Home Blog Page 1517

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने ठाणे व पालघर जिल्ह्यातील ६० महिलांचा सन्मान

मुंबई,दि, ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आज ज्या महिलांना प्राप्त झाला आहे त्यांचे अभिनंदन करून या पुरस्कारप्राप्त महिलांनी यापुढेही सामाजिक क्षेत्रात असेच काम सुरू ठेवावे. त्यामुळे महिलांना सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यास प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे ठाणे व पालघर जिल्ह्यातील प्रत्येकी १५ ग्रामपंचायतींमधील ६० पुरस्कार विजेत्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मंत्री श्री. लोढा बोलत होते.यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता काळे बनगर, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सरपंच,पुरस्कार प्राप्त महिला उपस्थित होत्या.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर, सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा ग्रामपंचायतस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतलेला आहे.या पुरस्कारासाठी राज्यातील एकूण २७८९७ ग्रामपंचायतींमध्ये  सुमारे ५५,७९४ महिलांना पुरस्कार देऊन आज गौरविण्यात आले.

0000

जी-२० बैठकीच्या निमित्ताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पुण्याची प्रगती आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवावे- अपर सचिव अभिषेक सिंग

पुणे, दि. ३१: जी-२० राष्ट्रांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे १२ ते १४ जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘डिजीटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप’ बैठकीच्या आयोजनप्रसंगी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पुण्याच्या प्रगतीचे प्रदर्शन करतानाच महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन परिषदेच्या सदस्यांना घडवावे, असे निर्देश केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हीजनचे अपर सचिव अभिषेक सिंग यांनी दिले.

जी-२० बैठकीच्या नियोजनासंबधी आढावा बैठक आज विधान भवन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीस केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव सुशिल पाल, उपसचिव अनुपम आशिष चौहान, विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पुण्याचे पोलीस आयुक्त रितेशकुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उपायुक्त वर्षा लड्डा आदी उपस्थित होते.

श्री. सिंग म्हणाले, बैठकीच्या नियोजनामध्ये कोणतीही त्रुटी राहू याची दक्षता घ्यावी. पाहुण्यांना पालखी सोहळाच्या निमित्ताने आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून द्यावी. वारीबद्दल क्युआर कोड आणि घडीपुस्तिकेच्या माध्यमातून माहिती देण्यात यावी. जेवणाच्यावेळी महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीची देखील ओळख करून द्यावी, असे त्यांनी सांगितले.

बैठकीच्या आयोजनाच्या तयारीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला. सर्व संबधित विभागांनी समन्वयाने कामे करावीत, पुण्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्थळे, येथील खाद्यसंस्कृती, स्मार्ट सिटी, स्वच्छ पुणे, आदी वैविध्य जगासमोर आणण्याची संधी मिळाली असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा प्रशासनाला मोठा अनुभव असून जानेवारी २०२३ मध्ये जी-२० प्रतिनिधींच्या पहिल्या बैठकीचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. १२ ते १४ जून दरम्यान आयोजित बैठकीसाठी आवश्यक तयारी प्रशासनातर्फे सर्व विभागांच्या सहकार्याने सुरु आहे. परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना विमानतळ ते मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पुण्याची वैशिष्ट्ये आणि क्षमता ठळकपणे दिसतील अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले असून ऐतिहासिक व महत्वाची वारसा ठिकाणे, शैक्षणिक संकुल आदी ठिकाणी प्रतिनिधींच्या भेटींचे नियोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. आषाढी वारी आणि बैठकीच्या आयोजनासंबधी ताळमेळ ठेवण्यात येत असून त्यादृष्टीने नियोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. बैठकीच्या निमित्ताने शहर स्वच्छता, महत्वाच्या चौकांचे व मार्गाचे सुशोभीकरण आणि रात्री विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

असे होईल पाहुण्यांचे स्वागत
बैठकीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींचे विमानतळावर पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीने सनई-चौघड्याद्वारे स्वागत करण्यात येणार आहे. विमानतळावरील सजावट करताना बैठकीच्या विषयाच्या अनुषंगाने डिजिटल संकल्पना केंद्रीत ठेवण्यात आली आहे. पाहुण्यांच्या सन्मानार्थ आयोजित भोजनाचेवेळी सांस्कृतिक कार्यक्रमात माँसाहेब जिजाऊ वंदन, दिंडी, शेतकरी नृत्य, मंगळागौर, गोविंदा, कोळी नृत्य, लावणी, धनगर नृत्य, गोंधळी आणि शिवराज्याभिषेक सोहळा सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश वेबपोर्टलचे उद्घाटन

प्रवेशप्रक्रिया १ जूनपासून सुरु होणार

मुंबई, दि. 31 : शैक्षणिक वर्ष 2023-24करिता दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशास 01 जून 2023 पासून सुरुवात होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी व्हावी, यासाठी तंत्र शिक्षण विभागाकडून  https://dte.maharashtra.gov.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते या वेबपोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्यातील पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा मागील चार वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमी कालावधीत शालेय शिक्षणानंतर तंत्रशिक्षणातील पदविका ही रोजगारक्षम बनण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार, करिअर आणि रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षण देण्याचा तसेच पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून  ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी व्हावी यासाठी हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन मंत्री श्री. पाटील यांनी केले.

