंत यांनी सांगितले की, आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले. त्याच वेळी पोलिसही दाखल झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार सकाळी 6.10 वाजेपर्यंत सर्व काही व्यवस्थित असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. याचा अर्थ ही घटना सकाळी 6.10 वाजल्यानंतर झाली असावी अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी दुपारपर्यंत आरोपीची माहिती समोर येणार असल्याचे सांगण्यात आले.

कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केला आहे. या समाजकंटकी किंवा भेकडांवर कुठले संस्कार नक्कीच झालेले नसतील. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पण राज्यातील पोलिस यंत्रणा आणि सरकार काय करतंय? असा संतप्त सवाल अनिल देसाई यांनी उपस्थित केला आहे. निषेध करण्याच्या पलिकडची ही गोष्ट आहे. सरकारचे अपयश प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतंय. उद्धव ठाकरेंना या प्रकाराची कल्पना दिलेली आहे. आम्ही आमच्या पातळीवर जे करायचे आहे, ते करतोय, असे अनिल देसाई म्हणाले.

अशा समाजकंटकांना आजच्या प्रकाराचे प्रत्युत्तर मिळेल, असा इशाराही अनिल देसाई यांनी दिला. शिवसैनिकांनी पुतळा परिसर स्वच्छ केला आहे. शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी असा प्रकार घडतोय, यावरून सध्या मुंबई सुरक्षित नाहीये, असे दिसतंय. सरकार भलत्यासलत्या कार्यक्रमांमध्ये मश्गुल आहे. आजची घटना म्हणजे सरकारचे अपयश असून, ते महाराष्ट्रापुढे आले आहे, अशी टीकाही अनिल देसाई यांनी सरकारवर केली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिकांमध्ये एक आदराचे स्थान होते. शिवसैनिक त्यांना ‘माँसाहेब’ असे संबोधत असत आणि त्यांचा प्रचंड आदर करत. 1995 साली मीनाताई ठाकरे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर, शिवसैनिकांनी त्यांच्या स्मृती कायम जपण्यासाठी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांचा अर्धपुतळा उभारला. तेव्हापासून आजपर्यंत हा पुतळा त्याच ठिकाणी उभा आहे,.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या:सुप्रिया सुळे

0

पुणे- गेल्या 4 महिन्यांपासून (15 मे ते 15 सप्टेंबर) सतत पाऊस पडत आहे. राज्यात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे मी महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी जो शब्द दिला होता की आमचे सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी देऊ हे शब्द पाळावा आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड अस्वस्थता आहे. सरकारने जो जी आर काढला आहे त्यातून नक्की कुणाला आरक्षण मिळाले आहे हे कुणालाच समजत नाहीये. सरकारकडून कन्फ्युजिंग सिग्नल हे सरकार देत आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे. तर ओला दुष्काळ, राज्याची आर्थिक परिस्थिती असे अनेक विषय राज्यात असल्याची आठवण त्यांनी सत्ताधाऱ्यांना करुण दिली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगले प्रेझेंटेशन करावं आणि राज्याला आज आरक्षणाची परिस्थिती काय आहे? सरकारने जो नवीन जी आर काढला आहे त्यांचा किती लोकांना फायदा होणार आहे, झाला आहे, त्यांची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे राज्यातील जनतेला समजून सांगावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे आपण त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंवर आरोप करणाऱ्या सोबत असलेली मंत्रिमंडळातील अर्धी टीम तर तीच आहे. उद्धव ठाकरेंवर आरोप करणं हे दुर्दैवी आहे. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा चौकशी लावा ना? उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात खूप चांगले काम केले आहे, असे भारत सरकारने म्हटले आहे. ते सरकार भाजप चेच आहे ना? मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर अशी टीका करणे अत्यंत दुर्दैवी आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महिनाभरापूर्वी मी गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी गेले होते, यावेळी मी त्यांना विनंती केली होती की महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अमित शहा यांच्याकडे दोन खात्यांचा कारभार आहे, एक सहकार आणि दुसरे गृह खाते. अतिवृष्टीच्या काळात एनडीआरएफची टीम मदतीसाठी येते ती गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असते. तर सरसकट कर्जमाफीची जी आमची मागणी आहे ती सहकार विभागाच्या मार्फत अर्थ मंत्रालयाकडे जात असते अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळेंच्या समोरच आयुक्तांचे धरिले थेट चरण

