Home Blog Page 1391

राष्ट्रवादी काकाची की पुतण्याची ? निवडणूक आयोगात आजपासून सलग सुनावणी

शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीलाच अजित पवार यांचा आक्षेप-वास्तविक मी पक्षाचा अध्यक्ष असल्याचा दावा शरद पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. यावरुनच दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्तीलाच अजित पवार यांच्या गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला होता. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मणिंदर सिंग हे बाजू मांडत आहेत. तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत हे बाजू मांडत आहेत.

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात राष्ट्रवादी वरुन कायदेशीर लढाई सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोगात आजपासून सलग सुनावणी होणार आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर कागदपत्रे जमा करण्यात आली असून आजपासून बाजू मांडण्यात येणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी साहेबांना म्हणजेच काकांना मिळणार की दादांना मिळणार? असा प्रश्न आहे. या संदर्भात पुढील काळी दिवस सलग सुनावणी होऊन आयोग निकाल राखून ठेवण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान शरद पवार हे देखील आज दिल्लीत आहेत. त्यामुळे सुनावणीच्या वेळी ते आयोगात उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका शरद पवारांना भेटणार की, अजित पवारांना भेटणार? या कडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या संदर्भातील सुनावणी आता दररोज होणार आहे. आज दुपारी चार वाजेपासून या सुनावणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह नेमके कोणाचे, याबाबत दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोग जो शिवसेनेला न्याय तो राष्ट्रवादीला न्याय अशा अनुषंगाने निर्णय देणार की शरद पवार यांनाच राष्ट्रवादी पक्ष मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रसह देशाचे लक्ष लागले आहे. अजित पवार गटाकडून सुमारे 20 हजार बोगस शपथपत्रके दाखल करण्यात आल्याचा आरोप मागील सुनावणीच्या वेळी शरद पवार गटाने केला होता. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाकडून वेळकाढूपणा सुरु असल्याचा आरोप अजित पवार गटाने केला होता. अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असल्याने आज शरद पवार गटाकडून युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.

अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दोन गट पडले असले तरी शरद पवार यांनी तसे मानण्यास नकार दिला आहे. वास्तविक सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार गटाने पक्षावर दावा केल्यामुळे शरद पवार गटानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणीसाठी पोहोचले आहे. या प्रकरणावर सुरू असलेल्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या शरद पवार हे दिल्लीत आहेत. त्यामुळे शरद पवार हे देखील सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 भारतीय संवर्धन संस्थेस (मोतीबाग) एक कोटींचा निधी प्रदान

समाज सेवेसाठी संवेदना महत्वाची : सुहासराव हिरेमठ

पुणे : “निःस्वार्थ समाज सेवेसाठी संवेदना महत्वाची आहे. ही संवेदना कधीही क्षीण होता कामा नये. कारण संवेदनेतूनच समाजासाठी काम करण्याची प्रेरणा, उभारी मिळते,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक सुहासराव हिरेमठ यांनी केले.

भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेला (मोतीबाग) जेष्ठ उद्योजक जयंत नातू आणि अश्वमेध परिवाराच्या वतीने एक कोटी रुपयांचा निधी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यावेळी हिरेमठ बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकर्ते प्रा. अनिरुद्ध देशपांडे, भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी, पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर, उद्योजक जयंत नातू आदी उपस्थित होते.
सुहासराव हिरेमठ म्हणाले, “आजच्या काळात सर्व काही मिळेल; पण दानशूर आणि समाजासाठी काही करण्याची प्रेरणा असणाऱ्या दात्यांची कमी आहे. आजच्या या कार्यक्रमातून समाजालाही प्रेरणा मिळणार आहे. त्यांच्यातील संवेदना जागृत होण्यास मदत होणार आहे. प्रत्येकाने समाजासाठी, सेवा प्रकल्पासाठी संकल्प करायला हवा. दरवर्षी विशिष्ट रक्कम, वेळ सेवा प्रकल्पासाठी द्यावी. घरातील मंगलप्रसंगी सेवा प्रकल्पासाठी गरजूंना मदतीचा हात द्यावा.”

प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले की, भारतीय संस्कृतीमध्ये दातृत्व हा महत्वाचा गुण आहे. हा गुण जपण्याबरोबरच विकसित करण्याचा प्रयत्न करायला हवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समाज हे स्वतंत्र नाही तर एकरुप असे आहेत. समर्पण भावनेने काम करण्याची गरज आहे. ही भावना अशा कार्यक्रमामुळे वाढीस लागणार आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे समर्पणाचे दर्शन घडवत आहे. 

जयंत नातू यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, राष्ट्रीय भावनेने काम करणारे कार्यकर्ते संघाच्या माध्यमातून तयार झाले आहेत. देशासाठी अनेक प्रचारक घडविले आहेत. समाज आणि संघाने आयुष्यात जे दिले त्याची परतफेड करता येत नाही; पण कर्तव्य भावनेतून हा निधी प्रदान करत आहे.
राजीव जोशी यांनी संघ कार्याची आणि मोतीबाग संस्थेच्या नवीन बांधकाम प्रकल्पाबाबत माहिती सांगितली. अशोक वझे यांनी स्वागत केले. ऍड. पद्मा गोखले यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. मेधावी नातू यांनी स्वागत संघ गीत सादर केले. डॉ. पुष्पा रानडे यांनी वंदे मातरम् सादर केले.

