पुणे दि. 21- शहरात बकरी ईद, गोकुळाष्टमी, गणेश चतुर्थी, मोहरम आदी उत्सव साजरे केले जातात. या उत्सव काळात कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उत्सव काळातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आयोजित बैठकित त्यांनी या सूचना केल्या. यावेळी अपर जिल्हादंडाधिकारी विजयसिंह देशमुख, पोलिस अधीक्षक संदिप पाटील, पोलिस उपायुक्त अशोक मोराळे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, अजित देशमुख, मोसमी बरडे, तसेच महापालिका, आरोग्य विभाग, जिल्हापरिषद, पशुसंवर्धन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एन. डि. आर. एफ विभाग, पाटबंधारे विभाग आदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुणे शहरातून गणेश उत्सवाची सुरवात झाली आहे. त्यामुळे शहरात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्याबरोबरच इतर उत्सव देखील साजरे होतात. या उत्सव काळात लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक सेवांचे पूर्व नियोजन करावे. पोलिस प्रशासनाने अनुचित प्रकार घडणार नाहीत, याची दक्षता घेण्याबरोबरच सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त देखील करावा. सर्व प्रशासकीय विभागांना पूर्व नियोजन करून नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी उद्भवणाऱ्या अडचणी तसेच त्यावरील उपायांवर यावेळी चर्चा केली.