डीपी रस्त्याची कामे लवकर करावी म्हणून पुणे महापालिका आयुक्तांना धायरी ग्रामस्थांचा दंडवत ,म्हणाले साहेब येथे राष्ट्रपतींनी पत्र देऊनही पावसकरांनी कामे केली नाहीत .

पुणे: खासदार सुप्रियाताई सुळे धनंजय बेनकर सनी रायकर निलेश दमिष्टे काका चव्हाण प्रभावती ताई भूमकर यशवंत लायगुडे निलेश गिरमे असे अनेक मान्यवर उपस्थित असतानाही त्यांच्या समोरच ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामासाठी थेट महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे चरण धरत साहेब रस्ता करा हो … अशी विनवणी केली आणि पथ विभागाच्या प्रमुखांनी चालविलेले दुर्लक्ष याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले.
धायरी गावातील रखडलेल्या डीपी रस्त्याच्या कामाला पुणे महानगरपालिका आयुक्त यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासोबत भेट दिली प्रचंड लोकसंख्येच्या धायरी येथील चारही डीपी रस्त्यांच्या कामसाठी पालिकेने लाखो रुपये भरूनही हे काम अनेक महिन्यांपासून कागदावरच आहे.महानगरपालिकेच्या पथ विभागाच्या गलथान कारभाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार संतप्त नागरिकांनी केला आहे.या बाबत पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी महानगरपालिकेच्या पथ विभागाच्या हलगर्जीपणाकडे लक्ष आयुक्तांकडे वेधले आहे.
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,राष्ट्रपती द्रोपदा मुर्गुम यांनी धायरी येथील रखडलेल्या डीपी रस्त्यांचा प्रश्नावर कार्यवाही करण्याचे पत्र राज्य शासनाला गेल्या वर्षी दिले आहे तरीही शासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही सुरू केली नाही.

डीपी रस्त्यांच्या मोजणीसाठी पालिकेने गेल्या वर्षी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी भुमि अभिलेख विभागाला रितसर पैसे भरले आहेत मात्र भ्रष्ट कामांत अडकलेल्या भुमि अभिलेख विभागाने प्रत्यक्षात रस्त्यांची मोजणीच केली पण पूर्ण केली नाही मोजणी करायला टाळटाळ चालू आहे . उडवा उडवीची उत्तरे दिले जातात त्यामुळे रस्त्यांची कामे रखडली आहेत.

धायरी येथील सावित्री गार्डन ते लोकमत प्रेस, काका चव्हाण बंगला ते श्री कंट्रोल चौक, बेनकर वस्ती व हायब्लिज सोसायटी ते लक्ष्मी लाॅज या चार डीपी रस्त्यांची कामे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.
दुसरीकडे प्रचंड लोकसंख्येच्या धायरी येथे पर्यायी रस्ते नसल्याने वाहतूक कोंडी, अपघात अशा समस्या गंभीर बनल्या आहेत.
विद्यार्थ्यांसह कामगार नागरिकांना दररोज मृत्यूशी झुंज देत प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
तरीही महानगरपालिकेने या कडे दुर्लक्ष केले आहे.

