मुंबई- केंद्र सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची लवकरात लवकर हकालपट्टी केली नाही, तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.आज महाविकास आघाडीने मुंबईत ‘महामोर्चा’चं आयोजन केलं होतं. या मोर्चादरम्यान केलेल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल केला आहे.
यावेळी , पवार म्हणाले,’आजचा हा मोर्चा एका वेगळ्या स्थितीचे दर्शन करतो. मला आठवते ७० वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्रात प्रश्नासंबंधी मुंबईमध्ये लाखोंचे मोर्चे निघाले. मराठी भाषिकांचे राज्य व्हावे यासाठी हा उपक्रम यशस्वी झाला. अनेक तरूण पुढे आलेत. अखेर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मात्र तरीही जे मराठी भाषिक महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. ते महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी सातत्याने आग्रह करत आहेत. मग तो बेळगाव असेल, निपाणीचा असेल किंवा अन्य भागातील असेल त्या सर्वांचा महाराष्ट्रामध्ये समावेश व्हावा यासाठी जी त्यांची भावना आहे या भावनेसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मराठी माणूस अंतःकरणापासून सहभागी आहे.आज आपण लाखोंच्या संख्येने इथे का जमलोय तर महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकत्रित आलोय. आज ज्यांच्या हाती राज्याची सूत्र आहेत त्या सत्तेत बसलेले लोक महाराष्ट्राच्या महापुरुषांबद्दल वेगळ्या प्रकारची भाषा वापरतात. देशात अनेक राजे रजवाडे होऊन गेले अनेकांची संस्थाने झाली पण साडेतीनशे वर्ष झाली तरी सामान्य माणसाच्या अंत:करणात एक नाव अखंड आहे ते म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवछत्रपती महाराज. त्या शिवछत्रपतींबद्दल राज्याचा एखादा मंत्री, अन्य कोणी सत्ताधारी पक्षाचे घटक काही चुकीचे वक्तव्य करतात ते महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. या संबंधीची तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आज आपण लाखोंच्या संख्येने इथे जमलो. आज जो ईशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला त्यातून राज्यकर्त्यांनी बोध घेतला नाही तर लोकशाहीच्या मार्गाने त्यांना काय धडा शिकवायचा त्यासाठी महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्राची काही वैशिष्ट्य आहेत, काही सन्मानचिन्ह आहेत. महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील ही आमची सगळी सन्मानाची, आदराची स्थान आहेत. आजचे राज्यकर्ते यासंबंधी बोलतात. राज्याच्या इतिहासात असा राज्यपाल कधी पाहिला नाही. मी स्वत: विधानसभेत जाऊन ५५ वर्षे झाली याकाळात अनेक राज्यपाल पाहिले त्यांनी महाराष्ट्राचे नावलौकीक वाढविण्याचे काम केले. पण यावेळी जी व्यक्ती या ठिकाणी आली तिने महाराष्ट्राच्या एकंदर विचारधारेला संकटात नेण्याचे काम करते. महात्मा फुले, सावित्रीमाई यांच्याविषयी बाष्कळ उद्गार काढतात. त्यांना शरम वाटली पाहिजे. महात्मा जोतिबा फुले यांनी देशात सामान्य माणसाला संघटित करण्यासाठी, आधुनिक विचार देण्यासाठी, शेतीच्या क्षेत्रात परिवर्तन आणण्यासाठी, स्त्री शिक्षण असो किंवा ज्ञानदानाचे कामात पुढाकार घेणारे महात्मा जोतिबा फुले यांचे नाव सबंध देशात आदराने घेतले जाते. अशा व्यक्तीच्यासंबंधी राज्यपाल काही वक्तव्य करत असतील तर त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही.त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारला लोकशाहीच्या मार्गाने संदेश द्यायचा आहे की राज्यपालांची हकालपट्टी लवकरात लवकर करा. आज लोक शांतप्रिय आहेत, जर यांची हकालपट्टी वेळेत केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही त्याचे प्रत्यय या ठिकाणी आला आहे. मला गंमत वाटते की या राज्यकर्त्यांमध्ये एक स्पर्धा सुरु झाली आहे. ही स्पर्धा कर्तृत्वाची किंवा राज्याच्या विकासाची नाही तर महाराष्ट्राच्या बदनामीची आहे. कोणी मंत्री शिक्षण संस्था काढण्यासाठी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागितली असे वक्तव्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात शिक्षणाची दालन नव्हती त्यावेळी औरंगाबाद येथे मराठवाड्याला शिक्षणाचे दालन उभ करण्याचे फार मोठं काम त्यांनी केले. महात्मा फुले यांनी पुण्याच्या भिडे वाड्यात शाळा सुरु केली. सावित्री माईंना पुढे करून शिक्षणाची दालन खुली केली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सबंध आयुष्य ज्ञानदानासाठी घालवले. कर्मवीरांनी त्यांच्या घरी अन्न नव्हते ते उभे करण्यासाठी खबरदारी घेतली पण कधीही लाचारी स्वीकारली नाही. गरीब मुलामुलींसाठी वसतिगृह काढली व हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. आज अशा व्यक्तींसंबंधीचा उल्लेख करताना कोणी गलिच्छ शब्द वापरत असतील तर अशा लोकांना धडा शिकवण्याचे काम आपल्याला करावे लागेल. मला आनंद आहे की आपली विचारधारा वेगळी असली तरी महाराष्ट्राच्या भल्यासाठी, सन्मानासाठी, स्वाभिमानासाठी एवढ्या हजारोंच्या संख्येने लोक संयमाने आणि शिस्तीने आलात. माझी अपेक्षा आहे या चुकीच्या प्रवृत्तीला यातून काही धडा मिळेल. जर त्यांनी यातून काही धडा घेतला नाही तर पुढचा कार्यक्रम आपण एकत्र बसून करू आणि त्यांना उलथून कसे टाकायचे याचा विचार करू.