Home Blog Page 1943

आर्यन्स समूह २६ जूनला अठराशे कोटींचा निधी देणार राष्ट्राला,राष्ट्रीय स्तरावर १५०० तर राज्याच्या स्तरावर ३०० कोटी

पीएम केअर फंड,नॅशनल डिफेन्स फंड आणि पीएम नॅशनल रिलीफ फंड ला १५०० कोटी

राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २०० कोटी आणि मुख्यमंत्री कामगार निधीला १०० कोटी

पुणे – आर्यन्स समुहाच्या वतीने पीएम केअर फंड,नॅशनल डिफेन्स फंड आणि पीएम नॅशनल रिलीफ फंड या राष्ट्रीय स्तरावरील कोषात प्रत्येकी पाचशे कोटी,राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २०० कोटी आणि मुख्यमंत्री कामगार निधीला १०० कोटी याप्रमाणे तब्बल अठराशे कोटी निधी सामाजिक दायित्व म्हणून समर्पित करणार असल्याची घोषणा आज समूहाचे सीईओ मनोहर जगताप यांनी केली.

राज्यात,देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्यानेच आपल्या विविध व्यावसायिक श्रृंखलेतून
उद्योगक्षेत्रात पायाभरणी करीत असलेल्या आर्यन्स उद्योग समूहाच्या वतीने सुरू झालेल्या व येत्या २६ जून रोजी उद्घाटन केले जाणार आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री.जगताप यांनी राष्ट्रीय व राज्य सहाय्यता कोषात भरीव योगदान देण्याचे जाहीर करतांनाच आरोग्य क्षेत्रात कोरोना काळात व पश्चातही अत्यंत पायाभूत समजल्या जाणारे तब्बल ३७ व्हॅटीलेटर लोकार्पण केले जाणार असल्याचे सांगत प्रत्यक्षात औध येथील रुग्णालयाला प्रातिनिधिक स्वरूपात स्व.सुनील मुरलीधर जगताप यांच्या स्मरणार्थ श्रीमती वत्सलाबाई मुरलीधर जगताप यांच्याहस्ते डॉ.गिरीष कुऱ्हाडे यांना व्हॅटीलेटर सुपूर्द केले.
ओमा फौंडेशनच्या वतीने सामाजिक दायित्व म्हणून उर्वरित ३५ व्हॅटीलेटर लवकरच देण्यात येतील.

श्री.जगताप यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना स्पष्ट केले की,आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज यावर्षी आपला यशोत्सव साजरा करत आहे. समूहाने आपल्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ केला असून येत्या २६ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कंपनीच्या १२० एकरवर फक्त नैसर्गिक स्त्रोतातून साकारल्या जाणार असलेल्या मुख्य कार्यालयाचे भूमिपूजन प्रस्तावित आहे.आर्यन्स समूह रिफायनरी, एक्सर ई-बाईक,लिथियम आयन बॅटरी, सोडियम आयन बॅटरी, हायड्रोजन फ्युएल,बायोफ्युएल, विन एअर, आद्या एअर कॅब सर्व्हिसेस या उपक्रमासह दळणवळण क्षेत्रात पदार्पण करत असून ऑरगॅनिक शेती,होम अप्लयांस,स्व नावाने ह्युमन रोबोट,सोलर एनर्जी आदी ४७ क्षेत्रात सेवारत राहणार असल्याचे लाईव्ह सादरीकरण उपस्थित पत्रकारांना दाखवले.यातील काही उपक्रमांचे पंतप्रधान श्री.मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री.गडकरी,अर्थराज्य मंत्री भागवत कराड,मुख्यमंत्री उद्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि इतर मान्यवरांच्या उद्घाटन होणार आहे,असे नमूद केले.

एक्सर ई- बाईकचे सुद्धा वाटप –
राज्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवेत कार्यरत आशा वर्कर्स,महाराष्ट्र पोलिस दलाला व पुणे पोलिसांना प्रत्येकी शंभर याप्रमाणे ३०० एक्सर ई-बाईक समुहाच्या वतीने मोफत वाटप केल्या जात असल्याचे सांगण्यात आले.आर्यन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकुंद जगताप,ओमा फौंडेशनचे अध्यक्ष अजय जगताप,संचालक संजय शेंडगे,कामेश मोदी,किरण लोहार आदी संचालकांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाच्या संयोजनासाठी गृपचे इव्हेंट हेड प्रवीण वानखेडे, निखिल जाधव,अविनाश उबाळे, प्रवीण कदम आदींनी परिश्रम घेतले.

बालिकांच्या शिक्षणासाठी दिल्लीतील मराठमोळ्या आनंद रेखींचा पुढाकार’,नोएडा’त विद्यार्थीनींसाठी नि:शुल्क वातानुकूलित बस सेवा  

0


नवीदिल्ली- बालिकांच्या शिक्षणाचा टक्का वाढावा,उच्च शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ या संकल्पनेच्या पुर्ततेसाठी दिल्लीतील मराठमोळे भाजप नेते आणि एम्पायर ट्रान्सपोर्टचे संचालक आनंद रेखी यांनी पुढाकार घेतला आहे.राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील नोएडात सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी 200 वाताणुकूलित बसेस चालवून या बसेसमध्ये विद्यार्थीनींना नि:शुल्क प्रवास सुविधा उपलब्ध करवून देण्यात येईल,अशी माहिती शनिवारी रेखी यांनी दिली.
यासंबंधी नुकतीच त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली असून राज्य सरकार बस सेवेसंबंधी लवकरच सकारात्मक निर्णय घेईल,असा विश्वास व्यक्त केला.यूपीतील नोएडात अशाप्रकारचा पथदर्शी प्रकल्प राबवून त्याच्या यशस्वीतेवर इतरही शहरांमध्ये हा उपक्रम राबवता येईल,असे रेखी म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात नवनवीन प्रकल्प, सुविधा देशहितार्थ सुरूवात केली जात आहे. याच अनुषंगाने सर्वसामान्यांसाठी अत्यंत माफक दरात नोएडात या वाताणुकूलित बस सेवा सुरू करण्यात येतील. या बसेसमध्ये विद्यार्थींनांना नि:शुल्क प्रवासाची सुविधा दिली जाईल,असे रेखी म्हणाले.
सर्वसामान्यांसाठी रेखी यांच्या कंपनीकडून यापूर्वी 55 बसेस नोएडात धावत होत्या.कोरोना काळात करण्यात आलेल्या टाळेबंदीदरम्यान याच बसेसच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरोघरी जेवण पोहचवण्याचे काम करण्यात आले होते. पंरतु, नोएडाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून ही परिवहन सेवा बंद केली आहे. ही बस सेवा पुर्ववत करण्यात आल्यास गोरबरीबांना त्याचा लाभ होवून त्यांच्या पैशांची बचत होईल,असे मत रेखींनी व्यक्त केले. सार्वजनिक परिवहन व्यवस्था बाधित होवू नये याकरीता ही सेवा सुरळीत सुरू राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
यापूर्वी देखील नोएडावासियांसाठी अंतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली होती.पंरतु, नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशन एनएमआरसी कडून ही सेवा बंद करण्यात आली होती. नोएडात सार्वजनिक परिवहानाची प्रभावी व्यवस्था नसतांना बस सेवा बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा फटका बसतोय. गेल्या तीन वर्षात चांगल्या पद्धतीने परिवहन संचालन केल्याने अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार कंपनीला मिळाले आहेत.पंरतु, असे असतानाही ही सेवा बंद असल्याची खंत रेखी यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे व्यक्त केली.

आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा; कोविड लसीकरणाला पुन्हा गती द्या

0

अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांचे जिल्हाधिकारी, आयुक्त यांना पत्र

मुंबई दि. 4 : कोविड बाधित रुग्णांची गेले काही दिवसांत वाढत असलेली संख्या पाहता आरटीपीसीआर चाचण्यांची  संख्या आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत.

डॉ. व्यास यांनी याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी सविस्तर सूचना दिल्या आहेत.

डॉ. व्यास यांनी नमूद केले आहे की, राज्यातील चाचण्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.  एक जूनच्या माहितीनुसार राज्यातील सव्वीस जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षाही कमी झाली आहे. ही बाब तात्काळ सुधारणा करणे आवश्यक आहे. प्रति दहा लाख लोकसंख्येमागे एका आठवड्यात किमान 980 चाचण्या करणे आवश्यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. एकूण चाचण्यांपैकी साठ टक्के चाचण्या आरटीपीसीआर असायला हव्यात. याबाबत दर आठवड्याला सर्व लॅबोरेटरी चालकांची बैठक घ्यावी. कोविड 19 पोर्टलवर माहिती भरली जावी. रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली जावी. ज्या लॅबोरेटरी मध्ये अतिशय कमी अथवा एकदम जास्त रुग्ण आढळत असतील तर त्यावर नजर ठेवली जावी.

राज्याच्या काही भागात कोविड विषाणूचे विविध व्हेरियंट आढळले होते. या पार्श्वभूमीवर नवीन पॉझिटिव्ह केसेस बाबत दर आठवड्याला विश्लेषण केले जावे. या आधारे स्थानिक पातळीवर  उपाययोजना करणे शक्य होईल. नवीन रुग्ण आणि पुन्हा बाधित होणारे रुग्ण याबाबत विश्लेषण केले जावे, असे श्री. व्यास यांनी नमूद केले आहे.

नजीकच्या काळात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता गृहित धरून रुग्णालयातील पायाभूत सुविधा, कोविडसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधा व्यवस्थित आहेत का याची पाहणी करावी. मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था, यंत्रसामग्री आदी सुस्थितीत आहेत याची खात्री करावी, असेही डॉ. व्यास यांनी पत्रात नमूद केले आहे.

ताप आणि सारीने आजारी असणारे रुग्णांवर लक्ष ठेवून राहावे. ताप अथवा घशात खवखव असणाऱ्या नागरिकांना चाचणी करुन घेण्यास सांगावे. सहव्याधी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एसएमएसचा( सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटायझेशन) वापर करण्यास सांगावे. कोविड अनुकूल वर्तन करण्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात यावे. ट्रेन, बस, चित्रपटगृह, कार्यालय, महाविद्यालय, दवाखाना आणि शाळांत मास्क वापरण्यास प्रवृत्त करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

बारा ते अठरा वयोगटातील लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. त्याचबरोबर लसीकरण आणि संरक्षक लसीचा डोस घेण्यासाठी नागरिकांना उद्युक्त करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. ४ :- कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी नि:संदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली.

गेल्या काही दिवसांपासून कश्मिरी पंडित आणि हिंदूंचे ‘टार्गेट किलिंग’ कश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात अनेक कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. याक्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकंच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील.

१९९५ साली महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार अवतरले होते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कश्मिरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रात विशेष बाब म्हणून शिक्षणात आरक्षण दिले होते. तसेच शिवसेनाप्रमुखांनी सातत्याने काश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी आवाज बुलंद केला, याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राने काश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे. हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो आणि कर्तव्य भावनेनेच त्याकडे पाहतो. सध्या खोऱ्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. काश्मिरी पंडितांच्या नेत्यांशीही चर्चा सुरू आहे. मी पुन्हा सांगतो, काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व करू. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. महाराष्ट्र आपले कर्तव्य बजावेल.

एआयसीटीएस, पुणे येथे झाले पहिले बालरोग हृदय प्रत्यारोपण

पुणे, 4 जून 2022

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस), पुणे हे भारतीय सेना दलाचे 600 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे. हे कार्डिओ थोरॅसिक शस्त्रक्रियांचे भारतामधील सर्वात जुन्या केंद्रांपैकी एक आहे. 30 मे 2022 रोजी पहिले बालरोग हृदय प्रत्यारोपण करण्यात आले, तेव्हा एआयसीटीएस ने आपल्या गौरवशाली इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला.   

निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याच्या मोहम्मद फरदीन मन्सुरी नावाच्या 14 वर्षांच्या किशोर वयीन मुलाला धाप लागणे आणि थकवा येणे या तक्रारीसाठी दोन वर्षांपूर्वी रुग्णालयात पहिल्यांदा दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टर आणि त्याच्या पालकांना अशी शंका होती, की त्याला एखादा संसर्ग झाला असावा आणि एक दोन आठवड्यांत तो बरा होईल. मात्र त्याचं विधिलिखित काही वेगळंच होतं. कोणाला कल्पनाही नव्हती की त्या मुलाला गंभीर स्वरूपाचा हृदय रोग झाला आहे, ज्यामुळे त्याच्या हृदयाचा विस्तार आणि कार्यक्षमता कमी होत आहे.

मुलाच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा झाली नाही आणि हृदयाच्या कामामधील विफलतेमुळे त्याला वारंवार अतिदक्षता विभागात दाखल करावं लागलं. कुठल्याही उपचाराविना त्या तरुण मुलापासून जीवन दूर जाताना दिसत होतं. हृदय प्रत्यारोपणासाठी त्याला 18 महिन्यांपूर्वी स्वीकारण्यात आले आणि त्याचा यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या प्राप्तकर्त्यांच्या यादीत समावेश करण्यात आला.

या तरुण मुलाचं वजन, रक्त गटाशी जुळणारं आणि प्रत्यारोपणासाठी सुरक्षितपणे आणता येईल एवढ्या अंतरावर हृदय उपलब्ध होणं हे या विशिष्ट प्रकरणामधलं आव्हान होतं. दीर्घ प्रतीक्षेनंतर 30 मे 22 रोजी तो  दिवस उजाडला, जेव्हा एआयसीटीएस च्या पथकाला संभाव्य हृदय दात्यासंबंधी सूचना मिळाली, ही एक 14 वर्षांची मुलगी होती, आणि रस्ते अपघातात तिच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली होती. तिचं वजन आणि रक्तगट प्रतीक्षा करत असलेल्या रुग्णाचं वजन आणि रक्त गटाशी जुळत होतं. क्षेत्रीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र, पुणे जिल्हा यांच्या माध्यमातून सह्याद्री रुग्णालय, पुणे इथून दात्याचं हृदय आणण्यासाठी समन्वय साधण्यात आला.

रात्री उशीरा सूचना मिळाल्यावर लगेच एआयसीटीएस ने हृदयाच्या प्राप्तीसाठी मुल्यांकनाची प्रक्रिया तत्काळ सुरु केली, सकाळी 10 ही वेळ निश्चित केली. हृदय प्राप्त करण्यासाठी ठरल्या वेळेला एआयसीटीएस चं पथक रुग्णालयात पोहोचलं. यकृत आणि मूत्रपिंडानंतर हृदय काढण्यात आलं आणि सुरक्षितपणे एआयसीटीएस मध्ये आणलं गेलं.

दान करण्यात आलेलं हृदय घेऊन येण्यासाठी मोकळा रस्ता मिळावा यासाठी सैन्य दलाच्या दक्षिण मुख्यालयाच्या पोलीस पथकाने पुणे वाहतुक पोलिसांशी समन्वय साधला आणि केवळ 11मिनिटांमध्ये हे हृदय एआयसीटीएस, पुणे इथे आणलं गेलं. 

एआयसीटीएस मध्ये त्यापूर्वीच लाभार्थी रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये आणलं गेलं होतं आणि त्याचं हृदय काढण्याची प्रक्रिया सुरु होणार होती. त्यानंतर संपूर्ण पथकानं अत्यंत वेगाने काम केलं आणि ठरलेल्या वेळात हृदयाचं प्रत्यारोपण पूर्ण झालं. तरी, या कामाचा काही भागच पूर्ण झाला होता. प्रत्यारोपण करण्यात आलेल्या हृदयाला नव्या शरीरात आपली गती आणि प्रक्रिया सुरु करायला वेळ लागत होता. त्यामुळे रुग्णावर ईसीएमओ (Extra Corporeal Membrane Oxygenation) हा शस्त्रक्रिया पश्चात उपचार सुरु करण्यात आला. या मुलाला त्याचं निरोगी बालपण परत देण्यासाठी सर्वसमावेशक बहु-अनुशासानात्मक सांघिक कार्याची आवश्यकता आहे. 

1960 च्या दशकात अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतल्या प्रयोगशाळांमध्ये सुरु झाल्यापासून हृदय विफलतेवरील हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेने मोठा पल्ला गाठला आहे. समाजामध्ये प्रत्यारोपणाचं महत्त्व समजून घेणं आणि ते स्वीकारणं याची आता कुठे सुरुवात झाली आहे. समाजाच्या स्वीकृतीमुळे हृदय दात्यांची उपलब्धता वाढत आहे. या स्वीकृतीला अजूनही जागतिक पातळीवर सामाजिक संस्कार आणि धारणांवर मात करायची आहे. 

यशस्वी हृदय प्रत्यारोपण हे अनेक वर्षाचं प्रशिक्षण, तंत्रज्ञानामधील सुधारणा आणि अनेक वेळा सराव करून रूळलेली मानकं याचं एकत्रित फलित आहे. हा उपचार त्याच्यावर अवलंबून असलेल्यांच्या सहज आणि व्यापकपणे आवाक्यात यावा, यासाठी एआयसीटीएस ने हा खडतर प्रवास यशस्वीपणे सुरु केला आहे.

साखर कारखान्यांनी अधिक इथेनॉल निर्मिती करण्याची गरज – नितीन गडकरी

पुणे, 4 जून 2022

आत्मनिर्भर भारतासाठी भविष्यात पेट्रोल आणि डिझेल सारखे प्रदूषणकारी इंधन हद्दपार करण्याची गरज असून साखर कारखान्यांनी देखील आगामी काळात साखरेचं उत्पादन कमी करून इथेनॉल सारख्या पर्यायी इंधनाच्या निर्मितीकडे वळण्याची गरज असल्याचं स्पष्ट मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्याजवळील मांजरी इथं व्यक्त केलं.

वसंतदादा साखर संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय साखर परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दूरस्थ पद्धतीनं यावेळी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह साखर उद्योगातील दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी यांनी साखर उद्योगाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं . सध्या 100 टक्के इथेनॉल वर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध असून इथेनॉल हे हरित इंधन मानले जाते. भविष्यात इथेनॉल विक्रीचे पंप सुरू करण्याची गरज असून पुण्यात त्याची अंमलबजावणी व्हावी  अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली . बाजारात सध्या साखरेचे दर वाढलेले दिसत असले तरी ही परिस्थिती कायमस्वरूपी टिकणार नाही म्हणून साखरेचे भाव स्थिर रहण्यासाठी सुद्धा साखरेचं उत्पादन कमी करणे आवश्यक असल्याचं गडकरी यांनी स्पष्ट केलं.

दोन दिवस चालणाऱ्या या साखर परिषदेत साखर उद्योगासमोरील समस्या आणि त्यावरील उपाय योजना,साखर उद्योगातील नाविन्य पुर्ण संशोधन,साखर उद्योगाच्या केंद्र सरकारकडून असलेल्या अपेक्षा यासह विविध विषयांवर महत्वापूर्ण परिसंवाद होणार आहेत. या विषयातील देशभरातील नामवंत तज्ञ त्यात सहभागी होणार आहेत. व्ही एस आय तर्फे दिल्या जाणाऱ्या गुणवत्ता पुरस्कारांचे परिषदेत वितरण होईल. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार या परिषदेच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत .

देशात पाच टक्केच नागरिक सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करतात-डॉ. पी. ए. इनामदार 

 एमआयटीत मंदिर-मस्जिद विवादावर महाचर्चा

पुणे, ता. ४ – भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. हे भारतीय संस्कृती, परंपरा आणि विविधतेला अपायकारक आहे. देशात ९५ टक्के लोकांना शांतता हवी आहे, मात्र ५ टक्के लोक समाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कार्य करत असतात. त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असून सर्वांनी एकत्र येऊन धार्मिक सलोखा निर्माण करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे (एम.सी.ई.) अध्यक्ष डॉ. पी. ए इनामदार यांनी व्यक्त केले.

विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि महाराष्ट्र राज्य मुस्लिम बुद्धिजीवी मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित काशी-बनारस, मथुरेच्या मंदिर मस्जिद विवादावरील महाचर्चेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी नालंदा विदयापीठाचे कुलगुरू आणि ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ पद्मभूषण प्रा. डॉ. विजय भटकर, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, विश्‍वशांती केंद्राचे सल्लागार व महाराष्ट्र राज्य मुस्लिम बुद्धीजीवी मंचचे अध्यक्ष डॉ. एस. एन. पठाण, चार्टड अकाऊटंट महेंद्र देवी, भारतरत्न मौलाना आझाद असोसिएशन, पुणेचे संस्थापक अध्यक्ष अनामत जाफर शेख, कोंढवा पुणे येथील समाजसेवक जाहिदभाई शेख, रफिक तांबोळी, मिर्झा अब्दुल, माजिद पैठणकर, मौलाना अहमद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पी. ए इनामदार म्हणाले, धर्म जाती, पंथ यातून भारतीयांमध्ये फुट पडली आहे. ही अत्यंत क्लेषदायक बाब आहे. मंदिर – मस्जिदीच्या वादातून सर्व धर्मियांनी बाहेर पडावे.  राजकीय हेतूने हे विषय पेटविले जात आहे. यातून जातीय ध्रुवीकरण केले जात असून निष्पाप नागरिकांना त्रास दिला जात आहे. प्रत्येक धर्माचे तत्वज्ञान उत्तम आहे. सर्व धर्म एकात्मतेची शिकवण देतात.  आज सर्व धर्मांनी तत्वज्ञानाच्या गोष्टी कमी करून त्यातील विचारांवर अमंल करण्याची आवश्यकता आहे. शांततेसाठी दुसर्‍याचे ऐकून घेण्याची क्षमता विकसित करावी लागणार आहे. शांतीशिवाय विकास नाही. ईश्‍वर एकच असून त्यांचा संदेश ही एकच आहे.

डॉ. विजय भटकर म्हणाले, भारतात विविध जातीचे लोक राहत आहेत. पुन्हा राम मंदिर आणि बाबरी मस्जिदचा वाद देशाला परवडणारा नाही. विश्‍वशांतीसाठी सर्वांनी एकत्र यावे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून मानवता कल्याण आणि सामाजिक बंधुता विचार शिकविला जात आहे. ही बाब प्रत्येक विद्यापीठांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवली पाहिजे. धार्मिक वादविवादावर मार्ग काढण्याची गरज असून तत्वज्ञानी आणि बुद्धिजीवी नागरिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा. चांगल्या समाज निर्मितीसाठी शांती आणि धार्मिक सलोखा आवश्यक आहे.

डॉ. विश्‍वनाथ कराड म्हणाले, आयोध्येतील विवाद जमीन २.७० एकर वाद होता. हा सर्वाच्च न्यायालयाने मिटवला. राम मंदिराच्या निर्माणासाठीचे कार्य होत असतानाच मुस्लिम बांधवाच्या आस्थेसाठीही कार्य होत आहे. याचनुसार काशी आणि बनारसमधील मस्जिदांसाठी किमान ५ एकर जमीन सरकारने द्यावी. याने हिंदु- मुस्लिम धर्मातील वाद संपुष्टात येईल. वाद-विवाद करून समाजांमध्ये केवळ तेढ निर्माण होईल, मात्र एकत्र येऊन मार्ग काढल्याने वाद मिटेल. सर्वांनी एकत्र येऊन मानवता कल्याणाचे कार्य करावे. काशी, बनारस आणि मथुरा येथील मंदिर – मस्जिद वाद अयोध्येच्या निर्णयाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मिटवावा.

जाहिदभाई शेख म्हणाले, धार्मिक वाद मिटविण्यासाठी भारतातील मुस्लिम समाजाने शिक्षणाचा मार्ग स्वीकारावा.  धर्मा-धर्मातील द्वेष्ट मिटविण्यासाठी शिक्षण ही महत्वाची भूमिका निभावेल. मुस्लिमांनी साक्षरतेसाठी पुढाकार घेऊन भारत निर्माणासाठी पुढे यावे. 

महेंद्र देवी म्हणाले, शिक्षण ही वादातून मार्ग काढण्यासाठीची गुरूकिल्ली आहे. शांती आणि विवेकाने सर्व धर्मियांनी एकत्र राहून देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची गरज आहे.

डॉ. एस. एन. पठाण यांनी प्रस्ताविक केले.

आयएनएस निशंक आणि आयएनएस अक्षय ही नौदलाची जहाजे सेवानिवृत्त

0

मुंबई, 4 जून 2022

देशाची 32 वर्षे गौरवशाली सेवा केल्यानंतर निशंक आणि अक्षय ही  भारतीय नौदलाची जहाजे काल सेवानिवृत्त झाली. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड येथे पारंपरिक समारंभात त्यांना निरोप देण्यात आला. राष्ट्रीय ध्वज, नौदलाचे चिन्ह आणि दोनही जहाजांचे पेनंट सूर्यास्ताच्या वेळी खाली करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे, नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार  यांनी मानवंदना स्वीकारली

आयएनएस निशंक आणि आयएनएस अक्षयच्या कमांडिंग अधिकाऱ्यांसमवेत मेळाव्याला संबोधित केले

आयएनएस निशंक 12 सप्टेंबर 1989 रोजी कार्यान्वित झाली होती तर त्यानंतर एका वर्षानंतर 10 डिसेंबर 1990 रोजी आयएनएस अक्षय पोटी, जॉर्जिया येथे नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. आयएनएस निशंक आणि आयएनएस अक्षय ही जहाजे महाराष्ट्र नौदल क्षेत्राच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंगच्या ऑपरेशनल नियंत्रणाखाली अनुक्रमे 22 मिसाईल व्हेसल स्क्वाड्रन आणि 23 पॅट्रोल व्हेसल स्क्वाड्रनचा भाग होते.

दोन जहाजांवरचे नौदलाचे चिन्ह आणि डिकमिशनिंग पेनंट सूर्यास्ताच्या वेळी शेवटच्या वेळी खाली करण्यात आले आणि जतन करण्यासाठी सुपूर्द केले

दोन जहाजांवरचे नौदलाचे चिन्ह आणि डिकमिशनिंग पेनंट सूर्यास्ताच्या वेळी शेवटच्या वेळी खाली करण्यात आले आणि जतन करण्यासाठी सुपूर्द केले

दोन जहाजांवरचे नौदलाचे चिन्ह आणि डिकमिशनिंग पेनंट सूर्यास्ताच्या वेळी शेवटच्या वेळी खाली करण्यात आले आणि जतन करण्यासाठी सुपूर्द केले

दोन जहाजांवरचे नौदलाचे चिन्ह आणि डिकमिशनिंग पेनंट सूर्यास्ताच्या वेळी शेवटच्या वेळी खाली करण्यात आले आणि जतन करण्यासाठी सुपूर्द केले

दोन जहाजांवरचे नौदलाचे चिन्ह आणि डिकमिशनिंग पेनंट सूर्यास्ताच्या वेळी शेवटच्या वेळी खाली करण्यात आले आणि जतन करण्यासाठी सुपूर्द केले

ही जहाजे 32 वर्षांहून अधिक काळ नौदल सेवेत सक्रिय होती आणि त्यांच्या गौरवशाली प्रवासादरम्यान कारगिल युद्धादरम्यान ओपरेशन तलवार आणि 2001 मध्ये ऑपरेशन पराक्रम यासह अनेक नौदल मोहिमांमध्ये त्यांनी भाग घेतला.

आयएनएस निशंकच्या माजी कमांडिंग अधिकाऱ्यांचा ग्रुप फोटो

आयएनएस अक्षयच्या माजी कमांडिंग अधिकाऱ्यांचा ग्रुप फोटो

नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार हे या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे होते. व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड आणि व्हाईस ॲडमिरल बिस्वजित दासगुप्ता, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ ईस्टर्न नेव्हल कमांड या समारंभासाठी उपस्थित होते. आयएनएस अक्षय आणि आयएनएस निशंकचे पहिले कमांडिंग अधिकारी व्हाइस ॲडमिरल आरके पटनायक (निवृत्त) आणि व्हाईस ॲडमिरल एसपीएस चीमा (निवृत्त) या कार्यक्रमासाठी सन्माननीय पाहुणे होते.

आयएनएस निशंकची लहान प्रतिकृती अंतिम कमांडिंग ऑफिसर सीडीआर हिमांशू कपिल यांनी प्रथम कमांडिंग ऑफिसर व्हीएडीएम एसपीएस चीमा (सेवानिवृत्त) यांना नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत सुपूर्द केली

ईडीच्या कारवायांना 2024 नंतर उत्तर देण्याचा संजय राऊतांचा इशारा

पुणे-येथील एका कार्यक्रमात घेण्यात आलेल्या प्रगत मुलाखतीत शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले कि,’ भाजपने विरोधी बाकावर बसण्याची तयारी ठेवावी. पुढील अडीच वर्षेही सुखरूप पूर्ण होतील. महाराष्ट्र लढणारा आहे. कोणासमोरही झुकणार नाही. देशामध्ये बदल घडवण्याची महाराष्ट्राची ताकद. मी बाळासाहेबांनाही पाहिले आणि शरद पवारांना पाहिले. दोघेही लोकांमध्ये राहतात. तीच त्यांची ऊर्जा. पवारांमध्ये कोणताही बदल नाही. तेच आहेत तसेच आहेत. भाजपच्या लोकांवर ईडीचे छापे पडत नाहीत…2024 नंतर याचे उत्तर देतो. आमचेही दिवस येतील.

देशात भाजपचे राज्य आहे. त्यांना महागाईवरून लक्ष हटवायचे आहे. आणि ज्ञानव्यापी, शिवलिंग असे विषय काढले जातात. काही लोकांना आपल्या देशाची तुलना श्रीलंकेशी केलेली आवडत नाही. मात्र, श्रीलंकेसारखी ठिणगी इथे पडायला वेळ लागणार नाही. माझ्यासारख्या माणसाने नसलेली प्रॉपर्टी कोणतीही नोटीस न देता ताब्यात घेतली. आणि म्हणतात अटक करणार अटक करणार मी सांगितले मी दिल्लीत बसलोय मला अटक करा. असे म्हणत त्यांनी भाजपला इशारा दिला आहे

बाळासाहेबांची करून दिली आठवण

बाळासाहेब असते तर हे असे उद्योग करण्याची हिंमत झाली नसती, हे लोक तेव्हाही मातोश्रीत येण्यास घाबरत होते, आणि आताही घाबरतात असे म्हणत राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे. नक्कीच त्यांचा प्रभाव आहे. बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा, आताही आमच्या पक्षामध्ये पक्ष मोठा लढवय्ये लोक आहेत. अजूनही त्यांची भूमिका त्यांच्याच भाषेत लिहिले जातात. बाळासाहेब असते तर आज जे उपद्वव्याप करतात ते झाले नसते. ते बाळासाहेबांना चळाचळा कापायचे. आमचे सध्याचे नेते सुसंस्कृत आहेत. अंगावर आला तरी आम्ही शिंगावर घेतो. प्रभाव आहे, तो राहिला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण, प्रभाव राहिला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्र व्यासपीठ शेअर केलेय. आता जो संभ्रम निर्माण करतायत, त्यांना बाळासाहेबाचे विचार माहित नाही. मी त्यांची शिकवणी घ्यायला तयार आहे. भारतीय जनता पक्षाचे आभारा मानले पाहिजेत. त्यांनी महाराष्ट्राच्या मनातले सरकार आणायला भाग पाडले. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडीचा प्रयोग कायम राहीला तर देशात सत्तांतर-शरद पवार

पुणे-महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा (मविआ) प्रयोग कायम राहिला तर देशातही सत्तांतर अटळ असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. 4) व्यक्त केला. “विरोधी पक्षाचे प्रमुख नेते मविआ सरकार महिना-पंधरा दिवसांत पडेल असा दावा करतात. पण आता भविष्य सांगायचे बंद झाले. अडीच वर्ष हे सरकार टिकले असून 5 वर्षांचा कार्यकाळही पूर्ण करेल. ‘मविआ’चा प्रयोग कायम राहिला तर देशातही सत्तांतर होऊ शकते,” असे ते म्हणाले. आपण आस्तिक किंवा नास्तिकचा प्रचार करत नसल्याचेही पवार यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची पुण्यात आज एका कार्यक्रमात प्रगट मुलाखत झाली. या मुलाखतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर पवारांनी सडेतोड उत्तरेही दिली.

काश्मिर फाईलद्वारे लक्ष विचलित केले

काश्मिर फाईल चित्रपटात चुकीच्या पद्धतीने महत्व दाखवून लक्ष विचलित करण्यात आले. त्यावेळी सत्ता कोणाची होती, हे चित्रपटात दाखवले नाही असेही शरद पवार म्हणाले.बृजभूषण कुणी मॅनेज करेल अशी व्यक्ती नाही असा टोलाही पवारांनी राज ठाकरे यांना दिला.

अनेक गोष्टी पुढे येतात, मीडियाही बायस झाला आहे, माध्यमांचे नियंत्रण ताकदवान व्यक्तीच्या हाती आहे. जे योग्य आहे ते योग्य असे माध्यमांनी धोरण अवलंबवायला हवे असेही पवार म्हणाले.

बाळासाहेब असते तर भाजपची हिमंत नसती

संजय राऊतांसारखे स्पष्ट विचार लिहायला हवे असे सांगतानाच पवार म्हणाले की, बाळासाहेब असते तर असे उद्योग करण्याची हिंमत भाजपच्या लोकांत नसती असेही ते म्हणाले.

सध्याचे राजकारणी सभ्य, सुसंस्कृत नाही

शरद पवारांना सद्यस्थितीतील राजकारण्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्ट केले की, सध्याचे राजकारणी सभ्य, सुसंस्कृत नाहीत. 2024 मध्ये भाजपचे अर्धे नेते पक्ष सोडतील असा दावाही त्यांनी केला.

आम्ही दडपशाहीला घाबरत नाही

इडी असो कि काहीही आम्ही दडपशाहीला घाबरत नाही असे पवार म्हणाले, ते पुढे हेही म्हणाले की, शिवसेना राजकारणात येण्यापुर्वी एका विचारधारेने चालत होती त्यानंतरही हा विचार शिवसेनेने सोडला नाही त्यांचा विचार आजही तितकाच प्रभावी आहे असेही पवार म्हणाले.

म्हणून मी देवासमोर हात जोडतो

पवार म्हणाले, अस्तितकता नास्तिकता अशा तपासण्या झाल्या नाहीत. योग्य नाही, आस्तिक, नास्तिक व्यक्तिगत प्रश्न आहे, मी नास्तिक, आस्तिकतेचा गवगवा कधी करत नाही. पंढरपूरला गेलो तर मी हात जोडतो. कारण सामान्य माणसांची श्रद्धा असते त्या सामान्य माणसांच्या श्रद्धेचा अनादर होऊ नये म्हणून मी हात जोडतो अशी आस्तिक व नास्तिकतेवर आपली भूमिका मांडली.

भारत पुन्हा आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची निवडणूक लढविणार

0

नवी दिल्ली, 4 जून 2022

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक डिजिटल परिवर्तनाच्या बाबतीत आघाडीवर राहिला असून, भारताने विकास तसेच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाच्या वापराच्या बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे,” केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी डब्ल्यूएसआयएस 2022 अर्थात या वर्षीच्या जागतिक माहिती संघटनेच्या शिखर परिषदेत सांगितले. स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा येथे 31 मे ते 3 जून 2022 या कालावधीत पार पडलेल्या या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व देवुसिंह चौहान यांनी केले.

आयटीयू अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ, संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, युनेस्को अर्थात वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, यूएनडीपी अर्थात संयुक्त राष्ट्रांचा विकासविषयक कार्यक्रम तसेच यूएनसीटीएडी अर्थात संयुक्त राष्ट्रांची व्यापार आणि विकास परिषद यांच्या सर्व डब्ल्यूइआयएस कृती वाहिनीचे सह-सुविधाकार तसेच संयुक्त राष्ट्रांच्या इतर संघटनांसोबत दृढ सहकारी संबंध प्रस्थापित करून संयुक्त विद्यमाने या डब्ल्यूएसआयएस शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

भारत आयटीयू मंडळाच्या 2023 ते 2026 या कालावधीतील परिचालनासाठी पुन्हा निवडणूक लढवत आहे. भारत 1869 पासून या मंडळाचा सदस्य आहे आणि तेव्हापासून मंडळाचे कार्य, संघाचे उपक्रम यामध्ये अखंडितपणे भाग घेत असून जागतिक समुदायाच्या हितासाठी दूरसंचार तसेच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान विभागाच्या वाढीसाठी तसेच विकासासाठी शक्य तितक्या अधिक प्रमाणात योगदान देत आहे.

आरआरबी अर्थात रेडीओ नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठीचा उमेदवार आणि आयटीयू मंडळाच्या सदस्यत्वासाठी पुन्हा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री देवुसिंह चौहान म्हणाले की संपूर्ण विश्वाला एक संपर्कात असलेला समाज म्हणून स्थापित करण्यासाठी तसेच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानविषयक संस्थांना वर्ष 2030पर्यंत पूर्ण करण्यासाठी निश्चित झालेली शाश्वत विकास ध्येये  गाठणे शक्य व्हावे म्हणून भारताने आयटीयूचे स्वप्न आणि संकल्पना स्वीकारल्या आहेत.

भारतातर्फे रेडीओ नियामक मंडळाच्या सदस्य म्हणून एम.रेवती यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करताना केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की एम.रेवती यांनी समावेशक माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानविकासासाठी  व्यावसायिकतेतील विशेष प्राविण्य, नेतृत्व करण्याची क्षमता,  कालबद्ध पद्धतीने विहित कार्ये पूर्ण करण्याप्रती वचनबद्धता, पद्धतशीरपणे समस्या सोडविण्याची क्षमता तसेच नियम निश्चित करण्याची हातोटी या गुणांसह स्वतःला सिध्द केले आहे असे ते म्हणाले.

या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री चौहान “ब्रीजिंग द डिजिटल डिव्हाईड” या विषयावरील उच्चस्तरीय धोरणनिश्चिती सत्र, स्वास्थ्य, समावेश तसेच लवचिकता यासाठीची  माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान विषयक मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद आणि कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानावर आधारित उच्चस्तरीय संवाद यांसह अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले.

डब्ल्यूएसआयएस2022च्या कार्यक्रमासोबतच, केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी विविध द्विपक्षीय बैठका घेतल्या तसेच, आयटीयूचे उपसचिव माल्कम जॉन्सन, इराणचे दळणवळण अनि माहिती तंत्रज्ञान मंत्री इस्सा झारेपोर, जपानचे धोरण समन्वयन उपमंत्री यूजी सासाकी, आयटीयूचे महासचिव हाओलीन झोऊ अशा विविध मान्यवर आणि तज्ञ व्यक्तींच्या भेटी घेतल्या.  

बीएमसीसीत बी. कॉम ऑनर्स चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम

पुणे, ता. ४ – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) ‘बीकॉम ऑनर्स’ हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या (आयसीएआय) सहकार्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करणार असल्याची माहिती बीएमसीसीच्या प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित यांनी कळविली आहे.

पुरोहित म्हणाल्या, ‘सीए/सीएस/सीएमए असे व्यावसायिक अभ्यासक्रम आणि सीएफए/सीपीए या सारख्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राच्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी ‘बीकॉम ऑनर्स’ पदवी उपयुक्त ठरणार आहे. हा अभ्यासक्रम १६० क्रेडिट गुणांचा असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण दिले जाणार असून, वाणिज्य व्यवस्थापन, वित्त, कॉस्ट अण्ड मॅनेजमेंट अकाउंटिंग, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करप्रणाली, विधी, अर्थशास्त्र, उद्योजकता, व्यापार अशा विषयांचा समावेश असणार आहे. प्रवेशासाठी कोणत्याही बोर्डाची बारावीची परीक्षा ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी दिली जाणार आहे.’

आयसीएआयचे सेंट्रल कौन्सिल मेंबर चंद्रशेखर चितळे म्हणाले, ‘या अभ्यासक्रमासाठी बीएमसीसी आणि आयसीएआय यांच्यात सहकार्य करार करण्यात आला आहे. आयसीएआयच्या वतीने अभ्यासक्रम निश्चित करणे, महाविद्यालयातील शिक्षकांना प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना कौशल्यविकास मार्गदर्शन करणे आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण, नोकरी व व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.’

या वेळी डीईएसचे उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, बीएमसीसीच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर फडके, प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित, सीए चंद्रशेखर चितळे, यशवंत कासार, काशीनाथ पठारे, अभ्यासक्रमाच्या समन्वयिका प्रा. वर्षा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तडीपार करुनही सुधारला नाहीत तर थेट मोक्का लावू- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

पुणे- : पिंपरी-चिंचवड शहराची सार्वजिक सुरक्षितता सरकारची जबाबदारी आहे. गुन्हगारांची गय केली जाणार नाही. सर्वांना सुरक्षित जगता आले पाहिजे. जो गुंडगिरी करत असेल, दहशत करत असेल तो कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असेल, त्याचा आम्ही विचार करणार नाही.

त्याच्यावर जर चार – पाच गुन्हे दाखल झाले असतील तर त्याला आम्ही तडीपार करु. तडीपार करुनही तो सुधारला नाही तर थेट मोक्का लावू, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथे दिला.

पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवड येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, प्रदेशचे रविकांत वरपे, सुनील गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल, जगदीश शेट्टी, भाऊसाहेब भोईर, मंगला कदम, प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.

कोणाची गुंडगिरीही खपवून घेतली जाणार नाही.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मी कडवट बोलतो पण, व्यवहार्य बोलतो. आम्हाला कोणाला विनाकारण त्रास द्यायचा नाही. मात्र, कोणाची गुंडगिरीही खपवून घेतली जाणार नाही. महिलांनी निर्भयपणे फिरावे, असे वातावरण हवे. ”

कमीशन मिळेल त्यांचाच विचार भाजपाने केला
”पाच वर्षे महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या भाजपने केवळ स्वार्थाचे विषय मार्गी लावले. ‘कमिशन’ जास्त कसे मिळेल, याचा विचार केला. घरचा पैसा असल्यासारखी उधळपट्टी करत शहर बॅकफुटवर गेले. सहा कोटी रूपये खर्चुन कुत्र्यांची नसबंदी केली. नसबंदीसाठी सोन्याची उपकरणे वापरलीत काय, श्वानांच्या नसबंदीत कमिशन मिळविले, असा प्रश्न पवार यांनी केला.

ज्यांच्या अंगातच पाणी नाही ते काय रोज पाणी देणार
पवार म्हणाले, ”भाजपला पाच वर्षात आंद्रा, भामा – आसखेड धरणातून पिंपरी – चिंचवडकरांकरिता पाणी आणता आले नाही. ज्यांच्या अंगातच पाणी नाही ते काय रोज पाणी देणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे १०० नगरसेवक निवडून द्या शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करु, मी शहरवासीयांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी राजकीय स्टंटबाजी करणार नाही. प्रश्न सोडविण्याची धमक, ताकद आमच्यात आहे. अन्यथा अजित पवार नाव सांगणार नाही.”

कसबा पेठेत चार बोगदे झाले एकत्र

पुणे : कसबा पेठेतील साततोटी पोलीस चौकीच्या पुढे जमिनीखाली २८ मीटर खोलीवरचा कातळ फोडून साडेसात मीटर व्यासाचे कटर असलेले टीबीएम दुपारी १२ वाजता बाहेर आले.त्याआधी याच मार्गाने एक बोगदा कसबा पेठेत येऊन पोहोचला होता. शिवाजीनगरपासून सुरू होणारे दोन बोगदेही कसबा पेठेत आले होते. हा चौथा बोगदा आज पूर्ण झाला. कसबा पेठेत आता चार बोगदे एकत्र झाले आहेत. या जागेत मेट्रोचे भुयारी स्थानक आहे. भुयारी मार्गात एकूण ४ स्थानके आहेत. त्यातील शिवाजीनगर, स्वारगेट या स्थानकांची कामे जोरात सुरू आहेत. मध्य भागातील सिव्हिल कोर्ट स्थानकाचे कामही जोरात सुरू आहे. मंडई व कसबा पेठ या स्थानकांचे काम मात्र रेंगाळले होते. बोगद्यांचे काम पूर्ण झाल्याने तेही आता पूर्ण होईल.

यावेळी महामेट्रो तसेच ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. शिवाजीनगरकडून आलेले दोन व स्वारगेटकडून आलेले दोन अशा एकूण १२ किलोमीटरच्या चार बोगद्यांचे काम शनिवारी पूर्ण झाले. भुयारी स्थानकांचे काम सुरू असून, मार्च २०२३मध्ये ६ किलोमीटर अंतराचा हा शिवाजीनगर ते स्वारगेट असा भुयारी मार्ग वापरण्यास सुरूवात करता येईल.

मंडईपासून या बोगद्याचे काम सुरू करण्यात आले होते. दुपारी बरोबर १२ वाजता साडेसात मीटर व्यासाचा कटर असलेले टीबीएम भला मोठा आवाज करत तेवढ्याच आकाराच्या गोलातला दगडी कातळ भेदत बाहेर आले. कटर पूर्ण बाहेर आल्यानंतर त्यातून कर्मचारी खाली उतरले. त्यावेळी बाहेरच्या कर्मचाऱ्यांनी ‘भारत माता की जय’ म्हणून हातात तिरंगा घेऊन त्यांचे स्वागत केले. जमिनीखाली २८ मीटर खोलीवर हा स्वागत सोहळा रंगला.

बॅडमिंटनमध्ये पहिला विजय

0

खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणा 2022

पंचकुला (हरियाणा), ४ ः
बॅडमिंटनच्या मुलांच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्रालने विजय मिळविला. दर्शन पुजारी याने तामीळनाडूच्या थांगम कविन याचा दोन सेटमध्ये पराभव केला. उद्या त्याचा सामना उत्तराखंडच्या प्रणव शर्मासोबत होणार आहे.
ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समधील सुसज्ज बॅडमिंटन हॉलमध्ये हे सामने सुरू आहेत. स्पर्धेचा आज दुसरा दिवस होता.
दर्शन पुजारीने (मुंबई) सुरूवातीपासून आक्रमक खेळ केला. थांगम त्याचा अंदाज घेत होता. परंतु लगेच महाराष्ट्राच्या दर्शनने दोन गुण घेत चांगली सुरूवात केली. नंतर ही आघाडी त्याने वाढवत नेली. थांगमला त्याने डोके वर काढू दिले नाही. दर्शनने पहिला सेट (२१ विरूद्ध १०) जिंकून सामन्यात आघाडी घेतली. फोरहँड आणि बॅकहँड हे दोन्ही फटके तो लीलया मारत होता. खास करून त्याने स्मॅश जास्त मारले.

पहिला सामना हरलेला थांगम दबावाखालीच खेळत होता. त्यामुळे गुणफलक १९ विरूद्ध ७ असा झाला. काही चुकीचे फटके मारल्याने थांगमला गुण मिळाले. परंतु सरळ सेटमध्ये दर्शनने त्याचा पराभव केला. दोन्ही सेट त्याने २१ विरूद्ध १० आणि २१ विरूद्ध १० अशा फरकाने जिंकले.

हैदराबादला सराव
मुंबईचा रहिवासी असलेला दर्शन पुजारी हा हैदराबाद येथील पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीमध्ये सराव करतो. त्याच्याकडून महाराष्ट्राला पदकाची अपेक्षा आहे. सामन्यानंतर त्याने तसा निश्चय बोलून दाखवला.