भाजपचे मुख्यालय असलेल्या नागपुरात उमेदवार पराभूत झाल्याने भाजपला हादरा बसला आहे. 1958 नंतर पहिल्यांदाच भाजप गड ढासळला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नागपूर मतदार संघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
1958 पासून होता भाजपचा बालेकिल्ला
नागपुरात महाविकास आघाडीने भाजपच्या गडाला सुरुंग लावला आहे. 1958 पासून हा गड भाजपच्या ताब्यात होत्या. नागपुरात भाजपचे मुख्यालय असल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या आधिपासून हा गड भाजपच्या ताब्यात होता. 1958 मध्ये पंडीत बच्छराज व्यास हे जनसंघाचे नेते होते. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपकडे होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधर राव फडणवीस हे देखील येथून निवडून आले होते. केंद्रीय मंत्री गडकरीही सलग चार वेळा निवडून आले. एकदा त्यांनी सर्वाधिक विक्रम केला. ते अविरोध निवडूण आले. हे संघाचे मुख्यालय आहे. येथे पराभव होणे हा भाजपला मोठा धक्का आहे.
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत
अभिजीत वंजारी ५५ हजार ९४७, संदीप जोशी ४१ हजार ५४०, राजेंद्रकुमार चौधरी २३३, इंजीनियर राहुल वानखेडे ३ हजार ७५२, ॲङ सुनिता पाटील २०७, अतुलकुमार खोब्रागडे ८ हजार ४९९, अमित मेश्राम ५८, प्रशांत डेकाटे १ हजार ५१८, नितीन रोंघे ५२२, नितेश कराळे ६ हजार ८८९, डॉ. प्रकाश रामटेके १८९, बबन तायवाडे ८८, ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार ६१, सी.ए. राजेंद्र भुतडा १ हजार ५३७, प्रा.डॉ. विनोद राऊत १७४, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल ६६, शरद जीवतोडे ३७, प्रा.संगीता बढे १२० आणि इंजीनियर संजय नासरे ५६ मते पडली आहेत. प्रत्येक फेरीत २८ हजार मतांची मोजणी होत होती. तथापि, पाचव्या फेरीमध्ये उर्वरित २१ हजार ५३ मतांची मोजणी करण्यात आली. या निवडणुकीत एकूण वैध मते १ लक्ष २१ हजार ४९३ ठरली. ११ हजार ५६० मते अवैध ठरली.
विधान परिषद निवडणुकीत अभिजित वंजारी निवडून आले आहेत. औपचारिक घोषणा बाकी आहे. थोड्याच वेळात प्रमाणपत्र घ्यायला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे