Home Blog Page 348

महाराष्ट्रातील 1 कोटी बहीणींना लखपती दीदी करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजपातर्फे ‘माझा भाऊ देवाभाऊ’ अभियानांतर्गत राखी प्रदान सोहळा जल्लोषात संपन्न

मुंबई- लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात येत्या काळात एक कोटी बहीणींना लखपती दीदी केल्याशिवाय राहणार नाही. महिलांना सक्षम करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे आहे. यासाठी केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार विविध योजना आखत आहेत. विरोधक कितीही टीका करोत पण महिलांसाठी सुरु केलेली एकही योजना पुढची पाच वर्षे बंद होणार नाही, अशी ग्वाही विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. भारतीय जनता पार्टीच्या ‘माझा भाऊ देवाभाऊ’ या अभियानाचा भाग म्हणून जिल्हाभरातील लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी प्रेमपूर्वक पाठविलेल्या हजारो राख्या सुपूर्त करण्याचा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
लाडक्या बहिणींनी पाठवलेल्या राख्या मुख्यमंत्र्यांनी सन्मानपूर्वक स्वीकारल्या. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. यावेळी सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ. विद्या ठाकूर, मंदा म्हात्रे, कालीदास कोळंबकर, अमित साटम, संजय उपाध्याय, कॅप्टन तमिळ सेल्वन, सुलभा गायकवाड, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, आ. संजय केनेकर, माधवी नाईक, राजेश पांडे, ज्येष्ठ नेत्या कांता नलावडे, नीता केळकर, प्रा. वर्षा भोसले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला राज्यभरातून मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी उपस्थित होत्या.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यभरातील बहीणींच्या राख्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम राबवण्यात आला त्याबद्दल धन्यवाद. मला जन्मभर या बहीणींच्या ऋणातच रहायचे आहे, त्यांचे उतराई व्हायचे नाही. या राख्यांना भाषा, धर्म, पंथ, जात नाही, निरपेक्ष प्रेमाच्या ह्या राख्या प्रतिक आहेत. इतक्या बहीणींचे प्रेम ज्याच्यापाशी आहे अशा माझ्यासारख्या भावाला कुणाचीही भीती नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडक्या बहीणींच्या प्रेमाची दखल घेतली. लाडक्या बहीणींच्या मताला व्होट चोरी म्हणणारेच सर्वात मोठे चोर आहेत अशी प्रखर टीका श्री. फडणवीस यांनी केली. व्होट चोरी म्हणणाऱ्यांचे डोके चोरी झाले आहे, बुद्धी चोरी गेली आहे. माझ्या लाडक्या बहीणींना विनंती आहे की अशा निर्बुद्धांसाठी 25 टक्के आशीर्वाद मागा जेणे करून त्यांना अक्कल येईल. परदेशात जाऊन भारताची बदनामी करणारे आता बिहारमध्ये महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. पण यांना ना परदेशात ना बिहारमध्ये कोणी विचारणार आहे. महाराष्ट्रात जी यांची गत झाली तीच गत बिहारमध्ये होणार आहे. मातृशक्ती मोदीजींच्या पाठीशी आहे. बहीणींची मान अभिमानाने उंचावेल असेच कार्य आम्ही करू. देश, राज्य, समाज हितासाठी काम करू. तुमचे प्रेम आशीर्वाद असेच मिळो, प्रेम मिळाले तर महाराष्ट्राला परिवर्तित करून दाखवू अशी ग्वाही ही त्यांनी दिली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण म्हणाले की राजकारणाच्या पलिकडे जाऊन दिवसाचे 18 तास केवळ महाराष्ट्र आणि प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी जे आवश्यक गरजेचे आहे ते घडवण्याचा प्रयत्न करतो अशा लाखमोलाच्या भावाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनोखी भेट द्यायला हवी या विचाराने हा राखी प्रदान सोहळा आखला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी 36 लाख 78 हजार राख्या राज्यभरातून आल्या. महाराष्ट्राला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी देवाभाऊंनी अविरत केलेले काम सर्वापर्यंत त्यांच्या भगीनींनी पोहोचवायला हवे, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
यावेळी आ. चित्रा वाघ म्हणाल्या की देवाभाऊंच्या संकल्पनेनुसार महिलांच्या हाताला काम मिळून दाम मिळावे यासाठी महिला सेवा सहकारी संस्था स्थापन केल्या. हा देवाभाऊ लाडक्या बहिणींच्या भल्यासाठी नेहमी झटत असतो. असा भाऊ मिळणे म्हणजे भाग्य आहे. यशवंत, किर्तीवंत व्हा या शुभेच्छा त्यांनी दिल्या. जो निर्णय देवाभाऊ घेतील तो निर्णय तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महिला मोर्चाची आहे अशी ग्वाहीही दिली.
यावेळी श्री. शेलार म्हणाले की, हा मेळावा भावनिक आणि नाते जपणारा कार्यक्रम आहे. लाडक्या बहिणींची सदैव काळजी करणारा देवाभाऊ आणि त्यांच्या बहिणींचे नाते अनोखे आहे. मुंबई, मराठी वरून राजकारण करणारे आणि देवाभाऊ यांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून राजकारण करणारी मंडळी आज भावाभावाचे नाते जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक घरातील बहीणीला मतदार म्हणून नाही तर बहीण म्हणून बघणारा भाजपा आहे. त्या बहीणींच्या हितासाठी अनेक योजना केंद्र आणि राज्य स्तरावर आज आखल्या जात आहेत.

बहीणींच्या आशीर्वादाने 2029 साली ही आमचेच सरकार येणार
बहिणींच्या प्रेमाचे आशीर्वाद मिळाले म्हणूनच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊन तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी मला लाभली असे नमूद करीत श्री. फडणवीस यांनी बहिणींच्या आशीर्वादाने 2029 मध्येही आमचेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केला. येणाऱ्या काळात महायुती सरकार महिला सहकारी संस्थांसाठी डेडीकेटेड काम मिळायलाच हवे यासाठी त्यांना हिस्सेदारी व हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्‍या गाथा खडके, शर्वरी शेंडेला कांस्य

खेळाडूंसाठी धावले महाराष्ट्राचे मंत्रीकॅनडाला रवाना होण्यासाठी भारतीय संघांचे विमाना १५ ऑगस्‍ट रोजी होते. परंतु एअर कॅनडाचा संप झाल्यामुळे भारताच्या संघ 4 दिवस विमानतळावरच अडकून पडला होता. भारतीय तिरंदाजी संघटना आणि साईने यांनी विशेष प्रयत्न केले. अखेर महाराष्ट्राचे केंद्रिय राज्‍यमंत्री रक्षाताई खडके आणि मुरलीधर मोहोळ खेळाडूंच्‍या मदतीला धावले. या मराठमोळ्या मंत्र्यांच्‍या प्रयासाने प्रयत्न खेळाडूंना वेळेवर कॅनडाला रवाना झाले. संघाचे मार्गदर्शक रणजीत चामले हे स्पर्धेच्या दिवशी पहाटे साडेचार वाजता कॅनडात पोचलले. नाट्यमय घडामोडीनंतर भारतीय संघाने ही कामगिरी केली केल्‍याने क्रीडा मंत्रालय व साईकडून खेळाडूंचे कौतुक होत आहे.

पुणे ः कॅनडा येथे सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या गाथा खडके, शर्वरी शेंडेने जियाना कुमारच्‍या साथीने ऐतिहासिक कांस्यपदकाचा कामगिरी केली आहे.
अमेरिकेच्या संघाचा ६-० ने दणदणीत विजय नोंदवून १८ वर्षांखालील रिकरर्व्ह प्रकारात भारतीय मुलींनी कांस्यपदकाचा पराक्रम केला आहे. पात्रता फेरीत भारत चौथ्या स्‍थानावर होता. उपउपांत्‍यपूर्व फेरीत मेक्सिको संघावर ६-० ने सेटने पराभव करून स्‍पर्धेत विजयी सलामी दिली. उपांत्‍यपूर्व लढतीत बलाढ्य जपान संघाचा 5-3 सेटने पराभव भारताने उपांत्‍य फेरीत मुसंडी मारली होती. उपांत्‍य फेरीत कोरिया संघाने भारताला कडवी झुंज दिली. ६-२ सेटपर्यंत लढत रंगली. अखेर 1 गुण फरकाने कोरियाने निसटता विजय संपादन केला.
कांस्य पदकाच्‍या लढतीत अमेरिकेला भारताने एकाही विजयाची संधी दिली नाही. ५५-५३, ५९-५६,५५-५२ गुणांसह ६-० सेटने भारताने ऐतिहासिक कांस्य पदकाचर मोहर उमटवली. भारतीय संघांचे प्रशिक्षक प्रा रणजित चामले हे या संघांचे प्रशिक्षक होते. रणजीत सरांच्‍या प्रोत्‍साहनामुळे हे यश हाती आले असे सोलापूरच्‍या गाथा खडके हीने सांगितले. कांस्य पदक विजेता संघात सोलापूरच्‍या गाथा खडके, पुण्याच्‍या शर्वरी शेंडेसह चंदिगडच्‍या जियाना कुमार हीचा समावेश होता.

