पुणे : जीवनाच्या परिपूर्णत्वाचे दर्शन ज्यांच्या चरित्रातून घडले, ते जगद्गुरु तुकाराम महाराज. पूर्ण असणे आणि परिपूर्ण असणे वेगळे आहे. परिपूर्णतेमध्ये संपूर्ण आनंद भोगण्याची प्रक्रिया सुरु होते. हल्ली जीवन असे आहे की आनंद सगळ्यांकडे आहे, परंतु आनंद भोगण्याची कुवत कोणाकडे उरलेली नाही, असे ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर यांनी सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महोत्सवात प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले. तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ ट्रस्टतर्फे हा कार्यक्रम सुरु आहे. प्रवचनमालेत धाराशिव येथील संत गोरोबाकाका मंदिराचे ह.भ.प.पद्मनाभ महाराज व्यास, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे, सुतारवाडीचे ह.भ.प. राजेंद्र महाराज दहिभाते, श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील भाषाप्रभू ह.भ.प.डॉ.पंकज महाराज गावडे, पुण्याचे ह.भ.प. अभय महाराज टिळक, मुंबईचे ह.भ.प.चिन्मय महाराज सातारकर, ह.भ.प.भगवतीताई सातारकर यांचे प्रवचन झाले.
चिन्मय महाराज सातारकर म्हणाले, पूर्णत्वामध्ये कुठेतरी अभिमान आहे. दुस-याला दाखविणे आहे. मात्र, परिपूर्णतेमध्ये जगाला दाखविण्याची गरज नाही. ज्या स्थितीत आहे, त्याच स्थितीत परिपूर्ण. ताठ राहण्याकरिता, जगाला दाखविण्याकरिता आणि वाकण्यामध्ये जीवनाची सांगता होते.
ते पुढे म्हणाले, कर्माने, कृतीने, पैशाने, सत्तेने कितीही मोठा असो, जो वाकायला शिकला नाही. तो सगळे असून काहीतरी कमी असतो. परिपूर्णता ती, ज्यामध्ये मागायची गरज नाही. जीवनात पैसा कितीही कमविला, तरी सवय तशीच की आता अजून कुठून कमवू शकतो. तुकाराम महाराजांकडे काहीच नाही, परंतु अंत:करणाची परिपूर्णता आहे. तुकाराम महाराज परिपूर्ण म्हणूनच जन्माला आले, म्हणूनच ते कळस आहेत.
ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, गणेश कला क्रीडा मंच येथे दिनांक १९ जुलै पर्यंत दररोज सायंकाळी ५.३० ते ८ यावेळेत चातुर्मासामिनित्त कीर्तन महोत्सव असून त्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहेत. कीर्तन महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.