मुंबई-महाराष्ट्रात उद्या संध्याकाळी 8 वाजेपासून कलम 144 लागू करण्यात आली आहे. हे निर्बंध पुढील 15 दिवस राहणार आहे. यात अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवादसाधला . यावेळी त्यांनी या बाबी जाहीर केल्या , ते म्हणाले ,’ निर्बंध घालतोय, पण पर्याय आता नाही. लॉकडाऊन म्हणत नाही, पण काही निर्बंध तसेच आहेत. साखळी तुटायला हवी. रोजीरोटी महत्त्वाची आहेच पण रोजीरोटीसोबत जीव वाचवायला हवेत.उद्या 14 एप्रिलपासून रात्री 8 पासून निर्बंध लागू होतील.
मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार, पुढील 15 दिवस राज्यातील सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा, सुविधा सुरु राहतील. तसेच, बस, लोकल सेवांसह अत्यावश्यक सेवांसाठी सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार आहे. रुग्णालय, वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, जनावरांचे दवाखाने, बस, ऑटो, राजनैतिक कार्यालये, पावसाळी कामे सुरु राहतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हि शासकीय मदत
- राज्यातील 7 कोटी लाभार्थींना पुढील 1 महिना 3 किलो गहू 2 किलो तांदूळ देणार.
- पुढचा एक महिना 2 लाख शिवभोजन थाळ्या मोफत देणार.
- 35 लाख लोकांना 1000 रुपये आगाऊ देणार.
- राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये देणार.
- अधिकृत फेरीवाल्यांना 1500 रुपये देणार.
- परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रुपये.
- खावटी योजनेच्या आदिवासी कुटुंबांना 2 हजार रुपये.
- कोव्हिडसाठी 3300 कोटी तात्काळ निधी म्हणून उपलब्ध.
- व्हेटिंलेटर्स किंवा तत्सम सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी देणार.
- संजय गांधी निराधार, श्रावळ बाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्ती योजना अशा पेन्शन लाभार्थ्यांना 1 हजार रुपये आगाऊ देणार.
राज्यात सध्या 523 कोरोना चाचणी केंद्रे
ते पुढे म्हणाले, मागच्या वर्षी कोरोना चाचणी केंद्र 1-2 होते, पण आता 523 केंद्र आहेत. पण, चाचण्यांचे रिपोर्ट येण्यास वेळ लागत आहे. यंत्रणावर भार आलाय. यंत्रणांची क्षमता असते, रोज चाचण्यांची संख्या वाढवतोय. 85 हजारावरुन सव्वा दोन लाख चाचण्या होत आहेत. कोव्हिड सेंटर 2600 होती, ती आता 4 हजारावर गेलेत.
ऑक्सीजन देण्याची केंद्राकडे विनंती
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, अशा कठीण काळात मी सर्वांशी चर्चा करतोय, पण निष्पन्न काहीच होत नाहीय. सध्याचा जो काळ आहे, ही परिस्थिती हातातून गेली तर नंतर काहीच होणार नाही. सध्या 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होते. हा आरोग्यासाठीच वापरला जातो. आज 950 मेट्रिक टन ऑक्सिजन वापरला जातोय. औषधे जिथून मिळतील तिथून घेतोय. केंद्राकडे विनंती केली. रोजच्या रोज त्यांच्याकडे अहवाल जात आहे. एकही मृत्यू किंवा रुग्ण लपवत नाहीत. सर्व परिस्थितीला तोंड देतोय. त्यामुळे पंतप्रधानांना ऑक्सिजन देण्याची विनंती केली. त्यांच्या क्षमतेप्रमाणे ऑक्सिजन पुरवठा सुरु झाला आहे. अधिकचा ऑक्सिजन इतर राज्यातून देण्यासाठी परवानगी मागितली आहे. ईशान्येकडील राज्यातून परवानगी दिलीय, ती हजारो किमीवर आहेत.
ते पुढे म्हणाले, सध्या राज्यातील परिस्थिती अत्यंत कठीण आहे. पंतप्रधानांनी टीका महोत्सव करा म्हटले, मी म्हणतो फक्त चार दिवस कशाला, अनेक दिवस करू. आम्ही लसीकरण वाढवत आहोत. आताची लाट मोठी आहे. लसीकरणानंतर लगेच प्रतिकारशक्ती येत नाही. पुढची लाट येण्यापूर्वी लसीकरण आवश्यक आहे. येत्या काळात ब्रिटनप्रमाणे लसीकरण प्रचंड वाढवावा लागेल. पहिली लाट ही काहीच नव्हती. दुसरी लाट भयानक आहे. त्यामुळे तिसरी लाट कशी असेल सांगता येत नाही.
राज्यात ऑक्सीजनची कमतरता आहे. रस्त्याने ऑक्सिजन आणणे कठीण आहे. हवाई मार्गे ऑक्सिजन मिळत असेल तर ती परवानगी देऊन एअरफोर्सने ऑक्सिजन पाठवा, अशी केंद्राला विनंती केली आहे. ऑक्सिजन, औषधांची कमतरता जाणवतेय. येत्या काळात आरोग्य व्यवस्था पुन्हा वाढवतोय. जिथे जिथे आवश्यक तिथे व्यवस्था वाढवणार आहोत. आरोग्य व्यवस्था वाढवतोय पण हे एकतर्फी आहे. कारण आरोग्य व्यवस्था वाढले तरी डॉक्टर हवेत. जे नवे उत्तीर्ण झालेले डॉक्टर आहेत, त्यांना आवाहन करतोय, निवृत्त डॉक्टर, परिचारिकांना महाराष्ट्राच्या लढाईत सहभागी व्हा.