पुणे-शासनाच्या आरोग्यविषयी विविध कल्याणकारी योजना तृतीयपंथीयांना स्वतंत्र कक्षाद्वारे सेवा देऊन लागू व्हाव्यात अशी मागणी खा. वंदना चव्हाण यांनी ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांना भेटून केली. यावेळी डॉ. तांबे यांनी लवकरात लवकर सदर मागण्यांची अंमलबजावणी करू असे आश्वासन शिष्ठमंडळाला दिले.
तृतीयपंथीयांच्या आरोग्यसंदर्भातील मागण्यांबाबत खा. वंदना चव्हाण यांनी ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांची तृतीयपंथांच्या प्रतिनिधी शोनाली दळवी, प्रेरणा वाघेला आणि मयूरी बनसोड तसेच राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पश्चीम महाराष्ट्र प्रमुख मनाली भिलारे, अर्बन सेल समन्वयक नितीन जाधव यांच्या समवेत भेट घेवून मागणी पत्र सादर केले.
“संसदेत तृतीयपंथीयांच्यासाठी कायदा पारित झाल्यानंतरच त्यांच्या मानवी हक्कांच्या दृष्टीने शासनाने पावले उचलणे आता बंधनकारक झाले आहे. परंतु आज देखील त्यांच्या समस्यांविषयी फारशी अंमलबजावणी झालेली दिसत नाही. तृतीयपंथांचे शिक्षण, विलीनीकरण, कौशल्य विकास व आरोग्य यासंबधी समस्या त्यांना भेडसावतात. तृतीय पंथीयांना निसंकोचपणे आरोग्य सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ससून हॅास्पिटल मध्ये ओपीडीमध्ये राखीव वेळ मिळणे, त्यांच्यासाठी वेगळी स्वच्छतागृह करणे, एचआयव्ही ग्रस्त तृतीयपंथांसाठी वेगळा कक्ष निर्माण करणे, शासनाच्या आरोग्यविषयी विविध कल्याणकारी योजना त्यांना लागू व्हाव्यात अशी यावेळी मागणी करण्यात आली.”