पुणे- एकीकडे नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत हक्काची जागा आणि सत्यजित तांबे यांच्यासारखा युवा नेता कॉंग्रेसने गमावला असताना आता पुण्यातही कॉंग्रेस पक्ष अविनाश बागवे यांच्यासारखा महापालिकेच्या राजकारणात आणि रस्त्यावरच्या आंदोलनात वाघ म्हणून वावरलेला चेहरा गमावण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते आहे .गेल्या काही महिन्यांपासून अविनाश बागवे यांना प्रदेश अध्यक्ष यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची कुजबुज देखील पक्षात सुरू होती, आज त्यांच्या प्रभागातील रशीद शेख यांचा स्थानिक कुठल्याच पदाधिकारीशी चर्चा न करता काँग्रेस पक्षात झालेला प्रवेश कारणीभूत ठरल्याचे समजते.काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसचा एक ज्येष्ठ नगरसेवक आपल्या मुलांसह भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर असल्याच्या बातम्या आल्या होत्या ,त्यानंतर आता भाजपाने मास लीडर खेचून न्यायचे असे ठरवून आज कसबा निवडणुकीच्या तोंडावर ‘मास्टर स्ट्रोक’ देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते आहे.
शह आणि काटशह चे राजकारण–
कसबा विधानसभेच्या पोटनिवडणूकित आता राजकीय रंगांना उधाण येत असून भाजपाच्या उमेदवाराशी प्रमुख लढत देणाऱ्या कॉंग्रेस पक्षाने याच मतदार संघातील आपल्या भाजपात गेलेल्या एका माजी नगरसेवकाला आज पुन्हा कॉंग्रेसमध्ये खेचण्यात यश मिळविले असताना दुसरीकडे या ‘शहास काटशह’म्हणून भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज थेट कॉंग्रेसच्या युवा आणि अभ्यासू म्हणून लौकिक मिळविलेल्या माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्याशी त्यांच्या राहत्या घरी जावून संपर्क केला असून लवकरच ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अविनाश बागवे भाजपात प्रवेश करतील असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे.प्रत्यक्षात बागवे आणि भाजपा पदाधिकारी यांच्यातील बोलणी समजू शकली नसली तरी येत्या ४/५ दिवसात त्यांचा प्रवेश होईल असे सूत्रांकडून सांगितले जाते आहे. बागवे यांना मानणारा केवळ कसब्यातला ,पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रातला मातंग आणि दलित वर्ग मोठ्या संख्येने आहे. भ्रष्टाचारविरोधातील आणि अन्यायाविरोधातील त्यांची अभ्यासू आक्रमकता या त्यांच्या गुणामुळे ते लोकप्रिय आहेत . शहर आणि परिसरात त्यांनी केलेल्या आंदोलनांची संख्या सर्वात वरच्या क्रमांकाची राहिली आहे, पुणे महापालिकेत कॉंग्रेस पक्षाच्या अवघ्या ३ नगरसेवकांचाच दबदबा राहिला आहे . त्यातीलच 1भाजपच्या वाटेवर असल्याचा वृत्ताने खळबळ उडते आहे.कसब्यातील रोहित टिळक सारखा युवा नेतृत्व असलेला चेहरा देखील काँग्रेस च्या काही नेते मंडळींवर नाराज असल्याचे बोलले जात असून अनेक दिवस ते राजकीय कार्यक्रमातून अलिप्त असल्याचे दिसते आहे.