Home Blog Page 1267

स्टार्टअप सुरू करण्यासाठी शासनाचे सहकार्य-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. १२ : जगात नाविन्य, पेटंट आणि रॉयल्टी या तीन गोष्टींनी प्रगती साधता येणार असून त्यासाठी संशोधनाला महत्व प्राप्त झाले आहे. संशोधनाच्या माध्यमातून स्टार्टअप सूरू करण्यासाठी युवा उद्योजकांना शासनाचे सर्व सहकार्य राहील, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर पुणे यांच्यावतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित युवा उद्योजकांच्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे संस्थापक संचालक आणि उपाध्यक्ष एच. पी. श्रीवास्तव, स्टार्टअप आणि नाविन्यता समितीच्या अध्यक्षा सुप्रिया बडवे, श्रीकांत बडवे, रिलायन्स इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष सुशील बोर्डे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून युवा उद्योजकांना पुरस्कार प्रदान करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगून मंत्री श्री.पाटील म्हणाले, आपण संशोधनावर फारसे लक्ष न दिल्याने देशाला अनेक वस्तू आयात कराव्या लागल्या. देशाचे परावलंबित्व कमी करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नव्या पिढीला संशोधन, कौशल्याकडे वळविण्यासाठी प्रोत्साहन देणे सुरू केले, असेही ते म्हणाले.

संशोधनाच्या माध्यमातून तरुणांनी स्वत: उद्योग उभे करून देशाला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा युवा उद्योजकांना प्रोत्साहन देऊन एकप्रकारे उद्योजक घडविण्याचे कार्य डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर ही संस्था करीत आहे अशा शब्दात श्री.पाटील यांनी संस्थेचे कौतुक केले.

ते पुढे म्हणाले, आज देशात विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती होत असून नव्या पिढीला उद्योगाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. या वातावरणाचा लाभ घेत कोणतेही संशोधन स्पर्धेपुरते मर्यादीत न राहता त्या माध्यमातून बाजाराच्या गरजा कशा पूर्ण करता येतील, आर्थिक उन्नती साधता येईल याचा युवकांनी विचार करावा. या क्षेत्रातील विविध संधींचा लाभ घेत नवी कौशल्ये आत्मसात करावी. डेक्कन चेंबरने तरुण-तरुणींना असेच प्रोत्साहन देवून युवा उद्योजक घडवण्यासाठी यापुढेही कार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संशोधन करण्यासाठी विषयाचे आकलन गरजेचे असते. त्यामुळेच देशात नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी होत असून मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. व्यावहारिक ज्ञान व व्यवसायाभिमुख शिक्षणावरदेखील भर देण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान चांगल्याप्रकारे होऊन त्यांची संशोधनाची वृत्ती वाढण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पतंगोत्सवात वीजयंत्रणेपासून सावध राहण्याचे आवाहन

पुणे, दि. १२ जानेवारी २०२४: मकरसंक्रातीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी असलेल्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आणि इतर वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगावी असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरी व ग्रामीण भागात महावितरणच्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर्स तसेच इतर वीजयंत्रणा सार्वजनिक ठिकाणी आहेत. मकरसंक्रातीनिमित्त पतंग उडविताना पतंग किंवा मांजा वीजयंत्रणेमध्ये अडकण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत नागरिक किंवा लहान मुलांनी लोखंडी सळई, काठीच्या सहाय्याने वीजयंत्रणेमध्ये अडकलेला मांजा किंवा पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये. वीज यंत्रणेमध्ये वीजप्रवाह सुरु असताना वीजतारा, रोहित्र किंवा वीजयंत्रणेत अडकलेले पतंग काढण्याच्या प्रयत्नात वीजयंत्रणेला स्पर्श होण्याचा किंवा त्यावर चढून जाण्याचा जाणते अजाणतेपणी धोका पत्करला जातो. त्यामुळे विजेचा धक्का लागून अपघात होण्याची मोठी शक्यता असते. याशिवाय पतंगाच्या मांज्यामध्ये धातुमिश्रीत कोटींग असल्यामुळे विजेचा धक्क्याने विद्युत अपघातामध्ये जिवितहानी तसेच वीजवाहिन्यांमध्ये शॉर्टसर्कीट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका आहे. 

नागरिकांनी व विशेषतः लहान मुले व तरुणांनी महावितरणची विविध वीजयंत्रणा असलेल्या परिसराऐवजी सुरक्षित व मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे. कोणत्याही परिस्थितीत वीजयंत्रणेमध्ये अडकलेले पतंग किंवा मांजा काढण्याचा प्रयत्न करू नये. अतिशय सुरक्षितपणे व वीजयंत्रणेपासून सतर्क राहून सावधगिरी बाळगत पतंगोत्सव साजरा करावा तसेच तातडीच्या मदतीसाठी २४ तास सुरु असलेल्या महावितरणच्या १९१२ / १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे. 

बंधुतेचा विचार देतो माणूसपण जपण्याचा संस्कार-डॉ. मनोहर जाधव

२५ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटन
पुणे : “सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत काम करताना अनेकदा निराशा वाटेल, असे प्रसंग येतात. पण नेटाने आपले काम सुरु ठेवून रचनात्मक काम उभारले, तर यश निश्चित मिळते. बंधुतेची चळवळ गेली ४०-५० वर्षे सुरु आहे. हा बंधुतेचा विचार समाजातील माणूसपण जपण्याचा संस्कार देतो. त्यामुळे तो विचार जनमानसात रुजायला हवा,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मनोहर जाधव यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, काषाय प्रकाशन पुणे, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय, भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रौप्य महोत्सवी (२५ वे) राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. जाधव यांच्या हस्ते झाले.
नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष कवयित्री मधुश्री ओव्हाळ, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मावळते संमेलनाध्यक्ष प्रा. शंकर आथरे, स्वागताध्यक्ष प्रा. चंद्रकांत वानखेडे, मुख्य निमंत्रक प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, डॉ. अशोककुमार पगारिया, डॉ. संजय गायकवाड, डॉ. सविता पाटील आदी उपस्थित होते. यावेळी २५ कवींना बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दुपारच्या सत्रात कवी विलास ठोसर यांच्या अध्यक्षतेखाली ‘काव्यपंढरी’ कविसंमेलन झाले. रवींद्र यशवंतराव यांना प्रकाशगाथा साहित्य पुरस्कार, संदीप मुरबाड यांना प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार, तर विनोद सावंत यांना प्रकाशपर्व साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. संदीप कांबळे, गुलाबराजा फुलमाळी, ज्ञानेश्वर शिंदे, डॉ. सुशील सातपुते, मीनाक्षी शिंदे, डॉ. भीम गायकवाड, चंद्रकांत धस, नरेंद्र पाटील, प्रकाश फर्डे, विजयकुमार पांचाळ, रोहिदास शिखरे, विजय अंधारे, सरिता कलढोणे, तुकाराम कांबळे, विना व्होरा, पौर्णिमा कुंभारकर, ज्ञानेश्वर काळे, दीपाली वाघमारे या निमंत्रित कवींनी कविता सादर केल्या.
डॉ. मनोहर जाधव म्हणाले, “स्वातंत्र्य, समता व सामाजिक न्यायासाठी लढे उभा राहतात. मात्र, बंधुतेसाठी कोणी लढा देत नाही. बंधुता ही तुम्हा-आम्हाला एका धाग्यात बांधून ठेवणारा विचार आहे. मानवी मूल्यांची जपणूक करत बंधुतेचा हा धागा सर्वांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रकाश रोकडे यांनी जीवन समर्पित केले आहे. चांगले वाचन, आचरण असावे. आपल्या भवतालच्या समाजातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मिळालेल्या योगदानातून आपण समृद्ध होत जातो. त्या समाजाप्रती कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे.”
अध्यक्षीय भाषणात मधुश्री ओव्हाळ म्हणाल्या, “बंधुतेच्या रौप्य महोत्सवी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणे अभिमानास्पद आहे. जातीपातीचे कुंपण छेदून माणसाला माणूस म्हणून जोडण्याचे मूल्य बंधुता देते. स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय प्रत्यक्षात यायचा असेल, तर त्याला बंधुतेची जोड आवश्यक आहे. आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही बंधुतेचा विचार सर्वांपर्यंत पोहोचलेला नाही. देशाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उन्नतीसाठी बंधुतेचा विचार जनमानसात रुजायला हवा. त्यासाठी आपण सर्व बंधू-भगिनींनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे.”
बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “सध्याच्या गोंधळलेल्या, बावरलेल्या भयभीत व चिंताग्रस्त समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी साहित्यिक, विचारवंत, कवी-लेखकांनी सर्वस्पर्शी, समाजाला एकसंध ठेवणारी साहित्यनिर्मिती करावी. बंधुता लोकचळवळ आणखी प्रभावी होण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे.”
डॉ. अशोककुमार पगारिया, डॉ. अरुण आंधळे, प्रा. शंकर आथरे यांनीही मनोगते व्यक्त केली. प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. संगीता झिंजुर्के यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संजय गायकवाड यांनी आभार मानले.

आम्ही चंद्रावर पोहोचलो, पृथ्वीवर महिला सुरक्षित आहेत का? कायदा बदलून काही होणार नाही, मानसिकता बदलण्याची गरज-मध्य प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष ,भाजप आमदार गिरीश गौतम


– एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे भारतीय विद्यार्थी संसदेच्या १३ व्या आवृत्तीच्या तिसर्‍या दिवशी आम्ही चंद्रावर पोहोचलो आहोत, पृथ्वीवर महिला सुरक्षित आहेत का? या विषयावरील सहावे सत्र आयोजित करण्यात आले होते.
पुणे : कायदे करून काहीही होणार नाही, समाजाची इच्छा असल्याशिवाय बदल घडू शकत नाही, बदल घडवून आणण्यासाठी तरुणांना पुढे यावे लागेल, असे मत मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गौतम यांनी एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित १३ व्या भारतीय विद्यार्थी संसदेच्या सहाव्या सत्रात आम्ही चंद्रावर पोहोचलो आहोत, पृथ्वीवर महिला सुरक्षित आहेत का? या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मध्य प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे आमदार गिरीश गौतम होते.
यावेळी खासदार डॉ.फौजिया खान, शास्त्रज्ञ डॉ.टेसी थॉमस, एड. आभा सिंह आणि अभिनेत्री आणि खासदार रूपा गांगुली. तसेच उत्तर प्रदेशातील कैमगंज येथील आमदार डॉ.सुरभी यांना मॉडेल यंग एमएलए पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गौतम गिरीश म्हणाले, कायदे करून काहीही होणार नाही, समाजाची इच्छा असल्याशिवाय बदल घडू शकत नाही.कोणतीही संकल्पना बदलायची असेल तर समाज बदलला पाहिजे. स्त्रीला थोडीशी संधी मिळाली की ती आपले ध्येय गाठते. मानसिकता बदलण्याची गरज आहे.
 डॉ.आभा सिंह म्हणाल्या, तरुण हे कोणत्याही बदलाचे केंद्र असू शकतात. बदल घडवायचा असेल तर तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. तरुण जेव्हा पुढे येतील तेव्हा आपल्या देशात महिला नक्कीच सुरक्षित होतील.  तुमच्या हक्कांसाठी लढल्याशिवाय तुम्हाला हक्क मिळू शकत नाहीत, असे मत डॉ.आभा सिंह यांनी व्यक्त केले. प्रत्येक क्षेत्रात महिलांची विषमता दिसून येते. सर्वोच्च न्यायालयात ३१ पैकी केवळ ३ महिला न्यायाधीश आहेत. महिलांना समान व्यासपीठ दिल्यास ते आपला पराभव करतील, अशी भीती पुरुष वर्गाला वाटते.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हक्क हवे असतील तर कायदा वाचा. ११० पैकी ७० बलात्कारी मोकळे होतात कारण ते एकतर नेत्याशी संबंधित असतात किंवा श्रीमंत कुटुंबातील असतात.
त्यामुळे मौन तोडून संरक्षण मिळवण्यासाठी आवाज उठवा. तक्रारदाराच्या भाषेत तक्रार लिहावी असे सीआरपीसीच्या कलमात लिहिलेले आहे पण आम्हाला कायद्याची माहिती नसल्याने आणि पोलिसांकडे योग्य अनुवादक नसल्याने हे शक्य होत नाही. बदल हवा असेल तर सुरुवात स्वतःपासून करा. असंही त्या म्हणाल्या.
डॉ.टेसी थॉमस म्हणाल्या  की, महिला सुरक्षित राहण्यासाठी सर्वात मोठा घटक म्हणजे शिक्षण. अनेकदा महिलांना शारीरिकदृष्ट्या कमकुवत मानले जाते आणि त्यांना बॅकफूटवर ठेवले जाते, त्यामुळे शाळेत शारीरिक शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.मुली तेव्हाच पुढे जाऊ शकतात जेव्हा त्यांच्यात आत्मविश्वास असेल आणि चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी असेल.
रूपा गांगुली म्हणाल्या की, सध्या जे काही घडत आहे ते पूर्वीही घडत होते, फरक एवढाच आहे की ते रेकॉर्डमध्ये नोंदवले जात आहे. बदल घडवून आणायचा असेल तर कोणाला शिव्या देण्यापेक्षा स्वत:ला आजमावणे चांगले.अडचणींना तोंड देण्याची हिंमत मुलींमध्ये असेल तर त्या बदल घडवून आणू शकतात, महिलांना सुरक्षित वाटू शकते.
सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्या दिवशी मुलं या विषयावर बोलायला लागतील त्या दिवशी लोकांच्या मानसिकतेत नक्कीच बदल होईल.
फौजिया खान म्हणाल्या की, महिलांची सुरक्षा ही केवळ भारतीय समस्या नसून ती जागतिक समस्या आहे. आपण एवढ्या वेगाने पुढे जात आहोत की पुढच्या क्षणी काय होईल हे आपल्याला कळतही नाही.त्यामुळे नेहमी सतर्क राहण्याची गरज आहे. खूप कमी घरे असतील जिथे महिला सुरक्षित असतील, त्यामुळे याची सुरुवात घरापासूनच करा.
जेव्हा आपण सुसंस्कृत समाज निर्माण करतो तेव्हा महिला स्वतः सुरक्षित होतील.
विद्यार्थी नेते तारमिका (हरियाणा), निधी संधीर (दिल्ली), आशिषदीप कौर (पंजाब), अदिती शर्मा (उत्तर प्रदेश), अब्दुल अजीज (आंध्र प्रदेश) यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

महिंद्राची ऑल-इलेक्ट्रिक एक्सयूव्ही 400 प्रो रेंज बाजारात

INR 15.49 लाखांच्या प्रारंभिक किमतीपासून सुरू

*  नवीन प्रो श्रेणी: तीन नवीन प्रकार सादर करत आहे – EC Pro (34.5kWh बॅटरी, 3.3 kW AC चार्जर), EL Pro (34.5 kWh बॅटरी, 7.2 kW AC चार्जर)आणि EL Pro (39.4 kWh बॅटरी, 7.2 kW AC चार्जर).

*सर्व नवीन इंटिरिअर्स: 26.04cm इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 26.04cm डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर प्रीमियम आणि आधुनिक डॅशबोर्डसह अत्याधुनिक ड्युअल टोन इंटीरियरला पूरक आहे

*  प्रगत तंत्रज्ञान: अत्याधुनिक ड्रायव्हिंग आणि मालकी अनुभव प्रदान करणाऱ्या ५० हून अधिक वैशिष्ट्यांसह ऍड्रेनॉक्स कनेक्टेड कार सिस्टम

*वर्धित आराम: ड्युअल-झोन स्वयंचलित तापमान नियंत्रणमागील एसी व्हेंट्स आणि वायरलेस चार्जर

*12 जानेवारी 2024 पासून बुकिंग सुरू होणार आहे; 14:00, INR 21000/- च्या प्रारंभिक बुकिंग रकमेसह बुक केले जाऊ शकते

* डिलिव्हरी ०१ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होईल

*प्रारंभिक किमती INR 15.49 लाख पासून सुरू, 31 मे 2024 पर्यंत डिलिव्हरीसाठी हीच किंमत

मुंबई,महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, भारतातील आघाडीची SUV उत्पादक कंपनीने आज XUV400 प्रो रेंज लाँच केल्याची घोषणा केली आहे, ज्याची प्रारंभिक किंमत 15.49 लाख आहे. या नवीन प्रो श्रेणीमध्ये तीन नवीन प्रकार सादर करते: EC Pro (34.5kWh बॅटरी, 3.3 kW AC चार्जर), EL Pro (34.5 kWh बॅटरी, 7.2 kW AC चार्जर), आणि EL Pro (39.4 kWh बॅटरी, 7.2 kW AC चार्जर), प्रत्येक प्रगत वैशिष्ट्ये आणि उत्तम सोयी देते.

प्रगत तंत्रज्ञान आणि उत्तम आराम:

XUV400 Pro रेंजचे कॉकपिट प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 26.04cm इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 26.04 cm इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा समावेश आहे, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि वापर सुलभतेसाठी डिझाइन केलेले आहे. याला जोडून, ​​Adrenox कनेक्टेड कार सिस्टीम: 50 हून अधिक कनेक्टेड वैशिष्ट्ये ऑफर केल्याने ड्रायव्हिंग सुरक्षितता, मालकीचा अनुभव आणि एकूण वाहन कार्यक्षमता वाढेल.

याव्यतिरिक्त, प्रो रेंज सर्व प्रवाशांसाठी सातत्याने आरामदायी वातावरण सुनिश्चित करण्यासाठी, समर्पित मागील एअर व्हेंट्सद्वारे पूरक ड्युअल-झोन स्वयंचलित तापमान नियंत्रणासह उत्तम अनुभव देईल. वायरलेस चार्जर आणि मागील USB पोर्टची सुविधा प्रवाशांना चालताना जोडलेले राहण्यास मदत करेल.

ऑल-इलेक्ट्रिक SUV वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले वैशिष्ट्यांचा परिचय करून आपली तांत्रिक क्षमता आणखी वाढवेल, जी पुढील काही महिन्यांत ओव्हर-द-एअर फर्मवेअर अपडेट्सद्वारे उपलब्ध करून दिली जाईल. ही सुधारणा, अलेक्सा सुसंगततेसह, सहज नेव्हिगेशन आणि वापरकर्त्यासाठी अनुकूल ड्रायव्हिंग अनुभव देण्याचे वचन देते.

अत्याधुनिक डिझाइन:

XUV400 Pro रेंज त्याच्या उत्साहवर्धक नवीन नेब्युला ब्लू कलर पर्यायासह एक ठळक विधान बनवते, जो एका स्लीक शार्क फिन अँटेनाने पूरक आहे, ज्यामुळे सर्व-इलेक्ट्रिक SUV चे एकूण सौंदर्य वाढते. आतील जागा आराम आणि शैली संतुलित करते, आधुनिक आणि प्रीमियम ड्युअल-टोन इंटीरियर वैशिष्ट्यीकृत करते. गाडीच्या आतली रचना देखील अत्यंत आरामशीर आणि प्रसन्न करणारी आहे. ब्लू बॅकलाइटिंगसह कंट्रोलनॉब्स, शिफ्टलेव्हर आणि व्हेंटबेझल्सवरील सॅटिन-कॉपर अॅक्सेंट, इलेक्ट्रिक पॉवरट्रेनची उपस्थिती हायलाइट करतात. स्पोर्टी, आरामदायी आसने नैसर्गिक-धान्य, छिद्रित चामड्यात सूक्ष्म तांब्याच्या सजावटीच्या शिलाईने गुंडाळलेल्या आहेत, जे एकसंध, सुसंवादी आणि भव्य आतील रचना सादर करतात.

