Home Blog Page 1417

मोदींच्या स्वागताचे होर्डींग्ज लावण्यासाठी दादागिरी,अतिक्रमण -काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचा आरोप ..

मेट्रो-उदघाटने करतांना, “मेट्रो स्टेशन्स पार्किंग सुविधांची” मोदीं नी दखल घ्यावी..!

पुणे – जाहिरातदार संस्थांच्या फलकांवरील ‘विविध ऊत्पादकांच्या जाहीरातींचे करारनामे चालु असतांना, अरेरावीने, होर्डिंग्ज व्यवसाईकांना न विचारता होर्डिंग्जच्या लॅाक सिस्टीम मधील लोखंडी कापून मोदींच्या स्वागताचे फ्लेक्स लावले गेले. मनपा प्रशासनातील अधिकारी व सेवकांच्या माध्यमातून मोदींच्या स्वागताचे अतिरेकी फ्लेक्स दादागिरीच्या पद्धतीने ,अतिक्रमणे करून लावल्याचा आरोप काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.

पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलेल्या “१०० स्मार्ट सिटी प्रकल्पातील ‘पुणे शहराचा’ व मेट्रोचे उदघाटन केलेल्या ‘मेट्रो स्टेशन्स च्या पार्किंग सुविधांचा’ मागोवा व माहीती पंतप्रधान मोदी जींनी घेण्याची मागणी ही तिवारी यांनी येथे केली. मेट्रो स्टेशन्स जवळ “खाजगी वाहनांच्या पार्किंग ची किमान सोय ही नसेल” तर मेट्रोचा वापर पुणेकर नागरीक कसा करणार असा सवाल देखील केला. शहरातील वहातुक कोंडी व प्रदुषण कमी करण्यासाठी दिल्ली प्रमाणे मेट्रो सेवेचा वापर जर लोकांनी जास्तीत जास्त करावा असे वाटत असेल तर त्या प्रमाणात मेट्रो_स्टेशन्स जवळ ‘किमान पार्किंगची सुविधा’ मात्र करण्यात आली नाही हे अदुरदर्शीपणा नियोजन शुन्यतेचेच हे लक्षण असल्याची टिका त्यांनी केली.
तसेच,भाजपचे सत्ताधारी नेते दबावतंत्राचा वापर करीत,मनपा आयुक्त व प्रशासनावर दबाव आणून, मनपा कडून जाहिरातदार संस्थांच्या फलकांवरील ‘विविध ऊत्पादकांच्या जाहीरातींचे करारनामे चालु असतांना, अरेरावीने, होर्डिंग्ज व्यवसाईकांना नविचारता होर्डिंग्जच्या लॅाक सिस्टीम मधील लोखंडी कापून मोदींच्या स्वागताचे फ्लेक्स लावले गेले. मनपा प्रशासनातील अधिकारी व सेवकांच्या माध्यमातून मोदींच्या स्वागताचे अतिरेकी फ्लेक्स लावल्याचा आरोप तिवारी यांनी केला, ते म्हणाले ,
होर्डिंग्ज व्यवसाईकांवर अरेरावीने, दडपशाहीने, मनपा – अघिकाऱ्यांच्या दमबाजीने या जाहीराती लावल्याचे समजते आहे. होर्डिंग्ज व्यवसाईक संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांमध्ये या नुकसानी विषयी तीव्र चिंता व नाराजी व्यक्त केली गेली.
“मोदी स्वागताची अतिरेकी आतषबाजी” करून, करोडोंच्या पैशांची ऊधळपट्टी करण्याचे व पुणे शहर विद्रुप करण्याचे काम भाजपने केले असल्याचा आरोप ही त्यांनी केला .

सिनेमॅटोग्राफ कायद्यात 40 वर्षानंतर सुधारणा करत संसदेने हे ऐतिहासिक विधेयक मंजूर केले

नवी दिल्‍ली-

सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक, 2023 ला लोकसभेने मंजुरी दिल्याने या विधेयकाला  संसदेत मंजूरी मिळाली आहे. 20 जुलै 2023 रोजी राज्यसभेमध्ये हे विधेयक मांडण्यात आले होते आणि त्यावर चर्चा झाल्यानंतर 27 जुलै 2023 रोजी ते मंजूर करण्यात आले. वर्ष 1984 मध्ये म्हणजे 40 वर्षांपूर्वी सिनेमॅटोग्राफ कायदा 1952 मध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता या कायद्यात आणखी सुधारणा घडवत संसदेने हे ऐतिहासिक विधेयक मंजूर केले आहे. विशिष्ट अंदाजांच्या आधारे असे आढळून  आले आहे की पायरसी,  चित्रपट उद्योगाच्या 20,000 कोटींच्या नुकसानीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे पायरसीला व्यापक प्रमाणात आळा घालण्याच्या उद्देशाने हे सुधारित विधेयक मांडण्यात आले होते. किमान 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि 3 लाख रुपयांचा दंड अशी  कडक शिक्षा देण्यात आली असून ही शिक्षा 3 वर्षांचा तुरुंगवास आणि लेखापरीक्षणानुसार चित्रपट निर्मिती खर्चाच्या 5% रकमेइतका दंड अशी वाढवता येण्याची तरतूद यामध्ये आहे.