भुमि अभिलेख विभागाला रस्त्यांच्या मोजणीसाठी पालिकेने रितसर पैसे भरले आहेत मात्र भुमि अभिलेख विभाग मोजणी चे काम पुर्ण करत नाही. मोजणीसाठी कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे मात्र ते मोजणी पुर्ण करत नाही.
भ्रष्टाचारात गुंतलेल्या भुमि अभिलेख विभागाने रस्त्यांची मोजणी केली. पण नकाशा पालिकेकडे जमा करत नाही. त्यामुळे रस्त्यांची कामे रखडली आहेत त्यामुळे नागरिकांत तीव्र संतापाची लाट पसरली आहे ‌
येत्या दहा दिवसांत सर्व चारही डीपी रस्त्यांची मोजणी पुर्ण न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे धनंजय बेनकर यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठे होतो तो भूमि अभिलेख कार्यालय हवेली मध्ये होतो. माहिती अधिकार कायद्यामध्ये ग्रामस्थांनी अर्ज दिला मोजणी का झाली नाही म्हणून विचारण्यासाठी. त्याचे 30 दिवस झाले तरी अद्याप उत्तर नाही. माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली.

जिथे ५ लोक राहत तिथे आता ३०० लोक राहतात,पुण्याच्या सुरेख भवितव्यासाठी मार्ग काढणारी महापालिका बनवा – शरद पवार

पुणे- वानवडी येथील महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची पुणे शहर कार्यकारिणीची विक्रमी ५० वी बैठक आणि कार्यकर्ता मेळावा पार सपडला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रीय महासचिव जयदेवराव गायकवाड, माजी आमदार कमलनानी ढोले पाटील, अशोक पवार, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, आमदार बापूसाहेब पठारे, प्रकाश म्हस्के, पंडित कांबळे, महिला आघाडीच्या प्रमुख स्वाती पोकळे, युवक, विद्यार्थी व अल्पसंख्यांक या सगळ्या संघटनांचे प्रमुख आणि उपस्थित होते. शरद पवार यांनी ‘भव्य कार्यकर्ता मेळाव्या’त मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने सुसंवाद साधला.

यावेळी शरद पवार म्हणाले कि मला सांगण्यात आले आज कार्यकारिणीची बैठक आहे. पण मला असं दिसतंय की, वार्षिक सर्वसाधारण सभा! कारण साधारणतः कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये २०-२५-३० लोक असतात. पण शहराचं चित्र बदलतंय, तुमच्या बाजूने अनुकूल होतंय. याची प्रचिती आपली ही उपस्थिती या ठिकाणी दाखवते.

आपण गांधी- नेहरूंचा विचार मानतो.

निवडणुका आल्यात. सुप्रीम कोर्टाने आता स्वच्छ भूमिका घेतली की, एका ठराविक काळामध्ये ‘स्थानिक स्वराज्य संस्था’ यांच्या निवडणुका घेतल्याच पाहिजेत. त्यामुळे साहजिकच सबंध राज्यामध्ये ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ त्याचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला आणि मला जागरूक राहावं लागेल. तयारी करावी लागेल, निर्णय घ्यावे लागतील. आपण गांधी- नेहरूंचा विचार मानतो. निवडणुका उद्या होतील, त्यावेळेला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ म्हणून आपण मतदारांच्यापुढं जाणार आहोत. इतरही काही पक्ष आहेत. काही पक्ष देश पातळीवर आम्हाला सहकार्य करतात. काही पक्ष राज्यामध्ये सहकार्य करतात. काही पक्ष स्वतंत्रपणानं निवडणूक लढण्याचा विचार करतात. यासंबंधीचा निकाल पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी हे लवकरच घेतील. अन्य मित्र पक्ष यांच्याशी सुसंवाद साधून त्यांच्याबरोबर जायचं की नाही? गेलो तर कार्यक्रम काय? किती जागा मिळतील? कोणत्या त्या असतील? या सगळ्यांचा निर्णय आपले अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी हे तुम्हा लोकांच्या विश्वासाने निर्णय घेतील आणि त्याने आपण निवडणुकीला सामोरे जाऊया.

