पुणे– महाराष्ट्र राज्य फलोत्पादनात देशात अग्रेसर असून महाराष्ट्रातून द्राक्षाची विक्रमी
निर्यात होते. जागतिक बाजारपेठेत मागणी असलेल्या जातीच्या द्राक्षाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे
त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे आवाहन कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या 56 व्या वार्षिक मेळाव्याचे आयोजन येथील बालेवाडी
क्रिडा संकुलात करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते दिप
प्रज्वलनाने झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषि मंत्री खासदार
शरद पवार होते. यावेळी व्यासपिठावर खासदार अनिल शिरोळे, कृषि आयुक्त विकास देशमुख, महाराष्ट्र
राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, महाग्रेप्सचे अध्यक्ष सोपान
कांचन, उपस्थित होते.
यावेळी बोलताना कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले की, द्राक्ष निर्यातीमधून देशाला सुमारे 16
हजार कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त होते. या निर्यातीमध्ये महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या द्राक्ष
उत्पादनाचा मोठा वाटा आहे. द्राक्षाच्या निर्यातीसाठी आवश्यक सर्व सोपस्कार करता यावे, यासाठी
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ग्रेपनेट प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जागतिक बाजारपेठेत
मागणी असलेल्या वाणांचा वापर करुन द्राक्ष उत्पादनात वाढ करावी, त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत
शासनातर्फे शेतकऱ्यांना देण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
अध्यक्षीय भाषणात खासदार शरद पवार यांनी परदेशात द्राक्ष उत्पादनामध्ये होणाऱ्या बदलाची
दखल घेऊन ते तंत्रज्ञान येथील द्राक्ष उत्पादकांनी आत्मसात करावे, त्याचे प्रभावी विपणन करण्याकडे
प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.
जागतिक स्तरावर यशस्वी होणारे तंत्रज्ञान येथे उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने प्रयत्न करावे
असे सांगून शरद पवार म्हणाले की, कमीत कमी पाण्यामध्ये उत्पादित होणाऱ्या पिकांचे उत्पादन
घेण्यासाठी कृषि विद्यापीठांनी संशोधन करावे, यासाठी शासनाने त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन
केले. शेतकऱ्यांनी पाणी वाचवणाऱ्या तंत्राचा अवलंब करणे गरजेचे आहे, त्यासाठी शासनाने ठिबक
सिंचन पध्दतीबाबत सर्वसमावेश धोरण राबवावे. फळपिक उत्पादकांना करण्यात येणाऱ्या कर्ज वितरण
प्रणालीची नव्याने आखणी करणे आवश्यक आहे. जगामध्ये ज्या नवनवीन वाणांचा वापर करुन
फळपिकांचे उत्पादन घेण्यात येते, त्याचे उत्पादन येथील शेतकऱ्यांनी घ्यावे जेणेकरुन निर्यातीमध्ये वाढ
होईल असे ते म्हणाले.