नागपूर-कर्जत-जामखेड मतदारासंघातून निवडून पहिल्यांदाच विधानसभेत गेलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज प्रथमच विधानसभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी गेल्या पाच वर्षातील कामगिरीवर भाष्य करत तुफान फटकेबाजी केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवर बोलताना रोहित पवार यांनी बेरोजगारी, शिक्षण, उद्योग, शेती, महिला, तरुणांचे प्रश्न, सरकारी नोकरीतील रिक्त पदे आदी प्रश्नांकडे लक्ष वेधलं. सत्ता गेल्यामुळे सैरभैर झालेल्या भाजपने आपला वेळ राजकीय भाषणबाजीतच घातला अशी टीका यावेळी त्यांनी केली. तसंच गेल्या पाच वर्षात आपलं राज्य विकासापासून वंचित राहिलेलं पहायला मिळालं अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.
“विरोधी पक्षात बसलेल्या भाजपकडून अधिक प्रगल्भतेने जनतेचे प्रश्न मांडावेत, विकासावर बोलावं अशी अपेक्षा होती. पण सत्ता गेल्यामुळे सैरभैर झालेल्या भाजपाने आपला वेळ राजकीय भाषणबाजीतच घातला. परिणारी सत्ताधारी महाआघाडीच्या मंत्र्यांनाही त्यांच्या राजकीय प्रश्नांना उत्तरं देण्यात वेळ खर्ची घालावा लागला. सत्तेतील आमचा भागीदार मित्र शिवसेनेला ‘पुन्हा’ ओढण्याचा भाजपाचा डाव असल्याचं अजूनही त्यांच्या बोलण्यातून जाणवतं पण त्याचा आता काही उपयोग होणार नाही. विकासाच्या गोष्टी करताना राजकीय पतंगबाजी टाळली पाहिजे असं मला वाटतं,” असं रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं.
“बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा असेल तर कौशल्य विकास योजना प्रभावीपणे राबवण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षांत तीन ते चार हजार कोटी खर्च करुन सुरु केलेले २२०० स्कील डेव्हलपमेंट सेंटर आज बंद पडले आहेत. राज्याचा विकासदर घसरत आहे. पाच वर्षांपूर्वी आघाडी सरकारच्या काळात देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेलं राज्य गेल्या पाच वर्षात १३ व्या क्रमांकावर गेलं ही आपल्यासाठी निश्चितच भूषणावह गोष्ट नाही. पदव्या घेऊनही बेकारी वाढतच आहे,” अशी टीका रोहित पवार यांनी यावेळी केली.
“पोलिसांवर कामाचा प्रचंड भार पडत असताना आणि तरुणांच्या हाताला काम नसताना गेल्या पाच वर्षांत एकही पोलीस भरती झाली नाही. दरवर्षी दहा टक्के कारखाने बंद पडत आहेत. शिक्षणाच्या बाबतीतही राज्याची मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार २०१५-१६ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेलं आपलं राज्य २०१८-१९ मध्ये सहाव्या क्रमांकावर फेकलं गेलं आहे. एक लाख २२ हजार मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत, तर शिक्षणावरील निधीही दिवसेंदिवस कमी-कमी होत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याची ही अवस्था भीषण आहे,” असं रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं.
रोहित पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून प्रथमच भाषण केल्यानंतरच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, “राज्यातील जनतेचे प्रश्न मांडण्याचं आणि सोडवण्याचं एकमेव सभागृह म्हणजे विधानसभा आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून विरोधी पक्षाकडून घातल्या जाणाऱ्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज झालं नाही. पण तिसऱ्या दिवशी कामकाज सुरळीत सुरु झाल्याने मला बोलण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील माझ्यासारखे अनेक तरुण आमदार पहिल्यांदाच या सभागृहात आले आहेत. या सर्वांनाच बोलण्याची योग्य ती संधी देण्याची विनंती मी सभापती महोदयांना केली”.