Home Blog Page 1098

सोळाव्या वित्त आयोगाने  कंत्राटी आधारावर  तरुण व्यावसायिक (वायपी)/ सल्लागार पदासाठी मागवले अर्ज

सोळाव्या वित्त आयोगाने कंत्राटी आधारावर  तरुण व्यावसायिक (वायपी)/ सल्लागार पदासाठी अर्ज मागवले आहेत. सोळाव्या वित्त आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर (https://fincomindia.nic.in ) पात्रता, संदर्भ अटी, वेतन  आणि अर्ज नमुना अपलोड केला आहे.

आयोगामध्ये तरुण व्यावसायिक/ सल्लागार या हंगामी पदासाठी इच्छुक अर्जदार त्यांचे अर्ज योग्यरित्या भरलेल्या प्रपत्रात, संचालक, 16 व्या वित्त आयोगाला फक्त manish.kr1975[at]nic[dot] या ईमेलद्वारे पाठवू शकतात. तसेच त्याची प्रत rahul.sharma89[at]nic[dot] वर पाठवून त्यांचे स्वारस्य व्यक्त करू शकतात. कृपया यासाठी कोणतीही प्रत्यक्ष प्रत पाठवू नये.

अधिक माहितीसाठी आणि 16व्या वित्त आयोगातील तरुण व्यावसायिक आणि सल्लागारांच्या नियुक्तीबाबतची मार्गदर्शक तत्त्वे पाहण्यासाठी येथे क्लिक करा:

https://fincomindia.nic.in/asset/doc/Guidelines%20for%20YPs%20&%20Consultants%20in%2016th%20Finance%20Commission.pdf

मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करा; जिल्हाधिकाऱ्यांचे नवमतदारांना आवाहन

पुणे, दि.१२: नवमतदारांनी लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे आणि प्रथम मतदान करून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने आयोजित युवक मेळाव्यात सहभागी युवकांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे डॉ.दिवसे यांनी संवाद साधला. यावेळी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, तहसिलदार राधिका बारटक्के उपस्थित होते.

डॉ.दिवसे म्हणाले, मतदानाद्वारे आपण चांगले प्रतिनिधी निवडूण देवू शकतो. देशाचे भविष्य असलेल्या युवकांनी या प्रक्रियेत सहभाग वाढाविणे गरजचे आहे. नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वर्षभरात अनेक उपक्रम राबविले आहे. तरीदेखील जिल्ह्यातील युवकांच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ २५ ते ३० टक्के मतदारांनी मतदार नोंदणी केली आहे.

पुणे, शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी करून इच्छिणाऱ्या युवकांसाठी १५ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत मतदार नोंदणी करण्याची संधी आहे. युवकांनी निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://voters.eci.gov.in किंवा वोटर हेल्पलाईन ॲपवर आपल्या जागेवरच मतदार नोंदणी करण्याची सुविधा आहे. मतदार नोंदणीसाठी केवळ रहिवासी आणि वयाचा पुरावा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

वयोवृद्ध मतदारांचा आदर्श समोर ठेवा
जिल्हाधिकारी म्हणाले, लोकशाही बळकट करण्यात वयोवृद्ध मतदारांचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यात 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांना द्यावयाच्या सुविधेबाबत त्यांच्याशी संपर्क केला असता मतदान केंद्रावर अभिमानाने मतदान करण्याची इच्छा अधिकांश ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. त्यांच्या या कर्तव्यभावनेचा आदर्श युवकांनी समोर ठेवावा आणि मतदार नोंदणी तसेच मतदानात सहभाग घ्यावा. महाविद्यालयाच्या विविध उपक्रमातदेखील उत्साहाने सहभागी होऊन नेतृत्वगुण आणि संवादकौशल्य विकसित करावे. समाज माध्यममांचा उपयोग सकारात्मकता निर्माण करण्यासाठी करावा आणि आपल्या सहभागातून समाज आणि देश समृद्ध करावा, असे आवाहन त्यांनी केले.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाने लोकशाही व्यवस्था स्वीकारली. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. अनेक देशात महिलांना मताधिकारासाठी लढा द्यावा लागला, मात्र भारताने स्वातंत्र्यानंतर संविधानाद्वारे महिलांना मताधिकार प्रदान केला. अशा लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीला महत्व असताना पुण्यासारख्या शहरी भागात राज्यात होणाऱ्या सरासरी मतदानापेक्षा कमी मतदान होते. लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करणे महत्वाचे आहे, असेही श्री.दिवसे म्हणाले.
0000

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांची बैठक

चंद्रपूर, दि. १२: चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगांचे जाळे पसरले असल्यामुळे येथे कामगारांची संख्या खूप मोठी आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजे 19 एप्रिल रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असून औद्योगिक आस्थापनांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

नियोजन भवन येथे आयोजित बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, शिक्षणाधिकारी (माध्य.) निकिता ठाकरे तसेच औद्योगिक क्षेत्रातील विविध संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

औद्योगिक संस्थांनी त्यांच्या स्तरावर एक स्वीप नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी. तसेच 13 – चंद्रपूर लोकसभा क्षेत्रांतर्गत गत निवडणूकीमध्ये ज्या मतदान केंद्रावर 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते, अशा मतदान केंद्र परिसरातील मतदारांमध्ये उत्साह निर्माण व्हावा व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या थीम ठेवून त्यावर आधारीत मतदान केंद्र करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. यावेळी औद्योगिक संस्थेस मतदान केंद्र निश्चित करून देण्यात आले.

मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सुट्टी देण्यात येते किंवा कामाच्या ठिकाणी योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये संस्था, खासगी आस्थापना इत्यादी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागते. हे लक्षात घेता, या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे.

ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे.

मतदारांनो जिंका मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल

मतदान केल्यानंतरचा सेल्फी अपलोड करून सहभागी होण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आकर्षक स्पर्धा

चंद्रपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे तसेच नवमतदार म्हणजेच युवा वर्गाचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग वाढावा, यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ ही स्पर्धाआयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात सहभाग घेऊन विजेत्या पहिल्या तीन मतदारांना अनुक्रमे मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल मिळणार आहे.

लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदान करून देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी आपला सहभाग नोंदविणे अत्यंत महत्त्वाचे आहे.  13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी 2118 मतदान केंद्रावर होणार असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. 18 वर्षांवरील प्रथम मतदार मोठ्या संख्येने असल्याने व युवकांमध्ये मतदानाप्रती उत्साह निर्माण होण्यासाठी प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे.

19 एप्रिल रोजी मतदान केल्यानंतर मतदारांनी शाई लावलेले बोट दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करावा व आपला फोटो अपलोड करून ‘तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ या स्पर्धेत सहभागी व्हावे. फोटो अपलोड करण्यासाठीची लिंक / क्यूआर कोड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://chanda.nic.in/en/divisions/collector-office-contact-details/  तसेच जिल्हा परिषदेच्या https://zpchandrapur.co.in/ वेबसाईटवर उपलब्ध आहे.

स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांकरीता प्रथम पारितोषिक 1 लक्ष 60 हजार रुपयांची अपाची मोटारसायकल, द्वितीय पारितोषिक उच्च प्रतीची रेसींग सायकल आणि तृतीय पारितोषिक ॲड्राईड मोबाईल फोन देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

जेएसडब्ल्यू वन प्लॅटफॉर्म्सने डॉ. रंजन पै यांची त्यांच्या बोर्डावर स्वतंत्र संचालक म्हणून केली नियुक्ती

मुंबई –– जेएसडब्ल्यू वन प्लॅटफॉर्म हा 23 अब्ज डॉलरच्या जेएसडब्ल्यू समूहाचा भाग असून, कंपनीने डॉ. रंजन पै यांची त्यांच्या बोर्डावर स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ. पै यांच्याकडे शिक्षण, आरोग्यसेवा, उद्योजकता आणि गुंतवणुकीत भरपूर अनुभव आणि कौशल्य आहे. त्यांचा हा अनुभव आणि कौशल्य जेएसडब्ल्यू वन प्लॅटफॉर्मच्या सर्व भागधारकांसाठी नाविन्य आणि मूल्य निर्मितीच्या वचनबद्धतेशी साजेसे आहे. जेएसडब्ल्यू वन प्लॅटफॉर्मवर स्वतंत्र संचालक म्हणून डॉ रंजन पै त्यांच्या अनुभवातून घेतलेले धोरणात्मक मार्गदर्शन करतील. भारतातील टेक स्टार्ट-अप्सना गुंतवणुकीचा आणि मार्गदर्शन करण्याच्या त्यांच्या अनुभवासह शिक्षण, आरोग्य सेवा या क्षेत्रांबद्दलची त्यांची सखोल माहिती जेएसडब्ल्यू वन प्लॅटफॉर्म्सचे भविष्य घडवण्यात आणि त्याच्या भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यासाठी बहुमोल ठरेल.

डॉ रंजन पै हे शिक्षणतज्ञ, उद्योजक, संस्था बिल्डर आणि गुंतवणूकदार आहेत. ते मणिपाल एज्युकेशन अँड मेडिकल ग्रुप (MEMG) चे संस्थापक आणि अध्यक्ष असून त्यांची शिक्षण, आरोग्यसेवा, संशोधन आणि खाजगी गुंतवणूक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, MEMG ने भारतात आणि परदेशात शिक्षण आणि आरोग्य सेवा क्षेत्रात योगदान दिले आहे.

डॉ रंजन पै यांचे संचालक मंडळावर स्वागत करताना, जेएसडब्ल्यू वन प्लॅटफॉर्मचे संचालक श्री पार्थ जिंदाल म्हणाले” जेएसडब्ल्यू वनच्या बोर्डावर एक स्वतंत्र संचालक म्हणून डॉ. रंजन पै यांचे स्वागत करण्याची ही संधी मी घेऊ इच्छितो. भारताच्या $400 अब्ज डॉलर्सच्या ड्रेस करण्यायोग्य B2B मार्केटमधील सर्वात मोठ्या टेक प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही  जेएसडब्ल्यू वन बनवताना आणि स्केल करत असताना मी त्यांच्या अमूल्य ज्ञानाची अपेक्षा करतो. डॉ. पै यांचे ई-कॉमर्स इकोसिस्टमचे सखोल ज्ञान आणि मार्गदर्शन आमचे गव्हर्नन्स स्ट्रक्चर्स वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरेल कारण आम्ही पुढील 18 ते 24 महिन्यांत आयपीओ आणण्याच्या दिशेने काम करत आहोत. जेएसडब्ल्यू वनच्या व्हिजनवर विश्वास ठेवल्याबद्दल आणि बोर्डात सहभागी होण्यास सहमती दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.”

आर्थिक वर्ष 2024 मध्ये जेएसडब्लू वन प्लॅटफॉर्म्सचे सुमारे INR 9000 कोटी एकूण उत्पादन मूल्य राहिले आहे. आम्ही येथून मोठ्या प्रमाणावर आणि भारतातील B2B ई-कॉमर्समध्ये नेतृत्व तयार करत असताना, आम्ही आमच्या मंडळामध्ये स्वतंत्र दृष्टिकोन समाविष्ट करून प्रशासन वाढवण्यास उत्सुक आहोत. स्केलिंग व्यवसायातील डॉ. पै यांचे कौशल्य, शिक्षण आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील त्यांच्या नेतृत्वामुळे आणि स्टार्ट-अप इकोसिस्टमची त्यांची सखोल समज, जेएसडब्ल्यू वनला नवीन उंचीवर नेण्यात महत्त्वपूर्ण ठरेल,” असे जेएसडब्ल्यू वन प्लॅटफॉर्मचे सीईओ श्री गौरव सचदेवा म्हणाले.

जेएसडब्ल्यू वन प्लॅटफॉर्म्सच्या सन्माननीय मंडळात स्वतंत्र संचालक म्हणून सहभागी होणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आणि विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून, आम्ही परिवर्तनात्मक उपाय तयार करू शकतो. जेएसडब्ल्यू वन प्लॅटफॉर्म्ससाठी शाश्वत वृद्धी आणि नावीन्यपूर्ण मार्ग तयार करण्यासाठी मी लीडरशीप टीम आणि सहकारी बोर्ड सदस्यांसोबत काम करण्यास उत्सुक आहे,” असे जेएसडब्ल्यू वनचे स्वतंत्र संचालक डॉ. रंजन पै यांनी सांगितले.

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने महाराष्ट्रातील ठाण्यात बिगविंगचे उद्घाटन केले

·        प्रिमियम मोटरसायकलच्या (300cc – 500cc) विशेष श्रेणीसह मोटरप्रेमी लोकांचे लक्ष वेधून घेते

·        होंडाच्या मोठ्या बाइक्ससाठी अत्याधुनिक वनस्टॉप विक्री आणि सेवा केंद्र

ठाणे, 12 एप्रिल 2024: प्रिमियम मोटरसायकल पुनर्परिभाषित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र) येथे होंडा बिगविंग या नवीन प्रीमियम मोटरसायकल विक्री आणि सेवा आऊटलेटचे उद्घाटन केले.

मोटारसायकलप्रेमी लोकांसाठी हे पाऊल अत्यंत आनंददायी आणि परिवर्तनशील असणार आहे. केवळ सर्वोत्तमाच्या शोधात असलेल्या बाईक रायडर्ससाठी हे BigWing डीलरशिप आऊटलेट एक सर्वोत्कृष्ट अनुभव देईल. ठाण्याच्या अगदी मध्यवर्ती भागात वसलेल्या या अत्याधुनिक केंद्राचा उद्देश नवीन तसेच सध्या असलेल्या ग्राहकांमध्ये #GoRidin चा उत्साह वाढवणे हा आहे.

आपल्या अमूल्य ग्राहकांची छोट्यातली छोटी गरज पूर्ण करण्यासाठी हे BigWing डीलरशिप आऊटलेट अत्यंत उपयोगाचे आहे. हे BigWing आता देशभरातील 140 हून अधिक ऑपरेशनल टचपॉइंट्सवर उपलब्ध होईल.

प्रीमियम अनुभव

ब्लॅक अँड व्हाईट मोनोक्रोमॅटिक थीमने प्रभावित बिगविंग आपली वाहने अत्यंत अभिमानाने मिरवते. BigWing मधील उच्च प्रशिक्षित आणि जाणकार व्यावसायिक ग्राहकांना त्यांची गाडी किंवा त्याच्याशी संबंधित ऍक्सेसरीज संबंधी प्रश्नांचे निराकरण करण्यास मदत करतातआपल्याला कोणती गाडी हवीकोणती सूट होईल आणि कोणती अत्यंत उपयोगी ठरेल अशा सगळ्या प्रश्नांची तपशीलवार उत्तरे (www.HondaBigWing.inया वेबसाइट उपलब्ध आहेतशोध ते खरेदीपर्यंतचा तुमचा प्रवास इथे संपेलवेबसाइटवरील ऑनलाइन बुकिंगचा पर्याय ग्राहकांना जलदपारदर्शक बुकिंग अनुभव एका क्लिकवर मिळवून देतोरिअलटाइम ग्राहकांचा अभिप्राय मिळवण्यासाठी, Honda BigWing सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

ग्राहकांची सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करून, Honda BigWing इमर्सिव्ह डिजिटल अनुभव देते. व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म – https://virtualshowroom.hondabigwing.in वर ग्राहकांना त्यांच्या घरात आरामात बसून मोटरसायकल लाइन-अप, राइडिंग गीअर्स आणि ॲक्सेसरीज तपशीलवारपणे अनुभवता येतील.

विविध उत्पादन पोर्टफोलिओ

Honda च्या प्रीमियम मोटरसायकल रिटेल फॉरमॅटचे नेतृत्व BigWing Topline करते. – सर्वोत्कृष्ट महानगरांमधील संपूर्ण प्रीमियम मोटरसायकल श्रेणीसाठी (300cc – 1800cc) तसेच केवळ मध्यम आकाराच्या मोटरसायकल विभागासाठी (300cc – 500cc) तसेच इतर गरजांसाठी BigWing उपलब्ध आहेमोटारसायकलच्या विविध श्रेणींमध्ये सर्वनवीन CB350, H’ness CB350, CB350RS, CB300F, CB300R, NX500, XL750 Transalp, आफ्रिका ट्विन आणि गोल्ड विंग टूर यांचा समावेश आहे.

ग्राहकांना ‘NX500’ सह संपूर्णपणे नवीन अनुभव

HMSI ने 2024 च्या कॅलेंडर वर्षाची सुरुवात रु. 5,90,000 (एक्सशोरूम दिल्लीच्या आकर्षक किमतीत संपूर्णपणे नवीन ‘NX500’ साहसी टूर लाँच केली. ‘डेली क्रॉसओव्हर‘ च्या डिझाईन थीमने सजलेले हे नवीन मॉडेल CBU* मार्गाने (*पूर्णपणे अंगभूतभारतीय बाजारपेठेत प्रवेश करेल.

संपूर्णपणे नवीन असलेल्या Honda NX500 ला पॉवरिंग हे 471cc, लिक्विडकूल्ड, 4-स्ट्रोक DOHC इंजिन आहे ज्यामध्ये समांतर ट्विनसिलेंडर लेआउट आहेयातील हायरिव्हिंग कॅरेक्टर आणि झॅपी टॉप एंडसह अत्यंत आनंददायी सफर होतेस्लिकचेंजिंग 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेली ही मोटर 8,600rpm वर 35kW पॉवर आणि 6,500rpm वर 43Nm पीक टॉर्क देते.

जावा येझदी मोटरसायकलतर्फे नवीन स्टेल्थ ड्युअल-टोन पेराक सादर

२०२४ साठी रोमांचक अपडेट्ससह अत्याधुनिक बॉबर सादर

पुणे: वर्ष २०२४ साठीची महत्त्वाची घोषणा करताना जावा येझदी मोटरसायकलला आता फॉरवर्ड सेट फूट पेग आणि सुधारित मागील मोनो-शॉक यांसह काळजीपूर्वक बारकाईने केलेले पितळी काम असलेली पूर्णपणे नवीन स्टिल्थ ड्युअल-टोन पेंट स्कीम अशी महत्वपूर्ण जावा पेराक सादर करताना आनंद होत आहे. राइडिंगचा अनुभव आणि उत्साही लोकांसाठी उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने कंपनीने आपल्या बॉबर श्रेणीमध्ये आणखी सुधारणा केल्या आहेत. जावा 42 बॉबर आता २.०९ लाख रु. (एक्स-शोरूम दिल्ली) आणि नवीन अलॉय व्हील व्हेरियंटच्या रोमांचक किंमतीत उपलब्ध आहे.

