Home Blog Page 342

शरद पवार -अजित पवार पुन्हा एका व्यासपीठावर …

पुणे-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील भेटी वाढल्या असल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यात देखील अनेकवेळा भेटी झाल्या असल्याचे समोर आले आहे.बारामती येथे शरद पवार आणि अजित पवार यांनी विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या वार्षिक सभेला हजेरी लावली. यावेळी अजित पवार आणि शरद पवारांमध्ये एका खुर्चीचे अंतर होते. या कार्यक्रमात अजित पवारांनी विद्या प्रतिष्ठानमधील विकास कामांची पाहणी केली.

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, हे बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलातील व्हीआयटी सभागृहात ही सभा पार पडली. या बैठकीसाठी संस्थेचे अध्यक्ष म्हणून शरद पवार, विश्वस्त म्हणून अजित पवार आणि त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, तसेच खजिनदार युगेंद्र पवार हे देखील उपस्थित होते. या वार्षिक सभेपूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात संस्थेच्या कार्यालयात एक खासगी बैठकही झाली.

या दोन बड्या नेत्यांचे एकत्र येणे गेल्या चार दिवसांतील दुसरे सार्वजनिक दर्शन आहे. यापूर्वी, ते पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी राज्यातील साखर कारखान्यांच्या समस्या आणि साखर उद्योगासंदर्भातील महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली होती. संस्थात्मक व्यासपीठांवरून राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत, पवार कुटुंबीय त्यांचे महत्त्वाचे सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम एकत्रितपणे पुढे नेत असल्याचे या घटनांमधून स्पष्ट होते.

एकंदरीत, हे दोन्ही नेते राजकीय स्तरावर वेगवेगळ्या वाटांवर असले तरी, विद्या प्रतिष्ठान आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसारख्या संस्थांच्या कार्यासाठी ते एकत्र येत आहेत. बारामतीतील या शैक्षणिक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्ष आणि विश्वस्त म्हणून उपस्थित राहून, संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतील. संस्थात्मक बांधिलकी जपतानाच, पवार कुटुंबियांमधील सदस्यांचे असे एकत्र येणे राजकीय वर्तुळात लक्ष वेधून घेत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 22 हजार कोटी कर्जाची माहिती घेऊ : अजित पवार

पुणे-: पिंपरी चिंचवड महापालिकेवर विकास कामांच्या नावावर 22 हजार कोटींचे कर्ज तत्कालीन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यकाळात झाल्याची चर्चा सध्या शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे .याबाबत प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी बोलून वस्तुस्थितीची माहिती घेऊ असे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले

2022 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदी व प्रशासक म्हणून शेखर सिंह यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी महापालिकेकडे सहा हजार कोटी रुपये शिल्लक होते. गेल्या तीन वर्षात आयुक्त शेखर सिंह यांनी विविध विकास कामांच्या नावाखाली भरमसाठ खर्च केल्याचा आरोप यापूर्वीही करण्यात येत होता. परंतु याकडे एकाही माजी नगरसेवकाने कधीच लक्ष दिले नाही. विविध विकास कामांचे ऑडिट करणे गरजेचे आहे .जुना मुंबई पुणे रस्ता हा 61 मिटर रुंदीचा असताना पादचारी मार्गाचे रुंदीकरण करून हा मार्ग 45 मीटर पर्यंत अरुंद करण्यात आला . त्यामुळे सध्या या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे या खर्चाची खरेच गरज होती का हा प्रश्न उपस्थित केला जातो . याशिवाय शहरातील विविध ठिकाणचे पादचारी मार्ग रुंद करून डीपी चे रस्ते अरुंद करण्यात आले. भविष्यात वाहतूक कोंडी झाल्यास पुन्हा हे रस्ते खोदून रुंद करावे लागतील .म्हणजेच गरज नसताना आयुक्तांनी हा खर्च केल्याचे दिसून येते.

याशिवाय नदी सुधार प्रकल्प राबवून नदीपात्राचे रुंदीकरण कमी करण्याचा घाट त्यांनी घातला. या प्रकल्पासाठी नागरिकांनी आणि पर्यावरणवादी लोकांनी विरोध केला असताना देखील हा प्रकल्प राबवण्याचा घाट त्यांनी सुरूच ठेवला .अनेक विकास कामांचा खर्च आवाजवी करून महापालिकेला कर्जाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांच्या विकास कामांवर कोणाचाही आणि कोणताही दबाव नव्हता. त्यामुळे त्यांनी मनमानी कारभार केला .दोनशे कोटी रुपयांचे बॅाड खरेदी करून महापालिकेला कर्जात लोटले. आजपर्यंत महापालिकेला विकास कामांसाठी कधीच कर्ज काढण्याची वेळ आली नव्हती .

याशिवाय चिखली येथील अतिक्रमण तोडण्यासाठी केलेला भरमसाठ खर्च हा देखील चर्चेचा विषय आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राहटणी येथील कार्यक्रमात प्रसिद्धी माध्यमांनी प्रश्न विचारले त्यावेळी त्यांनी आपण याबाबत माहिती घेऊ. आपली महापालिकेवर सत्ता असताना कधीच कर्ज काढण्याची वेळ आणली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. प्रभारी आयुक्त हर्डीकर यांना वस्तुस्थितीची माहिती विचारून घेऊ असे सांगितले.

आयुक्त शेखर सिंह यांची बदली नाशिक येथे झाल्यानंतर पिंपरी चिंचवड मध्ये त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. हा सत्कार कोणी केला? आणि सत्कार मंचावर कोण उपस्थित होते याबाबत विविध चर्चा आहे. ज्यांनी पालिकेला लुटण्यासाठी आयुक्तांना सहकार्य केले अशाच मंडळींनी हा सत्कार केला आहे. यामध्ये ठेकेदार मोठ्या प्रमाणात सामील झाले होते. महापालिकेची तिजोरी तात्कालीन आयुक्त शेखर सिंह हे रिकामी करत आहेत याची माहिती माजी नगरसेवकांना असतानाही त्यांनी याबाबत का आवाज उठवला नाही ?हे एक गैाड बंगाल आहे अशी चर्चा शहरात दबक्या आवाजात सुरू आहे.

कामाख्या देवीचे दर्शन: काही अनुभव,काही सूचना

३ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर अशी १२ दिवसांची तीन बहिणींची म्हणजेच आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश राज्ये ; अशी ( 3 Sisters) आमची सहल सुखरूप पार पडली. सुखरूप अशासाठी की, इतके डोंगर, इतक्या दऱ्या,इतके सारखे वळणावळणाचे अरुंद रस्ते की, टेम्पो ट्रॅव्हलर पेक्षा मोठी गाडी जाऊच शकत नाही. काही ठिकाणी तर कार, जीपनेच प्रवास करावा लागतो. वाहन चालक अतिशय सफाईदारपणे वाहने चालवित असतातच. पण तरीही कित्येकदा आपल्या काळजाचा ठोका चुकतोच आणि आलो आहोत तर खरे, पण सुखरूप घरी पोहोचू की नाही? अशी धास्ती सारखी वाटत असते.

आमच्या सहलीच्या शेवटच्या दिवशी आसाम राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी; म्हणजेच गुवाहाटी येथे असलेल्या कामाख्या देवीचे दर्शन घ्यायचे ऐनवेळी ठरविण्यात आले. ऐनवेळी अशासाठीकी मुंबईहून निघण्यापूर्वीच आमच्या टुर ऑपरेटर नम्रता कारखानीस यांनी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करण्याचा प्रयत्न केला होता. पण बुकिंग फुल असल्याचे दिसून येत होते.त्या यापूर्वीही कामाख्या देवीच्या मंदिरात येऊन गेलेल्या असल्याने, त्यांना तिथे नेमके काय चालते, कसे चालते याची चांगलीच कल्पना होती. त्यामुळे त्यांनी आदल्या दिवशी,ज्यांना देवीचे दर्शन घ्यायचे आहे,त्यांनी प्रत्येकी ११००/_ रुपये जमा करावेत, असे सांगितले. तसेच आपल्या संबंधामुळे प्रत्येकी ४००/_ रुपये वाचले अन्यथा जास्तीचे हजार रुपये दिल्याशिवाय स्पेशल एन्ट्री कूपन मिळतच नाही,असे ठणकावून सांगितले. नम्रता आणि निखिल कारखानीस हे दोघे आयोजक सोडून आम्ही एकूण ३७ पर्यटक होतो. त्यापैकी चार पाच जण वगळता सर्वांनी दर्शन घ्यायचे ठरविले.

खरं म्हणजे, देवीच्या स्पेशल एन्ट्री कूपनचा अधिकृत दर हा ५०१/_ रुपये आहे. पण जास्तीचे ६००/_ रुपये हे एका पंड्याला द्यायचे असून तोच पास देतो,अशी तेथील “व्यवस्था” असून आम्ही सर्व पर्यटन कंपन्या या व्यवस्थेपुढे हतबल आहोत,यासाठी काही तरी केले पाहिजे,अशा शब्दात
नम्रता यांनी आपला उद्वेग, संताप व्यक्त केला.

आता इतके जास्तीचे पैसे भरल्याने आपले दर्शन लगेच होईल,अशा भ्रमात आम्ही होतो. अर्थात लगेच म्हणजे, दोन तास तरी लागतील,अशी कल्पना आम्हाला देण्यात आली होती.शिवाय पहिल्यांदा ज्या हॉल मध्ये आम्हाला बसविण्यात आले होते, तो वातानुकूलित असल्याने तिथे वाट पहात बसणे सुसह्य होते. त्यात परत खाजगी चहा , कॉफी विक्रेते, करगोटे,अन्य धार्मिक साहित्य विकणारे येत जात असल्याने दोन तास कसे गेले, हे कळलेच नाही.

खरा वैताग सुरू झाला,तो या वातानुकूलित हॉल मधून अतिशय चिंचोळ्या अशा जिन्यावर जाऊन उभे राहायला लागल्यावर. हळूहळू बाजूच्या रांगेतील काही भाविक महिला मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागल्या. त्यांच्या काही मुलांना घाबरेघुबरे होत होते. काहींना उलट्या,मळमळणे सुरू झाले होते. त्यामुळे त्यांचे म्हणणे होते की,आम्हाला दर्शन नको पण एकदाचे इथून बाहेर पडू द्या. या रांगेतील भाविकांकडे चौकशी केली असता, कळाले की ही बिना स्पेशल एन्ट्री कूपनच्या भाविकांची रांग असून ते बिचारे पहाटे दोन वाजेपासून रांगेत उभे आहेत!शेवटी एकदाचा त्या महिलांचा आरडाओरडा सुरक्षा रक्षक महिलेच्या कानी पडला आणि तिने तणतणत का होईना, मधले दार उघडून त्या महिला आणि त्यांच्या मुलाबाळांना बाहेर जाऊ दिले.

आधीच्या हॉल मध्ये निदान चहा,कॉफी,नैसर्गिक विधी करण्यासाठीची जागा तरी होती.पण या मधल्या रांगांमध्ये मात्र वाट पहात बसणे आणि होत असलेला त्रास सहन करीत बसणे या शिवाय दुसरा काही मार्ग नव्हता.

शेवटी कसेबसे एकदाचे आम्ही
गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो. बघतो तर काय,गाभाऱ्याच्या अलीकडेच बळी दिलेल्या काही रेडे, बकरे यांची मुंडकी
पडलेली होती.आमच्यातील कट्टर शाकाहारी असलेल्यांना तर ते दृश्य बघून भोवळ यायचीच बाकी राहिली होती.
त्यात मध्ये मध्ये बसलेल्या पंड्यांचा ,इधर पैसे डालो,असा तगादा सुरू होता. शेवटी एकदाचे आम्ही अंधाराच्या मार्गे गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले.हा गाभारा इतका चिंचोळा आहे की,एका वेळी एकच जण खाली उतरू शकतो किंवा वर येऊ शकतो. त्यामुळे या दरम्यान जर दुर्दैवाने चेंगराचेंगरी झाली तर सुटकेचा मार्ग काय ? कुठूनही हवा येण्याचा,बाहेर जाण्याचा मार्ग दिसत नव्हता.शेवटी दर्शन घेऊन,अक्षरश: जीव मुठीत घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि मोकळा श्वास घेतला.

सकाळी साडे आठ वाजता आलेलो आम्ही,दुपारी दोन वाजता देवीचे दर्शन घेऊ शकलो. त्यात परतीच्या विमानाची वेळ संध्याकाळी पाच वाजताची असल्याने दुपारी तीन पर्यंत आम्हाला विमान तळावर पोहोचणे आवश्यक होते.त्यामुळे आम्हाला जेवण काय, चहापाणी घ्यायला सुद्धा वेळ नव्हता. शेवटी कसेबसे आम्ही बरोबर तीन वाजता विमान तळावर पोहोचलो. दरम्यान मंदिरात न आलेले आमचे काही सह पर्यटक, विशेषतः निवृत्त सहसचिव श्री सातपुते साहेब हे त्यांच्या बरोबर सगळ्यांचे “फूड पॅक” घेऊन आलेले होते.एखाद्या निर्वासितासारखे आम्ही विमान तळावरील एक कोपरा पकडून ते कसेबसे खाल्ले. पुढचे सोपस्कार पार पाडून एकदाचा आमचा “जीव विमानात पडला”!

उपरोक्त सर्व अनुभवांवरून एक भाविक म्हणून मला संबंधित मंदिराचे ट्रस्टी, आसाम सरकार,भारत सरकार आणि अन्य संबंधित यंत्रणा, व्यक्ती यांना पुढीलप्रमाणे सूचना कराव्याशा वाटतात, जेणेकरून ज्या श्रद्धेने सर्व भाविक इथे देशविदेशातून मोठ्या संख्येने येत असतात, त्यांच्या भावनांना ठेच पोहोचणार नाही आणि त्यांचे दर्शन सुखावह होईल.
१) सध्या देण्यात येत असलेल्या स्पेशल एन्ट्री कुपन वर कोणत्याही व्यक्तीचे नाव, गाव,वय ,पत्ता,दिनांक,वेळ, इतकेच काय तर बुक नंबर, सिरीयल नंबरसुद्धा नाहीय. त्यामुळे तो सहजच हस्तांतरणीय असल्याने ,मला वाटते आतील कर्मचाऱ्यांशी मिलीभगत करून पंडा लोक हे पास एक गठ्ठा मिळवितात आणि त्यांचा काळा बाजार करतात. असे करण्याची संधी त्यांना मिळू नये म्हणून ऑनलाइन पास वर संबंधित व्यक्तीचे नाव, गाव, दिनांक, वेळ असावे. तसेच या कूपनवर वर डोलाई म्हणून छापील सही आहे. पण
कलेक्टर असे लिहिलेल्या जागेवर मात्र कुणाचीच छापील सुद्धा सही नाहीय!

२) उपरोक्त काहीच तपशील
या स्पेशल एन्ट्री कूपनवर नसल्यामुळे कदाचित हे कूपनच पूर्णपणे बनावट, बोगस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कूपनवर संबंधित व्यक्तीचे नाव, गाव, वय,पत्ता, वार , दिनांक,वेळ असा तपशील असावा.तसेच भाविकाचे कूपन आणि त्या सोबत त्याचे आधारकार्ड किंवा सरकारमान्य अन्य ओळखपत्र याची खातरजमा करूनच आत सोडण्यात यावे. केवळ भ्रष्टाचार रोखण्यासाठीच नाही तर सुरक्षेच्या दृष्टीनेही ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.

३) संपूर्ण मार्गात,जिने,पायऱ्या
इथे हवा खेळती राहील, ज्यांना पिण्याचे पाणी हवे, नैसर्गिक विधी करण्यासाठीची काही जागा असावी,अशी काही व्यवस्था करण्यात यावी.

४) आणखी काय सुयोग्य बदल, सुधारणा करता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी मंदिराचे ट्रस्टी,प्रशासकीय अधिकारी यांनी तिरुपती देवस्थान, शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर, शेगावचे श्री गजानन महाराज मंदिर अशा मंदिरांना भेटी देऊन,तेथील व्यवस्थेचा अभ्यास करून कामाख्या देवीच्या मंदिरात, परिसरात बदल घडवून आणावेत, जेणेकरून दूरदुरून आलेल्या भाविकांना तिथे आल्याचे सार्थक झाले,असे वाटेल.
जय कामाख्या मॉ .


छायाचित्रे सौजन्य:गुगल
लेखन : देवेंद्र भुजबळ.

वाचनाची गोडी लागून, वाचन चळवळ समृद्ध होण्यासाठी – ‘बुक्स ऑन व्हील’ उपक्रम पुणे शहर आणि ग्रामीण भागात

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : वाचन संस्कृतीचा प्रसार आणि समाजात वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) इंडिया यांनी “बुक्स ऑन व्हील” ही अभिनव फिरती पुस्तक प्रदर्शनी बस सुरू केली आहे. ही बस पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी १६ ऑक्टोबर ते २१ डिसेंबर या कालावधीत फिरणार असून, कायमस्वरूपी पुण्यासाठी राहणार आहे या उपक्रमाद्वारे ग्रामीण व शहरी भागातील लोकांना पुस्तकांच्या माध्यमातून विचार, संवेदना आणि संस्कार यांचा संगम अनुभवण्याची संधी मिळणार आहे.हा उपक्रम वाचनाची चळवळ वृद्धिंगत करण्यासोबतच वाचक, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी ज्ञान, प्रेरणा आणि मनोरंजनाचा सुंदर संगम ठरणार आहे.

आगामी पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या बसचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. यावेळी एनबीटीचे संचालक युवराज मलिक, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, उद्योजक विशाल चोरडिया, डॉ. विनोद गायकवाड, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष किरण ठाकूर, एमएनजीएलचे अधिकारी कुमार शंकरन, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेष कुलकर्णी आदी उपस्थित होते

या फिरत्या बसमधून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांतील चार हजार हून अधिक पुस्तकं वाचकांच्या भेटीस येणार आहेत. ग्रामीण भागातील आणि शहरातील वाचकांना दर्जेदार साहित्य सहज उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामध्ये पुस्तकांच्या विशेष मालिका असून, त्यामध्ये
भारत – देश आणि लोक, तरुण भारती, लोकप्रिय सामाजिक विज्ञान, विश्व साहित्य, राष्ट्रीय चरित्रमाला, लोकसाहित्यमाला, प्रधानमंत्री युवा मेंटॉरशिप योजना, इंडिया @75, नेहरू बाल पुस्तकालय, द्विभाषिक पुस्तकमाला आणि आशिया-पॅसिफिक सहप्रकाशन या मालिकांचा समावेश आहे.या vanमध्ये एकूण पाच सदस्यांची टीम असून, त्यात चार सदस्य दिल्लीहून आलेले आहेत. संपूर्ण उपक्रमाचे आयोजन शैलेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
‘बुक्स ऑन व्हील’ बसची आकर्षक वैशिष्ट्ये:

  • आतील व बाह्य बाजूस विस्तृत पुस्तक प्रदर्शन
  • टीव्ही स्क्रीनद्वारे एनबीटीच्या नव्या उपक्रमांची माहिती
  • बाहेरील डिजिटल डिस्प्ले – आकर्षक आणि माहितीपूर्ण
  • दोन एसी यंत्रणा – आरामदायक पुस्तक खरेदीचा अनुभव
  • सर्व पुस्तकांवर १०% सवलत
    लोकप्रिय पुस्तके
    आपली संसद, औषधी वनस्पती, आपले पर्यावरण, मानवी हक्क, लोकशाही, इंडियन सोसायटी, तोत्तोचान, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकांचा समावेश आहे.
    लहान वाचकांसाठी
    सत्याचा शोध, प्रदूषण, प्राणीसंग्रहालयात भेट, वीरों की कहानियां आणि द वर्ड ऑफ ट्रिज ही ज्ञानवर्धक पुस्तके उपलब्ध असतील.
    ….. ‘बुक्स ऑन व्हील’ ही केवळ एक बस नसून, चालते फिरते पुस्तक प्रदर्शन आहे. या बसच्या माध्यमातून “वाचनाची गोडी लागून, वाचन चळवळ समृद्ध होणार आहे. ही बस पुणे शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात फिरणार असल्याने, शाळा आणि महाविद्यालयांना फायदेशीर ठरणार आहे. -चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

बँक ऑफ बडोदाच्या “बीओबी के संग त्योहार की उमंग”सह वाढवा सणाचा आनंद

मुंबईभारतात सणांचा काळ म्हणजे आनंदाचा, उत्सवाचा आणि नवीन सुरुवातीचा काळ असतो. असा काळ जेव्हा कुटुंब मोठ्या खरेदीची योजना आखतात – मग ते नवीन घर खरेदी करणे असो, कार खरेदी करणे असो किंवा त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी हालचाल करणे असो. उत्सवाचे हे दिवस ग्राहकांसाठी अधिक खास आणि फायदेशीर बनवण्यासाठी बँक ऑफ बडोदाने त्यांची वार्षिक मोहीम, बीओबी के संग त्योहार की उमंग – शुभ भी लाभ भी” सुरू केली आहे.

रिटेल ऑफर्स

यंदा सणानिमित्त आणलेल्या ऑफरिंगमध्ये बऱ्याच काळापासून असलेल्या आकांक्षा तसेच दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेल्या ऑफर्सचा समावेश आहे. घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी गृह कर्ज आता शून्य प्रक्रिया शुल्कासह वार्षिक 7.45% पासून सुरू होते. नवीन गाडी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी, कार कर्जाचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. तसेच वाहनाच्या प्रत्यक्ष किमतीवर 90% पर्यंत आर्थिक सहकार्य आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी कर्ज परतफेडीचा कालावधी आठ वर्षांपर्यंत वाढवला गेला आहे. वास्तविक, ईव्ही खरेदीदारांना इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रक्रिया शुल्कात 50% सवलत देऊन बँक ऑफ बडोदा आणखी एक सुखद धक्का देत आहे.

सणासुदीचा काळ हा स्मार्ट आर्थिक पर्याय निवडण्यासाठी एक योग्य वेळ आहे. त्यासाठी, बँक ऑफ बडोदाने बीओबी मास्टरस्ट्रोक लाइट सेव्हिंग्ज अकाउंट सादर केले आहे. ज्यासाठी जास्त मासिक सरासरीची अट नाही मात्र, फायदे चिक्कार आहेत – मोफत प्रवास डेबिट कार्ड आणि जीवनशैली ऑफरपासून ते लॉकर्सवर सवलती आणि किरकोळ कर्जावरील व्याजदर सवलती आणि प्रक्रिया शुल्कावरील माफी.

सणाचा आनंद आणखी वाढवण्यासाठी, बँक ऑफ बडोदा त्यांच्या डेबिट कार्डधारकांसाठी प्रवास, अन्न, फॅशन आणि किराणा सामान यासारख्या सर्वाधिक मागणी असलेल्या श्रेणीतील आघाडीच्या ब्रँडशी करार करून आकर्षक उत्सवी सवलती देत ​​आहे. ज्यामुळे सणाची खरेदी अधिक आनंदात, उत्साहात तर होतेच पण त्याचा खिशावर भार कमी पडतो.

व्यवसायांना सक्षम बनवणे

आपल्या या उत्सवी ऑफर अंतर्गत बँक ऑफ बडोदा व्यवसायांसाठी देखील अनेक उत्तम पर्याय देते आहे. बीओबी डिजी उद्यम द्वारे, सूक्ष्म आणि लघु उद्योगांना आकर्षक व्याजदर, लवचिक प्रक्रिया शुल्कासह 100% डिजिटल आणि पेपरलेस प्रक्रियेसह 10 ते 50 लाख रुपयांपेक्षा जास्त तारण-मुक्त कार्यरत भांडवल कर्जे त्वरित मिळू शकतात.

बीओबी प्रॉपर्टी प्राइड मालमत्तेवर ओव्हरड्राफ्ट सुविधा प्रदान करते. कमी मार्जिन आणि लवचिक अटींसह 25 कोटी रुपयांपर्यंत निधी देते. आणि विशेषतः बीओबी स्मार्ट करंट अकाउंट डिजिटल-सॅव्ही व्यवसायांसाठी डिझाइन केलेले आहे. यातील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून मोफत ऑनलाइन NEFT/RTGS/IMPS/UPI व्यवहारांसह मोफत POS/MPOS मशीन आणि QR साउंडबॉक्ससह येते.

या प्रसंगी बँक ऑफ बडोदाचे मुख्य महाव्यवस्थापक श्री. शैलेंद्र सिंह म्हणाले, “सण म्हणजे केवळ समारंभ नाही, हे आम्ही जाणतो. तर एखाद्याच्या आकांक्षा पूर्ण करण्याची तसेच आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे पूर्ण करणे म्हणजे खऱ्या अर्थाने सण साजरे करणे. नवीन घर खरेदी करणे असो, वाहन खरेदी करणे असो किंवा व्यवसायाचा विस्तार करणे असो, आमच्या ग्राहकांना त्यांची उद्दिष्टे प्रत्यक्षात आणण्यास मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. बीओबी के संग त्योहार की उमंगद्वारे, आमचे ग्राहक स्मार्ट आर्थिक पर्याय निवडू शकतात. जे केवळ उत्सवाचा आनंदच वाढवणार नाहीत तर त्याचे दीर्घकालीन मूल्य देखील निर्माण करतील.”

आर अँड डीवर भर असलेली स्पेशॅलिटी केमिकल्स कंपनी प्रासोल केमिकल्सने ₹500 कोटींच्या आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्रे केली दाखल

स्पेशॅलिटी केमिकल्सचे एकात्मिक उत्पादन करणारी कंपनी प्रासोल केमिकल्स लिमिटेडने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे (SEBI) दाखल केला आहे. ही कंपनी स्पेशॅलिटी केमिकल्स क्षेत्रातील अत्यंत विविधीकृत खेळाडू मानली जाते. 31 जुलै 2025 पर्यंत कंपनीकडे 150 हून अधिक स्पेशॅलिटी केमिकल उत्पादने, 1,107 ग्राहक असून, ती आपली उत्पादने 69 देशांना निर्यात करते.

या आरंभिक सार्वजनिक समभाग विक्रीत (IPO) प्रति इक्विटी शेअर ₹2 दर्शनी मूल्यावर ₹80 कोटींची नवीन इश्यू आणि विद्यमान भागधारकांकडून ₹420 कोटींच्या समभागांची विक्री (Offer for Sale – OFS) अशा एकूण ₹500 कोटींच्या इश्यूचा समावेश आहे.

नवीन इश्यूतून मिळणारे निव्वळ उत्पन्न कंपनीने घेतलेल्या ₹60 कोटींच्या कर्जफेडीसाठी, तसेच सामान्य कॉर्पोरेट गरजांसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे. या कर्जफेडीमुळे कंपनीच्या बॅलन्सशीटवरील भार कमी होणार असून, आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल, असा कंपनीचा दावा आहे.

1992 मध्ये स्थापन झालेली आणि नवी मुंबई येथे मुख्यालय असलेली प्रासोल केमिकल्स कंपनी अ‍ॅसिटोन व फॉस्फरस-आधारित स्पेशॅलिटी केमिकल्स, तसेच जटिल आणि भिन्न रसायनशास्त्रावर आधारित इतर स्पेशॅलिटी केमिकल्सचे उत्पादन करते. कंपनीकडे विविध टप्प्यांवर विकसित होत असलेली 40 उत्पादने पाइपलाइनमध्ये आहेत, त्यापैकी 9 उत्पादनांनी पायलट स्टेज पार केला आहे. प्रासोल केमिकल्स ही भारत सरकारकडून प्रमाणित 3 Star Export House असून, तिचे नेटवर्क Asia-Pacific (APAC), North America, South America आणि Europe या प्रदेशांमध्ये पसरलेले आहे.

प्रासोल केमिकल्सची अ‍ॅसिटोन-आधारित स्पेशॅलिटी केमिकल्समध्ये Arkema, Evonik, TASCO, Solvay यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा आहे, तर फॉस्फरस डेरिव्हेटिव्हजमध्ये कंपनीची स्पर्धा Hubei Xingfa, Liaoning Ruixing, Excel Industries यांच्याशी होते. मात्र, देशांतर्गत बाजारपेठेत अ‍ॅसिटोन-आधारित स्पेशॅलिटी केमिकल्स उत्पादकांची संख्या कमी असल्याने प्रासोलला तुलनेने मर्यादित स्पर्धा आहे.

31 जुलै 2025 पर्यंत कंपनीच्या विस्तृत उत्पादन पोर्टफोलिओमध्ये 150 हून अधिक स्पेशॅलिटी केमिकल्सचा समावेश होता. यात 21 अ‍ॅसिटोन-आधारित उत्पादने, 53 फॉस्फरस-आधारित उत्पादने, तसेच 76 इतर कस्टमाइज्ड केमिकल्सचा समावेश आहे. या कस्टमाइज्ड उत्पादनांमध्ये सरफॅक्टंट्स, परफॉर्मन्स अ‍ॅडिटिव्हज, इथर्स, एस्टर्स, पॉलिमर्स आणि अ‍ॅसिड्स यांचा समावेश होतो.

प्रासोल केमिकल्सने देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विविधीकृत आणि प्रतिष्ठित ग्राहकवर्गाशी दीर्घकालीन संबंध प्रस्थापित केले आहेत. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये अ‍ॅलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड, भारत रसायन लिमिटेड, क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड, क्रोडा इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड, घार्दा केमिकल्स लिमिटेड, जीएसपी क्रॉप सायन्स लिमिटेड, लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, रॉसारी बायोटेक लिमिटेड आणि सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेड यांचा समावेश होतो.

आगामी काळात आणि विविध अनुप्रयोग उद्योगांमध्ये उत्पादनांच्या मागणीतील अपेक्षित वाढ लक्षात घेऊन, कंपनीने आपली उत्पादन क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महाराष्ट्रातील खोपोली आणि महाड येथील विद्यमान युनिट्सची क्षमता वाढवून, त्यांचे उत्पादनक्षमतेतील अडथळे दूर करण्याचा (debottlenecking) प्रस्ताव आहे. याशिवाय, कंपनी ल्युब्रिकंट अ‍ॅडिटिव्हज, कन्स्ट्रक्शन केमिकल्स आणि मायनिंग केमिकल्ससाठी स्वतंत्र अॅप्लिकेशन टेस्टिंग लॅबरोटरी विकसित करणार आहे.

31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात (FY25) प्रासोल केमिकल्स लिमिटेडने दमदार कामगिरी नोंदवली. कंपनीच्या ऑपरेशन्समधील महसूल 15.5% ने वाढून ₹1,012.49 कोटी झाला, जो FY24 मधील ₹876.56 कोटी होता. कंपनीचा ऑपरेटिंग ईबीआयटीडीए 44.9% वाढून ₹87.76 कोटी झाला, जो मागील वर्षातील ₹60.53 कोटी होता. हे परिणाम सुधारलेल्या ऑपरेशनल कार्यक्षमतेचे आणि मार्जिन वाढीचे प्रतीक आहेत. याशिवाय, कंपनीचा करपश्चात नफा (PAT) FY25 मध्ये ₹43.56 कोटींवर गेला, जो FY24 मधील ₹18.13 कोटी होता, म्हणजेच नफा दुपटीहून अधिक वाढला.


विशेष अनुप्रयोगांसाठी ओळखले जाणारे स्पेशॅलिटी केमिकल्स यांनी 2024 मध्ये जागतिक केमिकल उद्योगाच्या एकूण बाजारपेठेत 20% वाटा मिळवला होता. 2029 पर्यंत हा वाटा 21–23% पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, ज्यामागे कस्टमाइज्ड आणि हाय-परफॉर्मन्स सोल्युशन्सची वाढती मागणी हे कारण आहे. स्पेशॅलिटी केमिकल्सचा जागतिक बाजार CAGR 8% दराने वाढून 2029 पर्यंत $1,748 बिलियनपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

स्पेशॅलिटी केमिकल्स उद्योगातील एक महत्त्वाचा प्रवेश अडथळा म्हणजे उत्पादन पुरवठा सुरू करण्यापूर्वी ग्राहकाकडून नोंदणी आणि मंजुरी मिळवणे आवश्यक असते. ही मंजुरीची सायकल साधारणपणे 1 ते 4 वर्षे चालते. या प्रक्रियेत उत्पादनातील शुद्धता आणि अशुद्धतेची सखोल चाचणी, ग्राहकांच्या गरजेनुसार कस्टमायझेशन, कार्यक्षमतेची पडताळणी, शेल्फ-लाइफ अभ्यास व एंड-युज अ‍ॅप्लिकेशन टेस्टिंग यांचा समावेश होतो.

