दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिन’ म्हणून मानला जातो. या निमित्त कर्क रोगाबद्दल समाजामध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येते.
आपल्या देशात दरवर्षी लाखो रुग्ण विविध प्रकारच्या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात आणि लाखो नवीन रुग्णांना कॅन्सर चे निदान होते. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये तर तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या कॅन्सरचे प्रमाण भयावह रित्या वाढतच आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, फुप्फुसाचा कर्करोग होतो. त्याच बरोबर अन्ननलिकेचा, जठराचा, मोठ्या आतड्यांचा, गुदाचा, यकृताचा, पौरुष ग्रंथीचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग असे विविध प्रकार भारतात आढळतात.स्त्रीविशिष्ट अवयवांच्या विचार केला तर ‘स्तनांचा कर्करोग’ हा एकूण कर्क रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणे आढळतो. अन्य अवयवांचे म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि बीज ग्रंथीचा कर्करोगही मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या दोषांना बिघडवणारी कारणे, विरुद्ध आहार घेणे, जेवणाच्या चुकीच्या वेळा, भूक लागली आहे अथवा नाही याचा विचार न करता खाणे, सातत्याने तिखट – मसालेदार पदार्थ खाणे, शिळे अन्न खाणे, बेकरीचे पदार्थ – ज्या पदार्थांमध्ये पोषणमूल्य कमी आहेत ते खाणे त्याचबरोबर उष्णतेशी सातत्याने येणारा संपर्क, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव या कारणांचा विचार मांडला आहे.
या कारणांमुळे शरीरातील तीनही दोषांचे संतुलन बिघडते; विशेषत्वाने शरीरातील वातदोषाचे प्राधान्य दिसून येते आणि शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ होण्यास सुरुवात होते त्यालाच आपण त्या त्या अवयवाचा कॅन्सर असे म्हणतो.
कॅन्सर बाबत ‘आयुर्वेद चिकित्सा’ काही आहे का? अशी विचारणा सातत्याने रुग्ण वा रुग्णाचे नातेवाईक करत असतात, किंवा आपापल्या परीने आवळा वा इतर तथाकथित आयुर्वेदीय औषधे व उपचार घेत असतात. परंतु वैद्याकडून आयुर्वेदीय पद्धतीने तपासणी करून घेतलेली आयुर्वेदिक औषधे ही कॅन्सरच्या रुग्णांमध्ये हितकारक ठरतात.
कॅन्सरच्या रुग्णांची आयुर्वेद चिकित्सा करत असताना १) किमोथेरपी किंवा शल्यकर्म करण्यापूर्वी आयुर्वेद चिकित्सा घेणे. २) किमोथेरपी चालू असताना बरोबर आयुर्वेद चिकित्सा चालू ठेवणे. ३) किमोथेरपी, रेडिएशन पश्चात आयुर्वेद चिकित्सा घेणे.४) कॅन्सर हा अन्य अवयवांमध्ये पसरू नये (Metastasis) म्हणून ‘आयुर्वेदीय रसायन चिकित्सा’ चालू ठेवणे.५) केवळ आयुर्वेद चिकित्सा घेणे.असे आयुर्वेद चिकित्सेचे विविध टप्पे संभवतात.
आयुर्वेदीय चिकित्सा सुरू करत असताना रुग्णाचे बल, रोगप्रतिकारक शक्ती, वय, आजाराचा प्रकार आदी बाबींचा विचार करून औषधांची निश्चिती केली जाते. आणि अशा पद्धतीने केलेले उपचार हे रुग्णास उपयुक्त ठरलेले आहेत.
या सर्वांमध्ये महत्त्वाची ठरते, ती शरीराची ‘रोगप्रतिकारक शक्ती’ म्हणजेच शरीराचे बल. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, आहार-विहार यांचे नियोजन, मानस स्वास्थ्य जपणे आणि रसायन चिकित्सा यांचा विचार केलेला आहे.
१. आहारामध्ये देशी गायीचे दूध देशी गायीचे तूप यांचा समावेश असावा. २. जेवण ताजे, सकस असावे.३. फळ भाज्यांचा आहारात समावेश नेहमी असावा. यामध्ये पडवळ, दोडका, घोसाळे, कारले, भेंडी, दुधी भोपळा, लाल भोपळा या भाज्या असाव्यात.४. जेवणामध्ये आवडीनुसार हळद, सुंठ, जिरे, धने आदि मसाल्यांच्या पदार्थांचा समावेश असावा.५. गव्हाचा फुलका किंवा पोळी, ज्वारी, बाजरी यांच्या भाकरी चालतील.६. जेवणाची वेळ नियमित असावी.७. शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ कटाक्षाने टाळावे.८. ऋतु, दिवस, वय आदीं नुसार आपली भूक नेहमीच बदलत असते, त्यामुळे भुकेच्या प्रमाणातच जेवण करावे.
◆विहाराचा विचार करता ज्यांना शक्य आहे त्यांनी घरातच व्यायाम करावा.◆व्यायाम देखील सहजसोपी योगासने, पूरक हालचाली, दीर्घश्वसन यांचा समावेश असावा.◆ पावसाळ्यातील गारठा यापासून शरीराचे संरक्षण करावे. ◆दिवसा झोप, रात्री जागरण टाळावे.
★ या आजारामध्ये मानस स्वास्थ्य जपणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी ओंकार, ध्यान, दीर्घश्वसन किंवा इष्ट देवतेचे चिंतन करावे.
आयुर्वेदामध्ये कॅन्सर रुग्णांना ‘रसायन चिकित्सा’ अत्यंत उपयुक्त आहे. रुग्णाचे वय, कुठल्या अवयवाचा कॅन्सर आहे, अग्नि, यांचा विचार करून विविध रसायनांचा वापर करता येऊ शकतो. ही रसायन औषधे व्याधी क्षमता चांगली करणारी असतात, रुग्णाचे बल वाढवणारे असतात, भूक वाढवणारी असतात, त्वचेची कांती, वर्ण वाढवणारी असतात आणि आयुर्वेदात वर्णन केलेले शरीरातील सात धातू – त्या सर्वांना बलवान करणारी असतात. याचे उदाहरण म्हणजे परिचित असलेला ‘च्यवनप्राश अवलेह’.ह्याच बरोबर अन्य रसायन औषधे देखील आयुर्वेद वैद्यांच्या सल्ल्याने चालू करणे हितावह ठरते. ही औषधे आयुर्वेदीय पद्धतीने शरीराचा विचार करून, कॅन्सर कुठल्या अवयवाचा आहे याचा विचार करून वेगवेगळी असतात.
कॅन्सर रुग्णांमध्ये असलेली पुढची चिंताजनक बाब म्हणजे अन्य अवयवांमध्ये कॅन्सर पसरणे (Metastasis). जेव्हा धातूंचे बल चांगले असते, रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तेव्हा या Metastasis ला प्रतिबंध होण्यास मदत होते.
या सर्व गोष्टींचा साकल्याने सारासार विचार करता, कॅन्सरच्या रुग्णांमध्ये आयुर्वेदीय चिकित्सा निश्चितच उपयोगी ठरते.
आज ‘जागतिक कर्करोग दिना’निमित्त आपली प्रकृती, आपले कामाचे स्वरूप याचे आयुर्वेदीय पद्धतीने ज्ञान करून घेऊन आपला आहार-विहार ठरवावा. कुणा जवळच्या नातेवाईकाला कर्करोग झालेला असेल तर वरील बाबी नक्कीच जाणून घेऊन त्या कटाक्षाने पाळाव्यात आणि दुसरे म्हणजे जर कर्करुग्ण असाल किंवा त्याचे नातेवाईक असाल तर आग्रहाने आयुर्वेदीय चिकित्सेचा हट्ट धरावा आणि स्वास्थ्य प्राप्त करून घ्यावे.
डॉ. समर्थ कोटस्थाने, पुणे.