‘स्मार्ट अभ्यास’ हाच दहावीतील सक्सेस मंत्रा- व्याख्यात्या मंजू फडके 

रोटरी क्लब ऑफ पुणे युवा आणि सुपरमाईंडच्या वतीने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी ‘दहावी सक्सेस मंत्रा’ कार्यक्रम
पुणे : जग दिवसेंदिवस अधिक स्पर्धात्मक होत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये वेगळेपणा दाखवणे गरजेचे आहे. हे वेगळेपण केवळ ‘हार्ड वर्क’ करून येणार नाही, तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘स्मार्ट वर्क’ केले पाहिजे. स्मार्ट पद्धतीने अभ्यास करून विषय समजून घेणे आणि त्यानुसार कोणत्याही ताणतणावाशिवाय परीक्षा देणे, हाच खऱ्या अर्थाने दहावीतील सक्सेस मंत्रा आहे, असे मत रोटरी क्लब ३१३१ च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व व्याख्यात्या मंजू फडके यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ पुणे युवा आणि सुपरमाईंडच्या वतीने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी ‘दहावी सक्सेस मंत्रा’ या विनामूल्य कार्यक्रमाचे आयोजन कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ पुणे युवाचे अध्यक्ष निनाद जोग, श्रीकांत जोशी, अर्चिता मडके, दीपा बडवे, क्लबचे इतर पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते.

मंजू फडके म्हणाल्या, स्पर्धा कोणत्या बाजूने येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कायम स्पर्धेसाठी तयार राहिले पाहिजे. दहावी हा केवळ आपल्या शैक्षणिक करिअरचाच नव्हे तर संपूर्ण आयुष्याचा पाया असतो. यानंतरच तुमच्या आयुष्याला योग्य दिशा मिळणार आहे.  त्यामुळे दहावी मध्ये मजा मस्ती न करता आता जर तुम्ही कष्ट करून अभ्यास केला तरच तुम्हाला चांगले करिअर मिळू शकेल.

निनाद जोग म्हणाले, दहावी मध्ये असताना मुलांबरोबर पालकांनाही त्यांच्या भविष्याची चिंता असते. दोघांच्याही चिंतेचे निराकरण वेगवेगळ्या पद्धतीने करता येऊ शकते. त्यासाठीच अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.  या कार्यक्रमामधून पालकांचे व विद्यार्थ्यांचे मार्कंचे टेन्शन कमी होते व विद्यार्थ्यांना मोटिव्हेशन मिळते.

गेले सात वर्षे सातत्याने हा उपक्रम राबविला जातो. 40-50% पासून 90-95% पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या सेमिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळते. म्हणूनच या कार्यक्रमाला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. असे क्लबचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या विज्ञान विषयाच्या सदस्या डॉ. सुलभा विधाते यांनी विज्ञान विषयावर, मंजुषा वैद्य यांनी आयएमपी स्टडी टेक्निक आणि डॉ. जयश्री अत्रे यांनी गणित विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दीपा बडवे व अर्चिता मडके यांनी सूत्रसंचालन केले व आभार दिनेश अंकम यांनी मानले

भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे:- आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी भाग्याचा आहे. देशाची शान असलेल्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृती चिरंतन ठेवणारे स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालयाचे (गुरुकुल) भूमिपूजन ठाण्यात होत आहे. हे गुरुकुल भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाच्या “महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास” या योजनेंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील रेप्टोक्रॉस आरक्षित भूखंड, वर्तकनगर, ठाणे येथे भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ गायिका संगीतकार श्रीमती उषा मंगेशकर, आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आज डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी श्रीमती मीना खडीकर, ज्येष्ठ गायक आदिनाथ मंगेशकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, ठाणे महापालिका परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, राजू मिश्रा, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पूर्वेश सरनाईक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सर्व युगांप्रमाणे ‘लता युग’ हे अविस्मरणीय आहे. त्यांची गाणी आजही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लतादीदींची गाणी सर्वांनाच हवीहवीशी वाटतात. या विद्यालयाच्या उभारणीसाठी राज्य शासनाकडून 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ठाण्याला संगीत आणि साहित्याचा मोठा वारसा आहे. संगीत क्षेत्रातील दिग्गज पं. राम मराठे, पी.सावळाराम, श्रीनिवास खळे हे ठाण्यातीलच. भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) गायन-संगीत प्रेमींना निश्चितच उपयुक्त ठरेल. या वाटचालीत शासन मंगेशकर कुटुंबियांच्या कायम सोबत असेल.

ठाण्यातील इतर विकासकामेही लवकरच पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. ठाण्याचा सर्वांगीण विकास होत आहे. मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर सुशोभीकरण, स्वच्छतेकडेही कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. त्याच धर्तीवर ठाण्यातही काम सुरु केले जाणार आहे. जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू असून 50 कोटी रूपये निधी दिला आहे. ‘वापरा आणि फेका’ ही आपली संस्कृती नाही. जुना अनमोल ठेवा जपायला हवा, त्याचे संवर्धन करायला हवे. हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्यावर खूप प्रेम होते, मी त्यांच्याच आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो, त्यांच्या विचारधारेवरच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहे.

‘ग्लोबल वॉर्मिंग’ या जागतिक समस्येवर  मात करण्यासाठी जागोजागी झाडे लावणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नशील असून ‘अर्बन फॉरेस्ट’ ही संकल्पना लवकरच राबविण्यात येणार आहे. मोठमोठ्या शहरांमधील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने केला जाणार आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी जबाबदारीने, झोकून देऊन काम करणे आवश्यक आहे, याची पूर्ण जाणीव असल्यानेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या साथीने सर्व मिळून जनसामान्यांसाठी अहोरात्र काम करीत आहोत. बंद झालेले अनेक लोकोपयोगी प्रकल्प सुरू करण्यात आले असून नवीन प्रकल्पही सुरू करण्यात आले आहेत. हे सर्वसामान्यांचे शासन आहे, शेवटपर्यंत त्यांच्या हितासाठीच काम केले जाईल, अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी दिली.

याप्रसंगी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना विशेष भेट दिली. मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या, ठाण्याचे बदलते रूप पाहून मनापासून आनंद होत आहे. या ठाण्याला साजेशी अशी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) ची इमारत लवकरच उभारली जाणार आहे. त्याचा लाभ ठाणे व आसपासच्या परिसरातील सर्वच वयोगटातील गायन-संगीतप्रेमींनी घ्यावा. हे संगीत विद्यालय चालविण्याची जबाबदारी मंगेशकर कुटुंबियांकडे सोपविल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

श्री. सरनाईक यांनी मनोगत व्यक्त करताना ठाणे शहरातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील सुरु असलेल्या व नजीकच्या काळात सुरु होणाऱ्या विविध विकासकामांविषयी माहिती दिली. या विकासकामांसाठी भरघोस निधी देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आभार मानले.

त्यापूर्वी, पोखरण रोड नं. 01 येथील सिंघानिया शाळेसमोरील 3.75 कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या पादचारी पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या मुख्य सोहळ्यात, अमृत 2.0 योजनेंतर्गत वर्तकनगर-लोकमान्य नगर, घोडबंदर परिसरातील 200 कोटी रुपये मूल्य असलेला पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे मजबूतीकरण आणि विस्तारीकरण प्रकल्प यांचा शुभारंभ, खर्चाची रक्कम 50 कोटी रुपये असलेल्या शहरातील जुन्या विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई आणि पुनर्बांधणी या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. याबरोबरच वर्तकनगर प्रभाग समितीतील सर्व चौकांचे सुशोभीकरण करून आजूबाजूच्या परिसराची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल बोर्ड उभारणी (मूल्य 20 कोटी), ओवळा-माजिवडा क्षेत्रातील तलावांमधील संगीतमय कारंजी उभारणी व सुशोभीकरण (मूल्य 50 कोटी), मुंबईच्या धर्तीवर महापालिका क्षेत्रातील फूटपाथवर शोभिवंत रेलिंग लावणे (मूल्य 25 कोटी) या कामांचाही ऑनलाईन शुभारंभ मुख्य सोहळ्यात झाला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.

पुण्यात छठ महापुजा: भव्य गंगा आरतीला भाविकांची अलोट गर्दी

पुणे (दि. १९ ऑक्टोंबर २०२३) विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या तीरावर रविवारी (दि.१९) सायंकाळी ‘भव्य काशी गंगा आरती’चे आयोजन करण्यात आले होते. भक्ती भावपूर्ण वातावरणात इंद्रायणी मातेची यावेळी काशी येथून आलेल्या पौरोहित्यांनी विधिवत आरती केली.
यावेळी पालघर हिंदूशक्ती पीठ येथील स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज, विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री शंकर गायकर, समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक मिलिंद एकबोटे, आमदार महेश दादा लांडगे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अर्जुन गुप्ता, भारतीय खाद्य महामंडळ महाराष्ट्र सल्लागार समिती सदस्य व विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संयोजक डॉ. लालबाबू अंबीकलाल गुप्ता, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, सुरेश म्हेत्रे, हभप शेष महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विश्राम कुलकर्णी, अनिल उपाध्ये, चंद्रकांत तापकीर, गणेश आंबेकर, उमेश सिंग
आदींसह हजारो उत्तर भारतीय भक्त भाविक उपस्थित होते.
राष्ट्रीय एकतेतून राष्ट्र विकास हे ध्येय ठेवून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमासह विश्व श्रीराम सेना ही संस्था छठ महापुजा निमित्त भव्य गंगा आरतीचे आयोजन करीत असते. या महोत्सवाची सांगता सोमवारी पहाटे पाच वाजता सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला अर्ध्य देऊन होणार आहे. सुर्यषष्टी महाव्रत महापूजा, छोटकी छट, भव्य गंगा आरती सह विविध, धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सूर्याची उपासना करण्यासाठी छटपूजेचे व्रत केले जाते. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याचे प्राचीन काळापासूनची सामाजिक धारणा आहे. निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणार्‍या या व्रतात, आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे अशी माहिती लालबाबु गुप्ता यांनी दिली.
यावेळी संजय सम्राट म्युझिकल ग्रुप यांनी धार्मिक गीते सादर केली.