या इश्यूचा एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर डीएएम कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्स लिमिटेड आहे, तर केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे ऑफरचे रेजिस्ट्रारर आहेत. प्रासोल केमिकल्सचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) वर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जागतिक व्यासपीठावर भारतीय लोकशाही आणि महिला नेतृत्वाचे प्रभावी प्रतिनिधित्व

“बारबाडोस दौऱ्याची यशस्वी सांगता”

बार्बाडोस, : राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या (Commonwealth Parliamentary Association – CPA) 68 व्या जागतिक अधिवेशनाचा बार्बाडोस येथे यशस्वी समारोप झाला. या अधिवेशनात जगभरातील २० पेक्षा अधिक देशांतील संसद सदस्य आणि सुमारे ३०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत भारतीय लोकशाही, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समतेचा संदेश ठळकपणे मांडला.

अधिवेशनाच्या प्रारंभी “Parliaments since Beijing +30: Progress, Challenges and the Road Ahead for Gender Equality” या विषयावर डॉ. गोऱ्हे यांनी ओपनिंग रिमार्क्स सादर करत महिलांच्या सक्षमीकरणाबाबत भारताने आणि विशेषतः महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीचा उल्लेख केला.

त्या म्हणाल्या, “बीजिंग विश्वसंमेलनानंतर महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने झालेली प्रगती आणि त्यातील आव्हाने ओळखून पुढील वाटचाल ठरवणे गरजेचे आहे. भारत आणि महाराष्ट्राने लोकशाही मार्गाने परिवर्तन घडवण्याची जगाला दिशा दाखवली आहे.”

अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात दिव्यांग नागरिकांच्या सहभाग आणि समानतेच्या हक्कांवर चर्चा झाली. डॉ. गोऱ्हे यांनी या वेळी सांगितले की, “एक सशक्त लोकशाही तेव्हाच पूर्ण होते, जेव्हा प्रत्येक घटक — विशेषतः दिव्यांग नागरिक — सन्मानाने आणि समानतेने सहभाग घेतात.” तसेच, त्यांनी महिलांविरुद्ध हिंसा आणि भेदभावाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचे (Zero Tolerance) धोरण राबविण्याची गरज अधोरेखित केली आणि अंमलबजावणी यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.

या अधिवेशनात डॉ. गोऱ्हे यांनी विविध देशांतील संसद सदस्यांशी संवाद साधत लिंग समानता, महिला आरक्षण, लोकशाही सुदृढीकरण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य याबाबत विचारांची देवाणघेवाण केली. त्यांनी बार्बाडोसच्या पंतप्रधान श्रीमती मिया मोटली, राष्ट्राध्यक्ष श्रीमती सॅंड्रा मेसन, तसेच साऊथ वेल्सच्या खासदार नताशा अशगर, त्रिनिदाद व टोबॅगोचे सिनेट अध्यक्ष वेड स्टिफन मार्क, आणि आयल ऑफ मॅन प्रदेशाचे अध्यक्ष जुआन वॉटरसन एसएचके यांच्याशी फलदायी चर्चा केली.

या परिषदेत सहभागी होणे हा एक “प्रेरणादायी आणि शिक्षणदायी अनुभव” असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. विविध देशांतील प्रतिनिधींशी संवादातून मिळालेली दृष्टी आगामी कार्यात उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. भारतीय लोकशाही मूल्ये आणि महिला नेतृत्वाची विचारधारा जागतिक पातळीवर प्रभावीपणे पोहोचवणारा हा दौरा ठरला. या यशस्वी सहभागामुळे महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव आंतरराष्ट्रीय संसदीय व्यासपीठावर अधिक उज्ज्वल झाले आहे.

वसुबारस सप्ताह उत्साहात साजरा करण्याचे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे आवाहन

पुणे, दि. 16 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी राज्यातील सर्व गोशाळा संचालक, शेतकरी, पशुपालक आणि गोपालक बांधवांना वसुबारस सप्ताह उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

गोमातेचे दैनंदिन जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व ओळखून शासनाने “गोमातेला राज्य मातेचा” दर्जा दिला आहे. त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यंदा दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी वसुबारस या सणाने दीपोत्सवाला प्रारंभ होत आहे. हा दिवस कृषी आणि पशुपालन संस्कृतीशी घट्टपणे जोडलेला असल्याने तो मोठ्या श्रद्धेने साजरा करणे हे प्रत्येक शेतकरी व गोपालकाचे कर्तव्य असल्याचे मुंदडा यांनी सांगितले.

वसुबारस सप्ताहाच्या निमित्ताने राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमांमध्ये व्याख्याने, गोपूजन, शाळांमधील चित्रकला स्पर्धा, “सेल्फी विथ राज्यमाता” अशा कार्यक्रमांचा समावेश करावा .

या उपक्रमांच्या आयोजनात सर्व गोशाळा संचालकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, जेणेकरून कृषी व गोसंस्कृतीला सक्रिय चालना मिळेल, असेही आवाहन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा तसेच सदस्य सचिव डॉ. शामकांत पाटील यांनी केले आहे. तसेच आयोजित कार्यक्रमांचा अहवाल व छायाचित्रे महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या ई-मेल mhgosevaayog@gmail.com वर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0000

महाराष्ट्राला संरक्षण तंत्रज्ञानाचे हब बनविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि.१६: आज जग वेगाने बदलत असून प्रत्येक क्षणाला नवा विचार, नवी व्यवस्था, नवे तंत्रज्ञान समोर येत असताना अशा अनिश्चित जगात आपले कौशल्य आपल्या मदतीला येऊ शकते. त्यामुळे सर्वांनी मिळून कौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी केंद्र सरकारसोबत महाराष्ट्र राज्य शासन देखील कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या सुविधा उभ्या करीत आहे आणि त्यांना प्रोत्साहनही देण्यात येत आहे. सिम्बायोसिस विद्यापीठदेखील या दिशेने काम करत असून नोकरी मिळविण्यासाठी नाही तर नोकरी देण्याची क्षमता निर्माण करणारे शिक्षण येथे देण्यात येत आहे, असे गौरवोद्गार देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काढले.

सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सहाव्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकातदादा पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले.जनरल धीरज सेठ, विद्यापीठाचे कुलपती डॉ.शां.ब. मुजुमदार, प्र-कुलगुरु डॉ. स्वाती मुजुमदार, श्रीमती संजीवनी मुजुमदार, सिंम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलगुरू डॉ.विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.

कौशल्य शिक्षण देशाच्या उभारणीसाठी महत्त्वाचे असून कौशल्यप्राप्त व्यक्ती निर्मितीसाठी योगदान देतो. निर्मितीच माणसाचे महत्त्वाचे लक्षण असून निर्मितीत व्यस्त व्यक्तीच समाजाला दिशा देऊ शकते, असे नमूद करून संरक्षण मंत्री श्री.सिंह म्हणाले, आजच्या युगात केवळ ज्ञान उपयुक्त नसून त्याचे उपयोजन करण्याची कला अवगत असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शिकलेल्या बाबींना जीवनात कसे आणावे हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे हेच आजच्या शिक्षणाचे उद्दीष्ट असायला हवे.

नवभारताकडे देश जात असताना स्कील इंडीया, स्टार्ट अप इंडिया आणि मेक इन इंडियावर भर देण्यात येत आहे. केंद्र सरकारने कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे. या मंत्रालयाने या क्षेत्रातील आव्हानांना संधीत रुपांतरीत करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत १ कोटी ६३ लाख उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. जनशिक्षा संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण, आदिवासी आणि दुर्लक्षित घटकातील ३० लाखापेक्षा अधिक उमेदवारांना शिलाई, भरतकाम, हस्तकला, फळ प्रक्रिया आणि आरोग्य सेवा सहायकाचे प्रशिक्षण करण्यात आले आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील पारंपरिक कारागिरांना सक्षम करण्यात येत असून २२ लाख कारागिरांना व्यवसायाची आधुनिक साधने प्रदान करण्यात आली आहेत. यामुळे देशात कौशल्य विकासाला अनुकुल वातावरण तयार झाले आहे.