तंत्र शिक्षण संचालक श्री. मोहितकर म्हणाले की, मागील चार वर्षांपासून पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश वाढविण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने, राज्यातील तंत्रनिकेतनांद्वारे “स्कूल कनेक्ट” हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. समुपदेशन सभा, जनजागृती मोहीम, जाहिराती, रेडिओ मुलाखती अशा विविध उपक्रमाद्वारे संस्थांनी आपले योगदान दिले आहे.

तसेच औद्योगिक क्षेत्रातील आवश्यक गरजा आणि भविष्यातील संधींचा वेध घेऊन 9 शासकीय व 30 विनानुदानित संस्थामध्ये  2हजार 460 प्रवेशक्षमतेचे  न्यू इमर्जिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्यामध्ये  Artificial Intelligence (AI) and Machine Learning; Mechatronics; Automation and Robotics; Cloud Computing and Big Data, Computer Engineering and IoT अशा अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

पदविका अभ्यासक्रमांच्या एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये 41 टक्के, 2019-20 मध्ये 50 टक्के, 2020-21 मध्ये 60 टक्के व 2021-22 मध्ये 70 टक्के होती. तर 2022-23 मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या 85 टक्के झालेली आहे.

शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांच्या संख्येची सरासरी टक्केवारी 97 टक्के आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता एकुण 375 संस्थांची प्रवेशक्षमता जवळपास 1 लाख आहे.

पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता अध्यापनाच्या प्रक्रियेची अंमलबजावणी ऐच्छिक स्वरुपात “मराठी-इंग्रजी (द्विभाषिक)” माध्यमातून राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये, विकल्प अर्ज भरताना उमेदवारांना “मराठी-इंग्रजी (द्विभाषिक)” अभ्यासक्रम ठळकपणे दर्शविण्यात येणार आहेत.

पदविका प्रवेश प्रक्रिया :

10 वी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 10 वी चा निकाल घोषित होण्यापूर्वी प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज ,ऑनलाईन नोंदणी  कागदपत्रांच्या स्कॅन, छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज करणे ही प्रक्रिया दि. 01 जून 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे.

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आयोजित करण्यात येणार आहेत. यावर्षी ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही मोबाईल ॲपवर सुद्धा उपलब्ध आहे.

विद्यार्थी त्यांचा केवळ दहावी/बारावीचा आसन क्रमांक नमूद करून अर्ज भरू शकतील व निश्चित करू शकतील. विद्यार्थ्यांचे प्राप्त गुण सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे अर्जामध्ये नमूद करण्यात येतील. तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी प्रक्रियेव्यतिरिक्त ई-स्क्रुटीनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे.

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी व त्यांना प्रवेश अर्ज भरणे, त्यांचे समुपदेशन करणे, प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यामध्ये ३२८ सुविधा केंद्रांची स्थापना तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे करण्यात आलेली आहे आणि त्याची यादी प्रवेशाच्या संगणकीय प्रणाली वर देण्यात येणार आहे.

सुविधा केंद्रांना उद्भवणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. सुविधा केंद्रांना / संस्थांना प्रवेश प्रक्रियेसंबंधी काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण आल्यास त्याचे निवारण नोडल अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना माहितीसाठी प्रवेशप्रक्रियेचे टप्पे उदा. नोंदणी करणे, अर्ज निश्चित करणे, छाननीची पद्धत निवडणे, हरकती नोंदवणे, विकल्प नमुना भरणे, इ. या महत्त्वाच्या टप्प्याचे व्हिडीओ संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार  आहेत. त्याचबरोबर या संकेतस्थळावर पदविका प्रवेश प्रक्रियेची थोडक्यात माहिती देणारे सादरीकरण, विद्यार्थ्यांना पदविका तंत्रशिक्षणाबद्दल माहिती देणारे शाखानिहाय माहिती चित्रपटदेखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

सर्व सुविधा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून ते अगदी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्याने प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे माहिती देण्यात येणार आहे.

ज्या उमेदवाराला कॅपफेरी दरम्यान जागा वाटप केली गेली जाईल त्यांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आणि जागा स्वीकृतीसाठी एआरसीकडे जाण्याची अट यावर्षीही शिथिल करण्यात आलेली आहे.

जागा वाटप झाल्यानंतर, उमेदवारांनी त्याला/तिला कॅप फेरीदरम्यान दिलेले जागा वाटप हे नियमांनुसार आहे किंवा नाही याची पडताळणी स्वत: लॉगिनमधून करु शकणार आहे व त्यानुसार उमेदवारांना जागा स्वीकृतीची कार्यवाही त्यांच्या लॉगीन मधून पूर्ण करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत श्री मेंगाई देवी भक्त निवास बांधकामाचे भूमिपूजन

पुणे, दि. ३१: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत पंचायत समिती वेल्हे अंतर्गत श्री मेंगाई देवी भक्त निवास बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी गट विकास अधिकारी पंकज शेळके, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता विकास कुलकर्णी, देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष प्रकाश पवार आदी उपस्थित होते.

क-वर्ग तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम सन २०२२-२३ अंतर्गत मोजे वेल्हे बु. येथील श्री मेंगाई देवी भक्त निवास बांधकामासाठी १० लक्ष रुपये निधी उपलब्ध झालेला आहे.

पुणे पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. ३१: पुणे व पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेकरीता जिल्हा नियोजन समितीमधून ५० कोटी आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून ५० कोटी असे एकूण १०० कोटी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी ४१ कोटी रुपये मंजूर करण्यात येत असून उर्वरित रक्कम लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पुणे ग्रामीण पोलीसदलाअंतर्गत वेल्हे पोलीस ठाण्याच्या दुमजली नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार दिनेश पारगे, गट विकास अधिकारी पंकज शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, राज्याची कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी पोलीस दलाला सुसज्ज साधने, आणि पोलिसांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस शहर आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाला वाहनासाठी जिल्हा नियोजन समितीमधून प्रत्येकी २ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व्यायामशाळेकरिता सुमारे २ लाख रुपयापेक्षा अधिकचा निधी देण्यात आला आहे.

वेल्हे येथील पोलीस ठाण्याचे बांधकाम अद्ययावत पद्धतीने करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या पोलीस स्थानकाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम आणि फर्निचर करण्यासाठी रुपये ३ कोटी ३४ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यापुढेही आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलाला सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. कायदा व सुव्यवस्थेचे उत्कृष्ट कार्य या इमारतीतून व्हावे, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

पोलीस विभागाकडून गुन्ह्यांची उकल करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरातील घटनेबाबत माहिती पोलिसांना दिली पाहिजे. पोलीस विभागाने निःपक्षपणे तपास करुन सर्व सामान्य नागरिकाला न्याय मिळवून दिला पाहिजे. महिला विषयक प्रकरणे, जातीय तंटे आदी प्रकरणे जलदगतीने तपास केला पाहिजे. गुन्हा घडूच नये यासाठी सदैव सावध असले पाहिजे. वेल्हा तालुकाच्या विकासासाठी मागणीप्रमाणे पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून यापुढेही विकासात्मक कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील श्री. पाटील यांनी दिली.

विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. फुलारी म्हणाले, वेल्हे पोलीस ठाण्याची इमारत ही पर्यावरणपूरक व निसर्गाला साजेशी आहे. सर्वसामान्य नागरिकाला न्याय देण्यासाठी पोलीस दल कार्यरत असून पोलीस अधिकारी व कर्मचारी पारदर्शकपणे काम करावे. आपल्या परिसरात अनुचित घटना घडल्यास नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. फुलारी यांनी केले.

पोलीस अधीक्षक श्री. गोयल म्हणाले, जुने पोलीस ठाणे ब्रिटीशकालीन इमारतीत होते. सदर इमारत मोडकळीस आल्याने येथील कामकाज सन २०१६ पासून भाडेतत्वावर जागा घेऊन सुरु करण्यात आले होते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस स्थानकाच्या नवीन इमारत बांधकाम आणि फर्निचरसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती श्री. गोयल यांनी दिली.

श्री. पाटील यांनी पोलीस स्थानकाच्या नूतन इमारतीची पाहणी करुन झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच त्यांच्या हस्ते पोलीस स्थानक प्रागंणात वृक्षारोपण करण्यात आले.

सहायक निरीक्षक मनोज पवार यांचा सत्कार
यावेळी वेल्हे पोलीस स्थानकचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. पवार यांचा सत्कार करण्यात आला. श्री. पवार यांनी पानशेत हद्दीत तीन वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीचा ४८ तासात शोध घेतला. हा खटला ‘फास्ट ट्रक कोर्टामध्ये चालविण्यात आला. उत्कृष्ट पद्धतीने तपास करुन पुरावे सादर केल्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली. याबद्दल भारत सरकारच्या केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत उत्कृष्ट तपासी अधिकारी म्हणून गौरव तसेच गृहमंत्री व पोलीस महासंचालक पदक प्राप्त झालेले आहे.

यावेळी परिसरातील आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.

अद्ययावत सुविधा असलेले पोलीस स्थानक
वेल्हे पोलीस स्थानकाचे एकूण चटई क्षेत्रफळ ७८३.३० चौ. मी. आहे. तळमजला मजल्यावर एकूण १२ कक्ष असून पहिल्या मजल्यावर एकूण ६ कक्ष आहेत. या पोलीस स्थानक हद्दीत एकूण १२९ गावे असून क्षेत्रफळाने मोठी हद्द आहे. यामध्ये डोंगर दरे, दोन किल्ले, ३ धरणे व पर्यटन स्थळे, शिवकालीन मेंगाई माता देवीचे मंदीर, महाराणी राजमाता सईबाई समाधीस्थळ, पाल यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांनी परिसरात वृक्षारोपणदेखील केले आहे.
0000

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

आक्षेपार्ह मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे मुख्य सचिवांना निर्देश

मुंबई, दि. ३१ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत, याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थांनी घेणे गरजेचे आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशारा देतानाच  ‘इंडिक टेल्स’ वरील लेखात आक्षेपार्ह बाबी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

०००

उपदेशापेक्षा मुलांशी संवाद साधा-योगगुरु डॉ. संप्रसाद विनोद

कसबा संस्कार केंद्राचा ३८ वा वर्धापनदिनानिमित्त सारंग सराफ, वसुधा वडके, समृद्धी पटेकर यांना यंदाचा कसबा कार्य गौरव पुरस्कार प्रदान
पुणे : आजी आजोबांना वृध्दाश्रमात ठेवायचे आणि मुलांना संस्कार वर्गात घालायचे असे विचित्र चित्र आज समाजात दिसत आहे. मुले आपल्या पालकांकडे बघून शिकत असतात आणि हे संस्कार दिर्घकाळ टिकतात. मुलांचे भावविश्व समजून घेतले तर त्यांच्यावर संस्कार करावे लागणार नाही तर ते आपोआप रुजतील. त्यासाठी मुलांना वेळ द्या, सतत उपदेश देण्यापेक्षा मुलांशी संवाद साधा, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद यांनी व्यक्त केले.

श्रुतीसागर आश्रम फुलगांव पुणे संचलित कसबा संस्कार केंद्राच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात कसबा कार्य गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यंदाचा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते सारंग सराफ, अष्टपैलू कलाकार वसुधा वडके आणि गायिका समृद्धी पटेकर यांना प्रदान करण्यात येणार आला. यावेळी श्री देशमुख महाराज फाऊंडेशनचे प्रमुख प.पू. गुरुदास देशमुख महाराज,अॅड. प्रताप परदेशी, योगेश समेळ, सीमा सरदेशपांडे, प्रल्हाद गवळी, कसबा संस्कार केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवाणजी, अनघा दिवाणजी आदी उपस्थित होते.

शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमात कसबा गौरव पुरस्कार नृत्यांगना हर्षदा बांदल आणि खेळाडू प्रांजल पोटफोडे यांना प्रदान करण्यात आला. तर, बालगौरव पुरस्कार कलाकार ईशान जबडे याला देण्यात आला. संस्कार केंद्राची माहिती देणाऱ्या नविन पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच स्वाधार संस्थेतील देवदासींच्या मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. पुरस्कार वितरण समारंभानंतर विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि संस्कार वर्गातील ७५ मुला-मुलींच्या सांस्कृतिक कार्यक्रमात समूहनृत्य व समूहगीत सादर केले.

प.पू. गुरुदास देशमुख महाराज म्हणाले, आज स्पर्धेच्या युगात मुलांना केवळ शिक्षण देवून चालणार नाही तर त्यांच्यावर चांगले संस्कार देखील करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या मुलांबरोबर चांगले नातेसंबध प्रस्थापित करा. आज अनेक शिवबा जन्माला येत असतील परंतु त्यांना घडविणाऱ्या जिजाऊंचा अभाव दिसत आहे. ज्या देशात संस्कारांचा पाया मजबूत असेत ते सक्षम राष्ट्र असते, असेही त्यांनी सांगितले. स्मिता जोशी, संगिता जयंत ठकार, प्रिती  नायकवडी, अपेक्षा राऊत, सोनाली खानगांवकर, सारिका पाटणकर, यशवंत पारखी, रुपेश कुलकर्णी हे मान्यवर देखील उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पूर्वा ढोले, आर्या परदेशी, दिव्या राऊत यांनी केले होते.अनघा दिवाणजी व चैताली सरमहाले यांनी सूत्रसंचालन केले. अनिल दिवाणजी यांनी प्रास्ताविक केले.

एयर इंडियातर्फे लाँच करत शिक्षणाला नवा आयाम

या हबमध्ये ७०,००० अत्याधुनिक लर्निंग टुल्सचा समावेश

गुरुग्राम, ३१ मे २०२३ – कर्मचाऱ्यांना शिक्षणाचा अनोखा अनुभव देण्यासाठी एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या विमानवाहतूक आणि स्टार अलायन्स सदस्य कंपनीने नाविन्यपूर्ण लर्निंग हब लाँच केले आहे. Gurukul.AI नावाचे हे हब कंपनीने आपले स्वरूप बदलण्यासाठी आखलेल्या पाच वर्षीय Vihaan.AI उपक्रमाशी सुसंगत आहे. या लाँचमुळे एयर इंडियाला सातत्यपूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून क्रांतीकारी बदल घडवणे शक्य होणार आहे. 

आजच्या तंत्रज्ञानाने वर्चस्व असलेल्या व्यावसायिक जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी Gurukul.AI मध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आपली कौशल्ये अद्ययावत करण्यासाठी आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत. यात कर्मचाऱ्याच्या कामाचे स्वरुप, क्षमता आणि कौशल्ये यांचे विश्लेषण केले जाते. या प्लॅटफॉर्मवर कंपनीतील वेगवेगळ्या पदांसाठी आवश्यक क्षमतांची माहिती देण्यात आली असून त्यानुसार शैक्षणिक मोड्युल्स उपलब्ध करून दिले जातात.

एयर इंडियाचे प्रमुख मानवी संसाधन अधिकारी डॉ. सुरेश त्रिपाठी म्हणाले, ‘Gurukul.AI लाँच करत एयर इंडियाने प्रत्येक कर्मऱ्याच्या गरजा पुरवण्यासाठी, त्यांना शिक्षणाचा आधुनिक अनुभव देण्यासाठी कंपनीची बांधिलकी दर्शवली आहे. सतत बदलत असलेल्या जगात आपली कौशल्ये तातडीने विकसित करणे आणि डिजिटल सुविधांच्या माध्यमातून जागतिक दर्जाचा कंटेंट उपलब्ध करून देणे खूप महत्त्वाचे झाले आहे. या व्यावसायिक धोरणाच्या माध्यमातून आम्ही एयर इंडियाचे अखंड शिक्षण देणाऱ्या कंपनीत रुपांतर करण्याचे ठरवले आहे.’

सध्याच्या युगात कामासाठी आवश्यक कौशल्ये असणे आणि कंपनीतील कामाच्या अनुभवासह ही कौशल्ये विकसित करत राहाणे महत्त्वाचे आहे. हेच लक्षात घेऊन Gurukul.AI यश व कार्यक्षमतेवर प्रभावी परिणाम घडवून आणण्यासाठी सज्ज झाले आहे.

जागतिक दर्जाच्या सुविधा – एयर इंडियामध्ये अत्याधुनिक, जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, कर्मचाऱ्यांची उत्पादनक्षमता वाढवणे आणि जागतिक मापदंडानुसार त्यांची कौशल्ये विकसित करणे यावर Gurukul.AI चा प्रमुख भर आहे.

शिक्षण सहज उपलब्ध – या लर्निंग हबच्या मदतीने एयर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ज्ञानाची खाण खुली करून दिली आहे. कर्मचाऱ्यांना आपली कौशल्ये अद्ययावत करण्याची प्रेरणा मिळावी आणि स्वतःच्या विकासाची जबाबदारी स्वतःच घेण्याची संस्कृती तयार व्हावी या हेतूने या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे.

आवश्यकतेनुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान – आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून Gurukul.AI मध्ये कौशल्यांचे मोजमाप करण्यासाठी समग्र यंत्रणा देण्यात आली आहे. प्रत्येकाच्या गरजेनुसार यात शिफारस केली जाते. विशेष म्हणजे, या पोर्टलमधील तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांना आकडेवारी तयार करून देत आपली प्रगती जोखण्याची संधी देते. त्याशिवाय आपल्या कामगिरीचं व्यवस्थापन करण्याची सोयही यात आहे.

वैविध्यपूर्ण साधने – या हबद्वारे ७०,००० आधुनिक लर्निंग टुल्स पुरवली जातात. त्यामध्ये लर्निंग मोड्युल्स, मायक्रो- लर्नुंग, मोबाइल लर्निंग रिसोर्सेस, व्हिडिओवर आधारित मोड्युल्स यांचा समावेश आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार निवड करता येते.

संवादी पद्धतीद्वारे शिक्षण – यात देण्यात आलेल्या लीडर बोर्डासारख्या वैशिष्ट्यामुळे टीम लर्निंग सोपे होते. त्याशिवाय लर्निंग वॉलेटमध्ये रिवॉर्ड पॉइंट्स मिळवण्याची सोय असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपले ज्ञान विकसित केल्याबद्दल आकर्षक लाभ मिळतात.

गेमिफिकेशन – गेमसारखे दिसणारे संवादी घटक, प्रत्यक्ष संवाद साधणारी यंत्रणा यामुळे कर्मचाऱ्यांना आपली प्रगती जाणून घेता येते. महत्त्वाचे टप्पे तसेच उद्दिष्ट पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते.

एयर इंडिया टप्प्याटप्प्याने Gurukul.AI लाँच करणार असून त्यात इनफ्लाइट सर्व्हिसेस, ग्राउंड सर्व्हिसेस आणि इंजिनियरिंगसारख्या वेगवेगळ्या विभागांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान व यंत्रणेचा समावेश केला जाईल. आगामी टप्प्यात या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वैमानिक प्रशिक्षणासाठी आधुनिक, एआयवर आधारित सुविधा दिली जाणार आहे.

अमेरिकेत राहुल गांधींच्या कार्यक्रमात खलिस्तान्यांची मुजोरी,’खलिस्तान झिंदाबाद’च्या दिल्या घोषणा

राहुल म्हणाले ,नफरत के बाजार मी मोहब्बत कि दुकान .. राहुलच्या समर्थकांनी दिल्या ‘भारत जोडो च्या घोषणा

सॅन फ्रान्सिस्को

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात खलिस्तानी समर्थकांचा सामना केला. बुधवारी ते सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करत असताना सभागृहात बसलेल्या खलिस्तानी समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी हवेत खलिस्तानी झेंडे फडकावले आणि ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी हसले आणि म्हणाले, ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान’. दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींना धमकी देणारा व्हिडिओ जारी केला आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वाँटेड असलेला ‘सिख फॉर जस्टिस’चा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू हा राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकावताना दिसत आहेत. अमेरिकेत राहणारा मोस्ट वाँटेड खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू व्हिडिओमध्ये म्हणतो की, राहुल गांधी अमेरिकेत जिथे जातील तिथे त्यांच्यासमोर खलिस्तानी उभे राहतील. त्याने म्हटले की, 22 जूनला पुढचा नंबर मोदींचा आहे.

तथापि, खलिस्तान्यांच्या घोषणाबाजीनंतर तेथे उपस्थित भारतीय जनसमुदायाने प्रत्युत्तरात नफरत छोडो, भारत जोडो अशा घोषणा दिल्या.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय प्रवासींच्या मेळाव्याला संबोधित करताना, भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर लोकांना ‘धमकावणे’ आणि देशाच्या एजन्सीचा ‘दुरुपयोग’ केल्याचा आरोप केला. मंगळवारी कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथे एका कार्यक्रमात गांधी म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) भारतातील राजकारणाच्या सर्व माध्यमांवर नियंत्रण ठेवत आहेत. ते म्हणाले की, त्यांची ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करण्यापूर्वी, राजकारणातील जुनी जीवनशैली आता चालत नाही, याची जाणीव झाली.

राहुल गांधी म्हणाले, ‘भाजप लोकांना धमकावत आहे आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत आहे. ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करण्यात आली कारण भाजप-आरएसएसने लोकांशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व माध्यमांवर नियंत्रण ठेवले. “राजकीयदृष्ट्या काम करणे खूप अवघड झाले आहे, हेही आम्हाला जाणवत होते. म्हणून आम्ही भारताच्या दक्षिणेकडील टोकापासून श्रीनगरपर्यंत कूच करण्याचे ठरवले. ही यात्रा स्नेह, आदर आणि नम्रतेच्या भावनेने पार पडल्याचे गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले- भाजप आणि आरएसएसचे लोक भारताच्या विविधतेला धोका आहेत

कॅलिफोर्निया-राहुल गांधी 6 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. मंगळवारी रात्री ते अमेरिकेत पोहोचले. सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा आणि इतर आयओसी सदस्यांनी राहुल यांचे स्वागत केले. इमिग्रेशन क्लिअरन्ससाठी राहुल यांना दोन तास विमानतळावर थांबावे लागल्याचे पक्षाने म्हटले आहे. यादरम्यान, जेव्हा लोकांनी त्यांना विचारले की ते लाइनमध्ये का उभे आहेत, तेव्हा ते म्हणाले- मी एक सामान्य माणूस आहे, मी आता खासदार नाही.येथे ते सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीयांना संबोधित करत आहेतराहुल गांधी म्हणाले, ‘भारतातील काही लोकांना वाटते की त्यांना सर्वकाही माहित आहे. ते देवालाही गोष्टी शिकवू शकतात आणि आपले पंतप्रधान मोदी हे त्यापैकीच एक आहेत. भारत जोडो यात्रेत मी खचून जात नव्हतो कारण माझ्यासोबत संपूर्ण भारत होता. माझा प्रवास रोखण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले, पोलिस बळाचा वापर केला. असे असूनही भेटीचा प्रभाव वाढला.

प्रश्न : हा कार्यक्रम यशस्वी करण्यात महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महिला आरक्षण विधेयक गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास यावर काय कारवाई करणार?

राहुल : सरकार स्थापन होताच आम्ही नक्कीच विधेयक मंजूर करू. मागील सरकारमधील काही पक्ष या विधेयकावर आम्हाला सहकार्य करत नव्हते, पण आता तसे होणार नाही.

प्रश्न : तमिळ लोकांमध्ये बंधुभावाचे नाते आहे. आपण प्रत्येक माणसाला समान मानतो. भारतात विविध धर्म, जाती आणि संस्कृतीचे लोक राहतात. राहुलजी, तुम्ही अमेरिकेत शिकलात. येथे प्रत्येक राज्याचे स्वतःचे संविधान आहे. माझा प्रश्न असा आहे की भारताला युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया बनवण्याबद्दल तुम्हाला काय वाटते?

राहुल : आपली राज्यघटना सांगते की प्रत्येक धर्म, जात आणि संस्कृतीचे लोक समान आहेत. त्यांचे संरक्षण करावे लागेल. भाजप आणि आरएसएसचे लोक भारताच्या विविधतेला धोका आहेत. माझ्यासाठी तमिळ भाषा ही केवळ एक भाषा नसून तमिळ लोकांची संपूर्ण संस्कृती आहे. मी तमिळ भाषेला कधीही धोका होऊ देणार नाही, कारण त्यामुळे भारताच्या सभ्यतेला हानी पोहोचेल. कोणत्याही भाषेला धोका हा भारताच्या एकात्मतेला धोका आहे. आमची ताकद विविधतेमध्ये आहे आणि आम्ही वेगळे असतानाही एकत्र काम करतो.

प्रश्नः फॅसिझम हा भारतातील एक मोठा मुद्दा आहे, मग तुम्ही अर्थव्यवस्था आणि विकासाच्या बाबतीत सर्व घटकांना कसे कव्हर कराल?

राहुल : देशात विविध जाती-धर्माचे लोक राहतात. त्यांना जाणून घेतल्याशिवाय त्यांच्याबाबत योग्य धोरण बनवणे शक्य नाही. जात जनगणनेसाठी काँग्रेस भाजपवर सातत्याने दबाव आणत आहे. विविध सरकारी योजनांद्वारेच आपण सर्व लोकांना वाचवू शकतो. भारतातील खरे प्रश्न आहेत महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचा हक्क. यापासून लोकांना वळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

प्रश्न : द्वेषाच्या बाजारात तुम्ही प्रेमाचे दुकान उघडले आहे. भारतातील मुस्लिमांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यांच्यावर अनेक कायदे केले जात आहेत. मुस्लिम मुलांना त्यांनी न केलेल्या आरोपांसाठी तुरुंगात टाकले जात आहे. यावर तुम्ही काय सांगाल?

राहुल : आज भारतात मुस्लिम समाज आणि सर्व अल्पसंख्याकांमध्ये भेदभाव आहे. काही लोकांकडे देशाचा सर्व पैसा आहे आणि अल्पसंख्याक गरिबीच्या गर्तेत बुडाले आहेत. पण तुम्ही द्वेषाला द्वेषाने मारू शकत नाही. भारतीय लोक द्वेषावर विश्वास ठेवत नाहीत. काही लोकांनी यंत्रणा आणि माध्यमे पकडली आहेत आणि ते ही मानसिकता पसरवत आहेत. मी काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास केला आहे. भारतातील सामान्य नागरिकांची अशी मानसिकता नाही. आपण मिळून या भेदभावाला तोंड देऊ आणि प्रेमाने जिंकू.

प्रश्नः विद्यार्थ्यांना भारतात परत जाऊन भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे. पण आज तिथल्या पैलवानांची अवस्था बघून आम्हाला माघारी फिरता येत नाही. मग तुम्ही आमच्यासाठी काय कराल?

उत्तरः मीडिया आज जे दाखवतो तो भारत नाही. ते फक्त देशातील द्वेषाला ठळकपणे दाखवतात, पण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लोकांमध्ये खूप प्रेम आहे. अशा परिस्थितीत तुम्ही परत जा आणि देशाचा नावलौकिक करा. तुम्ही सर्व परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करता. त्या भावना तुम्हाला पुढे न्याव्या लागतील जेणेकरून आम्ही भाजपचा पराभव करू शकू.

अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडी येथे घोषणा

अहमदनगर- अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार, अशी घोषणा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते अहमदनगरमधील चौंडी येथे आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयेजित कार्यक्रमात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर केले, उस्मानाबादचे धाराशिव केले. आता अहमदनगरचे आहिल्यानगर करणारच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात हे नामांतर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनगर समाजासाठी आपल्या सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. विखे – पाटील यांच्या नेतृत्वात 10 हजार कोटींचा फंड तयार केला. एकाही पैशाचे व्याज न घेता मेढपाळांना कर्ज देण्याचा आम्ही निर्णय घेतला. आजपर्यंत मेढपाळांना पावसाळ्यात चरायसाठी जमीन ठरवून द्या ही गेल्या 25 वर्षांची मागणी आपण पूर्ण केली आहे. मेढपाळाकरता चरायराण राखून ठेवण्याचे काम या सरकारने केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनगर वाड्यांना जोडण्यासाठी आपण अर्थसंकल्पात रस्त्याची तरतूद केली आहे. 22 वेगवेगळ्या योजनाचा लाभ आपण आपल्या समाजाला उपलब्ध करुन दिला आहे. धनगर समाजासाठी 1 हजार कोटींच्या कामाची सुरूवात झाली होती. मात्र, सरकार बदलले आणि एक रुपयाही मिळाला नाही. आमचे सरकार आले नी पुन्हा सर्व मागण्यासाठी निधी दिला.

अहमदनगरचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर करावे अशी मागणी चौंडीतील कार्यकमात बोलताना भाजप आमदार राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. धाराशिव केले छत्रपती संभाजीनगर केले मग आमच्या नावात बदल करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनगर समाजासाठी दरवर्षी 25 हजार घरे बांधण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. वाडी वस्तीवर राहणारा एकही धनगर बेघर राहणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याचे लवकरच नामांतर होणार आहे. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिंदेंनी दिली. ते चौंडी येथे एका सभेला संबोधित बोलत होते. त्यामुळे आगामी काळात हा जिल्हा ‘अहिल्यानगर’ म्हणून ओळखला जाईल, असे शिंदेंनी स्पष्ट केले.

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मागदर्शन शिबीर संपन्न


पुणे दि.30:- कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध यांच्या संयुक्त विद्यमाने पर्वती विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक बिबवेवाडी येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मागदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर.बी. भावसार, उपप्राचार्य यशवंत कांबळे, नगरसेवक महेश वाबळे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

यावेळी आमदार मिसाळ म्हणाल्या, कोणताही व्यवसाय अथवा नोकरी ही कमी दर्जाची नसते. तरुणांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता स्विकारलेल्या क्षेत्रात चांगले काम केल्यास त्यांची निश्चित प्रगती होईल. तसेच स्वयंरोजगार व स्टार्टअपच्या माध्यमातून देखील तरुणांना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत असेही त्या म्हणाल्या.

उपसंचालक श्री. भावसार, यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रम, मुलींसाठीच्या औद्योगिक क्षेत्रातील संधी व शासनाच्या विविध योजना, भगवान पांडेकर यांनी दहावी, बारावीनंतर पुढे काय, अरविंद केळकर यांनी Swor Analysis याबद्दल माहिती देऊन व्यक्तिमत्व विकासासंबंधी मार्गदर्शन केले.

सचिन येडे यांनी पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग अभ्यासक्रम, डिप्लोमा कोर्सेस व प्रवेश प्रक्रिया याबद्दल माहिती दिली.
0000

लोकसेवा हक्क आयोगाच्या सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक-आयुक्त दिलीप शिंदे


पुणे, दि. ३० :- राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सेवा राज्यातील सामान्य माणसापर्यंत तत्परतेने, सहज व सुलभपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य हक्क अधिनियम २०१५ अंमलात आहे. या कायद्यातील तरतूदींचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून त्यासाठी विविध माध्यमांतून लोकजागृती करावी, असे आवाहन राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी केले.

राज्य हक्क अधिनियम २०१५ मधील तरतूदी, कार्यपद्धती व अधिसूचित सेवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत आयुक्त श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आयोगाच्या उप सचिव अनुराधा खानविलकर, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, पुणे मनपाचे उप आयुक्त सचिन इथापे, श्यामला देसाई, विक्रम महिते आदी उपस्थित होते.

या अधिनियमांतर्गत ५११ सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून त्यापैकी ३८७ सेवा ऑनलाईन पद्धतीने दिल्या जात असल्याचे सांगून श्री. शिंदे म्हणाले अधिनियमामध्ये पदनिर्देशित अधिकाऱ्याने पात्र व्यक्तींना कालबद्ध लोकसेवा देणे बंधनकारक असून सेवा देण्यासाठी निश्चित कालमर्यादा आहे. कालमर्यादेत माहिती देण्यास कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपयांपर्यंत दंड लावण्याची तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. शिंदे म्हणाले, आयोग स्थापन झाल्यापासून १३ कोटी ६२ लाख इतके अर्ज प्राप्त झाले असून १२ कोटी ९४ लाख अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. तर पुणे विभागात एप्रिल २०२३ पासून ७ लाख २७ हजार ४७१ अर्ज प्राप्त झाले असून ६ लाख २८ हजार ६५० असे एकूण ८६ टक्के अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. आयोगांतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ आपले सरकार पोर्टलद्वारेही घेता येतो. सध्या पुणे शहरामध्ये ५८६ आपले सरकार सेवा केंद्रचालक असल्याचे सांगितले.

या कायद्यान्व्ये जिल्हाधिकारी यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. लोकसेवा हक्क अधिनियमाची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आठवडी बाजार, भित्तीपत्रके, शिबीरे, जाहिरात आदींच्या माध्यमातून प्रसिद्धी व लोकजागृती होणे आवश्यक आहे, असे श्री. शिंदे म्हणाले. पुणे जिल्ह्याने सेवा देण्यामध्ये चांगले काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी आयोगाची संरचना, अधिनियमाची उद्दिष्ट्ये, महत्त्वाच्या तरतूदी, आयोगाचे अधिकार, जिल्हाधिकारी यांची जबाबदारी,आपले सरकार पोर्टलमार्फत ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध असलेल्या सेवा, दैनंदिन वापरासाठी देण्यात येणाऱ्या पदनिर्देशित अधिकारी, नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

बैठकीला आयोगाचे अधिकारी- कर्मचारी, नागरिक, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0000

कसबा पेठ येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन

पुणे, दि. ३० : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध यांच्यावतीने २ जून रोजी सकाळी १० वाजता रतनबेन चुनिलाल मेहता गुजराती हायस्कुल, १४३६ गणेश रोड, फडके हौद, कसबा पेठ, पुणे येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे संस्थेचे प्रभारी उपसंचालक आर.बी.भावसार यांनी कळविले आहे.

या शिबीरात इयत्ता १० वी व १२ वी नंतर करिअर, शिक्षणाच्या विविध संधीबाबत मार्गदर्शनपर व्याख्याने, सचित्र प्रदर्शन, आय.टी.आय. कोर्सच्या पुढील शिक्षणासंदर्भातील माहिती, १२ वी नंतरचे अभ्यासक्रम व प्रवेश प्रक्रियेची माहिती, शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती, परदेशातील शिक्षण व महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ यासंदर्भातील माहिती देण्यात येणार असून स्वयंरोजगाराबद्दल माहिती देणारे स्टॉल देखील लावण्यात येणार आहेत.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत नोंदणीसाठी क्यू. आर. कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. इयत्ता ९ वी ते १२ वी परीक्षा दिलेले विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी क्यू. आर. कोडच्या सहाय्याने नोंदणी करून शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
0000

डिजिटलसह इलेक्ट्रॉनिक्स व रेडिओ क्षेत्र “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेण्याचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांना दिलेला शब्द पाळला!

डिजिटल मिडिया शिंदे-फडणवीस सरकारचे आभार -राजा माने.
मुंबई,दि.३०- सहा महिन्यांपूर्वी भिलार-महाबळेश्वर येथे झालेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पहिल्या ऐतिहासिक अधिवेशनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील डिजिटल मिडिया पत्रकारांना दिलेला शब्द आज खरा करुन दाखविला.डिजिटल मिडियासह इलेक्ट्रॉनिक्स माध्यम अस्थापनांना “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.त्या बद्दल डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.
भिलार महाबळेश्वर येथे झालेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन भाषण करुन उद्घाटन केले होते.डिजिटल मिडिया क्षेत्राचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाद्वारे दिला होता.डिजिटल मिडियाला पत्रकारिता माध्यम म्हणून मान्यता देवून सरकार दरबारी नोंदणी व्हावी, मुद्रित माध्यमांप्रमाणे डिजिटल मिडिया ला नियमित जाहिराती मिळाव्यात, डिजिटल पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका दिल्या जाव्यात यासह सोळा मागण्या करणारे ठराव अधिवेशनात करण्यात आले होते.त्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, सांसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा सक्रीय सहभाग होता.राज्यातील सुमारे दोन हजार प्रतिनिधींच्या उपस्थित पार पडलेल्या अधिवेशनात मांडलेले सर्व प्रश्न मार्गी लागण्याची प्रक्रिया आज मंत्रिमंडळाच्या निर्णयाद्वारे सुरु झाली आहे.संघटनेचे राज्यातील सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांच्यावतीने राजा माने यांनी एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.