XUV400 प्रो रेंजच्या प्रास्ताविक एक्स-शोरूम किमती:

VariantBattery SizeCharger TypeEx-Showroom Price
XUV400 EC Pro34.5 kWh3.3 kW AC ChargerINR 1549000/-
XUV400 EL Pro34.5 kWh7.2 kW AC ChargerINR 1674000/-
XUV400 EL Pro39.4 kWh7.2 kW AC ChargerINR 1749000/-

सराफी दुकानातील साडेतीन कोटीच्या चोरीत सांगलीच्या चोरट्यांचा सहभाग:फरासखाना पोलिसांची कामगिरी

पुणे- रविवार पेठेतील सराफी दुकानात झालेल्या चोरीत दुकानातील कामगार आणि सांगलीच्या त्यांच्या कुटुंबाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून फरासखाना पोलिसांनी त्यांन अटक केली आहे.

दिनांक ३१/१२/२०२३ रोजी रात्री ०८.०० वाजता ते दिनांक ०१/०१/२०२४ रोजीचे सकाळी १०,०० याजेचे दरम्यान फिर्यादी नामे दिपक माने याचे ७९७ रविवार पेठ पुणे येथील राज कास्टींग नावाचे दुकान कुलूप लावुन बंद असतांना त्याचे दुकानामध्ये सध्या कामासाठी असलेले कामगार किंवा पुर्वी काम करत असलेल्या कामगारांपैकी कोणीतरी फिर्यादी यांचे दुकानाची व तिजोरीची बनावट चावी बनवून त्या चावीने दरवाजा उघडून दुकानामध्ये प्रवेश करुन दुकानामधील लोखंडी तिजोरी बनावट चावीने उघडून त्यामध्ये ठेवलेले एकुण ३कोटी ३२लाख ०९हजार २२८रुपयांचे ५ किलो ३२३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने१०,९३,२६०/- रुपये रोख रक्कम फिर्यादी यांचे संमतीशिवाय चोरुन नेले बाबत दिलेल्या फिर्याद वरून फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ०३/२०२४ भादवि कलम ३८१ प्रमाणे दिनांक ०१/०१/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयाच्या तपासामध्ये फिर्यादीच्या दुकानातील कामगार नामे सुनिल कोकरे हा त्याची आजी वारल्याचे सांगुन त्याच्या गावाकडे दोन दिवसा पूर्वी गेल्याचे समजले होते. परंतु तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे निष्पन्न झाले की, सदर कामगार हा दोन दिवसांपासुन पुणे मध्ये असल्याचे व घटनेच्या वेळी घटनास्थळावर असल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपी सुनिल कोकरे याच्या सोबत पुणे येथे राहणारा त्याचा मित्र अनिल गारळे हा सुद्धा पुणे सोडुन बाहेर गावी गेल्याचे समजले. या अनुषांगाने फरासखाना पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व स्टाफ असे जत सांगली येथे तपासाकरता रवाना झाले. या पथकाने यातील मुख्य आरोपी सुनिल खंडु कोकरे व त्याचा साथीदार सिध्देश्वर ऊर्फ तानाजी राजाराम खांडेकर यास त्याच्या घरी कारंडेवाडी, ता-जत, जि-सांगली येथे ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्हयाबाबत तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. सदरची चोरी त्याचे साथीदार अनिल गारळे व तानाजी खांडेकर यांच्या मदतीने केले असल्याचे सांगितले. परंतु गुन्हयातील मुद्देमाल हा त्यांचा त्यांचा दुसर साथीदार अनिल गारळे याच्याकडे असल्याचे सांगुन तो सध्या कोल्हापुर येथे असल्याचे सांगितले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक मोकाशी व पोलीस अंमलदार गणेश दळवी व प्रमोद मोहीते यांनी सदर आरोपींना ताब्यात घेऊन कोल्हापुर येथे गेले असता तेथे गुन्हे शाखा युनिट १, पुणे शहर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अशिष कवठेकर व स्टाफ यांनी यातील आरोपी अनिल गारळे यास ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोन्ही पथकानी ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींकडे विश्वासात घेऊन तपास करता त्यांनी चोरलेला मुद्देमाल हा सुनिल कोकरे याच्याकडे असल्याचे सांगितले. त्यामुळे सदर आरोपींना घेऊन दोन्ही पथके सुनिल कोकरे याच्या घरी कारंडेवाडी, ता-जत, जि- सांगली येथे आले असता आरोपी सुनिल कोकरे याने चोरी केलेले सोने व रोख रक्कम घरा जवळील शेतातील हत्ती घासमध्ये लपवले असल्याचे सांगितल्याने तेथे पोलीसांनी आरोपीच्या शेतामधुन २ किलो ९८३ग्रॅम ५ मिलीग्रॅम सोने व ७,७३,०७०/- रुपये रोख रक्कम जप्त केली.

सदर आरोपींना या चोरीत दिनांक ०२/०१/२०२४ रोजी अटक करण्यात आली. अटक आरोपींची पोलीस कस्टडी घेवुन त्यांच्याकडे उर्वरीत सोने व रोख रक्कम बाबत तपास करता ते काही एक उपयुक्त माहिती देत नसल्याने फरासखाना पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक, वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मोकाशी व पोलीस अंमलदार प्रमोद मोहीते, मल्लीकार्जुन स्वामी, संदीप कांबळे यांनी आरोपी सुनिल खंडू कोकरे याचे मुळ गावी जावुन त्याच्या घराची व शेताची झडती घेतली असता झडतीमध्ये ४९७ ग्रॅम सोने व १,५०,०००/- रुपये रोख रक्कम शेतामध्ये लपवुन ठेवल्याचे मिळुन आल्याने ते पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहेत. हा मुद्देमाल हा आरोपी सुनिल कोकरे यांची आई राजश्री खंडु कोकरे, भाऊ अनिल खंडु कोकरे, नवनाथ खंडु कोकरे यांनी संगणमत करुन लपवुन ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दाखल गुन्हयात भा.दं.वि कलम ४१४ प्रमाणे कलम वाढ करुन राजश्री कोकरे, अनिल कोकरे, नवनाथ कोकरे यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडे दाखल गुन्हयातील उर्वरीत सोने व रोख रक्कमे बाबत काहिएक उपयुक्त माहिती देत नसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मोकाशी व पोलीस अंमलदारमोहीते, वैभव स्वामी, प्रविण पासलकर, निर्मला शिंदे यांनी आरोपींना घेऊन त्यांच्या मुळ गावी जावुन बी.डी.डी.एस सांगली ग्रामिण व श्वान पथकसांगली ग्रामिण, डी.एस.एम.डीचे मदतीने आरोपीच्या घराची व घरा लगतचे शेतात शोध घेतला असता शेतातील एका पीव्हीसी पाईप मध्ये आरोपीने रोख रक्कम ५०,०००/- रुपये लपवुन ठेवलेली मिळुन आल्याने ती जप्त करण्यात आली आहे.अशाप्रकारे दाखल गुन्हयाचे तपासात आरोपींकडुन एकुण ३ किलो ४८० ग्रॅम ५ मिलीग्रॅम सोने व ९.७३.०७०/- रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले आहेत, दाखल गुन्हयाचा अधिक तपास वैभव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस स्टेशन हे करत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त (अति.कार्य.) श्री. रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री प्रविण पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे, श्री संदीप सिंह गिल्ल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्री. अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.दादासाहेब चुडाप्पा, श्री. शब्बीर सय्यद, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट १. पुणे शहर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री मंगेश जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वैभव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री अशिष कवटेकर, गुन्हे शाखा युनिट १, पुणे शहर, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मेहबुब मोकाशी, निर्मला शिंदे, प्रमोद मोहिते, गणेश दळवी, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, सुमित खुट्टे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, गणेश आटोळे, पंकज देशमुख, तुषार खडके, अजित शिंदे, शशीकांत ननावरे यांच्या पथकाने केली आहे.

