मुंबई-भाजपा आमदार गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील, एसीपी यांच्यामार्फत सरकारने षड्यंत्र रचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांना केला आहे. सरकार पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांना सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असणारा पेनड्राईव्हही सुपूर्द केला.राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लक्षवेधी मांडताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत
“देशामध्ये लोकशाही असून महाराष्ट्र पुरोगामी राज्य असल्याचे आपण म्हणतो. महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कतीमध्ये आपण एकमेकांचे विरोधक आहोत पण शत्रू नाहीत. महाराष्ट्राची पोलीस व्यवस्था ही प्रगल्भ आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पण अलिकडच्या काळात पोलीस दलाचा गैरवापर सकाकडून वाढला आहे. सरकारच षड्यंत्र करत असेल तर लोकशाहीला अर्थ उरत नाही,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
“पेनड्राईव्ह मी अध्यक्षांना सुपूर्द करत आहे. सरकार कशा प्रकारचे कटकारस्थान शिजवत आहेत ते मी या पेनड्राईव्हमध्ये दिले आहे. गिरीश महाजनांच्या संदर्भात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१८मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोईटे गटाच्यावतीने गिरीष महाजनांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या व्यक्तीचे अपहरण केले. त्यानंतर महाजनांचा फोन आला आणि त्यांनी धमकी दिली. अशा प्रकारची बनावट केस तयार करण्यात आली. त्या प्रकरणात गिरीष महाजनांना मोक्का लावण्यात यावा असे सांगून कागदपत्रे तयार करण्यात आली,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
“विरोधकांची कत्तल कशी करायची यासाठी षड्यंत्र शिजत होते. या कथेमध्ये प्रमुख पात्र विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण हे होते. सुरेशदादा जैन, रमेश कदम, डीएसके, महेश मोतेवार, रवींद्र बराटे या प्रकरणात त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. गिरीश महाजन यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला त्या प्रकरणातही सरकारी वकील हेच आहेत. या वकिलांचे कार्यालय आहे की, महाविकास आघाडी सरकारचा राजकीय कत्तलखाना अशी स्थिती आहे. चाकू प्लांट करण्यापासून ते गळ्याला रक्त लावण्यापासून ते ड्रग्जचा धंदा कसा दाखवायचा, रेड कशी टाकायची आणि कसेही करुन ही केस मोक्कामध्ये कशी फिट बसेल याचे नियोजन, गुन्हेगारी स्वरुपाचा कट एक सरकारी वकील करतो याची ही निर्लज्ज कथा आहे. या सरकारी कत्तलखान्याच्या नायकाची कथा आहे. यातील महानायकही मोठे आहेत. महाविकास आघाडीच्या कारागृहात गेलेल्या आणि कारागृहाबाहेर असलेल्या नेत्यांबाबतची त्याची मते, भविष्यातील सर्व योजना त्यांच्या कारनाम्याबाबत असलेली माहिती यावरही ते स्वतः प्रकाश टाकणार आहेत. या सव्वाशे तासाहून अधिक रेकॉर्डिंगमधील काही महत्वाचा भाग मी आपल्याला देतो,” असे देवेंद्र फडणवीसांना म्हटले.
आम्ही हवेत बोलत नाही. साधे पुरावे नव्हे तर व्हिडीओ आहेत. यावर कोण कारवाई करेल. राज्यातील महाविकास आघाडीचे नेते व पोलिसांचा यात सहभाग आहे, त्यामुळे हि केस सीबीआयकडे द्यावी. आम्हाला संपविण्यासाठी असा कट शिजत असेल तर शेवटी आरपारची लढाई लढावी लागेल. तुम्ही फक्त कांगावा करता प्रत्यक्षात पुरावे आम्ही देतोय. म्हातारी मेल्याचे दुखः नाही काळ सोकावु नये. यात शहाणपण नाही तर जनतेसाठी हे प्रकार योग्य नसल्याचेही फडणवीस म्हणाले.
विधीमंडळाच्या सायंकालीन सत्रात त्यांनी सडेतोड, तडाखेबंद भाषण त्यांनी केले. फडणवीस एक एक गौफ्यस्फोट करीत होते तसे तसे सभागृहात मोठी शांतता पसरली होती. फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांना पुराव्यांचा पेनड्राईव्हच दिला. त्यानंतर सभागृहात निवेदन करतना त्यांनी पोलखोल केली.
ते म्हणाले, गिरीश महाजनांवर मोक्का लागावा यासाठी राज्य सरकारने सरकारी वकिलांना हाताशी धरुन खटाटोप केला. त्यात पोलिसांचाही सहभाग आहे. हे सर्व कुंभांड रचण्यात आले. एफआयआर सरकारी वकिलाने लिहिला. जबान्या त्यांनी पाठ केल्या. हे सर्व सरकारी वकील स्वःत तोंडाने सांगतात.
महाविकास आघाडीच्या सुनिल गायकवाड, रविंद्र शिंदेने नाथाभाऊंशी बोलणे झाले की, गिरीश महाजनांना फसवायचे. अजित पवार सहकार्य करीत नाही. पण मोठे साहेब सर्व पाहताहेत अशा संवादाचे व्हिडीओतील कागदावर लिहिलेले संवाद फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखविले. अॅड. प्रवीण चव्हाण कट कसा रचत आहेत याचा पाढाच त्यांनी वाचला. सुट बुक केला. व्हेज – नाँन व्हेज जेवण करायचे का, मदत लागली तर खडसे साहेबांची घ्या असे काही संवादही त्यांनी वाचून दाखविले. हे षंडयंत्र सरकारातील काही व्यक्तींनी आमच्या विरोधात रचले असा आरोपही त्यांनी केला. सरकारी वकिल अॅड. प्रवीण चव्हाण विरोधात पुरावे आहेत. गिरिश महाजनांनरील बोगस केसचे पुरावे माझ्याकडे आहेत असेही ते म्हणाले.