मुंबई- शिंदे – फडणवीस सरकारने १६४ विरुद्ध ९९ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. शिंदे यांच्या विजयानंतर सभागृहामध्ये अभिनंदनपर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी फडणवीस यांनी शिंदे यांचा उल्लेख करताना ‘ भाजपा -शिवसेना ‘युतीचे मुख्यमंत्री’ असा केलाय. यानंतर भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांनी, ‘शिवसेना भाजपा युतीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या.
मी पुन्हा येणार असे म्हटले होते. त्यावरुन माझी खूप टिंगळटवाळी करण्यात आली. पण, मी पुन्हा आलो, यावेळेस मी एकटा आलो नाही तर एकनाथ शिंदे यांनासोबत घेऊन आलो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च स्थानी बसवले त्यांनी घरी बसवले असते, तरी आदेश मान्य केला असता, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर 164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा शिवसेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री असा उल्लेख करत अभिनंदन केले. यावेळी आमदारांनी सेना-भाजप युतीचा विजय अशी घोषणाबाजी केली. प्रस्ताव मंजूर होण्यासाठी बाहेर राहून मदत करणाऱ्या अदृश्य हातांचेही आभार, असे फडणवीस म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांचे पाईक आणि कर्मावर त्यांची निष्ठा असून संघटक आणि जनतेचे सेवेकरी आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे या दोघांच्या प्रभावामुळे 80 च्या दशकामध्ये त्यांनी शिवसेनेत सक्रिय काम सुरू केले. एक साधा कार्यकर्ता, शाखा प्रमुख ते वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत ते मुख्यमंत्री झालेत. आनंद दिघे यांनी 1984 मध्ये किसननगर शाखा प्रमुख म्हणून निवड केली. या नंतर दिघे साहेबांच्या नेतृत्त्वात अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. सामान्याला न्याय देण्यासाठी ते आंदोलन करायचे.
ते म्हणाले की, 2004 नंतर सलग चार वेळा ते आमदार झाले. मागच्या काळात मंत्री म्हणूनही त्यांनी माझ्यासोबत काम केले. या काळात सीमा प्रश्नावर जे काही आंदोलन झाले, या आंदोलनावर एक नेता म्हणून त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. 40 दिवस बेल्लारीच्या जेलमध्ये ते राहिले. त्यातूनच एक मोठं व्यक्तीमत्व तयार झालं. 1097 साली ठाण्यात नगसेवक, मनपा सभागृह नेते, आमदार, जिल्हाप्रमुख झाले.
फडणवीसांची शायरी –
दुनिया का हर शौक पाला नहीं जाता कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता मेहनत करने से मुश्किल हो जाती है आसान क्योंकि हर काम तकदीर पर टाला नहीं जाता