Home Blog Page 324

महाराष्ट्र विधानमंडळ लोकलेखा समितीची येरवडा मध्यवर्ती कारागृहास भेट

पुणे, दि. ११: महाराष्ट्र विधानमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह समिती सदस्यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या विविध विभागास भेटी देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी बंदीसोबत संवाद साधून कारागृहाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती घेतली.

याप्रसंगी समिती सदस्य आमदार ॲड. अनिल परब, कृपाल तुमाने, संजय खोडके, सत्यजीत तांबे, समीर कुणावार, अनिल पाटील, सुहास बाबर, रोहित पवार, विधान मंडळाचे सहसचिव नागनाथ थिटे, उपसचिव उमेश शिंदे उपस्थित होते.

मोहनदास करमचंद गांधी यार्ड, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यार्ड, किशोर यार्ड, दूरदृष्य प्रणाली कक्ष (व्हीसी रुम), मुलाखत कक्ष, ई-मुलाखत कक्ष, कारखाना विभाग, नवीन बॅरेक, अतिसुरक्षा विभाग, स्वयंपाकगृह आदी विभागांना भेटी देऊन समितीने तेथील कामकाजाची माहिती घेतली.

यावेळी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई, कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ उपस्थित होते.

ज्यांच्यावर आरोप केले ते तुमच्या अंगाखांद्यावर खेळत आहेत

पुणे-बिनशर्ट, बिनशर्ट म्हणता म्हणता त्यालाच बिनशर्त तीनदा भेटले, अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी राज ठाकरे यांची वारंवार भेट घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे केवळ आणि केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी आपल्या मशालीला इंजिनाचे वंगण फासत असल्याची टीकाही त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधताना केली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे.

सुषमा अंधारे यांनी ट्विट करत केशव उपाध्ये यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, केशवजी बात निकलेगी तो दूर तक जाएगी. मुलुंडच्या एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे आता तुमच्या अंगाखांद्यावर खेळत आहेत, असे म्हणत अंधारे यांनी निशाणा साधला आहे.

पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या, ज्या नितेश राणे यांनी फडणवीसांची हाफ चड्डीवाले म्हणून संभावना केली ते आता चाहते आहेत. फडणवीसांची नवाब मलिक, भुजबळ साहेब आणि अजितदादा यांच्याबद्दलची विधान तुमच्या चांगलीच लक्षात असतील की व्हिडिओ स्वरूपात लावावीत? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. तसेच वेगळा विदर्भ झाल्याशिवाय ते लग्नही करणार नव्हते हे सुद्धा आठवतच असेल तुम्हाला? मनसे उनसे हे सांगणारे सुद्धा फडणवीसच न? असा खोचक सवालही अंधारे यांनी उपस्थित केला.

फडणवीसांच्या एका मुख्यमंत्री पदाच्या महत्वकांक्षेपायी काँग्रेसमुक्त म्हणता म्हणता भाजपा काँग्रेसयुक्त झाली. तुमच्यासारख्या निष्ठावान लोकांची फडणवीसांनी माती केली. यावर चिंतन करणे हे तुमच्या अधिक फायद्याचे राहील, असा सल्लाही सुषमा अंधारे यांनी केशव उपाध्ये यांना दिला आहे.

केशव उपाध्ये काय म्हणाले होते?बिनशर्ट, बिनशर्ट म्हणता म्हणता त्यालाच बिनशर्त तीनदा भेटले. केवळ आणि केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी आता मशालीला इंजिनाचे वंगण फासले, असे ट्विट करत केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची घेतलेल्या भेटीवर टीका केली आहे. तसेच, चरणस्पर्श कधी शिवतीर्थाचा तर जनपथावरि कधी लोटांगण, विचारांचे लोणी गेले, पालिकेची मलई गेली नाचता येईना वाकडे अंगण, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टोलाही लगावला होता.

दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणामुळे शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाहतूक बंद

वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

पुणे दि. 11 : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गांतर्गत हडपसर ते दिवेघाट या पॅकेज 6 मध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या कामासाठी खडकात ब्लास्टिंग करण्याची आवश्यकता असल्याने पोलिस प्रशासनाच्या देखरेखीखाली ब्लास्टिंगचे काम करण्यात येत आहे.

शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत दिवेघाटातील वाहतूक बंद राहणार असून, दोन्ही बाजूंनी प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहनचालकांसाठी कात्रज-बोपदेव घाट (राज्य मार्ग क्र. 131) मार्गे सासवड, खेडशिवापूर-सासवड लिंक रोड मार्गे सासवड, कापूरहोळ-नारायणपूर (राज्य मार्ग क्र. 119) मार्गे सासवड तसेच हडपसर-उरळी कांचन-शिंदवणे घाट मार्गे (राज्य मार्ग क्र. 61) सासवड या पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे.

वाहनधारकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने या पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पकाई पुणेचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
या पुढेही ज्या दिवशी असे ब्लास्टिंगचे काम असेल त्या दिवशी रस्ता बंद होईल. त्यावेळीही वाहनधारकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेत शिक्षक दिन उत्साहात साजरा….

पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या वतीने शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरवात  प्रमुख पाहुणे प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे, कार्यक्रमाचे  अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते   उदय जगताप, संस्थेच्या सरचिटणीस .प्रमिलाताई गायकवाड, संयुक्त चिटणीस वासंती बोर्डे,अजय पाटील,  खजिनदार धैर्यशील वंडेकर,के. टी. सोनावणे,  नियामक मंडळाच्या अध्यक्ष कमलताई व्यवहारे  यांचे हस्ते  माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या प्रसंगी संस्थेच्या विविध शाखांमधील  शिक्षकांचा अध्यापनात विशेष नैपुण्य मिळविल्याबद्दल व  ग्रंथपाल, क्रीडा संचालक, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी, कार्यालय अधिक्षक  यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते  विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी गणेश शिंदे यांनी राजर्षी शाहू महाराजांचा वारसा अविरतपणे चालविणाऱ्या, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणून गोरगरीब, ग्रामीण भागातील  मुलांच्या राहण्याची, जेवणाची सोय करून शिक्षणाची द्वारे  खुली  करणाऱ्या स्व. उत्तमराव पाटील  यांच्या कार्याचे स्मरण  केले. आजच्या बदलत्या शिक्षण पद्धतीवर बोलत असताना समाजाचा खरा शिल्पकार म्हणून शिक्षकांची भूमिका खूपच महत्त्वाची असल्याने  शिक्षकांनी काळाबरोबर नव तंत्रज्ञान अवगत करून स्वतः अपडेट हवे. समाजातील वाईट विचार दूर करून विद्यार्थ्यांच्या मनात चांगले विचार रुजविण्याचे काम शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी एकरूप होऊन केले पाहिजे. आजची बेरोजगारी पहाता विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याचे बळ देऊन कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे या साठी विद्यार्थ्याला जीवन जगण्याची कौशल्य देणारे विद्यापीठ म्हणजे शिक्षक  होय. समाजाचा उद्धार करण्यासाठी तत्त्वज्ञानाने   परीपूर्ण , तांत्रिक कुशल विद्यार्थी घडविण्यासाठी  शिक्षकांनी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन ज्ञानदान करावे. तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्याच्या प्रतिभेवर परिणाम होणार नाही यासाठी नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे अशी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त केली.   उदय जगताप यांनी  स्वतःच्या खडतर शैक्षणिक प्रवासाचे उदाहरण देऊन शिक्षण व्यवस्थेतील बदल, आईवडिलांचा आदर, जीवनातील संस्काराचे महत्व सांगून समाजातील वास्तवाची जाणीव  या प्रसंगी करून दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  संस्थेच्या सरचिटणीस प्रमिलाताई गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन संयुक्त चिटणीसअजय पाटील  यांनी केले. सत्कारार्थीच्या वतीने डॉ.  प्रवीण जाधव  यांनी  मनोगत व्यक्त केले.

भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रशियामध्ये केले लोककलांचे बहारदार सादरीकरण

स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे रशियातील आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादरीकरण
पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् ने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा लोककलेचा सांस्कृतिक ठसा उमटवला आहे. रशियातील व्लादिमिर येथे झालेल्या गोल्डन रिंग इंटरनॅशनल फोल्कलोर फेस्टिव्हल मध्ये  विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र व आसाम येथील लोकनृत्य प्रकार  लावणी, गोंधळ, बिहू व भोरताल सादर केले.

भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्ली व रशियाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या निमंत्रणावरून या महोत्सवात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी दाद दिली. या आंतरराष्ट्रीय महोत्सवात भारतासह तब्बल १० देशांतील संघांनी सहभाग नोंदवला. भारती विद्यापीठाचे स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् मधील १० विद्यार्थी व संचालक  प्राध्यापक प्रा. शारंगधर साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम व कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी अभिनंदन केले.

प्रा. शारंगधर साठे म्हणाले, भारतीय लोककलेच्या परंपरेकडे जगभरात आदराने पाहिले जाते. आंतरराष्ट्रीय महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांनी मेहनत, सराव आणि जिद्दीने उत्कृष्ट सादरीकरण करून भारताची मान उंचावली आहे. जागतिक मंचावर आपल्या लोकनृत्यांना इतका मोठा प्रतिसाद मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

वीज क्षेत्रातील कामगिरीत महावितरणचा प्रथम क्रमांक,केंद्र सरकारच्या मानांकनात यश, १०० पैकी ९३ गुण

0

मुंबईदि. ११ सप्टेंबर २०२५: केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये शंभरपैकी ९३ गुण मिळवून महावितरणने प्रथम क्रमांक मिळविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने केलेल्या कामगिरीमुळे कंपनीला यश मिळाले आहे. या यशाबद्दल आपण मा. मुख्यमंत्र्याचे आभार मानतो तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो, असे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

महावितरणच्या कामगिरीत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर व अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले, असे ते म्हणाले.

ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने आरईसी व पॉवर फाऊंडेशन ऑफ इंडिया यांनी वीज कंपन्यांचे मानांकन निश्चित केले. पश्चिम भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण १०० पैकी ९३ गुणांसह महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे व राज्याला ए मानांकन मिळाले आहे. महाराष्ट्राच्या पाठोपाठ मध्य प्रदेश (८४.५ गुण), गोवा (७४ गुण), दादरा, नगर हवेली आणि दीव दमण (७४ गुण), गुजरात (६७ गुण) व छत्तीसगड (५२ गुण) यांचा क्रमांक लागतो.

मानांकन निश्चित करण्यासाठी पाच निकष ठरविण्यात आले होते. त्यापैकी संसाधन पर्याप्तता (३२ पैकी ३२ गुण), ऊर्जा परिवर्तन (१५ पैकी १५ गुण) व नियामकाच्या अनुषंगाने प्रशासन (५ पैकी ५) या तीन घटकात महावितरणला पैकीच्या पैकी गुण मिळाले. वीज कंपनीचे आर्थिक स्थैर्य या घटकात २५ पैकी २४ गुण मिळाले. जीवन सुलभता व व्यवसाय सुलभता या निकषात महावितरणला २३ पैकी १७ गुण मिळाले. या निकषात गुजरातला १४ तर मध्य प्रदेशला १६ गुण मिळाले.

वीज क्षेत्रातील कामगिरीबद्दल गुणांकनाची प्रक्रिया ३ मार्च रोजी सुरू झाली होती. देशातील मानांकनामध्ये ८५ पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या राज्यांचा ए गटात समावेश केला असून त्यामध्ये महाराष्ट्रासह एकूण ८ राज्ये आहेत.

महावितरणच्या यशाचे कारण

महावितरणने गेल्या तीन वर्षात ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी तसेच भविष्यकाळाचा वेध घेऊन वीज पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली. त्यामुळे मानांकन उंचावले आहे.

आगामी काळात राज्याची विजेची मागणी किती असेल याचा अभ्यास करून महावितरणने ऊर्जा विभागाच्या मदतीने आराखडा तयार केला. अशा प्रकारे ऊर्जा परिवर्तन आराखडा तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

ऊर्जा परिवर्तन आराखड्यानुसार महावितरणने गेल्या अडीच वर्षात ४५,००० मेगावॅट वीज खरेदीसाठीचे करार केले व आगामी पाच वर्षांची तरतूद केली. या वीज खरेदी करारांमध्ये नवीकरणीय ऊर्जेवर भर दिल्यामुळे आगामी पाच वर्षात वीज खरेदीचे ६६ हजार कोटी रुपये वाचणार असून त्याच्या आधारे महावितरणच्या वीजदरात पाच वर्षांसाठी सर्वच ग्राहकांच्या वीजदरात कपात करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीचा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० हा १६ हजार मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. राज्याच्या ऊर्जा परिवर्तनासाठी हा महत्त्वाचा गेम चेंजर प्रकल्प आहे. शेतांमध्ये सौर पंप बसविण्याच्या बाबतीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. वीज पुरवठ्याचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी महावितरणतर्फे आरडीएसएस योजनेच्या अंतर्गत पायाभूत सुविधांचे काम प्रभावीपणे चालू आहे. या सर्वांचा विशेषतः वीजदराच्या कपातीत मिळालेल्या यशाचा परिणाम म्हणून महावितरणला १०० पैकी ९३ गुण मिळाले असून प्रथम क्रमांक मिळाला आहे.

जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य झाल्यात:त्यांनी आता अल्टिमेटम न देता मागण्यांची अंमलबजावणी कशी होईल याचे प्रयत्न करावेत – मंत्री पाटील

सांगली -मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे व मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद एका नव्या उंचीवर पोहोचला आहे. त्यातच आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जरांगेंना सरकारला अल्टिमेटम न देता सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी कशी होईल यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे.चंद्रकांत पाटील गुरूवारी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. गाव पातळीवर समिती स्थापन झाली. गावात एखाद्या व्यक्तीकडे कुणबी दाखला असेल तर त्याचा भाऊबंद आहे, त्यालाही प्रतिज्ञापत्रावर सक्षम अधिकाऱ्याने पडताळणी करून दाखला द्यायचा आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यामुळे, आता त्यांची अंमलबजावणी कशी होईल यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. सरकारने जरांगे यांच्या सर्वच मागण्या मान्य केल्यामुळे आता त्यांच्या आंदोलनाची धार कमी होईल असा दावाही मंत्री पाटील यांनी यावेळी बोलताना केला.

मनोज जरागे यांच्या आझाद मैदानावरील उपोषणानंतर महायुती सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यासाठी एक खास जीआर काढला. या जीआरवरून सध्या जरांगे व मंत्री छगन भुजबळ रोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भुजबळ यांनी या शासन निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय दिल्यानंतर जरांगे यांनीही मंडल आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत ओबीसी आरक्षणाच्या मुळावर घाव घालण्याची तयारी केली आहे. यामुळे महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण गढूळ झाले असताना आता राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे यांना आपल्या मागण्यांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी छगन भुजबळांचीही मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसींचे कोणतेही नुकसान होणार नसल्याची खात्री पटत असल्याचाही दावा केला. छगन भुजबळ गत अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात. त्यांच्यासाठी भांडतात. त्यामुळे ते ताक सुद्धा फुंकून पीत आहेत. त्यांची हळूहळू खात्री होत आहे की, यातून ओबीसींना कोणताही धक्का लागत नाही. त्यामुळे ते आपल्या सहकाऱ्यांना मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागत नसल्याचे समजावून सांगत आहे. बबनराव तायवाडे जसे आपल्या सहकाऱ्यांना सांगत आहेत, तसेच भुजबळही करत आहेत, असे ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी छगन भुजबळ यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचेही संकेत दिलेत.

“महिलांचा राजकारणातील सहभाग वाढविणे हे देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक- उपसभापती ना.डॉ. नीलम गोऱ्हे”

समाज, पक्ष, कुटुंब आणि शासकिय यंत्रणेत महिलांनी सक्षमीकरणासाठी योगदान देण्याचे आवाहन

पुणे, ११ सप्टेंबर २०२५ : महिलांच्या स्थिती व समस्यांवर सातत्याने अभ्यास, माहिती संकलन आणि संशोधन करणारे ‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र’ यांनी यंदा त्यांच्या विशेषांकासाठी “महिलांचा राजकारणातील सहभाग” हा विषय निवडला. या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना, डॉ. नीलम गोऱ्हे यांचेसह इतर मान्यवरांच्या हस्ते दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी, सायंकाळी ६ वाजता न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथील गणेश हॉलमध्ये पार पडला.
प्रकाशन सोहळ्या नंतर आयोजित चर्चासत्रात त्यांच्यासोबत खासदार मा.मेधा कुलकर्णी तसेच मा. सुमनताई थोरात (माजी सरपंच, शेवाळेवाडी), मा. गायत्री ताई चिखले (माजी सरपंच, पिंपरी-दुमाला, शिरूर) यांचा सहभाग होता . महिलांच्या राजकारणातील भूमिका, आव्हाने व संधी या विषयांवर मान्यवर महिलांमध्ये सखोल विचारमंथन झाले.

महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी या चर्चेचे महत्त्व अधोरेखित झाले. कार्यक्रमाचे आयोजन मा. अरूण सारस्वत अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांनी केले.
प्रास्ताविकानंतर चर्चासत्राला सुरुवात झाली. ना.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “१९७५ च्या ‘स्टेटस ऑफ वुमन कमिटी’च्या अहवालात महिलांचा राजकारणातील सहभाग फक्त चार टक्के असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर काही प्रमाणात परिस्थिती बदलली असली तरी महिलांना कुटुंबातील जबाबदाऱ्या,चारित्र्यहनन व हिंसाचारामुळे राजकारणापासून दूर रहावे लागते. परंतु प्रत्यक्षात समाजातील प्रत्येक प्रश्न हा निर्णय प्रक्रियेशी आणि राजकारणाशी संबंधित आहे. त्यामुळे महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवणे ही काळाची गरज आहे.”

