पुणे : महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. शुक्रवारनंतर सर्वच पक्षातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले. सर्वाधिक इच्छुकांची संख्या भारतीय जनता पक्षाकडे असल्याने सहाजिकच, सर्वांना उमेदवारी देणे पक्षाला शक्य झाले नाही. त्यामुळे उमेदवारी न मिळालेल्या अनेकांनी काल आपला ‘नाराजी’नामा उघडपणे व्यक्त केला.
ही नाराजी दूर करणे, हे भारतीय जनता पक्षापुढे आव्हान होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील यादीवर अंतिम मोहोर उमटवल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट पुण्यात परतले व त्यांनी काल (शनिवारी) दिवसभर नाराज इच्छुकांची भेट घेवून त्यांची मनधरणी केली. यावेळी शहराध्यक्ष योगेश गोगावले व खा. संजय काकडेही उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या समजुतीनंतर पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची ग्वाही नाराजांनी दिली. दरम्यान, महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला भाजपने सशक्त पर्याय दिल्याने अनेक इतर पक्षीय उमेदवारही भाजपमध्ये दाखल झाले. यातील काहींना भाजपने उमेदवारी दिल्याने भाजपमधील अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली नाराजी जाहीरपणे उघड केली. त्यामुळे पक्षापुढे पेच प्रसंग निर्माण झाला होता. याबाबत, त्यांची समजूत काढण्यात पालकमंत्र्यांना यश आले. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ‘ इतर पक्षातील उमेदवारांना तिकीट देणे हा एक राजकीय डावपेचाचा भाग आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ही राजकीय गणिते मांडावी लागतात. इतर पक्षातून आलेल्या फक्त ७ ते ८ उमेदवारांना तिकीट दिले असल्याने पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय झाला, असे म्हणता येणार नाही. गेल्या २५ वर्षापासून शिवसेना हा आमचा मित्र पक्ष असल्याने निवडणुकीत जरी युती झाली नसली तरी, निवडणुकीनंतर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी युती करण्याचे सूतोवाच बापट यांनी केले. तसेच प्रचारातही शिवसेनेवर टीका-टिपण्णी करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.