गांधी- नेहरू- आझाद यांची विचारधारा म्हणजे कॉंग्रेस -ज्या पक्षाचा जन्म खर्या अर्थाने पुण्यात झाला

आपण ‘काँग्रेस’च्या नावाने लढतो, राष्ट्रवादी काँग्रेस! पण ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ याच्यामागं विचारधारा आहे. मी सुरुवातीला सांगितलं ती विचारधारा गांधी- नेहरू- आझाद यांची विचारधारा आहे. ही विचारधारा मजबूत करायची आहे. विशेषतः पुणे शहरामध्ये आपण इथे एकत्रित आहोत. माझ्या मते, पुणे शहराच्या ‘काँग्रेस’ विचारांच्या लोकांची जबाबदारी ही अधिक आहे. त्याचं कारण कदाचित तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल. १८८५ साली ‘काँग्रेस पक्ष’ स्थापन झाला. त्याचा निर्णय पुण्यामध्ये झाला. ‘काँग्रेस पक्षा’ची स्थापना, जन्म हा पुण्यात झाला. बैठक बोलावली होती. पण दुर्दैवानं बैठक ज्या दिवशी बोलावली होती, त्याच्या आधी तीन दिवस पुण्यामध्ये प्लेगची साथ होती. ही प्लेगची साथ आल्यामुळं इथं कुठलेही कार्यक्रम हे घेता आले नाहीत. म्हणून पुण्याचा निर्णय हा बदलला आणि तो मुंबईला नेला. आज ज्याला ‘ऑगस्ट क्रांती मैदान’ हे जे ठिकाण आहे, तिथे ‘काँग्रेस’ नेली आणि तिथून ‘काँग्रेस’ ही जाहीर केली गेली. पण त्याचं मूळ हे पुण्यातलं होतं आणि पुण्यातलं असेल तर ‘पुणेकर’ म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी ही अधिक आहे.

आजचं पुणं आणि १९८५ चा जो पुणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आज पुणं शहर बदललेलं आहे. तुम्ही सगळेजण पुण्यामध्ये राहता. आज रस्त्याने जाणं अवघड आहे, दळणवळणाची साधनं वाढली. देशामध्ये सगळ्यात जास्त ‘टू व्हीलर्स’ यासंबंधीची नोंद ही पुण्याची आहे. अनेक गोष्टी आहेत, आज जुनं पुणं राहिलेलं नाही. एक काळ असा होता की, छोटी- छोटी घरं! आज लोक सांगतात तिथं ३० मजल्यांची इमारत, कुठे ४० मजल्यांची इमारत आणि यामुळे आज पुण्याचा चेहरा बदलला आहे. पण या सगळ्या बदलाच्या वेळेला त्याच्या गरजाही काही आहेत. उदाहरणार्थ ४० मजली इमारत बांधली. ज्या जागेवर ५ लोक राहणार होते, आज त्या ठिकाणी ३००- ४०० लोक हे राहायला येतात. मग प्रश्न येतो, पाण्याची सोय आहे का? रस्त्याची सोय आहे का? पुरेसा वीज आहे का? आरोग्याच्या सुविधा आहेत का? कायदा आणि सुव्यवस्था याची व्यवस्था आहे का? प्रचंड नागरी प्रश्न आज पुण्यासारख्या शहरात आणि आजूबाजूला आपल्याला बघायला मिळतात. याला उत्तर शोधायचं असेल तर, महानगर पालिका! उद्या पुण्याच्या भवितव्यासाठी मार्ग काढणारी ही महानगर पालिका झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रश्नांच्या संबंधी आस्था असलेले उमेदवार हे निवडून आले पाहिजेत. ती दृष्टी आज तुम्हा लोकांच्यामध्ये आहे.