डॉ. गोऱ्हे यांनी पुढे सांगितले की, कायदे व धोरणांमध्ये बदल करण्याची ताकद केवळ विधिमंडळात असते. महिलांच्या मतदानात झालेली लक्षणीय वाढ ही राजकीय समीकरणांवर थेट परिणाम घडवून आणते. “आज महिलांची स्वतंत्र मतदार बँक निर्माण झाली आहे आणि ती राजकारणातील समीकरणे बदलविण्याची ताकद दाखवते. पुरुषप्रधान राजकारणात संघर्ष करूनही महिलांनी सक्षम नेतृत्व निर्माण केले आहे. संघर्ष असूनही मला या क्षेत्रातून जास्त शिकायला आणि मिळवायला मिळाले,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच महिलांवरील चारित्र्यहनन, लैंगिक प्रकारच्या टिप्पणी आणि कुटुंब-राजकारणातील समन्वय या मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केले. “महिला सुरक्षिततेच्या प्रश्नावर आजही पुरेशी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे महिलांच्या संघटनांनी अधिक सक्रिय होणे आवश्यक आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले.

महिलांनी राजकारणात येऊन सामाजिक प्रश्न सक्षमपणे सोडविण्यास वाव आहे, परंतु यासाठी तिला कुटुंब, समाज, राजकीय पक्ष आणि प्रशासन या सर्व स्तरावर सहकार्य मिळणे आवश्यक आहे असे मत ना. नीलम गो-हे उपसभापती
विधानपरिषद यांनी व्यक्त केले.

आतंकी कारवायामुळे एकीकडे पाकचे पाणी बंद करायचे आणि दुसरीकडे क्रिकेट खेळायचे ..या पॉलीसीमागे दडलंय काय ?

पुणे-भारत – पाक क्रिकेट सामना बाबत आम्ही काँग्रेस सोबत देखील चर्चा करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही, असे सरकारने म्हटले होते .आणि एकीकडे पाकिस्तानचे पाणी अडवले तर दुसरीकडे त्याच पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायचे हे धोरण कसले? भारत सरकारने पाक बाबत धोरण बदलले आहे काय ? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. आतंक वादाच्या विरोधामध्ये झालेल्या ऑपरेशन सिंदूरला आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला आहे. एकीकडे संपूर्ण भारत त्याबाबतीत एकत्र असताना क्रिकेट चा विषय आल्यावर भारत सरकारने त्यांचे धोरण बदलले काय? असा प्रश्न आपण विचारणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.सुप्रिया सुळे यांनी रोजगारासंदर्भात देखील राज्य सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी पुण्यातील हिंजवडीमध्ये बारा हजार नोकऱ्या एकट्या इन्फोसिसने कमी केले असल्याचे म्हटले आहे. सध्या पुण्यात मुलांना नोकरी मिळत नाही. नवीन कंपन्या येत नाहीत, कॅम्पस मध्ये मुलांना पॅकेज मिळत होते, ते ही आता मिळत नसल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.

सरकारकडे योजनांसाठी देण्यास देखील पैसे नाही. लाडकी बहिण योजनेतही पहिल्याच टप्प्यात 26 लाख महिलांना वगळण्यात आले आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या माध्यमातून त्यांनी नाव न घेता अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी आरोप केला की, योजनांसाठी निधी मिळत नाही, कारण सरकारकडे पैसे नाही. सरकारने याचा विचार करावा. पिक्सल डिफिसिएट मॅनेजमेंट कायदा हा अटल बिहारी वाजपेयी सरकारने केला आहे. मात्र, सरकारची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. याला कोण जबाबदार आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकारमध्ये कधीच विरोधी पक्षातील खासदारांची कामे होत नाही, असे होत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा जल-जीवन मिशन संदर्भात कोणतेही मंत्री आम्हाला नाही म्हणत नाही. विरोधी पक्षाच्या खासदारांसोबत निधी वाटपात केंद्र सरकारमध्ये दुजाभाव होत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. मात्र महाराष्ट्र मध्ये नवीन कल्चर आले असून ते वेदना देणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आम्ही देखील लोकप्रतिनिधी आहोत, विरोधी पक्षात आहोत म्हणून आम्हाला निधी देणार नाही? आणि जे सत्तेत आहेत, त्यांना निधी देणार? हे फार वेदनादायी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. या राजकारणाला अर्थ काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यामुळे अस्वस्थ करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वार्थासाठी सरकार सोबत गेलेल्या लोकांना निधी मिळत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडी राज ठाकरे यांचा समावेश याबाबत देखील सुप्रिया सुळे यांनी मत व्यक्त केले आहे. आमची समविचारी पक्षांना एकत्र घेण्याची आमची कायम तयारी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पूर्वीपासून आघाडी असताना देखील वेगवेगळे लढत आले आहेत. आजपर्यंतचा इतिहास तसाच आहे. याबाबतचे सर्व निर्णय हे स्थानिक पातळीवर होत असतात. अगदी तालुका पातळीवरचा निर्णय देखील तालुकाध्यक्ष घेत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

