पुणे- कसबा विधानसभा मतदार संघात मुक्ता टिळकांच्या निधनामुळे पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आज पासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवातही झाली असली तरी वरिष्ठ राजकीय पातळीवर मात्र याबाबत अद्याप म्हणाव्या तशा वेगवान हालचालींना प्रारंभ झालेला दिसत नाही,तरीही स्थानिक पातळीवर मात्र भाजपा आणि मविआ कोणाला उमेदवारी देणार आणि द्यायला हवी यावर मोठ्या प्रमाणात उत्सुकता आणि चर्चेला तोंड मात्र फुटलेले आहे. टिळक यांच्या घराण्याला कसब्याने बरीच वर्षे सातत्याने कॉंग्रेस आणि भाजप या राजकीय पक्षाच्या स्तरावर साथ दिली आहे,आता मात्र इथे कार्यकर्ते आणि मतदार यांना बदल हवा असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.बिगर ब्राम्हण उमेदवार भाजपने दिला तर मविआची प्रचारात गोची होईल असे सांगून बिडकर यांच्या नावाला प्राधान्य दिले जात असले तरी कसबा हा बालेकिल्ला आहे असे सांगून टिळक नकोत तसे स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले रासने हि नकोत असा मोठा सूर आहे.स्थायी समितीची कारकीर्द सारी निवडणुकीत चव्हाट्यावर येईल असे कार्यकर्त्यांचे आणि भाजपाच्या मतदारांचेही म्हणणे आहे. बिडकर यांनी सभागृहनेता म्हणून आपली कारकीर्द गाजविली आहे. अनेक प्रकरणात विरोधकांचा खुले आम सामना केला आहे,पण या मतदार संघात सातत्याने ब्राम्हण उमेदवार दिला गेला आहे याकडे लक्ष वेधून कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळख असलेल्या धीरज घाटे यांचे नाव पुढे येते आहे. घाटे यांनी अल्प काल सभागृहनेता म्हणून काम केले आहे मात्र कुठल्याही प्रकरणात त्यांच्यावर बोट रोखले गेलेले नाही.नगरसेवक पदावर असताना त्यांनी विरोधकांना केलेला खंबीर विरोध लक्षात राहील असाच राहिला आहे.पक्षांच्या विविध कामात,कार्यक्रमात त्यांचा सहभाग याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.तर खासदार गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांच्याकडेही मोठ्या आशेने येथील भाजपचा मतदार पाहत आहे. बापटांची कारकीर्द निव्वळ कसब्यालाच नाही तर पूर्ण पुण्याला ठाऊक आहे. मतदार कोणत्याही पक्षाकडे कल असणारा असू देत पण सर्व स्तरावर घरोघरी संपर्क असलेला नेता म्हणून बापटांची ओळख आहे,आणि तीच शिदोरी त्यांच्या सुनबाई स्वरदा यांच्याकडे आहे.त्यांना आताच गेल्या आठवड्यात कन्यारत्न झाले.आणि बापटांची तब्बेत हि बरी नाही..या बाबी त्यांच्या मायनस बाबी सांगितल्या जात असल्या तरी या निवडणुकीतून आणि त्याद्वारे किमान मध्यम स्तरावरील राजकारणातूनसुद्धा बापट बाहेर असणे हे बापटांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कितपत रुचेल हा प्रश्नच आहे. त्या दृष्टीने स्वरदा यांच्या बाबत सहानुभूती निश्चित आहे. त्यांच्या विजयाची लोक खात्री देतात.
स्वीकृत सदस्य बनवून नंतर सभागृहनेता केलेल्या गणेश बिडकरांनी आपल्या नेतृत्वाला आणि मतदारांना कायम समाधानी ठेवण्यासाठी केलेली अडीच वर्षातील धडपड देखील लक्षणीय आहे. ब्राम्हण उमेदवार नकोच हि परंपरा मोडायची असेल तर बिडकरच उजवे ठरतात, मविआ च्या प्रचार यंत्रणेची नाकाबंदी करू शकतात.अशा स्थितीत भाजपमध्ये घाटे,बिडकर आणि स्वरदा बापट अशी कसब्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच असल्याचे मानले जाते आहे. हेच तीनही उमेदवार प्रशासनावर पकड ठेऊ शकणारे आहेत असेही मानले जाते.आजही भाजपच्या आणि संघाच्या राजकीय वर्तुळात टिळक,रासने हि नावे मागे पडल्याचेच चित्र आहे.