संयोजनात श्याम गुप्ता, उमेश सिंग, मुन्ना सिंह, राजकुमार गुप्ता, विनोद गुप्ता, माधव गुप्ता, पप्पू गुप्ता, राजकुमार प्रसाद, संजय विश्वकर्मा आदींनी सहभाग घेतला होता.

आज आपण जिंकलो तर मोदी श्रेय घ्यायलाही कमी करणार नाही:संजय राऊतांचा टोला, म्हणाले- इव्हेंट असा सुरू जसे काही मोदी बॅटिंग करणार

मुंबईतून क्रिकेटही अहमदाबादला हलवले

मुंबई-भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामना होतो आहे. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. मात्र, या सामन्याचा राजकीय इव्हेंट केला जात असल्याचा आरोप करत संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, केंद्रात आणि राज्या-राज्यात मोदी सरकार आल्यापासून प्रत्येक गोष्टीचे राजकारण सुरू आहे. एखाद्याचा मृत्यू झाला किंवा खेळाचा उत्सव असला तरी त्या प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट होतोय. इथे मृत्युचाही इव्हेंट केला जातो, खोटे अश्रु ढाळले जातात. हा तर वर्ल्डकप आहे. इथे राजकारण कशाला आणायला हवे? पण अहमदाबादमध्ये याचा इव्हेंट सुरु आहे. जसं काय मोदी बॉलिंग टाकणार, शहा बॅटिंग करणार आहे आणि भाजपचे लोकं सीमारेषेवर उभे राहणार आहेत. नंतर आम्ही अशी बॉलिंग, बॅटिंग करायला सांगितले असून म्हणून श्रेयही घेतील, असा टोला राऊत यांनी लगावला.संजय राऊत पुढे म्हणाले की, पूर्वी मुंबई क्रिकेटची पंढरी होती. अशा प्रकारचे खेळांचे उत्सव दिल्ली, मुंबई किंवा कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर व्हायचे. पण मुंबईतून संपूर्ण क्रिकेट अहमदाबादला हलवण्यात आले. कारण त्यांना राजकीय इव्हेंट करायचा आहे. आज जर आपण जिंकलो तर मोदी होते म्हणून आपण जिंकलो, मोदी है तो वर्ल्डकप की जीत मुमकीन है, असे बोलायलाही ते कमी करायचे नाहीत.

पुणे काँग्रेसच्या वतीने स्व. इंदिराजी गांधी यांच्या १०६ व्या जयंती निमित्त अभिवादन

पुणे-

   भारताच्या महिला माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या १०६ व्या जयंती निमित्त आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

      यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘आयर्न लेडी पंतप्रधान इंदिराजी गांधी या देशाच्या स्वाभिमान आहे. आज खास करून जयंती निमित्ताने काँग्रेस भवनचा परिसर अनेक महिलांच्या उपस्थितीने गौरवान्वित झाला आहे. इंदिरा गांधी यांची वीससूत्री प्रणाली आजही देशाला दिशादर्शक आहे. इंदिराजींनी त्यांच्या कालावधी मध्ये आणलेल्या विविध योजनांपैकी हरितक्रांती मुळे भारत देश सुजलाम सुफलाम झालेला आहे. त्यांनी जाहिर केलेल्या गरीबी हटाव नारा यामुळे पुढील ३० वर्षांमध्ये देशातील गरीबी ५०% ने कमी झाली.

      विदेशी वस्तूंवर बहिष्कार करणाऱ्या आंदोलनाची पहिली समर्थक जीने आपले विदेशी कपडे व खेळणी यांची होळी केली ती लहानगी म्हणजे इंदिरा.

      बालवयातच मायेचे छत्र हरपलेली, वडिलांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागामुळे स्वमदतीतून स्वत:ला सावरणारी निडर मुलगी म्हणजे इंदिरा.

      ‘मै नेहरू की बेटी हूँ कितना भी मारो मगर मै चिल्लाउंगी नही और तिरंगा झेंडा छोडुंगी नही’ असे इंग्रजांना ठणकाहून सांगणारी आंदोलक म्हणजे इंदिरा.

      चूल आणि मूल यांच्या पलीकडे महिलांना काँग्रेस पक्षात पहिल्यांदाच महिलांसाठी एक स्वतंत्र्य फ्रंटल संघटक सुरू करून महिलांना जबाबदारी व अधिकारी देणारी पहिली महिला म्हणजे इंदिरा. प्रजासत्ताक राष्ट्राची साहसी, पोलादी महिला व आजवर झालेल्या पंतप्रधानांपैकी एकमेव महिला पंतप्रधान म्हणजे इंदिराजी गांधी.