प्रशांत जगताप स्वतः महापौर होते. अंकुश काकडे स्वतः महापौर होते. कमलताई होत्या, अनेकांची नावं सांगता येतील. आपल्यामध्ये महानगर पालिकेच्या कामांचा अनुभव असलेले अनेक सहकारी आहेत. त्यामुळे साहजिकच आपली नैतिक जबाबदारी पुण्याच्या नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्याची ताकद आणि दृष्टी आज तुमच्यामध्ये असेल तर, ही जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. त्या जबाबदारीमध्ये यश मिळवायचं असेल तर, महानगरपालिकेला उत्तम उमेदवारांची निवड! नव्या पिढीच्या तरुण उमेदवारांना संधी देऊन त्यांची निवड करणं आणि लोकांचा विश्वास संपादून महानगर पालिका इथलं सूत्र तुम्हा लोकांच्या हातात येईल, तुमच्या सहकाऱ्यांच्या हातात येईल, याची काळजी ही आपल्याला घ्यायची आहे. माझी खात्री आहे की, लोकांनी एकदा साथ दिली की आपण पूर्ण ताकदीने पुण्याचे नागरी प्रश्न जे आहेत, त्याच्या सोडवणुकीसाठी जे जे करावे लागेल ते आपण करू. त्या दृष्टीने आजची ही बैठक एक विचार घेऊन जायचं आहे, निर्धार घेऊन जायचा आहे. उद्याची महानगर पालिका नागरी प्रश्नांची सोडवणूक असण्याची कुवत ज्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये आहे, त्यांच्याच हातात आली पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही सगळेजण प्रयत्नांची पराकष्टा करू, हाच निकाल घेऊन तुम्ही इथनं गेलं पाहिजे.

उद्या पक्ष कुणाशी युती करायची? यासंबंधीचा निकाल हा घेईल. त्या निकालाच्या नंतर सगळ्या जागा या आपल्याकडे काय येणार नाहीत. काही जागा मित्रांना सोडाव्या लागतील. ज्या जागा आपण लढवू, तिथं स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नव्या उमेदीच्या आणि नक्कीच जिंकू शकेल, अशा कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम पक्षाचं नेतृत्व करेल. त्यांना साथ देणं, सहकार्य करणं ही तुम्हा लोकांची जबाबदारी आहे. त्याची पूर्तता तुम्ही कराल, हा विश्वास या ठिकाणी बाळगतो. तुम्हाला या कामाला शुभेच्छा देतो.

बाणेर परिसरात 13 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

0

17 वर्षीय आरोपीने शाळेच्या परिसरात केला कृत्य; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
पुणे-शाळेतून घरी जात असलेल्या एका 13 वर्षीय मुलाला रस्त्यात अडवून त्याच्या ओळखीतील एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलांविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पीडित मुलाच्या आईने बाणेर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अल्पवयीन आरोपी विरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 13 वर्षीय मुलगा 11 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी निघाला होता.

त्यावेळी आरोपी अल्पवयीनाने त्याला रस्त्यातच अडवले. खेळायला जाऊ असा बहाणा केला. त्यानंतर मुलाला शाळेच्या परिसरात एका झाडाजवळ नेऊन त्याला पैसे देण्याचे आमिष दाखविले. मुलावर त्याने बळजबरीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलाने त्याला विरोध केल्यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत सांगण्यात आहे. पोलिस उपनिरीक्षक एस सानप पुढील तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी गुन्हा

कॉलेज वरून घरी जात असताना अल्पवयीन मुलीची बॅग व मोबाईल हिसकावत घेऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश चंद्रकांत जगताप (25, रा. चैत्र बन वसाहत, बिबवेवाडी) याच्यावर बाल लैंगिक अत्याचार व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी एका 17 वर्षीय मुलीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे.

महिलेला फिरायला जाऊ म्हणत विनयभंग

महिलेला फिरायला जाऊ म्हणत कॉल करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम लोणे (40, रा. हिंदवीनगर, उरूळी देवाची) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 38 वर्षीय महिलेनी तक्रार दिली आहे. आरोपीने फिर्यादी महिलेच्या मोबाईल वर कॉल करून चला आपण फिरायला जाऊया म्हणून जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत सांगितले आहे.

आजपासून PM मोदींना मिळालेल्या 1300 भेटवस्तूंचा ई-लिलाव:राम मंदिराच्या मॉडेलसह भवानीची मूर्ती हि सामील

0

पॅरालिम्पिक पदक विजेत्यांच्या बुटांचा देखील लिलाव
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तू देण्यात आलेल्या १,३०० हून अधिक वस्तूंचा बुधवारपासून ई-लिलाव केला जाईल. आज पंतप्रधान मोदींचा ७५ वा वाढदिवस आहे. केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मंगळवारी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) येथे पत्रकार परिषदेत ई-लिलावाची घोषणा केली.त्यांनी सांगितले की ई-लिलावात चित्रे, कलाकृती आणि क्रीडा संबंधित स्मृतिचिन्हांचा समावेश आहे. भेटवस्तू सध्या एनजीएमए येथे प्रदर्शित केल्या आहेत, जिथे पर्यटक येऊन त्या पाहू शकतात. यानंतर, ते वस्तूंसाठी ऑनलाइन बोली लावतील.

पीएम मोमेंटोस वेबसाइटनुसार, पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंमध्ये देवी भवानीची मूर्ती, अयोध्येतील राम मंदिराचे कोरलेले मॉडेल आणि पॅरालिम्पिक खेळ २०२४ च्या क्रीडा स्मृतिचिन्हांचा संच यांचा समावेश आहे. देवीच्या भवानी मूर्तीची मूळ किंमत १ कोटी ३ लाख ९५ हजार रुपये आहे.

राम मंदिराच्या मॉडेलची मूळ किंमत ५.५ लाख रुपये आहे. याशिवाय, पॅरालिम्पिक पदक विजेत्यांच्या तीन जोड्या शूज देखील आहेत, ज्यांची मूळ किंमत ७.७ लाख रुपये आहे. मूळ किंमतीच्या बाबतीत हे पाच मॉडेल टॉप ५ यादीत आहेत.
भेटवस्तूंमध्ये पश्मीना शाल आणि नागा शाल देखील समाविष्ट
इतर भेटवस्तूंमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील पश्मीना शाल, राम दरबाराचे तंजावरचे चित्र, धातूची नटराजाची मूर्ती, जीवनवृक्षाचे चित्रण करणारी गुजरातमधील रोगन कलाकृती आणि हाताने विणलेली नागा शाल यांचा समावेश आहे. ई-लिलाव २ ऑक्टोबरपर्यंत चालेल. यातून मिळणारे उत्पन्न दरवर्षीप्रमाणे नमामि गंगे मिशनला दान केले जाईल.

संस्कृती मंत्रालयाच्या मते, मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी त्यांच्या सर्व स्मृतिचिन्हे एका उदात्त कार्यासाठी समर्पित केली आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की ई-लिलाव हा नागरिकांना केवळ इतिहासाचा एक तुकडा मिळवण्याचीच नाही तर आपल्या पवित्र नदी गंगेच्या संवर्धनाच्या एका उदात्त मोहिमेत सहभागी होण्याची संधी आहे.

२०२४ मध्ये, लिलावात सर्वात कमी ६०० वस्तू होत्या
यावर्षी पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावाची सातवी आवृत्ती आहे. पहिला लिलाव जानेवारी २०१९ मध्ये झाला होता. तेव्हापासून, पंतप्रधानांना मिळालेल्या हजारो भेटवस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे, ज्यातून ५० कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे.

गेल्या सात वर्षांत, २०२४ मध्ये पहिल्यांदाच सर्वात कमी ६०० वस्तूंचा लिलाव करण्यात आला. गेल्या वर्षी, ई-लिलावात सर्वात महागडी वस्तू निषाद कुमारची होती, ज्याने पॅरालिम्पिक खेळांमध्ये रौप्य पदक जिंकले होते, ज्याची किंमत १० लाख रुपये होती.

यापूर्वी, २०१९ मध्ये पहिल्या लिलावात १८०५ वस्तू, २०२० मध्ये २७७२ वस्तू, २०२१ च्या तिसऱ्या लिलावात १३४८ वस्तू, २०२२ च्या चौथ्या लिलावात १२०० वस्तू आणि पाचव्या लिलावात ९१२ स्मृतिचिन्हे लिलाव करण्यात आली होती.