पुणे – ‘दिवा प्रतिष्ठान’ च्यावतीने घेण्यात आलेल्या दिवाळी अंक वाचक स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकाराचा पुरस्कार राजेंद्र सरग यांना जाहीर झाला आहे. ‘दिवा प्रतिष्ठान’ ही दिवाळी अंकांच्या संपादकांची संघटना आहे. या संघटनेच्यावतीने दरवर्षी वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
सर्वोत्कृष्ट वाचकाचा प्रथम पुरस्कार रागिनी पुंडलिक (पुणे), द्वितीय पुरस्कार कल्पना चिंतामणराव मार्कंडेय (औरंगाबाद) आणि तृतीय पुरस्कार सौरभ साबळे (मलकापूर कराड) यांना जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट विनोदी दिवाळी अंकाचा पुरस्कार नाशिकच्या महेंद्र देशपांडे संपादित ‘हास्यधमाल’ या दिवाळी अंकाला प्राप्त झाला आहे. सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार अमोल सांडे, सर्वोत्कृष्ट लेखिका मोनिका गजेंद्रगडकर, सर्वोत्कृष्ट विनोदी लेखिका रेखा खानपुरे, सर्वोत्कृष्ट कवी पुररस्कार विलास क-हाडे, सर्वोत्कृष्ट ज्योतिषविषयक दिवाळी अंक ज्योतिष ओनामा, वाचकांनी निवडलेला सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंक पुरस्कार डॉ. सतीश देसाई संपादित ‘पुण्यभूषण’ या दिवाळी अंकास प्राप्त झाला आहे.
शनिवार, दिनांक 16 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेत दिवाळी अंक संपादकांचे एक दिवशीय अधिवेशन होणार असून यावेळी पुरस्कारांचे वितरण होईल. अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी 11.30 वाजता सुप्रसिध्द उद्योजक भारत देसडला यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द वात्रटिकाकार रामदास फुटाणे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक ल.म. कडू उपस्थित राहतील.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन ‘आपला डॉक्टर’ चे संपादक सन्ना मोरे करणार आहेत. दुपारी 1-30 ते 2-30 या वेळेत ‘दिवाळी अंक आणि विनोदी साहित्य’ या विषयावर चर्चासत्र होणार असून अध्यक्षस्थानी मिलींद जोशी राहतील. यामध्ये भारतभूषण पाटकर, विवेक मेहेत्रे, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, विनोदी कथा लेखक सुभाष खुटवड यांचा सहभाग असेल. दुपारी 2-30 ते 3-30 वाजता ‘दिवाळी अंक आणि कविता’ या विषयावरील चर्चासत्र डॉ.मनोहर जाधव यांच्याअध्यक्षतेखाली होईल. यामध्ये डॉ.सौ स्नेहसुधा कुलकर्णी, संतोष शेणई, मंगेश काळे, उध्दव कानडे सहभागी होतील.
दुपारी 3-30 ते 4-30 ‘वाचकांच्या नजरेतून दिवाळी अंक’ या विषयावरील चर्चासत्रात कल्पना बांदल, रागीणी पुंडलिक, भूषण लोहार, प्रसाद सोवनी हे सहभागी होणार असून डॉ. अंजली पोतदार सूत्रसंचालन करणार आहेत. अध्यक्षस्थानी सचीन ईटकर असतील. सायंकाळी 4-30 ते 5-50 वाजता प्रकाश पायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप तसेच संपादकांचे चर्चासत्र होईल. ‘संस्कृती’ च्या संपादिका सुनीता पवार, सोनल खानोलकर, ‘भूमिका’ च्या संपादिका रुपाली अवचरे, ‘साहित्य आभा’ च्या संपादिका शारदा धुळप, ‘धमाल धमाका’ चे संपादक नसीर शेख, ‘कलाकुंज’ व ‘हास्यधमाल’चे संपादक महेंद्र देशपांडे, ‘आक्रोश’चे संपादक ज्ञानेश्वरतात्या जराड, ‘विशाखा’चे ह.ल. निपुणगे यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमानंतर प्रातिनिधीक सत्कार होणार असून सूत्रसंचालन सुनील गायकवाड करणार आहेत.
अधिवेशनाचे संयुक्त आयोजक चंद्रकांत शेवाळे आणि अरुण जाखडे हे असून अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांसह प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय पाध्ये, कार्यवाह शिवाजी धुरी यांनी केले आहे.