पुणे : बार्टीला निधी देण्याबाबत राज्य सरकारकडून अन्याय होत आहे. याबाबत केंद्र सरकारने लक्ष घालून महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले निवेदनाद्वारे केली.रामदास आठवले शनिवारी पुणे दौऱ्यावर होते यावेळी त्यांची भेट घेऊन सुनील माने यांनी त्यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, मागासवर्गीय समाज तसेच विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या बार्टी संस्थेने महाराष्ट्र सरकारकडे यंदाच्या अर्थसंकल्पांत ३०० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र एप्रिलपासून महाराष्ट्र सरकारने बार्टीला निधी उपलब्ध करून दिला नाही. बार्टी सातत्याने मागासवर्गीय समाजाच्या तसेच विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी उपक्रम राबवत असते. राज्य सरकारच्या अशा धोरणामुळे संस्था अडचणीत येऊ शकते. हा निधी त्वरित बार्टीला मिळण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा.
त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात ‘थॉटस ऑन इंडिया नँशनल सेक्युरिटी’ हा कोर्स सुरु होता. मात्र सध्या हा कोर्स बंद असून राज्य सरकारने त्यासाठी निधी देणे थांबवले आहे. या बरोबरच बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधुन पाली ञिपिटिकाचे मराठी भाषांतर करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मधील पाली विभागासोबत करार करण्यात आला होता, मात्र महाराष्ट्र सरकारकडून विद्यापीठासोबतचा हा करार रद्द करण्यात आला आहे. या सर्व बाबतीत आपण लक्ष घालून महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय मंत्र्यांबरोबर बैठक लावावी.