बहुजन समाजात सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची क्षमता -श्रीमंत शाहू महाराज छत्रपती

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या छत्रपती ताराबाई वसतीगृहाचे भूमिपूजन

पुणे :   छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन कार्य सुरू केले, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे ठरले ते वसतीगृह. त्या काळातही शिक्षणाची पायाभरणी होण्यासाठी वसतीगृह महत्त्वाचे ठरले, आजही वसतीगृहाचे महत्त्व आहे. या वसतिगृहाच्या माध्यमातूनच शैक्षणिक संस्था सुरू झाल्या आणि शिक्षणाची ज्योत पेटवली गेली. बहुजन समाज एकत्र येऊन काम करत राहिल्यास सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता आपल्या समाजात आहे. राजर्षी शाहू महाराजांमुळे बहुजन समाज आपल्या पायावर उभा राहू शकला आहे, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले. 
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या शिवाजीनगर मधील छत्रपती ताराबाई वसतीगृहाचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी पुनीत बालन ग्रुपचे संचालक पुनीत बालन, माणिकचंद ग्रुपच्या जान्हवी बालन यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार उल्हास पवार,  काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, प्रमिला गायकवाड, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, सत्येंद्र कांचन, विलास गव्हाणे यावेळी उपस्थित होते.

छत्रपती शाहू महाराज म्हणाले, राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्नुषा ताराबाई यांच्या नावाने वसतीगृहाची पायाभरणी झाली आहे ही चांगली गोष्ट आहे.  शिक्षण हे एक असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये जितके काम करू तितके कमी आहे. इतर शैक्षणिक संस्थेच्या बरोबरीने किंवा पुढे जायचे असेल तर सामाजिक आणि वैचारिक लोकांनी यामध्ये अधिक लक्ष घालून जोमाने काम पुढे न्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले. 
पुनीत बालन म्हणाले, पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून नेहमीच गरजू लोकांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असतो.  छत्रपती ताराबाई वसतीगृहाच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले. अण्णा थोरात यांनी प्रास्ताविक केले. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले. 

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट बॉट्स अँड चॅट जीपीटी’ वरील व्याख्यानास प्रतिसाद

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजन

पुणे :

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट बॉट्स अँड चॅट जीपीटी’या विषयावर माहिती -तंत्रज्ञान आणि संगणक तज्ज्ञ डॉ.दीपक शिकारपूर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.भारती विद्यापीठाच्या धनकवडी शैक्षणिक संकुलात झालेल्या या व्याख्यानाला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.विदुला सोहोनी,कुलसचिव जी.जयकुमार,उपप्राचार्य डॉ.सुनीता जाधव,उपप्राचार्य डॉ.सचिन चव्हाण,डॉ.कुलदीप राडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.शिकारपूर म्हणाले,’डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.या नव्या तंत्रामुळे मानवी प्रतिभेला धोका नाही.मात्र,जग एकमेकांशी जोडले गेल्याने खासगीपणा उरलेला नाही.आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे मोठ्या प्रमाणावरील माहिती साठ्याचे विश्लेषण लगेच करता येत असले तरी माहिती साठ्याची गोपनीयता धोक्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शैक्षणिक क्षेत्रात उपयोग करून अगदी व्यक्तिगत पातळीवरील शैक्षणिक,अध्यापनाची व्यवस्था करणे शक्य आहे. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमीत्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थी.प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

डॉ.जी.जयकुमार म्हणाले,’आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरील अवलंबित्व वाढल्यास मानवी मेंदूच्या विश्लेषणावर,समस्या सोडवणुकीच्या क्षमतेवर मर्यादा येऊ शकतात.डॉ.सुनीता जाधव यांनी उपक्रमांचा आढावा घेतला.