निवडणूक यादीमध्ये पारदर्शकता येत असेल तर त्याचे स्वागत करायला हवे. निवडणुकांमध्ये पारदर्शकता असावी आमची अशी आधीपासूनच मागणी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक मतदारांच्या यादीचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला, असेल तर त्याचे आम्ही स्वागत करत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

मांत्रिकाने अंगारा लावून पेढा दिला, अन विवाहितेकडून 3 लाख उकळले

पुणे : मूल होत नसल्याच्या समस्येवर उपाय म्हणून मंत्रोच्चार आणि अंगारा लावून महिलेला पेढा देऊन एका मांत्रिकाने महिलेकडून तीन लाख १५ हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

सहकारनगर परिसरात हा प्रकार घडला असून, पोलिसांनी गिरीश बलभीम सुरवसे, वय ३६ वर्ष, रा. भोसरी, याच्यावर भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र नरबळी-जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी बालाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका २६ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. आरोपी सुरवसे याला अटक करण्यात आली असून, त्याच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे. हा प्रकार २८ जुलै ते नऊ सप्टेंबर २०२५ या काळात घडला आहे.आरोपीने पीडितेला विश्वासात घेऊन मंदिरात नेले. तेथे मंत्रोच्चार करीत अघोरी विधी केल्याचे भासवले. त्यानंतर अंगाऱ्याचा पेढा खाण्यास देऊन सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तीन लाख १५ हजारांचा ऐवज घेतला. आपली फसवणूक झाल्याच्या निदर्शनास आल्यानंतर पीडितेने तक्रार दिली. त्यानंतर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.‘अंधश्रद्धेला बळी पडू नका. कोणत्याही संशयास्पद व्यक्तीने जादूटोणा, अंगारे किंवा चमत्कारिक विधींच्या नावाखाली पैसे, दागिने मागितल्यास तत्काळ पोलिसांना कळवा,’ असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

CRPF चा आरोप- राहुल गांधी सुरक्षा प्रोटोकॉल पाळत नाही:काँग्रेस अध्यक्ष खरगेंना पत्र लिहिले- न कळवता परदेशात जातात, ही चिंतेची बाब

0

राहुल ९ महिन्यांत ६ वेळा परदेशात गेले

नवीदिल्ली- केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून राहुल गांधी यांनी सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. इटली, व्हिएतनाम, दुबई, कतार, लंडन आणि मलेशिया यासारख्या देशांच्या दौऱ्यांदरम्यान राहुल गांधी यांनी सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे सीआरपीएफने म्हटले आहे.सीआरपीएफने राहुल गांधी यांना एक वेगळे पत्र लिहून या प्रकरणाची माहिती दिली आहे. पत्रात असे लिहिले आहे की त्यांच्या सुरक्षेचा विचार करता असे करणे गंभीर चिंतेची बाब आहे. अशा चुकांमुळे व्हीव्हीआयपी सुरक्षा कमकुवत होते. त्यांना धोक्यांचा सामना करावा लागू शकतो.

राहुल गांधींना अॅडव्हान्स सिक्युरिटी लायझन कव्हरसह सर्वोच्च पातळीची Z+ सुरक्षा आहे. Z Plus सिक्युरिटीमध्ये एकूण ५५ सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये १० हून अधिक NSG कमांडोंचा समावेश आहे.उर्वरित सुरक्षा कर्मचारी सीएपीएफ आणि स्थानिक पोलिसांचे आहेत.

यलो बुक प्रोटोकॉल अंतर्गत, उच्च श्रेणीतील संरक्षण मिळालेल्यांना पुरेशी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या हालचालींबद्दल सुरक्षा शाखेला आधीच माहिती द्यावी लागते. यामध्ये परदेश प्रवास देखील समाविष्ट आहे.
सीआरपीएफचे व्हीव्हीआयपी सुरक्षा प्रमुख सुनील जून यांनी बुधवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या पत्रात आरोप केला आहे की राहुल गांधी त्यांच्या सुरक्षेला गांभीर्याने घेत नाहीत कारण ते बहुतेक परदेश दौऱ्यांवर कोणालाही न कळवता जातात.सीआरपीएफने राहुल यांच्या परदेश दौऱ्यांचा उल्लेख केला आहे – ३० डिसेंबर ते ९ जानेवारी दरम्यान इटली, १२ ते १७ मार्च दरम्यान व्हिएतनाम, १७ ते २३ एप्रिल दरम्यान दुबई, ११ ते १८ जून दरम्यान कतार, २५ जून ते ६ जुलै दरम्यान लंडन आणि ४ ते ८ सप्टेंबर दरम्यान मलेशिया.

प्रगत सुरक्षा संपर्क कव्हर हे झेड प्लस आणि इतर व्हीआयपी सुरक्षा श्रेणींपेक्षाही उच्च दर्जाचे सुरक्षा कव्हर आहे कारण त्यासाठी तयारी आणि समन्वय खूप तीव्र आहे.याअंतर्गत, व्यक्ती जिथे जाईल त्या ठिकाणाच्या सुरक्षेतील त्रुटी तपासाव्या लागतात. जिल्हा प्रशासन, राज्य पोलिस, आरोग्य विभाग यांचा आधीच सल्ला घ्यावा लागेल आणि सुरक्षा व्यवस्था कशी असेल याबद्दल योजना बनवावी लागते.याशिवाय, संभाव्य स्फोटांची तयारी, स्फोटक पदार्थांची तपासणी, लोकांची तपासणी, सुरक्षा उपकरणे यांचा आढावा घेतला जातो.कुठे किती वाजता जायचे, मार्ग कसा असेल, आपत्कालीन योजना कशी असेल, आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे, या सर्व गोष्टींचा सराव केला जातो.

पुणे 2012 साखळी बॉम्बस्फोट :आरोपी फारुख बागवानला जामीन मंजूर

0

मुंबई- 2012 मध्ये पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फारुख बागवान याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. खटल्याची सुनावणी न झाल्यामुळे 12 वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर त्याला हा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी याच प्रकरणातील दुसरा आरोपी असलम शब्बीर शेख यालाही 2023 मध्ये जामीन मिळाला होता.उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, प्रत्येक आरोपीला खटला जलदगतीने चालवण्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, बागवानचा खटला नजीकच्या काळात पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. तसेच, इतर आरोपींप्रमाणेच त्याच्यावरही समान आरोप आहेत, त्यामुळे त्यालाही समानतेच्या आधारावर जामीन मिळण्याचा हक्क आहे. बागवानविरोधात या प्रकरणाशिवाय इतर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

1 ऑगस्ट 2012 रोजी पुण्यातील जंगली महाराज रोडवर एकामागोमाग एक पाच बॉम्बस्फोट झाले होते. हे बॉम्ब डेक्कन परिसरातील सहा ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यापैकी पाच बॉम्ब काही मिनिटांच्या अंतराने फुटले, तर एक बॉम्ब निकामी करण्यात आला. सुदैवाने, बॉम्ब तयार करताना झालेल्या चुकीमुळे मोठी जीवितहानी टळली होती. या स्फोटांमध्ये एक व्यक्ती जखमी झाली होती.या घटनेनंतर पुण्यात मोठी खळबळ उडाली होती. अनेकांना सुरुवातीला या स्फोटांचे गांभीर्य लक्षात आले नाही. पण, काही मिनिटांतच काही अंतरावर ठेवण्यात आलेले पाच बॉम्ब सलग फुटल्याने मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे समोर आले होते. डेक्कर परिसर, बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड कॅफे, देना बँक, गरवारे पूल या पाच ठिकाणी हे बॉम्ब ठेवण्यात आले होते.

याच प्रकरणातील अन्य आरोपींनाही यापूर्वी जामीन मिळाला आहे. 19 जानेवारी 2023 रोजी आरोपी असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदारला देखील मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यामुळे, इतर आरोपींप्रमाणेच समानतेच्या आधारावर बागवानलाही जामीन मिळण्याचा हक्क असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. बागवान विरोधात या प्रकरणाव्यतिरिक्त कोणताही गुन्हा दाखल नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे आरोपी फारुख बागवानची लवकरच तुरुंगातून सुटका होणार आहे.

जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीकडून राज्यभर निषेध आंदोलन.

मुंबई,
शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या गोंडस नावाखाली राज्यातील महायुती सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा हा जनसामान्यांचा आवाज दाबणारा, घटनाविरोधी कायदा आहे. या अत्याचारी जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीने आज राज्यभर निषेध आंदोलन करून हा अन्यायकारक कायदा रद्द करा,अशी मागणी केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), माकपा, भाकपा, शेकाप यांच्यासह समविचारी पक्षांनी व सामाजिक संघटनांनी या आंदोलात भाग घेतला.

