पुणे-मेट्रो स्टेशनच्या नावावरून आक्षेप घेत , मागण्या करत आज शिवसेनेचे शहर अध्यक्ष संजय मोरे आणि शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांना धारेवर धरले . आणि यावेळी अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांचेसोबत याविषयावर सविस्तर चर्चा केली . दोन तीन दिवसात पुणे मनपा आयुक्त, महामेट्रोचे अधिकारी आणि शिवसेना शिष्टमंडळ एकत्र चर्चा करून चांगला मार्ग काढू असे खेमनार यांनी शिष्टमंडळाला सांगितले.यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महिला आघाडी शहरसंघटिका पल्लवी जावळे, कल्पना थोरवे, संगिता ठोसर, शहर संघटक विश्वास चव्हाण, राजेंद्र शिंदे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, आनंद गोयल, बाळा ओसवाल, विधानसभाप्रमुख योगेश मोकाटे, नितीन शिंदे, नितीन दरेकर, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, युवराज पारीख, वैभव दिघे, सुशांत पोकळे, सागर दळवी, संदिप नवले, रूपेश थोपटे उपस्थित होते.
मोरे यांनी यावेळी आयुक्ताना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,’ छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यनगरीत सोन्याचा नांगर फिरवून विकासाची नवी दिशा दिली. ती पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी व प्रशासनाने कधी आत्मसात करण्याचा साधा प्रयत्न केला नाही. परंतू अवहेलना मात्र आवर्जून केली. त्यात आणखी एक उदाहरण म्हणजे महामेट्रो स्थानकाला छत्रपतींचा एकेरी उल्लेख करून दिलेल्या नावाचा. पुणे शहरात छत्रपतींच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्याची हिंमत येते कुठून ? वारंवार अशी मस्ती का होत आहे ? महामेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्टदरम्यान असणाऱ्या स्थानकाला शिवाजीनगर मेट्रो हे नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा यातून एकेरी उल्लेख होत आहे. यावरून पुणेकर, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावण्याचा महामेट्रो, पुणे मनपा, राज्य व केंद्र सरकार यांचा उद्देश स्पष्टपणे दिसत आहे. आपण आयुक्त या नात्याने सदर स्थानकाच्या नावामधे बदल करण्याच्या त्वरीत हालचाली करून नावातील अपभ्रंश टाळावा. मेट्रो स्थानकाला छत्रपती असा उल्लेख केल्याशिवाय त्याठिकाणी फलक लावून नये अशी शिवसेनेच्या वतीने आग्रहाची मागणी करण्यात येत आहे.पुणे शहरामध्ये मेट्रोचे काम पूर्णत्वास येत आहे. अनेक ठिकाणी मेट्रोचे स्टेशन तयार करण्यात आले आहे. मेट्रो स्टेशनचे नाव देताना सामाजिक, ऐतिहासिक बांधिलकीचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. पुणे स्टेशन जवळील माता रमाई आंबेडकर पुतळा या ठिकाणी मेट्रोचे स्टेशन उभारण्यात आले आहे. सदरच्या मेट्रो स्टेशनला माता रमाई आंबेडकर असे नाव देण्यात यावे. या भागांमध्ये माता रमाई यांच्या नावे उद्यान आणि पुर्णाकृती पुतळा देखील आहे. त्यामुळे या भागातील ओळख माता रमाई नगर अशी आहे. तरी मेट्रो प्रशासनाने पुणे मनपा आयुक्तांमार्फत राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुराव करून या स्टेशनला माता रमाई आंबेडकर मेट्रो स्टेशन असे नामकरण करावे. असे वेळेत १५ एप्रिल २०२३ रोजी पत्राद्वारे सुचविण्यात आले होते. यामुळे पुणे शहरातील अनेक आंबेडकर अनुयायी तसेच सर्व पुणेकर नागरिक आनंदित होतील व मेट्रो स्टेशनला एक सामाजिक व ऐतिहासिक ओळख मिळेल.परंतू महामेट्रोच्या व्यवस्थापनाने व पुणे महापालिकेने याबाबत काहीच पाठपुरावा केल्याचे दिसत नाही. सदर मेट्रो स्टेशनला रूबी हाॅल स्टेशन नाव देण्यात आले. ज्या रूबी हाॅल मधे किडनी रॅकेट चालवून रुग्णांच्या आरोग्याचा खेळखंडोबा केला. रूबी हाॅल देशात बदनाम झालेच त्याचबरोबर परदेशातही पुण्याची बदनामी झाली. असे नाव देउन महामेट्रो व पुणे मनपा काय साध्य करू इच्छिते ? या नावाबाबत पुनर्विचार होउन पुणेकरांच्या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून मेट्रो स्टेशनच्या नावात बदल करावा.तसेच आरटीओ शेजारील All India Shri Memorial Society कॉलेजच्या शेजारी मेट्रो स्टेशन आहे. या कॉलेजची स्थापना छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पुतळ्याची उभारणी देखील या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकाराने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आली आहे, त्यामुळे या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व आहे. मेट्रो स्टेशनचे नाव छत्रपती शाहू महाराज देणे योग्य होईल. कारण या भागामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाची व उच्च शिक्षणाची पायाभरणी याच कॉलेजमध्ये केली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत त्या भागाला छत्रपती शाहू महाराजांची ओळख आहे महाराजांच्या ऐतिहासिक ओळखीमुळे या स्टेशनला जर छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात आले तर त्या स्टेशनला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होईल. असे सुचविण्यात आले होते. याठिकाणीही मंगळवार पेठ नाव दिले गेले आहे. या स्टेशनपासून मंगळवार पेठ दूर आहे. सदर स्टेशनच्या परिसराची ओळख मंगळवार पेठ नसून आरटीओ परिसर अशी आहे. महामेट्रो, पुणे मनपा, राज्य व केंद्र शासन यांना ऐतिहासिक वारसा व महापुरूषांची ओळख पुसून टाकायची आहे का ?वरील तिन्ही मेट्रो स्थानकाच्या नावातील बदलाचे प्रस्ताव हे पुणेकर नागरिकांची मागणी असून पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आपणास निवेदनाद्वारे देण्यात येत आहे.यासंदर्भात लवकरात लवकर नवीन प्रस्ताव तयार करून संबंधित तिन्ही स्टेशनचे नाव अनुक्रमे छत्रपती शिवाजीमहाराज, माता रमाई आंबेडकर व राजश्री छत्रपती शाहू महाराज असे देण्यात यावे. समस्त पुणेकर नागरिक व शिवसेना वरील मागणीसाठी आग्रही आहे. याबाबत कोणत्याही राजकीय पक्षाचा अथवा सामाजिक संघटनेचा विरोध असेल असे वाटत नाही. मग शासन व प्रशासन एवढे उदासीन का आहे ?