पुणे दि.१४- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलता व शासनाच्या विविध विभागांच्या कार्यतत्परतेमुळे परभणी तालुक्यात भाऊचा तांडा येथील दुर्घटनेत मृत पावलेल्या सफाई कामगारांच्या कुटुंबियांना अवघ्या काही तासांतच ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य शासनाने मंजूर केले आहे.
सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायती अंतर्गत भाऊचा तांडा येथील शेतामधील सेप्टिक टॅंकची सफाई करताना दुर्दैवाने ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ११ मे २०२३ रोजी रात्री ९ वाजता घडली होती. याबाबत जिल्हाधिकारी परभणी यांनी मुख्यमंत्री यांना अवगत केल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार काही तासातच शासकीय अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
मृत पावलेल्या एकूण ५ सफाई कामगारांच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य अदा करण्याकरिता सामाजिक न्याय विभागाने प्रत्येक व्यक्ती १० लाख याप्रमाणे एकूण ५० लाख रुपयांचा निधी १२ मे २०२३ च्या शासन निर्णयानुसार मंजूर केला आहे.
सद्यस्थितीत सदर मंजूर केलेल्या निधीचा पहिला हप्ता प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे रुपये २५ लाख रुपये तात्काळ उपलब्ध करून दिले आहेत. हा निधी लवकरच सदर मयत झालेल्या कामगारांच्या वारसांना मिळणार आहे.
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम २०१३ अंतर्गत महाराष्ट्र राज्यात दूषित गटारामध्ये उतरून काम करताना मृत्यू झालेल्या मॅन्युअल स्कॅवेंजर यांच्या वारसांना रुपये १० लाख रुपये नुकसान भरपाई रक्कम अदा करण्याची तरतूद आहे.
जिल्हाधिकारी परभणी यांनी १२ मे रोजी समाज कल्याण विभागास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी समाज कल्याण विभागास तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे व आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावर तात्काळ पाठपुरावा करुन नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी , युवक क्रांती दलाकडून आयोजन
पुणे :
‘सत्य, लोकशाही, प्रेम,समता,बंधुता ही श्वाश्वत मुल्ये आहेत, चिरंतन मुल्ये आहेत. संघ, सावरकरवादी आणि रा. स्व. संघाला द्वेष वाढवून ही शाश्वत मूल्ये नष्ट करायची आहेत. द्वेषाचे हे राजकारण फेकून द्यायचे असेल तर गांधींजींप्रमाणे चिरंतन, शाश्वत मुल्यांचा आक्रमक प्रसार करावा लागेल ‘, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी रविवारी केले.’कर्नाटक मधील युवापिढीने द्वेषाचे राजकारण फेकून दिले. पुढील पिढी लोकशाहीमधेच नांदावी, असे वाटत असेल तर आपण या पिढीत प्रबोधनाचा आग्रह धरला पाहिजे. संघटन, विचार प्रसाराची यंत्रणा तयार करावी लागणार आहे. सत्तेविरुद्ध सत्याचा विजय होणारच आहे ‘, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे पुण्यात ‘ गांधी दर्शन शिबिर ‘ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि. १४ मे २०२३ रोजी सकाळी १० ते ६ या वेळात ही कार्यशाळा गांधी भवन, कोथरूड पुणे येथे पार पडली.या कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, प्रा. श्रीरंजन आवटे यांनी मार्गदर्शन केले.डॉ. कुमार सप्तर्षी,(अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि संस्थापक, युवक क्रांती दल) हे अध्यक्षस्थानी होते.अन्वर राजन, डॉ. उर्मिला सप्तर्षी, प्रशांत कोठडिया, संदीप बर्वे,सुदर्शन चखाले ,सचिन पांडुळे , अस्लम बागवान ,अप्पा अनारसे,प्रसाद झावरे-पाटील उपस्थित होते.
निरंजन टकले म्हणाले, ‘गांधीजींनी चरख्याद्वारे सर्वसामान्य माणसाला कार्यप्रवण केले, आश्वस्त केले आणि इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात अहिंसात्मक साधन दिले. महात्मा गांधींनी मध्ययुगीन उदाहरणे सांगितली नाही,त्यांनी वर्तमानातील प्रश्नांना वर्तमानकालीन उत्तरे दिली.कोणत्याही खोट्या प्रचाराबाबत मनात प्रश्न आले पाहिजेत.विश्लेषण करता आले पाहिजे. तरच बुध्दीभेद करणाऱ्या प्रचार साहित्याचे प्रयत्न हाणून पाडता येतील.’चले जाव ‘ सारख्या शब्दांना गांधीजींनी मंत्राचे सामर्थ्य दिले. कारण त्यांना नैतिक अधिष्ठान होते.गांधीजींचे विरोधक, मारेकरी सत्तेवर आले असले तरी त्यांच्यापैकी कोणीही नथुराम हे नाव मुलाबाळांना दिलेले नाही. ही शरम जिवंत आहे, तो पर्यंत गांधीजी जिवंत राहतील.स्वातंत्र्यसंग्रामाचे, स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास सांगणारे संग्रहालय व्हायला हवे, म्हणजे स्वातंत्र्यलढयात कोण सहभागी होते, कोण नव्हते , हेही सर्वांसमोर येईल’, असेही टकले यांनी सांगितले.
