मुंबई-शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कार्यक्रमात आहेत त्या कार्यक्रमात जाऊ नये ही लोकभावना आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. लोकमान्य टिळक यांचे गुण आणि त्यांनी मार्ग दाखवला त्याचं स्मरण आम्ही करु. मला असं वाटतं की शरद पवार हेदेखील लोकमान्य टिळक यांनी दाखवलेल्या मार्गाचं स्मरण करतील. महाविकास आघाडीवर आम्ही नाराज नाही. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला हे वाटतं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जाऊ नये पण आम्ही शरद पवारांना सल्ला देणार नाही.शरद पवार यांनी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करु नये, असेही ते म्हणाले, ते दिल्लीमध्ये बोलत होते. एक ऑगस्ट रोजी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार दिला जाणार आहे, त्या कार्यक्रमाचे शरद पवार प्रमुख पाहुणे आहेत. इंडिया विरुद्ध एनडीए अशी लढाई सुरु असताना शरद पवार यांच्या या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. इंडियाच्या एकीमध्ये शरद पवार प्रमुख सुत्रधार आहेत, अशा नेत्यांनी मोदींच्या कार्यक्रमात उपस्थिती लावणे, यामुळे संभ्रम निर्माण होत असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत. याबाबत खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली. शरद पवार यांनी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करु नये… त्यांनीच लोकांच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी भूमिका संजय राऊत यांनी व्यक्त केली. त्याशिवाय याबाबत आम्ही शरद पवारांना सल्ला देणार नाहीत, असेही राऊत म्हणाले.
जे काही गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात चाललं आहे जे काही आम्ही पाहतो आहोत, वाचतो आहोत त्यावरुन हे कळतं आहे लोकांच्या मनात असंतोष आहे. जो खदखदतोय. लोकांना जे काही राजकारण या देशात आणि महाराष्ट्रात चाललं आहे ते काही लोकांना मान्य नाही. या राजकारणाचे जे कर्ते धर्ते असतात त्यांना कोणता पुरस्कार मिळावा हा त्यांचा प्रश्न आहे. नोबेल मिळाला तरीही त्यांचा प्रश्न आहे. मात्र महाविकास आघाडी किंवा ‘इंडिया’चे नेते जेव्हा अशा ठिकाणी जातात तेव्हा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. शरद पवार इतके अनुभवी आहेत की त्यांना हा संभ्रम आहे ते आम्ही सांगायला नको. आमची ‘इंडिया’ किंवा महाविकास आघाडी घट्ट आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.