जोधपूर – नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभर आंदोलने सुरू असताना केंद्र सरकार हे मागे घेणार असल्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. नागरिकत्व कायद्यावरून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे शुक्रवारी शहा म्हणाले. ते राजस्थानात बोलत होते. अनेक आंदोलनांमध्ये या कायद्याला देशातील मुस्लिमांच्या विरोधी असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, या कायद्याचा देशातील मुस्लिमांशी काहीच संबंध नाही. तसेच काँग्रेस आणि विरोधी पक्ष मुद्दाम यावरून गैरसमज आणि अफवा पसरवण्याचे काम करत आहेत असा आरोप अमित शहा यांनी केला.
राहुल गांधींना दिले सीएए वर चर्चेचे आव्हान
जोधपूर येथील सभेत बोलताना अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खुले आव्हान दिले आहे. नागरिकत्व कायद्यावर चर्चा करण्यासाठी कुठेही या असे त्यांनी सांगितले आहे. राहुल गांधींना आव्हान देताना शहा म्हणाले, “राहुल बाबा कायद्याचा अभ्यास केला असेल तर कुठेही चर्चा करण्यासाठी या. कायदाच वाचला नसेल तर मी त्याचे इटालियन भाषांतर पाठवतो. ते वाचून घ्या.” अमित शहा एवढ्यातच थांबले नाहीत. त्यांनी काँग्रेसवर या कायद्यावर अफवा पसरवण्याचे आरोप केले आहेत. काँग्रेसच काय, देशातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन विरोध केला, तरीही भाजप सरकार नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून एक इंचही माघार घेणार नाही असे विधान शहा यांनी केले.