Home Blog Page 1447

मराठी अभिनेता रवींद्र महाजनी यांचे निधन; बंद फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह, मृत्यू 2-3 दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज

पुणे-मराठी सिनेसृष्टीवर आघात करणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांच निधन झालं आहे. 80 चा काळ गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे रविंद्र महाजनी त्याकाळी मराठीतील हँडसम हंक म्हणून रविंद्र महाजनी यांच्याकडे पाहिलं जायचं. आज ते आपल्यात नाहीत, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाही.मावळच्या तळेगाव दाभाडे येथील घरात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. रवींद्र यांचं वय 77 वर्ष होतं. त्यांचा मृत्यू साधारण: तीन दिवसांपूर्वी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.त्यांच्या मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. लोकप्रिय अभिनेत्याचा असा शेवट झाला आहे.गश्मिर महाजनी हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो देखील चित्रपट क्षेत्रात आघाडीचा अभिनेता आहे.

तळेगाव MIDC पो स्टे हद्दीत एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे मराठी सिने अभिनेता रवींद्र हनुमंत महाजनी (वय 77 वर्षे) बंद फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळून आले आहेत. ते गेले 7- 8 महिन्यापासून वरील ठिकाणी एकटेच राहण्यास होते. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा गश्मिर यांना कळविण्यात आली असून ते तळेगाव येथे आल्यानंतर मृतदेहाचे पोस्ट मोर्टेम करून घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

या एव्हरग्रीन अभिनेत्याच्या करिअरची सुरुवात टॅक्सी चालवण्यापासून झाली होती. अभिनेता रविंद्र महाजनी हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. अभिनय क्षेत्रात पाय ठेवण्यापूर्वी ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत. त्यांनी साधारणपणे 3 वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली. मात्र, त्यांच्यातील एक कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ते दिवसा वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत आणि रात्री टॅक्सी चालवत. रविंद्र महाजनी यांनी मराठीसह हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्येही काम केले. रविंद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ यांसारखे प्रसिद्ध चित्रपट दिले. एवढेच नाही, तर ते बॉलिवूडमध्येही झळकले. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

रवींद्र महाजनी यांच्या अपार्टमेंटमध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या आदिका वारंगे नामक महिलेने त्यांच्याशी झालेल्या अखेरच्या संवादाची माहिती दिली आहे. या महिलेने सांगितले की, मी या इमारतीत दररोज कचरा घेण्यासाठी येत होते. मंगळवारी मी रवींद्र महाजनी यांना अखेरचे पाहिले. त्यानंतर बुधवारी माझी साप्ताहिक सुट्टी होती. गुरुवारी ते झोपले असावेत या विचाराने मी त्यांचे दार ठोठावले नाही. त्यानंतर ते दिसले नाही. कचरा देताना ते थोडेफार बोलायचे. तेवढाच आमच्यात संवाद व्हायचा. शुक्रवारी कचऱ्यासाठी गेले असता त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंध येत असल्याचे जाणवले. मी त्याची माहिती माझ्या वरिष्ठांना दिली.

मी दरवाजा ठोठावल्यानंतर त्यांचा आवाज यायचा. पण काल आतून त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, असेही आदिती वारंगे यांनी यावेळी सांगितले. दुसरीकडे, पोलिसांनी महाजनी यांच्या मृतदेहाची स्थिती पाहून त्यांचा मृत्यू दोन-तीन दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गश्मीरच्या मातोश्री आजारी असल्यामुळे त्यांच्यापासून ही बातमी लपवून ठेवण्यात आल्याचीही माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुर्दैवी निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो. तसेच महाजनी परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली, असे ते म्हणाले.

मराठी चित्रपट सृष्टीची मोठी हानी – शरद पवार

आपल्या संपन्न अभिनय कलेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी आहे. आपल्या भावस्पर्शी अभिनयाने रविंद्र महाजनी यांनी एक काळ गाजवला होता. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीची मोठी हानी झालेली आहे. महाजनी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे शरद पवार म्हणाले.

महिलांना समान न्याय मिळावा यासाठी देशात समान नागरी कायदा महत्त्वाचा

पुणे:महिलांना समान न्याय मिळावा यासाठी देशात समान नागरी कायदा महत्त्वाचा असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता मोनिका अरोरा यांनी व्यक्त केले.

डीईएस श्री. नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात संभाव्य ‘समान नागरी कायदा’ या विषयावर मोनिका अरोरा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

ॲड. श्रीहरी बोरीकर, डीईएसचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालक मंडळाचे सदस्य महेश आठवले, ॲड. अशोक पलांडे, प्रभारी प्राचार्या डॉ. सुनिता आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.

अरोरा म्हणाल्या, आपल्या देशात कायद्यासमोर सर्व सारखे आहेत. फक्त कौटुंबिक कायद्यात समानता नाही. त्यातही विवाह, घटस्फोट, वारसा आणि दत्तक याबाबतचे कायदे वेगवेगळे आहेत. त्यामुळे महिला आणि मुलांमध्ये भेदभाव होतो. तो टाळण्यासाठी समान नागरी कायदा होणे आवश्यक आहे.

अरोरा पुढे म्हणाल्या, आपण सर्व भारतीय म्हणून राज्यघटना स्वीकारली आहे. यात कुठल्याही धर्माचा संबंध येत नाही. राष्ट्राला धर्म नाही. समान नागरी कायद्याशी धर्माचा संबंध जोडणे योग्य नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि गरिमापूर्ण जीवन जगण्याचे अधिकार घटनेने दिले आहेत.

बोरीकर म्हणाले, देशाच्या विकासासाठी समान नागरी कायदा आवश्यक आहे. समान नागरी कायद्यासाठी प्रत्येकाने आपला सहयोग दिला पाहिजे. भारताच्या सोनेरी भविष्यासाठी आपले उत्तरदायित्व महत्त्वाचे आहे.

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पालकमंत्र्यांकडून पाहाणी

उड्डाणपूल प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे योग्य नियोजन करा!

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

पुणे दि.१४- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामास भेट देऊन पाहणी केली. उड्डाणपूल प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक शाखेचे विजयकुमार मगर, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दीपक पोटे, अमोल बालवडकर, माजी नगरसेविका अल्पना वर्पे, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,  भाजपाचे गणेश कळमकर, प्रकाश बालवडकर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुला प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १२ ऑगस्ट रोजी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या पूर्वतायरीच्यादृष्टीने श्री. पाटील यांनी चांदणी चौक येथे भेट दिली.

पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकात उड्डाणपूल, सेवा रस्ता उभारण्यात येत असून, सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रकल्प संचालक संजय कदम यांनी यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांना दिली.

पुणेकरांसाठी चांदणी चौक हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे त्याचे उर्वरित काम जलदगतीने पूर्ण करावे. त्यासोबतच , कामात कोणतीही त्रुटी राहू नये, याची खबरदारी घ्यावी. पावसाची शक्यता लक्षात घेऊन, उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पेपर रिचेकिंग चे निकाल त्वरित द्या..अन्यथा…

पुणे:आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अंतर्गत झालेल्या परीक्षांचे रीचेकिंगचे निकालाला विलंब झाला असून ते त्वरित जाहीर करावेत अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनाखालीराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने डॅा. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (D.BATU) चे विभागीय केंद्र समन्वयक यांना यासंदर्भात लेखी निवेदन देण्यात आले.

विद्यापीठ अंतर्गत घेतल्या गेलेल्या परिक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले होते सदर निकाला मध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी तसेच विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे दिसुन आले असता विद्यार्थ्यांनी रीचेकिंग, Revaluation चे अर्ज (D.BATU ) कडे सादर केले असून सदरची प्रक्रिया व अंतिम निकाल अजून जाहीर करण्यात आले नव्हते. विद्यार्थ्यांनी अनुत्तीर्ण विषयाची पुनः परिक्षा (4th Semester) देखील दिली होती. तरी देखील रीचेकिंग, Revaluation चे निकाल अजून जाहीर झाले नाही.
या संदर्भात डॅा. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ ( D. BATU ) चे विभागीय केंद्र समन्वयक यांच्या कडे निवेदना द्वारे विनंती केली की निकाल त्वरीत जाहीर करावा व विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासातून सुटका करावी व सदर मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी शुभम अंकुश माताळे,श्रीकांत बालघरे, ऋषिकेश कडू, जयजगदिश कोंढाळकर, रोहन जोशी आदि पदाधिकारी उपस्थित होते.

डिजिटल इंडिया सप्ताह २५ जुलैपासून नागरिकांना मिळणार केंद्रीय योजनांची माहिती

पुणे दि. १४: भारत सरकारतर्फे २५ ते ३१ जुलै दरम्यान ‘डिजिटल इंडिया’ सप्ताह साजरा
करण्यात येणार असून र्व नागरिकांना ई-गव्हर्नन्स सेवांबद्दल माहिती देण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचा अधिक
वापर व्हावा यासाठी हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी नोंदणी केल्यास
नागरिकांना विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेता येईल.

भारताचे तंत्रज्ञान क्षेत्रातील काम जगासमोर आणणे, टेक स्टार्टअप साठी सहयोग व व्यवसायाच्या
नवीन संधी शोधणे, नवीन पिढीला प्रेरणा देणे, नागरिकांना ई-गव्हर्नन्स सेवांची माहिती देणे
आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे यासाठी या सप्ताहाचे आयोजन होत आहे. याअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यात सहभागी होण्यासाठी http://www.nic.in/diw2023-reg ह्या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

माहिती तंत्रज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांनाही या क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान विषयांवरील
व्याख्याने व चर्चा यामध्ये सहभागी होण्याची विनामूल्य संधी याद्वारे उपलब्ध होईल. अधिकाधिक नागरिकांनी नोंदणी करून ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद
बोरोले यांनी केले आहे.

४ हजार २७७ खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसवर कारवाई; १ कोटी ८३ लक्ष रुपयांची दंड वसुली

मुंबई, दि. 14 : राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांतील ‘वायुवेग’ पथकांमार्फत 14 हजार 161 खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 4 हजार 277 खाजगी बसेस नियम मोडत असल्याचे निदर्शनास आल्याने या बसेसना तपासणी प्रतिवेदने जारी करुन प्रकरणे नोंदवित कारवाई करण्यात आली आहे. विविध कार्यालयांमार्फत 1 कोटी 83 लक्ष तडजोड शुल्काचा दंड वसूल करण्यात आला आहे.

तपासणी दरम्यान रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादी गुन्ह्यांसाठी सर्वात जास्त 1702 बसेस वर कारवाई करण्यात आली. विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणाऱ्या 890 बसेसवर; योग्यता प्रमाणपत्र वैध नसलेली 570 खाजगी बसेसवर, तर 514 बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे आढळून आले असून त्यावर कारवाई करण्यात आली.

शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची व इतर गुन्ह्यांबाबत तपासणी करण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी  16 मे  ते 30 जून 2023 दरम्यान विशेष मोहीम राबविली. सदर तपासणी माहिमेमध्ये बसेसची तपासणी करताना विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र वैध नसणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादींमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर भरल्याची खात्री करणे, जादा भाडे आकरणे, अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे, आपत्कालीन परिस्थितीत निर्गमन दर आणि इतर दरवाजे कार्यरत स्थितीत आहेत काय आदी बाबींची राज्यभर व्यापक तपासणी करण्यात आली. त्यानंतर उक्त नमूद विविध गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या बसेसवर कारवाई करण्यात आली.

विविध गुन्ह्यांसाठी कारवाई

मोटार वाहन कर न भरणाऱ्या 485 बसेस, आपत्कालीन दरवाजा कार्यरत स्थितीत नसणाऱ्या 293 बसेस,  अवैधरित्या व्यवसायिक पद्धतीने माल वाहतूक करणाऱ्या 227 बसेस,  आसन क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतुक करणाऱ्या 147 बसेस, वेग नियंत्रक बसविणे व ते कार्यरत असणे आवश्यक असतांना वेग नियंत्रक नसणारी 72 बसेस, जादा भाडे आकारणी  करणाऱ्या 40 बसेस व इतर गुन्ह्यांमध्येसुद्धा विशेष तपासणी मोहिमेच्या कालावधीत खाजगी बसेसवर परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा या दृष्टीकोनातून सदर व्यापक मोहीम राबविण्यात आली.

राज्यात शिक्षक भरतीचा जीआर आजच; दोन टप्पात 50 हजार शिक्षक भरती होणार, दीपक केसरकरांची मोठी घोषणा

मुंबई-राज्यात शिक्षण भरतीचा आजच जीआर काढणार असून पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. तर राज्यात एकूण 50 हजार शिक्षकांची भरती होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिल्याने शिक्षक भरतीचे काम रखडले होते, असे मंत्री दीपक केसकरांनी सांगितले आहे.दरम्यान दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले की, आगामी नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षकांची भरती करण्याचा आमचा मानस आहे. यात पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. त्यासाठी जीआर काढण्याची प्रक्रियाही आजच केली जाईल. शंभर टक्के शिक्षक भरती करण्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पद भरती होईल. अशा उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची भरती करण्यात येईल.

दीपक केसरकर म्हणाले की, रिटायर होणाऱ्या शिक्षकांकडून काम करून घेतले जाणार आहे. जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळा शिक्षक भरती होणार असल्याचे ते म्हणाले. शिक्षणाचा दर्जा खालावल्याचे ट्विट शरद पवार यांनी केले होते. याची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असेही यावेळी केसरकर म्हणाले. 70 वर्षाच्या इतिहासात आम्ही एवढे मोठे निर्णय घेतले. त्यामुळे शिक्षण दर्जा वाढवला असल्याचेही ते म्हणाले. शरद पवार यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांना माहिती दिली जाईल.

दीपक केसरकर म्हणाले की, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आम्ही शिक्षकांच्या बदलीसंदर्भात सविस्तर चर्चा करु. तसेच, शिक्षक एकाच ठिकाणी स्थिर होण्यासाठी माध्यमिक शिक्षकांप्रमाणेच प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यादेखील रद्द करता येतील का, याबाबत महाजन यांच्यासोबत चर्चा करण्याच आश्वासन त्यांनी दिले. प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असे नाही, मात्र जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल का, यासाठी प्रयत्न करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवशंकरांच्या पुष्पप्रतिकृतीमध्ये मंडईतील म्हसोबाराया विराजमान 

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव ; धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ
पुणे : मंडईतील म्हसोबा मंदिरात विविधरंगी फुलांनी साकारलेल्या २५ फूट उंचीच्या शिवशंकरांच्या आकर्षक पुष्पसजावटीमध्ये म्हसोबाराया विराजमान झाले आहेत. प्रारंभी श्रीं चा रुद्राभिषेक व होमहवन, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवाला थाटात प्रारंभ झाला. मंडई म्हसोबा मंदिराच्या परिसरात पुष्पसजावटीसोबतच विविधरंगी विद्युतरोषणाई देखील करण्यात आली असून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी पुरंदरमधील श्री क्षेत्र वीर श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानचे विश्वस्त सचिव अभिजीत धुमाळ व प्रतिभा धुमाळ  यांच्या श्रीं चा रुद्राभिषेक व होमहवन पार पडले. तर, दुपारी भिंताडे उद्योग समूहाच्या शालन भिंताडे, पृथ्वीराज भिंताडे यांच्या हस्ते श्रीं ची महाआरती झाला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले यांनी पुष्पसजावट केली. दीपक जोशी गुरुजी यांसह ६ ब्रह्मवृंदांनी पौरोहित्य केले. 
मंदिर परिसरात साकारण्यात आलेल्या २५ फूट उंचीच्या भगवान शिवशंकरांच्या पुष्पप्रतिकृतीसोबतच अग्रभागी २ नंदी आणि २ त्रिशुळाच्या पुष्पप्रतिकृती देखील साकारण्यात आल्या आहेत. याकरिता सुमारे ६० बंडल पर्पल आॅर्किड, ८० किलो शेवंती, ६० किलो झेंडू, १०० बंडल गुलाब यांसह अनेक फुले वापरण्यात आली आहेत. सुभाष सरपाले यांच्या मार्गदर्शनाखाली १५ कारागिरांनी ३ दिवस व १ रात्र या कालावधीत ही आरास साकारली आहे. 
धार्मिक उत्सवासोबतच विधायक उपक्रम हे उत्सवाचे वैशिष्टय असणार आहे. त्यामध्ये तृतीयपंथीयांना आर्थिक मदत, गरजू विद्यार्थ्यांना फुलस्केप वह्या प्रदान करण्याचा उपक्रम, विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत देण्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. तसेच, दीप अमावस्येनिमित्त दीप पूजन व दीपोत्सव करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने होणार आहे. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे या ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन हा उत्सव भाविकांना पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.  