टाटा क्लिक लक्झरीच्या विशेष भागीदारीत सब्यसाचीने सादर केले संपूर्ण भारतासाठी डिजिटल बुटिक

हे डिजिटल बुटिक २१ ऑगस्ट २०२५ पासून टाटा क्लिक लक्झरी प्लॅटफॉर्मवर सुरू होईल; यात सब्यसाची कलकत्ताकडील १८ कॅरेट सोन्यात घडवलेला, व्हीव्हीएस-व्हीएस ईएफ कलर ब्रिलियंट कट हिरे, नैसर्गिक मोती, मौल्यवान रत्ने आणि ब्रँडच्या खास कारागिरी यांनी सजलेला फाइन ज्वेलरीचा निवडक संग्रह सादर केला जाईल.

पुणे : टाटा क्लिक लक्झरी या भारतातील लक्झरी लाइफस्टाइलच्या अग्रगण्य प्लॅटफॉर्मने देशातील पहिले डिजिटल ज्वेलरी बुटिक सुरू करण्यासाठी सब्यसाची कलकत्ता या भारतातील प्रमुख लक्झरी ब्रँडशी विशेष भागीदारी जाहीर केली आहे. परंपरेची सांगड आणि डिजिटल नवकल्पना यांचा अनोखा संगम या भागीदारीत असेल. त्यामुळे सब्यसाचीचे अप्रतिम कारागिरीचे नमुने अधिक लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या चिरंतन लक्झरीच्या वारशाला साजेसे राहतील.

हे बुटिक २१ ऑगस्ट २०२५पासून टाटा क्लिक लक्झरी प्लॅटफॉर्मवर सुरू झाला आहे . सब्यसाचीच्या फाइन ज्वेलरीचा सर्वांत मोठा संग्रह यामध्ये ऑनलाइन उपलब्ध असेल. १८ कॅरेट सोन्यात तयार करण्यात आलेल्या या संग्रहात कोलकात्याच्या सुप्रसिद्ध अटेलिअरमधून आलेल्या विविध फाइन ज्वेलरी कलेक्शन्सचा समावेश आहे.

यातील रॉयल बंगाल हेरिटेज गोल्ड कलेक्शनमध्ये शुद्ध सोन्यात कोरलेले बंगाली वाघाचे प्रतीकचिन्ह आणि पारंपरिक सब्यसाची मंगळसूत्र यांचा समावेश आहे. रॉयल बंगाल डायमंड कलेक्शनमध्ये व्हीव्हीएस-व्हीएस ईएफ कलर ब्रिलियंट कट हिरे, मौल्यवान रत्ने आणि नैसर्गिक स्टोन चार्म्स जडवले आहेत. रॉयल बंगाल पर्ल सीरीजमध्ये नैसर्गिक, कल्चर्ड आणि‘साउथ सी मोत्यांचा समावेश आहे. सुंदरबन कलेक्शन या संग्रहात इतिहासात डोकावणाऱ्या प्राचीन हस्तकलेचे ज्ञान फुलाफळांच्या रूपात खुलणारे आहे. टायगर स्ट्राईप आणि शालिमार कलेक्शन्स ही १८ कॅरेट सोन्यात लॅकरची कलात्मक झाक देऊन तयार करण्यात आलेली आधुनिक प्रतीके आहेत. टायगर आय गटात हिरेजडित बंगाली वाघाचे प्रतीक आहे. इतर उत्पादनांच्या यादीत इअरिंग्स, लॉकेट्स, ब्रेसलेट्स आणि अंगठ्या आहेत. हे सर्व दागिने दैनंदिन वापरातील सौंदर्य लक्षात घेऊन घडवलेले आहेत.

एखाद्या खास प्रसंगासाठीची खरेदी असो, वैयक्तिक स्टाईलसाठी असो किंवा मनापासून द्यावयाच्या भेटीसाठी असो, टाटा क्लिक लक्झरीच्या ग्राहकांना सब्यसाचीच्या या विविध उत्पादनांच्या खरेदीचा खास वैयक्तिक अनुभव जाणकार तज्ज्ञांच्या मदतीने घेता येईल.

सब्यसाचीच्या सादरीकरणाविषयी बोलताना टाटा क्लिक लक्झरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल आस्थाना म्हणाले, “टाटा क्लिक लक्झरीमध्ये आम्ही भारतीय, तसेच जागतिक लक्झरीचा उत्सव साजरा करतो. जगातील सर्वोत्तम लक्झरी ब्रँड्सची जपून निवड करण्याच्या आमच्या कटिबद्धतेला आणखी बळकटी देणारे हे सब्यसाचीचे सादरीकरण आहे. अप्रतिम कारागिरीसाठी आणि भारतीय परंपरेशी घट्ट नात्यासाठी सब्यसाची प्रसिद्ध आहे. हा ब्रॅंड पारंपरिक सौंदर्यशास्त्र आणि जागतिक आकर्षण यांचा अनोखा संगम सादर करतो. सब्यसाचीच्या फाइन ज्वेलरीचे आमच्या प्लॅटफॉर्मवर पदार्पण होत असल्यामुळे आमच्या लक्झरी ज्वेलरी संग्रहाची प्रतिष्ठा अधिकच उंचावली आहे. देशातील टियर-२ व टियर-३ शहरांतील कलासक्त ग्राहकांसह संपूर्ण भारतात हा प्रतिष्ठित ब्रँड आम्ही पोहोचवीत आहोत. भारतातील आघाडीचा लक्झरी प्लॅटफॉर्म आणि देशातील सर्वाधिक गौरवशाली डिझायनर या निमित्ताने एकत्र येत असल्यामुळे डिजिटल युगातील फाइन ज्वेलरी अनुभवाची नवी व्याख्या या विशेष भागीदारीतून परिभाषित होत आहे.”

सब्यसाची कलकत्ता एलएलपीचे संस्थापक व क्रिएटिव्ह डायरेक्टर सब्यसाची मुखर्जी म्हणाले, “टाटा क्लिक लक्झरीवर सब्यसाची फाइन ज्वेलरी सादर करताना मला अभिमान वाटतो. ज्यामुळे आमचा ब्रँड सदैव लोकांच्या मनात घर करून आहे, त्याच गाभ्याने, तेवढ्याच चिरंतन उच्च मानकांनी आणि तेवढ्याच विलक्षण मूल्यदृष्टीने हा संग्रह साकारला आहे. आमची किंमत स्वप्नवत नाही, तर वास्तवाशी जोडलेली आहे. सुसंस्कृत, परंपरांशी निगडित आणि चिरंतन ही मूल्ये ग्राहकांना ‘सब्यसाची हाऊस’कडून अपेक्षित असतात, ती सर्व या कलेक्शनमध्ये समाविष्ट आहेत. भारतात आपण किंमतींबद्दल बरेच बोलतो, पण मूल्याबद्दल फारसे बोलत नाही. तुम्ही लोकांना प्रामाणिकपणा आणि उत्कृष्टता देता, तेव्हा त्यांना त्यातील फरक जाणवतो, हा माझा विश्वास आहे.”