लोकसभेत सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक, 2023 चर्चा आणि मंजुरीसाठी सादर करण्यात आले तेव्हा या विधेयकाबद्दल बोलताना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, “भारत हा आपली समृद्ध संस्कृती, वारसा, वडिलोपार्जित परंपरा आणि वैविध्य यांचे दर्शन घडविणाऱ्या कथा सांगणाऱ्यांचा देश आहे. येत्या 3 वर्षांत आपला चित्रपट उद्योग 100 अब्ज डॉलर्सपर्यंत भरारी घेणार असून त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही पायरसीशी लढण्यासाठी आणि चित्रपट उद्योगाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी हे विधेयक आणले आहे.या सुधारणा चित्रपट उद्योगाचे 20,000 कोटी रुपयांचे नुकसान करणाऱ्या पायरसीच्या त्रासाला व्यापक प्रमाणात आळा घालण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.”

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “चित्रपटाच्या परवान्याचे नूतनीकरण दर 10 वर्षांनी केले जाण्याची अट सरकारने काढून टाकली असून आता हा परवाना आजीवन वैध करण्यात आला आहे. आता परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या घालण्याची गरज उरलेली नाही. के.एम.शंकराप्पा विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यात देण्यात आलेल्या निर्णयाला अनुसरत  सरकारने रिव्हिजन अधिकारापासून स्वतःला दूर ठेवत या बाबतीत संपूर्ण लक्ष देण्याचे अधिकार आता सीबीएफसी स्वायत्त संस्थेला देण्यात आले आहेत.”

सिनेमॅटोग्राफ कायद्यातील सुधारणा:

पहिली सुधारणा म्हणजे हे विधेयक चित्रपटांचे बेकायदेशीर रेकॉर्डिंग आणि प्रदर्शन करण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करते तसेच इंटरनेटवर या चित्रपटांचे बेकायदेशीरपणे प्रेषण करून पायरसी करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी देखील उपाययोजना करते

दुसरी सुधारणा म्हणजे हे विधेयक चित्रपटाच्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी  केंद्रीय चित्रपट प्रमाणन महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करते तसेच चित्रपटांच्या प्रमाणीकरणाच्या वर्गीकरणात सुधारणा घडवून आणते.

तिसरी सुधारणा म्हणजे हे विधेयक सिनेमॅटोग्राफ कायद्याला विद्यमान कार्यकारी आदेश, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि इतर संबंधित कायद्यांशी सुसंगत करण्याचा प्रयत्न करते.

  1. चित्रपटांचे अनधिकृत रेकॉर्डिंग आणि पायरसी केलेले   चित्रपट दाखवण्याला आळा घालण्यासाठीच्या तरतुदी: चित्रपटगृहांमध्ये कॅम-कॉर्डिंगद्वारे पायरसी रोखणे; आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही चित्रपटाच्या पायरेटेड कॉपी, अनधिकृत कॉपी तसेच या कॉपीचे ऑनलाइन प्रसारण आणि प्रदर्शन रोखण्यासाठी कठोर दंडात्मक तरतुदी समाविष्ट केल्या आहेत.
  2. वय-आधारित प्रमाणन: विद्यमान UA श्रेणीच्या तीन वयोगटांवर आधारित श्रेणींमध्ये उप-विभाजन करून प्रमाणीकरणाच्या वय-आधारित श्रेणींचा परिचय, उदा. सात वर्षे (UA 7+), तेरा वर्षे (UA 13+), आणि बारा वर्षाऐवजी  सोळा वर्षे (UA 16+). हे वय-आधारित मार्कर ही  केवळ शिफारस असेल. याचा अर्थ पालक किंवा पालकांनी त्यांच्या मुलांनी असा चित्रपट पाहावा की नाही याचा विचार करावा.
  3. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांशी संलग्नता: के.एम. शंकरप्पा विरुद्ध केंद्र सरकार (2000) प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार केंद्र सरकारचे रीव्हीजनल  अधिकार वगळणे.
  4. प्रमाणपत्रांची शाश्वत वैधता: सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) च्या प्रमाणपत्रांच्या शाश्वत वैधतेसाठी केवळ 10 वर्षांसाठी प्रमाणपत्र वैधता कायद्यातील निर्बंध हटवणे.
  5. दूरचित्रवाणीसाठी चित्रपटाच्या श्रेणीत बदल: टीव्ही प्रसारणासाठी संपादित चित्रपटाचे पुन:प्रमाणीकरण, कारण केवळ प्रतिबंध नसलेले सार्वजनिक प्रदर्शन श्रेणीतील चित्रपट दूरचित्रवाणीवर दाखवले जाऊ शकतात.
  6. जम्मू आणि काश्मीरचा संदर्भ: जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, 2019 च्या अनुषंगाने पूर्वीच्या जम्मू आणि काश्मीर राज्याचा संदर्भ वगळणे.