देशातील युवकाकडे कौशल्य असेल तर जगातील कोणतीच शक्ती आपल्याला रोखू शकत नाही. देशात कौशल्य विकास क्षेत्रातील प्रगती लक्षात घेता आजची पिढी कौशल्य प्राप्त करून पुढच्या युगातील तंत्रज्ञानाची पिढी घडवेल असा विश्वास वाटतो. मात्र कौशल्यासोबत संवेदनशील राहून समाजासाठी त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे, असे श्री.सिंग म्हणाले.

स्नातकांना दीक्षांत संदेश देतांना ते म्हणाले, पदवी प्राप्त करून विद्यापीठाच्या बाहेर पडणाऱ्या स्नातकांसाठी संपूर्ण विश्व आता एक नव्या विद्यापीठाप्रमाणे असेल. या स्नातकांनी भविष्यातील चिंता न करता व्यापक दृष्टीकोन बाळगावा. संकुचित विचारांनी जीवनात सुख आणि आनंद मिळविता येत नाही. स्नातकांचे यश हे समाजाचा सहयोग, संस्कार आणि पाठिंब्याचा परिणाम आहे. त्यामुळे या सर्वांविषयी कृतज्ञता बाळगणे गरजेचे आहे. कुशल बुद्धीच्या आधारे सतत कार्यरत राहून कौशल्य, संकल्प आणि परिश्रमाने स्नातक नव्या युगाची पायाभरणी करतील, असा विश्वास श्री.सिंग यांनी व्यक्त केली.

ऑपरेशन सिंदूर हे देशाच्या आत्मनिर्भरतेचे प्रतिक होते. देशाच्या लष्कराने भारतात तयार झालेल्या शस्त्रास्त्रांचा उपयोग करीत धैर्य आणि संयमाने पराक्रम गाजविला. संरक्षण साहित्य निर्मितीमध्ये भारतीय युवांनी मोठा पुढाकार घेतला असून गेल्या १० वर्षात आपली संरक्षण साहित्य निर्मिती ४६ हजार कोटी रुपयांवरून १ लाख ५० हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे. यातही सुमारे ३३ हजार कोटी रुपयांचे खासगी क्षेत्राचे योगदान आहे. २०२९ पर्यंत आपली उत्पादनक्षमता ३ लाख कोटींपर्यंत नेण्याचे आणि संरक्षण साहित्य निर्यात ५० लाख कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.

भारताने नेहमीच ‘वसुधैव कुटुंबकम्’असा संदेश आपल्या कृतीतून दिला. देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करीत असताना सिम्बायोसिससारख्या संस्थांमध्ये सुरू करण्यात आलेल्या संरक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम शिक्षणासोबत देश उभारणीचा संकल्प आहे. नव्या युगातील संरक्षण उपकरण इथले स्नातक तयार करतील, असेही संरक्षण मंत्री श्री.सिंह म्हणाले.

महाराष्ट्राला संरक्षण तंत्रज्ञानाचे हब बनविणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीच्या उद्घाटनाद्वारे नव्या युगातील महत्त्वाच्या क्षेत्रात पाऊल टाकल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्याचे महत्त्व लक्षात घेऊन देशात एक कौशल्य विकासाचे अभियान सुरू केल्यावर सिम्बायोसिसने कौशल्य विद्यापीठाची कल्पना समोर आणली. देशाला महासत्तेच्या रुपात समोर आणायचे असल्यास देशातील तरुणाईला कौशल्य प्रदान करून कुशल मनुष्यबळात रुपांतरीत करण्याची गरज आहे. मात्र या क्षेत्रासाठी आवश्यक व्यवस्था उभी करणाऱ्या शिक्षणसंस्थांची संख्या मर्यादित आहे. सिम्बायोसिसने शिक्षणासोबत मूल्यांवर भर दिला असल्याने या क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय स्तराच्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या. युवकांच्या आशा-आकांक्षाना बळ देणारी व्यवस्था विद्यापीठात उभी केली. विद्यापीठाचे कौशल्य विकासाचे हे मॉडेल देशासाठी मार्गदर्शक ठरले आहे. यामागे विद्यापीठाचे परिश्रम आणि सकारात्मक दृष्टीकोन आहे. येत्या दोन ते तीन वर्षात जगातील अग्रगण्य कौशल्य विकास विद्यापीठात सिम्बायोसिसची गणना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देश संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सातत्याने पुढे जात असताना महाराष्ट्राला संरक्षण तंत्रज्ञानाचे हब बनविण्याचा प्रयत्न राज्य सरकार करते आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. येत्या काळात या क्षेत्रातील गुंतवणुक, उत्पादन आणि मनुष्यबळ निर्मिती राज्यात होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. स्नातकांनी आपल्यासाठी शिक्षणाच्या व्यवस्था उभ्या करणाऱ्या समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही श्री.फडणवीस यांनी केले.

कुलपती डॉ. मुजुमदार म्हणाले, देशाला रोजगारक्षम कुशल युवकांची आवश्यकता आहे. देशातील तरुणाईला देशाच्या विकासाशी जोडण्यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक असून त्यासाठी कौशल्य विकास शिक्षणाला चालना देण्याची गरज आहे. स्नातकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ रोजगाराचा विचार न करता जगाच्या कल्याणासाठी ज्ञानाचा उपयोग करावा, शिक्षणासोबत मूल्यांची जपणूक करावी. विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणून अभिमान बाळगताना धैर्याने आव्हानांना सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्र. कुलगुरू डॉ. मुजुमदार यांनी प्रास्ताविकात विद्यापीठात सुरू असलेल्या विविध उपक्रमाची व अभ्यासक्रमाची माहिती दिली. राज्यातील कौशल्य विकासाचे हे पहिले विद्यापीठ असून गेल्या दोन वर्षापासून विद्यापीठाला नॅशनल युनिव्हर्सिटी रँकींग फ्रेमवर्कचे पहिले मानांकन मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.

संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते पदवी प्रदान समारंभात १ हजार ५३२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. २ विद्यार्थ्यांना कुलपती यांचे सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. तसेच २ विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर पुरस्कार आणि एका विद्यार्थिनीला कुशल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे उद्घाटन करण्यात आले. संरक्षण मंत्री श्री.सिंह आणि मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी कौशल्य प्रशिक्षण उत्कृष्टता केंद्राला भेट देऊन विविध उद्योगांकडून कौशल्य प्रशिक्षणासाठी प्रायोजित गरजू विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकचा शुभारंभ

इलेक्ट्रीक ट्रक निर्मितीसाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वॅपेबल बॅटरी असलेला इलेक्ट्रिक ट्रक म्हणजे ‘रिव्होल्यूशन ऑन व्हील’-मुख्यमंत्री

▪️ दावोस येथे झालेल्या सामंजस्य कराराचे फलीत

पुणे दि.१६: ब्ल्यू एनर्जी मोटर्स निर्मित स्वॅपेबल बॅटरी असलेला इलेक्ट्रिक ट्रक म्हणजे ‘रिव्होल्यूशन ऑन व्हील’ असून त्यातील तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता लक्षात घेता येत्या काळात या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल. राज्य शासन मुंबई- पुणे इलेक्ट्रीक कॉरिडोअरसारखे अन्य कॉरिडोर करण्यासाठी सर्व सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

निघोजे येथील ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, महेश लांडगे, बाबाजी काळे, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, ब्ल्यू एनर्जी मोटर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध भुवलकर, धीरेंद्र शास्त्री बागेश्वरबाबा, प्रशांत रुईया, अंशुमन रुईया, अमित बाजाज, कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते.

ब्ल्यू एनर्जी मोटर्सने इलेक्ट्रीक वाहन क्षेत्रात नवी क्रांती केली असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, माल वाहतूक करणाऱ्या ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असल्याने सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात इलेक्ट्रीक ट्रकची आवश्यता होती. कार्गो वाहतूक करणाऱ्या क्षेत्रात ब्ल्यू एनर्जीने अत्यंत उत्तम आणि ‘मेड इन इंडिया’ ट्रकची निर्मिती केली आहे. ही बाब देशाचे ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न साकार करण्यासारखी आहे.

इलेक्ट्रिक ट्रकसाठी संपूर्ण क्लिष्ट अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची संकल्पना आणि निर्मिती, तंत्रज्ञान देशातच त्यातही महाराष्ट्र आणि पुण्यात निर्माण होणे ही अभिमानाची बाब आहे. डावोस येथे याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानंतर कंपनीने अत्यंत वेगाने प्रकल्प उभारणीचे काम केले आहे. महाराष्ट्र शासनाने ईव्ही क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण तसेच पर्यायी इंधन धोरण अशी शाश्वत धोरणे स्वीकारली असून या क्षेत्रातील उद्योगाला त्याचा फायदा व्हावा आणि पर्यावरणाचे या माध्यमातून रक्षण व्हावे हे आहे. महाराष्ट्र शासन मुंबई-पुणे इलेक्ट्रीक कॉरिडोअरसाठी तसेच अन्यत्रही बॅटरी स्वॅपींग आणि चार्जिंगच्या कॉरिडॉरसाठी ब्ल्यू एनर्जीसोबत काम करेल.या ट्रकच्या किंमती डिझेल वाहनांशी स्पर्धा करणाऱ्या असल्याने या वाहनांना चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

श्री. फडणवीस पुढे म्हणाले, या इलेक्ट्रीक ट्रकसाठी तयार करण्यात आलेले तंत्रज्ञान भारतीय वातावरणाला अनुरूप आहे आणि बॅटरी स्वॅपींग तंत्रज्ञान ईव्ही क्षेत्रातील मोठी क्रांती ठरणार आहे. बॅटरीच्या किंमती कमी होत असून बॅटरीच्या कार्यक्षमतेत, आयुर्मानात वाढ होत आहे. त्यामुळे येत्या काळात बॅटरीच्या साह्याने ट्रक २०० ऐवजी ४०० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकेल. हा केवळ ट्रक किंवा इलेक्ट्रीक वाहन नसून ‘सॉफ्टवेअर ऑन व्हील्स’ आहे, जे तंत्रज्ञानाला स्मार्ट बनवण्याचे उदाहरण आहे. कार्गो वाहतूकीत ही टेस्ला चळवळीची सुरूवात आहे असे म्हणता येईल. हे तंत्रज्ञान किफायतशीर असण्यासोबत त्याची कार्यक्षमताही उत्तम आहे. ट्रकमध्ये बसवलेले सेन्सर आणि स्मार्ट तंत्रज्ञानामुळे अधिक भाराचे निदान होईल, ज्यामुळे वाहतूक नियमांचे पालन आणि अपघात नियंत्रण साधले जाईल.

राज्यात सौर ऊर्जा निर्मितीला गती देण्यात येत असून २०३५ पर्यंत ७० टक्के ऊर्जेचा वापर सौर स्रोताद्वारे करण्यात येणार असल्याचेही श्री.फडणवीस म्हणाले.

दावोस येथील सामंजस्य कराराचे फलीत
दावोस येथे जानेवारीत झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत ब्ल्यु एनर्जी कंपनी बरोबर सामंजस्य करार झाला होता. त्या करारानुसार ब्लू एनर्जी कंपनीचा आज प्रकल्प सुरू होत आहे. दावोस येथे झालेले करार प्रत्यक्षात येत आहेत. दहा हजार ट्रक पहिल्या टप्यात तयार होत आहेत. थोड्याच दिवसात हा आकडा वाढत जाणार आहे. महाराष्ट्र गुंतवणूकदरांचे पहिल्या पसंतीचे राज्य आहे. ब्ल्यू एनर्जी कंपनीचा प्रकल्प सुरू होऊन उत्पादन सुरु झाले आहे आणि रोजगार निर्मिती झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले.

प्रास्ताविकात ब्ल्यू एनर्जीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध भुवलकर यांनी कंपनीविषयी माहिती दिली. मालवाहतूकीला पर्यावरणपूरक पर्याय देण्यासाठी देशातील पहिला एलएनजी ट्रक सप्टेंबर २०२२ मध्ये बनविण्यात आली. इलेक्ट्रीक वाहन हे भविष्य असल्याने आणि शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी ईव्ही ट्रकचा शुभारंभ करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी चालवली ट्रक
ब्लू एनर्जी मोटर्सतर्फे निर्मित स्वॅपेबल बॅटरी हेवी इलेक्ट्रिक ट्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या आवारात चालविला. नवं तंत्रज्ञान समजून घेताना ते हाताळण्याचे कसबही मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले.
तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते ब्लू एनर्जी मोटर्सतर्फे निर्मित भारताच्या पहिल्या स्वॅपेबल बॅटरी असलेल्या हेवी ड्युटी इलेक्ट्रिक ट्रकचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कंपनीच्या मुंबई–पुणे इलेक्ट्रिक कॉरिडॉरचे उद्घाटनही करण्यात आले.

गडचिरोलीच्या आदिवासी विद्यार्थ्याची इंग्लंडमध्ये एम.एससी. अभ्यासक्रमासाठी निवड

पुणे, दि. 16 ऑक्टोबर: गडचिरोली जिल्ह्यातील मुरखेल (ता. चार्मोशी) येथील आदिवासी विद्यार्थी विशाल सुनील मेश्राम यांनी परदेशात उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांची इंग्लंडमधील नामांकित युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल येथे एम.एससी. (पब्लिक पॉलिसी) या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.

श्री. विशाल मेश्राम हे आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृह, कोरेगाव पार्क, पुणे येथील माजी विद्यार्थी असून सध्या ते अजिम प्रेमजी विद्यापीठ, बेंगळुरू येथे पदवी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या प्रतिभा, परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. श्री. मेश्राम यांची ही कामगिरी आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी ठरली असून, उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण करणारी आहे, असे वसतिगृहाचे गृहपाल उदय महाजन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

पुणे विभागात पात्र मतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करा- अपर आयुक्त तुषार ठोंबरे

पुणे, दि. १६: पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रमाअंतर्गत ६ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे, त्यामुळे विभागातील माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ तसेच शासकीय कार्यालयातील पात्र मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची कार्यवाही येत्या ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश अपर आयुक्त तुषार ठोंबरे यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीच्या अनुषंगाने पुणे विभागस्तरीय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण, कृषी विभागातील अधिकारी, विद्यापीठांचे कुलसचिव, महाविद्यालयीन प्राचार्य, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांकरिता आयोजित प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण परिषदेच्या महासंचालक वर्षा उंटवाल लड्डा, पुणे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर, उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. अशोक उबाळे, तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव, शिक्षण उपसंचालक गणपत मोरे, अमरजीत पाटील, बाबुराव जाधव, पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा उबाळे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी संगीता बांगर, विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. बैठकीस सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी आणि अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी, शैक्षणिक संस्थेचे प्रतिनिधी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

श्री. ठोंबरे म्हणाले, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी – नोव्हो) तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी सुरू आहे. सन २०२६ मध्ये पुणे विभागात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यात होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाकरिता निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त असून, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते मतदार नोंदणीचे काम करीत आहेत.

सन २०२६ मध्ये होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाकरिता निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. या कार्यक्रमाअंतर्गत यापूर्वीच्या पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयादीत नाव समाविष्ठ असले तरी आता पात्र मतदारांचे नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करावे, असे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. मतदार नोंदणी करताना सर्व कागदपत्रांची तपासणी करुनच नोंदणी करावी. नवीन मतदार नोंदणीचे अर्ज मतदार नोंदणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील, याबाबत दक्षता घ्यावी. मतदारांना मतदार नोंदणी करण्याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन करावे. मतदार नोंदणीकरिता एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याबाबत नोंद घ्यावी.

पुणे विभागात मतदार नोंदणी कार्यक्रमाबाबत पदवीधर आणि शिक्षकांना माहिती होण्यासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती करावी. शासकीय कार्यालयातील सर्व पदवीधर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंदणी करून सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा. शिक्षक मतदारसंघाकरिता शैक्षणिक संस्थेतील केवळ शिक्षकांचे मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यात आल्याची खात्री करुन घ्यावी, शिक्षकेतर कर्मचारी, शिपाई यांचे नाव नोंद करु नये. मतदार नोंदणीबाबत आपल्याला शंका असल्यास पदनिर्देशित अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

मतदार नोंदणी प्रक्रिया १ जानेवारी पासून निरंतर सुरु राहणार असून यामध्येही मतदार नोंदणी करता येणार आहे. एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही श्री. ठोंबरे म्हणाले.

प्रशिक्षण सत्रात मतदार नोंदणीचे टप्पे, मतदार नोंदणीचे अर्ज भरताना घ्यावयाची काळजी, अर्जाची छाननी प्रक्रिया, मतदार अर्हता, शैक्षणिक कागदपत्रे, मतदार नोंदणी जनजागृती कार्यक्रम, संदर्भ परिपत्रके, शासन निर्णय, आदेश आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ: मतदार नोंदणीची प्रक्रिया पार पाडताना प्रशासन, सर्व संबंधित यंत्रणा तसेच विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आदींनी समन्वय साधून काम करावे. लोकशाही बळकटीकरणाकरिता विभागातील अधिकाधिक पात्र पदवीधर आणि शिक्षकांनी मतदार नोंदणी कार्यक्रमात सक्रीयपणे सहभागी होवून आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवून घ्यावा.

डॉ. विजय भटकर यांनी पुणे जिल्हा परिषदेसोबत २५ स्किल स्कूल्स सुरू करण्यासाठी भागीदारी स्वीकारली

पुणे, १६ ऑक्टोबर २०२५ – पद्मभूषण डॉ. विजय भटकर, चैतन्य फाऊंडेशनचे अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदेसोबत २५ “स्किल स्कूल्स” स्थापनेसाठी समजुतीचा करार (MoU) करण्यास सहमत झाले आहेत.

ही घोषणा पुण्यातील झुंभार हॉलमध्ये आयोजित बैठकीदरम्यान श्री गजानन पाटील (IAS), मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

या सहकार्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिक्षण, रोजगारक्षमता आणि उद्योजकता वाढवणे आहे, जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि कुशल, स्वावलंबी ग्रामीण युवक निर्माण करण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.

ही योजना जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि मूल्याधारित शिक्षण एकत्रित करण्याच्या डॉ. भटकर आणि पुणे जिल्हा परिषदेच्या संयुक्त प्रतिवद्धतेचे प्रतीक आहे.

खवा, स्वीट मावा, गाईचे तुप, खाद्यतेल, दुध, पनीर, बटर व वनस्पती, भगर:दोन कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

पुणे, दि. १६ ऑक्टोबर : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली “सण महाराष्ट्राचा-संकल्प अन्न सुरक्षिततेचा” या अभियानाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य व जनहित लक्षात घेता विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत १ कोटी ९७ लाख ९३ हजार ४२ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

सणासुदीच्या काळात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत ३५३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून १९६ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली आहे. कारवाईदरम्यान खवा, स्वीट मावा, गाईचे तुप, खाद्यतेल, दुध, पनीर, बटर व वनस्पती, भगर आदी अन्न् पदार्थाचे एकूण ६५४ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते, त्यापैकी २१६ अन्न् नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले असून १९० प्रमाणित दर्जाचे, ५ कमी दर्जाचे, ८ मिथ्याछाप, व १३ असुरक्षित नमुने आढळले आहेत. दोषी नमुन्यांवर कायद्यानुसार कारवाई सुरू आहे.

सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याबाबत शंका असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे केले आहे.
000

महाराष्ट्रात डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव असलेले आधार कार्ड!पिंपरीत 54000 मतदारांचा घोळ- रोहित पवारांचा दावा

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक या काळात सर्वात जास्त मतदान हे पनवेलमध्ये वाढले आहे. इथे 65000 मतदार वाढले आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये 57000 मतदार वाढले. भोसरीत 56000, मीरा भाईंदर 53000, नालासोपारा 50000, चिंचवड 45000, हडपसर 43000 अशा संख्येत सहा महिन्यांत मतदार वाढले आहेत, असा दावा रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.

मुंबई-महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मतदार यादी तसेच मतचोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर तसेच निवडणूक आयोगावर टीका केली होती. यावेळी प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत दिसले. त्यानंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी स्क्रीनवर मतदारांची खोटी नावे टाकण्यात आल्याचे सांगत थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या नावे देखील आधार कार्ड असल्याचे दाखवले.

रोहित पवार म्हणाले, महाविकास आघाडीचे सर्व नेते व त्यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब हे निवडणूक आयोगाकडे गेले होते. जी काही यादी आहे त्यावर आमचा आक्षेप आहे. काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांनी मत चोरीचा मुद्दा काढला होता. आता तुम्हाला यातील काही तांत्रिक बाबी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 2024 च्या लोकसभेचा जो काही निकाल एनडीएच्या विरोधात लागला होता. केंद्रात सत्ता आणण्यासाठी त्यांना बरीच समीकरणे जुळवावी लागली होती. मग महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी त्यांनी खोट्या मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप पवारांनी केला.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, माझ्या मतदारसंघात म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघात लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 या 6 महिन्यांच्या कालावधीत एकूण 14 हजार 113 मतदार वाढले. त्यानंतर 31 ऑगस्ट 2024 ते 1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत प्रति महिना 4891 मतदार वाढले. त्यामुळे निवडणूक आयोग लोकशाहीला मारते की काय असा प्रश्न आम्हाला पडला आहे.

यावेळी रोहित पवारांनी प्रात्यक्षिक दाखवत मतदारसंघातील पत्ता टाकला, यात त्यांनी ‘पांढरा बंगला’ असा कर्जत मधला पत्ता टाकायला सांगितला, त्यानंतर संपूर्ण तपशील भरायला सांगितला. तारीख 1825 मधली टाकली. त्यानंतर त्यांनी फेटा असलेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो अपलोड केला आणि लगेच डोनाल्ड तात्या ट्रम्प या नावाने संपूर्ण आधार कार्डच तयार झालेले प्रात्यक्षिक स्क्रीनवर दाखवले. यावरून खोटी माहिती कशी टाकली जाते ते रोहित पवार यांनी दाखवले.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, शिरूर विधानसभा मतदारसंघाचे 10230 नावे आहेत. वडगाव शेरीत 11064, खडकवासला येथून 12330, पर्वती मतदारसंघात 8238, हडपसर मतदारसंघात 12798 असे 54000 नावे वाढवली आहेत. आमचे कार्यकर्ते तिथे माणसे शोधायला गेली. पण एक सुद्धा माणूस तिथे सापडली नाहीत. अशोक पवार यांनी जसे सांगितले की, बसने तिथे लोक आणली. तिथे मतदान करुन घेतल्यानंतर परत त्यांना बसने पाठवले. पैसे देऊन लोकांना मतदानासाठी आणले. मतदान करुन घेतले आणि परत त्यांच्या मतदारसंघात पाठवले. मी पिंपरीचे उदाहरण दाखवले. तिथे 54000 मतदारांचा घोळ झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केला.

निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. या स्वायत्ता संस्थेचे इंटरनेट आणि त्यांची वेबसाईट सांभाळण्याची जबाबदारी देवांग दवे नावाच्या व्यक्तीला निवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सर्व माहिती असते. दवे भाजपचा पदाधिकारी असेल तर आमच्या आधी दवे यांच्याकडे सर्व माहिती होती. यादीत कुणाचे नाव घ्यायचे आणि कुणाचे नाव काढायचे हे दवेंनी त्या त्या मतदारसंघाच्या आमदारांना विश्वासात घेऊन केले, असे आमचे ठाम मत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, एवढी मोठी माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्याला वेबसाईटच्या माध्यमातून मिळत असेल, आम्ही जेव्हा मागतो तेव्हा आम्हाला सांगितले जाते की देत नाही. आमच्या नेत्यांना सांगितले जाते की, ही माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. मतदार यादीचे विश्लेषण आम्हाला दिले पाहिजे. अचानक वाढलेले मतदार होते कुठले आणि कसे आले याची माहिती आम्ही मागवली आहे. आम्हाला लेखी स्वरुपात स्ष्टपणे माहिती दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

डिजीटल मतदार याद्या देण्यात याव्यात. बीएलोच्या डायरी नोंदी कशा झाल्या याची माहिती मिळायला हवी. तसेच येणाऱ्या निवडणुकीत ते कसे होणार आहे, याची देखील माहिती आम्हाला हवी आहे. मतदानाच्या दिवसाचे सीसीटीव्ही हवे आहेत. शेवटच्या तासात 68 लाख लोकांनी मतदान केले. मग ते कोण होते ते आम्हाला बघायचे आहे, असेही यावेळी रोहित पवार यांनी म्हटले आहे.