सब्यसाची कलकत्ता एलएलपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष चोप्रा म्हणाले, “टाटा क्लिक लक्झरीवर आमच्या फाइन ज्वेलरी लाईनचे पदार्पण होणे हा सब्यसाचीसाठी एक नवा रोमांचक अध्याय आहे. दोन दशकांहून अधिक काळ हा ब्रँड आपल्या प्रामाणिकतेसाठी, कारागिरीसाठी आणि शाश्वत मूल्यांसाठी ओळखला जातो. आता आमची ज्वेलरी ऑनलाइन लक्झरी रिटेलच्या जगात आणून आम्ही आमचे अटेलिअर्स आणि देशभरातील घरे यांच्यातील अंतर मिटवत आहोत. त्यामुळे नव्या पिढीला सब्यसाचीच्या मूल्यांचा अनुभव घेता येईल आणि ती मूल्ये आत्मसात करता येतील. अप्रतिम गुणवत्ता असलेली आमची फाइन ज्वेलरी आणि विचारपूर्वक ठरवलेल्या त्यांच्या किंमती, असा हा लक्झरीच्या जगात दुर्मिळ असलेला सुंदर मिलाफ आहे. टाटा क्लिक लक्झरीचे नवे दार उघडताना, आमची ज्वेलरी नवीन घरांमध्ये पोहोचेल आणि देशभरात नव्या कथांनी फुलेल, हे पाहण्यासाठी मी स्वतः उत्सुक आहे.”

सब्यसाचीच्या प्रतिष्ठित फाइन ज्वेलरीचे कलेक्शन २१ ऑगस्ट २०२५ पासून टाटा क्लिक लक्झरीवर उपलब्ध आहे .

मनोहारी नृत्याविष्काराने रंगले १७० कथक नृत्यांगनांचे ‘आवर्तन’

पुणे: चेहऱ्यावरील उत्कट भावमुद्रा… कलात्मक व लयबद्ध हालचाली… घुंगरांचा तालबद्ध नाद… अशा मनोहारी नृत्याविष्काराने कथकचे ‘आवर्तन’ रंगले. निमित्त होते, कथक नृत्याविष्काराची अनुभूती देणाऱ्या, ताल, लय व भाव यांचा मोहक संगम असलेल्या ‘आवर्तन २०२५’ कार्यक्रमाचे! कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

कथक नृत्यांगना वेदांती भागवत महाडिक यांच्या ‘लयोम इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड मीडिया’च्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त या नेत्रदीपक व हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कथक गुरु पं. राजेंद्र गंगाणी यांच्या उपस्थितीत १७० कथक नृत्यांगनांनी नृत्याविष्कार सादर केले. लहानग्यांनी ‘मैत्री असावी अशी’ या कवितेवर सादर केलेले कोमल, उमलत्या पदन्यासांचे नृत्य विशेष दाद मिळवून गेले. राग बिहाग, बागेश्री आदींच्या आल्हाददायक सुरावटींवर ‘गुरु वंदना’, ‘गगन सदन’, ‘रसिले रंगीले’, ‘निज रे’, ‘दशावतार’ यांसारख्या नृत्यरचना सादर होताच सभागृह मंत्रमुग्ध झाले.

वेदांती भागवत महाडिक यांच्यासह त्यांच्या शिष्यांनी वैविध्यपूर्ण नृत्यरचना सादर करीत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. शास्त्रीय बंदिशी, शिववंदना, गणेशवंदना, धृपद, चतुरंग, त्रिवट तराणा, तसेच तीनताल यासारख्या विविध अंगांचे सादरीकरण झाले. प्रत्येक नृत्यरचना ताल-लयबद्ध पावले, ठेक्यांची नजाकत आणि भावनांची अभिव्यक्ती यामुळे उठून दिसली. या सर्जनशील रचनांमधून प्रेक्षकांना कथकनृत्याची विविध रूपे अनुभवायला मिळाली. अभिजित पाटसकर (संवादिनी), सुनील अवचट (बासरी), मयूर महाजन (गायन), मुक्ता जोशी (गायन), यश सोमण (तबला) आणि अपूर्व द्रविड (पखवाज) यांनी साथसंगत केली. प्रशांत कात्यायन यांनी निवेदन केले.

पं. राजेंद्र गंगाणी यांनी नृत्यांगनांच्या मेहनतीचे कौतुक केले. “इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी एकाच मंचावर कथकातील अंगांचा सुसंवाद साधून नृत्य सादर करणे अद्वितीय आहे. लयोम इन्स्टिट्यूटने पुण्यात कथक संवर्धनासाठी केलेले कार्य अभिमानास्पद आहे. तरुणाईला शास्त्रीय कलेशी जोडण्याचा प्रयत्न यातून होतो आहे, हे भविष्याच्या दृष्टीने आनंददायी आहे,” असे त्यांनी नमूद केले.

संस्थेच्या मागील १५ वर्षांत चार विद्यार्थिनींना केंद्र सरकारकडून ‘सीसीआरटी’ शिष्यवृत्ती मिळाली असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांत पारितोषिके मिळाल्याचे वेदांती भागवत महाडिक यांनी सांगितले. अक्षय महाडिक यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

रूपरंगी जुगलबंदीत रसिक मंत्रमुग्ध

ब्लिसफुल विंड्‌स फाऊंडेशन आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव
पुणे : सुप्रसिद्ध बासरी वादक, गुरू पंडित रूपक कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेली बासरी वादनातील अनोखी रूपरंगी जुगलबंदी, कोलकाता येथील गायक पंडित शुभोमोय भट्टाचार्य यांनी सादर केलेले मल्हार रागातील अप्रचलित प्रकार आणि ब्लिसफुल विंड्‌स फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांचे बासरी वादन यातून गुरुपौर्णिमेचा अविस्मरणीय सोहोळा रंगला.
निमित्त होते रूपक कुलकर्णी म्युझिक फाऊंडेशन आणि ब्लिसफुल विंड्‌स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवाचे. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात शुक्रवारी (दि. २२ ऑगस्ट) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
एकाच बासरीवादकाने दोन तबला वादकांच्या साथीने केलेले वादन, त्यात दोन स्वतंत्र राग आणि दोन वेगळे ताल यांच्या माध्यामातून रंगत गेलेली सूर-तालाची अनोखी जुगलबंदी कार्यक्रमाचा कळसाध्याय ठरली. या रूपरंग जुगलबंदीत पंडित रूपक कुलकर्णी यांना ज्येष्ठ तबलावादक पंडित मुकुंदराज देव आणि त्यांचे पुत्र रोहित देव यांनी समर्पक साथ करत कार्यक्रमाची रंगत वाढविली.
पंडित रूपक कुलकर्णी यांच्या अनोख्या संकल्पनेतून ही रूपरंगी जुगलबंदी सादर झाली. त्यांनी भूपाली रागातील रूपक ताल आणि यमन रागतील मत्तताल ऐकविताना केलेले सुमधुर बासरी वादन रसिकांना संमोहित करणारे ठरले. त्यांनतर दोन्ही तबला वादकांच्या साथीने शुद्धकल्याण राग सादर करून रसिकांना स्वरवर्षावात चिंब केले. कार्यक्रमाची सांगता बासरीवादनातील मैहर घराण्याचे वैशिष्ट्य असणाऱ्या मांझ खमाज या रागाच्या सादरीकरणाने केली. निसर्गात बरसत असणाऱ्या श्रावण धारा आणि त्याचवेळी रंगमंचावर बरसत असणारे बासरीचे स्वर आणि दोन तबलजींच्या तबल्यातून उमटणारे बोल यांच्या अनोखा संगमातून रसिकांना सूरांच्या अवकाशात विहरत ठेवले. मृगेंद्र मोहाडकर, आदित्य सुतार यांनी सहवादन केले.
कोलकाता येथील सुप्रसिद्ध गायक शुभोमोय भट्टाचार्य यांनी मैफलीची सुरुवात राग गौड मल्हारमधील ‘तोरे मुख चंद्र’ या पारंपरिक बंदिशीने केली. त्याला जोडून द्रुतलयीतील ‘कारे पिरे बदरवा छाए’ ही बंदिश सादर करून ‘तानाना दिर दिर ताना’ हा तराणा बहारदारपणे सादर केला. मल्हार रागातील अभावानेच सादर होणारे अप्रचलित प्रकार ऐकविताना पंडित शुभोमोय भट्टाचार्य यांनी खमाज आणि मल्हार रागांचे मिश्रण असणाऱ्या खमाजी मल्हारमधील ‘रिमझिम रुमझुम बरसे बदरा’ ही बंदिश सादर केली. धूंधिया मल्हार हा अनोखा राग सादर करताना ‘बिजुरी चमके, बदरा गरजे’ ही बंदिश तर बिरजू की मल्हारमधील ‘जंगल बिच बोले मुरवा’ या पारंपरिक बंदिशी ऐकविल्या. त्यांना दिपिन दास (तबला), नचिकेत हरिदास (संवादिनी) यांनी साथसंगत केली.
सुरुवातीस मृगेंद्र मोहाडकर यांच्या ६० शिष्यांचे बासरीवादन झाले. यात आठ वर्षे वयाच्या शिष्यांपासून साठ वर्षे वयाच्या शिष्यांचा सहभाग होता.
कलाकरांचा सन्मान पंडित रूपक कुलकर्णी, मृगेंद्र मोहाडकर यांनी केला तर सूत्रसंचालन रजत जोशी यांनी केले.

सुरक्षा रक्षकानेच सोसायटीमध्ये केली पावणेनऊ लाखाची घरफोडी

पुणे- एमपी चा सोनी नामक तरुण पोट भरायला पुण्यात आला सोसायटीचा सुरक्षा रक्षक बनला आणि तिथेच त्याने घरफोडी करून पावणे नऊ लाखाचा ऐवज चोरून नेला . पुणे पोलिसांनी त्याला चातुर्याने पकडले असून त्याच्याकडून चोरीस गेलेला सर्व ऐवज देखील हस्तगत केला आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि. १२/०८/२०२५ रोजी पर्वती पोलीस स्टेशन हद्दिमध्ये औंदुबर सोसायटी, गणेशमळा, सिहगडरोड पुणे येथील फिर्यादी यांचे राहते घरी दि.०८/०८/२०२५ ते दि. १२/०८/२०२५ रोजीचे दरम्यान त्यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करुन स्वतःच्या आर्थिक फायदया करता घरफोडी करुन १० तोळे वजनाचे सोन्याचे व चांदिचे दागिन्यांचा ऐवज चोरीस गेला आहे. म्हणुन फिर्यादी यांनी अज्ञात चोरट्याविरुध्द फिर्याद दिलेवरुन पर्वती पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २५४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (३), ३३१ (४) प्रमाणे. गुन्हा नोंद करण्यात आला .
दाखल गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर पर्वती पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक किरण पवार, व पोलीस अंमदार, पर्वती पोलीस स्टेशन पुणे करीत असताना वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली व सुचनाप्रमाणे दोन टिम तयार करुन सोसायटीमध्ये व आजुबाजुचे परिसरात तपास केला असता सदर सोसायटीमधील वॉचमन राकेशकुमार मुलचंद सोनी वय २९ वर्षे रा. औदुंबर सोसायटी, गणेशमळा सिंहगडरोड पुणे, मुळ रा. ४९/१, राम अमिलीया, पो. पटणा कला, जि. अनुपपुर रा. मध्यप्रदेश त्यास ताब्यात घेवुन, त्याचेकडे तपास केला असता त्याने सदरची घरफोडी केल्याचे त्याने कबुल केल्याने त्यास दाखल गुन्हयाचे तपास कामी दि. १२/०८/२०२५ रोजी अटक करुन त्याने घरफोडी करुन चोरी केलेल्या सोन्यापैकी ८,६५,०००/-रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परि-०३ संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, अमोल दबडे, महेश मंडलिक, अमित चिव्हे, सुर्या जाधव, श्रीकांत शिंदे, सद्दाम शेख, मनोज बनसोड, नानासो खाडे, राकेश सुर्वे यांनी केली.

सिंगापूरच्या लेखिका नीला बर्वे…

सिंगापूर येथील लेखिका नीला बर्वे यांच्या
“कोवळं ऊन” या कथा संग्रहाचे प्रकाशन आज; शनिवारी होत आहे. त्यानिमित्ताने त्यांची ही ओळख….

मुंबईचे सांस्कृतिक केंद्र समजल्या जाणाऱ्या विलेपार्ले येथे नीलाजी यांचा जन्म झाला. घरात सर्वांना वाचनाची अत्यंत आवड. आजीसुद्धा खूप पुस्तके वाचायची, त्याबद्दल सांगायचीही! पार्ले टिळक शाळा आणि टिळक मंदिर या दोन संस्थांनी त्यांचं बालपण समृद्ध केलं. शाळेत अभ्यास आणि खेळ, सूर्यनमस्कार या सर्वांना सारखाच न्याय असे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक जडणघडण उत्तम झाली. तिथेच बी.एससी. पर्यंत शिक्षण झाले. पदवीनंतर आवड म्हणून भारतीय विद्याभवन येथे पत्रकारितेचा कोर्स केला. तेथे द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेखी आणि तोंडी परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीसाठी पत्र आले पण त्याचवेळी लग्न ठरल्याने, बॉण्ड लिहून देता आला नाही आणि आत्यंतिक आवड असलेली नोकरी मुकली ही खंत त्यांना कायम राहिली.

त्यानंतर नीलाजी पार्ले टिळक विद्यालय येथे शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. लग्न होऊन ठाण्याला गेल्या आणि तेथून रोज सकाळी येत होत्या त्यामुळे शाळेतर्फे बी.एड. करून कायमची शिक्षिका म्हणून तेथे रुजू होण्याची संधी नाकारावी लागली. कारण रोज ठाणे येथून, पहाटे साडेतीन वाजता उठून, सकाळी साडेसहाला पार्त्याला येणे कायम जमेल असे वाटले नाही. बँकेच्या परीक्षा दिल्या होत्या आणि सर्वच परीक्षा उत्तीर्ण होऊन जेव्हा नियुक्तीपत्रे आली तेव्हा सर्वांच्या सल्ल्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाची नोकरी स्वीकारली. तीही तशी दूर म्हणजे फोर्ट विभागात होती.

नोकरी आणि घरचे काम सांभाळून लेखनाची आवड जपत नीलाजी या काही वृत्तपत्रांमध्येही लेखन करीत.
तसेच घरी काही वर्षे त्यांनी मुलांच्या शिकवण्या घेतल्या.सोबतच पर्यावरण विषयक काम करणाऱ्या हरियाली या स्वयंसेवी संस्थेचे , ग्रंथालीचे , व्यायाम शाळेचे, शुभंकरोति संस्थेचे अशा विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत.

कर्तृत्ववान परंतु समाजापुढे न आलेल्या ठाण्यातील महिलांचा शोध घेऊन त्यांच्यावर नीलाजींनी एका वृत्तपत्रासाठी लेखमाला लिहिली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

बँकेची नोकरी म्हणजे सतत आकड्यांची जुळवाजुळव, पण नीलाजींनी आयुष्यभर आकड्यांची यशस्वीपणे जुळवाजुळव करीत असतानाच आपलं अक्षरप्रेम कधीच कमी होऊ दिलं नाही. बँकेमध्ये बदली होणाऱ्या व सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येकासाठी कवितेमधून निरोप देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. आजही प्रत्येकाकडे आपापली कविता आहे.

मुले मोठी झाल्यावरच नीलाजींनी प्रमोशन घेतले. बँकेत अनेक महत्त्वाची कामे सांभाळली. त्यात गृहकर्जे आणि त्यानंतर बँकेच्या सुवर्ण व्यवसायाची जबाबदारी आणि विविध योजना.

त्यानंतर नीलजींची गोव्यात बदली झाल्यावर व्यवस्थापकाच्या पदाबरोबरच येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरीतीने निभावल्या. शिवाय वेळ काढून काही वृत्तपत्रातही लिखाण केले. पणजी आकाशवाणीवरून कविता, नाट्यछटा, लेख सादर झालेच पण बँकेविषयी माहिती आणि जागृतता यावरही काही भाषणे झाली.
गोवा दूरदर्शनवरूनही त्यांचे कार्यक्रम झाले. गोव्यातील
विविध काव्यसंमेलनांची त्यांना आमंत्रणे असत.

नीलाजींचा “रानफुले “हा काव्यसंग्रह पद्मश्री प्रसाद सावकार यांच्याहस्ते प्रकाशित
झाला आहे.

नीलाजींच्या सेवानिवृत्तीला काही वर्षे असताना एका दुर्घटनेत त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यावेळी त्या गोव्यात ग्रामीण भागांत शाखाप्रमुख होत्या.पुढे नीलाजी सेवानिवृत्त झाल्यावर स्टेट बँकेने तसेच गोव्यातील काही सहकारी बँकांनी, तसेच काही वृत्तपत्रांनीही त्यांच्याकडे रुजू होण्याविषयी विचारले. पण मुलगा राहुल ,जो मद्रास आयआयटी मधून एम टेक
झाला आहे,त्यास हे कळताच त्याने त्यांना सिंगापूरला बोलावून घेतले आणि यापुढे तू नोकरी करायची नाही, खूप केलेस आत्तापर्यंत ,आता तुझे राहून गेलेले छंद पुरे करायचे असे सांगितले.

नीलाजींचे प्रांजळ मत आहे की, जर दुसऱ्या देशात कायमचे रहायला जायचे असेल तर तरुण वयात जावे. नोकरी, वाढता संसार, नव्या जागीं सेटल होण्यास धडपड होते, पण १०-१५ वर्षांत तिथलेच होऊन जातो. सारे आयुष्य एका देशात गेल्यावर, अनेक वर्षांचे स्नेहबंध सोडून दुसरीकडे जुळवून घेणे कठीण जातेच . सारा वेळ मोकळा पण बाकी कोणी नाहीत मोकळे आपल्याबरोबर संवाद साधण्यास. काही मित्रपरिवाराच्या कथा ऐकल्या होत्या. त्यांचे म्हणणे… थोडे दिवस ठीक आहे, जातो वेळ इकडेतिकडे फिरण्यात पण नंतर बोअर होते. त्यांची आपली संस्कृती, खाणे-पिणे, सारेच वेगळे. कसे जुळवून घेणार या वयात? आणि परत आले भारतात. पण त्यामुळे मुलांना काळजीच.नीलाजींनी मात्र ठरविले, मुलाला असल्या टेन्शनमध्ये अडकवायचे नाही. त्याची अपेक्षा किती माफक होती की, आईने निव्वळ आनंदात रहावे! त्याप्रमाणे त्यांनी सिंगापूर महाराष्ट्र मंडळातील उपक्रमांत भाग घेण्यास सुरुवात केली. तसेच या देशाने आधार दिला म्हणून तेथील लोकांसाठी काम करणे हे कर्तव्यच आहे असे मानून विविध संस्थांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आरएसव्हीपी सिंगापूर (ज्येष्ठ स्वयंसेवकांची संस्था) या संस्थेत सहभागी होऊन त्यांच्यातर्फे नॅशनल हार्ट हॉस्पिटल, स्त्रिया आणि मुलांसाठी असलेले के. के. हॉस्पिटल, वृद्धाश्रम, इंडियन हेरिटेज अशा निरनिराळ्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून जाऊ लागल्या. तसेच खेळांची आवड असल्याने अॅक्टिव्ह एसजी या सिंगापूरच्या क्रीडा संस्थेमध्ये सभासद होऊन निरनिराळ्या खेळांच्या स्पर्धेसाठी स्वयंसेवक म्हणून सेवा देऊ लागल्या. आंतरराष्ट्रीय रग्बीसाठी स्वयंसेवक म्हणून काम करताना विदेशातील ८ टॉपमोस्ट टीम्सच्या खेळाडूंच्या स्पर्धा त्यांना बघण्यास मिळाल्या. शिवाय हा खेळ त्या पहिल्यांदाच लाईव्ह बघत असल्याने त्याचे नियम, स्किल इ. सर्व समजावून घेण्याची संधी त्यांना मिळाली. नॅशनल व्हॉलीबॉल चॅम्पिअनशिप, बून ले येथील अॅक्टिव्ह एसजी हॉकी व्हिलेजचा उद्घाटन समारंभ (१७ ऑगस्ट २०१९) येथे फोटोग्राफर म्हणून त्या स्वयंसेवक होत्या.

सिंगापूरला आल्याआल्याच आरएसव्हीपी सिंगापूर या संस्थेला २० वर्षे झाल्याबद्दल त्यांनी लोगो स्पर्धा जाहीर केली होती. एकमेव बक्षिस होते आणि ते २०० डॉलर्स आणि गाला डिनर विथ सिंगापूर प्रेसिडेंट असे होते. नीलाजींची चित्रकलेची आवड उफाळून आली.अथक परिश्रम करून नीलाजी या स्पर्धेत सहभागी झाल्या आणि विशेष म्हणजे प्रथम क्रमांक मिळाला. त्यामुळे त्यांना मुलासह
तेथील राष्ट्रपतींना भेटायची संधी मिळाली. या लोगोमुळे संस्थेतही चांगली ओळख झाली.

नीलाजींना कॅरम लहानपणापासून अतिप्रिय. शिवाय त्या ऑल इंडिया कॅरम फेडरेशनच्या पंच. त्यामुळे सिंगापूर सरकारच्या क्रीडा अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी हा खेळ सिंगापूरमध्ये लोकप्रिय करायचा आहे, इथल्या मुलांना शिकवायचा आहे म्हणून सांगितले. काही बैठकीनंतर त्यांनी नीलाजींना कॅरमचे २ संच मंजूर केले त्याचप्रमाणे क्लेमेंटी स्पोर्ट्स हॉलमध्ये जागाही दिली. येणाऱ्या मुलांना (वयोगट ८ ते १४ वर्षे ठेवला होता) कॅरम म्हणजे काय खेळ आहे, सोंगट्या, स्ट्रायकर म्हणजे काय इ. पासून शिकविण्यास सुरुवात केली. मुले खेळांत रस घेऊ लागली, काही बऱ्यापैकी खेळू लागले पण हाय रे दैवा! कोरोनाच्या आक्रमणामुळे त्यांचा हा उपक्रम बंद पडला. काही काळाने असोसिएशन ऑफ कॅरम, सिंगापूर या नव्याने सुरू झालेल्या संस्थेतील एकाने संपर्क साधला. २०२२ मध्ये मलेशिया येथे आंतरराष्ट्रीय कॅरम वर्ल्ड चॅम्पिअनशिप आयोजित केली गेली. एसीएसने सिंगापूरतर्फे सहभाग घेतला .तिथे नीलाजींना अम्पायर म्हणून बोलावले गेले. २८ देशांच्या टॉपर्ससाठी अंपायर म्हणून एक आव्हानच ! पण त्यांनी ते एन्जॉय केले आणि तेथेच इंटरनॅशनल रेफ्रीसाठी परीक्षा दिली. ४ प्रकारात होणाऱ्या या परीक्षेत त्या पहिल्या आल्या.
परत आल्यावर नीलाजी २०२३ मध्ये नॅशनल रैंकिंगच्या स्पर्धेसाठी चीफ रेफ्री होत्या. खेळण्याचे वैयक्तिक प्रयत्न सुरूच होते. पूर्वीचे नैपुण्य नाही पण मग २०२४ मध्ये नॅशनल रैंकिंगमध्ये सहभाग घेतला. त्यात मालदीव येथे झालेल्या आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली. ही संधी त्याचवेळी त्या भारतात गेल्यामुळे नाही स्वीकारता आली पण त्यांनतर अमेरिका येथे सहाव्या कॅरम विश्वचषक स्पर्धेसाठी पुन्हां निवड होऊन त्या टीमबरोबर गेल्या. खूप चांगले अनुभव मिळाले आणि नुकतीच मे महिन्यात झालेल्या एसीएस नॅशनल स्पर्धेत भाग घेऊन २०२५ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांची निवड झाली आहे.

नीलाजी सिंगापूर महाराष्ट्र मंडळाच्या द्वैमासिकात लिहितात .मंडळातील सर्व साहित्यप्रेमी जमून दर महिन्याला कविता सादर करतात. त्यामुळे कितीही व्यस्त असले तरी कविता लिहिल्या गेल्या, असे त्या आवर्जून सांगतात. या मंडळाच्या सर्व उपक्रमांत स्वयंसेवक म्हणून सक्रिय सहभाग घेतातच पण गणपती उत्सवात एकपात्री अभिनयात भाग घेऊन अभिनयाची हौस आणि गणपतीला निरोप देतेसमयी दीड-दोन तास लेझीम खेळून तीही हौस भागवून घेतात.