रा. स्व. संघाकडून गांधींबद्दलचा अपप्रचार : डॉ.कुमार सप्तर्षी
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ संघाला पुराणकालीन व्यवस्था आणायची आहे. यज्ञ संस्कृतीचा ब्राह्मण वर्चस्ववाद आणायचा आहे. व्यक्तीचा मानसिक दृष्टया ताबा घेऊन ते प्रसार करतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मुल्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नको आहेत . संघाने अपप्रचार करून गांधीजींची चुकीची प्रतिमा पसरवली आहे. खरे गांधी विचारांनी अजून जिवंत आहेत. खरा गांधी झाकोळून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कॉंग्रेसही गांधी विचार पुढे नेण्यात अपयशी ठरली.गांधी हे शास्त्र आहे. सार्वजनिक जीवनात ते उपयुक्त आहे, ज्यांनी सत्याग्रहाची कास धरली, त्यांना अपयश येत नाही. सत्याला सामर्थ्याची जोड दिली तरच विजय होतो . लोक उभे राहिले की द्वेषवादी वृतीचा पराभव होतो, हे कर्नाटकात दिसले आहे’, असेही डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले.
पुणे -पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पर्यटन बससेवा क्र. २ चा शुभारंभ हडपसर गाडीतळ येथे महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी ऑनलाईन प्रणाली व्दारे उपस्थित राहुन केला. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा पोतदार-पवार, चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन). सतीश गव्हाणे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, प्र.कामगार व जनता संपर्क अधिकारी अल्ताफ सय्यद, महामंडळाचे अधिकारी विजय रांजणे, शैलेश जगताप, मोहन दडस,समीर अत्तार, सुरेंद्र दांगट व कर्मचारी उपस्थित होते. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर व १६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता ७ पर्यटन बस मार्ग निश्चित केले असून वातानुकूलीत ई-बसेसव्दारे विशेष ‘पर्यटन बस’ सेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दिनांक ०१/०५/२०२३ पासून सुरू करण्यात आलेली आहे. या ‘पर्यटन बस’ सेवेकारिता प्रति प्रवासी तिकीट दर रूपये ५००/- इतका आकारण्यात येतो. हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर या मार्गावरील ‘पर्यटन बस’ ला सहव्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा पोतदार-पवार व चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतीश गव्हाणे यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली. या वेळी बोलताना महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया म्हणाले कि, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सुरू करण्यात येत असलेल्या वातानुकूलीत पर्यटन बससेवेचा लाभ भक्तगण, भाविक व पर्यटक यांनी घ्यावा असे ते म्हणाले.
पुणे दि.१४- पुढील वर्षी राज्य शासनाच्या वतीने किल्ले पुरंदर येथे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येईल आणि किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
किल्ले पुरंदर येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शासकीय सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी अधिकारी मिनाज मुल्ला , उप विभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील . गटविकास अधिकारी अमर माने, पुरंदर प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज जयंती नियमितपणे साजरी केल्याबद्दल पंचायत समिती,पुरंदर प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेडचे अभिनंदन करून पालकमंत्री पाटील म्हणाले, परकीय आक्रमाणाच्यावेळी अनेक लढाया जिंकून जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच स्वराज्यासाठी प्रसंगी मृत्यूलाही कसे सामोरे जावे याचा आदर्श संभाजी महाराजांनी आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांचे बलिदान आजही देशप्रेमाची प्रेरणा देणारे आहे.
छत्रपती संभाजी महाराज युद्धात तरबेज होते, तसेच ते न्यायनिवाडा करण्यात निष्णात होते. आदर्श प्रशासन कसे असावे याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आहे. अशा महापुरुषांची जयंती साजरी करतांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जाणून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
आमदार जगताप म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज कुशल प्रशासक होते. त्यांच्या जीवनकार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यात येणार आहे. नागरिकांनी यात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
श्री.शिवतारे म्हणाले,छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केले. स्वराज्य आणि स्वधर्म प्रेमाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या कार्याचे स्मरण आणि विचारांचे अनुसरण करण्याची गरज आहे.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्येक लढाई जिंकली. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक वढू बुद्रुक येथे उभारण्यात येणार असून लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येईल.
कार्यक्रमपूर्वी सुवासिनींनी बाल शंभुराजेंचा पाळणा म्हटला. मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून वंदन केले. तत्पूर्वी पालकमंत्री श्री.पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पुणे;कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण 2014 पासून रखडले आहे. येथे 2018 पासून 22 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर 45 जण गंभीर जखमी झाले आहेत. येथे एकूण 22 अपघातीस्थळे निर्माण झाली आहेत. राजकीय खाऊ स्पर्धेत मुबलक नैसर्गिक संपदा लाभलेला हा रस्ता आणि परिसर आता काँक्रिटीकरणा च्या राजकीय लाळटपगेकिरी मुळे मोठी दुर्धर अवस्था जगतो आहे. जमिनीवर ताबे,टेकडी ची लचके तोड,बेकायदेशीर बांधकामे, दारूची दुकाने यामुळे येथील निसर्गावर प्रचंड हल्ले झाले. आणि पुढारी मात्र याव त्याव करत टिमकी वाजवत स्वतःच स्वतः चा डंका पीटविण्यात दंग आहेत.
