मुंबई-राज्यात शिक्षण भरतीचा आजच जीआर काढणार असून पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. तर राज्यात एकूण 50 हजार शिक्षकांची भरती होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिल्याने शिक्षक भरतीचे काम रखडले होते, असे मंत्री दीपक केसकरांनी सांगितले आहे.दरम्यान दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले की, आगामी नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षकांची भरती करण्याचा आमचा मानस आहे. यात पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. त्यासाठी जीआर काढण्याची प्रक्रियाही आजच केली जाईल. शंभर टक्के शिक्षक भरती करण्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पद भरती होईल. अशा उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची भरती करण्यात येईल.
दीपक केसरकर म्हणाले की, रिटायर होणाऱ्या शिक्षकांकडून काम करून घेतले जाणार आहे. जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळा शिक्षक भरती होणार असल्याचे ते म्हणाले. शिक्षणाचा दर्जा खालावल्याचे ट्विट शरद पवार यांनी केले होते. याची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असेही यावेळी केसरकर म्हणाले. 70 वर्षाच्या इतिहासात आम्ही एवढे मोठे निर्णय घेतले. त्यामुळे शिक्षण दर्जा वाढवला असल्याचेही ते म्हणाले. शरद पवार यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांना माहिती दिली जाईल.
दीपक केसरकर म्हणाले की, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आम्ही शिक्षकांच्या बदलीसंदर्भात सविस्तर चर्चा करु. तसेच, शिक्षक एकाच ठिकाणी स्थिर होण्यासाठी माध्यमिक शिक्षकांप्रमाणेच प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यादेखील रद्द करता येतील का, याबाबत महाजन यांच्यासोबत चर्चा करण्याच आश्वासन त्यांनी दिले. प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असे नाही, मात्र जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल का, यासाठी प्रयत्न करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले.