पुणे-गेल्या दि. ३० जानेवारी २०१९ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त उत्तर
प्रदेशातील अलिगड येथे हिंदू महासभेच्या कार्यकर्ते व नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर
प्रतिकात्मकरित्या गोळ्या झाडल्या आणि शौर्य दिवस साजरा केला याबाबत फेसबुकवर श्रीमती.
निती गोखले नावाच्या महिलेने आपले कमेंट्स पोस्ट केले. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की,
‘Ajun 2 Gandhi ahet. Tyacha vadh karayla ek Nathuram Godse have’ या कमेंट्स
वरून हे स्पष्ट होते की, नीती गोखले यांना गांधी कुटूंबियांबाबत द्वेष आहे आणि त्यांची हत्या
झाली पाहिजे असे त्यांना वाटते. ही फार गंभीर बाब आहे. या पोस्टचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते रमेश अय्यर, ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर
व सोशल मिडीयाचे प्रमुख चैतन्य पुरंदरे यांनी वरिष्ठ पोलीस स्टेशन सायबर सेल शिवाजीनगर
येथे याबाबत तक्रार नोंदविली. तक्रारीत असे म्हटले आहे की, निती गोखले यांच्या विरूध्द
पोलीसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे तीव्र
आंदोलन करण्यात येईल.