पुणे : पुण्यालगत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या अपूर्ण कामांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत त्यामुळे महामार्गांची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी संसदेत काल केली.
लोकसभेतील प्रश्नकाळात बोलताना ते म्हणाले, पुणे हे मुंबई,कोल्हापूर, सोलापूर, नाशिक या शहरांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण आहे. या शहराच्या चारही बाजूला राष्ट्रीय महामार्ग आहेत. या मार्गावर कायम रहदारी असते. पुण्याच्या चारही बाजूला राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरणाची कामे सुरू आहेत पण ठेकेदार कंपन्यांकडून अत्यंत कूर्म गतीने ही कामे सुरू आहेत. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
पुणे सातारा महामार्गावर 140 किलोमीटरच्या कामाला 2008 साली मंजुरी मिळाली. 2010 साली या कामाला सुरुवात झाली. 31मार्च 2013 पर्यंत हा मार्गाचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. तथापि नॅशनल हायवे ने या मार्गाचे काम करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रा या कंपनीला चार वेळा मुदत वाढ दिली. त्यानंतरही रिलायन्स इन्फ्राने डिसेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ मागितली होती. मात्र अद्यापही या मार्गावरील कामे अपूर्ण आहेत.
निधीच्या कमतरतेमुळे नाशिक -पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अपूर्ण आहे.
पुणे सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण जमीन अधिग्रहाणामुळे रखडले आहे. पुणे सासवड दरम्यान वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या मार्गाचे रुंदीकरण लवकर न केल्यास स्थिती गंभीर होईल.
महामार्गालगतचे सेवा रस्ते, ओव्हर ब्रिज, अंडरपास यांची ही कामे अद्याप अपूर्ण आहेत. वारंवार मुदतवाढ देऊनही ही कामे पूर्ण होत नाहीत. सध्या पावसाळा सुरू असल्याने अपूर्ण रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्ता खराब असल्याने वेळेचा व इंधनाचा अपव्यय होत आहे. त्याचप्रमाणे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.
पुणे हे वेगाने बदलत असलेले शहर आहे. विद्येचे माहेरघर असलेले पुणे आयटीहब तसेच औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. या महामार्गांची कामे पूर्ण झाल्यास पुण्यात आणखी पायाभूत सुविधा मजबूत होतील. यामुळे पुण्यातील औद्योगिक कंपन्यांचा फायदा होईल तसेच आणखी नवनवीन उद्योग पुण्यात येतील. परिणामी पुण्याच्या विकासात भर पडेल.याबाबत सरकारने लक्ष घालून या महामार्गांची कामे त्वरित पूर्ण करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.