मुंबई- ”प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला कोर्टात जावे लागते. हिंमत असेल तर मैदानात या. माझी तयारी आहे. मी मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदानही तसे मिळणार नाही. तुम्ही आम्ही एका व्यासपीठावर आमने-सामने येऊ” असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला आज लगावला.
छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ सोहळ्यात ते बोलत होते..या सोहळ्यास माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ.फारुख अब्दुल्ला,प्रज्ञावंत लेखक-कवी डॉ.जावेद अख्तर,विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार,माजी मंत्री बाळासाहेब थोरात,खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मी लढाईच्या क्षणाची वाट बघतोय
ठाकरे म्हणाले, फारूक अब्दुल्ला मला म्हणाले होते की, अजिबात घाबरु नको, बाळासाहेबांसारखे लढ. भुजबळ एक वादळ आहे, त्यासोबतच वादळ निर्माण करणारे शरद पवारही आहेत. वादळ, पाऊस असो न डगमगता उभे राहणारे शरद पवार आहे. मी लढाईच्या क्षणाची वाट बघतोय.
घोषणा नको मागेही रहा
ठाकरे म्हणाले, भुजबळांनी शिवसेना सोडली तो आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता. जुन्या आठवणी खूप आहेत. भुजबळांना मनापासून शुभेच्छा देतो. केवळ नेत्यांना आगे बढो म्हणू नका, घोषणा दिल्यानंतर आम्ही लढू पण मागे कुणीच नाही असे होता कामा नये.
स्वातंत्र्याची दुसरी लढाई
ठाकरे म्हणाले, स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत आता स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू आहे. शिवसेनाप्रमुखांचा जुना साथी सोबती आजही राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमच्यासोबत आहे. ते गेले पण येताना राष्ट्रवादीच नव्हे तर काँग्रेसही घेऊन आले.