नागपूर : ‘चिखलात कमळ फुलते, असे म्हटले जाते. पण त्यासाठी आधी चिखल करा आणि मग कमळ फुलवा’, असे आता होणार नाही. कारण महाराष्ट्रात तीन पक्षांची ताकद एकत्र आली आहे. सर्वत्र गोंधळ घालून देश पेटवायचा आणि मग राज्य आणायचे ही शिवसेना किंवा अन्य दोन्ही पक्षांची भूमिका नाही. आम्ही भयमुक्त महाराष्ट्र घडवायला निघालो आहोत’, या शब्दांत शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी विधानसभेतील पहिल्याच भाषणात भाजपला सुनावले.
विधानसभा निवडणुकीत प्रथमच निवडून आल्याने नवनिर्वाचित आमदार म्हणून आदित्य सभागृहात नेमके काय बोलतात, कसे बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. बुधवारी रात्री आमदार आदित्य ठाकरे यांना राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवरील प्रस्तावावर विधानसभेत बोलण्याची संधी मिळाली.
‘सभागृहातील दिग्गजांना नमन करतो, ज्यांनी मला सभागृहात पाठवले त्यांना नमन करतो’, अशी सुरुवात करून आदित्य ठाकरे म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन होत असताना महिनाभरातच मोठे नाट्य बघायला मिळाले. सत्तेची हाव काय असते, कशी असते, खोटे कसे बोलले जाते, मित्रपक्षाला कसे डावलले जाते याचा अनुभव घेत असतानाच कौटुंबिक संबंध कसे निर्माण होऊ शकतात, हेदेखील बघायला मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या तिघांनी महाराष्ट्रात बदल घडवण्यासाठी, नवी दिशा देण्यासाठी काम सुरू केले आहे. महाराष्ट्रात भयमुक्त सरकार स्थापन करण्यात यश आले आहे’, असे आदित्य म्हणाले.
‘जे पूर्वी सामना वाचत नव्हते, ते वाचायला लागले. आधीपासून सामना वाचला असता तर ते सत्ताधारी बाकांवर आमच्यासोबत राहिले असते’, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. ‘महाराष्ट्रात लोकशाही नक्की काय असते ते या सरकारने दाखवून दिले आहे. आम्ही सारेच पक्ष दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी काम करत आहोत. शेतकरी बांधवांना कर्जमुक्त, चिंतामुक्त करायचे असेल तर आपल्याला काही गोष्टींवर विचार करायला पाहिजे. आता हवामान व तापमानातील बदलावर सभागृहाची एखादी बैठक हवी, त्यात या समस्येवर गांभीर्याने चर्चा व उपाययोजनांवर चर्चा व्हावी. २०५० पर्यंत मुंबई, कोकणासह अनेक शहरे पाण्याखाली जाण्याची भीती आहे. त्यावर आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे’, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आदित्य ठाकरे बोलत असताना शिवसेनेसह सत्ताधारी बाकांवर बऱ्यापैकी उपस्थिती होती. बहुतांश आमदार बाके वाजवून त्यांच्या प्रत्येक वाक्याला दाद देत होते. विरोधी बाकांवर मात्र या वेळी शुकशुकाट जाणवत होता.
प्लास्टिक बंदी, डिजिटल शिक्षणासाठी आग्रहाने मांडले मुद्दे
आदित्य यांनी प्लास्टिक बंदी, बेरोजगारी, शिक्षण, उद्योग या विषयांवरही मत मांडले. शैक्षणिक धोरण बदलले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करताना ते म्हणाले, ‘मुंबई मनपाच्या १२०० वर शाळांत आठ भाषांचे शिक्षण दिले जाते. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना टॅब दिले. हे अाॅनलाइन शिक्षण आता गावपातळीवर नेले पाहिजे. सोलरवर चालणारे टॅब आपण देऊ शकतो. मुंबईत ५०० शाळांत व्हर्च्युअल क्लासरूम आहेत. तेच तंत्रज्ञान गावपातळीवर नेले तर समान शिक्षण गावापर्यंत जाईल. व्हर्च्युअल क्लासरूम व डिजिटल एज्युकेशनचे उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहाेत.’