वाहतूक पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात कात्रज चौकात 16 तर खडी मशीन चौकात सहा अपघाती स्थळे निर्माण झाली आहेत. येथे तात्पुरत्या उपाययोजना करुनही अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही. अपघात होण्याच्या कारणांचा विचार करता, रखडलेले रस्त्याचे काम, रस्त्याची दुरवस्था, मोठ्या प्रमाणातील अवजड वाहतूक, दुभाजकाचा अभाव,प्रचंड अतिक्रमणे, राजकिय अनास्था कारणीभूत ठरत आहे.
आरएमडी शाळेसमोर शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास झालेल्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला. हे रुंदीकरण असेच रखडले तर आणखी किती जणांचा बळी जाणार असा प्रश्न स्थानिक नागरिक प्रशासनाला विचारत आहेत.
यासंदर्भात वाहतूक शाखेने दिलेली माहिती अशी की, कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन दररोज सात ते आठ हजार वाहनांची वाहतूक होते. यामध्ये अवजड वाहनांचे प्रमाण 20 टक्के आहे. अवजड वाहनांमुळे रस्ताही खराब झाला आहे. महापालिकेने 2018 मध्ये रस्त्याचे रुंदीकरणाचा निर्णय घेऊन भुमिपुजनही केले. मात्र, तेंव्हापासून रुंदीकरणाचे काम रेंगाळले आहे. परिणामी, या रस्त्यावरील अपघात वाढल्याचे भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलीस ठाण्यातील नोंदणी वरून स्पष्ट होते. कात्रज चौक ते राजस सोसायटीपर्यंत उड्डाणपुल करूनही थोडीफार वाहतूक सुरळीत झालेली नाही. मात्र, राजस सोसायटीपासून खडीमशीनपर्यंत ठिकठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणाची कामे सुरु आहेत.
भूसंपादनामुळे रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्यावर वाहतूक सुधारणा करण्याची कामे महापालिकेने वाहतूक पोलिसांच्या मदतीने वर्षभरापासून सुरू केली आहेत. रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण काढणे, साइड पट्ट्यामध्ये डांबरीकरण करून दोन्ही बाजूने रस्ता मोठा करणे, दुभाजक टाकणे ही कामे हाती घेतली गेली होती.ज्यात राजकिय अनास्थेमुळे अडथळेच निर्माण केले गेले.
मुंबई,दि.१३ : आजच्या काळात महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीमुळे महिलांना शिलाई मशीन, घरघंटी आणि मसाला कांडप मशिन आदी संयंत्र सामग्रीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याने महिला आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि सक्षम होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
चुनाभट्टी येथील सोमैय्या मैदान येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य लाभ वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, सर्वश्री आमदार अॅड. आशिष शेलार, प्रसाद लाड, मंगेश कुडाळकर, सुनिल शिंदे, राजहंस सिंह, सदा सरवणकर, कॅप्टन तमिल सेल्वन, कालिदास कोळंबकर, प्रकाश सुर्वे, दिलीप लांडे, श्रीमती भारती लव्हेकर, यामिनी जाधव, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगर पालिका आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, श्रावण हार्डिकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देण्याबरोबरच त्यांच्या प्रयत्नांना, प्रगतीला, कष्टाला बळ देण्याचे काम करण्यात येत आहे.जवळपास २७ हजारांहून अधिक पात्र महिलांना शिवणयंत्र, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्र दिले जाणार आहेत. महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम राज्य सरकार, मनपा करीत आहे. मनपाच्या जेंडर बजेटमध्ये १० ते १५ कोटी रुपये तरतूद होती. यामध्ये साहित्य वाटप, महिलांना सक्षम, पायावर उभे करण्यासाठी २५० कोटी रूपयांची बजेटमध्ये तरतूद केली. मुंबईत अनेक योजनांच्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत. मेट्रोची कामे सुरू आहेत. मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी कायमचा तोडगा काढण्यासाठी ४५० किमीचे सिमेंट काँक्रिंटचे रस्ते केले. उर्वरितही रस्ते काँक्रिटचे करणार असून अडीच वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करणार आहे.
मुंबई ही आर्थिक राजधानी असून मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करणार बनविण्यासाठी प्रयत्नशील असून मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांच्या विकासासाठी वापरणार आहे. खराब काम करणारे कंत्राटदार हद्दपार करणार आहे. शहरात १,१७४ सुशोभिकरण प्रकल्प, उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून ८ लाख मुंबईकरांना लाभ झाला आहे. सर्व सोयींनीयुक्त दवाखाना असा हा दवाखाना असून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सर्व सुविधा यामध्ये आहेत. मुंबईला प्रदूषणमुक्त करणार आहे. जी-२० कार्यक्रम मुंबईत होत असून देशाला जी-२० चा मान मिळालाय हे अभिमानास्पद आहे. हे सरकार राज्याला विकासासाकडे नेण्याचे काम करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लेक लाडकीच्या माध्यमातून मुलगी जन्माला आल्यानंतर सुकन्या योजना, महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सूट, घरघंटी, कांडप मशिन, शिलाई मशिनसोबत मार्केटिंग करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यांच्या वस्तूला बाजारात भाव मिळण्यासाठी मनपाने योजना तयार करावी. मुंबई मनपाच्या ७७ हजार कोटी रूपयांच्या सुरक्षा ठेवी होत्या त्या वाढून ८८ हजार कोटी झाल्या. २५ हजार कोटींची कामे करूनही ११ हजार कोटी रूपयांच्या सुरक्षा ठेवी वाढल्या आहेत. हे सरकार लोकाभिमुख, लोकोपयोगी काम करीत आहे. केंद्राची राज्याला मदत होत आहे. प्रत्येक निर्णय सर्वसामान्यासाठी घेतोय. सर्व योजना राबवून मुंबईचा कायापालट करण्याच्या ध्येयाबरोबर मुंबई बाहेरचा माणूस पुन्हा मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
२७ हजार महिला नव्हे तर २७ हजार कुटुंबांना सशक्त करण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने केले
—उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत २७ हजारांहून अधिक महिलांना शिलाई, घरघंटी आणि मसाला कांडप आदी संयंत्र सामग्रीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याने २७ हजार महिला सक्षम होण्याबरोबरच २७ हजार कुटुंबे सशक्त होणार आहेत. आणखी २५ लाख महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मनपाच्या कामाची दिशा बदलली असून मनपा लोकाभिमुख झाली आहे. मनपातील कामे पारदर्शक पद्धतीनेच होणार असू कामात अनियमितता होत असेल तर कारवाई करण्यात येईल. मनपा, राज्य सरकार महिलांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून बजेटमध्ये महिलांना मदत, एसटीमध्ये ५० टक्के सवलत दिली. महिलांना सक्षम करण्याचे काम महिला धोरणाद्वारे करणार असून मुंबईतील झोपडपट्टीमध्ये वीज, रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत.
प्रारंभी महिला व बालविकास योजनेच्या पात्र महिलांकरिता शिलाई मशीन, घरघंटी मशीन, मसाला कांडप मशीन यंत्रसामग्री वाटप योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते रिमोटच्या माध्यमातून करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते आज प्रातिनिधिक स्वरुपात २५ महिलांना अर्थसहाय्य लाभार्थी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसने राज्यात 224 पैकी 136 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपाला अवघ्या ६५ जागा मिळाल्या आहेत . दक्षिण भारतातील या विजयामुळे काँग्रेस पक्ष आता एकूण 7 राज्यांमध्ये सत्तेवर आला आहे. काँग्रेस स्वबळावर सत्तेत असलेल्या 4 राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. याशिवाय बिहार, झारखंड आणि तामिळनाडूमध्ये काँग्रेस आपल्या मित्रपक्षांसोबत सत्ता वाटून घेत आहे.
हिमाचल प्रदेश – कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने हिमाचल निवडणुकीत विजय मिळवला होता. हिमाचलमध्ये गेल्या वर्षी निवडणुका झाल्या. 68 जागांच्या या राज्यात काँग्रेस पक्षाला 45 जागा मिळाल्या. भाजपला येथे केवळ 25 जागा मिळाल्या.
राजस्थान- राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका आहेत. 2018 मध्ये राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाला 100 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी वसुंधरा राजे यांचे सरकार होते आणि सचिन पायलट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. राजस्थानमध्ये सध्या काँग्रेस दोन गटात विभागली गेली आहे.
छत्तीसगड- राजस्थानप्रमाणेच 2018 मध्ये छत्तीसगडमध्येही काँग्रेसने बाजी मारली. 90 सदस्यांच्या या राज्यात काँग्रेसला 68 जागा मिळाल्या, तर भाजपला केवळ 15 जागा मिळाल्या.
बिहार – बिहारमध्ये काँग्रेस महाआघाडी सरकारचा भाग आहे. राज्यात 2020 मध्ये निवडणुका झाल्या. त्यानंतर भाजप आणि जेडीयूची युती झाली. त्यांनी निवडणूक जिंकली पण 2022 मध्ये नितीश यांनी आरजेडीच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील होणे चांगले मानले. मग सरकारही या सरकारमध्ये सामील झाले. बिहारमध्ये काँग्रेस नेत्यांकडे दोन मंत्रालये आहेत.
झारखंड – झारखंडमध्ये 2019 मध्ये निवडणुका झाल्या. येथे झामुमोचे सरकार आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने काँग्रेस आणि आरजेडीसोबत आघाडी करून निवडणूक लढवली. काँग्रेसला 16 जागा मिळाल्या. झारखंडमध्ये सध्या काँग्रेसकडे चार मंत्रालये आहेत.
तामिळनाडू – दक्षिण भारतातील या राज्यात 2021 मध्ये निवडणुका झाल्या. करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत द्रमुकने 133 जागा जिंकल्या तर त्याचा मित्रपक्ष काँग्रेसला 18 जागा मिळाल्या.
‘देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरुवात कर्नाटकातील विजयाने झाली आहे. सामान्य माणूसच हुकूमशहाचा पराभव करू शकतो हा विश्वास कर्नाटकच्या जनतेने देशाला दिला.
त्याबद्दल त्या शहाण्या जनतेचे अभिनंदन,’ अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली व आशेचा किरण दाखवला. काँग्रेसचा प्रचंड विजय झालाच, पण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘कर्नाटकच्या निवडणुकीत हिंदू, मुसलमान, बजरंगबली, हिजाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. काँग्रेसने लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली व जिंकली. २०२४ सालच्या विजयाची ही नांदी आहे. प्रियंका गांधी व राहुल गांधी यांचे खास अभिनंदन,’ असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
पुणे-पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे कर्नाटक राज्याच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यामुळे आज सकाळी काँग्रेस भवन येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिवाजीनगर गावठांण येथील हनुमान मंदिरात काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते यांनी हनुमानाची आरती केली आणि त्यानंतर ढोल ताश्याच्या गजरात कार्यकर्ते उत्साहाने नाचले व लाडू वाटून आनांदोत्सव साजरा केला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते उल्हास पवार म्हणाले की, ‘‘भारतीय जनता पक्षाने कर्नाटकाची निवडणुक जिकंण्यासाठी साम, दाम, दंड, भेद चा वापर केला. आपल्या सरकारचे भ्रष्टाचार झाकण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जवळ जवळ ४० सभा घेतल्या. धर्माचा वापर करून मत मिळविण्याचा प्रयत्न केला परंतु कर्नाटकातील जनतेने त्यांना नाकारले. काँग्रेस पक्षाने महागाई, बेरोजगारी या विषयावर प्रचार केला. कर्नाटकातील भाजप सरकार ४०% कमिशन खाणारे सरकार म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून जनतेने हा कौल काँग्रेस पक्षाच्या बाजूने दिला. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व नेते व कार्यकर्त्यांनी शिस्तबध्द प्रचार करून काँग्रेस पक्षाला यश मिळवून दिल्या बद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. या निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशामुळे २०२४ ला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव अटळ आहे असे दिसते.’’
यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘कर्नाटकातील काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी पक्ष संघटना मजबुत करून कार्यकर्त्यांना ताकद दिली. भारतीय जनता पक्षाच्या प्रचार यंत्रणेच्या तोडीला आपल्याही पक्षाची यंत्रणा सज्ज केली. राहुलजी गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा आणि प्रियंकाजी गांधी यांच्या सभेमुळे काँग्रेस पक्षाला यश मिळाले. नियोजनबध्द प्रचारामुळे आणि सामान्य जनतेचा प्रश्न काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यामध्ये आणि प्रचारामध्ये मांडल्यामुळे कर्नाटकातील जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास टाकला आणि भरघोस मतांनी काँग्रेस पक्षाला निवडून दिले.’’
यावेळी माजी मंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी,ॲड. अभय छाजेड, दिप्ती चवधरी, आमदार रविंद्र धंगेकर, नीता रजपूत, संगीता तिवारी, अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, उस्मान तांबोळी, रजनी त्रिभुवन,साहिल केदारी, मेहबुब नदाफ, द. स. पोळेकर, सुजित यादव, सुनिल पंडित, प्रशांत सुरसे, सुरेश कांबळे, परवेज तांबोळी, जावेद निलगर,वीरेंद्र किराड, रमेश सोनकांबळे, प्रदिप परदेशी, कृष्णा सोनकांबळे, अनुसया गायकवाड, सिमा सावंत, रवि आरडे, दिपक ओव्हाळ, राजेंद्र नखाते, राधिका मखामले, कल्पना उनावणे, विठ्ठल गायकवाड, सोनिया ओव्हाळ, सुंदरा ओव्हाळ, छाया जाधव, ज्योती अरवेल, रेखा गहलोत, जयश्री पारेख, लतेंद्र भिंगारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे विद्यार्थी गृहाचा ११४ वा वर्धापन दिन; महाराष्ट्र विद्यालयाच्या शताब्दीनिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन
पुणे : “नव्या शैक्षणिक धोरणात नवकल्पना, स्टार्टअप संस्कृती, कौशल्य विकास यावर भर देण्यात आला आहे. ज्ञानदानाची ११४ वर्षांची जाज्वल्य परंपरा असलेल्या पुणे विद्यार्थी गृहाने नव्या गोष्टी राबविण्याला, तसेच कार्यक्षम, कृतिशील व कार्यकुशल पिढी घडवण्याला प्राधान्य द्यावे,” असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री व पुणे विद्यार्थी गृहाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पुणे विद्यार्थी गृहाच्या ११४ व्या वर्धापन दिनानिमित्त, तसेच संस्थेच्या महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शताब्दी पूर्ती निमित्त स्मरणिका प्रकाशन सोहळ्यात विखे पाटील बोलत होते. संस्थेचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी श्रीधर पाटणकर अध्यक्षस्थानी होते. प्रसंगी नियामक मंडळाच्या पौर्णिमा लिखिते, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, उपकार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कार्यवाह प्रा. डॉ. राजेंद्र कांबळे, कोषाध्यक्ष आनंद कुलकर्णी, कुलसचिव अमोल जोशी, संचालक संजय गुंजाळ, कृष्णाजी कुलकर्णी, राजेंद्र बोऱ्हाडे, राजेंद्र कडुस्कर, रमेश कुलकर्णी यांच्यासह सल्लागार व कार्यकारी मंडळाचे सदस्य, माजी विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतनक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून स्थापन झालेल्या पुणे विद्यार्थी गृहाच्या वाटचालीत अनेक दानशूरांचे योगदान, अनेकांचा त्याग यामुळे गरीब मुलांच्या शिक्षणासाठी गेली ११४ वर्षे हा ज्ञानयज्ञ तेवत राहिला आहे. संस्थेने अनेकांना घडवले आहे. मूलभूत ध्येयापासून विचलित न होता कालानुरूप बदल करत संस्थेने प्रगतीचे अनेक टप्पे गाठले, ही समाधानाची बाब आहे.”
सुनील रेडेकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, संस्थेच्या सर्व विभागाची कामगिरी उल्लेखनीय होत आहे. अभियांत्रिकी, मुद्रण महाविद्यालयात विद्यार्थ्यांकड़ून अनेक तंत्राविष्कार पाहायला मिळत आहे. नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या शैक्षणिक प्रदर्शनात संस्थेला गौरविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शताब्दी पूर्तीनिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन झाले. यामध्ये विद्यालयाच्या शंभर वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच संस्थेच्या विविध विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सकाळी संस्थेच्या आवारातील धनुर्धारी श्रीराम मंदिरात रेडेकर यांच्या हस्ते शास्त्रोक्त पूजा झाली. श्रीधर पाटणकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रा. माणिक जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. राजेंद्र कांबळे यांनी आभार मानले.
मुंबई: कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले बहुमत हे काँग्रेस नेत्यांनी स्थानिक मुद्द्यावर केलेल्या प्रचारामुळेच साध्य झाले असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली. कर्नाटक मधील दोन विभागातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ पृथ्वीराज चव्हाण यांनी सभा घेतल्या तसेच 3 पत्रकार परिषद घेतल्या. त्यावेळी काँग्रेस पूर्ण बहुमताने कर्नाटकात सत्ता स्थापन करेल अशीच परिस्थिती होती. त्यामुळे अपेक्षेप्रमाणेच हा निकाल लागला आहे. असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. जर आम्ही काटावर असतो तर भाजप चा सत्तेसाठीचा घोडाबाजार झाला असता जो महाराष्ट्रासह अनेक राज्यात आपल्याला बघायला मिळाला आहे. ती शक्यता पूर्णपणे मावळली असून कर्नाटकच्या जनतेने भक्कम असे बहुमत काँग्रेसला दिलेले आहे. तरीसुद्धा काळजी घ्यावी लागेल आणि तशी काँग्रेसकडून तयारी सुद्धा दिसत आहे. असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. कर्नाटक मधील भाजप सरकार पूर्ण भ्रष्टाचारी स्वरूपाचे सरकार होते आणि त्यांना उघडे करण्यात कर्नाटक काँग्रेसच्या नेत्यांना मोठे यश मिळाले आहे. भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराची रेट लिस्टच काँग्रेस ने वृत्तपत्रामधून प्रसिद्ध केली होती. कर्नाटक मध्ये स्थानिक मुद्द्यावर निवडणूक काँग्रेस कडून लढविली गेली. बेरोजगारी व महागाई हे सामान्य जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे विषय होते त्यासाठी काँग्रेस कडून जाहीरनाम्यातून पाच गॅरंटी जाहिर करण्यात आल्या ज्यामधून कर्नाटक मधील जनतेला दिलासा मिळेल. या पाच योजना म्हणजे 200 युनिट फ्री मध्ये वीज, महिलांना रु 2000 महिना भत्ता, बीपील कुटुंबातील प्रती व्यक्ती 10 किलो धान्य, बेरोजगार असलेल्या पदवीधर युवकांना रु 3000 भत्ता तर डिप्लोमा होल्डर ना रु 1500 भत्ता ज्यामधून पुढील 2 वर्षात त्या युवकांला नोकरी मिळेपर्यंत ही रक्कम दिली जाईल तसेच महिलांना राज्यात मोफत बससेवा. अशा योजना काँग्रेस कडून जाहिर करण्यात आल्या होत्या याला जनतेने चांगली साथ दिली. असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
सरकारी आप निर्माण केल्यास ग्राहक व रिक्षाचालकांचा फायदा :- बाबा कांबळे,
पुणे शहरातील सर्व प्रमुख संघटनांची एक मताने ठराव मंजूर
पुणे- आरटीओ च्या वतीने नुकतेच रिक्षा वाहनासाठी वापरण्यात येणारा ओला उबेर रॅपिडो या कंपनीच्या मोबाईल ॲप साठीची परवानगी नाकारली असून, चार चाकी वाहनांना परवानगी नाकारण्याबद्दल राज्य सरकारला सूचना केली आहे, यामुळे आता रिक्षासह चार चाकी वाहनातून होणारे ओला उबेर रॅपिडो या कंपनीची सेवा लवकरच बंद होऊ शकते,
यामुळे पुणे शहरातील सर्व रिक्षा संघटनांनी एकत्र येऊन रिक्षा चालकांसाठी व प्रवाशांसाठी मोबाईल टेक्नॉलॉजी अत्यंत उपयुक्त आहे, परंतु खाजगी आणि भांडवलदार कंपन्यामुळे रिक्षा चालकांचे आणि प्रवाशांचे देखील लूट होत आहे अक्षरशः भांडवलदार कंपन्या प्रवाशांकडून जास्त पैसे घेतात तर रिक्षा चालकांकडून देखील 40% देखील कमिशन घेत आहेत, यामुळे सरकारने स्वतः मोबाईल ॲप निर्माण करून तो प्रवासी आणि रिक्षाचा सेवेमध्ये उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पुण्यातील सर्व रिक्षा संघटनेने केले असल्याची माहिती ऑल इंडिया ऑटो रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिली. मोबाईल आपलिकेशन बाबत निर्माण झालेल्या नवीन परिस्थितीबाबत पुणे शहरातील सर्व संघटनांनी पुणे येथील महामाता रमाई स्मारक येथे बैठक आयोजित केली होती.
भाजप वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अंकुश नवले हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते या बैठकीत समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक व पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष किशोर चिंतामणी, आम आदमी पक्षाचे पुणे शहर संघटक एकनाथ ढोले, शिवनेरी रिक्षा संघटनेचे संस्थापक आबा बाबर, सावकाश रिक्षा संघटनेचे प्रदीप भालेराव, पुणे रिक्षा फेडरेशनचे माजी अध्यक्ष प्रकाश झाडे, रिक्षा फेडरेशन चे ज्येष्ठ नेते पोपटराव कांबळे, रिक्षा संघटनेचे ज्येष्ठ नेते असगर बेग, पंकज जैन, समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे सदस्य गणेश रासने, शिवकल्याण रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ मारणे , श्री समर्थ रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ कडू,तुषार पवार, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख कार्याध्यक्ष विलास त्यांचे पाटील,आधी यावेळी उपस्थित होते.
पुणे-कर्नाटकमध्ये काँग्रेसचा दिमाखदार विजय झाल्याने जनमत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या पराभवासह दक्षिणेतील अखेरचे राज्य देखील भारतीय जनता पार्टीने गमावले आहे. या पराभवाची नैतिक जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी, अमित शहा व कर्नाटक राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली पाहिजे,असे मत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व्यक्त केले आहे.
एकीकडे देशातील मणिपूर सारखे राज्य दंगलीमध्ये जळत असताना देशाच्या पंतप्रधानांनी मात्र त्या घटनेकडे पूर्णपणे पाठ फिरवत कर्नाटकमध्ये येऊन प्रचार करण्यास पसंती दिली, पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना घेतलेल्या नैतिकतेच्या मूल्यांचा देखील पंतप्रधानांना विसर पडला. केवळ सत्ता आणि सत्ता हेच भारतीय जनता पार्टीचे अंतिम ध्येय आहे. त्यासाठी जातीय दंगली भडकवणे, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणे यांसारख्या कुठल्याही स्तराला ते जाऊ शकतात, हेच या घटनेतून पाहायला मिळाले. पण सरते शेवटी कानडी जनतेने या सर्व गोष्टींचा सारासार विचार करत भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवत काँग्रेसला ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला आहे.
देशात लोकशाही विरोधात सुरू असलेल्या अनेक घडामोडी, ऑपरेशन लोटस व खोट्या ईडी कारवाया करत मिळवलेली सत्ता, महागाई, बेरोजगारी, शेतमालाला हमीभाव या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत केवळ धार्मिक व विषारी मुद्द्यांकडे लक्ष वेधत देशातील जनतेला अस्थिर वातावरण देणाऱ्या भारतीय जनता पार्टीसाठी ही मोठी चपराक आहे. येत्या काळात राज्यासह संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीला अशाच प्रकारे सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्गीय, शेतकरी आणि देशातील बेरोजगार तरुण नाकारणार, हेच या विजयातून स्पष्ट होते
कर्नाटकमधील सर्व विजयी उमेदवारांचे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हार्दिक अभिनंदन.
कर्नाटकात १३६ जागांवर आघाडी घेतलेल्या कॉंग्रेसच्या त्यापैकी १०३ जागा विजयी घोषित करण्यात आल्या असून भाजपा ने ६४ जगणाव्र आघाडी घेतली असून ५० जागांवर भाजप विजयी घोषित करण्यात आली आहे.अपक्षांनी २ जागा जिंकल्यात ,जेडीएस ने १६ तर कल्याण राज्य प्रगती पक्ष आणि सर्वोदय कर्नाटक पक्ष यांनी प्रत्येकी १/ १ जागांवर विजय मिळविला आहे.आता कर्नाटक काँग्रेसमधील कोणता नेता मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. यासाठी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हे दोघे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.
मुंबई- कर्नाटक निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कर्नाटकात शक्तीशाली पक्ष आहे अशी काही स्थिती नाही. आम्ही एक प्रयत्न म्हणून काही उमेदवार उभे केले. त्यापैकी निपाणी मतदारसंघातील उमेदवाराला आम्ही शक्ती दिली होती, तिथे काही निर्णय मिळतील, अशी अपेक्षा होती. आतापर्यंतची आकडेवारी पाहता, आमचा उमेदवार पहिल्या पाच फेऱ्यांपर्यंत पहिल्या क्रमांकावर होता. पण आता तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. अजूनही चार फेऱ्या बाकी आहेत, अंतर सहा हजारांचे आहे. तिथे यश मिळेल याची खात्री नाही. पण एखाद्या राज्यात एन्ट्री करण्याच्यादृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला होता. आमचे खरे लक्ष्य हे कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव करणे, हेच होते. गेल्या आठ-दहा दिवसांत जाहीर सभांमध्ये मी बोलून दाखवले की कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचा पराभव होईल. त्यांचे सरकार जरी असले, देशातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक ठिकाणी सभा, रोड शो असे कार्यक्रम जरी केले असले तरी तेथील जनतेचा जो रोष आहे तो मतांमधून व्यक्त केला जाईल अशी खात्री आम्हाला होती. अलीकडच्या काळात भाजपने जिथे त्यांचे राज्य नाही त्याठिकाणचे आमदार फोडून तेथील राज्य घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी सत्तेचा वापर करणे हे सूत्र त्यांनी ठिकठिकाणी वापरले. कर्नाटकात सुद्धा त्यांनी तीच अवस्था केली. कर्नाटकात जे सरकार होते तेही लोक फोडून घालवले. जसे महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी केले तेच कर्नाटकमध्ये झाले होते. मध्य प्रदेशातही आमदार फोडून कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात आले. गोव्यातही भाजपने तेच केले. यंत्रणा आणि साधनसंपत्ती वापरुन सरकार पाडण्याची ही एक नवीन पद्धत सुरु झाली आहे, ही गोष्ट चिंताजनक आहे. मात्र, फोडाफोडी आणि खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही, ही गोष्ट कर्नाटकच्या निकालाने दाखवून दिली. कर्नाटकमध्ये भाजपला ६५ ठिकाणी, तर काँग्रेसला तब्बल १३३ जागांवर यश मिळेल, असे दिसत आहे. याचा अर्थ काँग्रेसला भाजपपेक्षा दुप्पट जागा मिळणार असे दिसत आहे. भाजपचा सपशेल पराभव करण्याची भूमिका कर्नाटकच्या जनतेने घेतली. याचे मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार, सत्तेचा, साधनांचा गैरवापर आणि लोक फोडून आपण राज्य करु शकतो, याविषयी सत्ताधाऱ्यांना असलेला विश्वास.. याविरोधात जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. मी कर्नाटकच्या जनतेचे व काँग्रेस पक्षाचे अभिनंदन करतो की देशामध्ये ज्या चुकीचे वातावरण पसरवणाऱ्या प्रवृत्ती आहेत त्यांना एक प्रकारचा धडा शिकवला. आता ही प्रक्रिया संबंध देशात होईल. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, दिल्ली, झारखंड, पंजाब, पश्चिम बंगाल अशा बहुतांश राज्यात भाजप सत्तेबाहेर जात आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होतील तेव्हा देशात काय चित्रं असू शकते, याचा अंदाज कर्नाटकच्या निवडणुकीतून करू शकतो. कर्नाटकच्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा उपयोग झाला असे म्हणता येईल. आम्ही कर्नाटकात जाऊ असे जे सीमा भागातील लोक म्हणत होते ते मुळात महाराष्ट्रातील नव्हते तर ते कर्नाटकातील होते. याची आम्ही माहिती घेतली. पण महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या सरकारची बदनामी करणे, हे त्यामागील सूत्र होते हे देखील लोकांना कळले. आम्ही एक पॉलिसी निर्णय घेतला होता की जिथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आहेत तिथे उमेदवार उभे करणार नाही. तिथे आम्ही प्रचाराला गेलो नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीने आतापर्यंत मराठी लोकांना विश्वास दिला होता. परंतु महाराष्ट्र एकीकरण समिती व तेथील अन्य पक्ष यांच्यात एकवाक्यता राहिली नाही. याचा परिणाम निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. महाराष्ट्रात मी आमच्या पक्षाची बैठक बोलवली. मी स्वतः उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन याविषयी चर्चा करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, आम्ही एकत्र बसून पुढची आखणी आतापासूनच करावी, हा विचार माझ्या मनात आहे. त्याबाबत मी सर्वांशी बोलणार आहे. ‘मोदी है तो मुमकिन है’ हा विचार लोकांनी यापूर्वी अमान्य केला आहे. सर्व सूत्रं एकाच व्यक्तीच्या हातात असल्यास लोकांचा पाठींबा नाही, हे चित्र आता दिसायला लागले आहे. महाराष्ट्रात मी ज्या भागात गेलो तिथे मागच्या निवडणुकीला जसा प्रचंड प्रतिसाद मिळाला तेच चित्र मला पाहायला मिळाले. मी फार ठिकाणी गेलो नाही. पाच-सहा ठिकाणी गेलो तिथे असे चित्र पाहण्यास मिळाले. याचा अर्थ स्पष्ट आहे की, लोकांना इथे सुद्धा बदल हवा आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो तर उद्याच्या निवडणुकीत ते चित्र दिसेल. आम्ही स्वतंत्र लढायचा प्रश्न येत नाही. आता आम्हाला असे वाटते की आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र यावे व तसेच जे छोटे पक्ष आहेत त्यांनाही विश्वासात घ्यावे. मात्र हा निकाल मी एकटा घेणार नाही तर बाकीच्या सहकाऱ्यांशी बोलून घेण्यात येईल.