      तळागाळात कारखानदारी पोहचावी, सर्वांना रोजगार मिळावा अशी भूमिका इंदिरा गांधी यांची होती. स्थानिक नागरिक व नेतृत्वांची विचार सरणी बदलणार नाही तो पर्यंत राष्ट्र प्रगती करू शकणार नाही. त्यासाठी सर्वांची आर्थिक पत वाढली पाहिजे त्या अनुषंगाने बँकांचे राष्ट्रीयकरण करणारी व उद्योजकता वाढीस लावणारे धुरंधर नेतृत्व म्हणजे इंदिराजी गांधी होत. त्यांच्या जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम.’’

      यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या ॲड. राजश्री अडसूळ, विठ्ठल गायकवाड, ॲड. अश्विनी गवारे यांनी आपले विचार व्यक्त केले.  

 यावेळी नगरसेविका लता राजगुरू, संगिता तिवारी, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, हेमंत राजभोज, राजू ठोंबरे, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, द. स. पोळेकर, सुरेश नांगरे, वाल्मिक जगताप, उषा राजगुरू, छाया जाधव, अनिता मखवाणी, ताई कसबे, मोतीबाई उडते, दिपक ओव्हाळ, आशुतोष जाधव, राज घलोत, फैयाज शेख, हरिदास अडसूळ, विठ्ठलराव हाडके आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.

      कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्यांचे आभार प्रदेश प्रतिनिधी यशराज पारखी पाटील यांनी मानले. आभार व्यक्त ते म्हणाले की, ‘‘आधुनिक काळातील जीवनावश्यक तंत्रज्ञानाची पाया भरणी इंदिराजी गांधी यांनी केली. महिला आरक्षण मिळवून देणाऱ्या व महिलांना स्वयंपूर्ण करणाऱ्या प्रणेत्या म्हणजे इंदिराजी गांधी होत. देशांतर्गत मैदान राजकारणाचे असो, आतंरराष्ट्रीय रणनीतीचे असो किंवा खेळाचे असो इंदिराजींनी कधीही जातीय भाषीय प्रांतीय भेदभावाला थारा दिला नाही. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारतात आशियाई खेळांचे भव्य दिव्य आयोजन केले होते. समता, समानता व बंधूभाव यांचे त्यांनी नेहमीच स्वागत केले.’’

महात्मा फुले कार्यगौरव पुरस्कार आशिष सुपनार यांना जाहीर

संमेलनाचे मुख्य प्रवर्तक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांची माहिती

सासवड, दि. १९ खानवडी (ता.पुरंदर) येथे सोळाव्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनात पुणे महापालिकेचे विभागीय आरोग्य निरीक्षक आशिष माणिकराव सुपनार यांना राज्यस्तरीय महात्मा फुले प्रशासकीय कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती
संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी २७ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे,
पुणे जिल्हा परिषदेत दुर्गम भागात 4 वर्ष उत्कृष्ठ आरोग्य सेवा केली आहे.
पुणे महानगरपालिकेत 12वर्षे सेवा करीत सर्व सामान्य नागरिकांच्या तक्रार निवारण करीता त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. कोरोना काळात अनेकांचे प्राण वाचवण्यात मोलाचे योगदान दिले. सामाजिक कामात त्यांचा नेहमी सहभाग असतो. उरुळी कांचन येथील सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो.
प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सौ सुप्रिया सुळे,आमदार सजंय जगताप, माजी मंत्री विजयबापू शिवतारे यांच्या हस्ते सुपनार यांना पुरस्कार देण्यात येईल.

मुंबईतील भुजबळांची इमारत लुबाडलेल्या जागेवर – अंजली दमानिया

भुजबळांचे प्रत्युत्तर, सुपारी घेऊन बोलणाऱ्या लोकांबद्दल मी काय बोलणार?

मुंबईसामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. भुजबळांनी बेकायदेशीररित्या घर बळकावल्याचं सांगत त्यांनी घराचे मूळ मालक कुटुंबिय सोबत आणले होते. सुरुवातीला भुजबळांच्या घरासमोर त्यांना बोलू दिलं नव्हतं. नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळांवर आक्षेप घेतले.अंजली दमानिया यांच्या आरोपांना मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, अंजली दमानिया यांच्याबद्दल मी अधिक काही बोलणार नाही. सुपारी घेऊन बोलणाऱ्या लोकांबद्दल मी काय बोलणार? आम्ही कुणाचंही घर लाटलेलं नाही. या प्रकरणाची केस कोर्टामध्ये सुरु असून जो निकाल येईल, तो आम्हाला मान्य असेल.अंजली दमानिया मुंबईत भुजबळांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेणार होत्या. पण पोलिसांनी त्यांना अटकाव केला. यानंतर त्यांनी आपल्या घरीच पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या की, मी आज दाखवणार होते की, मंत्री छगन भुजबळ यांची सांताक्रुझमधील टोलेजंग इमारत ही त्यांची नाही आहे तर लुबाडलेल्या जागेवर उभी आहे. मूळ जागा मालकाला अद्याप एक पैसाही मिळालेला नाही, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी यावेळी केला. ज्या माणसाला उठसुठ छातीत कळ यायची ती कळ कुठे गेली. असा सवालही त्यांनी केला.

