पुणे : “भारतीय लोकांची बुद्धीमत्ता पाहता आपल्याकडे सर्वाधिक पेटंट असायला हवेत. परंतू जागरूकतेच्या अभावामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतात खूप कमी वस्तूंचे पेटंट झाले आहेत. आपण केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे राहावे, यासाठी पेटंट किंवा स्वामित्व हक्क असणे गरजेचे असते. त्यामुळे भारतीयांनी संशोधन करतानाच बौद्धिक संपदा, पेटंट किंवा कॉपी राईट याबाबत सजग होणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन या क्षेत्रातील अभ्यासक प्रा. गणेश हिंगमिरे यांनी केले.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नविन शोध, बौद्धिक संपदा व पेटंट’ या विषयावर प्रा. गणेश हिंगमिरे यांचे व्याख्यान झाले. मयूर कॉलनीतील इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानावेळी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. विनय र. र., उपाध्यक्ष प्रा. राजेंद्रकुमार सराफ आदी उपस्थित होते.
प्रा. गणेश हिंगमिरे म्हणाले, “जे मूळचे आपले आहे, अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचे पेटंट बाहेरच्या देशातील कंपन्या घेतात व त्यावर आपला हक्क सांगतात. त्यामुळे भारतीयांनी आपल्या अधिकाधिक गोष्टींचे पेटंट मिळवायला हवे. तरुण शास्त्रज्ञांनी पेटंटबाबत सतर्क राहून जनजागृती करावी. एक पेटंट म्हणजे एक ‘इंडस्ट्री’ म्हणायला हरकत नाही. पेटंट मिळाल्यावर उद्योगाचा जन्म होतो. शेकडो लोकांना रोजगार मिळतो. हजारो रुपयाचे उत्पन्न निर्माण होते. तसेच पेटंट झालेल्या वस्तूचा समाजालाही फायदा होतो.”
”परकीय देशातील कंपन्या अधिकाधिक पेटंट स्वतःच्या नावावर करून घेतात. अमेरीकेसारख्या देशात एका कंपनीच्या नावावर शेकडो पेटंट असतात, त्या तुलनेत संपूर्ण भारतातचा विचार केला, तर खूप गोष्टींचे पेटंट आपल्या नावावर आहेत. आयआयटीमध्ये पेटंट संस्कृती रुजू लागली आहे, ही सकारात्मक बाब आहे. बौद्धीक संपदा हा राजमार्ग आहे. तुमच्या नावावर असलेली तुमच्या हक्काची बैद्धीक संपदा चोरीला जाण्याचे प्रकारदेखील मोठया प्रमाणात होतात. त्याचे पेटंट असेल, तर कायदेशीर कारवाई करून नुकसानभरपाई मिळू शकते. पेटंट, कॉपीराईट याबाबत शालेय शिक्षणात समावेश करण्याची गरज आहे.” असेही त्यांनी नमूद केले.
प्रा. विनय र. र म्हणाले , ”पेटंटच्या संकल्पनेचा जाणीवपूर्वक वापर केला जावा. नवीन गोष्टी सापडल्या की त्याचे पेटंट तयार करून घेणे महत्त्वाचे आहे. आपण निर्मिलेल्या गोष्टी चोरल्या जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी.”
प्रा. राजेंद्रकुमार सराफ यांनी प्रस्तावना केली.