भारतीय चित्रपट उद्योग हा जगातील सर्वात मोठा आणि जागतिकीकरण झालेल्या उद्योगांपैकी एक आहे.  दरवर्षी 40 हून अधिक भाषांमध्ये 3,000 हून अधिक चित्रपटांची निर्मिती हा चित्रपट उद्योग करतो. चित्रपटाचे माध्यम, निगडीत साधने आणि तंत्रज्ञानात काळानुरूप महत्त्वाचे बदल झाले आहेत. इंटरनेट आणि समाज माध्यमांच्या आगमनामुळे पायरसीचा धोकाही अनेक पटींनी वाढला आहे. सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक, 2023 हे आज संसदेने मंजूर केले असून ते पायरसीच्या धोक्याला आळा घालण्यासाठी आणि व्यवसाय करण्याच्या सुलभतेसह भारतीय चित्रपट उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी खूप मदत करेल.

तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त-राज्यपाल रमेश बैस

पुणे: तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त असून तरुणांनी भागवत कथा कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि श्रीमद्भागवत कथेतील उपदेशाचे पालन करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

लोणावळा येथील नारायणी धाम येथे आयोजित श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमात राज्यपाल श्री. बैस सहभागी झाले होते त्यावेळी ते बोलत होते. प.पू.स्वामी गिरीशानंद सरस्वती महाराज यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, मानव जीवन अनमोल आहे. भागवत कथेमुळे मानवी मनाचे शुद्धीकरण होऊन शांती आणि मुक्ती मिळते. सत्संगामुळे विवेक मिळतो आणि प्राणीमात्रांचा लौकिक व आध्यात्मिक विकास होतो. श्रीमद्भागवत कथेतील उपदेशाचे पालन केल्यास आणि उद्देशपूर्ण जीवनपद्धतीचा अंगिकार केल्यास युवकांना संयमी आणि सक्षम व्यक्तिमत्व घडविता येईल.

श्री गिरीशानंद सरस्वती महाराजांनी नर्मदा शुद्धीकरणासाठी मोठे कार्य केले आहे, असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.

राज्यपाल महोदयांनी राजकीय आणि सामाजिक जीवनात समर्पण भावनेने कार्य केले असल्याचे गिरीशानंद सरस्वती महाराज म्हणाले. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची त्यांनी प्रशंसा केली आणि नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वागत केले.

विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता वाढविण्यासाठीविद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये पाथेय उपक्रम

पुणे : विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये नोकरी करताना कोणती व कशी तयारी करावी, नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये कशी विकसित करावीत, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी, तसेच त्यांच्यातील रोजगार क्षमता वाढवण्यासाठी विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये ‘पाथेय-प्लेसमेंट सेल ओरिएंटेशन प्रोग्राम : चुजींग युअर करिअर’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.

समितीच्या डॉ. आपटे वसतिगृहात झालेल्या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अभय सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रसंगी समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, समितीचे कार्यकर्ते राजेंद्र ततार, रोटरी क्लबचे उज्वल केले, विनीत जोशी, देविदास वाबळे, मिलिंद जोशी, शेखर आघारकर आदी उपस्थित होते.

अभय सावंत म्हणाले, प्रत्येक मनुष्य हा वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या स्वतःला व स्वतःमधील क्षमतांना ओळखावे. नोकऱ्या मोठ्या प्रमाणात आहेत; पण कंपनी उत्तम मुलांच्या शोधात असते. कंपनीच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावे लागतील. पदवी आपल्याला नोकरी देणार नाही; ते केवळ पाया भक्कम करण्याचे काम करते. इंग्रजी ही वैश्विक व औद्योगिक भाषा आहे. त्यामुळे ती अवगत करणे आणि स्वतःला सतत अपग्रेड (अद्ययावत) करत राहणे गरजेचे आहे. पाश्चिमात्य अर्थव्यवस्थे सोबत त्यांच्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यावर भर हवा.”

उज्वल केले सर यांनी ‘पाथेय’ या उपक्रमाची संकल्पना सांगितली. ‘पाथेय’ या शब्दाचा अर्थ ‘जो मार्गस्थ होतो’ असा असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रकांत कुलकर्णी यांनी विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन अंगारकी मांडे हिने केले. ओंकार शिंदे या विद्यार्थ्याने आभार मानले.

वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे,: वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना आणि थेट कर्ज योजनेचे पुणे जिल्ह्यासाठी चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी महामंडळाशी संपर्क साधावा.

२५ टक्के बीज भांडवल योजना: ही योजना राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या माध्यमातून राबविण्यात येते. योजनेसाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे. बँकांचा सहभाग ७५ टक्के असून व्याजदर बँकाच्या नियमाप्रमाणे लागू राहील. महामंडळाचा सहभाग २५ टक्के रकमेवर व्याजदर ४ टक्के आहे. या योजनेत महत्तम प्रकल्प मर्यादा ५ लाख रुपयेपर्यंतची आहे. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न शहरी भागाकरिता १ लाख रुपये तर ग्रामीण भागाकरिता ९८ हजार रुपयापर्यंत असावे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना: या योजनेमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत महत्त्म कर्ज मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत आहे. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष दरम्यान असावे, अर्जदाराचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य आहे. महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे अनिवार्य राहील. अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा. अर्जदाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. कुटुंबातील एकावेळी एकाच सदस्याला कर्ज योजनेचा लाभ घेता येईल. कर्जरकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादेत) व्याजपरतावा रक्कम अनुदान स्वरुपात लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.

गट कर्ज व्याज परतावा योजना: या योजनेकरिता कर्जाची मर्यादा १० लाख ते ५० लाख रुपयापर्यंत असून या योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता नोंदणीकृत गट असावा. गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावेत. गटातील सदस्याचे वय १८ ते ४५ वर्ष पर्यंत असावे. गटातील लाभार्थीचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. गटातील प्रमुख सदस्याने महामंडळाच्या महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे अनिवार्य राहील. गटातील सर्व लाभार्त्यांचे प्रमाणित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, नॉन क्रिमिलेअरकरिता असलेल्या कौटुंबिक उत्पन्न ८ लाखाच्या मर्यादेत असावे.

१ लाख रुपयांपर्यंत थेट कर्ज योजना: या योजनेमध्ये महामंडळाकडून १ लाख रूपयाचे थेट कर्ज दिले जाते. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्ष दरम्यान असावे. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न शहरी भागाकरिता १ लाख रुपये तर ग्रामीण भागाकरिता ९८ हजार रुपयापर्यंत असावे. लाभार्थ्यांचा सहभाग निरंक राहील. नियमित 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल २ हजार ८५ रुपये परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकीत हप्त्यांवर दर साल दर शेकडा ४ टक्के व्याजदर आकारण्यात येईल.

पुणे जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ‘बी’ विंग, तळमजला, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, येरवडा पुणे, दूरध्वनी क्रमांक ०२०- २९७०३०४९ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. आर. बडगुजर यांनी केले आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

या कार्यक्रमामार्फत तयार झालेल्या अभ्यासक्रमातून बांबूपासून शिल्प व वस्तू बनवण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना मिळेल तसेच अर्थार्जनासाठी या कौशल्याचा वापर कसा करावा याबाबतसुद्धा मार्गदर्शन मिळेल. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या आणि स्वयं रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन कार्यरत आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे सर्वांचेच प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या साहित्याचा वसा घेऊन आपण सर्वच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत आहोत. त्यांच्या जयंतीनिमित्त सुरु करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा. तरुणांना कौशल्य विकासाचे शिक्षण देऊन आपल्या राज्याचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह आणि राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी उपस्थित होते.

दिव्यांग कल्याण विभागातील १९१२ पदे भरण्यास मान्यता

मुंबई : दिव्यांग कल्याण  विभागांतर्गत सर्व प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यात एकूण ९३२ अनुदानित दिव्यांग शाळा / कार्यशाळा व अनाथ मतिमंद बालगृहे कार्यरत आहेत. या  विभागात शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील १,९१२ पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

शिक्षकीय १,१६७ तसेच शिक्षकेतर ५०८  ही पदे नियमित स्वरुपात आणि २३७ पदांना बाह्यस्त्रोताद्वारे अशा एकूण १९१२ पदांना भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. या मान्यतेच्या अनुषंगाने या उपक्रमांतील पदभरतीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देऊन या पदभरतीची कार्यवाही विभागामार्फत सुरु करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विभागाचा शासन निर्णय दि.२६ जुलै २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

दरड कोसळण्याच्या घटनांवर मुंबई आयआयटी उपाययोजना सुचविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

धोकादायक दरड पाडून संरक्षक जाळी बसविण्याचे निर्देश

मुंबई – गेल्या आठवड्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पुण्याकडे जाताना मुख्यमंत्र्यांनी घाटात थांबून या दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली.

या महामार्गावर ९ कि.मी. चे घाट क्षेत्र असून या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्यास आयआयटी मुंबईला सांगितले आहे आणि त्यांनी काम सुरू केले आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

दरड कोसळून दुर्घटना घडलेल्या ठिकाणच्या डोंगरावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संरक्षण जाळी लावली असून हा परिसर सुरक्षित केला आहे. कामशेत बोगद्याजवळ दुसऱ्या ठिकाणी कोसळलेल्या दरडीबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची देखील मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.

ज्या ठिकाणी   डोंगराचा भाग धोकादायक असेल तो भाग पाडून त्या ठिकाणी संरक्षक जाळी टाकून हा भाग सुरक्षित करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.

छत्रपतींच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्याची हिंमत येते कुठून ? वारंवार अशी मस्ती का होत आहे ? संजय मोरेंचे सवाल

पुणे-मेट्रो स्टेशनच्या नावावरून आक्षेप घेत , मागण्या करत आज शिवसेनेचे शहर अध्यक्ष संजय मोरे आणि शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांना धारेवर धरले . आणि यावेळी अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांचेसोबत याविषयावर सविस्तर चर्चा केली . दोन तीन दिवसात पुणे मनपा आयुक्त, महामेट्रोचे अधिकारी आणि शिवसेना शिष्टमंडळ एकत्र चर्चा करून चांगला मार्ग काढू असे खेमनार यांनी शिष्टमंडळाला सांगितले.यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महिला आघाडी शहरसंघटिका पल्लवी जावळे, कल्पना थोरवे, संगिता ठोसर, शहर संघटक विश्वास चव्हाण, राजेंद्र शिंदे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, आनंद गोयल, बाळा ओसवाल, विधानसभाप्रमुख योगेश मोकाटे, नितीन शिंदे, नितीन दरेकर, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, युवराज पारीख, वैभव दिघे, सुशांत पोकळे, सागर दळवी, संदिप नवले, रूपेश थोपटे उपस्थित होते.

मोरे यांनी यावेळी आयुक्ताना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,’ छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यनगरीत सोन्याचा नांगर फिरवून विकासाची नवी दिशा दिली. ती पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी व प्रशासनाने कधी आत्मसात करण्याचा साधा प्रयत्न केला नाही. परंतू अवहेलना मात्र आवर्जून केली. त्यात आणखी एक उदाहरण म्हणजे महामेट्रो स्थानकाला छत्रपतींचा एकेरी उल्लेख करून दिलेल्या नावाचा. पुणे शहरात छत्रपतींच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्याची हिंमत येते कुठून ? वारंवार अशी मस्ती का होत आहे ? महामेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्टदरम्यान असणाऱ्या स्थानकाला शिवाजीनगर मेट्रो हे नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा यातून एकेरी उल्लेख होत आहे. यावरून पुणेकर, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावण्याचा महामेट्रो, पुणे मनपा, राज्य व केंद्र सरकार यांचा उद्देश स्पष्टपणे दिसत आहे. आपण आयुक्त या नात्याने सदर स्थानकाच्या नावामधे बदल करण्याच्या त्वरीत हालचाली करून नावातील अपभ्रंश टाळावा. मेट्रो स्थानकाला छत्रपती असा उल्लेख केल्याशिवाय त्याठिकाणी फलक लावून नये अशी शिवसेनेच्या वतीने आग्रहाची मागणी करण्यात येत आहे.पुणे शहरामध्ये मेट्रोचे काम पूर्णत्वास येत आहे. अनेक ठिकाणी मेट्रोचे स्टेशन तयार करण्यात आले आहे. मेट्रो स्टेशनचे नाव देताना सामाजिक, ऐतिहासिक बांधिलकीचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. पुणे स्टेशन जवळील माता रमाई आंबेडकर पुतळा या ठिकाणी मेट्रोचे स्टेशन उभारण्यात आले आहे. सदरच्या मेट्रो स्टेशनला माता रमाई आंबेडकर असे नाव देण्यात यावे. या भागांमध्ये माता रमाई यांच्या नावे उद्यान आणि पुर्णाकृती पुतळा देखील आहे. त्यामुळे या भागातील ओळख माता रमाई नगर अशी आहे. तरी मेट्रो प्रशासनाने पुणे मनपा आयुक्तांमार्फत राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुराव करून या स्टेशनला माता रमाई आंबेडकर मेट्रो स्टेशन असे नामकरण करावे. असे वेळेत १५ एप्रिल २०२३ रोजी पत्राद्वारे सुचविण्यात आले होते. यामुळे पुणे शहरातील अनेक आंबेडकर अनुयायी तसेच सर्व पुणेकर नागरिक आनंदित होतील व मेट्रो स्टेशनला एक सामाजिक व ऐतिहासिक ओळख मिळेल.परंतू महामेट्रोच्या व्यवस्थापनाने व पुणे महापालिकेने याबाबत काहीच पाठपुरावा केल्याचे दिसत नाही. सदर मेट्रो स्टेशनला रूबी हाॅल स्टेशन नाव देण्यात आले. ज्या रूबी हाॅल मधे किडनी रॅकेट चालवून रुग्णांच्या आरोग्याचा खेळखंडोबा केला. रूबी हाॅल देशात बदनाम झालेच त्याचबरोबर परदेशातही पुण्याची बदनामी झाली. असे नाव देउन महामेट्रो व पुणे मनपा काय साध्य करू इच्छिते ? या नावाबाबत पुनर्विचार होउन पुणेकरांच्या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून मेट्रो स्टेशनच्या नावात बदल करावा.तसेच आरटीओ शेजारील All India Shri Memorial Society कॉलेजच्या शेजारी मेट्रो स्टेशन आहे. या कॉलेजची स्थापना छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पुतळ्याची उभारणी देखील या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकाराने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आली आहे, त्यामुळे या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व आहे. मेट्रो स्टेशनचे नाव छत्रपती शाहू महाराज देणे योग्य होईल. कारण या भागामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाची व उच्च शिक्षणाची पायाभरणी याच कॉलेजमध्ये केली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत त्या भागाला छत्रपती शाहू महाराजांची ओळख आहे महाराजांच्या ऐतिहासिक ओळखीमुळे या स्टेशनला जर छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात आले तर त्या स्टेशनला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होईल. असे सुचविण्यात आले होते. याठिकाणीही मंगळवार पेठ नाव दिले गेले आहे. या स्टेशनपासून मंगळवार पेठ दूर आहे. सदर स्टेशनच्या परिसराची ओळख मंगळवार पेठ नसून आरटीओ परिसर अशी आहे. महामेट्रो, पुणे मनपा, राज्य व केंद्र शासन यांना ऐतिहासिक वारसा व महापुरूषांची ओळख पुसून टाकायची आहे का ?वरील तिन्ही मेट्रो स्थानकाच्या नावातील बदलाचे प्रस्ताव हे पुणेकर नागरिकांची मागणी असून पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आपणास निवेदनाद्वारे देण्यात येत आहे.यासंदर्भात लवकरात लवकर नवीन प्रस्ताव तयार करून संबंधित तिन्ही स्टेशनचे नाव अनुक्रमे छत्रपती शिवाजीमहाराज, माता रमाई आंबेडकर व राजश्री छत्रपती शाहू महाराज असे देण्यात यावे. समस्त पुणेकर नागरिक व शिवसेना वरील मागणीसाठी आग्रही आहे. याबाबत कोणत्याही राजकीय पक्षाचा अथवा सामाजिक संघटनेचा विरोध असेल असे वाटत नाही. मग शासन व प्रशासन एवढे उदासीन का आहे ?

पुण्याच्या कार्यक्रमात शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कानउघाडणी करावी – अतुल लोंढे

मोदी जे काही करत आहेत ते टिळकांच्या विचारसणी विरोधात आहे हे पवारांनी मोदींना सांगावे.

पुण्यातील मोदींच्या कार्यक्रमाला जावे की नाही हा शरद पवारांचा प्रश्न.

मुंबई, दि. ३१ जुलै
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उपस्थित रहावे की नाही त्यांचा व त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. परंतु शरद पवार या कार्यक्रमाला जातच असतील तर त्यांनी आपल्या शिष्याची कानउघाडणी करावी, अशी अपेक्षा आहे असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

देशभरात भाजपा व नरेंद्र मोदी विरोधात इंडिया नावाने आघाडी स्थापन झालेली असताना या आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात उपस्थित राहावे की नाही हा प्रश्न चर्चिला जात आहे. यावर बोलताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, ज्या व्यक्तीमुळे देशाची लोकशाही, संविधान, शिव, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचाराला धोका पोहचलेला आहे, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी उपस्थित राहू नये अशी लोकांची इच्छा आहे. परंतु शरद पवार हे कार्यक्रमाला जातच आहेत तर ज्या पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आपले गुरु आहेत, त्यांचे बोट धरून राजकारणात आलो, असे म्हटले होते. आता पुण्यात एका कार्यक्रमात गुरु-शिष्य एकत्र येतच आहेत तर, नरेंद्र मोदी जे काही करत आहेत ते लोकमान्य टिळकांच्या विचारसणीच्या विरोधात आहे, अशी कानउघाडणी गुरु शरद पवार यांनी शिष्य नरेंद्र मोदी यांची करावी, ही आमची अपेक्षा आहे, असे अतुल लोंढे म्हणाले.

3 वर्षांपासून भिजत घोंगडे:राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवर 10 दिवसांत शपथपत्र सादर करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

मुंबई-

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणात सुनावणी करताना राज्य सरकारला राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंबंधी पुढील 10 दिवसांत शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिलेत. तत्कालीन मविआ सरकारने शिफारस केलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा जैसे थे राहील, असेही कोर्टाने या प्रकरणी नमूद केले आहे.

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा गत 3 वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकरणी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी एक याचिका नव्याने दाखल केली आहे. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने राज्य सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सुनावणी 21 ऑगस्टपर्यंत स्थगित केली. यावेळी कोर्टाने राज्य सरकारला पुढील 10 दिवसांत आपली बाजू प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याचेही निर्देश दिले.

तत्पूर्वी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारच्या महाधिवक्त्यांनी 12 आमदारांच्या शिफारशीच्या मुद्यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने गत आठवड्यात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीचा मार्ग मोकळा केला. त्यात कोर्टाने या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते रतन सोली यांना याचिका मागे घेण्याची मुभा दिली. तर अन्य एक याचिकाकर्ते सुनील मोदी यांना हाय कोर्टात जाण्याची परवानगी दिली. त्यानुसार हा वाद आता हाय कोर्टात पोहोचला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या 12 आमदारांच्या यादीवर सर्वप्रथम निर्णय व्हावा. त्यानंतर दुसऱ्या यादीचा विचार केला जावा, अशी मागणी या प्रकरणी याचिकाकर्ते सुनील मोदी यांनी केली आहे.

कोर्टाने सप्टेंबर 2022 मध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीला स्थगिती दिली होती. परंतु ही स्थगिती आता उठवण्यात आली आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीने दिलेल्या 12 सदस्यांची यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी नवी यादी सादर करण्याची तयारी सुरू केली. या 12 नावांसाठी शिंदे गट व भाजपत जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पण दोन्ही पक्षांचे संख्याबळ पाहता भाजपला 12 पैकी 8, तर शिंदे गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनोहर भिडेंच्या अटकेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीची निदर्शने

पुणे – मनोहर उर्फ संभाजी भिडे याने राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिराव फुले आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू , व समाजसुघारक यांच्याबाबतीत केलेल्या गैरवक्तव्यांचा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करुन निषेध करण्यात आला. भिडे याला या अवमानकारक वक्तव्याबद्दल अटक करुन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना दिपक मानकर म्हणाले भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी हे शेवटच्या श्वासापर्यंत या देशासाठी लढले या राष्ट्रपित्याचा अपमान आपण कोणीही सहन करू शकत नाही , संभाजी भिडे याचे खरे नाव मनोहर भिडे. हे असून ही व्यक्ती संभाजी हे नाव लावून जनतेची का फसवणूक करते याचा शोध धेणे निश्चितच गरजेचे आहे , सदर व्यक्तीस त्वरीत अटक व्हावी याकरीता आम्ही शासनाकडे मागणी करीत आहोत ह्यास त्वरीत अटक न झाल्यास आम्ही सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहोत .


याप्रसंगी बोलताना प्रदिप देशमुख म्हणाले की, संभाजी भिडे याला राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्ये करण्याची खोड आहे. ही वक्तव्ये जाणिवपूर्वक केली जात असून याम माध्यमातून दोन समाजामध्ये दंगली घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य शासनाने याची अतिशय गंभीर अशी दखल घेऊन संभाजी भिडे याच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
ते पुढे म्हणाले की, हा देश घडविणाऱ्या विचारधारेचा सतत अवमान करण्याची प्रवृत्ती घातक असून यामुळे देशाची एकता आणि अखंडता याला धोका निर्माण होत आहे.
यावेळी महात्मा गांधी अमर रहे , महात्मा ज्योतीबा फुलेंचा विजय असो व
गटारातले किडे … मनोहर भिडे
वळवळणारे किडे …. मनोहर भिडे
माथेफिरू भिडे ….. करतोय किडे
अटक करा अटक करा … मनोहर भिडे ला अटक करा या घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी शहराघ्यक्ष दिपक मानकर ,रूपाली ठोंबरे, कार्याघ्यक्ष प्रदीप देशमुख , बाबा पटील , सौ पुनम पाटील , पुजा झोळे ,बाळासाहेब बोडके , बाबा धुमाळ , प्रिया गदादे , विनोद ओरसे ,संतोष नांगरे , अब्दुल सत्तार , विनोद पवार , शिवाजी पाडाळे , संतोष बेन्द्रे . सोनाली गाढे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बँक ऑफ इंडियाचा पहिल्या तिमाहीतील नफा अंदाजे तीन पटींनी वाढून १५५१ कोटी रुपयावर

मुंबई – बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीचा नफा आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीतील ५६१ कोटी रुपयांवर वार्षिक पातळीवर १७६ टक्क्यांनी वाढून १५५१ कोटी रुपयांवर गेला आहे. कंपनीचा ऑपरेटिंग नफा आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीतील २१८३ कोटी रुपयांवरून वार्षिक पातळीवर ७२ टक्क्यांनी वाढून ३७५२ कोटी रुपयांवर गेला आहे.

असेट क्वालिटीच्या बाबतीत जीएनपीए गुणोत्तर वार्षिक पातळीवर २६३ बीपीएसने आहे, तर निव्वळ एनपीए गुणोत्तर वार्षिक पातळीवर ५६ बीपीएसने कमी झाले आहे.

जागतिक व्यवसायाने १२ लाख रुपयांचा टप्पा पार केला असून त्यात ८.६१ टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक ठेवी वार्षिक पातळीवर ८.७१ टक्क्यांनी वाढल्या आहेत. एकूण कर्ज वार्षिक पातळीवर ८.४८ टक्क्यांनी वाढले आहे.

निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीतील ४०७२ कोटी रुपयांवरून वार्षिक पातळीवर ४५ टक्क्यांनी वाढून ५९१५ कोटी रुपयांवर गेले आहे. बिनव्याजी उत्पन्न आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीतील ११५२ कोटी रुपयांवरून वार्षिक पातळीवर २७ टक्क्यांनी वाढून १४६२ कोटी रुपयांवर गेले आहे.

देशांतर्गत ठेवी वार्षिक पातळीवर ७.९८ टक्क्यांनी वाढून जून २३ मध्ये ५,८९,५१७ कोटी रुपयांवर गेल्या आहेत. देशांतर्गत कासा वार्षिक पातळीवर ७.५६ टक्क्यांनी वाढून जून २३ मध्ये २,६०,६१५ कोटी रुपयांवर गेला आहे, तर कासा गुणोत्तर ४४.५२ टक्क्यांवर गेले आहे.

आरएएम कर्ज वार्षिक पातळीवर ११.७५ टक्क्यांनी वाढून २,३९,९५४ कोटी रुपयांवर गेले असून जून २३ मधील कर्जात त्याचा वाटा ५५.३९ टक्के आहे.

मार्च २३ मधील १६.२८ टक्क्यांच्या तुलनेत बँकेचा एकूण कॅपिटल अडिक्वेसी रेशिओ (सीआरएआर) ३० जून २०२३ रोजी १५.६० टक्क्यांवर गेला. सीईटी-१ गुणोत्तर मार्च २३ मधील १३.६० टक्क्यांच्या तुलनेत जून २३ मध्ये १३.०२ टक्क्यांवर गेला.

बँकेने पूर्णपणे डिजिटल उत्पादनांची निर्मिती सुरू केली आहे. त्यात ठेवींच्या बाबतीत एसबी खाती, तर कर्ज विभागात मुद्रा/केसीसी/वैयक्तिक कर्ज/निवृत्ती कर्ज इत्यादींचा समावेश आहे. ग्राहकांना शाखेला भेट न देताही एसबी खाते सुरू करता येईल आणि कर्जही मिळवता येईल. बँकेने या आर्थिक वर्षाच्या अखेरीस डिजिटल उत्पादनांच्या माध्यमातून १०,००० कोटी रुपयांचा व्यवसाय मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे.

३० जून २३ रोजी बँकेकडे ५१२९ देशांतर्गत शाखा आहेत. त्यात ग्रामीण – १८५२ (३६ टक्के), निम- शहरी १४५६ (२८ टक्के), शहरी – ८२९ (१६ टक्के) आणि मेट्रो – ९९२ (१९ टक्के) यांचा समावेश आहे.

शरद पवारांनी मोदींच्या सन्मान सोहळ्यात सहभागी होऊ नये ही जनभावना पण … संजय राऊत म्हणाले …

मुंबई-शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कार्यक्रमात आहेत त्या कार्यक्रमात जाऊ नये ही लोकभावना आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. लोकमान्य टिळक यांचे गुण आणि त्यांनी मार्ग दाखवला त्याचं स्मरण आम्ही करु. मला असं वाटतं की शरद पवार हेदेखील लोकमान्य टिळक यांनी दाखवलेल्या मार्गाचं स्मरण करतील. महाविकास आघाडीवर आम्ही नाराज नाही. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला हे वाटतं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जाऊ नये पण आम्ही शरद पवारांना सल्ला देणार नाही.शरद पवार यांनी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करु नये, असेही ते म्हणाले, ते दिल्लीमध्ये बोलत होते. एक ऑगस्ट रोजी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार दिला जाणार आहे, त्या कार्यक्रमाचे शरद पवार प्रमुख पाहुणे आहेत. इंडिया विरुद्ध एनडीए अशी लढाई सुरु असताना शरद पवार यांच्या या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. इंडियाच्या एकीमध्ये शरद पवार प्रमुख सुत्रधार आहेत, अशा नेत्यांनी मोदींच्या कार्यक्रमात उपस्थिती लावणे, यामुळे संभ्रम निर्माण होत असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत. याबाबत खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली.  शरद पवार यांनी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करु नये… त्यांनीच लोकांच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी भूमिका संजय राऊत यांनी व्यक्त केली. त्याशिवाय याबाबत आम्ही शरद पवारांना सल्ला देणार नाहीत, असेही राऊत म्हणाले. 

जे काही गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात चाललं आहे जे काही आम्ही पाहतो आहोत, वाचतो आहोत त्यावरुन हे कळतं आहे लोकांच्या मनात असंतोष आहे. जो खदखदतोय. लोकांना जे काही राजकारण या देशात आणि महाराष्ट्रात चाललं आहे ते काही लोकांना मान्य नाही. या राजकारणाचे जे कर्ते धर्ते असतात त्यांना कोणता पुरस्कार मिळावा हा त्यांचा प्रश्न आहे. नोबेल मिळाला तरीही त्यांचा प्रश्न आहे. मात्र महाविकास आघाडी किंवा ‘इंडिया’चे नेते जेव्हा अशा ठिकाणी जातात तेव्हा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. शरद पवार इतके अनुभवी आहेत की त्यांना हा संभ्रम आहे ते आम्ही सांगायला नको. आमची ‘इंडिया’ किंवा महाविकास आघाडी घट्ट आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अजितदादा कमळाचा प्रचार करणार! चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान; छगन भुजबळ यांचा सवाल, पंडित केव्हा झाले?

मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार कमळाचा प्रचार करताना दिसतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यांच्या यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी बावनकुळे यांना टोला हाणला आहे. बावनकुळे पंडित केव्हापासून झाले हे मला कळालेच नाही, असे ते म्हणाले.अजित पवार यांनी महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली. ते शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. ते एवढ्यावरच थांबले नाही. काही ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेत त्यांनी पक्षावरही दावा सांगितला. या नव्या राजकीय मैत्रीवर भाष्य करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अजित पवार कमळासाठी मतदान मागतील असे विधान केले.

आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार कमळाचा प्रचार करतील. कमळाला मत द्या म्हणून भाषण करतील. कारण, आम्ही महायुती म्हणून एकत्र आलोत. त्यामुळे आम्ही सुद्धा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करू, असे ते रविवारी परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील कार्यक्रमात संवाद साधताना म्हणाले. यावेळी त्यांच्या या विधानाला कार्यकर्त्यांनी खळखळून हसून दाद दिली. ते स्वतःही यावर खूप हसले.

बावनकुळे पंडित केव्हापासून झाले?

चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबल यांनी त्यांना उपरोधिक टोला हाणला. ते म्हणाले की, बावनकुळेंना सर्वकाही दिसत आहे. त्यांना भविष्यातीलही दिसत आहे. ते पंडित केव्हापासून झाले हेच मला कळत नाही. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच ते उपमुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळे ते केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचाच प्रचार करतील.

दुसरीकडे, अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा गट भाजप प्रणित एनडीएचा अधिकृत सदस्य आहे. त्यानुसार, अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांनी एनडीएच्या बैठकांनाही हजेरी लावली आहे. त्यामुळे हा गट यापुढे महायुतीचा घटकपक्ष म्हणूनच निवडणुकांना सामोरे जाईल, असा अंदाज आहे.