वंचितांची नेमकी संख्या समजावी यासाठी जातगणना आवश्यक-डॉ. अजॉय कुमार

भारतीय छात्र संसदेचे पाचवे सत्र संपन्न
पुणे – दि. १२ जानेवारी – भारतीय समाज अनेक जातींमध्ये विभागला आहे. हे वास्तव स्वीकारून, प्रत्येक समाजघटकाला न्याय मिळावा, या हेतून जातगणना आवश्यक आहे. जातींची संख्यात्मक आकडेवारी समोर आल्याशिवाय समाजातील मागासलेल्या, वंचित घटकांचे नेमके चित्र समोर येणे अवघड आहे, असे मत काँग्रेस पक्षाचे जमशेदपूर येथील माजी खासदार डॉ. अजॉय कुमार यांनी मांडले
एमआयटीच्या भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल आफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस यूनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या भारतीय छात्र संसदेच्या पाचव्या सत्रात ते बोलत होते. डाटा, डायव्हर्सिटी अँड डेमॉक्रसी – कास्ट सेन्सस डायलेमा असा चर्चासत्राचा विषय होता.
डॉ. अजॉय कुमार म्हणाले, ’आधुनिक शैलीचे जीवन जगणारी शहरे वगळता गावात, खेड्यात गेले, की तुम्हाला आधी जात समजते. विशिष्ट जातींना सामाजिक सुविधा, हक्क, अधिकारांपासून कायम वंचित ठेवले जाते. जातींमध्ये विभागलेल्या समाजामुळे आपल्या देशातील ७५ टक्के संपत्तीचा उपभोग अवघे १० टक्के लोक घेतात, हे वास्तव आहे. या वास्तवाची विदारकता समजून घ्यायची असेल, तर जातगणनेची आवश्यकता आहे. नेमकी आकडेवारी समोर आली, की समस्येचे नेमके स्वरूपही समजण्यास मदत होते. जातींची गणना हा समाजाचा एक्सरे असतो’.
डॉ. संजय कुमार म्हणाले, ’आपल्या देशात जातींची इतकी विविधता आहे, की आकडेवारी (डेटा) मिळणे, आवश्यक आहे. डेटा समोर आला, की विविधतेचे स्वरूपही पुढे येते. विविध जातींचे समाजसमूह नेमक्या किती संख्येने आहेत, हे चित्र पुढे आले, की थर्मामीटर प्रमाणे नेमके तापमान समजणे सोयीचे होते. कुठल्याही योजना कार्यान्वित होतात, त्या आकडेवारीच्या जोरावर. त्यामुळे जातींचे वास्तव मान्य करून जातगणना करणे आवश्यक आहे. विविधतेचा आदर करण्यासाठीही विविधतेची आकडेवारी पुढे आली पाहिजे. त्यातून सामाजिक विषमतेचे स्वरूपही समजून घेणे सोपे जाईल’.
प्रा. मनोजकुमार झा म्हणाले, ’आपल्या समाजाची मानसिकता वेगळी आहे. आपल्याला सतत कुणीतरी जादूगार लागतो, जो आपल्या समस्यांची सोडवणूक करेल. साधनसामग्रीची अनुपलब्धता विशिष्ट समाजांना मागास ठेवते, हे वास्तव आहे. लोकशाही समाजव्यवस्थेत असे घडावे, ही कोंडी विचित्र आहे. जातगणना आवश्यक आहे, असे माझे मत आहे. अशी गणना केल्याने जातीयवाद वाढेल, असे मला वाटत नाही. लोकशाहीचे सामाजिकीकरण होण्याची आवश्यकता आहे, ज्यासाठी जातगणना पूरक ठरेल’.
यावेळी आदर्श युवा विधायक सन्मान झारखंडच्या आमदार पूर्णिमा नीरज सिंग यांना एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अनुराग शुक्ला, क्षितिज नाईक, सौरभसिंग जरीयाल, आकाश सपकाळे आणि विधान मलिक या विद्यार्थी प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अक्षय मल्होत्रा यांनी आभार मानले. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

चीनी मांजाची छुपी विक्री थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावीत-डॉ. कल्याण गंगवाल

जखमी पक्ष्यांच्या बचावकार्यासाठी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानतर्फे हेल्पलाईन सुरु
पुणे : मकरसंक्रातीच्या निमित्ताने पतंग आणि मांजा बाजारात दाखल झाला आहे. चीनी आणि नायलॉन मांजामुळे गेल्या काही वर्षात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. मांजाने गळा कापल्याच्या घटना ताज्या आहेत. मांजामुळे पशु-पक्षांना मोठा धोका निर्माण होतो. या मांजाच्या वापरावर कायद्याने बंदी असूनही छुप्या पद्धतीने त्याची विक्री होत आहे. माणसांच्या जीवावर बेतणारा हा चीनी मांजा विकणार्‍यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि चिनी मांजाच्या विक्रीला आळा घालावा, अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली. या मांजामुळे जखमी होणार्‍या पक्ष्यांच्या बचावासाठी हेल्पलाईन सुरु केल्याची माहितीही त्यांनी दिली.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पतंगबाजी करणार्‍यांची लगबग सुरु होते. बाजारात विविध प्रकारचा मांजा येतो. बोहरी आळीसह शहर आणि उपनगरांतील छोट्या-मोठ्या दुकानांत हा मांजा विकला जातो. बहुतांश मांजा चीनी किंवा नायलॉनचा असतो. त्यामुळे अपघातांचे प्रकार वारंवार घडताना आपण पाहिले आहे. पुणे, नागपूर, नाशिकसह अन्य शहरात मांजाने गळा कापल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अशा मांजाची निर्मिती, विक्री, साठवण, खरेदी व वापर यावर कायद्याने बंदी आहे. चीनी मांजा सापडल्यास संबंधितांवर पाच वर्षांचा तुरुंगवास व एक लाखाच्या आर्थिक दंडाची तरतूद आहे. मात्र, शासकीय यंत्रणेच्या ढिलेपणामुळे हा मांजा बाजारात विकला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या आधी घडलेल्या दुर्घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन चीनी मांजा विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. तसेच राष्ट्रीय हरित लवादाने याप्रकरणी लक्ष घालावे, अशी आमची मागणी आहे.”
या मांजाला माणसांसह अनेक पक्षीही बळी पडतात. त्यामध्ये कबुतरे, कावळे, घुबड, पोपट, घार आणि फुलपाखरे यांचा समावेश आहे. जखमी पक्ष्यांच्या बचावासाठी सर्वजीव मंगल प्रतिष्ठान गेल्या २० वर्षांपासून काम करीत आहे. गेल्या आठ वर्षात जवळपास २५०० पक्ष्यांना वाचविण्यात यश आले आहे. यंदाही एक अ‍ॅम्ब्युलन्स, एक पशुवैद्यकीय डॉक्टर आणि चार-पाच कार्यकर्ते ही बचावकार्य मोहिम महिनाभर राबविणार आहेत. त्यासाठी हेल्पलाइन सुरु करण्यात आली असून, यामध्ये रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेस्क्यू वाइल्डलाइफ टीटीसी या संस्थांचे सहकार्य मिळाले आहे. जखमी पक्ष्यांबाबत डॉ. कल्याण गंगवाल (९८२३०१७३४३), सुनील परदेशी (९८२३२०९१८४), गौरव गाडे (७०३०२८५५२०) किंवा रेस्क्यू वाईल्ड लाईफ (९१७२५१११००) या क्रमांकावर माहिती देऊन अहिंसा प्रेमी नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. गंगवाल यांनी केले.
मांजा देणाऱ्यांना बक्षीससंक्रांतीच्या निमित्ताने शहरातील वेताळ टेकडी, तळजाई टेकडी, हनुमान टेकडी यासह अन्य ठिकाणी पतंग उडवण्यास लोक जातात. इथे अनेकदा मांजा झाडावर अडकलेला दिसतो. हा मांजा जमा करून आणून देणाऱ्यांना संस्तेतर्फे ५०० रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे, असेही डॉ. गंगवाल यांनी नमूद केले.

