काँग्रेस ला खेचत राष्ट्रवादी सुसाट
मुंबई-
नगरपंचायत निवडणुकांमध्ये बुधवारी भाजपने राज्यभरात सर्वाधिक जागा मिळवल्या मात्र एकूण जागांची गोळाबेरीज करता सत्ताधारी महाविकास आघाडीची सरशी झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकतील निकालाचीच नगरपंचायतमध्येही पुनरावृत्ती घडण्याची शक्यता आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यातील १०६ नगर पंचायतींसाठी दोन टप्यांमध्ये मतदान झाले.
त्याचा निकाल बुधवारी जाहिर झाला. यामध्ये सर्वाधिक ३८४ जागा भाजपने पटकावत राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ३४४ जागा जिंकून दुसरा क्रमांक प्राप्त केला. काँग्रेसला ३१६ जागा मिळाल्या असून राज्यात महाविकास आघाडीचे सारथ्य करत असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चौथ्या क्रमांकाच्या २८४ जागा मिळवता आल्या आहेत.
२०१४ ते १८ दरम्यान पार पडलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकांत राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष होता. पहिला क्रमांक भाजपचा तर दुसरा मोठा पक्ष काँग्रेस होता. यावेळी मात्र राष्ट्रवादीने आपली कामगिरी सुधारली असून काँग्रेसला मागे खेचत दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिवसेना मागच्या वेळी चौथ्या क्रमांकावर होती.
यंदा ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्यामुळे गाजलेल्या या निवडणुकीवर कोरोनाचेही विघ्न होते परंतु राज्यभरात भरभरून मतदान झाले. राज्यातील १०६ नगर पंचायतींमधील १ हजार ८०२ जागांसाठी २१ डिसेंबर २०२१ आणि १८ जानेवारी २०२२ अशा दोन टप्प्यात मतदान झाले होते. यापैकी ९७ नगर पंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी होऊन १ हजार ६४९ जागांपैकी १ हजार ६३८ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले.
ही निवडणूक चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले. या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. दरम्यान, भाजप पुन्हा नंबर वन पक्ष असल्याचे सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली..तर भाजपला राज्यातील जनतेने नाकारले असून एकूण ८० टक्के जागा महाविकास आाघाडीच्याच पारडयात पडल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.