पुणे-कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात घडली आहे. घरासमोर खेळत असताना पावसाच्या पाण्याने भरलेल्या उघड्या खड्ड्यात पडून सोहम लखन कसबे (वय 2) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात कंत्राटदाराविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले होते. मात्र, काम सुरू असतानाही त्या खड्ड्यांभोवती कोणतेही बॅरिकेड्स, संरक्षक जाळी किंवा धोक्याचा इशारा देणारे फलक लावण्यात आले नव्हते.
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे हे सर्व खड्डे पाण्याने पूर्ण भरले होते. त्यामुळे त्यांची खोली ओळखणेही अशक्य झाले होते. गुरुवारी दुपारी सोहम आपल्या घराबाहेर खेळत असताना नकळत या पाण्याने भरलेल्या खड्ड्याजवळ गेला आणि त्यात पडला. पाण्यात बुडाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने कसबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोहमची आई शिल्पा कसबे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना घडलेला प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, “मी घरात स्वयंपाक करत होते आणि सोहम घराबाहेर खेळत होता. काही वेळाने तो दिसेनासा झाल्याने मी भावाला विचारलं, पण त्यालाही तो दिसला नव्हता. त्यानंतर आम्ही सर्वत्र शोध घेतला. शेवटी जवळच पाण्याने भरलेल्या खड्ड्यात काठी टाकून पाहिलं, तेव्हा सोहमचा मृतदेह वर तरंगून आला.” यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणात कंत्राटदाराच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. परिसरात सांडपाणी व पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तब्बल चार मोठे खड्डे खोदण्यात आले होते. परंतु, त्याठिकाणी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या.
खड्ड्याभोवती बॅरिकेड्स उभारणे, धोक्याचे फलक लावणे, दोरी किंवा पत्रे लावून परिसर सुरक्षित करणे आवश्यक असताना ते काहीच करण्यात आले नाही. पावसामुळे खड्डे पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने ते सामान्य नागरिकांना किंवा लहान मुलांना दिसण्याची शक्यताही नव्हती.
स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की, काम पूर्ण न करताच कंत्राटदाराने खड्डे उघडे सोडले आणि याच बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप बालकाचा जीव गेला.

