नवी दिल्ली – भारतात कोरोना व्हायरसमुळे संक्रमित झालेल्यांची संख्या 900 पेक्षा अधिक झाली आहे. तर शनिवारी दोन जणांच्या मृत्यूने या व्हायरसने मृतांचा एकूण आकडा 24 झाला आहे. केरळमध्ये शनिवारी कोच्ची मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेणाऱ्या 69 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. केरळमध्ये कोरानाचा बळी गेल्याची ही पहिलीच घटना आहे. तर याच दिवशी गुजरातच्या अहमदाबाद शहरात एका 46 वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
अहमदाबादेत ज्या महिलेचे निधन झाले, तिला 26 मार्च रोजी हायपरटेंशन आणि मधुमेहाच्या त्रासानंतर उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती नाजूक असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. यासोबतच गुजरातमध्ये कोरोनामुळे मृत्यूची संख्या 4 झाली आहे. अहमदाबादमध्ये 2 आणि भावनगर व सुरतमध्ये प्रत्येकी एका-एका व्यक्तीच्या निधनाची नोंद झाली. तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी टुमकूर येथे 65 वर्षीय व्यक्तीचा बळी गेला. तर मुंबईत शुक्रवारी संध्याकाळी एका 65 वर्षीय महिलेचे निधन झाले.
दिल्लीत रेल्वेच्या डब्ब्यांचे आयसोलेशन कोचमध्ये रुपांतर केले जात आहे
कोरोनाव्हायरस संक्रमणाचा सामना करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. रेल्वेने ट्रेनच्या डब्ब्यांना आयसोलेशन कोचमध्ये रुपांतरित करण्यास सुरुवात केली आहे. बोगीमधील 6 बर्थ असलेल्या भागातील मिडल बर्थ आणि समोरील तिन्ही बर्थ काढली आहेत. या भागात रुग्णाला ठेवले जाईल. यामुळे प्रत्येक रुग्णामध्ये योग्य अंतर राहील. तसेच पायर्या देखील काढल्या गेल्या आहेत आणि बाथरूमच्या भागातही बदल केला आहे. सध्या दिल्लीतील रेल्वे डेपोत मेडिकल टीमच्या देखरेखेखाली असे कोच तयार केले आहेत.
कोरोना संसर्गाचे गुजरात आणि महाराष्ट्रात प्रत्येकी 6 आणि राजस्थानमध्ये 2 लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. देशात आतापर्यंत एकूण 904 प्रकरणे समोर आली आहेत. यातील 791 संक्रमित सध्या रुग्णालयात असून 76 ठीक झाले आहेत. ही आकडेवारी covid19india.org या वेबसाइटनुसार आहे. सध्या सरकारी आकडेवारीत संसर्ग झालेल्यांची संख्या 775 आहे. 78 लोक ठीक झाले आहेत. शुक्रवारपर्यंत कोरोनामुळे 23 लोकांनी प्राण गमावले आहेत. तर एका दिवासंत सर्वाधिक 151 संसर्गाचे प्रकरणे शुक्रवारीच समोर आले, 3 लोकांचा मृत्यू झाला आणि 25 लोक ठीक झाले आहेत. यापूर्वी 23 मार्च रोजी एकाच दिवसात 102 संक्रमित झाले होते.
इतर राज्यांतील परिस्थिती
- मध्यप्रदेश; एकूण संक्रमित – 29 : शुक्रवारी जबलपुरमध्ये आणखी दोन लोकांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दोन्ही नवीन रुग्ण आधीच संक्रमित सराफा व्यापारी येथे काम करतात. सध्या जबलपुरमध्ये 8, इंदूरमध्ये 15, भोपाळ -3, शिवपुरी – 2 आणि ग्वाल्हेरमध्ये 1 पॉझिटिव्ह रुग्ण आहे.
- राजस्थान; एकूण संक्रमित – 52 : शनिवारी अजमेरमध्ये 23 वर्षीय तरुण संक्रमित आढळला. तो नुकताच पंजाबमधून परतला होता. तसेच भीलवाडामध्ये एका 21 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यात शुक्रवारी कोरोनाचे सात नवीन प्रकरणे समोर आली होती. राज्यातील भीलवाडामध्ये सर्वाधित 21 कोरोनाग्रस्त आहेत.
- उत्तरप्रदेश; एकूण संक्रमित- 49 : उत्तरप्रदेशमध्ये आग्र्यात सर्वाधिक 9 संक्रमित रुग्ण आहेत. यानंतर लखनऊमध्ये 8 प्रकरणे समोर आली आहेत. लॉकडाउननंतर गाझियाबादमधली मजुरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना आपल्या राज्यात घरी पोहोचण्यासाठी वाहने मिळत नाहीयेत.
- छत्तीसगढ़; एकूण संक्रमित – 6 : यातील पाच प्रकरणे गुरुवारी समोर आली. या दरम्यान राज्याचे कृषीमंत्री रविंद्र चौबे यांनी म्हटले की, लॉकडाउन दरम्यान शेतकऱ्यांना मंडईतून रिकामे वाहन घेऊन येताना अडचणींचा सामना करावा लागतोय. अशात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी निर्देश दिले की, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये.
- बिहार; एकूण संक्रमित – 9 : बिहारमध्ये आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यातील एक सिवान येथील रहिवासी आहे, तो नुकताच दुबईहून परतला होता. दुसरा नालंदा येथील असून तो देखील परदेशातून परतला होता. यासोबतच राज्यात आतापर्यंत संसर्गाची 9 प्रकरणे समोर आली आहेत. यातील सहा लोकांचा कोणताही प्रवास इतिहास नाही.
- आंध्रप्रदेश; एकूण संक्रमित-13 : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टनम आणि गुंटूर येथे आणखी दोन लोकांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. यासोबत राज्यतील कोरोनाबाधितांची संख्या 13 झाली आहे. हे दोघेही इतर कोरोना संसर्गित लोकांच्या संपर्कात आले होते. यापूर्वी 17 मार्च रोजी ब्रिटनहून परतलेल्या एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने एकाला कोरोनाची लागण झाली होती.
- दिल्ली; एकूण संक्रमित – 40 : दिल्लीत आतापर्यंत कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे लॉकडाउननंतर शहरातील मजुरांचे पलायन थांबत नाहीये. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यांच्याकडे खाण्यासाठी आणि पिण्यासाठी काहीही नाहीये.
देशभरात नीट परीक्षा स्थगित
कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट पुढे ढकलण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. नीटद्वारे देशातील एम्ससह सर्व वैद्यकीय संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस कोर्ससाठी प्रवेश मिळतो.