भारतीय मोटारसायकल बाजारपेठेतील अग्रगण्य नाव जावा येझदी मोटरसायकल्स जावा पेराक आणि जावा 42 बॉबर या त्यांच्या प्रतिष्ठित मॉडेलसह बॉबर विभागाला पुन्हा परिभाषित करत आहे. या बाइक्सनी भारतामध्ये केवळ चित्तथरारक बॉबर संस्कृती प्रस्थापित केली असे नाही तर अस्सल स्टाइलिंग आणि स्पोर्टी कामगिरीचे कौतुक असलेल्या उत्साही लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता देखील मिळवली आहे.

शैली आणि कामगिरी या दोन्हीला प्राधान्य देणाऱ्या रायडर्सच्या आकांक्षा पुऱ्या करत बॉबर्स त्यांच्या अद्वितीय अपीलसाठी प्रसिद्ध आहेत.  जावा पेराक आणि जावा 42 बॉबर या विभागामध्ये अतुलनीय अनुभव देतात. हेरिटेज कलेक्शनमधील 2024 जावा पेराक प्रीमियम बॉबर विभागामध्ये उत्कृष्ट फिट आणि फिनिश, रिफाइंड राइडिंग डायनॅमिक्स आणि पीरियड-करेक्ट स्टाइलिंगसह नवीन मापदंड प्रस्थापित करते.

नवीन जावा पेराक तपशीलाकडे बारकाईने लक्ष देत आकर्षक स्टिल्थ मॅट ब्लॅक/मॅट ग्रे ड्युअल-टोन स्कीम सादर करते. यात सुंदर क्राफ्ट केलेले ब्रास टँक बॅजिंग आणि अस्सल ओल्ड-स्कूल अपीलसाठी इंधन फिलर कॅप आहे. अधिक आरामासाठी क्लासिक शैलीतील क्विल्टेड टॅन सीट हे वैशिष्ट्य आहे. फॉरवर्ड-सेट फूट पेग्सचा 155 मिमी पुढे स्थित, एकूण राइडिंग एर्गोनॉमिक्स आणखी उंचावते.

त्याच्या स्टिल्थी एक्सटीरियर बाह्य भागाअंतर्गत जावा पेराक एक शक्तिशाली 334cc लिक्विड-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित आहे. सर्वोत्तम अॅक्सीलरेशन आणि ब्रेकिंगसह आनंददायक कामगिरी सुनिश्चित करत ते उत्कंठावर्धक 29.9PS@7500RPM आणि 30Nm@5500RPM तयार करते. अवघड शहरी प्रवासादरम्यान हलके क्लच अॅक्शन करण्यासाठी असिस्ट आणि स्लिप क्लच सह बाईकमध्ये Continental द्वारे ड्युअल-चॅनल ABS आणि मोठे ByBre, डिस्क ब्रेक्स (280mm पुढील आणि 240mm मागील) आहेत. शेवटी, नवीन सात-स्तरीय प्रीलोड ॲडजस्टेबल मोनो-शॉक एक छान आणि आरामदायक राइड सुनिश्चित करते.

जावा 42 बॉबर मूनस्टोन व्हाईट व्हेरियंटची किंमत रु. 2.09 लाख (एक्स-शोरूम दिल्ली) असून

दरम्यान, निओ-रेट्रो कलेक्शनमधील जावा 42 बॉबर श्रेणी, आता अधिक सुलभ आणि व्यावहारिक बनली आहे.

मिस्टिक कॉपर आणि जॅस्पर रेड ड्युअल-टोन व्हेरियंटसह  २०२४ साठी नवीन दोन नवीन ट्रिम असून आता प्रीमियम डायमंड-कट अलॉय व्हीलसह उपलब्ध आहेत. LED लाइटिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन, यूएसबी चार्जिंग, एक अॅडजस्टेबल सीट आणि एकाधिक सामान पर्याय यासारख्या आधुनिक वैशिष्ट्यांच्या संपूर्ण संचासह 42 बॉबर फॉर्म आणि कार्यामध्ये एक चांगला समतोल राखतो.

या सादरीकरणाबद्दल भाष्य करताना जावा येझदी मोटरसायकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आशिष सिंग जोशी म्हणाले, “जावा पेराक हे आमच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्सपैकी एक बनले. भारताच्या वाढत्या महत्त्वाकांक्षी बाजारपेठेचे हे द्योतक आहे. 42 बॉबरने आमच्या विभागातील वर्चस्वाला आणखी मजबूत केले. बॉबर मानसिकता ही एक मनात रुजलेली गोष्ट असते. ती तुमच्याकडे असते किंवा नसते. तुमच्याकडे आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही त्याची राईडच घ्यावी लागते. जावा पेराकचे नवीन डिझाईन तुम्हाला या अनोख्या बाजूकडे आकर्षित करते!”

जावा 350, जया 42, येझ्दी रोडस्टर, येझ्दी स्क्रॅम्बलर आणि येझदी ॲडव्हेंचरचा समावेश असलेल्या विद्यमान लाइनअपला पूरक जावा 42 बॉबरसह जावा पेराक जावा येझ्दी मोटरसायकलसाठी सध्याचा ‘फॅक्टरी कस्टम पोर्टफोलिओ’ तयार करते. 

जावा पेराक आणि विविध जावा 42 बॉबर प्रकार (एक्स-शोरूम दिल्ली) यांच्या किंमती खालीलप्रमाणे

जावा पेराक: 2,13,187 रु.

जावा 42 बॉबर – मूनस्टोन व्हाइट: 2,09,500 रु

जावा 42 बॉबर – मिस्टिक कॉपर स्पोक व्हील: 2,12,500 रु.

जावा 42 बॉबर – मिस्टिक कॉपर अलॉय व्हील : 2,18,900 रु.

जावा 42 बॉबर – जॅस्पर रेड ड्युअल टोन स्पोक व्हील: 2,15,187 रु.

जावा 42 बॉबर – जॅस्पर रेड ड्युअल टोन अलॉय व्हील: 2,19,950 रु.

जावा 42 बॉबर – ब्लॅक मिरर: 2,29,500 रु.

हुकूमशाही प्रवृत्ती संसदीय लोकशाहीला मारक-डॉ. श्रीपाल सबनीस

-पहिल्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटन
पुणे: “अस्थिरतेच्या वातावरणात कोणत्याही समाजाची, प्रांताची वा देशाची प्रगती होत नाही. आज जगभरात अस्थितरतेचे वातावरण वाढत आहे. लोकशाही प्रक्रियेतून निवडणूक आलेले लोक हुकूमशाही प्रवृत्तीने वागत आहेत. रशियाचे पुतीन, चीनचे जिनपिंग व अमेरिकेचे बायडेन आधुनिक काळातील हिटलरप्रमाणे वागत आहेत. भारतातही या हुकूमशाही प्रवृत्तीचा शिरकाव होत आहे. ही प्रवृत्ती संसदीय लोकशाहीला मारक आहे,” असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व पहिल्या विश्वबंधुता संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
बंधुता लोकचळवळीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय आणि भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या संमेलनावेळी उद्घाटक रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. सुभाष वारे, डॉ. विजय ताम्हाणे, मधुश्री ओव्हाळ, प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अशोककुमार पगारिया, डॉ. अरुण आंधळे आदी उपस्थित होते. मधुश्री ओव्हाळ लिखित ‘सम्यक सत्यार्थी’ पुस्तकाचे, नंदा कोकाटे लिखित ‘पुकार बंधुतेची’ काव्यगीताचे प्रकाशन यावेळी झाले. वासंती मेरू (पलूस), पूजा विश्वकर्मा (पुणे), भाग्यश्री बगाड (गुजरात), राम तरटे (नांदेड), चंद्रशेखर महाजन (अकोट), पल्लवी पतंगे (मुंबई), प्रकाश पाठक (संभाजीनगर), गजानन गायकवाड (सिल्लोड), युवराज पाटील (कोल्हापूर), सुरज दिघे (तळेगा), सीमा झुंजारराव (मुंबई) यांना ‘बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. 
दुपारच्या सत्रात प्रा. चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘अभिजात मराठी काव्यपंढरी’ कविसंमेलन झाले. यामध्ये संगीता झिंजुरके, डॉ. बंडोपंत कांबळे, प्रा. संतोष काळे यांच्यासह राज्यभरातून निमंत्रित कवी सहभागी झाले होते. उमरखेड येथील सचिन शिंदे यांना प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार, संभाजीनगर येथील विजयकुमार पांचाळ यांना प्रकाशपर्व साहित्य पुरस्कार, तर मुखेड येथील तुकाराम कांबळे यांना प्रकाशगाथा साहित्यगाथा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बंधुता काव्यप्रतिभा पुरस्काराने विविध कवींचा सन्मान करण्यात आला.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “समाजातील प्रत्येक माणूस हा बंधुतेने जोडलेला आहे. स्वातंत्र्य, समतेसाठी कायदा करता येतो, मात्र बंधुतेचा कायदा करता येत नाही. ती प्रत्येकाच्या मनातून रुजायला हवी. जातीय, धार्मिक वाद बंधुतेमुळे संपतील. भारतीय संस्कृतीचा आत्मा म्हणजे बंधुता व करुणा आहे. धर्म ही संकल्पना मर्यादित असून, आपल्यातील माणूसपण महत्वाचे आहे. सर्व धर्मग्रंथ, महापुरुष बंधुतेची शिकवण देतात. त्यामुळे या महापुरुषांच्या चांगल्या गोष्टींची बेरीज करत त्यातून समाजाचा, देशाचा विकास साधायला हवा.”
प्रा. सुभाष वारे म्हणाले, “स्वातंत्र्य व समता प्रत्यक्षात येण्यासाठी कायदे करता येतात. मात्र, बंधुतेचा कोणताही कायदा नसून, ती भावना अंतर्मनातून यावी लागते. आज संविधानावर आघात होत असताना बंधुतेचा विचारच प्रत्येक नागरिकाला प्रतिष्ठा, राष्ट्राला एकात्मिक भावनेने जोडून ठेवू शकते. बंधुतेची ही मशाल लोकशाहीला मारक असलेल्या हुकूमशाहीला पराभूत केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे बंधुतेचा विचार जनमनात पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने काम करायला हवे.”
चंद्रकांत दळवी म्हणाले, “बंधुतेचा विचार घेऊन समाजात खोलवर त्याची जागृती करण्याचे काम रोकडे यांनी केले आहे. सामान्यातले हिरे शोधून त्यांना घडविण्याचे आणि बंधुतेच्या व्यासपीठावर आणण्याचे काम आजच्या काळात कठीण आहे. अशावेळी बंधुतेचा हा दीप तेवत ठेवून समाजाला प्रकाशमय करण्याचे काम कौतुकास्पद आहे.”
बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मधुश्री ओव्हाळ, नंदा कोकाटे यांनी आपले विचार मांडले. कृष्णकुमार गोयल यांनी स्वागतपर भाषण केले. शंकर आथरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विजय ताम्हाणे यांनी आभार मानले. प्रा. प्रशांत रोकडे, डॉ. प्रभंजन चव्हाण, प्रा. सदाशिव कांबळे आणि डॉ. सहदेव चव्हाण यांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

पंतप्रधानांनी उष्णतेच्या लाटेशी संबंधित परिस्थितीचा सामना करण्यासंबंधी सज्जतेचा घेतला आढावा

संपूर्ण सरकारी  दृष्टिकोनावर पंतप्रधानांचा भर; रुग्णालयांमध्ये पुरेशा तयारीसह जागरूकता निर्मितीचे महत्त्वही केले अधोरेखित

पंतप्रधानांना सध्याच्या उन्हाळ्यातील हवामानाचा अंदाज आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याच्या शक्यतेबद्दल देण्यात आली माहिती

आरोग्य क्षेत्राच्या सज्जतेचाही पंतप्रधानांनी घेतला आढावा

सर्व माध्यमांतून विशेषत: प्रादेशिक भाषांमध्ये  आवश्यक आयईसी /जागरूकता सामग्रीचा वेळेवर प्रसार करण्यावर दिला भर

आरोग्य मंत्रालय आणि एनडीएमए द्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित करून व्यापक प्रमाणावर प्रसारित करण्याचे केले आवाहन  


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली चालू हंगामातील उष्णतेच्या लाटेच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.
पंतप्रधानांना एप्रिल ते जून, 2024 या कालावधीतील तापमानाच्या अंदाजाबाबत माहिती देण्यात आली, ज्यात चालू हंगामातील उष्णतेचा अंदाज (एप्रिल ते जून) देण्यात आला तसेच देशातील बहुतांश भागांमध्ये सामान्य कमाल तापमानापेक्षा जास्त राहण्याची शक्यता, विशेषत: मध्य भारत आणि पश्चिम द्वीपकल्पीय भारतात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अत्यावश्यक औषधे, सलाईन, आइस पॅक, ओआरएस आणि पेयजल या संदर्भात आरोग्य क्षेत्रातील तयारीचा आढावा घेण्यात आला.
दूरचित्रवाणी, रेडिओ आणि सोशल मीडिया यांसारख्या माध्यमांद्वारे  विशेषतः प्रादेशिक भाषांमध्ये आवश्यक आयइसी / जागरूकता सामग्रीचा वेळेवर प्रसार करण्यावर भर देण्यात आला. यंदाचा 2024 मधील उन्हाळा सामान्यपेक्षा अधिक कडक असण्याची शक्यता असल्याने तसेच याच काळात सार्वत्रिक निवडणुका असल्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एनडीएमए द्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करून त्याचा व्यापक प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले.  
संपूर्ण सरकारी दृष्टिकोनावर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की, केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील सरकारच्या सर्व विभागांनी आणि विविध मंत्रालयांनी एकत्रितपणे यावर काम करणे आवश्यक आहे. रुग्णालयांमध्ये पुरेशी तयारी करण्यासोबतच जनजागृतीवरही पंतप्रधानांनी भर दिला. जंगलातील वणव्यांबाबत त्वरित माहिती घेऊन ते शमवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
पंतप्रधानांचे प्रधान सचिव, गृह सचिव, भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

दुर्गा नगर एसआरए प्रकल्पात १०० सदनिकांचा घोटाळा प्रकरण

उच्च न्यायालयाचा आदेश – परिस्थिती जैसे थे ठेवून प्रशासनाला दहा जूनपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश

पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२४) दुर्गा नगर एसआरए प्रकल्पाचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने सुरू केले आहे. दुर्गा नगर आणि शरद नगर येथील झोपडीधारकांसाठी ३६० सदनिका बांधून तयार आहेत. त्यापैकी काहीचे वाटप झाले आहे. परंतु दुर्गा नगर येथील झोपडी झोपडीधारकांना डावलून महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागातील कर्मचारी, अधिकारी, पोलीस व या भागातील पुढारी मंडळी मूळ झोपडीधारकांना डावलून बेकायदेशीररित्या दुर्गा नगर येथील त्यांच्या झोपड्या पाडत आहेत. याबाबत येथील रहिवासी मुमताजबी गफुर जामदार, ज्ञानेश्वर पांडुरंग गारगोटे आणि इतरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने या प्रकरणी गंभीर दखल घेत दुर्गा नगर आणि शरद नगर पुनर्वसन प्रकल्पाची परिस्थिती जैसे थे ठेवून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास दहा जूनपर्यंत म्हणणे मांडण्याचे तसेच तीन महिन्यांत अर्ज निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकाराबद्दल दुर्गा नगर आणि शरद नगर येथील झोपडीधारकांचे समन्वयक विलास घाडगे यांनी वेळोवेळी एसआरए अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि पोलिसांशी पत्रव्यवहार केला परंतु दखल घेतली नाही. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर एसआरए अधिकाऱ्यांना याबाबत चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. ३५ झोपड्या बाकी आहेत त्या पाडण्यासाठी विकसक यांनी स्थानिक गुंड यांना हाताला धरून रात्री सात नंतर झोपड्या पाडण्याचे बेकायदेशीर काम केले आहे. या झोपडीधारकांमध्ये तीव्र असंतोष असून त्यांना त्यांच्या न्याय हक्काची झोपडी मिळालीच पाहिजे यासाठी प्रशासनाचा निषेध करून आंदोलन ही करण्यात आले होते.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे विलास भागवत घाडगे, दीपक हणमंत हलूरकर, बाबासाहेब भगवान गोरे, अब्दुल जमादार, सीता विठ्ठल नांदवते, बाबासाहेब कदम, आतिश दिलीप कदम, प्रशांत दिलीप कदम, प्रमिला पांडुरंग शिंदे यांनी स्वागत केले असून न्यायालय आम्हाला योग्य न्याय देईल अशी भावना व्यक्त केली.

या ठिकाणी प्रशासनाने बोगस सर्वे केला, बोगस नोंदी केले आहेत मृत व्यक्तींच्या नावे बोगस खरेदी दाखवून दुसऱ्याच्या नावे खोटे खरेदीखत केले आहे. दुर्गा नगर मध्ये मूळ झोपडी मालकांमध्ये एकही बोबडे आडनावाची व्यक्ती नसतानाही जवळपास आठ बोबडे नावाच्या व्यक्तींना सदनिका देण्यात आले आहेत. यामध्ये अशोक संदिपान बोबडे, विकास झुंबर पुळवले, सविता अरुण तूरुकमारे हे बोगस असल्याने त्यांची कागदपत्रे तपासली जावीत. तसेच मूळ झोपडीधारक विठ्ठल लक्ष्मण फुटक, पांडुरंग कोंडीबा शिंदे, गोकुळदास उत्तमराव घुले, चांगदेव काशिनाथ तांदळे व इतर हे मृत झाल्यानंतर त्यांच्या नावे बोगस कागदपत्र सादर करून खरेदीदार यांनी शासनाची फसवणूक करून मूळ झोपडीधारकांवर अन्याय केला आहे. याची देखील चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असे विलास घाडगे म्हणाले.

शाहू महाराजांविषयी गाढवांनी बोलू नये:प्रकाश आंबेडकर म्हणाले ; उद्धव ठाकरे, शरद पवारांचेही मॅच फिक्सिंग

चंद्रपूर – राज्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मॅच फिक्सिंग केली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. याबरोबरच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारीने केलेल्या वक्तव्याचा देखील त्यांनी समाचार घेतला. शाहू महाराजांचे वंशज कोण आहेत? हे सर्व जगाने मान्य केले आहे. असे असताना देखील दोन गाढवाने त्यावर बोलावे, त्यावर काहीही बोलण्याची आवश्यकता नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.शाहू महाराजांचे कुटुंबीयांना जगाने स्वीकारले आहे. त्यांच्या जवळचे माणसे आणि त्यांचे कुटुंबीय कोण, हे सर्वांनाच माहिती आहे. एकदा जगाने मान्य केल्यानंतर दोन गाढवांनी त्यावर कमेंट करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी महाआघाडीचे उमेदवार शाहू महाराज हे घराण्याचे खरे वारसदार नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्याचा प्रकाश आंबेडकर यांनी चांगला समाचार घेतला.पंकजा मुंडे यांच्या बीड लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच वेळेस पडलेल्या उमेदवाराला तिकीट दिले आहे. अशी अनेक नावे आहेत, जी सांगू शकतो. नवीन चेहरे असताना देखील पुन्हा जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ही मॅक्स फिक्सिंग असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात देखील एकनाथ शिंदे यांनी जुन्या उमेदवारालाच उमेदवारी दिली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पीएला तेथे उमेदवार दिली आहे. ही मॅक्स नाही का? असा प्रश्न देखील प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

महायुतीला खासदार डॉ कोल्हेंचा आणखी एक धक्का..!

पुणे – खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुतीला आणखी एक धक्का देत खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद असलेले भाजपचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश देऊन शिरुर लोकसभा मतदारसंघात आपली ताकद आणखी वाढवली आहे.

२०१९ च्या खेड आळंदी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अतुल देशमुख यांनी मोठी ताकद दाखवून दिली होती. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांच्यात भाजप पक्ष वाढविण्यासाठी मोठी कामगिरी बजावलेले देशमुख भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते. देशमुख यांनी खेड नगरपरिषद आणि आळंदी नगरपरिषदमध्ये भाजपचे वर्चस्व मिळवले होते. सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याशी देशमुख यांचा तालुक्यात संघर्ष पाहायला मिळाला त्यातच अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सामील झाल्यापासून अतुल देशमुख आणि दिलीप मोहिते यांचा अजून संघर्ष शिगेला पोहोचला असता त्यातच भाजपमध्ये सुरू असलेला देशमुख यांचा संघर्ष त्यामुळे नाराज अतुल देशमुख यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क केला आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून देशमुख यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

अतुल देशमुख यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर खेड तालुक्यात कशा प्रकारे आमदार मोहिते यांची दडपशाही सुरू आहे त्याची माहिती दिली. आमदार मोहिते यांच्या दडपशाहीला झुगारून शरद पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निलेश लंके नंतर धैर्यशील मोहिते पाटील आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे समर्थक शेखर पाचुंदकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश देऊन अजित पवार आणि महायुतीला सतत धक्के देत आहेत. त्याचबरोबर मध्यमांशी बोलताना डॉ. कोल्हे यांनी सांगितले आहे की हा तर ट्रेलर आहे चित्रपट बाकी आहे त्यामुळे आगामी काळात किती प्रवेश होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान अतुल देशमुख यांसह पुणे शहर कार्यालयात खेडचे अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, जवळपास ३५ ते ४० सरपंच उपस्थित आहेत त्याचबरोबर आळंदीचे अनेक माजी नगरसेवक, खेड व चाकणचे अनेक माजी नगरसेवक सोबत असल्याचे देशमुख यांनी सांगितले यावेळी सुधीर भोमाळे, मनोहर सांडभोर, राहुल आडारी, संतोष सांडभोर, चेतन बर्गे, केतन लगड, रामभाऊ शिंदे, बाळासाहेब शिंदे, अनंता भागीर, दत्ता कवडे, बारकू आवळे, कैलास चिखले, गणेश साबळे, सुनील काळोखे, विनोद लोहोट, गणेश लोहट, उमेश वर्पे, आदित्य गुंडरे, संजय मोहिते, दत्ता परदेशी, किरण येळवंडे, बाळासाहेब कहानी, पंडित गोडसे, प्रकाश बांगर, रघुनाथ लांडगे, संदीप दसगुडे, शिवाजी कड, मंगेश गुंडाळ, मनोहर सांडभोर, सचिन सातकर, बापू दौंडकर, अक्षय केदारी, राहुल पिंगळे, धीरज आदक, योगेश धायबर, निलेश पवार, आयुष जाधव, मंदार क्षीरसागर, यांसह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पहिलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • ‘अब की बार, महाराष्ट्रात ४५ पार’

– कमळ किंवा धनुष्यबाण किंवा घड्याळ कोणतेही बटण दाबा मत मोदींनाच जाणार हे नक्की

पुणे –

‘बूथचा कार्यकर्ता ते महापौर असा प्रवास करणाऱ्या मुरलीधर मोहोळ मोहोळ यांना कुटुंबातून पैलवान असल्याचा वारसा आहे. त्यांना कुठला डाव कधी टाकायचा? हे सर्व माहिती आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर राजकीय स्वार्थासाठी आखाडे बदलणारे पहिलवान टिकणार नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

पुणे शहर-जिल्ह्यातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लिकन पार्टी आठवले गट आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या संयुक्त मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

या पदाधिकारी मेळाव्यास पालकमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, रुपाली चाकणकर, आमदार माधुरी मिसाळ, आ. सुनील टिंगरे, आ. चेतन तुपे, आ. भीमराव तापकीर, आ. सुनील कांबळे, आ. सिद्धार्थ शिरोळे, महेश शिंदे, दीपक मानकर, धीरज घाटे, प्रमोद भानगिरे, अजय भोसले, परशुराम वाडेकर, श्री. लतीफ शेख, संजय माशिलकर, संजय सोनवणे, प्रकाश भालेराव, श्रीनाथ भीमाले, बालाजी पवार, राजेश पांडे, भारत नागद, संजय आल्हाट यांच्यासह महायुती आणि घटक पक्षाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली.

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मुरलीधर मोहोळ यांना गिरीश बापट यांचा वारसा पुढे चालवायचा आहे. माझे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. गिरीश बापट मला मोठ्या भावासारखे होते. पुण्याचे प्रश्न ते मांडायचे. आता आपला खासदार पुण्यातून दिल्लीला जाणार आहे. इथे भाऊॅ तात्या कोणी नाही, मुरलीधर अण्णाच निवडून येणार आहेत. आयोध्येतील रामलल्लासाठी पुण्यातून दोन धागे रामासाठी विणले, त्याची वस्त्र श्रीरामल्लांना परिधान केली गेली. आता मतांचे धागे आपल्याला विणायचे असून जिल्ह्यातील चारही उमेदवारांना दिल्लीला खासदार म्हणून पाठवायचे आहे.

कोरोना काळात मुरलीधर मोहोळ यांनी चांगले पुण्यात काम केले, आम्ही राज्यात काम करत होतो, पंतप्रधान मोदी देशात काम करत होते.पण काही जण फक्त फेसबुक लाइव्ह करत होते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘आता हेच फेसबुकवाले मोदीजींवर टीका करत आहेत. मोदीजी त्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून ठीक, पण जर त्यांची वक्रदृष्टी फेसबुकवाल्यांकडे गेली तर तोंडाला फेस येईल. यावेळी आपल्याला प्रत्येक बूथ जिंकण्याचे उदिष्ट आहे. त्यातून आपण देशात ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५ पार करू, थोडी जास्त मेहनत कार्यकर्त्त्यांनी घेतली तर राज्यात ४५च्याही पुढे जाऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनात मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित चारही मतदारसंघात काम केले पाहिजे. विधानसभेची ही रंगीत तालीम असल्याने कुणीही गहाळ राहू नका. समोरचा उमेदवार कमकुवत समजायचा नाही. सर्वांची एकजूट दाखवणे महत्वाचे आहे. सोशल मीडिया सेलच्या पदाधिकाऱ्यांना जास्त काम करावे लागणार आहे. विकासावर मत मागायची. केलेल्या कामाच्या जोरावर मत मागायची आहेत. काही लाख कोटींची काम सुरू आहेत. पुण्यातील वाहतूक कोडी सोडवण्यासाठी मेट्रो कात्रज, हडपसर, वाघोलीला नेतोय,त्यासाठी केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असणे गरजेचे आहे. आपल्या सर्व उमेदवारांचे मताधिक्य वाढण्यासाठी वादग्रस्त विधाने करणे टाळा, वादविवाद टाळा. गंमततीचा भाग नाही खरोखर नम्रतेने वागा. ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. सामाजिक कार्यकर्ते, संघटना जोडून घ्या.त्यांना सोबत घ्या. मतदारांना श्री मोदीजींना मतदान करायचे आहे. जिल्ह्यात घड्याळदोन ठिकाणी, धनुष्यबाण आणि कमळ ही तीन चिन्हं आहेत. त्या समोरचं बटण दाबलं तरी मत श्री मोदीजींना जाणार आहे.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, जर महायुतीला महाराष्ट्रात हरवू शकेल, तर तो कार्यकर्ताच हरवू शकेल. माझा फोटोच नाही, नावच नाही, असं नाही. मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात काम केले. त्यांचे सर्व कुटुंब ऍडमिट असताना ते तेथून काम करत होते. एकेका जागेचा विचार करा. उध्दवजी गेले मत कमी होतील पण दादा आले. त्यापेक्षा जास्त मत आपल्यात अधिक होतील. त्यामुळे महायुतीचे उमेदवार जिंकणार हे लहान मुलही सांगेल.

उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘मी महापौर झाल्यावर कोरोनाचे संकट आले आणि जगच थांबले पण त्या काळात काम करायची खरी संधी मला मिळाली. लोकांसाठी काय आणि कसे काम करायचे असते? ते मला या काळात काम करताना शिकायला मिळाले. पुण्यातील रिंगरोड, चांदणी चौकातील रस्ते-उड्डाणपूल, मेट्रोचा विस्तार ही सर्व कामे केवळ राज्यात आणि देशात असलेल्या विकासाच्या विचारांच्या सरकारमुळे शक्य होत आहे. त्यामुळे पुन्हा आपल्याला हीच स्थिती कायम ठेवण्यासाठी काही दिवस मेहनत करायची आहे. कार्यकर्त्यांनी मुरलीधर मोहोळसाठी नाही तर श्मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

सुनेत्रा पवार यांनी रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांची घेतली सदिच्छा भेट

पुणे-सुनेत्राताई पवार आज रमजान ईद हा मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र असणाऱ्या या सणाच्या निमित्ताने त्यांच्या आनंदात सहभागी झाल्या. या निमित्ताने शहरातील यादगार मस्जिद, बागवान मस्जिद, चांद शहा वली दर्गा व कब्रस्तान, मक्का मस्जिद, फातिमा मस्जिद, शगनशाह दर्गा मस्जिद, मदिना मस्जिद, इदगाह मैदान येथे जाऊन मुस्लिम बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांचा सर्वांनी आनंदाने स्वीकार करून सुनेत्रा पवार यांनाही शुभेच्छा दिल्या. इदगाह मैदान येथे इदगाह कमिटीच्या वतीने सुनेत्रा पवार यांचा सन्मान करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणासह मुस्लिम बांधवांसाठी विविध ठिकाणी झालेल्या विकास कामांची माहिती मुस्लिम बांधवांनी वहिनींना दिली.

विविध मस्जिदना दिलेल्या शुभेच्छा भेटीप्रसंगी इम्तियाजभाई शिकीलकर, झाकीरभाई शेख, अल्ताफ सय्यद, अमजद बागवान, शाकीर बागवान, वसीम बागवान, हुसेन पठाण, परवेज सय्यद, युसुफ इनामदार, तन्वीर इनामदार, शौकत बागवान, यास्मिन सय्यद उपस्थित होते

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमानी, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अविनाश बांदल, तुषार लोखंडे, कमलताई हिंगणे, अनिता गायकवाड, साधू बल्लाळ, श्रीकांत पवार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपळे निलख मध्ये स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भक्तांची मांदियाळी

पिंपरी पुणे (दि ११ एप्रिल २०२४) – पिंपळे निलख, गणेशनगर येथील सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही अक्कलकोट स्वामी समर्थांच्या प्रकटन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती सचिन साठे यांनी दिली.
स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त आठवडाभर भजन सप्ताहाचे आयोजन केले होते. यानिमित्त पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळांनी उपस्थित राहून भजन सेवा केली. तसेच बुधवारी स्वामी समर्थांच्या प्रकटन दिना पहाटे श्रींना महाअभिषेक, त्यानंतर होम हवन करण्यात आले.
संध्याकाळी स्वामी समर्थांच्या पालखीची परिसरातून ग्रामप्रदक्षिणा सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी पिंपळे निलख पंचक्रोशीतील हजारो नागरिक सहभागी झाले होते, विशेषतः युवक, महिलांचा समावेश उल्लेखनीय होता. ग्रामप्रदक्षिणेनंतर महाआरती करण्यात आली व महाप्रसाद वाटप करण्यात आले. हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच बुधवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नागरिकांची रक्तदाब तपासणी, महिलांसाठी स्तनाचा कर्करोग, क्ष किरण, रक्तातील साखरेची तपासणी, रक्तातील सर्व घटक, कोलेस्टेरॉल, डोळे तपासणी करण्यात आली. सुमारे अडीचशे जणांनी या शिबिराचा लाभ घेतला, अशी माहिती सचिन साठे यांनी दिली. सचिन साठे सोशल फाउंडेशन, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ आणि पिंपळे निलख ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.