वीज बिलातील सवलतींचा लाभ घ्या,महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे ग्राहकांना आवाहन

 मुंबई, दिनांक १४ जुलै २०२३: महावितरणच्या ग्राहकांनी तत्पर बिल भरणा, ऑनलाईन पेमेंट व गो ग्रीनच्या सुविधेमुळे वीजबिलात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.

 उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार अधिकाधिक ग्राहकांना वीज बिलातील सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे.

वीज ग्राहकांनी मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना प्रॉम्प्ट पेमेंटसाठी अर्थात तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते. हे बिल भीम ॲप, गुगल पे, पेटीएम किंवा बँकेच्या ॲपवरून किंवा महावितरणच्या वेबसाईटवरून असे ऑनलाईन पद्धतीने भरले तर पाव टक्का सवलत मिळते. याखेरीज ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ईमेलने बिल स्वीकारण्याचा गो ग्रीनचा पर्यावरण पूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते.

शंभर युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाने तत्पर भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो ग्रीन या तिन्हीचा वापर केला तर दरमहा किमान वीस रुपयांची म्हणजे वर्षाला २४० रुपयांची सूट मिळते. दोनशे युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाने या तीनही उपायांचा अवलंब केला तर दरमहा ३५ रुपये म्हणजे वर्षाला ४२० रुपयांची सवलत मिळते. महिना तीनशे युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाला तत्पर भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो ग्रीन या तिन्हीचा वापर करून दरमहा ५१ रुपयांची म्हणजेच वर्षाला ६१२ रुपयांची सवलत मिळू शकते.

विजेची बिले ऑनलाईन भरणे आणि ती दिलेल्या मुदतीच्या आधी भरणे हे वीज ग्राहकांना सहज शक्य आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचतात आणि बिलातही सवलत मिळते. त्यासोबत महावितरणच्या वेबसाईटवरून अथवा ॲपवरून एकदा गो ग्रीनसाठी नोंदणी केली तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळत राहते. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांनी या सवलतींचा लाभ घ्यावा.

अजित पवार कागदपत्रात फेरफार करू शकतात, लवासा प्रकरणाची याचिका लवकर निकाली काढण्याची मागणी

पुणे-शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबियांच्या अडचणीत वाढ करणाऱ्या लवासा प्रकरणी लवकर सुनावणी घेण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने ते पुण्यातील लवासा प्रकरणात फेरफार करू शकत असल्याचे यात म्हटले आहे. लवासा प्रकरणाची सुनावणी तातडीनं घेण्याची विनंती कोर्टानं मान्य केली आहे. लवासा प्रकरणी पुढची सुनावणी 21 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने ते लवासा प्रकरणातील कागदपत्रात फेरफार करू शकतात त्यामुळे लवकरात लवकर या प्रकरणाची सुनावणी घेण्याची विनंती याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी केली होती.

अजित पवार उपमुख्यमंत्री झल्याने राज्यातील राजकारण बदलले आहे. त्याच प्रमाणे लवासा प्रकरणानेही नवे वळण घेतले आहे. अजित पवार हे लवासा प्रकरणातील कागदपत्रात फेरफार करू शकतात, फायलींना आगही लागू शकते, तपास प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकतात, त्यामुळे तत्काळ सुनावणी घ्या. अशी विनंती याचिकाकर्तांनी न्यायालयाला केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य करून 21 जुलैला पुढील सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या समोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षभरात यात सुनावणीच झाली नाही. आता तत्काळ सुनावणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मुळे मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अजित पवार यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. अजित पवार पोलिसांवर दबाव वाढवण्याची शक्यता या याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.

याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी सांगितले की, कॅग आणि लोकायुक्तांनी लवासाप्रकरणी दिलेल्या अहवालाकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले असून लोकायुक्तांनी दाखल केलेल्या अहवालानुसार या प्रकल्पामुळे सरकारी तिजोरीला पाच ते दहा हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा केला होता. या प्रकरणी 2018 मध्ये पुणे पोलिस आयुक्तांकडे केलेली तक्रार आयुक्तांनी पौड पोलिस ठाण्याकडे पाठवली. मात्र पौड पोलिसांनी पुन्हा ही तक्रार पोलिस आयुक्तांकडे पाठवली.

साल 2019 मध्ये पोलिस आयुक्तांनी ही तक्रार पुणे ग्रामीण पोलिस उपायुक्तांकडे वर्ग केली होती. मात्र या तक्रारीवर पौड पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाल्यामुळे मे 2022 मध्ये पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांकडे याबाबत तक्रार केली. मात्र, त्यावरही काहीही कारवाई न झाल्याने शेवटी आपण ही जनहित याचिका दाखल केल्याचे याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी याचिकेत नमूद केलेलं आहे.

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांचे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक बनविण्यात येणार- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. १४: क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथे समाजाला प्रेरणादायी आणि भव्य असे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या सूचना विचारात घेऊन तातडीने आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीस आमदार सुनील कांबळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, समाजकल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी या स्मारकाच्या अनुषंगाने कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. हे स्मारक लवकरात लवकर उभे रहावे अशी शासनाची भूमिका आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, त्यासाठी स्मारकात समाविष्ट करावयाचे संग्रहालय, त्यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन, शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था आदी तपशीलाबाबत समितीने चर्चा करुन निर्णय घ्यावा. स्मारकाचा आराखडा समितीच्या सूचनेनुसार तयार करण्यात यावा. स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे श्री. पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी या स्मारक, संग्रहालयासाठी सुमारे साडेपाच एकर जागा संपादित केली असून ती पूर्णता महापालिकेच्या ताब्यात असल्याचे सांगितले. जमीन संपादनासाठी सुमारे १०१ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित वास्तूविशारदांनी स्मारकाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे सादरीकरण केले. त्यावर मंत्रीमहोदय तसेच समिती सदस्यांनी काही सूचना दिल्या.

राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन योजनेच्या लाभार्थींना आवाहन

मुंबई दि. १४ : राज्यातील राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या काही जुन्या लाभार्थींची परिपूर्ण माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी लाभार्थींनी आपले आधार कार्ड, भ्रमणध्वनी क्रमांक, हयातीचा दाखला व मानधन जमा होत असलेल्या बँक खात्याच्या पासबुकच्या छायांकित प्रती तालुक्याच्या ठिकाणी गटविकास अधिकारी, पंचायत समिती या ठिकाणी जाऊन जमा कराव्यात, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगरमधील लाभार्थींनी आपली माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालय जुने सचिवालय, पहिला मजला, विस्तार भवन, मुंबई -32 या ठिकाणी द्यावी किंवा dcamandhan@gmail.com या ईमेलवर पाठवावी, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

वित्त व नियोजन विभागाची जबाबदारी,अजित पवार यांच्याकडून कामकाजाला सुरुवात

वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन घेतला कामकाजाचा आढावा

मुंबई, दि.14:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे तत्पूर्वी सकाळी त्यांनी दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन वित्त व नियोजन विभागाच्या सद्यस्थितीची माहिती तसेच कामकाजाचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनातून कामकाजाला सुरुवात केली. सकाळी लवकर मंत्रालयात आलेल्या अजित पवार यांनी वित्त व नियोजन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते अभ्यागत नागरिकांना भेटले.

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे कार्यालय मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील 503 क्रमांकाचे दालनात असून या दालनातूनच ते आपल्या विभागांचे तसेच उपमुख्यमंत्रीपदाचे कामकाज पाहणार आहेत.

अजित पवारांकडे अर्थ, धनंजय मुंडेंकडे कृषी, तर मुश्रीफांना ‘वैद्यकीय शिक्षणा’चे मानाचे पान

भाजप,एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीच्या सरकारचे बहुचर्चित खातेवाटप अखेर शुक्रवारी जाहीर झाले. त्यानुसार अजित पवार यांनी अपेक्षेप्रमाणे अर्थखाते पटकावले. तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपण्यात आली. ईडीच्या कारवाईमुळे चर्चेत राहिलेले हसन मुश्रीफ यांच्या गळ्यात वैद्यकीय शिक्षण खात्याची माळ पडली आहे.

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेचे मातब्बर मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडचे कृषी खाती धनंजय मुंडे यांना देण्यात आले. आता सत्तारांकडे अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन खाते सोपण्यात आले आहे. तर संजय राठोड यांच्याकडील अन्न व औषध प्रशासन विभाग हे खाते राष्ट्रवादीच्या धर्मरावबाबा आत्राम यांना मिळाले. त्यामुळे राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण हे कमी महत्त्वाचे खाते आले आहे.

छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालय, तर दिलीप वळसे पाटील यांना सहकार खाते देण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, पशू संवर्धन खाते देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या जबाबदारी देण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते कायम ठेवण्यात आले आहे.

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

पहा महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ

1) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – 
सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग.
2) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार.
3) उपमुख्यमंत्री अजित पवार – अर्थ व नियोजन

भाजपचे मंत्री

  1. राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
  2. सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  3. चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  4. गिरीश महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
  5. रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
  6. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
  7. अतुल सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
  8. मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
  9. सुरेशभाऊ खाडे- कामगार

शिंदे गट शिवसेनेचे मंत्री

  1. गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
  2. दादाजी भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
  3. संजय राठोड- मृद व जलसंधारण
  4. संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  5. उदय सामंत- उद्योग
  6. प्रा. तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  7. अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
  8. दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
  9. शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’चे मंत्री

  1. अजित पवार – उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री
  2. धनंजय मुंडे – कृषी
  3. छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  4. दिलीप वळसे-पाटील – सहकार
  5. हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
  6. अदिती तटकरे – महिला व बालविकास
  7. अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन
  8. संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
  9. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन

आनंद सगळ्यांकडे मात्र तो भोगण्याची कुवत नाही- ह.भ.प.चिन्मय महाराज सातारकर

पुणे : जीवनाच्या परिपूर्णत्वाचे दर्शन ज्यांच्या चरित्रातून घडले, ते जगद्गुरु तुकाराम महाराज. पूर्ण असणे आणि परिपूर्ण असणे वेगळे आहे. परिपूर्णतेमध्ये संपूर्ण आनंद भोगण्याची प्रक्रिया सुरु होते. हल्ली जीवन असे आहे की आनंद सगळ्यांकडे आहे, परंतु आनंद भोगण्याची कुवत कोणाकडे उरलेली नाही, असे ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर यांनी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महोत्सवात प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले. तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ ट्रस्टतर्फे हा कार्यक्रम सुरु आहे. प्रवचनमालेत धाराशिव येथील संत गोरोबाकाका मंदिराचे ह.भ.प.पद्मनाभ महाराज व्यास, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे, सुतारवाडीचे ह.भ.प. राजेंद्र महाराज दहिभाते, श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील भाषाप्रभू ह.भ.प.डॉ.पंकज महाराज गावडे, पुण्याचे ह.भ.प. अभय महाराज टिळक, मुंबईचे ह.भ.प.चिन्मय महाराज सातारकर, ह.भ.प.भगवतीताई सातारकर यांचे प्रवचन झाले.

चिन्मय महाराज सातारकर म्हणाले, पूर्णत्वामध्ये कुठेतरी अभिमान आहे. दुस-याला दाखविणे आहे. मात्र, परिपूर्णतेमध्ये जगाला दाखविण्याची गरज नाही. ज्या स्थितीत आहे, त्याच स्थितीत परिपूर्ण. ताठ राहण्याकरिता, जगाला दाखविण्याकरिता आणि वाकण्यामध्ये जीवनाची सांगता होते.

ते पुढे म्हणाले, कर्माने, कृतीने, पैशाने, सत्तेने कितीही मोठा असो, जो वाकायला शिकला नाही. तो सगळे असून काहीतरी कमी असतो. परिपूर्णता ती, ज्यामध्ये मागायची गरज नाही. जीवनात पैसा कितीही कमविला, तरी सवय तशीच की आता अजून कुठून कमवू शकतो. तुकाराम महाराजांकडे काहीच नाही, परंतु अंत:करणाची परिपूर्णता आहे. तुकाराम महाराज परिपूर्ण म्हणूनच जन्माला आले, म्हणूनच ते कळस आहेत.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, गणेश कला क्रीडा मंच येथे दिनांक १९ जुलै पर्यंत दररोज सायंकाळी ५.३० ते ८ यावेळेत चातुर्मासामिनित्त कीर्तन महोत्सव असून त्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहेत. कीर्तन महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.