मुंबई-विरोधक आणि लोक विचारतात की, भुजबळांकडे एवढा पैसा कुठून आला? मी सांगतो की, आम्ही बालपणापासून कष्ट उपसले. भाजी विकली, नंतर भाजीची निर्यात केली. हळूहळू व्यवसाय वाढवला, कंपनी काढली. मुंबई आणि गोवा पहिली लक्झरी बस भवानी ट्रॅव्हल्स मी सुरू केली त्यानंतर आमच्याकडे पैसा आला असे संपत्तीचे गमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ आज अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उलगडले.
छगन भुजबळ गौरव समितीतर्फे मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या ‘अमृत महोत्सव’ सोहळ्यात भुजबळ बोलत होते.
ते दोन लोक आज नाहीत
भुजबळ म्हणाले, माझी एकसष्टी शिवाजी पार्कवर साजरी झाली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी फारुक अब्दुल्लाही काश्मीरमधून आले होते. पण तेव्हा जे दोन लोक होते ते विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे आज नाहीत. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण होते पण त्यांना काम असल्याने येता आले नाही.
दाढीवाल्यांचेच राज्य
भुजबळ म्हणाले, सध्या देशात, राज्यात दाढीवाल्यांचेच राज्य आहे. कुठे काळी तर कुठे पांढरी दाढी आहे. माझे सर्वांनी कौतूक केले त्यात मी आता काय सांगू. पंच्याहत्तर वर्षांचा चित्रपट आज डोळ्यासमोर उभा राहतो. ज्यावेळी कळत नव्हते त्या वयात माझे आई-वडील गेले. आईच्या मावशीने मला वात्सल्य दिले. जिथे कोणतीही सुख सुविधा नव्हत्या. आमच्या माझगावच्या डोंगरावर मी वाचायला जायचो.
मनपाच्या दिव्याखाली अभ्यास केला
भुजबळांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, कपडेही नसायचे, पुस्तकेही नसायचे ते सर्व शिक्षकांनी दिले. मला शिक्षकांनी भाषण आणि उत्तम बालोयला शिकवले. मी महानगर पालिकेच्या दिव्याखाली अभ्यास केला. हे सर्व करीत असतानाच बाळासाहेब ठाकरेंची सभा शिवाजी पार्कला झाली. मीही तेथे गेलो. त्या सभेला बाळ ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, दत्ता साळवी, रामराव आदीक होते.
आम्ही भाजी विकली, कष्ट उपसले
भुजबळांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, पहिले दहा पंधरा शाखाप्रमुख झाले त्यातला मी पहिला शाखाप्रमुख. काम काय तर मराठी माणसांची अस्मिता जपायची. मी तेव्हा चुन्यानेच भिंती रंगवत मराठी अस्मिता जपली शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्नशिल होतो. माझे मोठ्या भावाने अर्थात समीर भुजबळांचे वडिल त्यांनी खूप कष्ट केले. त्यांनी भाजी आणायची आणि आमच्या माझगावच्या फुटपाथवर विकायचो.
आम्ही पुढे काॅन्ट्रॅक्ट घेत पुढे ट्रकने भाजी निर्यात केली. आता लोक म्हणतील की, एवढा पैसा कुठून आला आम्ही बालपणीपासून कष्ट उपसले. हळूहळू आम्ही आमचा व्यवसाय वाढवला. कंपनी काढली. मुंबई आणि गोवा पहिली लक्झरी बस भवानी ट्रॅव्हल्स मी सुरू केली.
माझा भाऊ गेला..
भुजबळांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, सप्तश्रृंगी गडावर मी सहकुटुंब गडावर गेलो तेथे रस्ता नव्हता, कडक उन्हात येतानाच माझा भाऊ तेथेच ब्रेन हॅमरेजने गेला. आयुष्य काय? दुख तो अपना साथी है..राही मनवा दुख की, चिंता क्यो सताती है, आम्ही लढत राहीलो अतिशय कष्टाने.
मशाल घेऊन निवडणूक लढलो
भुजबळ म्हणाले, लोकसभेला महाराष्ट्रात सर्वात जास्त खासदार तेव्हा काँग्रेसचे आले होते. त्यावेळी आमचा शिवसेना पक्ष नोंदणीकृत नव्हता. तेव्हा निशाणी घेतली. सोप्यात सोपी निशाणी मशाल होती ती आम्ही घेतली. कारण ती भिंतीवर काढायला सोपी, आम्हीच भिंतीवर चिन्ह रेखाटायचो. आम्ही रात्रभर प्रचार करायचो. राज्याचा निकाल आला तेव्हा रथी-महारथी पडले एकटा छगन भुजबळ निवडून आला.ट
मात्तबरांना हरवले
वसंत पाटील, निलंगेकर पाटील, शंकरराव चव्हाण यांच्याविरोधात लढलो. पुढे मुंबईचा महापौर झालो. मुंबईचे चित्र पालटून टाकले. सुंदर मुंबई असा सिनेमाही दादा कोंडकेंना सोबत घेऊन काढला. ते आणि आम्ही सर्व राज्यात शिवसेनेचा प्रचार केला. त्यावेळी भाजप सोबत नव्हती.
अन् भाजपशी युती झाली
भुजबळ म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी तेव्हा बाळासाहेबांना म्हणाले होते की, आपके पास भुजबळ और हमारे पास भुजबल है..त्यानंतर आमची युती झाली. आमची शिवसेना रजिस्टर्ड झाली. धनुष्यबाण मिळाला नंतर पुन्हा मी निवडून आलो आणि महापौर दुसऱ्यांदा झालो.
मी शिवसेना सोडली
भुजबळ म्हणाले, मी शिवसेना सोडून गेलो तर शिवसेनेच्या पक्षात कुणीच नव्हते. छत्तीस आमदारांनी सांगितले की, शिवसेनेतून बाहेर पडायचे..मग ठरले तेव्हा वन थर्ड मुळे आमची आमदारकी वाचली. मनोहर जोशींनी विरोधीपक्षनेते केल्याने मी शिवसेना सोडली यात तथ्य नव्हते. मी पवारांसोबत गेलो त्यानंतर समता परिषदेची स्थापना केली. एक लाख लोकांचा मेळावा जालना येथे झाला होता.
अन्.. बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला दिले
भुजबळ म्हणाले, पवारांनी शिक्षण, नोकरी आणि राजकारणात एक महिन्यात आरक्षण दिले. महात्मा फुले यांचा वाडा राष्ट्राला अर्पण करण्यातही पवारांचा वाटा मोठा होता. मंडल आयोगाच्या शिफारसीसाठी प्रयत्न केले. मराठवाडा विद्यापीठाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी मी पवारांकडे केली. ते म्हणाले सरकार गेले तर बेहद्दर मराठवाडा विद्यापीठाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊ त्यांनी दिलेही.