भुजबळ यासंदर्भात पुढे म्हणाले की, घरासंबंधीचे कागदपत्र आमच्याकडे आहेत. परंतु मी या कंपनीचा डायरेक्टर नाही. आमचे लोक आहेत. हे सगळं असलं तरी दमानिया यांना असं नाटक करायचं आजच कसं सुचलं? एकीकडे ओबीसींचा लढा सुरु असताना दुसरीकडे असे आरोप केले जात आहेत. काहीही झालं तरी न्यायाच्या पलीकडे मी अजिबात जाणार नाही.

फर्नांडिस कुटुंबाचा एक बंगला होता. तो 1994 ला रहेजाला पुनर्बांधणी करायला दिला. त्याच्या बदल्यात फर्नांडिस कुटुंबाला पाच प्लॅट मिळणार होते. पण अद्याप ते प्लॅट मिळाले नाहीत तर रहेजाने तो बंगला समीर भुजबळ यांच्या कन्स्ट्रक्शनला विकला. त्यानंतर त्यावर बुलडोझर फिरवला गेला. पण फर्नांडिस कुटुंबाला एकही पैसाही मिळालेला नाही. मी काही किरीट सोमया नाही, हातोडा घेऊन टाईमपास करायला. भुजबळ यांनी काल कष्टाच्या पैशाचे खातो, असे जाहीर सभेत म्हटले होते. त्यांचे कष्टाचे पैस हे शा कुटुंबाचे ओरबडून घेतलेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. ज्या कुटुंबाचा आदर करत नाही त्या कुटुंबातील सुप्रिया सुळे यांना याबद्दल माहिती दिली. त्यांनी तीस सेकंदात मला कॉल करुन या प्रकरणाची माहिती घेतली आणि माणूस पाठवून या कुटुंबाची दयनीय अवस्था पाहिली, असेही दमानिया यांनी सांगितले.

विश्वकरंडक भारताने जिंकावा यासाठी ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला साकडे

पुणे -एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करून भारताने अंतिम फेरीत धडक मारली असून रविवारी( दि.१९)होणाऱ्या अंतिम सामन्यात विजयी होऊन विश्वकरंडकावर भारतानेच नाव कोरावे यासाठी शनिवारी ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला साकडे घालण्यात आले
पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल व मित्रपरिवारातर्फे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची महाआरती करून भारताने विश्वचषक जिंकावा अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.यावेळी संयोजक अमित बागुल, नंदकुमार बानगुडे,महेश ढवळे,अभिषेक बागुल, इम्तियाज तांबोळी,सुनील भोसले, सुरेश कांबळे, चेतन अगरवाल, राजु नाणेकर, सुरेश गायकवाड, समीर शिंदे, क्रिकेट कोच मारवाडी, बाबालाल पोळके, राकेश नामेकर, राहुल तौर, जयकुमार ठोंबरे, विश्वास दिघे, गोरख मरळ आदी उपस्थित होते.यावेळी मंदिराबाहेर जल्लोष करून भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छाही देण्यात आल्या.यावेळी अमित बागुल म्हणाले की, यंदा क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने सर्व सामने जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. उत्कृष्ट कामगिरी करत १०पैकी १०सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघ अपराजित राहिला आहे.त्यामुळे यंदाच्या विश्वकरंडकावर भारताचे नाव कोरले जाईल असा आशावाद संपूर्ण देशात आहे.त्यासाठी स्थानिक क्रिकेट खेळाडूंसमवेत ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

पुणे-नगर रोडवरील जड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : खराडी-चंदननगर येथील महालक्ष्मी लॉन्स पुणे नगर रोड या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या सभेच्या निमित्ताने २० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुक कोंडी टाळण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पुणे-अहमदनगर रोडवरील जड-अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश दिले आहेत.

अहमदनगर बाजूकडून पुणे शहराकडे येणारी जड-अवजड वाहने शिक्रापूर येथून चाकण, भोसरीमार्गे पुणे- मुंबईकडे जातील. सदर आदेश अत्यावश्यक सेवेतील वाहने, उदा. पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, पेट्रोल- डिझेल टँकर्स, पीएमपीएमएल बसेस, स्कुल बस यांना लागू राहणार नाही.

…तर शासनाला गावकारभाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल-सरपंच परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत इशारा

गावखेड्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची मागणी
पुणे : गावगाड्याचा कारभार चालवणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक, संगणक परिचालक या प्रमुख घटकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. शासनदरबारी वारंवार मागण्या करूनही गावखेड्यांना सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे. आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार झाला नाही, तर राज्य शासनाला गावकरभाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा गावखेड्यांच्या अपेक्षा मोर्चाच्या सहविचार व पूर्वतयारीच्या राज्यस्तरीय बैठकीतून देण्यात आला.
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पुढाकाराने पुण्यातील पाषाण रोड भागातील सीपीआर इन्स्टिट्युटच्या सभागृहात सरपंच, ग्रामसेवक, संगणक परिचालक, ग्राम रोजगार सेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी या सर्व राज्यस्तरीय संघटनांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील ग्रामपंचायतींना आणि ग्रामविकासाचा गाडा चालवणाऱ्या प्रमुख घटकांना एकत्र करून लढा उभारण्यासाठी ही विचारविनिमयाची बैठक होती. या बैठकीत ग्रामपंचायत चालवणाऱ्या सर्व घटकांच्या संघटनांची एकत्रित मोट बांधण्याचा व यापुढे सर्वांच्या प्रलंबित मागाण्यांसाठी समान कृती कार्यक्रम तयार करून एकत्रित लढा उभारण्याचे धोरण जाहीर करण्यात आले.