नीलार्जीच्या आईवडिलांचे देशावर अफाट प्रेम होते. त्यामुळे त्यांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर बहुसंख्य लोकांना भारतदर्शन घडविले. अशी समाजसेवा त्या करू शकत नाहीत पण त्यांच्यामुळे लहानपणापासून त्यांना प्रवास खूप आवडू लागला. त्यामुळे त्या वर्षातून एक-दोन सहली एकटीनेच करतात. विविध अनुभव घेत, विविध जीवनपद्धती अनुभवत लोकांना जाणून घेत भ्रमण करतात. अर्थात यासाठी अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देऊन त्यातून बाहेर पडण्याची मनाची तयारी असते.

नीलाजी कथा, कविता, नाटुकलं, अलक, ललितलेखन, प्रवासवर्णन नियमितपणे लिहीत असतात. विशेष म्हणजे पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या अद्वितीय व्यक्तींचे ऋण म्हणून, त्यांचे कार्य सर्वांना समजावे म्हणून त्या
न्यूज स्टोरी टुडे या प्रख्यात पोर्टलवर त्यांची साप्ताहिक लेखमाला सुरू आहे. त्या व्हिडीओद्वारे कथा, कविता सादरीकरणहीकरतात. ऑनलाइन उपक्रमांना परीक्षक म्हणूनही असतात. त्यांना बागकामाची आवड असून त्यांनी सुमारे ६० झाडे बाल्कनी व लिफ्टच्या बाजूच्या जागेत लावली आहेत. तसेच एका ग्रुपला त्या मार्गदर्शनही करतात.

सिंगापूरमध्ये भारतीय सण साजरे करताना त्या शेजाऱ्यांना त्या सणांमागील वैज्ञानिक दृष्टिकोन सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी काढलेल्या रांगोळ्या इमारतीतील लोक आवर्जून बघतात. त्यांची सून सिंगापूर येथील असल्याने, त्यांच्या पद्धती, परंपरा, सण समजावून घेऊन त्यांच्यात सामावून गेल्या आहेत. यांच्याकडे दिवाळीसाठी ज्या माळा लागतात, त्या ख्रिसमस, न्यू इयर, चायनीज न्यू इयर साजरे करीत गुढीपाडव्यापर्यंत लखलखत असतात.सुनेचे माहेर खूप मनमिळावू आहे, त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीची देवाणघेवाण होत असते. त्यामुळे इथेही स्नेहबंध जुळले. दोन्ही परिवार अनेक ठिकाणी एकत्र जातात, विविध ठिकाणी एकत्र भ्रमण करीत असतात.

अनेक ऑनलाइन कार्यक्रमांचे नीलाजींनी यशस्वी आयोजन केले आहे. आळंदी येथील फुलोरा साहित्य संमेलनात त्या प्रमुख अतिथी होत्या. भारतीय स्त्रीशक्ती, ठाणेतर्फे आयोजित स्वलिखित कथाकथन स्पर्धेत तर ‘आभाळाखालची शाळा’तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय कला महोत्सवमध्ये नाट्य विभागात तसेच शॉपीझन आयोजित कथास्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
अशा या नीलाजीना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
लेखन: देवेंद्र भुजबळ
_9869484800

परप्रांतीयाकडून राज ठाकरेंना शिवीगाळ,आरोपी सुजित दुबेला अटक

मुंबई- मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना एका परप्रांतीय तरुणाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे अंधेरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित तरुणाचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सुजित दुबे असे या तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले होते.मनसेच्या संतप्त भूमिकेनंतर आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलिसांनी तातडीने कारवाई केली. आरोपी सुजित दुबे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटकही करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी योग्य तपास आणि कारवाईचे आश्वासन दिले आहे.

ही घटना अंधेरी पूर्वेतील महाकाली रोडजवळील सुंदरनगर भागात घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, सुजित दुबे हा दारूच्या नशेत राज ठाकरे यांना आई-बहिणीवरून शिवीगाळ करताना व्हिडिओत दिसत आहे. राज ठाकरेंना शिवीगाळ केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांत संताप उसळला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंधेरीतील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेत आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. एवढेच नव्हे, तर आरोपीकडून चालवले जाणारे तीन अनधिकृत धंदेही तात्काळ बंद करण्याची मागणी मनसेने केली आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई न झाल्यास पोलिस ठाण्याबाहेर तीव्र आंदोलन करणार, असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी दिला.

मराठी लोगो की औकात क्या? तुम भंगार हो…दुसरीकडे, नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय व्यक्ती आणि मराठी लोकांमध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गाडी शिकत असताना एका परप्रांतीय तरुणाने स्थानिकाच्या गाडीला धडक दिली. यानंतर त्याने ”मराठी लोगो की औकात क्या? तुम मराठी लोक भंगार हो” अशा प्रकारे अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मनसे कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला मराठीत बोलण्यास सांगितले, मात्र त्याने नकार दिल्याने हा वाद अधिक वाढला आणि कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. या घटनेनंतर गाडीला धडक दिल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे समजते. मात्र, शिवीगाळ आणि मारहाणीबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

बेरोजगारीच्या प्रश्नावर २५ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा.

मुंबई, दि. २३ ऑगस्ट २०२५
राज्य सरकारच्या विविध विभागात तब्बल २.५ लाख रिक्त पदे असूनही नोकर भरती केली जात नाही. लाखो तरुणांच्या भविष्याशी सरकार खेळ खेळत आहे. रिक्त जागा असतानाही सरकार मात्र कंत्राटीपद्धतीने भरती करत आहे. काँग्रेस पक्ष या बेरोजगारी विरोधात आवाज उठवत असून छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी २५ ऑगस्ट रोजी “रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.

प्रदेश काँग्रेसच्या रोजगार विभागाचे संयोजक व प्रदेश सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, “राज्य विद्युत महामंडळाच्या महावितरण, महापारेषण व इतर विभागांमध्ये शेकडो जागा रिक्त आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ही पदे भरली जात नाहीत. रोजगार सत्याग्रह यात्रेतून आम्ही सरकारला कठोर इशारा देत आहोत, भरती प्रक्रिया सुरू करा अन्यथा काँग्रेस रस्त्यावर तसेच विधानसभेतही याविरोधात आवाज उठवेल. तरुणांचे रोजगार हक्क अबाधित राखण्यासाठी रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ९:०० वाजता क्रांती चौक येथून या यात्रेला प्रारंभ होऊन MSEB चे सह-व्यवस्थापकीय संचालक कार्यालय, मिल कॉर्नर येथे पोहोचेल. तेथे निवेदन सादर केल्यानंतर दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन सादर करणार आहे.

सरकारने

१) महावितरण, महामार्ग व महानगरपालिका विभागांतील ITI, डिप्लोमा व अभियांत्रिकी शिक्षणावर आधारित सर्व रिक्त पदांची तातडीने भरती करावी.
२) विभागातील सर्व रिक्त पदे स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देऊन भरावीत.
३) महावितरण व महामार्ग विभागांतील कंत्राटी सेवेची मुदत ३ वर्षांवरून १ वर्षावर आणावी.
४) दरवर्षी होणारी पदविका परीक्षा नियमित भरती प्रक्रियेत समाविष्ट करावी.
५) कोणत्याही कारणास्तव नोकरीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना “आउट ऑफ टर्न” नियुक्तीची संधी द्यावी.
६) सहाय्यक अभियंता पदासाठीची GATE परीक्षा सक्ती तात्काळ रद्द करावी.
७) कनिष्ठ अभियंता पदासाठीची कमाल वयोमर्यादा वाढवावी.

या मागण्यांसाठी हा सत्याग्रह आहे.
या रोजगार यात्रेत मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांतील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच NSUI, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस व अन्य संलग्न विभागाचे कार्यकर्ते या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी, महापालिका आणि अस्तित्व फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम

पुणे : संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी, पुणे महापालिका आणि अस्तित्व फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आकर्षक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या.
निमित्त होते कोथरूडमधील छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय, ४७ मुलींची शाळा येथे आज (दि. २३) आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे. या कार्यशाळेत सुमारे २०० विद्यार्थ्यांनी श्रीगणेशाच्या मूर्ती साकारल्या. महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सव हा राज्याच्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा केल्यानंतर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याची आयोजित केलेली ही पहिलीच कार्यशाळा ठरली आहे.
ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले. संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, वृद्धी रिॲलिटीचे प्रतिनिधी प्रसाद पाटील, महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाचे क्रीडा अधिकारी माणिक देवकर, अस्तित्व संस्थेच्या अध्यक्षा राजश्री जायभाये, सुप्रसिद्‌ध शिल्पकार विवेक खटावकर मंचावर होते. कार्यशाळेचे संयोजन मुख्याध्यापिका ज्योती मानकर, निकिता मोघे आणि केतकी महाजन यांनी केले. वर्ल्ड आर्टिस्ट डेव्हलपमेंट फेडरेशन, सिने मॉडेल आर्ट स्टुडिओचे सुरेश राऊत आणि सातारकर स्टुडिओच्या प्रज्ञा सातारकर यांच्या सहकार्याने कार्यशळा आयोजित करण्यात आली होती.
शिल्पकार विजय राऊत, विजय दीक्षित यांनी सुरुवातीस विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती कशी साकारावी याविषयी मार्गदर्शन केले.
सुरुवातीस सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात माहिती देताना सांगितले की, शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जागरूकता निर्माण व्हावी, पर्यावरणाचे रक्षण व्हावे हा कार्यशाळेचा उद्देश आहे.
किरण देवकर, प्रसाद पाटील, मुरली लाहोटी, विवेक खटावकर, राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राहुल सुतार यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका ज्योती मानकर यांनी केले.

‘एक वही, एक पेन’ उपक्रमास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा उत्साहवर्धक प्रतिसाद

गणेशोत्सवात समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे सहकार्य

मुंबई — समाजातील गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी सुरू असलेल्या ‘एक वही, एक पेन’ या उपक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोलाचा हातभार लावला आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने हारफुलांसह शैक्षणिक साहित्य श्री गणेशचरणी अर्पण करून वंचित विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संदेश या अभियानातून दिला जातो. या उपक्रमाच्या शिष्टमंडळाने, प्रणेते पत्रकार राजू झनके यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. गोऱ्हे यांच्या शासकीय निवासस्थानी भेट दिली.

मागील दहा वर्षांत हजारो विद्यार्थ्यांना मदत पोहोचविणाऱ्या या अभियानाचे डॉ. गोऱ्हे यांनी कौतुक करत शिक्षणापासून कोणताही घटक वंचित राहू नये, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी स्वतः शैक्षणिक साहित्य देऊन सहभाग नोंदवला तसेच समाजालाही आवाहन केले की, “गणेशोत्सवात हारफुलांसह शैक्षणिक साहित्य अर्पण करून वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावा.”

या भेटीत शिष्टमंडळात अविनाश गरुड, राजेश उबाळे, राजू लोखंडे, सुनील वाकोडे, पत्रकार काशिनाथ म्हादे, सुरेश ठमके आदी मान्यवर उपस्थित होते.

“नाही देवी, नाही दासी; समान स्थान हवे आम्हासी” — SHAKTI संवादात डॉ. नीलम गोऱ्हे यांचा निर्धार

मुंबई, — राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘SHAKTI संवाद : इंटरॅक्टिव्ह अँड कपॅसिटी बिल्डिंग मीटिंग विद स्टेट वूमन कमिशन्स’ या महत्त्वपूर्ण चर्चासत्रात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बीजिंग डिक्लेरेशनच्या पार्श्वभूमीवर महिला-केंद्रित धोरणांची अंमलबजावणी, मिळालेली प्रगती आणि उर्वरित आव्हाने यांचा सखोल आढावा सादर केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर तसेच विविध राज्य महिला आयोगांच्या अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणात डॉ. गोऱ्हे यांनी १९९५ च्या बीजिंग घोषणापत्राचा संदर्भ देत सांगितले की, हे घोषणापत्र महिलांच्या हक्कांसाठी आणि लिंगसमभाव साधण्यासाठी जगभरातील १८९ देशांनी दिलेले ऐतिहासिक वचन होते, ज्यात भारताचाही समावेश होता. “नाही देवी, नाही दासी; समान स्थान हवे आम्हासी” या ठाम संदेशातून त्यांनी महिलांच्या समान भागीदारीची आवश्यकता अधोरेखित केली. त्या पुढे म्हणाल्या की, गेल्या तीन दशकांत अनेक महत्त्वपूर्ण प्रगती साध्य झाली आहे. घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, निर्भया प्रकरणानंतर झालेल्या फौजदारी कायद्याच्या दुरुस्त्या आणि स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांना दिलेले आरक्षण यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर सशक्त होण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, मुद्रा योजना, स्टँड अप इंडिया, जननी सुरक्षा योजना अशा उपक्रमांमुळे महिलांच्या शिक्षण, आरोग्य व आर्थिक स्वावलंबनाला नवे बळ मिळाले आहे.

तसेच, डॉ. गोऱ्हे यांनी अजूनही भेडसावत असलेल्या आव्हानांकडे लक्ष वेधले. त्यांनी स्पष्ट केले की, महिलांचा कामगार शक्तीतील सहभाग केवळ २० टक्क्यांवर स्थिर आहे, सुरक्षा आणि हिंसेचे प्रकार अद्यापही सुरू आहेत, संसद व विधानसभांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व मर्यादित आहे, तर ग्रामीण भागातील महिलांना तंत्रज्ञान व डिजिटल साधनांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात. यासोबतच दलित, आदिवासी, अल्पसंख्याक व दिव्यांग महिलांना बहुपदरी भेदभावाला सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महिला सक्षमीकरणाला गती देण्यासाठी काही ठोस शिफारसी करताना डॉ. गोऱ्हे यांनी संसद व विधानसभांमध्ये महिलांच्या आरक्षण विधेयकाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, महिला उद्योजकतेसाठी स्वतंत्र निधी आणि बाजारपेठेतील संधी निर्माण व्हाव्यात, ग्रामीण-शहरी डिजिटल दरी कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, कार्यस्थळांवर समानता व सुरक्षितता यांची हमी मिळावी आणि दिव्यांग तसेच विधवा महिलांसाठी विशेष धोरणे आखावीत, अशी मांडणी केली.

महाराष्ट्रातील उपक्रमांचे उदाहरण देताना त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM), ग्रामीण महिलांसाठी स्वयं-सहायता गटांची उभारणी, नवउदीत क्षेत्रांत कौशल्य विकास, पौगंडावस्थेतील मुलींचे आरोग्य उपक्रम, दुष्काळग्रस्त भागातील रोजगार हमी व ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्य कार्यशाळांचा उल्लेख केला. या सर्व उपक्रमांमुळे महिलांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले की, २०३० मध्ये बीजिंग जाहीरनाम्याच्या अनुषंगाने शाश्वत विकास उद्दिष्टांचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे तोपर्यंत स्त्री-पुरुष यांचा समान सहभाग असेल अशी अपेक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

समारोप करताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “बीजिंग घोषणा-पत्र ही केवळ एक कागदपत्र नव्हते, ती एक प्रतिज्ञा होती. १९९५ पासून आपण मोठा पल्ला गाठला आहे, पण अजूनही बरेच कार्य बाकी आहे. जेव्हा आपण एका महिलेला सशक्त करतो, तेव्हा आपण एका कुटुंबाला, समाजाला आणि अखेरीस राष्ट्राला सशक्त करतो.”

पुणेकरांसमोर उलगडली देशाचा अभिमान ठरलेल्या “चिनाब ब्रिज”ची जन्मकथा

प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशनच्या तसेच सह आयोजक अल्ट्रा टेक, बीएनसीए,आयसिआय, एईएसए, आयजीएस यांच्या वतीने आयोजन

पुणे : जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर नव्याने बांधण्यात आलेला चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे, जो चिनाब नदीपासून ३५९ मीटर वर आहे आणि त्याची लांबी १३१५ मीटर आहे, तासाला २६६ किमी वेगाने आलेले वारे सहन करण्याची क्षमता असलेल्या या जागतिक आश्चर्य, देशाचा अभिमान ठरलेल्या या पुलाच्या अंतरंगांची आणि बांधकामाची अनोखी कथा आज पुणेकरांसमोर उलगडण्यात आली.निमित्त होते पुणे प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारताचा अभिमान “चिनाब ब्रिज” या विशेष चर्चासत्राचे.

बीएनसीए, कर्वे नगर, पुणे येथे विनामूल्य चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी इंजि. विकास रामगुडे(जॉईंट एम.डी एमएसआयडीसी, महाराष्ट्र सरकार), डॉ. सुनील बसारकर (अभियंता)(आयकॉनिक चिनाब रेल्वे ब्रिज चे भूगर्भ तंत्रज्ञान), ब्रिज इंजि. शशांक राजभोज(चिनाब आर्च ब्रिजचे डिझाइन आणि बांधकाम),कार्यक्रम समितीचे अध्यक्ष, इंजि. नारायण कोचक, पुणे प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शेषराव कदम,सचिव अजय कदम आदि मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना इंजि. विकास रामगुडे म्हणाले, आज पीएसईए च्या वतीने एक वेगळा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, अनेकदा इंजिनियरला कमी लेखल्याची तक्रार असते मला वाटते या चर्चासत्रात सादर करण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मधून स्ट्रक्चरल इंजिनियरचे काम किती महत्वाचे असते हे दिसून आले आहे.

डॉ. सुनील बसारकर म्हणाले, आजच्या चर्चासत्रातून ऐतिहासिक आणि जागतिक आश्चर्य ठरलेल्या चिनाब ब्रिजची जन्मकथा सांगताना मला वाटते ही एक इंजिनियरिंग विश्वातील महत्वपूर्ण घटना आहे. अनेक नव्या तंत्रज्ञानाचा आविष्कार या पुलाच्या बांधकाममध्ये झाला आहे. २००३ साली मंजूर करण्यात आलेल्या पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला २००४ मध्ये सुरुवात झाली २०२० ते २०२२ या कोविड काळात हा पूल करण्यासाठी अनेक संकटांचा सामान्य करावा लागला,अनेक आव्हानांचा प्रतिकार करत हा ऐतिहासिक पूल निर्माण करण्यात आला.

इंजि. शशांक राजभोज म्हणाले,चिनाब ब्रिज हा जगात सर्वात मोठा पूल आहे. या उभारणीत आलेल्या अडचणी, आव्हाने मोठी होती, या निर्माणाचा मी एक भाग होतो, हा पूल उभारणे मोठे आव्हान होते, जिथे वाहतूक व्यवस्था नाही, पूलाची ऊंची, पूल उभरण्यात आलेला भूभाग या सर्वच बाबी म्हणजे एक अत्यंत खडतर प्रवास होता, ३० -३० टन वाजनांचे सेगमेंट्स त्या ठिकाणी उभारणे किती कौशल्याचे होते याची माहिती सांगताना माझ्या या पुलाच्या उभारणीतील आठवणींना उजाळा मिळाला.

शेषराव कदम म्हणाले,पीएसईए तर्फे एक तंत्रज्ञान उलगडणारा परिसंवाद आयोजित करण्यात आला.मुळात संस्थेची स्थापनाच आमच्या व्यवसायातील लोकांना आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवणे आणि सर्वाना एकत्र आणणे हा आहे. आज इंजिनियर, आर्किटेक्ट आणि विद्यार्थ्यांच्या मिळालेल्या प्रतिसदाने आम्ही भारावून गेलो आहोत, भविष्यात अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही घ्यावेत यासाठी प्रेरणा यातून मिळाली असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही,

अजय कदम म्हणाले, पीएसईए ही संस्था आम्ही नव्याने सुरू केली असली तरी यातील सर्व संस्थापक हे अनुभवी आहेत. ३० ते ३५ वर्षांचा अनुभव त्यांचा आहे, स्ट्रक्चरल इंजिनिअर्स च्या समोरील आव्हाने आणि नवीन तंत्रज्ञान याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यात पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या प्रॉजेक्ट बद्दल आशा पद्धतीचा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.आजच्या परिसंवाद कार्यक्रमाला पुणेकर,वरिष्ठ प्रॉजेक्ट मॅनेजर्स, जेसीबी सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यां मधील अनुभवी तज्ञ इंजिनियर्स व काही कन्स्ट्रक्शन उपकरणे बनवणारे मेकॅनिकल इंजिनियर्स,विद्यार्थी, पुणे, सातारा, मुंबई येथील स्ट्रक्चरल इंजिनियर्स, बांधकाम व्यावसायिक,बिल्डर्स यांनी सहभाग घेतला यांचा मिळालेला प्रतिसाद आम्हाला प्रेरणा देणार आहे. तसेच अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापक व होतकरू विद्यार्थ्यांचा समावेश PSEA संस्थेच्या प्रशासकीय समितीस आशादायक व उत्साहवर्धक वाटला.

मुंबईकडे कूच नको, कागद-पेन घ्या अन् चर्चेला या:शांततेने मागण्या मांडल्या तर सरकार ऐकेल, चंद्रकांत पाटलांचा मनोज जरांगेंना सल्ला

मुंबई-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापू लागले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला असून, यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे.लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मात्र तो सनदशीर पद्धतीनेच असायला हवा. जर आंदोलन करताना कायद्याचे उल्लंघन होणार असेल, तर सरकार कारवाईस पात्र ठरेल, असा स्पष्ट इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनोज जरांगे यांनी कागद-पेन घ्या आणि सरकारसमोर चर्चेला यावे. आरक्षणाबाबत-च्या मागण्या शांततेत मांडल्यास त्यावर सकारात्मक निर्णय होऊ शकतो, असे पाटील यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षण उपसमितीचे पुनर्गठन केले असून, आता या समितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील हेच या समितीचे अध्यक्ष होते. या बदलावर बोलताना पाटील म्हणाले, एकाच माणसाने किती वेळ काम करायचं? मी बराच काळ अध्यक्ष होतो, पण मी अजूनही समितीत आहे. माझ्या कार्यकाळात अनेक लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज महाराष्ट्रातील प्रमुख घटक आहेत आणि ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. जरांगे पाटील यांच्या मागण्या किंवा मराठा समाजाच्या उन्नती साठीच्या मागण्या चांगल्या पद्धतीने कशा पुढे नेता येतील, यावर सरकार लक्ष देईल. आंदोलन करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे काही करणे आवश्यक असेल ते सरकार करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हि तर भाजपासाठी सोईची ठरणारी प्रभाग रचना,त्वरित रद्द करा: राहुल डंबाळे

पुणे : महानगरपालिकेच्या 2025 मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने 41 प्रभाग निर्माण करण्यात आलेले आहेत. सदर रचना करत असताना केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांकडे पूर्णता दुर्लक्ष करून केवळ भाजपाच्या विद्यमान उमेदवारांना सोईची ठरणारी प्रभाग रचना केल्याने ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने पक्ष अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे.

शुक्रवारी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये नैसर्गिक नदी, नाले , राष्ट्रीय महामार्ग ,राज्य महामार्ग यांचा हद्द निश्चित करताना विचार केला जावा, अशा स्पष्ट सूचना असताना सुद्धा त्याकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे.

तसेच सध्या निर्माण केलेल्या रचनेमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाशी संबंधित आरक्षण व उमेदवारांवर विपरीत परिणाम करणारी रचना केल्याचे जाणवत आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षणा व्यतिरिक्त निवडून येणारे प्रमाण घटणार असल्याने त्याबाबत देखील नाराजगी या पत्रात व्यक्त करण्यात आलेली आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करून महानगरपालिकेने केलेल्या प्रभाग रचनेस तात्काळ स्थगिती द्यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे.

प्रभाग रचना काही असली तरी सध्या राज्य सरकारचा कारभार व मागील पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाने घेतलेले निर्णय यामुळे शहराची प्रचंड हानी झाली असून त्याचा फटका सत्ताधारी भाजपाला बसण्याची शक्यता गृहीत धरूनच बेकायदेशीर हस्तक्षेप करून सोयीची प्रभाग रचना केल्याची भावना समस्त भाजप विरोधी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे.

पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना ही सध्या केंद्रामध्ये व देशभरामध्ये सुरू असलेल्या मतचोरी प्रकरणाशी साधर्म्य साधत मतदार चोरीचा हा प्रकार असल्याचे निदर्शनास येत असलेने या विरुद्ध व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याचे सोशॅलिस्ट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी यावेळी जाहीर केले.