25 ते 28 जानेवारीपासून एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन – 2024 चे आयोजन

पुणे : पुणे शहरातील प्रसिध्द पुष्प प्रदर्शनाची पुण्यासहित देश-विदेशातील वाट पाहत असतात, अशा एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन – 2024 चे आयोजन 25 ते 28 जानेवारीपासून केले आहे.
पुष्पप्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना. यंदाच्या वर्ष देखील जपानी पध्दतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती या पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील.या वर्षीच पुष्प प्रदर्शन दि. 25 जाने. ते 28 जाने. 2024 या दरम्यान होत असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दि. 25 जानेवारी रोजी दुपारी 12.00 वाजता, श्री. विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त, ट्रॅफिक विभाग यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्यानंतर प्रदर्शन सर्वांसाठी रात्रौ 7. 30 पर्यंत सर्वांसाठी खुले राहील.26, 27 आणि 28 जानेवारी रोजी प्रदर्शन सकाळी 9 ते सायं. 7. 30 या वेळेत सुरू राहील. अशी माहिती सुरेश पिंगळे (मानद सचिव, एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन), अनुपमा बर्वे (मानद सहसचिव) यशवंत खैरे (मानद सचिव), निलेश आपटे (रोज सोसायटी) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी खास मुलांसाठी चित्रकला व हस्ताक्षर लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात येतात. या स्पर्धेस निरनिराळ्या शाळांमधून सुमारे 1000 ते 1200 विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यंदाच्या वर्षी देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व हस्ताक्षर लेखन स्पर्धा रविवार दि. 21 जाने. 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
अ‍ॅग्री हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन केले जाते. बागेचे व्यवस्थापन करीत असताना संस्थेमार्फत नेहमी अनेक विविध समाजपयोगी उपक्रम बागेत राबविले जातात. ज्यायोगे सर्वसामान्य व्यक्तीला निसर्गाबद्दल व पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होईल व प्रत्येक व्यक्तीला त्यापासून काही विरंगुळा मिळेल या उद्देशाने अ‍ॅग्री हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था 1830 पासून कार्यरत आहे.दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डन येथे पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. सुरवातीच्या काळात पुष्प प्रदर्शन म्हणजे केवळ ठराविक वर्गाचा विरंगुळा मानला जात होते. मात्र संस्थेने कालानुरूप त्यामध्ये बदल केल्यामुळे आज जे पुष्प प्रदर्शन भरविले जाते त्यामध्ये अबाल- वृद्धांचा सहभाग असतो. सर्वसामान्यांचा पुष्पप्रदर्शनामध्ये अधिक सहभाग वाढविण्यासाठी बागप्रेमींसाठी निरनिराळ्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. तसेच फुलांची कलात्मक मांडणी, भाजीपाला स्पर्धा, आकर्षक व शोभिवंत पानांच्या कुंड्या तयार करणे, इ. गोष्टींच्या स्पर्धा या निमिताने आयोजित करण्यात येतात.
 तसेच बागेतील विविध फुले देखील सर्वसामान्य व्यक्ती या प्रदर्शनामधील स्पर्धेत मांडू शकतात. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.केवळ स्पर्धे पुरते मर्यादित न राहता. पुष्प प्रर्दशनानिमित्ताने बागेस भेट देणार्‍या पुष्प रसिकांना नव्याने सजलेल्या एम्प्रेस गार्डनचा देखील आनंद घेता येतो. पुष्प प्रदर्शनानिमित्त दरवर्षी बाग विविध प्रकारच्या उद्यान रचना, आकर्षक कुंड्यांची मांडणी, विविध पानाफुलांची रचनात्मक मांडणी करून आकर्षक रीत्या सजविण्यात येते. त्यामुळेच तर पुष्प रसिक या पुष्प सोहळ्याची वर्षभर आतुरतेने वाट पहात असतात.पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इ. ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्पप्रदर्शना मध्ये सहभागी होण्याकरिता येत असतात.

‘छत्रपती संभाजी’ मराठी रुपेरी पडद्यावर

स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरी देह झिजवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे रणांगणावरचे अस्सल शेर होते. ज्यास कवेत घेताना, खुद्द मृत्यू ही ओशाळला. स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे,छत्रपती संभाजी महाराज  म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्व.  धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या  या महान योद्धयाचा  इतिहास  मराठी रुपेरी पडद्यावर  उलगडणार आहे. राकेश सुबेसिंह  दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित  ‘छत्रपती  संभाजी’ हा मराठी चित्रपट येत्या २६ जानेवारी २०२४ रोजी आपल्या भेटीला येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी म्हणजे  बलिदान भूमी वडू बुद्रुक, पुणे येथे  या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. ‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत ‘छत्रपती संभाजी’ हा  चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.   

छत्रपती संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्षे मुघल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत, स्वराज्याला टिकवले आणि वाढविले. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या साम्राज्याचा विस्तार केला. हिंदवी स्वराज्य निर्माण करणं हे सहज शक्य नव्हतं, पण त्याहून कठीण होतं ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं, वाढवणं. छत्रपती संभाजी महाराजांनी हे आव्हान स्वीकारलं आणि सक्षमपणे पेललं सुद्धा. अद्वितीय राजकरण, आक्रमक रणनीती आणि रणकौशल्याच्या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलेला  प्रेरणादायी इतिहास  ‘छत्रपती  संभाजी’ या चित्रपटातून  तरुण पिढीला पाहता येणार आहे.  

प्रमोद पवार, शशांक उदापूरकर,रजित कपूर, दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ  धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख , कै. आनंद अभ्यंकर,समीर,मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार  ‘छत्रपती संभाजी’  चित्रपटात आहेत.       

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा  सुरेश चिखले यांची आहे. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी  दिले आहे.  छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. कला अनिल वठ यांची आहे. साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत. 

पुणे -सोलापूर रस्त्यावर कार रस्त्याच्या बाजूला घेतल्याने कारची तोडफोड:टोळक्याकडून चालकाला मारहाण

पुणे:पुणे -सोलापूर रस्त्यावर मांजरी याठिकाणी कावेरी हॉटेलच्या समोरील बाजूस एका कार चालकानी पुण्याहून पाटसकडे जात असताना, रस्त्याच्या कडेला इंडिकेटर लावून कार उभी केली. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चार आरोपींनी कार बाजूला का घेतली ?या कारणावरून कारचालकाला बेदम मारहाण करत कारची तोडफोड केली.तसेच कारचालकाच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून नेण्याचा प्रकार घडला आहे .

याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात कुणाल कल्याणराव शितोळे (वय -35 ,राहणार – उरळी कांचन, तालुका -हवेली ,पुणे )यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे .त्यानुसार किरण फडतरे, सचिन चोरघडे ,सागर उर्फ नाना चोरघडे व त्याचे इतर चार साथीदार (सर्व राहणार -फुरसुंगी ,पुणे )याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कुणाल शितोळे व त्यांचा मित्र अविनाश मोरे हे एका कारमधून पुण्याहून पाटसकडे जात होते. त्यावेळी गाडी साईडला इंडिकेटर लावून उभी असताना, दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी ‘तू अचानक गाडी बाजूला का घेतली ‘असे म्हणून तक्रारदार यास हाताने मारहाण केली.त्यानंतर इतर आरोपींना घटनास्थळी बोलवून गाडीची दगडाने तोडफोड करून ,चालकाच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून दिली.तसेच तक्रारदार यास’ तू जर माझ्याविरुद्ध तक्रार केली तर, मी तुझ्याविरुद्ध चिठ्ठी लिहून आत्महत्या करील ‘अशी धमकी आरोपी किरण फडतरे यानी दिली.सदर घटनेनंतर तक्रारदार यांनी हडपसर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही दाभाडे करत आहे.

स्वानुभवातील लेखन प्रेरक व प्रभावी : डॉ. शशांक शहा

वेलनेस कोच सोनल देसाई व ब्रायन ट्रेसी लिखित ‘अल्टिमेट सिक्रेट्स ऑफ वेल्थ’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : “जीवनात यशस्वी होण्यात वय नाही, तर स्वतःमधील इच्छाशक्ती, जिद्दीने केलेले प्रयत्न, आप्तस्वकियांचा पाठिंबा गरजेचा असतो. भवतालच्या परिस्थितीतून अनुभव घेत, त्यातून शिकत आपण स्वतःला समृद्ध करत असतो. त्यातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतो. अशावेळी स्वतःच्या अनुभवांना शब्दांमध्ये बांधत केलेले लेखन इतरांसाठी प्रेरक व प्रभावी असते,” असे मत प्रसिद्ध बॅरिऍट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी व्यक्त केले.
होलिस्टिक वेलनेस कोच आणि ब्रेथवर्क फॅसिलिटेटर सोनल देसाई व कॅनडियन-अमेरिकन मोटिवेशनल स्पीकर ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेल्या ‘अल्टिमेट सिक्रेट्स ऑफ वेल्थ’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. शहा यांच्या हस्ते झाले. कोरेगाव पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ. पूनम शहा, उद्योजक चकोर गांधी, लेखिका सोनल देसाई, त्यांचे पती व उद्योजक पंकज देसाई आदी उपस्थित होते. गृहिणी ते वेलनेस गुरु असा सोनल यांचा थक्क करणारा प्रवास यावेळी प्रकाशनाच्या निमित्ताने उलगडला.
सोनल देसाई म्हणाल्या, “माझा हा प्रवास परम योग इन्स्टिट्यूटमधून २०१५ मध्ये योग शिक्षक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरु झाला. माझ्यातील ज्ञानाची आसक्ती व शिकण्याची इच्छा यामुळे २०१७ मध्ये मी तिबेटियन ब्रेथवर्क व मेडिटेशनसाठी कैवल्य योग इन्स्टिट्यूटकडे गेले. तसेच इस्टोनिया येथील माईंडव्हॅली विद्यापीठातुन ‘होलोबॉडी’ अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणित ‘सिल्वा मेथड सिक्स फेज मेडिटेशन फॅसिलिटेटर’ बनले. डॉ. स्नेह देसाई यांच्याकडे ‘ट्रेन द ट्रेनर’ हा कार्यक्रम केला. त्यामुळे माझी खूपच प्रगती झाली.”
“प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्ल्यून्सर स्नेहा देसाई, ज्वेलरी डिझाइनर तन्वी देसाई व सिनेमॅटोग्राफर विराग देसाई यांचे उत्तम संगोपन करताना मला हा मार्ग सापडला आणि ब्रायन ट्रेसी यांच्यासोबत लेखन करण्याची संधी हा माझ्यासाठी आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे. हे पुस्तक संपत्तीच्या रहस्यांचा अभ्यास करते, वैयक्तिक विकासावरील व्यावहारिक अंतर्दृष्टीसह सर्वांगीण आरोग्य पद्धती एकत्र करते. जीवनात आनंदी, निरोगी व आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असे वाटते,” असे सोनल देसाई यांनी नमूद केले.
स्नेहा देसाई व तन्वी देसाई यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. अतिशय रोमांचक शैलीत दोघीनींही आपल्या आईचा प्रवास उलगडला. विराग देसाई यांनी सर्वांचे आभार मानले.

अपने अपने राम’ रामकथा कार्यक्रमासाठीउभारण्यात येणाऱ्या रामनगरीची पायाभरणी

संस्कृती प्रतिष्ठान, शि. प्र. मंडळीच्या वतीने १८ ते २० जानेवारीला राम कथा कार्यक्रम
पुणे : संस्कृती प्रतिष्ठान व शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अपने अपने राम’ या राम कथा कार्यक्रमस्थळाचे भूमिपूजन व उभारण्यात येणार्‍या रामनगरीची पायाभरणी शुक्रवारी (दि. १२) करण्यात आली. डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून १८, १९, २० जानेवारी २०२४ अशी तीन दिवस ही राम कथा स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे.
शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत विशेष संपर्कप्रमुख किशोर चव्हाण, पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्या हस्ते विधिवत पूजा करून, श्रीफळ वाढवून भूमिपूजन व वासा पूजन पार पडले.
यावेळी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक अजय खेडेकर, हेमंत हरहरे, मकरंद देशपांडे, धनंजय बर्वे, विनीत कुबेर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन भोसले म्हणाले, “अयोध्येत २२ तारखेला होत असलेल्या प्राणप्रतिष्ठेला सर्वांना जाता येणार नाही. मात्र, मोहोळ यांच्या पुढाकारातून येथे उभारण्यात येणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृतीमुळे पुणेकर राम भक्तांना अयोध्येतील सोहळ्याची अनुभूती घेता येणार आहे.”
धीरज घाटे, किशोर चव्हाण यांनीही या भव्यदिव्य कार्यक्रमातून भक्तांना राम कथा ऐकण्याची संधी मिळणार असून, हा कार्यक्रम अतिशय देखणा होईल. हा कार्यक्रम निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे धीरज घाटे यांनी नमूद केले.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून रामकथा ऐकण्यासाठी रोज एक लाख लोक बसतील, अशा स्वरूपाची व्यवस्था करण्यात येत आहे. अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती आकर्षण असणार असून, त्याच व्यासपीठावरून डॉ. विश्वास निरूपण करतील.