सरपंच परिषदेचे जयंतराव पाटील, ग्रामसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजीव निकम, संगणक परिचालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे, ग्राम रोजगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद चव्हाण, सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस विवेक ठाकरे, कोअर कमिटीचे पुरुजीत चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत मोरे, महिला उपाध्यक्षा रेखा विद्याधर टापरे, प्रदेश सल्लागार प्रा. राजेंद्र कराडे आदी प्रमुख उपस्थित होते. प्रदीप माने यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. जळगाव जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे यांनी आभार मानले.

जयंतराव पाटील म्हणाले, “गावखेड्यांना देण्यात येणारी सावत्र वागणूक थांबवावी, सरपंचांना जाहीर केलेले मानधन नियमित अदा करावे, अनियमिततेच्या नावाखाली ग्रामसेवकांना नाहक फौजदारी कचाट्यात अडकवण्याचे प्रकार थांबवावेत, संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा द्यावा, त्यांना खाजगी कंपनीच्या मार्फत नेमून दरसाल कोट्यावधी रुपये वाचवावेत, ग्राम रोजगार सेवकांना दुर्लक्षित करू नये, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता लागू करावा, अशा आमच्या मागण्या आहेत. यावर शासनाने त्वरित निर्णय घ्यावा व आम्हाला न्याय द्यावा.”

“ग्रामपंचायत कारभारात भूमिका असणाऱ्या सर्व प्रमुख घटकांना एकत्र करत शासनाकडे वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांकडे मुद्दाम दुर्लक्ष होत असल्याने येत्या पंधरवाड्यात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे पुन्हा मागणी करण्यात येणार आहे. याबाबत शासनाने तात्काळ धोरण न ठरवल्यास डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभरातील ग्रामपंचायती काम बंद आंदोलन उभारतील, असा निर्धार सर्वानुमते करण्यात आला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या काळात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, संगणक परिचालक व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सर्वांचा सुमारे तीन लाखाचा मोर्चा मुंबई मंत्रालयावर काढण्याचे ठरले आहे,” असेही पाटील यांनी नमूद केले.

आम्ही कुणाची घरे जाळली? त्यांनी घरे जाळली तेव्हा तुम्ही शांत होते..संभाजी राजेंना भुजबळांचा प्रतिसवाल

इगतपुरी-आम्ही कुणाची घरे जाळली? असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजीराजेंना केला. आम्ही कुणाची घरे जाळली? त्यांनी घरे जाळली तेव्हा तुम्ही शांत होते. तुम्ही स्वतः बीडला जाऊन पीडितांची भेट घेण्याची गरज होती. पण तुम्ही त्यांचे अश्रू पुसले नाही. हे तुमचे काम नव्हते का? महाराज, मला मंत्रीपद किंवा आमदार पदाची पर्वा नाही. मी गोरगरीबांसाठी लढणारा आहे. पण, तुम्ही छत्रपती शाहूंच्या गादीवर बसलात, त्यामुळे तुम्ही सगळ्यांना न्याय द्या. कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, असेहि भुजबळ म्हणाले.छगन भुजबळ यांची शनिवारी नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात सभा झाली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ठाम विरोध केला. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची भूमिका त्यांनी मांडली. यावेळी त्यांनी आपली मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांचा चांगलाच समाचार घेतला.

यावेळी त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर एका विशिष्ट जातीची बाजू घेण्याचाही आरोप केला. संभाजीराजे यांनी या वादात पडण्याची गरज नव्हती. ते केवळ एका समाजाची बाजू घेऊन कसे काय बोलतात? असे ते म्हणालेत.संभाजीराजेंनी काल माझ्यावर 2 समाजांत वितुष्ट निर्माण करण्याचा आरोप केला. त्यांनी माझी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. आम्ही त्यांचा आदर करतो. कारण, आमच्या हृदयात असणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांच्या उत्थानाचे काम केले. संभाजीराजे त्यांच्या गादीवर बसलेत. ते एका समाजाचे नाहीत. ते राज्याती सर्व समाजाचे आहेत. पण त्यानंतरही ते एका समाजाची बाजू घेऊन कसे काय बोलतात?

एकतर संभाजीराजे यांनी या वादात पडण्याची गरजच नव्हती आणि पडले तर त्यांनी सर्वांचे अधिकार शाबूत ठेवा, कुणावरही अन्याय करू नका अशी भूमिका घेण्याची गरज होती. आम्हाला त्यांच्याकडून हीच अपेक्षा होती, असे छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा साधला. प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला सहकार्य केले पाहिजे. आम्ही कुठे चुकलो हे त्यांनी सांगावे. राज्यात काय चालले आहे ते पाहा. आम्हाला त्यांच्याकडून दूर ढकलण्याची नव्हे तर सहकार्याची अपेक्षा आहे. या राज्यातील समजदार लोकांनी आमचे म्हणणे ऐकूण घ्यावे, आमचा आक्रोश समजून घ्यावा, असे ते म्हणाले.आम्ही कुणाच्याही आरक्षणाला विरोध करत नाही. पण तुम्ही सर्वच हिरावून घेत आहात. मोदी साहेबांनी (भाजप) 10 टक्के दिले त्यातही 85 टक्के तुम्हीच. कुणबी प्रमाणपत्र घेऊनही तुम्हीच. मग बाकीच्यांनी जायचे कुठे? असा सवालही छगन भुजबळ यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना उपस्थित केला

व्हिडीओ कॉल घेताना सावधान:निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पावणेचार लाख रुपये उकळले

पुणे-लष्करातून निवृत्त झालेल्या एका 64 वर्षीय कर्मचाऱ्यांला अज्ञातांनी अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत3 लाख 74 हजार 232 रुपये ट्रान्स्फर करायला लावून फसवणूक केल्याची तक्रार लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.याप्रकरणी लष्करातून निवृत्त झालेल्या 64 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार फोन वरून बोलणाऱ्या राहुल शर्मा आणि अज्ञात मोबाईलधारकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 ते 17 ऑगस्ट 2023 दरम्यान ऑनलाईन घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लष्करातून निवृत्त झाले असून ते पुण्यातील वाघोली परिसरात कुटुंबा समवेत राहायला आहेत. सायबर चोरट्याने फिर्यादी यांना व्हिडिओ कॉल केला. फिर्यादी यांच्याकडून अवधानाने तो व्हिडिओ कॉल उचलल्या गेल्या. त्यावेळी समोरील व्यक्ती कपडे काढत होती. यामुळे फिर्यादी यांनी व्हिडिओ कॉल लगेच ठेवला. मात्र सायबर चोरट्याने तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला. यानंतर सायबर चोरट्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांना पैशाची मागणी केली. तसेच सायबर चोरट्याने फिर्यादी यांना दिल्ली पोलीस मधून बोलत असल्याचे सांगत व्हिडीओ खूप मोठा असून सोशल मीडियावरून डिलिट करण्यासाठी वेळोवेळी 3 लाख 74 हजार 232 रुपये ट्रान्स्फर करायला लावून फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) एस ढाकणे करत आहेत.

नामदेव जाधवांना शरद पवार समर्थकांचा दणका;तोंडाला फासले काळे…

सत्तेच्या खेळासाठी नाम्या जाधवासारख्याचा वापर करू नका -प्रशांत जगताप

नामदेव जाधव म्हणाले ,ते बौद्धिक गुलाम …याचे परिणाम होतील ,त्यांना शाहू ,फुले आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही

नामदेवराव जाधव हे पत्रकार भवन येथे कार्यक्रम रद्द झाल्याबद्दल माहिती देत असताना शरद पवार गटाच्या काही कार्यकर्ते येऊन त्यांच्या तोंडाला अचानक काळं फासलं. हा सगळा प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्या समोर घडला. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत नामदेवराव जाधव यांना पूर्ण घेराव करत गाडीत बसून त्यांना तात्काळ घटनास्थळावरून रवाना केलं.

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात प्राध्यापक नामदेव जाधव यांना काळं फासलं आहे. संबंधित प्रकार पुण्याच्या पत्रकार भवन या ठिकाणी घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांना काळं फासलं. ते प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत होते, याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यांच्यावर शाईफेक केली. शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी नोंद असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आज आक्रमक झाले आहेत. आमच्याविरोधात कारवाई व्हायची ती होऊ द्या. पण माझं म्हणणं आहे, शरद पवार यांच्याविषयी नामदेव जाधव सातत्याने विरोधात वक्तव्य करत आले आहेत. ते कोणीतरी सोडलेलं पिल्लू आहे, नाही तेव्हा शरद पवारांचे पाया पडायला यायचा. शरद पवारांवर टीका केली तर खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया एका आक्रमक कार्यकर्त्याने दिली. शरद पवारांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या नामदेव जाधव यांना पुण्याच्या पत्रकार भवनाजवळ काळं फासण्यात आलं आहे, अशी प्रतिक्रिया एका महिला कार्यकर्त्याने दिली. नामदेव जाधव यांचा आज भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रम होणार होता. पण भंडारकर इन्स्टिट्यूटने ती परवानगी नाकारली. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर नामदेव जाधव प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी पत्रकार भवनासमोर आले होते. पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पत्रकार भवनसमोर जमले. नामदेव जाधव बोलत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर काळं फासलं. भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये ‘पर्यटनातून उद्योजकतेकडे’ असा व्याख्यानाचा कार्यक्रम होणार होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी करण्यात यावी, या विषयावर भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी फी देखील ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमात नामदेव जाधव प्रमुख व्याख्याते असणार होते. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला.