Home Blog Page 378

वैदिक संमेलनातून संशोधनात्मक कार्य व्हावे : डॉ. गीताली टिळक

श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम्‌‍ दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्‌‍,शृंगेरी, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे आयोजित वैदिक संमेलनाचा समारोप

पुणे : भारतीय ज्ञानपरंपरा आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा स्वरूपाची वैदिक संमेलने आयोजित करण्यात यावीत तसेच याविषयी संशोधनात्मक कार्य व्हावे ज्या योगे वेदाभ्यास, ज्ञानपरंपरेचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेच्या अध्यक्ष व टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी केले.
श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम्‌‍ दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्‌‍,शृंगेरी आणि वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय वैदिक संमेलनाचा आज (दि. 3) समारोप झाला. त्या वेळी डॉ. गीताली टिळक अध्यक्षपदावरून बोलत होत्या. वासुदेव निवास, पुणेचे पीठाधीश आणि विश्वस्त योगश्री प.पू. शरदराव जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री शृंगेरी शारदा पीठाचे महाराष्ट्र प्रतिनिधी वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेचे कार्याध्यक्ष भगवंत ठिपसे, कार्यवाह श्रद्धा परांजपे व्यासपीठावर होते. संमेलन शिवशंकर सभागृह, महर्षिनगर येथे आयोजित करण्यात आले होते.

डॉ. गीताली टिळक पुढे म्हणाल्या, वेदशास्त्रातील शिक्षण विषयात पदवी अभ्यासक्रम टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सुरू करण्याचा मानस आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व टिळक कुटुंबिय वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या कार्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहेत. टिळक नावाबरोबर जबाबदारी येते या वडिलांच्या शिकवणुकीमुळे मी वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे, असे त्यांनी आवजूर्न नमूद केले.

वेदाध्यायनाला साधनेची-चैतन्याची जोड मिळाल्यास शांती प्राप्ती होते, असे सांगून प.पू. शरदराव जोशी यांनी श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम्‌‍ दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्‌‍,शृंगेरी आणि वासुदेव निवासाची परंपरा यांच्यातील धार्मिक अनुबंधांविषयी सविस्तर माहिती दिली.

संमेलनानिमित्त सकाळपासून मंत्रजागर, धर्मशास्त्रीय शंकासमाधान, परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यज्ञीय वृक्षांचे समकालीन महत्त्व या विषयावर वैद्य कौशिक दाते (सोलापूर) यांचे व्याख्यान झाले. आयुर्वेद शास्त्रानुसार ग्रहांप्रमाणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या वृक्षांच्या गुणधर्माबद्दल त्यांनी सविस्तर विवेचन केले.

प्रास्ताविकात श्रद्धा परांजपे यांनी संस्थेच्या कार्याची ओळख करून देत वैदिक संमेलानाच्या तीन दिवसातील उपक्रमांचा आढावा घेतला. याप्रसंगी संस्थेच्या कार्याला हातभार लावणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर खांडेकर, तुषार भट यांनी केले तर आभार श्रीकांत फडके यांनी मानले.

महसूल सप्ताहानिमित्त जिल्ह्यात पाणंद, शिवरस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि.३: ‘महसूल सप्ताह २०२५’च्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी करुन दुतर्फा वृक्षारोपण लावण्याकरिता उद्दिष्ट निश्चित करुन त्यानुसार कार्यवाही करण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्देश दिले.

जुन्नर तालुक्यात टिकेकर वाडी, नारायणगाव, शिरोळी, उदापूर, आर्वी, पिंपळगाव, आंबेगाव तालुक्यात लौकी येथे पाणंद रस्त्याच्या तसेच मावळ तालुक्यात इंदुरी सांगुडी येथे शिव रस्त्याच्या तसेच नवलाख उंबरे, मंडळ वडगाव, गहुंजे ते सांगवडे, थोराण येथील स्मशानभूमी कडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.

मुळशी तालुक्यातील चाले, नेरे, दत्तवाडी, भुगाव, आंग्रेवाडी, भुकूम, कुळे, खुबवली, मारूंजी ९ गावामध्ये तसेच घोटावडे गावठाण ते बंधाऱ्याकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याच्या
अंदाजे दीड कि.मी.दोन्ही बाजूला वृक्षारोपण केले.

अप्पर तहसील पिंपरी चिंचवड.अंतर्गत
निरगुडी व विठ्ठलनगर, देहू येथे पाणंद रस्त्याच्या दुतर्फा तसेच अप्पर तहसील लोणी काळभोर अंतर्गत अष्टापूर ते पिंपरी-सांडस शिवस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केले आहे.

हवेली तालुक्यात खेडशिवापुर येथील श्रीरामनगर गाव ते गाऊडदरा या दोन गावांना जोडणाऱ्या शिव रस्त्याची दुतर्फा वृक्षारोपण लागवड करण्यात आली. भोर तालुक्यात भोंगवली येथे वृक्षारोपण आणि बंद असलेले १०० हून अधिक रस्ते वाहतूकी साठी पुन्हा सुरू करण्यात आले. वेल्हा (राजगड) येथील अडवली, कानंद, ओसांडे, बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये पानंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली.
खेड येथील चाकण महसूल मंडळातील गोणवडी ते बोरदरा शिवरस्ता खुला करून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.

पुरंदर तालुक्यातील मौजे आडाचीवाडी येथे पाणंद रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली. तसेच शेतकऱ्यांच्या सहमतीने पानंद रस्ता मोकळा करून लोकसहभागातून मुरूमीकरणाचे काम सुरू करण्यात आले.दौंड तालुक्यात एकूण १६ तसेच शिरूर तालुक्यात १० गावांमध्ये वृक्षलागवड करण्यात आली.

या मोहिमेत गावातील ग्रामस्थानी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, दरम्यान रस्त्यासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रशासनाच्यावतीने सत्कार करण्यात आला, असेही श्री. डुडी म्हणाले.

श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 561 जणांनी केले रक्तदान

पुणे – मानाचा चौथा महागणपती म्हणून प्रसिद्ध असलेले श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदानात पुण्यातील विविध गणेश मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध ढोल ताशा पथकातील वादक मित्र असे मिळून तब्बल 561 युवकांनी रक्तदान केले .
हे शिबिर रविवार, दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत नु. म. वि. शाळा, बाजीराव रोड येथे आयोजित करण्यात आले होते . या रक्तदान शिबिरास  कसब्याचे  आमदार हेमंत रासने, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे सह मानाचा पहिला श्री कसबा गणपती चे अध्यक्ष श्रीकांत शेटे आदी मान्यवरांनी भेट दिली . यावेळी रक्तदान करण्यास तरुणांसोबत
तरुणीचाही उत्साह दिसून आला
रक्तदान शिबिरात रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, स्वरुपवर्धिनी, श्री गजलक्ष्मी, शिवमुद्रा, गजर प्रतिष्ठान, स्वराज्य ट्रस्ट, उगम प्रतिष्ठान, तालगर्जना, मैत्री वेलफेअर फाउंडेशन, समर्थ प्रतिष्ठान, नादब्रम्ह ट्रस्ट ढोल ताशा पथकांचा समावेश होता.तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे श्री विकास जी पवार (अध्यक्ष),  विनायक जी कदम (उपाध्यक्ष),  नितीन पंडित  (कोषाध्यक्ष),कृष्णकुमार गोयल (स्वागताध्यक्ष), सह आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .

डीजे आणि लेझर बीमवर खटले टाकून उपयोग काय ? दोन्हींचा वापर होऊच नये – खर्डेकर

आयुक्त साहेब विसर्जन मिरवणूक सुरु कधी करायची ,मंडळाच्या विसर्जन रथांचा क्रम कसा असेल ..सामोपचाराने ठरवा हो

पुणे- पुण्याच्या गणेशोत्सवाची जागतिक पातळीवर ओळख आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीला दिशा देणारा उत्सव म्हणून लोकप्रिय झालेल्या उत्सवाने आता सामाजिक चळवळीचा वेध घ्यायला सुरुवात केल्याचे दिसून यावे अशी दिशा मिळू लागणार आहे . हा उत्सव अगदी २ वर्षाच्या मुला पासून ते ९० वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वांनाच हवाहवासा वाटावा कोणालाही उपद्रवकारक वाटू नये यासाठी आता अधिक काळजी घेण्याचे प्रयत्न देखील सुरु झालेत . गुलालाची उधळण रोखली गेली,विना गुलाल मिरवणुकीचे प्रयत्नही बऱ्याच अंशी यशस्वी झाल्याचे पूर्वीच पाहायला मिळालेत त्यानंतर आता कर्णकर्कशच नव्हे तर हृदयाला आणि कानांना इजा पोहोचविणारे DJ नकोतच आणि डोळ्यांना इजा पोहोचविणारे लेझर बीम देखील नकोत अशी भूमिका संदीप खर्डेकर , अंकुश काकडे आणि श्रीकांत शिरोळे आणि अनेकांनी व माध्यमांनी देखील गेल्या काही वर्षापूर्वीपासून मांडायला सुरुवात केली , पण DJ आणि लेझर बीम वर अद्याप म्हणावा तसा आवर घालता आलेला नसावा असे मानले जाते ,ते वापरणाऱ्यावर खटले भरले जातात .. पण त्यांना काहीही अर्थ नसतो . ती तेवढ्यापुरती कारवाई असते , नंतर हे खटले काढूनही घेतले जातात . त्यामुळे DJ आणि लेझर बीम नसावेतच या साठी पोलिसांनी काही भूमिका घेणे गरजेचे असल्याचे बोलले जाऊ लागले आहे . या शिवाय विसर्जन मिरवणूक जर २४ तासात संपवायची असेल तर ती सकाळी ७ वाजता सुरु करावी असा आग्रह हि आता धरला जातोय . मानाच्या गणपतींनी दिवसभर व्यतीत केल्यावर अन्य मंडळांना तेवढी स्पेस मिळत नाही हि खंत व्यक्त केली जाते . त्यात आता मनाच्या गणपती नंतर विसर्जन मिरवणुकीत भाऊ रंगारी आणि मंडई गणपतीने सहभागी होण्याची घोषणा केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता भाजपचे प्रवक्ते असलेले संदीप खर्डेकर यांनी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष म्हणून पोलीस आयुक्तांना एक पत्र देत मंडळांची बैठक बोलवा आणि सामोपचाराने सारे काही ठरवा असे आवाहन केले आहे. काय म्हटले आहे नेमके खर्डेकर यांनी या पत्रात ते वाचा जसेच्या तसे…..

प्रती,
मा. अमितेशकुमार,
पोलीस आयुक्त, पुणे…
विषय – गणेश विसर्जन मिरवणूकीतील गैरप्रकारांबाबत….

मा. महोदय,
मी गणेशोत्सवाशी 1983 सालापासून जोडलेला कार्यकर्ता असून आता चाळीस वर्षाहून जास्त काळ विविध मंडळाशी संबंधित आहे.
गणेशोत्सवाला आता जेमतेम वीस दिवस राहिलेत आणि विसर्जन मिरवणूकीतील मानाच्या गणपतींच्या नंतर च्या क्रमवारी वरून मतभेदाचे फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. भाऊसाहेब रंगारी मंडळ आणि अखिल मंडई मंडळाने मानाच्या गणपतीपाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होण्याची घोषणा केल्यानंतर काही मंडळानी सकाळी सात ला मिरवणूक सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. तर काहींनी परस्पर केलेले घोषणेला विरोध दर्शविला आहे.या परिस्थितीत शहरातील प्रमुख गणेश मंडळाचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व सार्वजनिक उत्सवांशी संबंधित शहरातील काही प्रतिष्ठित नागरिक यांची तातडीने बैठक घेऊन याबाबत चे धोरण निश्चित करावे आणि ह्या विषयांवरून गणेशोत्सवाची शांतता भंग होऊ नये यासाठी सर्वांच्या सहमतीने सर्वमान्य धोरण निश्चित करावे अशी आग्रही मागणी करत आहे.
गतवर्षी मी, अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे यासह अनेक पुणेकरांनी डीजे च्या वापरावर निर्बंध आणावेत यासाठी मोहीम उघडली होती. यावर्षी मध्यवर्ती भागातील मंडळाना मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ देणारे उद्योजक पुनीत बालन यांनी डीजे विरुद्ध घेतलेली भूमिका स्वागतार्ह असून यामुळे मोठा फरक पडेल असे दिसते.
यासह मिरवणूकीतील काही गैरप्रकारांबाबत पोलीस प्रशासनाने पाऊले उचलणे गरजेचे आहे असे वाटते.
यात प्रामुख्याने…
1) मिरवणुकीतील डीजे आवाजाच्या पातळीवर आणि डोळ्यांना इजा करणाऱ्या लेझर बीम वर पोलीस खात्याने अंकुश ठेवणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी आधीच मंडळाशी संवाद साधावा असे वाटते. कारणं ऐन मिरवणुकीत mob psychology मुळे आणि रस्त्यावर असलेल्या प्रचंड गर्दी मुळे पोलीस कारवाई करत नाहीत आणि नंतर दाखल केलेल्या खटल्यांना काहीच अर्थ उरत नाही.
2) बाहेरून मिरवणूक बघायला आलेली आणि शिक्षणासाठी आलेली काही मंडळी झुंडीने विविध मंडळापुढे नाचण्यासाठी उत्सुक असतात. ते कुठल्याही मंडळाचे कार्यकर्ते नसतात आणि त्यांच्यामुळे मिरवणूक रेंगाळते, यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
3) मुलांच्या, पुरुषांच्या अश्लील हावभाव करत केलेल्या नृत्यामुळे उत्सवाचे पावित्र्य भंग होतेच पण गेली काही वर्षे महिलांचा / मुलींचा मिरवणुकीत सहभाग वाढत असून त्यांच्यात देखील अश्लील हावभाव करत नाचणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, यावर देखील लक्ष ठेवणे गरजेचं आहे असं वाटतं.
4) सध्या पुणे शहरात बहुतांश नवे पोलीस अधिकारी नेमणूकीस आहेत. पुणेकरांना ओळखणारे आणि पुणेकर असलेले व मंडळाच्या कार्यकर्त्यांची मानसिकता जाणणारे अधिकारी फारसे राहिले नाहीत, ही बाब लक्षात घेऊन या महत्त्वाच्या उत्सवासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे पथक तयार करावे ही विनंती.
5) ढोल ताशा पथकातील वादक हे एका मंडळाचे विसर्जन झाल्यावर दुसऱ्या मंडळाच्या वादनासाठी लक्ष्मी रस्त्याने खांद्यावर ढोल घेऊन उलटे जाताना प्रचंड धक्काबुक्की करत जातात, तसेच वादन करताना देखील जोशात उड्या मारतात व टिपरू इतके उंचावतात की ते नागरिकांना लागतेच. त्याच बरोबर पथकातील वादकांची संख्या मर्यादित असावी याबद्दल देखील मार्गदर्शक सूचना द्याव्यात ही विनंती.
6) काही तथाकथीत पोलीस मित्र किंवा स्वयंसेवक हे प्रचंड दादागिरी करतात व फुकट फौजदारकी करताना महिलांना, लहान मुलांना,शहरातील प्रतिष्ठितांना देखील सोडत नाहीत व ह्यांच्या अरेरावी मुळे सगळेच त्रस्त झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे ह्यांना देखील आवर घालण्याची आवश्यकता आहे याची दखल घ्यावी.
यासह वेळोवेळी अन्य उपयुक्त सूचना करेनच… तूर्त ह्या बाबतीत गांभीर्याने विचार करून कार्यवाही करावी ही विनंती.
आपलाच,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995

मशिदींवरील भोंगे, लाऊड स्पीकर हटवा,न्यायालयाचा अवमान आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान करणे थांबवा – किरीट सोमैय्या फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल

पुणे- मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, अपर पोलीस महासंचालक यांची नियमावली (SOP), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान सभेतील घोषणा या सर्वांचा आधार घेत मशिदींवरील भोंगे हटवा याबाबत लेखी निवेदन देण्यासाठी आज भाजप नेते किरीट सोमैया यांनी पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले .

वाचा त्यांचे लेखी निवेदन जसेच्या तसे …….

संदर्भः केएस/मुंबई/02/3805/2025
दि. 03 ऑगस्ट, 2025
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन
पुणे.

महोदय,
विषयः मशिदी वरील अनधिकृत भोंगे / लाऊड स्पीकर.
संदर्भ :- मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, अपर पोलीस महासंचालक यांची नियमावली (SOP), मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस यांची विधान सभेतील घोषणा.
मुंबई उच्च न्यायलयाने जानेवारी 2025 मध्ये मशिदीवर (धर्मस्थानात) अनधिकृत भोंगे, लाऊडस्पीकर, ध्वनी प्रदूषण संबंधात अंतिम आदेश दिले. यात त्यांनी ध्वनी मर्यादा 50 डेसीबल पेक्षा अधिक असू नये यासंबंधी स्पष्ट निर्देश दिले आहे.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्टपणे सांगितलं आहे की, “भोंगे चालणार नाही”.
मुंबई मध्ये भोंगा मुक्त मुंबई मोहीम यशस्वी रित्या मुंबई पोलीसांनी पार पाडली.
महाराष्ट्रात आपल्या भागात मोठ्या प्रमाणात मशिदीवर अनधिकृत भोंगे आहेत. ध्वनी प्रदूषण पण तीव्र आहे. अनेक मशिदच्या ट्रस्टींनी लाऊडस्पीकर / भोंग्याची परवानगी घेतलीच नाही. ध्वनी मापक यंत्रही बसवले नाही.
मशीद आणि मदरसा परवानगी न घेता किंवा मिळालेल्या परवानगीचे निर्देश न पाळता मोठ्या प्रमाणात आपल्या भागात लाऊडस्पीकर, भोंगे वाजवत आहे, दिवसा 4/5 वेळा अश्या प्रकाराने गोंगाट होतो हे महाराष्ट्रातील जनतेला, न्यायालयाला, महाराष्ट्र अपर पोलीस महासंचालक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आम्हाला मान्य नाही.

  1. काही पोलीस अधिकारी आम्ही परवानगी दिली नाही असे सबब दाखवून कारवाई करत नाही.
  2. वास्तविकरीत्या ध्वनी प्रदूषणची मर्यादा, ध्वनी आवाज यांच्या मर्यादेत भोंगे बसूच शकत नाही. एवढ्या उंचीवर, खुल्या आकाशात बाहेरच्या जनतेसाठी भोंगे, लाऊडस्पीकर लावणे हे कायद्यात बसतच नाही,
  3. हे बेकायदेशीर आहे हे माहीत असूनही अनेक पोलीस स्टेशनचे अधिकारी कारवाई करत नाही याची गंभीर दखल घ्यावी लागणार.
  4. काही पोलीस अधिकारी आम्ही डेसीबल मोजतो हे सांगतात त्यावेळी हे सत्य नसते, कारण एवढ्या उंचीवरून, मीनाऱ्यावरून त्या लाऊडस्पीकर / भोंग्याच्या तोंडाशी धरून जे ध्वनीवर्धक माप घ्यावे लागते, ते घेता येत नाही, हे शक्यच नाही.
  5. पोलीस कॉन्स्टेबल हे मशिदी/ मदरसाच्या समोरच्या फुटपाथ वरून, लांबून काही वेळेला माप घेतात आणि रिपोर्ट देतात हे फक्त चुकीचं नाही तर बेकायदेशीर आहे हे स्थानिक पोलीसांनी लक्षात ठेवावे लागणार.
  6. आपल्या भागातील सगळ्या मशिद, मदरसावरवर जर लाऊडस्पीकर, भोंगे असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई करणे हे बंधनकारक आहे.
  7. कोणत्याही मशिद (धर्मस्थानक) यांना परवानगी हवी असल्यास 10 X 15 इंच बॉक्स स्पीकरची परवानगी देता येते ही परवानगी तिथे येणाऱ्या त्यांच्या भक्तांना व्यवस्थित ऐकायला जावे त्यासाठी दिली जाते त्याचे तोंड हे आतल्या बाजूला असणे बंधनकारक आहे.
    आपण यासंबंधात ताबडतोब कारवाई करावी. आपल्या भागातील मदरसा, मशिदीवरील अनधिकृत भोंगे/लाऊडस्पीकर ताबडतोब काढण्यात यावे ही विनंती.
    न्यायालयाचा अवमान आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान करणे तसेच पोलीस महासंचालक यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणे हे मान्य नाही.
    धन्यवाद !
    आपला,
    (डॉ. किरीट सोमैया)

हिंदूंच्या कथित बदनामी’चा थयथयाट करून युतीकडून सत्तेतील अपयश लपवण्याचा प्रयत्न..!

२०१४ ते १९ स्व-सत्ताकाळात प्रगट का करू शकले नाहीत..काँग्रेस’चे हिंदू बदनामीचे षडयंत्र ..? सरकारी वकील बदलून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता काय..?

नैतिक व संविधानिक Character Less (चारीत्र्य हिन) राजवटीत गुन्हेगार व भ्रष्टाचाऱ्यांना मोकळीक …! काँग्रेस’ची प्रखर टिका
पुणे दि ३ ॲागस्ट २५
मुंबई बॅाम्ब स्फोटा नंतर, मालेगाव बॅाम्ब स्फोटातील हिंदुत्ववादी संघटनेच्या आरोपींना, सन्मानपुर्वक नव्हे तर ‘पुराव्या अभावी’ एनआयए विशेष न्यायालयाने आरोप मुक्त केल्याने ‘सत्तेतील भाजप व शहा प्रायोजक, शिंदे सेनेचा’ काँग्रेसच्या नावे चाललेला थयथयाट हा सत्तेतील अपयश लपवण्याचा प्रयत्न चालल्याची टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, मालेगांव बाँम्ब स्फोटा’चा तपास तत्कालीन एटीएस प्रमुख, कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी म्हणून ख्याती असलेले श्री हेमंत करकरे यांनी केला होता. त्यावेळी संबंधित आरोपीं विरोधातील ॲाडीओ क्लिप्स, इलेक्ट्रॉनिक साहित्य, जबाब इ सक्षम पुरावे देखील समोर आल्याचा सुतोवाच तपास यंत्रणे कडुन झाला होता.
२०१४ नंतर देशात व राज्यात सत्तापालट झाल्यानंतर
सरकारी वकील रोहिणी सालीयान यांनी एनआयए कडून न्यायालयीन कामकाजात दबाव येत असल्याचे स्पष्ट केल्यावर ही, त्यांचे जागी ‘नविन सरकारी वकीलांची नेमणूक’ कोणत्या हेतूने केली (?) असा सवाल ही काँग्रेस ने विचारला.
सप्टेंबर २०११ मध्ये देशातील राज्यांचे पोलीस प्रमुख व आयबी’चे संचालक यांचे बैठकीत तपास यंत्रणेतील गंभीर बाबी पुढे आल्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी गृहमंत्री नात्याने ‘भगवा दहशतवादाचे’ प्रयत्न काही प्रवृत्तीं कडून सुरू असल्याचा सुतोवाच केला. असीमानंद सारख्या आरोपींचा कबुली जवाब ही त्यावेळी पुढे आला होता.
देशाच्या गृहमंत्र्यांचे ‘सकृत दर्शनी परिस्थिती’वरील मत हे पक्षाचे राजकीय मत’ नसते तर तत्कालीन वास्तव परिस्थितीवर असते.
न्यायालयाने आरोपींना पुरावा अभावी निर्दोष निकाल दिल्यानंतरच् भाजप’ने ‘भगवा दहशतवाद’ वक्तव्यावर रान पेटवण्याचा प्रयत्न करणे हे सत्तेतील अपयश लपवण्याचा व जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे गोपाळदादा तिवारी यांनी सांगीतले.
काँग्रेस’वर षडयंत्राचा आरोप करतांना “२०१४-१९ राज्यात व देशात एक हाती सत्ता असुनही” एक ही एफआयआर नोंदवू शकले नाही वा त्यावर ब्र शब्द ही केला नाही (?) त्यावेळी सरकारी वकील बदलून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता काय..? असा उपरोधिक सवाल काँग्रेस ने केला.
काँग्रेस ‘हिंदू विरोधी’ असल्याचा तथ्यहीन, बालीश आरोप करणारे ‘भारतीय संस्कृतीचा’ इतिहास सांगणाऱ्या ‘रामायण व महाभारत’ मालिका सुमारे ३ वर्षे तत्कालीन पंतप्रधान इंदीराजी व राजीवजी गांधी यांनीच देशात आणलेल्या टीव्ही- दुरदर्शन मुळे दर रविवारी घरोघरी दाखवल्या गेल्याचे सोईस्कर विस्मरणात गेले काय असा खोचक सवाल ही राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी विचारला.
महायुती सरकार, न्यायालयाच्या ‘मुंबई बॅाम्ब हल्ला निर्णय’ विरोधात अपील करणार, मात्र मालेगांव स्फोट निर्णय विषयी अपील करणार नाही (?) हे धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस’ला मान्य आहे काय (?)असा ही सवाल त्यांनी अजीतदादा पवारांना केला.
जेंव्हा केंद्रीय तपास यंत्रणेने आरोपीं विरुध्द ‘मृत्यु दंडाची’ मागणी केली होती, तर ‘एनआयए’ची विश्वासार्हता पणास लागली असतांना ‘वरीष्ठ न्यायालयात’ अपील करणे नैसर्गिक न्याय तत्वाने अपेक्षित आहे.
त्यामुळे सरकार अपील बाबत ‘जात व धर्म’ पाहून निर्णय घेऊन, मंत्री पदाच्या शपथे विरोधी भुमिका घेणार काय(?) व निष्पाप नागरिकांच्या हत्ये बाबत न्याय मिळणार काय (?) याकडे देशातील जनतेचे लक्ष असल्याचे काँग्रेस ने म्हंटले आहे.

‘सनातनी दहशतवाद’ ही भाषा म्हणजे हिंदू धर्माचा अपमान: नीतेश राणे

आव्हाड यांच्या विधानाशी पवार-सुप्रियाताई सहमत आहेत का?,

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ‘सनातनी दहशतवाद’ या विधानावरून राज्यात नवा राजकीय वाद पेटला आहे. भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी या मुद्द्यावरून आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ही भाषा म्हणजे हिंदू धर्माचा अपमान असून, आव्हाडांच्या या भूमिकेशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सहमत आहेत का, असा थेट सवाल राणे यांनी केला आहे.

राणेंची पोस्ट काय?

नीतेश राणे म्हणाले की, ‘हिंदू दहशतवाद’ किंवा ‘सनातनी दहशतवाद’ ही भाषा भारताच्या हिंदू आणि संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे. आधी सुशीलकुमार शिंदे मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरत आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याशी शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे सहमत आहेत का? राष्ट्रवादी शरद पवार गटाचीही भूमिका हीच आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं.

नीतेश राणे म्हणाले की, खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदू धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच आव्हाडांचा अजेंडा असतो. दहशतवाद हा हिंसेशी जोडलेला असतो, जिचा उद्देश लोकशाही, सहिष्णुता आणि समाजविरोधी कट रचणं असतो. सनातन हिंदू परंपरेचा इतिहास हा प्रश्नौत्तरं, संवाद, वैचारिक संघर्ष आणि लोकशाहीचं दर्शन आहे.
मतदारसंघासाठी महाराष्ट्राचे वाट्टोळे करू नका

नीतेश राणे म्हणाले की,‘सनातनी दहशतवाद’ हा शब्द वापरणं म्हणजे आपल्या इतिहासाची, हिंदू परंपरेची आणि सामाजिक क्रांतीच्या प्रवाहाची थट्टा करण्याचा प्रकार आहे. इथल्या हिंदू समाजानं तुमच्या ‘बाटग्या’ विचारांना कधी साथ दिली नाही आणि भविष्यातही ते देणार नाहीत. केवळ आपला एक मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे वाट्टोळे करू नका.

सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल !:बुद्ध, फुले, आंबेडकरांचा छळ करणारेच खरे दहशतवादी- जितेंद्र आव्हाड


मुंबई-“सनातनी दहशतवाद” ही संकल्पना आजची नाही, तर प्राचीन काळापासून सुरू आहे. भगवान बुद्ध, संत, समाजसुधारक, महापुरुष यांच्यावर अन्याय करणारे तेव्हाचे आणि आजचेही सनातनी दहशतवादीच आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, तुम्हाला राजे म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही, असे म्हणत त्यांची हेटाळणी करणारे सनातनी दहशतवादीच होते.शत्रूशी हातमिळवणी करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा कट रचणारे सनातनी दहशतवादीच होते.

जितेंद्र आव्हाडांची पोस्ट काय?

जितेंद्र आव्हाड यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल ! सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे…भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. बौद्ध भिख्यूंना मारणारे तत्कालीन सनातनी दहशतवादीच होते. चार्वाकाला मारणारे सनातनी दहशतवादीच होते. बसवेश्वरांना मारणारे सनातनी दहशतवादीच होते. संत ज्ञानेश्वरांना छळणारे सनातनी दहशतवादीच होते. संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, तुम्हाला राजे म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही, असे म्हणत त्यांची हेटाळणी करणारे सनातनी दहशतवादीच होते.शत्रूशी हातमिळवणी करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा कट रचणारे सनातनी दहशतवादीच होते. त्यांना शत्रूच्या हातात पकडून देणारेही सनातनी दहशतवादीच होते. महात्मा फुलेंवर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांच्या खुनाची सुपारी देऊन मारेकरी घालणारे सनातनी दहशतवादीच होते. स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आद्य शिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्यावर शेणगोटे मारणारे सनातनी दहशतवादीच होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांना बदनाम करणारे , त्यांच्या खुनाचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते. एका वर्गाला शूद्र ठरवून त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणारे सनातनी दहशतवादीच होते.
माणसाला माणूस म्हणून जगूच द्यायचे नाही; शूद्रांना पाण्यापासून वंचित ठेवणारे सनातनी दहशतवादीच होते.
आगरकर हे केवळ सनातनी प्रवृत्ती विरोधात होते म्हणून त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसवणारे आणि ते शिक्षणापासून वंचित कसे राहतील, याचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते. महात्मा गांधी यांच्यावर अनेकदा हल्ले करणारे आणि प्रार्थनेला जाणाऱ्या निशस्त्र महात्म्यावर गोळ्या झाडणारे सनातनी दहशतवादीच होते.
अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी झगडणारे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे सनातनी दहशतवादीच होते.
सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या गोविंद पानसरे यांचा खून करणारे सनातनी दहशतवादीच होते.
कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या समाज सुधारणेच्या कार्याला संपवण्यासाठी त्यांना ठार मारणारे सनातनी दहशतवादीच होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, स्त्रियांना या समाजात स्थानच नाही. त्या केवळ उपभोगाच्या वस्तू आहेत, असे मानणारे सनातनी दहशतवादीच होते. आपली आई उपभोगण्याची वस्तू आहे, असे मानणारे सनातनी दहशतवादीच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान ज्या सनातनी दहशतवादाविरोधात होते, त्या मनु स्मृतीला आपले संविधान मानणारे सनातनी दहशतवादीच होते. या सनातनी दहशतवादाने भारताला जाती-व्यवस्थेत ढकलले अन् सनातन्यांनीच देशात विषमतावादी वर्णव्यवस्था लादली. अशांना सनातनी दहशतवादी म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? ‘सनातनी दहशतवाद’ हा शब्द मागील हजारो वर्ष अस्तित्वात होता अन् पुढील हजारो वर्ष अस्तित्वात राहिल. जोपर्यंत जातीव्यवस्था – वर्णव्यवस्था आहे, तोपर्यंत सनातनी दहशतवाद विसरताच येणार नाही.

लष्करी अधिकाऱ्याची स्पाइसजेटच्या 4 कर्मचाऱ्यांना मारहाण:एकाचा पाठीचा कणा तुटला, तर दुसऱ्याचा जबडा; बेशुद्ध कर्मचाऱ्याला लाथा मारत राहिला..

नागरी विमान वाहतूक मंत्रालयालाही पत्र पाठवण्यात आले..७ दिवसानंतर घटना उघडकीस ..

श्रीनगर -जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर विमानतळावर, एका लष्करी अधिकाऱ्याने अतिरिक्त सामानावरून स्पाइसजेटच्या चार कर्मचाऱ्यांना मारहाण केली. एका कर्मचाऱ्याचा पाठीचा कणा तुटला. दुसऱ्याचा जबडा तुटला. तिसऱ्याच्या नाकातून रक्त येऊ लागले. तरीही आरोपी त्यांना लाथा मारत राहिला, चौथा कर्मचारी बेशुद्ध पडला.ही घटना २६ जुलै रोजी घडली. हे प्रकरण आता उघडकीस आले आहे. एअरलाइननेही एक निवेदन जारी करून आरोपी लष्करी अधिकाऱ्याला नो-फ्लाइंग लिस्टमध्ये टाकले आहे. लष्करानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि आरोपींवर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.
२६ जुलै रोजी, श्रीनगरहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या फ्लाइट SG-386 च्या बोर्डिंग गेटवर एका प्रवाशाने, जो लष्करी अधिकारी असल्याचे सांगितले जाते, त्याने चार कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला.एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, आरोपी अधिकाऱ्याकडे दोन केबिन बॅगा होत्या, ज्यांचे एकूण वजन १६ किलो होते. हे ७ किलोच्या मर्यादेच्या दुप्पट होते. स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला सांगितले की तुमचा सामान निर्धारित मानकांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.आरोपी अधिकाऱ्याने अतिरिक्त पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर, तो बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण न करता जबरदस्तीने एअरोब्रिजमध्ये घुसला. हे सुरक्षा नियमांचे उल्लंघन होते.

कर्मचाऱ्यांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जवळच ठेवलेल्या स्टँडने त्याने कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यांना लाथा आणि मुक्काही मारले. त्यापैकी काहींना जबड्याला दुखापतही झाली.स्पाइसजेटचा एक कर्मचारी जमिनीवर बेशुद्ध पडला, पण प्रवासी बेशुद्ध कर्मचाऱ्याला लाथ मारत राहिला. बेशुद्ध कर्मचाऱ्याला मदत करण्यासाठी खाली वाकत असताना, दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या जबड्यावर जोरदार लाथ मारली गेली आणि त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येऊ लागले. जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे एअरलाइनने सांगितले. नागरी विमान वाहतूक नियमांनुसार, प्रवाशाला नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.स्पाइसजेटने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून त्यांच्या कर्मचाऱ्यांवरील प्राणघातक हल्ल्याची माहिती दिली आहे आणि योग्य कारवाई करण्याची विनंती केली आहे. एअरलाइनने विमानतळ अधिकाऱ्यांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना सोपवले आहे.

‘सीएसआर’च्या चांगल्या विनियोगासाठी स्वयंसेवी संस्था, कंपन्यांमध्ये समन्वय हवा

डॉ. अनिता मोहिते यांचे प्रतिपादन; उदयकाळ फाउंडेशन, उदयगिरी सोशल फाऊंडेशनतर्फे ‘सीएसआर कॉन्फरन्स २०२५’ 

पुणे: “समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक स्वयंसेवी संस्था धडपड करीत असतात. त्यांच्या या कार्याला व्यापक करण्यासह परिवर्तनशील विकास साकारण्यासाठी निधीची गरज असते. ही गरज भागविण्याचे काम उद्योगांची सामाजिक बांधिलकी (सीएसआर) करते. ‘सीएसआर’चा चांगला विनियोग करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि कंपन्या यांच्यातील समन्वय महत्वपूर्ण ठरतो,” असे प्रतिपादन भारती अभिमत विद्यापीठातील सोशल सायन्स सेंटरच्या प्रभारी संचालिका डॉ. अनिता मोहिते यांनी केले.

उदयकाळ फाऊंडेशन आणि उदयगिरी सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सीएसआर कॉन्फरन्स २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मोहिते  बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात व्हर्टिव कंपनीचे वरिष्ठ संचालक डॉ. प्रशांत शिनगारे, अपिकोअर फार्मास्युटिकल्सचे उपाध्यक्ष डॉ. नंदकुमार पाटील, उदयगिरी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष राम माने, संयोजक व उद्याकाळ फाउंडेशनचे सचिव मयूर बागूल व आरती बागूल आदी उपस्थित होते. 

सामाजिक विकास क्षेत्राची संकल्पना यावर समता शक्ती फाउंडेशनच्या संचालिका अर्चना गोमजे, प्रकल्प प्रस्ताव लेखन व निधीचे स्रोत यावर सिलॅबलच्या संस्थापिका डॉ. समीक्षा नेरुरकर, सीएसआर: कंपनीचा दृष्टीकोन यावर कल्याणी टेक्नोफोर्जचे राहुल सावंत, स्वयंसेवी संस्थांकडून कंपनीच्या अपेक्षा यावर अमडॉक्सच्या सीएसआर मॅनेजर दीप्ती घोणे कांबळे, स्वयंसेवी संस्था आणि सोशल मीडियावर विकास तिवस्कर यांनी विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले.  

डॉ. अनिता मोहिते म्हणाल्या, “स्वयंसेवी संस्थांनी ग्रामीण भागात पोहोचायला हवे. तिथे अनेक कामे करण्याची गरज असून, त्यामध्ये ‘सीएसआर’चे महत्व खूप आहे. विकास प्रकल्पांचे चांगले प्रस्ताव, अहवाल बनवायला पाहिजेत. कंपन्यांपर्यंत आपले काम पोहचले, तर निधी उपलब्ध होऊ शकतो. ‘एमएसडब्ल्यू’ झालेली व्यक्ती सोबत असल्यास हे काम अधिक प्रभावीपणे होऊ शकते.”

डॉ. प्रशांत शिनगारे म्हणाले, “चांगल्या कामांसाठी कंपन्या नेहमीच निधी उपलब्ध करून देतात. समाजोपयोगी उपक्रमांना त्यांनी पाठिंबा दिल्यास शाश्वत बदल घडवता येतो. युवकांनीही पुढाकार घेत सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करावा. हे उपक्रम केवळ समस्या सोडवत नाहीत, तर समाजात आशावाद आणि प्रेरणा निर्माण करतात.”

डॉ. नंदकुमार पाटील म्हणाले, “कंपन्यांनी केवळ व्यवसायिक लाभ न पाहता सामाजिक जबाबदारीही पार पाडली पाहिजे. आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण यासारख्या क्षेत्रांत गुंतवणूक केल्यास समाजाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. स्थानिक उपक्रमांना पाठिंबा देणे ही काळाची गरज असून अशा प्रयत्नांतून कंपन्यांची सकारात्मक प्रतिमा निर्माण होते.”

राम माने यांनीही मनोगत व्यक्त केले. मयूर बागुल यांनी स्वागत-प्रास्ताविकात परिषदेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. केतकी पवार, वर्षा डांगी यांनी सूत्रसंचालन केले. कार्तिक चव्हाण यांनी आभार मानले. वर्षा डांगे, कार्तिक चव्हाण, राहुल माने यांनी परिषद यशस्वी साठी प्रयत्न केले.

गुरुकुल भक्तिवेदांत, उरळी कांचन येथे सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम

उरळी कांचन, – क्विक हील फाउंडेशन आणि एसपी कॉलेज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षण फॉर सायबर सुरक्षा” या उपक्रमांतर्गत गुरुकुल भक्तिवेदांत येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात विद्यार्थ्यांना वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देत सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याच्या विविध पद्धती समजावून सांगण्यात आल्या. विशेषतः सोशल मिडिया, ऑनलाइन गेमिंग, फिशिंग लिंक, पासवर्ड सुरक्षा यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

या सत्राद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे सायबर हल्ल्यांची परिणामकारकता आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यांची जाणीव करून देण्यात आली. तसेच, सायबर सुरक्षिततेसाठी काही महत्त्वपूर्ण टिप्सही दिल्या गेल्या. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभावी ठरला.

पद्मश्री डॉ. शंकर महादेवन यांनी गायलेले “बाप्पा मोरया” गाणं प्रकाशित 

राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि युवा उद्योजक श्री पुनीतदादा बालन यांच्या हस्ते प्रकाशित

पुणे-पद्मश्री डॉ. शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड झालेलं “बाप्पा मोरया” हे गाणं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं.

या गाण्याची निर्मिती अमोल घोडके आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी केली असून, हे गाणं संपूर्ण महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी एक भक्तिपूर्ण सांस्कृतिक भेट ठरेल.

या गाण्याच्या माध्यमातून हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची परंपरा जपणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांचा जयघोष करण्यात आला आहे. पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक संगीताचा संगम साधणाऱ्या या गीतात गणेशोत्सवाचे वैभव प्रभावीपणे उभं राहिलं आहे.

“बाप्पा मोरया” या गाण्याला शंकर महादेवन यांचा सुमधुर स्वर लाभला असून, गीताचे बोल आणि संगीत शैलेश चंद्र लोखंडे यांनी लिहिले आणि संगीतबद्ध केले आहेत. संगीत संयोजन अवी लोहार यांनी केले असून, रिदम नागेश भोसेकर आणि नितीन शिंदे यांनी केले आहे. गाण्याला भक्तिरसात रंगवण्यासाठी अभिषेक शिंदे, रविराज काळे, समिहान सहस्त्रबुद्धे आणि मनोहर नारवडे यांनी कोरस गायनातून योगदान दिले असून या गीताचे मिक्सिंग अजिंक्य ढापरे यांनी केले आहे.

गाण्याच्या प्रकाशनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुनीत बालन यांनी “बाप्पा मोरया” या गीताला शुभेच्छा दिल्या.

दादा जे. पी. वासवानी यांची १०७ वी जयंती – ‘जागतिक क्षमादिन’ म्हणून साजरी

पुणे-

२ ऑगस्ट २०२५ रोजी पूज्य दादा जे. पी. वासवानी यांची १०७ वी जयंती जगभरात ‘जागतिक क्षमादिन’ म्हणून साजरी करण्यात आली. यंदाच्या वर्षीचा संदेश होता — “सोडून द्या… आणि मोकळं व्हा!”

दादा जे. पी. वासवानी यांनी क्षमाशक्तीच्या रूपांतरकारी सामर्थ्याचा जोरकस प्रचार केला. ते कायम सांगायचे, “क्षमा ही अंतःशांती आणि आत्मिक आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.” त्यांच्या या शिकवणुकीच्या प्रेरणेने दरवर्षी २ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक क्षमादिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दुपारी २ वाजता ‘मोमेंट ऑफ कॅाल्म’ — म्हणजेच ‘शांततेचा क्षण’ पाळला जातो, जो क्षमेला समर्पित असतो.

‘लेट-इट-गो’ बॉक्सचा उद्घाटन नुकतेच साधु वासवानी मिशनच्या प्रमुख दिदी कृष्णा कुमारी यांच्या हस्ते झाले. दादांच्या शिकवणुकीतून प्रेरित होऊन तयार केलेला हा बॉक्स एक प्रतीकात्मक साधन आहे — जे लोकांना त्यांच्या राग, दुःख, भीती यांसारख्या नकारात्मक भावना लिहून त्यात टाकण्यास प्रोत्साहित करतो, जेणेकरून त्या भावना अंतःकरणातून मुक्त होतील. हा उपक्रम हे शिकवतो की अशा नकारात्मक भावनांना दडपणं नव्हे, तर त्यांना पूर्णतः सोडून देणं आवश्यक आहे — ज्यातून मानसिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्य प्राप्त करता येतं. असे ४५० हून अधिक बॉक्सेस जगभरातील विविध शहरांमध्ये ठेवण्यात आले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

भोपाळच्या कविता यांनी सांगितले की, क्षमा ही रोजच्या सवयीचा भाग बनवल्यामुळे त्यांचे जीवनच पालटले. पूर्वी मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्या भोगत असलेल्या कविता आता अधिक हलकं, शांत आणि अनेक व्याधींपासून मुक्त वाटतात.

या उपक्रमात लायन्स क्लब, मास्टरकार्ड आणि वीवर्क यांसारख्या नामांकित कॉर्पोरेट संस्थांनी सहभाग घेतला. परमार्थ निकेतन, ब्रह्माकुमारीज आणि श्रीमद् राजचंद्र मिशन यांसारख्या आध्यात्मिक संस्थांनी देखील ‘मोमेंट ऑफ कॅाल्म’ पाळून सहभाग दर्शवला. भारतभरातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक ‘लेट-इट-गो’ बॉक्सच्या उपयुक्ततेचे कौतुक करत आहेत. सिंगापूर, बार्सिलोना, लॉस एंजेलिस आणि हाँगकाँग येथील साधु वासवानी केंद्रांनीही हे अभियान राबवलं.

२६ जुलै रोजी दिल्ली, न्यू यॉर्क, पुणे, मुंबई, बेंगळुरू, सिंगापूर, टेनेरिफ (स्पेन) आणि लंडन यांसारख्या शहरांमध्ये वॉकाथॉनसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर येथे “फोर्गिव्ह. रिलीझ. राईझ फ्री.” या शीर्षकाचा विशेष कार्यक्रम पार पडला, ज्याने जागतिक पातळीवर लक्ष वेधून घेतलं.

घराघरांत, कार्यालयांत, मंदिरे आणि वर्गखोल्यांत — सर्वत्र लोकांनी जुने राग, दुःख आणि भावनिक ओझं सोडून देण्यासाठी या उपक्रमात भाग घेतला.

पुणे येथील मिशनच्या मुख्यालयात तीन दिवसांचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये सत्संग, भजन, कीर्तन व दादा वासवानी यांचे प्रवचन सादर करण्यात आले. दिदी कृष्णा यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की, आपल्या त्रुटी लपवण्यात काहीही उपयोग नाही. प्रत्येकाने त्या गुरूंच्या चरणी कबूल करून क्षमा आणि आशीर्वाद मागावा, असे त्यांनी आवाहन केले.

मिशनच्या विविध संस्थांमार्फत अनेक व्यापक सेवा उपक्रमही राबवण्यात आले.

क्षमेबद्दल बोलताना दिदी म्हणाल्या, “क्षमेच्या वृत्तीइतका सद्गुणांचा विकास करणारा दुसरा कोणताही मार्ग नाही.”

‘मोमेंट ऑफ कॅाल्म’ ही मोहीम दरवर्षी नव्या लोकांपर्यंत पोहोचत आहे, कारण अधिकाधिक लोकांना समजत आहे की ‘लेट गो’ केल्यामुळे मिळणारी भावनिक आणि आध्यात्मिक मुक्तता किती अमूल्य आहे.

दादा जे. पी. वासवानी हे भारताचे प्रख्यात संत, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि मानवतावादी होते — ज्यांना संपूर्ण जगात प्रेमाचा प्रेषित म्हणून ओळखलं जातं. विज्ञान विषयात उच्च शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य प्रेम, करुणा आणि आध्यात्मिक शहाणपणाच्या सेवेत अर्पण केलं.

एकदा एका विद्यार्थ्याने त्यांना विचारलं, “माझा मित्र वारंवार तीच चूक करतो, मी काय करावं?” त्यावर दादा हसून म्हणाले, “तो चुकत राहो, तू क्षमा करत राहा!” दादा कायम सांगायचे, “क्षमा करत राहा! ज्या प्रमाणात तुम्हाला देवाने क्षमा करावी असं वाटतं, त्याच प्रमाणात तुम्हीही इतरांना क्षमा करायला हवी.”

संविधानाशी सुसंगत बाबासाहेब शिंदे यांचे कार्य : डॉ. श्रीपाल सबनीस

सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सत्कार

पुणे : भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानवकेंद्रीत आहेत. माणूसपण आणि सेवेतून समर्पण या भावनेतून बाबासाहेब शिंदे संविधानाशी सुसंगत भूमिका घेऊन समाजकार्य करीत आहेत, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.

मनोहर कोलते मैत्र संघ, पुणे, नवरत्न ओल्ड एज होम आणि स्नेहछाया परिवार बालकाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 3) महावितरणमधील प्रधान यंत्रचालक बाबासाहेब शिंदे यांचा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महावितरण मानव संसाधन विभागाचे संचालक राजेंद्र पवार, मनोहर कोलते, आर. टी. देवकांत, अनिता राकडे, दत्तात्रय इंगळे मंचावर होते. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जगत्‌‍गुरू संत तुकाराम महाराज यांची पगडी, शाल देऊन शिंदे यांचा गौरव करण्यात आला.

डॉ. सबनीस पुढे म्हणाले, शिंदे यांची भूमिका संघर्षाची असली तरी विचार संवादी आहेत. संवेदनेमुळे बोलण्यात आलेले कौशल्य अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले आहे. त्यांच्या सेवाकार्याची साक्ष अनेक उदाहरणांमधून दिसून येत आहे.

राजेंद्र पवार म्हणाले, शिंदे यांनी मैत्रीभाव जपत सहकारी, मित्रांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्यातील विनम्रता हा सहकारी आणि मित्रांमधील खरा दुवा आहे.

पुस्तकांची उपयुक्तता लक्षात घेऊन ज्या शाळांमध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले अशा शाळांना, नवरत्न वृद्धाश्रम, स्नेहछाया बालकाश्रमास पुस्तके भेद दिली. वाचनातून मनुष्य घडत जातो त्यामुळे विविध संस्था, शाळांना पुस्तके भेट देत असल्याचे बाबासाहेब शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. आर. टी. देवकांत यांनी मनोगत व्यक्त केले.

सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मनोहर कोलते म्हणाले, शिंदे यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेतली जावी या उद्देशाने त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बाबासाहेब शिंदे यांच्या कार्याची माहिती चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत थेटे यांनी केले.

मंगळागौर: स्त्रियांच्या भक्ती आणि संस्कृतीचे आध्यात्मिक माध्यम – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे (३ ऑगस्ट, २०२५): कोथरूड येथील भुसारी कॉलनी परिसरात श्रावण महिन्याच्या निमित्ताने आयोजित ‘श्रावणबहार गीत आणि मंगळागौर’ कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळागौरचे महत्त्व सांगितले. त्या म्हणाल्या की, मंगळागौर हा केवळ स्त्रियांच्या मनोरंजनाचा खेळ नसून, तो भक्ती, सामाजिक एकोपा आणि स्त्रीशक्तीचे दर्शन घडवणारे एक आध्यात्मिक माध्यम आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन सौ. मीनल निलेश धनवटे आणि निलेश धनवटे यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी श्रावण महिन्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले. मंगळागौरच्या खेळांतून स्त्रिया एकमेकांशी नातेसंबंध दृढ करतात आणि आपली सांस्कृतिक परंपरा जपतात, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. गोऱ्हे यांनी पुढे म्हटले की, या परंपरा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत आणि त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. या खेळांमध्ये शारीरिक चपळता, गाणी, फुगड्या, उखाणे आणि समूहभावना यांचा सुंदर संगम दिसून येतो.

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कोथरूडमधील महिलांचे डॉ. गोऱ्हे यांनी कौतुक केले. रविवार असूनही वेळात वेळ काढून हिंदू धर्म आणि संस्कृती जपण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी महिलांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे, युवासेना सरचिटणीस अनिकेत जवळकर, शिवसेना शहरप्रमुख (महिला आघाडी) श्रद्धा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. शेवटी, सौ. श्रद्धा शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.