पुणे :- ७२ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पिंपरी येथील गोयल गंगा इंटरनैशनल स्कूल मध्ये वनप्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून मैन्यूफैक्चरिंग ग्रुप ऑफ आर्मी बेस वर्कशॉपचे उपमहाव्यवस्थापक कर्नल के.टी. कुरिआकोस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलच्या सोनू गुप्ता,मुख्याध्यापिका भारती भागवाणी, इतर शिक्षक आणि पालकही उपस्थित होते.
शाळेच्याच भागात सहावी ते दहावीच्या मुलांनी यावेळी ५० झाडे लावून ‘वन प्रकल्पा’ची सुरुवात केली. याचा शुभारंभ काल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाला. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये ७०० हून अधिक झाडे लावण्याचा आणि जोपासण्याचा आमचा मानस आहे अशा भावना मुख्यध्यापिका भारती भागवाणी यांनी व्यक्त केल्या.
आपल्या नैसर्गिक संसाधनाचा वापर कसा देशाच्या चांगल्यासाठी करता यावा तसेच त्याचे जतन कसे करावे, हाच या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. असे मत सोनू गुप्ता यांनी मांडले.
आपल्या मधील कौशल्यामुळे अनेक गोष्टी सहज साध्य करता येतात . पण त्यासोबत ही क्षमता वाढविणे, जोपासणे आणि त्याचा उपयोग समाजातील अधिकाधिक लोकांच्या कल्याणासाठी कसा करता येईल हा विचार करणे आवश्यक आहे असे मत कुरिआकोस यांनी मांडले. याशिवाय ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेचे काय पैलू आहेत, येणाऱ्या पिढ्यांच्या स्वातंत्र्यासाठी आधीच्या पिढ्यांनी नेमकी काय किंमत मोजली याची माहितीही या निमित्ताने करून देण्यात आली.