मुंबईत शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडी व डाव्या पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले, यावेळी आमदार डॉ. ज्योती गायकवाड, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, प्रदेश उपाध्यक्ष राजन भोसले, राजेश शर्मा, धनंजय शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात आले. नागपुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे व्हेरायंटी चौक येथील गांधी पुतळ्याजवळ अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष आ. अभिजीत वंजारी, विशाल मुत्तेमवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती संभाजी नगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात खासदार कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील, शहर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्यासह इंडिया आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते. बुलढाणा, जालना, अमरावती, नांदेड, चंद्रपूर, पालघर, रत्नागिरी, धाराशिव, सोलापूर, लातूर, ठाणे, जळगाव, अकोला, वाशिम, नाशिक, धुळे यासह राज्यभरातील सर्व जिल्हाच्या ठिकाणी आणि तालुका मुख्यालयी महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते, डावे पक्ष व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन या काळ्या कायद्याविरोधात आंदोलन केले.

गौरी गाडगीळ आता ‘पर्पल फेस्ट’च्या दूत

पुणे : ‘यलो’ चित्रपटातील भूमिकेतून ओळख मिळवलेली,आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आणि सक्षमीकरण क्षेत्रातील कार्यासाठी प्रसिद्ध पुण्याच्या गौरी गाडगीळ यांची आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ साठी ‘पर्पल अॅम्बेसेडर’ म्हणून निवड झाली आहे. त्या ‘बौद्धिक दिव्यांगत्व’ प्रकाराचे त्या प्रतिनिधित्व करतील. हा महोत्सव नऊ ते १२ ऑक्टोबर या दरम्यान गोव्यात होणार आहे. गोवा सरकारच्या अपंग व्यक्ती आयुक्त कार्यालय, केंद्र सरकारचा दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभाग आणि संयुक्त राष्ट्र संघटना इंडिया यांच्या सहकार्याने या फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे

चव्हाणनगर कमानीजवळ मारहाण करून जबरीने लुटणारे तिघे ट्रेझर पार्कजवळ पकडले, २ अल्पवयीन

पुणे- सातारा रस्त्यावरील चव्हाण नगर कमानी जवळ रात्री साडेबारा वाजता अपघातग्रस्त बनून एकाला लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी ट्रेझर पार्कजवळ पकडले .यातील दोघे अल्पवयीन मुले आहेत तर एक १९ वर्षाचा तरुण आहे .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.०६/०९/२०२५ रोजी रात्री १२/३० वाचे सुमा. फिर्यादी चव्हाणनगर कमान चौक पुणे सातारा रोड काळुबाई मंदिराजवळ पुणे येथुन जात असताना कात्रजकडुन एका मोपेड दुचाकी गाडीवरून तीन इसम अचानक आडवे आले व त्यांचे दुचाकी गाडीची फिर्यादी यांचे गाडीला धडक झाली व ते खाली पडले. त्यावेळी फिर्यादी गाडी थांबवुन कोणी इसम जखमी झाले काय याबाबत त्यांचेकडे विचारण्यासाठी गाडीतुन खाली उत्तरले असता त्या तीघांनी शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तसेच आम्हाला पायाला लागले आहे दहा हजार रूपये खर्च दे असे म्हणाले. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना हाताने व लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली व फिर्यादी यांचे माझे दोन मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावुन चोरून नेले बाबत सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३७९/२०२५ भारतीय न्यास संहिता २०२३ चे कलम ३०९ (६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचे अनोळखी आरोपी गुन्हा करून फरार झाले होते.
दि.०८/०९/२०२५ रोजी दाखल गुन्हयाचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व अमित पदमाळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा करणारे तीन आरोपी हे ट्रेझर पार्क सहकारनगर पुणे येथील श्रीहरी हॉटेलचे जवळ एमएच १२ एक्स झेड ५४७२ या काळे रंगाचे अॅक्सेस गाडीवर बसलेले असुन ते कोणाची तरी वाट पाहत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन लागलीच स्टाफसह बातमीचे ठिकाणी जावुन स्टाफसह बातमीप्रमाणे जावुन तीनही आरोपीना ताब्यात घेवुन त्यांची नावे पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) अनिकेत गणेश शिंदे वय १९ वर्षे रा.सर्वे नं.९२, शाहु वसाहत, अनिता वॉशिंग सेंटर मागे, लक्ष्मीनगर पुणे असे असल्याचे सांगितले त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांचेपैकी दोन विधिसंघर्षीत बालक असल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर इरामांकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी करता त्यांनी फिर्यादी यांना गाडीची धडक झाल्याचे कारणा वरुन मारहाण करून त्यांचेकडील दोन मोबाईल हिसकावुन चोरून नेलेची कबुली दिली असून त्यांचे कब्जातून एकुण २५,०००/- रु किंचे दोन मोबाईल हॅण्डसेट जप्त करून सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३७९/२०२५ भारतीय न्यास संहिता २०२३ चे कलम ३०९ (६), ३ (५) प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे.